Monday, June 28, 2010

रिक्षावाले काका



(छायाचित्र सौजन्य: विकिपीडिया)

''दीपक, खाली ये रे! '' रिक्षावाले काका रस्त्यावरून जोरदार हाळी देतात. शून्य प्रतिसाद.
दोन मिनिटांनी पुन्हा एक हाक, ''ए दीपक, चल लवकर! ''
दीपकच्या आईचा अस्फुट आवाज, ''हो, हो, येतोय तो! जरा थांबा! ''
पुन्हा पाच मिनिटे तशीच जातात.
''ए दीपक, आरं लवकर ये रं बाबा, बाकीची पोरं खोळंबल्याती! ''
रिक्षाचा हॉर्न दोन-तीनदा कर्कश्श आवाजात केकाटतो आणि रिक्षावाल्या काकांच्या हाकेची पट्टीही वर चढते.
समोरच्या इमारतीत राहणाऱ्या छोट्या दीपकची रोज शाळेच्या वेळेला येणाऱ्या रिक्षाकाकांच्या हाकांना न जुमानता आपल्याच वेळेत खाली येण्याची पद्धत मला खरंच अचंबित करते. सकाळी सात-साडेसातच्या सुमारास आमच्या गल्लीत असेच दोन-तीन रिक्षाकाका आपापल्या चिमुकल्या प्रवाशांना त्यांच्या घरातून शाळेत नेण्यासाठी येत असतात. कधी तर त्यांच्या रिक्षाचे इंजिन तसेच चालू असते. सकाळी सकाळी तो पटर्र पटर्र आवाज ऐकला की खरे तर माझ्या मस्तकात कळ जाते. पण त्याचबरोबर त्या रिक्षातल्या चिटकुऱ्या पोरांचा किलबिलाटही चालू असतो तो कानांना सुखावत असतो.
''ए मला धक्का नको हां देऊ, तुझं नाव सांगीन मी रिक्षाकाकांना... ''
"ओ काका, ही बघा ना, मला त्रास देते आहे.... ''
''ए सरक जरा तिकडे, जाड्या.... ढोल्या.... ''
''ओ काका, चला ना लवकर, उशीर होतोय किती.... ''
मग रिक्षाकाकांना बसल्या जागेवरुन सामूहिक हाका मारण्याचा एकच सपाटा. ''काका, चला ऽऽऽऽऽ'' चा कानात दडे बसवणारा घोष. त्या चिमखड्या वामनमूर्ती आकाराने जरी लहान दिसत असल्या तरी त्यांच्या फुफ्फुसांची ताकद त्यांच्या आवाजातून लगेच लक्षात येते. सरावलेले रिक्षाकाकादेखील पोरांना उखडलेल्या आवाजात सांगतात, ''ठीक आहे. आता तुम्हीच आणा त्या दीपकला खाली! '' कधी कधी ही मुले काकांनी सांगण्याची वाट न पाहता आपण होऊनच सुरू करतात, ''ए दीपक, लवकर ये रे खाली.... आम्हाला तुझ्यामुळे उशीर होतोय!!!! '' पावसाळ्यातल्या बेडकांच्या वाढत्या आवाजातील डरांव डरांव सारखे यांचेही आवाज मग आसमंतात घुमू लागतात. टाळ्या, हॉर्न, हाकांचा सपाटा सुरू होतो नुसता!
यथावकाश ह्या सर्व कंठशोषाला जबाबदार दीपक त्याच्या आजोबांचे किंवा बाबांचे बोट धरून येतो खाली डुलत डुलत. सोबत आलेल्या मोठ्या व्यक्तीच्या हातातील सॅक, वॉटरबॅग, लंचबॉक्सची पिशवी ते रिक्षाकाकांकडे सोपवतात. दीपक वर बाल्कनीकडे बघत, लेकाला घाईघाईने टाटा करायला गाऊनवर ओढणी घालून आलेल्या आपल्या आईला हात हालवत ''बाय'' करतो. तिच्या ''डबा खा नीट वेळेवर, '' वगैरे सूचना समजल्यासारखी मुंडी हालवतो आणि रिक्षात बसलेल्या पोरांना धक्काबुक्की करत, खिदळत, इतरांच्या किलबिलाटात सामील होत शाळेकडे रवाना होतो.
थोड्याफार मिनिटांच्या फरकाने आमच्या रस्त्यावर हे नाट्य रोज सकाळी दोन-तीनदा घडते. पात्रांची नावे फक्त बदलतात. कधी तो ''रोहन'' असतो, तर कधी ''हर्षा''. तेच ते पुकारे, तीच ती घाई, तेच संवाद आणि रिक्षाकाकांचे साऱ्या पोरांना कातावून ओरडणे, ''आरे, आता जरा गप ऱ्हावा की! किती कलकलाट करताय रं सकाळच्या पारी! ''
मे महिन्याच्या सुट्टीत मात्र सारे काही शांत असते. एरवी त्या पोरांच्या अशक्य हाकांना कंटाळलेली मी नकळत कधी त्यांच्या हाकांची प्रतीक्षा करू लागते ते मलाच कळत नाही!
कधी काळी लहानपणी मीही शाळेत रिक्षेने जायचे. काळी कुळकुळीत, मीटर नसलेली आमची ती टुमदार रिक्षा आणि आमचे रिक्षाकाकाही तसेच काळेसावळे, आकाराने ऐसपैस! त्यांचे नाव पंढरीनाथ काका. कायम पांढरा शुभ्र झब्बा- लेंगा घातलेली त्यांची विशाल मूर्ती दूरूनही लगेच नजरेत ठसत असे. मंडईजवळच्या बोळात दोन बारक्याशा खोल्यांच्या अरुंद जागेत ते राहायचे. जेमतेम इयत्ता चौथीपर्यंत शिक्षण. मनाने अतिशय दिलदार माणूस! तोंडात कधी शिवी नाही की व्यसनाचा स्पर्श नाही. माळकरी, सश्रद्ध, तोंडात सतत पांडुरंगाचे नाव! आणि तरीही पोरांवर रोज भरपूर ओरडणार अन् त्यांच्यावर तेवढीच मायाही करणार! आईवडीलांच्या गैरहजेरीत मुलांची शाळेत ने-आण करताना ते जणू त्यांचे मायबाप बनत. त्यांना स्वतःला मूलबाळ नव्हते. कदाचित त्याचीच कसर ते आमच्यावर माया करून भरून काढत असावेत. त्यांचा आरडाओरडा त्यामुळेच आम्हाला कधी फार गंभीर वाटलाच नाही. कधी शाळेतून घरी सोडायला उशीर झाला तर ''पोरास्नी भुका लागल्या आस्तील,'' करत त्यांच्या तुटपुंज्या उत्पन्नातून त्यांनी खाऊ घातलेले खारे दाणे, फुटाणे, शेंगा म्हणूनच लक्षात राहिल्या! त्यांना कधी आम्हाला घरी नेण्यासाठी शाळेच्या दाराशी यायला उशीर झाला की अगदी डोळ्यांत प्राण आणून आम्ही त्यांची वाट बघायचो. आणि वाहतुकीच्या गर्दीत ती चिरपरिचित रिक्षा दिसली की मग कोण तो आनंद व्हायचा!
कधी शाळेतल्या जंगलजिम किंवा घसरगुंडीवर शाळा सुटल्यानंतर खेळायची हुक्की आली असेल तर काकांच्या हातात दप्तर कोंबून आम्ही घसरगुंडीच्या दिशेने पसार! शेवटी बिचारे पंढरी काका यायचे आम्हाला शोधत शोधत! आपल्या छोट्याशा घरी नेऊन वर्षातून एकदा आम्हाला सगळ्या मुलांना हौसेने खाऊ घालण्याचा त्यांचा आटापिटा, कधी कोणाला लागल्या-खुपल्यास त्यांनी तत्परतेने लावलेले आयोडीन, रिक्षातल्या कोण्या मुलाची काही वस्तू शाळेत हरवल्यास ती शोधायला केलेली मदत, कोणाशी भांडण झाल्यास घातलेली समजूत यांमुळे ते आम्हा मुलांमध्ये लोकप्रिय होते. त्यामुळेच जेव्हा रिक्षा सुटली तेव्हा खूप वाईट वाटले होते. नंतर कधी ते रस्त्यात दिसले तर स्वखुशीने चटकन लिफ्ट पण देत असत. निरोप घेताना मग उगाच त्यांचे डोळे डबडबून येत.
रिक्षाच्या बाबत माझ्या शेजारणीच्या छोट्या मुलीची तर अजूनच वेगळी तऱ्हा! साडेसाताची शाळा म्हटल्यावर पावणेसातला रिक्षाकाका इमारतीच्या दारात हजर होत. आणि त्यावेळी ही छोटुकली जेमतेम उठून दात घासत असे! मग एकच पळापळ!! एकीकडे रिक्षाकाकांच्या हाकांचा सपाटा आणि दुसरीकडे शेजारीण व तिच्या मुलीतले ''प्रेमळ'' संवाद!!! कित्येकदा माझी शेजारीण लेकीची वेणी लिफ्टमधून खाली जाताना घालत असल्याचे आठवतंय! आज तिला त्या समरप्रसंगांची आठवण करुन दिली की खूप गंमत वाटते.
ह्या सर्व गोष्टी आठवायचं कारण म्हणजे लहान मुलांची शाळेतून ने-आण करण्यासाठीच्या तीन आसनी रिक्षांवर आता सरकारने टप्प्याटप्प्याने बंदी घालायचे ठरविले आहे. त्यांची जागा आता बसेस घेणार आहेत. कारणही सुरक्षिततेचे आहे. एका परीने ते योग्यच आहे. कारण मुलांना अशा रिक्षांमधून कश्या प्रकारे दाटीवाटीने, कोंबलेल्या मेंढरांगत नेले जाते तेही मी पाहिले आहे. गेल्या वर्षी स्वाईन फ्लूच्या साथीमुळे अनेक पालकांनी आपल्या मुलांना रिक्षाऐवजी व्यक्तिशः शाळेत नेऊन सोडणे पसंत केले. तेव्हाच ह्या व्यवसायाला घरघर लागायला सुरुवात झाली होती. सरकारच्या नव्या धोरणामुळे गेली किमान तीस वर्षे चालू असणारा हा व्यवसाय काही काळाने बंद होण्याची चिन्हे दिसत आहेत. शाळांच्या दारांशी आणि रस्त्यांवर आता मुलांनी ठसाठस भरलेल्या, डुचमळत्या रिक्षाही दिसणार नाहीत आणि रोज सकाळी इमारतीच्या दाराशी ''ओ काका, चला नाऽऽऽ, उशीर होतोय,'' चा गिल्लाही ऐकू येणार नाही. मुलांच्या बसेस मुलांना अरुंद गल्ल्यांमधून वाट काढत घराच्या दाराशी नक्कीच सोडणार नाहीत. त्यांचे थांबे ठराविकच असतात.
तेव्हा रिक्षाकाकांचे ते मुलांना जिव्हाळा लावणारे पर्व ओसरल्यात जमा आहे. त्यांना आता उत्पन्नाचे दुसरे मार्ग शोधायला लागतील. त्यातील कितीतरी रिक्षाकाका वयाची चाळीशी ओलांडलेले आहेत. पुन्हा नव्याने रोजीरोटीचा मार्ग शोधायचा हे त्यांच्यासमोरचे मोठे आव्हान आहे. ''कालाय तस्मै नमः '' म्हणत पुढे जायचे ठरवले तरी इतकी वर्षे मुलांना जीव लावणारे, त्यांची काटाकाळजीने ने-आण करणारे, त्यांना वेळप्रसंगी रागावणारे, त्यांच्या जडणघडणीत - शिस्त लावण्यात आपलेही योगदान देणारे अनेक ''पंढरी''काका आणि त्यांचे ह्या उत्पन्नावर चालणारे संसार आठवत राहतात. आणि नकळत मनाला एक अस्पष्ट रुखरुख लागून राहते!
-- अरुंधती

Thursday, June 17, 2010

वारिस शाह नूं -- अमृता प्रीतमच्या काव्याचा अनुवाद


(पिंजर चित्रपटात ह्या काव्याचा समर्पक उपयोग)
(छायाचित्र स्रोत : विकीपीडिया)

गेले कितीतरी दिवस तिची ती कविता मनात ठाण मांडून बसली आहे. त्या कवितेवर लिहिण्यासाठी अनेकदा सुरुवात केली.... पण त्या अभिजात कवयित्रीच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेल्या त्या काव्याचा अनुवाद मांडताना ''लिहू की नको'' अशी संभ्रमावस्था व्हायची... लिहिताना माझे हात उगाचच थबकायचे! आज मनाने धीर केला आणि तो अपूर्ण अनुवाद पूर्ण केला.
ते अजरामर काव्य आहे अमृता प्रीतम यांच्या हृदयस्पर्शी लेखणीतून उतरलेलं, ''वारिस शाह नूं''......
भारत व पाकिस्तानच्या फाळणीचे दरम्यान पंजाब प्रांताचे जे विभाजन झाले त्या मानवनिर्मित चक्रीवादळात कित्येक कोवळ्या, निरागस बालिका - युवती, अश्राप महिला वासना व सूडापोटी चिरडल्या गेल्या. एकीकडे रक्ताचा चिखल तर दुसरीकडे आयाबहिणींच्या अब्रूची लक्तरे छिन्नविछिन्न होत होती. प्रत्येक युद्धात, आक्रमणात, हिंसाचारात अनादी कालापासून बळी पडत आलेली स्त्री पुन्हा एकदा वासना, हिंसा, सूड, द्वेषाच्या लचक्यांनी रक्तबंबाळ होत होती. अनेक गावांमधून आपल्या लेकी-बाळींची अब्रू पणाला लागू नये म्हणून क्रूर कसायांगत नंगी हत्यारे परजत गिधाडांप्रमाणे तुटून पडणाऱ्या नरपशूंच्या तावडीत सापडण्याअगोदरच सख्खे पिता, बंधू, चुलत्यांनी आपल्याच लेकीसुनांच्या गळ्यावरून तलवारी फिरवल्या. शेकडो मस्तके धडावेगळी झाली. अमृता आधीच निर्वासित असण्याचे, तिच्या लाडक्या पंजाबच्या जन्मभूमीपासून कायमचे तुटण्याचे दुःख अनुभवत होती. त्या वेळी तिच्या संवेदनशील कवीमनावर आजूबाजूच्या स्त्रियांचे आर्त आक्रोश, त्यांच्या वेदनांच्या ठुसठुसत्या, खोल जखमा, हंबरडे आणि आत्मसन्मानाच्या उडालेल्या चिंधड्यांचे बोचरे ओरखडे न उठले तरच नवल! अशाच अस्वस्थ जाणीवांनी विद्ध होऊन, एका असहाय क्षणी तिच्या लेखणीतून तिने फोडलेला टाहोच ''वारिस शाह नूं'' कवितेत प्रतीत होतो. १९४७ साली लिहिली गेलेली ही कविता ''हीर'' या लोकप्रिय दीर्घकाव्याच्या - हीर व रांझ्याच्या अजरामर व्यक्तिरेखांच्या रचनाकाराला, वारिस शहाला उद्देशून लिहिली आहे!
हे वारिस शाह!
आज मी करते आवाहन वारिस शहाला
आपल्या कबरीतून तू बोल
आणि प्रेमाच्या तुझ्या पुस्तकाचे आज तू
एक नवीन पान खोल

पंजाबच्या एका कन्येच्या आक्रोशानंतर
तू भले मोठे काव्य लिहिलेस
आज तर लाखो कन्या आक्रंदत आहेत
हे वारिस शाह, तुला विनवत आहेत

हे दुःखितांच्या सख्या
बघ काय स्थिती झालीय ह्या पंजाबची
चौपालात प्रेतांचा खच पडलाय
चिनाब नदीचं पाणी लाल लाल झालंय
कोणीतरी पाचही समुद्रांमध्ये विष पेरलं

आणि आता तेच पाणी ह्या धरतीत मुरतंय
आपल्या शेतांत, जमिनीत भिनून
तेच जिकडे तिकडे अंकुरतंय...

ते आकाशही आता रक्तरंजित झालंय
आणि त्या किंकाळ्या अजूनही घुमताहेत

वनातला वाराही आता विषारी झालाय
त्याच्या फूत्कारांनी जहरील्या
वेळूच्या बासरीचाही नाग झालाय

नागाने ओठांना डंख केले
आणि ते डंख पसरत, वाढतच गेले
बघता बघता पंजाबाचे
सारे अंगच काळेनिळे पडले

गळ्यांमधील गाणी भंगून गेली
सुटले तुटले धागे चरख्यांचे
मैत्रिणींची कायमची ताटातूट
चरख्यांची मैफिलही उध्वस्त झाली

नावाड्यांनी साऱ्या नावा
वाहवल्या आमच्या सेजेसोबत
पिंपळावरचे आमचे झोके
कोसळून पडले फांद्यांसमवेत

जिथे प्रेमाचे तराणे घुमायचे
ती बासरी न जाणे कोठे हरवली
आणि रांझाचे सारे बंधुभाई
बासरी वाजवायचेच विसरून गेले

जमिनीवर रक्ताचा पाऊस
कबरींना न्हाऊ घालून गेला
आणि प्रेमाच्या राजकुमारी
त्यांवर अश्रू गाळत बसल्या

आज बनलेत सगळे कैदो*
प्रेम अन सौंदर्याचे चोर
आता मी कोठून शोधून आणू
अजून एक वारिस शाह....

(* कैदो हा हीरचा काका होता, तोच तिला विष देतो! )
अनुवादक - अरुंधती 
कवयित्री अमृता प्रीतम (छायाचित्र स्रोत : विकिपीडिया)  
मूळ काव्य :
(पिंजर चित्रपटात ह्या कवितेचा सुरेख वापर केला गेला आहे. )
वारिस शाह नूं
आज्ज आखां वारिस शाह नूं
कित्थे कबरां विचों बोल ते आज्ज किताबे ईश्क दा
कोई अगला वर्का फोल
इक रोई सी धी पंजाब दी तूं लिख लिख मारे वैण
आज्ज लखां धिया रोंदियां तैनूं वारिस शाह नूं कैण
उठ दर्दमंदा देया दर्दिया उठ तक्क अपना पंजाब
आज्ज वेले लाशा विछियां ते लहू दी भरी चिनाव
किसे ने पंजा पाणियां विच दित्ती जहर रला
ते उणा पाणियां धरत नूं दित्ता पानी ला
इस जरखेज जमीन दे लू लू फुटिया जहर
गिट्ठ गिट्ठ चड़ियां लालियां ते फुट फुट चड़िया कहर
उहो वलिसी वा फिर वण वण वगी जा
उहने हर इक बांस दी वंजली दित्ती नाग बना
नागां किल्ले लोक मूं, बस फिर डांग्ग ही डांग्ग,
पल्लो पल्ली पंजाब दे, नीले पै गये अंग,
गलेयों टुट्टे गीत फिर, त्रखलों टुट्टी तंद,
त्रिंझणों टुट्टियां सहेलियां, चरखरे घूकर बंद
सने सेज दे बेड़ियां, लुड्डन दित्तीयां रोड़,
सने डालियां पींग आज्ज, पिपलां दित्ती तोड़,
जित्थे वजदी सी फूक प्यार दी, ओ वंझली गयी गवाच,
रांझे दे सब वीर आज्ज भुल गये उसदी जाच्च
धरती ते लहू वसिया, कब्रां पइयां चोण,
प्रीत दिया शाहाजादियां अज्ज विच्च मजारां रोन,
आज्ज सब्बे कैदों* बन गये, हुस्न इश्क दे चोर
आज्ज कित्थों लाब्ब के लयाइये वारिस शाह इक होर
--- अमृता प्रीतम

यू ट्यूब वर अमृताच्या स्वत:च्या आवाजात हे गाणे ऐका : 

"> 

Monday, June 14, 2010

भेट तिची माझी

ती येईल का नक्की सांगितल्याप्रमाणे? की आयत्या वेळेस नवेच खेंगट काढेल? तिचा नवरा वैतागणार तर नाही ना, बायको सकाळी सकाळी तयार होऊन एवढी कोणाला भेटायला चालली आहे म्हणून?

मी असेच काहीसे विचार करत घरातून निघाले तेव्हा सकाळचे सव्वा आठ झाले होते. कोपऱ्यावरच रिक्षा मिळाली. रिक्षावाल्याला ''रुपाली हॉटेल, एफ्. सी. रोड'' सांगितले आणि मी निवांत झाले.
आज बऱ्याच वर्षांनी कॉलेजमधील दूर परराज्यात राहायला गेलेल्या एका मैत्रिणीला भेटायचा योग जुळून आला होता. गेला आठवडाभर आमचे वेळापत्रक एकमेकींशी लपंडाव खेळत होते. ज्या दिवशी तिला वेळ असे त्या दिवशी नेमके मला काम असे. आणि ज्या सायंकाळी मी मोकळी असे त्या वेळेस तिच्या इतर भेटीगाठी ठरलेल्या असत. शेवटी आम्ही दोघीही कंटाळलो. असा काही नियम आहे का, की संध्याकाळीच भेटले पाहिजे? ठरले तर मग! सकाळी आमच्या आवडत्या रुपालीत नाश्त्यालाच भेटायचे, भरपूर गप्पा ठोकायच्या, सकाळच्या शांत वेळेचा आनंद घेत एकमेकींची ख्यालीखुशाली जाणून घ्यायची असा काहीसा होता आमचा बेत! आधी वाटले होते, तिला घरी बोलवावे किंवा आपण तिच्या माहेरी धडकावे... पण तिच्या-माझ्या घरातले अंतर, घरी गप्पांमध्ये येणारे व्यत्यय वगैरे बघता बाहेरच भेटणे जास्त सोयीचे होते.
सकाळच्या थंडगार हवेत अंगावर झुळुझुळू वारे घेत रिक्शाने जात असताना मनात अनेक विचार येत होते.... कशी दिसत असेल आपली मैत्रीण? आधी होती तशीच असेल की आता वागण्या-बोलण्यात आणि स्वभावातही फरक पडला असेल? कारण मध्ये तब्बल एक तपाहून जास्त काळ लोटलेला. कॉलेज सुटले तसा आमचा संपर्कही तुटला. मधल्या काळात मी पुण्याबाहेर होते. आणि मी परत आले तेव्हा तिने घर बदलले होते व लग्न होऊन ती सासरीही गेली होती. पुढची अनेक वर्षे आम्ही एकमेकींविषयी ''आता ती कोठे असेल, काय करत असेल, कशी असेल, '' वगैरे विचार करण्यात घालवली. मग दोन वर्षांपूर्वी आमच्या कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचे जे स्नेहसंमेलन झाले त्यात सर्वांना एकमेकांचे ठावठिकाणे लागत गेले. अचानक मंडळी ऑर्कुटवर, फेसबुकवर दिसू लागली. बघता बघता आमच्या बॅचचे बरेच विद्यार्थी ह्या सोशल नेटवर्किंग साईट्सचे सदस्य झाले. त्यातच माझी ही हरवलेली मैत्रीण पुन्हा गवसली.
तसे गेल्या सहा-आठ महिन्यांमध्ये आम्ही एकमेकींशी इ-मेल, चॅट, स्क्रॅप्स द्वारा संपर्कात होतो. पण प्रत्यक्ष भेट ही वेगळीच असते ना! ती पुण्यात सुट्टीला आल्याचे निमित्त साधून आमचा हा थेट भेटीचा कार्यक्रम ठरला होता!
मी रुपालीला पोचले तेव्हा आठ अडतीस झाले होते. क्षणभर मला वाटले, ही बायो येऊन ताटकळत थांबली तर नसेल ना? आमचे ठीक साडे आठला भेटायचे ठरले होते! हो, आता इतकी वर्षे ती आर्मी वाइफ आहे म्हटल्यावर वेळेच्या बाबतीत कडकपणा नक्की येऊ शकतो! पण नाही.... बाईसाहेब माझ्यापेक्षाही लेटच होत्या! तरी मी एकदा तिच्या घरी फोन करून ती निघाल्याची खात्री करून घेतली.
एव्हाना मनात खूप हुरहूर दाटली होती. कधी एकदा भेटेन तिला, असे झाले होते. खरे सांगायचे तर आम्ही एवढ्या काही घट्ट मैत्रिणी अजिबात नव्हतो. पण परप्रांतीय आणि परदेशी विद्यार्थ्यांच्या भाऊगर्दीत आमच्या वर्गातील तुटपुंज्या आद्य पुणेकर विद्यार्थ्यांपैकी असल्यामुळे नकळतच आमचे स्नेहबंध पक्के झाले होते. एकमेकींच्या स्वभावातील गुणदोषांसह पारखून घेऊन त्याबद्दलची मैत्रीतील स्वीकृतीही होती त्यात! आणि म्हणूनच बऱ्याच वर्षांनी तिला जेव्हा भेटायचा योग जुळून आला तेव्हा मनात संमिश्र भावनांनी दाटी केली होती!
''हाssssय डियर!! '' तिच्या आवाजासरशी एवढा वेळ रस्त्याकडे गुंगून पाहणारी मी एकदम भानावर आले. बाईसाहेब बहिणीची स्कूटी घेऊन आलेल्या दिसत होत्या. तोच चेहरा, तेच ते हसू.... फक्त आता सर्वच आकार रुंदावलेले.... तिचीही तीच प्रतिक्रिया असणार! डोळा मारा
दोघींनीही लगोलग रुपालीत प्रवेश करून एका बाजूचे, रस्त्यालगतचे रिकामे टेबल पटकावले. येथून रस्त्यावरची ''वर्दळ'', ''हिरवळ'' पण छान दिसत होती आणि शांतपणे, विनाव्यत्यय गप्पाही मारता येणार होत्या!
सुरुवातीच्या चौकश्या झाल्यावर तिने तिच्या प्रेमविवाहाची चित्तरकथा सांगितली. तिचा नवरा दाक्षिणात्य, आणि त्यात आर्मीतला! घरून वडिलांचा प्रचंड विरोध होता ह्या लग्नाला. त्यांना शक्यतो पुण्यात राहणारा, सर्वसामान्य आयुष्य जगणारा जावई हवा होता. पण माझ्या मैत्रिणीने सुरुवातीपासूनच आर्मीतल्या मुलाशीच लग्न करायचे ठरवले होते. त्यापुढे मग वडिलांनाही माघार घ्यावी लागली. तिचे लग्न ठरले तेव्हा तिचा नवरा सी. एम. ई मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करत होता. त्याच वर्षी कारगिलचे युद्ध घडले. मैत्रिणीच्या वडिलांना कोण तो आनंद! कारण युद्ध म्हटल्यावर सर्व आर्मी कोर्सेस बंद झाले होते व मैत्रिणीच्या भावी नवऱ्याला कधीही सीमेवर जावे लागणार होते! तिच्या वडिलांना वाटले, आता ह्यांचे लग्न नक्की लांबणीवर पडणार! पण सुदैवाने त्याला सीमेवर जावे लागले नाही व लग्न ठरल्या प्रमाणे वेळेतच पार पडले! कालांतराने वडिलांचा विरोध मावळला आणि आता सासरे-जावई गुण्यागोविंदाने नांदतात. मला हा सर्व किस्सा ऐकून खूपच मजा वाटली. दोघींनीही त्यावर मोकळेपणाने हसून घेतले.
आर्मी वाइफ म्हटल्यावर नवऱ्यापासून अनेक महिने होणारी ताटातूट, मनात असलेली धाकधूक, एकटीने घ्यावे लागणारे निर्णय, निभवाव्या लागणाऱ्या जबाबदाऱ्या, त्याचबरोबर संपन्न लोकसंग्रह, समृद्ध जीवनशैली, आर्मीमधील एकमेकांच्या कुटुंबांना आधार देण्याची पद्धत यांसारख्या तिच्या आयुष्यातील अनेक कडू-गोड घटना ऐकतानाच आम्ही आमच्या रुपाली स्पेशल लाडक्या पदार्थांना ऑर्डर करत होतो. निघायची घाई नव्हती, त्यामुळे अगदी संथ लयीत ऑर्डरी देणे चालू होते. एव्हाना शेजारच्या टेबलावर एक कॉलेजवयीन प्रणयी जोडपे एकमेकांचे हात हातात घेऊन बसले होते. त्यांच्याकडे आमच्या ''पोक्त'' नजरांतून हसून बघत आम्हालाही कॉलेजचे ते रंगीबेरंगी दिवस आठवले. त्या गुट्टरगू करणाऱ्या जोड्या, ब्रेक-अप्स, मेक-अप्स, ड्रामेबाजी, वावड्या, भानगडी आणि अजून बरेच काही. आमच्या बॅचमधील काही जोड्यांच्या प्रेमप्रकरणांची परिणिती लग्नांत झाली खरी... पण त्यातही काहींचे ब्रेक-अप्स झाले. उरलेल्या काहींमधील सर्वांचीच लग्नेही यशस्वी झाली नाहीत. कोणाचे करियर गडबडले. कोणी उध्वस्त झाले. कोणी पार वाया गेले. यशोगाथाही अनेक घडल्या. आज आमच्या वर्गातील बारा-पंधराजण देशभरातील मानाच्या पदांवर कार्यरत आहेत किंवा नाव कमावून आहेत. सर्वांचे ताळेबंद घेत असताना जाणवत होते, की त्या वयात जीवनमरणाचे वाटणारे गहन प्रश्न आता त्यांचे महत्त्व पार गमावून बसले होते! असेच होत असते का आयुष्यात? त्या त्या टप्प्यावर खूप गुंतागुंतीचे वाटणारे प्रश्न, समस्या कालांतराने धार गेलेल्या बोथट शस्त्रासारखे गुळमुळीत होऊन जातात? की ती आपल्या दृष्टिकोनातील परिपक्वता असते? त्या काळात अनेक फसलेल्या जोड्यांमधील मुले-मुली आज आपल्या वेगळ्या जोडीदारांबरोबर आनंदात संसार करत आहेत.... पण जेव्हा त्यांचा ब्रेक-अप झाला तेव्हा हेच लोक जीवाचे बरेवाईट करायला निघाले होते... किंवा महिनोंमहिने निराशेने घेरले गेले होते. काहीजण तू नही तो और सही, और नही तो और सही ह्याही पठडीतले होते... पण त्या फुलपाखरांकडे कोणीच फार सीरियसली बघत नसे!
जी मुले आमच्या वर्गात अगदी सर्वसाधारण समजली जायची, काठावर पास व्हायची, तीच आज आपापल्या क्षेत्रात आघाडीवर आहेत. आणि जे लोक मेरिटामध्ये यायचे, वर्गात कायम पुढे असायचे ते आज करियरच्या वेगळ्याच वाटा चोखाळत आहेत! आमच्या वर्गमैत्रिणींपैकी अनेकींनी लग्नानंतर मुले-बाळे झाल्यावर घरी बसणेच पसंत केले किंवा स्वीकारले. कोणी त्यातूनही मार्ग काढून वेगळा व्यवसाय करायच्या प्रयत्नात आहेत. पण घेतलेल्या शिक्षणाचा वापर करून त्याच क्षेत्रात उडी टाकण्यास, उमेदवारी करण्यास इच्छुक मात्र विरळ्याच!
अश्या आणि अजून बऱ्याच साऱ्या गप्पा मारता मारता तीन तास कसे सरले ते कळलेच नाही. वेटर एव्हाना तीनदा बिले बदलून गेला होता! कारण दर खेपेस त्याने बिल दिले की आम्ही थोड्या वेळाने पुन्हा अजून काही तरी ऑर्डर करत असू... कॉलेजची ही सवय मात्र अद्यापही कायम होती!
शेजारच्या प्रणयी जोडप्याची जागा पन्नाशीतील एका जोडप्याने घेतली होती. दोघेही आपापल्या जॉगिंग सूटमध्येच आले होते. आमच्यासमोर त्यांनी भराभर नाश्ता, ज्यूस संपवला आणि एकमेकांशी फार न बोलता, न रेंगाळता ते रवानाही झाले. मग मात्र एक मोठा पेन्शनरांचा जथा आला. आमच्या आजूबाजूच्या सर्व खुर्च्या-टेबलांना व्यापून उरत कलकलाट करू लागला. मला गंमतच वाटली! एरवी कॉलेजकुमारांच्या जोरजोरात गप्पा मारणाऱ्या घोळक्याकडे आजूबाजूचे आजी-आजोबा कपाळाला आठ्या घालून पाहताना दिसतात. आज इथे ह्या कलकलाट करणाऱ्या पेन्शनरांच्या घोळक्याकडे बघताना आजूबाजूच्या तुरळक तरुण जोड्यांच्या कपाळावर सूक्ष्म आठ्यांचे जाळे विणले गेले होते.... मीही त्याला अपवाद नव्हते!
शेजारच्या टेबलवरच्या आजोबांनी आपल्या मित्राच्या मांडीवर हसत जोरात थाप मारली आणि त्या धक्क्याने टेबलावरचा पाण्याचा ग्लास लवंडून सभोवताली पाणीच पाणी झाले. सर्वांची ते पाणी आपल्या कपड्यांपासून दूर ठेवता ठेवता एकच तारांबळ उडाली. त्यांचा तो अशक्य गोंधळ पाहताना मला हसू येत होते व आता निघायला हवे ह्याचीही जाणीव होत होती.
जणू माझ्या मनातले विचार पकडल्याप्रमाणे मैत्रिणीच्या सेलफोनची रिंग वाजली. पलीकडून तिचा लेक बोलत होता, ''मम्मा, आप घर वापिस कब आ रही हो? पापा बोल रहे है, हमारे लिए भी इडली पार्सल लेके आना... नानीमां ने फिरसे वो बोअरिंग उप्पीट बनाया है । मैं नही खानेवाला... ''
आमच्या मैत्रीच्या वर्तुळाबाहेरचे जग आता पुन्हा खुणावू लागले होते. मन अजून गप्पा मारून भरले नव्हते... कदाचित ते कधी भरणारही नाही.... तीच तर मजा असते मैत्रीची.... पण आता आपापल्या कामाला निघायलाच हवे होते! मैत्रिणीला तिचा लेक पुकारत होता आणि मलाही बाजूला ठेवलेले उद्योग दिसू लागले होते! आता निरोप घेतला की आपण एकमेकींना एकदम एका वर्षाने, पुढील खेपेस ती पुण्यात येईल तेव्हाच भेटू शकणार ही भावना अस्वस्थ करत होती. पण ईमेल्स, ऑर्कुट वगैरे माध्यमातून एकमेकींशी तुटक का होईना, गप्पा नक्की मारता येतील हीदेखील खात्री होती आता! जड अंतःकरणानेच आम्ही एकमेकींचा निरोप घेतला. मन तरीही कोठेतरी हलके-फुलके झाले होते. मैत्रीचे धागे पुन्हा एकदा जुळले होते.... नव्हे, होत्या धाग्यांची वीण अजूनच पक्की झाली होती! जुन्या आठवणींना उजाळा मिळताना नव्या आठवणीही तयार झाल्या होत्या. एकीकडे तिची स्कूटी रहदारीत भर्रदिशी दिसेनाशी झाली आणि दुसरीकडे माझ्यासमोरही एक रिकामी रिक्शा येऊन थांबली.
काळाच्या ओघात दूर गेलेल्या, मागे पडलेल्या बाकीच्या मित्रमैत्रिणींनाही लवकरच संपर्क करायचे मनाशी ठरवून मी रिक्शावाल्याला पत्ता सांगितला आणि एका अनामिक नव्या हुरुपाने मार्गस्थ झाले!
--- अरुंधती

Sunday, June 06, 2010

पाद्रीबुवांची मराठी शिकवणी

(छायाचित्र स्रोत : विकीपिडीया) 
तुम्ही कधी कोणाला आपली मातृभाषा गोर्‍या साहेबाच्या भाषेतून शिकवायची कसरत केली आहे? आणि त्यातून तुमचा आधीचा अनुभव अगदीच माफक असताना व तुमचा विद्यार्थी कोणी ऐरागैरा नाही तर तो एक ख्रिश्चन मिशनरी पाद्री आहे हे माहीत असताना? मला हा अनोखा अनुभव घेण्याची मजेशीर संधी काही वर्षांपूर्वी मिळाली आणि त्या छानशा अनुभवातून एक सुंदर स्मृतिचित्र तयार होताना मलादेखील काही शिकायला मिळालं.
कॉलेजच्या सोनेरी दिवसांमधील गोष्ट. भटकंती, सहली, सिनेमा, हॉटेलिंग, वाढदिवस इत्यादींसाठी कायमच घरून हातखर्चाला दिलेले पैसे कमी पडायचे. अवाजवी पैशांची मागणी केली की घरून सांगितले जायचे, "आपापले पैसे कमावा आणि खर्च करा"! स्वावलंबनाचे व स्वकष्टाच्या कमाईचे महत्त्व समजण्यासाठी त्याचा फार उपयोग झाला. त्यामुळेच मी कधी छोटासा जॉब कर, कधी इंग्रजी वृत्तपत्रांत काहीबाही लेख पाठव तर कधी शिकवण्या घे असे नाना उद्योग करून गरजेबरहुकूम धन जोडण्याच्या कामी असे. सुदैवाने इंग्रजी व मराठी ह्या दोन्ही भाषांच्या टेकूमुळे मला अर्थार्जनाच्या संधींची कधीच कमतरता भासली नाही.
तर एक दिवस अचानक एका मित्रशिरोमणींचा फोन आला. त्यांची ओळख असलेल्या एका मिशनरी संस्थेत एका पाद्रीबुवांना गोर्‍या साहेबाच्या भाषेतून (इंग्रजीतून) मराठी शिकवण्यासाठी सुयोग्य व्यक्ती हवी होती. 'तुला ह्या जॉबमध्ये इंटरेस्ट आहे का? ' अशी पलीकडून पृच्छा झाली. काहीतरी वेगळे करायला मिळते आहे म्हणून मी लगेच होकार दिला. झाले! मिशनच्या मुख्य पाद्रींनी माझी एक अनौपचारिक मुलाखत घेतली. सौम्य, मृदू बोलणे व हसरे व्यक्तिमत्त्व असलेल्या ह्या पाद्रींनी जणू माझी बरीच जुनी ओळख असल्याप्रमाणे माझे स्वागत केले. माझ्या सोयीची वेळ, पगाराची रक्कम आणि कामाची साधारण रूपरेषा इत्यादी गोष्टींची चर्चा करून झाल्यावर त्यांनी मला त्यांच्या संस्थेच्या समृद्ध पुस्तकालयातून हवी ती संदर्भपुस्तके, शब्दकोश इ. घरी नेण्याचीही परवानगी दिली. ते सर्व घबाड पाहिल्यावर मला काय आनंद झाला म्हणून सांगू! घरी मी अक्षरशः उड्या मारीत परत आले.
त्यानंतर मी माझ्या ६८ वर्षांच्या तरुण विद्यार्थ्यालाही भेटले. छोटीशी, जेमतेम पाच फूट उंची असलेली, कमरेतून किंचित वाकलेली मूर्ती, काळासावळा वर्ण, पिकलेले आखूड केस व डोळ्यांना जाडसर भिंगांचा चष्मा! हे माझे विद्यार्थी खास दक्षिण भारताच्या किनारपट्टी प्रदेशातून पुण्याच्या मिशनशी संलग्न असलेल्या शैक्षणिक संस्थेत प्रशासकीय जबाबदारी सांभाळण्यासाठी आले होते. ह्या दाक्षिणात्य पाद्रीबुवांना तरुण अशासाठी म्हणावेसे वाटते कारण वयाच्या ६८व्या वर्षीही त्यांचा काही नवे शिकण्याचा, नवी भाषा - नवी संस्कृती जाणून घेण्याचा उत्साह केवळ अप्रतिम होता! त्यांच्या पहिल्या भेटीतच मला त्यांचे हे गुण भावले. कारण उत्साहापोटी त्यांनी ग्रंथालयातून मराठी शिकण्यासाठी त्यांना उपयुक्त वाटलेली २-३ पुस्तके मला दाखवायला आणली होती. थोडी जुजबी चर्चा करून दुसरे दिवसापासून आमची साहेबाच्या भाषेतून मराठीची शिकवणी सुरू झाली.
तीन महिन्यांच्या आमच्या ह्या शिकवणीत आम्ही दोघांनी आपापल्या भाषा- संस्कृती - तत्त्वज्ञान- विचार इत्यादींची भरपूर देवाणघेवाण केली. आमचे हे पाद्रीबुवा मराठीतून बोलायला बऱ्यापैकी तयार होत असले तरी लिखाणात खूप कच्चे होते. मी त्यांना जो गृहपाठ देत असे तोदेखील ते कसाबसा पूर्ण करीत. जमलं तर चक्क अळंटळं करीत. स्वभाव तसा थोडासा रागीटच होता. शिवाय ते वयाने एवढे मोठे होते की सुरुवातीला मला त्यांना गृहपाठ न करण्याबद्दल, टाळाटाळीबद्दल रागावायचे कसे हाच प्रश्न पडत असे. पण माझी ही अडचण संस्थाप्रमुखांनी सोडवली. "खुशाल शिक्षा करा त्यांना, " प्रमुखांनी मला खट्याळपणे हसत सांगितले. मीही पडत्या फळाची आज्ञा मानून आमच्या ह्या विद्यार्थी पाद्रीबुवांना जास्तीच्या गृहपाठाची शिक्षा देत असे. मग तेही कधी लहान मुलासारखे रुसून गाल फुगवून बसत, तर कधी गृहपाठाचा विषय निघाला की इतर गप्पा मारून माझे लक्ष दुसरीकडे वेधायचा प्रयत्न करीत. कधी माझ्यासाठी चॉकलेट आणीत तर कधी एखादी अवघड किंवा अवांतर शंका विचारून विषयांतर करता येतंय का ते पाहत. अर्थात मीही स्वतः कॉलेजमध्ये शिकत असल्यामुळे मला सर्व दिशाभूल तंत्रे तोंडपाठ होती! त्यामुळे मी त्यांच्या दोन पावले पुढेच असे. मग त्यांच्या चाळिशीच्या फ्रेमआडून माझ्या दिशेने कधी वरमलेले तर कधी मिश्किल हास्यकटाक्ष टाकण्यात येत असत!
ह्या काळात अवांतर गप्पांच्या ओघात त्यांनी मला त्यांची जीवनकहाणीही थोडक्यात सांगितली. दक्षिणेतील एका छोट्याशा गावात परिस्थितीने गरीब ख्रिश्चन कुटुंबात त्यांचा जन्म झाला. बरीच भावंडे आणि पाचवीला पुजलेले दारिद्र्य! शाळेतही त्यांची अभ्यासात खूप प्रगती नव्हती. पण फुटबॉलमध्ये मात्र विलक्षण गती! अगदी आंतरराज्य स्तरावर खेळले ते! पण फुटबॉलमध्ये करियर करण्यासाठी घरची परिस्थिती अनुकूल नव्हती. मग त्यांनी धर्मकार्याला वाहून घेतले. त्याबदल्यात त्यांना ठराविक वेतन सुरू झाले, पोटापाण्याचा प्रश्न मिटला आणि त्या कामातच सगळी हयात गेली. जास्त शिक्षण नसल्यामुळे ह्याही क्षेत्रात अडचणी येत गेल्या. अनेक अपेक्षाभंग पचवावे लागले. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना मिशनच्या कामासाठी पुण्यासारख्या अनोळखी प्रांतात, अनोळखी लोकांमध्ये, वेगळ्या भाषा व संस्कृतीच्या प्रदेशात त्यांना धाडण्यात आले. पण तशाही अवस्थेत त्यांची शिकण्याची तयारी, नवी भाषा आत्मसात करून ती बोलायचा उत्साह खरोखरीच स्तुत्य होता. शारीरिक व्याधी, म्हातारपण, वयाबरोबर येणारी विस्मृती ह्या सर्व आव्हानांना तोंड देत ते आपल्या नव्या जबाबदारीसाठी तयारी करत होते. पण मग कधी कधी त्यांचाही धीर सुटे. संस्थेतील राजकारणाने ते अस्वस्थ होत. आपल्यावर अन्याय झालाय ही भावना त्यांचा पाठलाग करत असे. त्यातल्या त्यात सुख म्हणजे रोजच्या साध्या साध्या वाटणार्‍या गोष्टींमध्ये त्यांना मानसिक आराम मिळत असे. पण तिथेही अपेक्षाभंग झाला की ते कमालीचे अस्वस्थ होत. खास करून मिशनच्या भोजनकक्षात दिले गेलेले खाणे त्यांच्या पसंतीचे नसले की ते हमखास सायंकाळी त्याविषयी माझ्याकडे एखाद्या लहान मुलासारखी तक्रार करीत. मग खाण्यावरून त्यांचे लक्ष अभ्यासात आणण्यासाठी मला खरीखुरी कसरत करावी लागत असे.
एक दिवस आमच्यात अशीच नेहमीच्या गृहपाठाच्या विषयावरून भलतीच खडाजंगी उडाली. आज पाद्रीबुवा भलतेच घुश्शात होते! ''तू मला मुद्दामहून अवघड गृहपाठ देतेस! तुला माहीत आहे मी डायबिटीसचा पेशंट आहे, मला थोडे कमी दिसते, ऐकूही कमी येते. पण तरी तू मला कसलीही सूट देत नाहीस! हे चांगलं नाही!'' मला खरं तर त्यांचा संपूर्ण आविर्भाव पाहून मनात हसायला येत होते. पण तसे चेहर्‍यावर दिसू न देता मी अगदी मास्तरिणीच्या थाटात उत्तरले, ''हे बघा, नियम म्हणजे नियम! जर मी तुम्हाला सूट देत बसले तर तुम्हाला तीन महिन्यातच काय, तीन वर्षांमध्येही मराठी लिहिता - बोलता येणार नाही! बघा, चालणार आहे का तुम्हाला?'' त्यावर ते काही बोलले नाहीत. फक्त आपल्या हातातील वही जरा जोरात टेबलवर आपटून त्यांनी त्यांचा राग व्यक्त केला. मला काळजी होती ते त्यांचा रक्तदाब रागापायी वाढतो की काय! पण आमचा तास संपेपर्यंत त्यांचा पारा बराच खाली आला होता. मग मी निघताना ते हळूच म्हणाले, ''सॉरी हं! आज जास्तच चिडलो ना मी? तुला दुखवायचा हेतू नव्हता माझा. पण वय झालं की होतं असं कधी कधी!'' आणि मग माझ्याच पाठीवर सांत्वना दिल्यासारखे थोपटून त्यांची छोटीशी मूर्ती प्रार्थनाकक्षाच्या दिशेने दिसेनाशी झाली.
ख्रिसमस जवळ आला होता. आमच्या पाद्रीबुवांना त्यांच्या गावाची, प्रदेशाची फार आठवण येत होती. मी त्यांच्यासाठी एक छोटेसेच, स्वहस्ते बनवलेले शुभेच्छापत्र ख्रिसमस अगोदरच्या सायंकाळी घेऊन गेले. दुसर्‍या दिवसापासून मिशनला चार दिवसांची सुट्टी होती. परंतु चार दिवसाचा कालावधी त्यांच्या जन्मगावी जाऊन परत यायला अपुरा असल्यामुळे पाद्रीबुवा जरा खट्टूच होते! त्या सायंकाळी मी त्यांना ते शुभेच्छापत्र दिल्यावर मात्र त्यांचा मूड जरा सावरला. मग ते भरभरून त्यांच्या गावाविषयी बोलत राहिले. आज मी त्यांना मराठीतूनच बोलण्याची सक्ती केली नाही. अगदी निघताना त्यांनी हळूच एक खोके माझ्या हातात ठेवले. आतून मस्त खरपूस, खमंग गोड वास येत होता. औत्सुक्याने मी आत काय आहे ते विचारले तर माझा विद्यार्थी मला थांगपत्ता लागू द्यायला अजिब्बात तयार नाही. मी तिथून बाहेर पडणार इतक्यात त्यांना काय वाटले कोणास ठाऊक, त्यांनी त्यांच्या टेबलावरील ''बी हॅपी'' लिहिलेला शंखाकृती पेपरवेट उचलला व माझ्या हातात कोंबला. त्यांच्या डोळ्यांत दाटून आलेले धुके पाहून मी पण माझे शब्द गिळले. घरी आल्यावर खोके उघडून पाहिले तर आत मस्त संत्र्याचा केक होता. त्यांनी अगत्याने दिलेली ती भेट आमचा ख्रिसमस गोड करून गेली.
त्या अल्प काळात त्यांना शिकवण्यासाठी माझी जी तयारी झाली, जी तयारी मला करावी लागली, त्यामुळे माझे मराठी व इंग्रजी भाषाकौशल्य सुधारण्यास फार मदत झाली. नवनवीन पुस्तके, मिशनचे वाचनालय व निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या मिशनच्या इमारतीतील शांत प्रार्थनागृह ह्यांचाही मी लाभ घेतला. बघता बघता तीन महिने संपले. आमच्या पाद्रीबुवांना आता त्यांच्या नव्या जबाबदारीच्या पदाची सूत्रे स्वीकारायची होती. माझीही कॉलेजची परीक्षा जवळ येऊन ठेपली होती. काहीशा जड अंतःकरणानेच आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. गुरूशिष्याचे स्नेहाचे हे अनोखे नाते आता संपुष्टात येणार होते. शेवटच्या दिवशी आम्ही भरपूर गप्पा मारल्या, आणि त्याही मराठीतून! मी निघताना पाद्रीबुवांना डोळ्यांतील अश्रू लपविणे कठीण झाले होते. आणि उद्यापासून सक्तीची मराठी शिकवणी संपणार याचा आनंदही त्यांच्या चेहर्‍यावर लख्ख दिसत होता. मी त्यावरून त्यांना चिडवले देखील! त्यांची छोटीशी आठवण म्हणून त्यांनी मला एक छोटे बायबल देऊ केले व त्यांचा आवडता पायघोळ ट्रेंचकोट मी नको नको म्हणत असताना माझ्या हातांत कोंबला.
आज त्याला बरीच वर्षे लोटलीत. पुढे निवृत्ती स्वीकारल्यावर ते त्यांच्या जन्मगावी परत गेले. पाद्रीबुवा आता हयात आहेत की नाही हेही मला ठाऊक नाही. पण अजूनही मी कधी कपड्यांचे कपाट आवरायला काढले की एका कप्प्यात सारून ठेवलेला तो कोट मला पाद्रीबुवांची आठवण करून देतो! त्या तीन महिन्यांच्या काळात त्यांना शिकवण्याबरोबर मीही बरेच काही शिकले. त्यांची आठवण मनाच्या एका कोपर्‍यात सदैव राहील.
-- अरुंधती

Thursday, June 03, 2010

गारांचा पाऊस




गार गार गारा.... (छायाचित्र स्रोत : विकिमिडीया)

परवा बऱ्याच काळानंतर मी गारांचा पाऊस अनुभवला. खूप मस्त वाटले. विजांचा कडकडाट, जोरदार वारे वगैरे वातावरण निर्मिती तर अगोदरच झाली होती. आभाळातून सपसप काही थेंब वानगीदाखल बरसूनही झाले होते. मग अचानक पुन्हा एकदा एक जोरदार वावटळ आली. सगळीकडे नुसती धूळच धूळ! कोंदलेल्या आभाळाकडे एक कटाक्ष टाकत मी खिडक्यांवरचे वाळ्याचे पडदे वर गुंडाळू लागले. पण वाऱ्याला कुठे चैन पडत होते! त्या पाचेक मिनिटांत त्याने भरपूर खोडसाळपणा करून मला पार त्रस्त करून सोडले! कधी डोळ्यांमध्ये धूळ उडवून, कधी खिडक्यांच्या तावदानांना हीव भरल्यागत थडथडा आपटवून तर कधी आपल्या द्रुतगतीवर वाळ्याच्या पडद्यांना जोरदार हेलकावे देऊन! त्या घोंघावणाऱ्या वाऱ्याला, कडकडाट करून कानठळ्या बसविणाऱ्या विद्युल्लतेला व आभाळात दाटून आलेल्या कृष्णमेघांच्या गर्दीला घाबरून परिसरातील पक्षीगणही चिडीचूप... गायब झाले होते. कोणी चुकार, उशीरा जागे झालेले पक्षी जोरजोरात पंख फडकवून येणाऱ्या पावसाच्या चाहुलीने आसरा शोधत हिंडत होते.


मग पुन्हा एकदा ढगांचा एकच गडगडाट झाला. विजेने आकाशात वेगवेगळ्या नृत्यमुद्रा धारण करणे सुरू केले. वाळ्याच्या पडद्याला बांधलेल्या दोऱ्याची गाठ पक्की करण्यासाठी म्हणून मी हात खिडकीबाहेर काढले आणि तोच आभाळातून गारांचा वर्षाव सुरू झाला. काय त्यांचा तो वेग, काय विलक्षण मारा.... आभाळातून जणू कोणी मशीन-गनमधून गोळ्या झाडल्यागत गारा झाडत होते! क्षणभर मला स्वतःच्याच विचाराचे हसू आले. तोवर बघता बघता गारांच्या माऱ्याने बराच वेग घेतला होता. उघड्या खिडकीतून आता त्या घरातही येऊ लागल्या होत्या. त्यांच्या त्या वर्षावात आगळेच रौद्र सौंदर्य होते. न राहवून मी ड्रेसच्या ओच्यात गारा गोळा करू लागले. प्रत्येक गार अगदी पत्री-खडीसाखरेच्या दाण्याहूनही टपोरी.... त्यांना चपळाईने वेचून खाता खाता मन हळूच बालपणात डोकावून आले....

लहान असताना माझ्या आजूबाजूला अंगण होते, अंगणात झाडे होती. सिमेंट काँक्रीटचे रस्ते अजूनही घराला लगोलग चिकटले नव्हते. पावसाळ्याच्या आगमनाची चाहूल देत जेव्हा जेव्हा असा गारांचा पाऊस पडे तेव्हा सर्व बच्चे कंपनी अंगणात धाव घेत असे. ओल्या मातीच्या गंधाने वेडे होत, आभाळाकडे तोंड करत आ वासून आधी गारा थेट तोंडातच पकडण्याचा व्यर्थ प्रयत्न केला जाई. पण त्या प्रयत्नांत समोर न बघितल्याने एकमेकांशी टक्करच जास्त होई! कधी तर कपाळमोक्ष व टेंगळे! मग आम्हां मैत्रिणींची फ्रॉकचा ओचा पुढ्यात पसरून त्यात गारा पकडायची चढाओढ लागे. जमिनीवर पडलेल्या गाराही धूळ, मातीची पर्वा न करता उचलून घेत बिनदिक्कत खाल्ल्या जात. त्या गार गार बर्फाळ गारांना कडाड कुडूम खाताना येणारा आवाज आणि नंतर बधिर होणारे तोंड यांतही वेगळीच मजा असे. चेहऱ्यावर, उघड्या हाता-पायांवर गारांचा सपासप मार बसत असे. पण एरवी आईने हलकी चापट जरी दिली तरी गळा काढणारे अस्मादिक गारांचा हा मार हसत-खेळत सहन करत असू!

पावसात मनसोक्त भिजून झाले की मग नखशिखांत भिजलेल्या अंगाने, कुडकुडत, पावलागणिक पाण्याचे ओहोळ तयार करत समस्त ओले वीर/ वीरांगना आपापल्या घरी परतत असत. घरी आई किंवा आजी हातात टॉवेल घेऊन सज्जच असे! सर्वात आधी आमची चुकार डोकी टॉवेलच्या घेरात पकडून खसाखसा पुसली जात. अगदी घोड्याला खरारा केल्यागत! कित्येकदा त्यात आमचे चेहरेही खरवडून निघत.... पण त्याला इलाज नसे! मग आमची पिटाळणी स्नानगृहात होई. तिथे ओले कपडे बदलणे, अंग पुसणे, माती-चिखलाचे हात पाय धुऊन कोरडे करणे वगैरे सोपस्कार केले की मगच स्नानगृहाच्या बाहेर येता येई. बाहेर आल्यावर पावसात भिजल्याची खूण म्हणून दोन-चार शिंका सटासट दिल्या की मलाही समाधान मिळे. त्यानंतर ऊबदार स्वयंपाकघरात मऊ जाजमावर मांडी ठोकून समोर आलेल्या उकळत्या हळद-आलेयुक्त दुधाचा मस्तपैकी आस्वाद घ्यायचा.... पाऊस ओसरला की जुन्या वह्यांचे कागद फाडून त्यांच्या होड्या बनवून त्यांना गटाराच्या वाहत्या पाण्यात सोडायचे....

अनेकदा पावसाच्या स्वागतार्थ घरी भजी तळली जायची.... शेजारच्या उपाहारगृहातील भटारखान्यात दिलेली झणझणीत लसणाची खमंग फोडणी आणि तिचा घमघमाट (माझ्या आजोबांच्या भाषेत 'खकाणा') थेट मस्तकात जायचा.... कधी कोठेतरी कोणी मिश्रीसाठी तंबाखू भाजायला घ्यायचे.... नाकपुड्या हुळहुळायच्या.... पुन्हा दोन-चार शिंका!! उरलेला पाऊस मग बाल्कनीत बसून बघायचा. रस्त्यातील पाण्याच्या डबक्यांमधील तवंगांमुळे निर्माण होणाऱ्या इंद्रधनुष्यी छटा न्याहाळत वेळ कसा जायचा तेच कळायचे नाही.

शाळा सुटली, आयुष्य पुढे सरकले, मोरपिशी दिवस सुरू झाले. आता जेव्हा गारांचा पाऊस पडायचा तेव्हाही त्या वेचायला, पावसात मनसोक्त भिजायला मजा यायची. पण त्याचबरोबर मनात कोठेतरी एक चोरटा भावही असायचा. इतरांच्या नजरांची जाणीव असायची. अन तरीही त्या चिंब पावसात गारा लुटताना पुन्हा एकदा मन बाल होऊन जायचे... पावसाच्या माऱ्यासरशी आरडत-ओरडत, गारांना हातात झेलायचा प्रयत्न करत वर्षातालावर केलेले उत्स्फूर्त नृत्य.... गारठ्याने कुडकुडत असतानाही पावसाच्या पाण्याच्या डबक्यांत उड्या मारत एकमेकांच्या अंगावर उडवलेले पाणी... आमच्या इमारतीच्या गच्चीवर आभाळाकडे बघत, पावसाला थेट तोंडावर झेलत, हात पसरून गरागरा घेतलेल्या गिरक्या....

आजही ते सारे आठवले. वयाने कितीही मोठे झालो तरी मनाचे वय वाढत नाही हेच खरं! कारण आजदेखील त्या पावसात गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या करायला मन आसुसले होते. मग घरातच मी एक छोटीशी गिरकी घेतली. तडतडाडतड नृत्य करणाऱ्या गारा ओंजळीत पकडून भरभरून खाल्ल्या. माझे मन भरले तरी गारांचा मारा अजून चालूच होता. बघता बघता समोरच्या नुकतीच खडी घातलेल्या काळ्या कुळकुळीत डांबरी रस्त्यावर पांढऱ्या शुभ्र गारांची खडी पसरली. तो शुभ्र गालिचा इतका सुंदर दिसत होता म्हणून सांगू!  घनदाट काळ्या केशकलापात माळलेले स्फटिकमणीच जणू..... समोरच्या आंब्याच्या झाडाला तर वाऱ्याच्या बेभान तालावर अंग घुसळवत डोलण्याचा, नाच करण्याचा मुक्त परवानाच मिळाला होता! त्याची उन्हाळ्यात धुळकटलेली पाने पावसाच्या वर्षावात हिरवीगार चिंब धुतली गेलेली.... नवी कोवळी, पोपटी रंगाची पालवी तर काय लुसलुशीत दिसत होती! अहाहा!! नशीब मी बकरी नाही.... नाहीतर खादडलीच असती तिला... फक्त ती पालवी झाडाच्या माथ्यावरच होती ही गोष्ट अलाहिदा! आंब्याच्या झाडाला लगटून असलेला मधुमालतीचा वेलही वाऱ्याच्या झोक्यांसरशी गदगदा हालत होता. 

पावसाने गारव्याची अशी काही बरसात केली की सारी सृष्टीच नव्हे तर मनही त्या सरींमध्ये न्हाऊन निघाले! उन्हाळ्याच्या बेहद्द गर्मीनंतर असा पाऊस म्हणजे चंदनाची उटीच जणू! त्यामुळे रस्त्यावरून जाणारे पादचारीही आनंदात दिसत होते. खड्ड्यांमधील साचलेल्या पाण्याचे फवारे वाहनांच्यामुळे अंगावर उडत असतानाही त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले पावसाचे कौतुक कायम होते. दुकानदार दुकानातील थंडावलेल्या वर्दळीची पर्वा न करता बाहेर येऊन पावसाचा आनंद लुटत होते. छोट्या मुलांचे पावसात भिजतानाचे आनंदी चीत्कार, आरडा-ओरडा, किलकाऱ्या यांनी वातावरणात अजूनच रंग भरले जात होते. 

पाऊस ओसरला, थांबला आणि मग आभाळात पुन्हा पक्ष्यांची गर्दी दिसू लागली. समोरच्या इमारतीच्या टेरेसवर, तारांवर, झाडांवर वेगवेगळ्या पक्ष्यांनी आपापले पंख झटकून 'अंग वाळवणे' अभियान सुरु केले. मावळत्या सूर्याच्या काही चोरट्या किरणांनी परिसराला काही वेळ एका वेगळ्याच छटेत उजळवून टाकले. निसर्गाचा लाईव्ह लेसर शो समाप्त झाला होता. थंड वाऱ्याच्या झुळुकींबरोबर आता एक नवाच चिरपरिचित गंध नाकाला खुणावू लागला होता... कोपऱ्यावरच्या वडेवाल्याने समयोचित ताज्या, गरमागरम बटाटेवड्यांचा घाणा तळायला घेतला होता :-)              

-- अरुंधती