Friday, October 25, 2013

ग्रीनवॉशिंग व ग्राहकांची जागरूकता

''आमचे उत्पादन पर्यावरणपूरक आहे.''

''आम्ही बनविलेले उत्पादन संपूर्णतः नैसर्गिक आणि पर्यावरणास कोणताही धोका न पोहोचविणारे आहे.''

अशा कित्येक जाहिराती आपल्याला टीव्ही, वर्तमानपत्रे, सोशल मीडियावर दिसत असतात. एखादे उत्पादन पर्यावरणपूरक आहे हे 'दिसल्या'वर आजच्या सुशिक्षित, सधन ग्राहकाचा त्या उत्पादनामधील रस वाढतो ही बाब उत्पादन करणार्‍या कंपन्या व जाहिरातदार नेमकी जाणून आहेत. जागतिक तापमानवाढ, पर्यावरणाची हानी, प्रदूषण इत्यादींबद्दल वाढती सतर्कता जशी ह्याला कारण आहे तशीच 'ग्रीन' किंवा 'पर्यावरणपूरक' उत्पादने खरेदी करणे हे सामाजिक प्रतिष्ठेचे समजले जाण्याची मानसिकताही त्यामागे आहे.

सध्याचा जमाना प्रसारमाध्यमांचा व सोशल मीडियाचा आहे. टीव्ही, आंतरजाल, वृत्तपत्रे इत्यादींच्या माध्यमातून आपण वर्षाकाठी हजारो जाहिरातींच्या संपर्कात येत असतो. या जाहिराती आपल्यावर अगदी बेगुमान आदळत असतात. त्यांचा अभ्यास करू जाता, गेल्या काही वर्षांमध्ये जाहिरातदार आपली उत्पादने किंवा सुविधा कशा प्रकारे पर्यावरणपूरक आहेत, पर्यावरणाला पोषक आहेत अथवा ''ग्रीन'' आहेत हे अहमहमिकेने सांगताना, मांडताना दिसतात. त्या प्रकारच्या लेबल्सने त्यांचे उत्पादन नटलेले असते. 'इको-फ्रेंडली', 'बायो-डीग्रेडेबल', 'ग्रीन', 'री-सायकल्ड', 'डॉल्फिन-फ्रेंडली', 'पर्जन्यवनांना धोका न पोचविणारे', 'नैसर्गिक', 'एनर्जी-एफिशियंट', 'फॉस्फेट-फ्री', 'अ‍ॅनिमल-फ्रेंडली', पर्यावरणपूरक उत्पादन अशी अनेक प्रकारची, तर्‍हेची लेबल्स - त्यांवरील लोगो - त्यांमागील संदेश - हे खरोखर तुम्हा-आम्हाला ती जाहिरात बघताना किंवा खरेदी करताना कळते का हो? जाहिरातीनुसार खरोखर ते उत्पादन तसे आहे की जाहिरातदार आपली दिशाभूल करत आहे हे त्यावरून कळते का?

'ग्रीनवॉशिंग' म्हणजे ढोबळपणे आपले उत्पादन प्रत्यक्षात जेवढे व जितके पर्यावरणपूरक आहे त्याच्या कितीतरी पटीने जास्त असल्याचे भासविणे असे म्हणता येईल. प्रत्यक्ष उत्पादनावर, कंपनीच्या संकेतस्थळ / माहितीपुस्तिकेत किंवा जाहिरातींमध्ये असे प्रतिपादन केलेले असते. 'ग्रीनवॉशिंग'ची ही संज्ञा व अशा प्रकारे दिशाभूल करणे हे काही नवीन नाही. ही दिशाभूल मुख्यतः जाहिराती व लेबल्सद्वारे केली जाते. जोवर ही दिशाभूल फक्त मार्केटिंग तंत्राचा एक भाग एवढ्यापुरतीच मर्यादित होती तोपर्यंत त्याकडे बर्‍याच प्रमाणात दुर्लक्ष केले गेले. परंतु ही दिशाभूल ग्राहकांच्या आरोग्यास व पर्यायाने सामाजिक आरोग्यास धोकादायक ठरू शकते हे लक्षात आल्यावर ग्राहक संघटना, वेगवेगळ्या एन.जी.ओ. व स्थानिक प्रशासकीय व्यवस्था त्यांबद्दल जागरूक होऊ लागल्या. इ.स. २००९ च्या टेराचॉईस एनव्हायर्नमेन्टल मार्केटिंग कंपनीच्या अहवालानुसार अमेरिकेत २२१९ उत्पादनांनी 'ग्रीन' असल्याचा दावा केला. त्यातील ९८% उत्पादने 'ग्रीनवॉशिंग' केलेली होती!!

एअरबस ए ३८० - अ बेटर एन्व्हायर्नमेन्ट इनसाईड अ‍ॅन्ड आऊट अशी जाहिरात


तुम्ही जेव्हा एखादे उत्पादन खरेदी करता तेव्हा त्यावर असणारी सर्व प्रकारची लेबल्स पाहून - वाचून तुम्ही ते खरेदी करता का? त्या लेबल्सचा अर्थ तुम्हाला माहीत असतो का? वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या प्रकारची लेबल्स जेव्हा आपले उत्पादन हे 'ग्रीन' आहे हे दर्शविण्यासाठी लावतात तेव्हा त्यांच्या विभिन्नतेमुळे तुमचा गोंधळ उडतो का? उदा. एखादे उत्पादन 'ऑर्गॅनिक' (सेंद्रीय) किंवा 'अ‍ॅनिमल फ्रेंडली' आहे हे वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या लेबल्सद्वारे दाखवतात. त्यावरील लोगो भिन्न असू शकतात, चित्र भिन्न असू शकते. तसेच त्या लेबलमागे कोणती अधिकृत संस्था आहे का, हेही स्पष्ट नसते. ग्राहकांचा गोंधळ हा कित्येकदा ह्यामुळे होतो. जरा विचार करा, त्या उत्पादनावर जर अशा तर्‍हेचे लेबल असेल किंवा 'आमचे उत्पादन हे पर्यावरणपूरक आहे' असे निराळे व ठळक छपाईत लिहिलेले असेल तर त्यामुळे ते उत्पादन विकत घेणे किंवा न घेणे ह्याबद्दल तुमच्या निर्णयावर काही प्रभाव, फरक पडतो का?



अनेक कंपन्यांच्या संकेतस्थळांवर त्यांची उत्पादने 'इको-फ्रेंडली' असल्याचे दावे केलेले आढळतात. परंतु नक्की कोणत्या प्रकारे ते उत्पादन इको-फ्रेंडली आहे, त्याचा पुरावा किंवा त्याबद्दलची सविस्तर माहिती यांबद्दल तिथे जास्त काही लिहिलेले नसते. काही आंतरराष्ट्रीय ब्रँड्सच्या कंपन्यांच्या संकेतस्थळांवर त्या कंपन्यांनी आपल्या उत्पादनाचे किंवा आपली कंपनी करत असलेल्या कामासंबंधीचे पर्यावरण अहवाल दिलेले असतात. रकानेच्या रकाने भरून माहिती असते. परंतु नक्की कोणत्या ठिकाणाची माहिती आहे, किती क्षेत्रफळातील जमीन/स्रोत/उद्योगाची माहिती आहे, इतर कोणत्या उपाययोजना केल्या आहेत, किती प्रमाणात त्या राबविल्या आहेत, कधीपासून व कशा प्रकारे राबविल्या आहेत - या सर्व तपशिलांची बर्‍याचवेळा वानवा असते. कंपनीचे कारखाने अनेक ठिकाणी असतील आणि त्यातील एखाद्या ठिकाणचा अहवालच जर सादर केला असेल तर मग त्या अहवालानुसार कंपनीच्या प्रॅक्टिसेस पर्यावरणपूरक म्हणता येतात का? हे अहवाल कित्येकदा कंपनीनेच प्रायोजित केलेले असतात. म्हणजे कोणा तटस्थ किंवा त्रयस्थ, मान्यताप्राप्त, अधिकृत संस्थेद्वारा ही तपासणी झालेलीच नसते. कंपनीने नेमलेल्या एखाद्या सल्लागार संस्थेने दिलेला अहवाल असतो तो! मग असा अहवाल कितपत ग्राह्य धरायचा?

भारतासकट बर्‍याच देशांमध्ये एखाद्या उत्पादनाच्या किंवा सुविधेच्या पर्यावरणावर होणार्‍या परिणामांसंबंधी दिशाभूल करणार्‍या जाहिरातींची रेलचेल दिसून येते. भारतातले एक उदाहरण म्हणजे व्हर्लपूल क्विक चिल रेफ्रिजरेटरची जुनी जाहिरात! ह्या जाहिरातीत कंपनीने म्हटले होते की अन्य कंपन्यांच्या सर्वसामान्य रेफ्रिजरेटरमध्ये वापरला जाणारा पर्यावरणास धोकादायक गॅस न वापरता या उत्पादनात पर्यावरणपूरक गॅस वापरला गेला आहे. ही जाहिरात ठिकठिकाणी झळकली. प्रत्यक्षात तो गॅस पर्यावरणास पूरक नसून हानी पोहोचविणाराच होता. परंतु कंपनीने बिनबोभाटपणे अशी जाहिरात करून ग्राहकांची दिशाभूल केली. नंतर त्यांना ती जाहिरात योग्य कारवाईमुळे मागे घ्यावी लागली. हे एक उदाहरण... पण अशी कैक उदाहरणे ह्या क्षेत्रातले तज्ज्ञ लोक देतात. या उदाहरणांमध्ये फक्त खासगी संस्थाच नव्हे तर कित्येकदा सरकारी किंवा निम्न सरकारी कंपन्याही दिशाभूल करणार्‍या जाहिराती, लेबल्सद्वारे ग्राहकांची फसवणूक करण्यास हातभार लावत असतात.

ग्रीनवॉशिंगची ७ पातके!

[द सेव्हन सिन्स ऑफ ग्रीनवॉशिंग]

१. उत्पादनामुळे होणारी हानी लपविण्याचे पातक

एखादे उत्पादन 'ग्रीन' आहे हे महत्त्वाच्या पर्यावरणासंबंधी निकषांकडे दुर्लक्ष करून अतिशय त्रोटक किंवा मर्यादित बाबींवरून ठरविणे. (उदा. पर्यावरणपूरक अशा (शाश्वत / सस्टेनेबल) जंगलातील वृक्षांपासून बनविलेला कागद : हा कागद बनविताना निर्माण झालेले प्रदूषण किंवा खर्च झालेली अतिरिक्त ऊर्जा यांबद्दल सांगण्याची टाळाटाळ व ते उत्पादन 'ग्रीन' आहे अशी जाहिरात.)

२. पुरावा नसण्याचे पातक

आपले उत्पादन 'ग्रीन' असण्याचा दावा त्यासंबंधी कोणताही पुरावा न देता करणे. तशी माहिती किंवा त्रयस्थ, तटस्थ संस्थेचे तसे प्रशस्तिपत्रक सादर न करणे.

३. मोघमपणाचे पातक

उत्पादनाची जाहिरात करताना मोघम शब्द वापरणे. त्या संज्ञेचा अभिप्रेत अर्थ विशद न करणे. जसे, 'ऑल नॅचरल'. आता ऑल नॅचरल या संज्ञेचा कंपनीला अभिप्रेत असणारा अर्थ व ग्राहकाला अभिप्रेत असणारा अर्थ यांच्यात तफावत असते व असू शकते. त्या तफावतीचा गैरफायदा घेऊन आपल्या उत्पादनाबद्दल ग्राहकांची दिशाभूल करणे.

४. अप्रासंगिक किंवा संबंध नसलेली जाहिरात करण्याचे पातक

येथे कंपनीने उत्पादनावर किंवा जाहिरातीत केलेला दावा जरी बरोबर असला तरी त्याचा पर्यावरणाविषयी जागरूक ग्राहकांना काही उपयोग नसतो. [उदा. एखादे उत्पादन विकत घेऊन तुम्ही डॉल्फिन्सचे संरक्षण / जतन करण्यास हातभार लावत आहात असा दावा करणे. त्या निकषावर ते उत्पादन पर्यावरणपूरक आहे असे भासविणे.]

५. धोकादायक बाबींपेक्षा कमी धोका असणार्‍या बाबींची जाहिरात करण्याचे पातक

'लेसर ऑफ द टू एव्हिल्स' असे ज्याला म्हणता येईल, अशा प्रकारे एखाद्या उत्पादनापासून जर पर्यावरण किंवा आरोग्याला जो धोका सर्वात मोठ्या प्रमाणात असेल त्याबद्दल न बोलता त्या उत्पादनामुळे आरोग्याला / पर्यावरणाला कमी धोका असणार्‍या बाबीसंबंधी बोलणे व ग्राहकाची दिशाभूल करणे. [उदा. ऑर्गॅनिक सिगारेट्स, किंवा पॅकबंद पाण्याची 'नैसर्गिक स्रोतांतून / हिमनगातून आलेले शुद्ध पाणी' अशी जाहिरात.]

६. खोटे दावे करण्याचे पातक

आपल्या उत्पादनाबद्दल पर्यावरणासंबंधी खोटे दावे करणे. [उदा. प्रत्यक्षात आपले उत्पादन 'एनर्जी एफिशियन्ट' इ. नसताना जाहिरातीत किंवा उत्पादनावर तसे, तत्सम शब्द वापरणे.]

७. खोट्या शिक्क्यांचे पातक

ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी आपल्या उत्पादनावर ते उत्पादन 'ग्रीन' असण्याचे खोटे शिक्के / लेबल्स लावणे. [उदा. 'इको-प्रेफर्ड' उत्पादनाचा दावा करून खोटे शिक्के/लेबल्स लावून ते उत्पादन पर्यावरणपूरक असल्याचे भासविणे.]

उत्पादनांवर छापले जाणारे शिक्के किंवा लेबल्स नक्की काय सांगतात, काय दर्शवितात, त्यांच्या मागे कोणती / कोणत्या अधिकृत संस्था आहेत, त्या संस्था मान्यताप्राप्त व तटस्थ - खात्रीलायक आहेत का, हे सर्व ग्राहकांना समजणे व त्यांनी त्याबद्दल जागरूक राहणे हे आवश्यक आहे. अन्यथा अशी लेबल्स ग्राहकांची दिशाभूल करतात किंवा त्यांना गोंधळात टाकतात.

त्यासाठी कोणत्याही उत्पादनावरील 'इको-लेबल्स' असतात त्यांची खात्री करून घेणे हे ग्राहकास शक्य असणे जरुरीचे आहे. त्यासाठी आवश्यक माहिती, चित्रे इत्यादी हे पर्यावरणपूरक उत्पादनासंबंधी संकेतस्थळांवर, पुस्तिकांद्वारा प्रकाशित होणे एक महत्त्वाचे पाऊल ठरेल. तसेच ज्या संस्थांद्वारे अशी लेबल्स मान्य केली जातात त्या संस्थांची व त्यांच्या कार्याची पारदर्शकता ग्राहकांपुढे येणे आवश्यक आहे. त्या संस्थांना किंवा संस्थाचालकांना कोणत्याही उत्पादनाच्या विक्रीतून निधी मिळतो, किंवा अन्य कोणत्याही प्रकारचा फायदा होतो, असे असता कामा नये. तसेच ग्राहकांना, पर्यावरण-संरक्षण करणार्‍या कार्यकर्त्यांना, उद्योगांना व समाजधुरीणांना विचारून, त्यांची मते व प्रतिसाद विचारात घेऊन पर्यावरणासंबंधी प्रशस्तिपत्रके बनविली जाणे आवश्यक आहे.
सर्व ग्रीन लेबल्स चे प्रमाणीकरण होणे, त्यांच्यात एकवाक्यता येणे, त्यांबद्दल सार्वत्रिक जागरूकता वाढणे हेही महत्त्वाचे आहे.

भारतात अ‍ॅडव्हर्टायझिंग कौन्सिल ऑफ इंडिया सारख्या संस्था कार्यरत आहेत व त्या दिशाभूल करणार्‍या जाहिरातींवर नजर ठेवून असतात, तसेच चुकीच्या जाहिरातींवर यथायोग्य कारवाई होण्यासाठी प्रयत्न करत असतात. परंतु कित्येकदा संपूर्ण कारवाई पार पडेस्तोवर हजारो, लाखो ग्राहकांची दिशाभूल होण्याची शक्यता जास्त असते. तसेच संबंधित कंपन्या आपली दिशाभूल करणारी जाहिरात फक्त मागे घेतात व त्या ऐवजी दुसरी जाहिरात दाखवितात. परंतु आपण अगोदर दिशाभूल करणारी जाहिरात केली हे त्या कंपन्या ग्राहकांसमोर मान्य करत नाहीत.

अनेकदा अशा तर्‍हेचे ग्रीनवॉशिंग करणार्‍या कंपन्यांमुळे फक्त ग्राहकांना व पर्यावरणालाच फटका बसत नाही, तर ज्या कंपन्या खरोखरी पर्यावरणपूरक उत्पादने किंवा सुविधा देतात त्यांच्याकडेही संशयाने बघितले जाते. प्रगत देशांमधील ग्राहकांमध्ये 'ग्रीन' उत्पादनांबद्दल वाढता अविश्वास, ज्याला 'ग्रीन फटीग(थकवा)' म्हणून संबोधिले जाते, रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यावर विचारमंथन करताना तज्ज्ञांनी काही गोष्टी मांडल्या. त्यात ग्राहक व जाहिरात करणार्‍या एजन्सीज, मार्केटिंग करणार्‍या एजन्सीज यांच्यात पर्यावरणपूरकता म्हणजे नक्की काय याबद्दल साक्षरता / जागरूकता निर्माण करणे हा एक उपाय होता.

पर्यावरणपूरक उत्पादने ही स्थलकालसापेक्ष असतात. उदा. एखाद्या ठिकाणी पाण्याची मुबलकता असेल तर तिथे 'धुवून पुन्हा वापरता येण्यासारखे बाळांचे कापडी लंगोट' हे पर्यावरणाला आव्हान देत नाहीत. पण जिथे पाण्याचे दुर्भिक्ष्य असेल तिथे पाण्याची मागणी वाढविणार्‍या, पाण्याच्या स्रोतांवर ताण आणणार्‍या लंगोटांची जाहिरात करणे हे पर्यावरणदृष्ट्या जबाबदारीचे ठरणार नाही.

एखादे उत्पादन पर्यावरणपूरक आहे किंवा नाही हे ठरविणे जसे मान्यताप्राप्त अधिकृत संस्थांचे काम आहे तसेच आपल्या उत्पादनाबद्दल खरी व तपशीलवार माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचविणे हे त्या उत्पादन करणाऱ्या कंपनीचे काम आहे. त्यात ते उत्पादन/ वस्तू बनविताना खर्च होणारे नैसर्गिक स्रोत, ऊर्जा, त्या उत्पादनाची प्रक्रिया, वापरले जाणारे घटक, कचर्‍याची विल्हेवाट, औद्योगिक कचर्‍याचे निर्मूलन, त्या उत्पादनाची चाचणी घेताना ती कशी घेतली गेली, उत्पादनाची वाहतूक, आवरण, ज्या ठिकाणी उत्पादन बनविले जाते त्या ठिकाणच्या नैसर्गिक पर्यावरणाच्या जतनाची जबाबदारी इत्यादी अनेक गोष्टींचा समावेश होतो. ही सर्व माहिती ग्राहकांची दिशाभूल करणारी नसावी, खरीखुरी असावी. तसेच मान्यताप्राप्त त्रयस्थ, अधिकृत संस्थेने नियमाने तपासणी करून ही माहिती खरी असल्याचे मान्य केलेले असावे. तसेच ठराविक काळाने उत्पादनांची व अन्य बाबींची पर्यावरणपूरकतेच्या बदलत्या निकषांनुसार पुनर्तपासणी होणेही आवश्यक आहे.

आपण कोणतेही उत्पादन 'ग्रीन' असल्याच्या निकषावर जेव्हा खरेदी करतो तेव्हा एक ग्राहक म्हणून त्या उत्पादनाच्या पर्यावरणपूरकतेची खात्री करून घेणे ही आपलीही एक महत्त्वाची जबाबदारी ठरते.

* वरील लेख हा फक्त माहिती मिळावी व जागरूकता निर्माण व्हावी - वाढावी ह्या उद्देशातून लिहिलेला आहे.

संदर्भ :

१] सेंटर फॉर सस्टेनेबल प्रॉडक्शन अ‍ॅन्ड कन्झम्प्शन चे संकेतस्थळ : http://www.cuts-international.org/

२] इको-लेबल्स

३] रिचर्ड दाल यांचा 'एनव्हायर्नमेन्टल हेल्थ पर्स्पेक्टीव्ह' अंकातील ग्रीनवॉशिंग संदर्भातील जून २०१० मध्ये प्रसिद्ध झालेला लेख. http://ehp.niehs.nih.gov/118-a246/

* छायाचित्र विकीपीडियावरून साभार

Sunday, October 20, 2013

संहिता - मनात दडलेली!

प्रत्येकाच्या मनात एक संहिता दडलेली असते. आपल्या आयुष्याची संहिता, आपले विचार, अनुभव आणि आपल्या दृष्टिकोनांची संहिता. खरं तर एकच काय ते आयुष्य! पण वेगवेगळ्या चष्म्यांमधून पाहिले तर त्याचे विविध कंगोरे, चढ-उतार, मर्यादा आणि परिसीमा नव्याने जाणवतात, दिसतात, दिसू शकतात. ही जाणीवच मुळात साक्षात्कारी आहे. आणि अशा जाणिवांची लड उलगडताना दरवेळी त्याच त्या परिघांमध्ये फिरणारे कथानक आपल्या सीमा ओलांडून त्यात वेगवेगळ्या वर्तुळांना जसजसे समाविष्ट करत जाते तसतशी त्यातून येणारी अनुभूतीही बदलत जाते. ही अनुभूती म्हणजे संहिता. 



मायबोली.कॉमच्या माध्यमातून संहिता चित्रपटाच्या प्रीमियरला उपस्थित राहता येणे हा माझ्यासाठी खरोखरी एक सुखद व अविस्मरणीय अनुभव होता. संहिता चित्रपटाची पोस्टर्स पाहिल्यापासून ह्या चित्रपटाबद्दल मनात अतीव उत्सुकता तर होतीच, शिवाय सुमित्रा भावे व सुनील सुकथनकर यांची जोडी असल्यामुळे उत्तम कथानक, उत्कृष्ट दिग्दर्शन, नेत्रसुखद चित्रांकन आणि दर्जेदार अभिनय पुन्हा एकदा ह्या चित्रपटाच्या माध्यमातून अनुभवायला मिळणार याचीही खात्री होती. इतक्या सुंदर अनुभवाची संधी प्राप्त करून दिल्याबद्दल मायबोली व माध्यम प्रायोजकांचे खास खास आभार! :)

पुण्यात प्रीमियरच्या ठिकाणी सिटीप्राईड कोथरूड येथे गुरुवारी सायंकाळी मी पोचले तेव्हा मिलिंद सोमण, देविका दप्तरदार, सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर तिथे अगोदरच आलेले दिसले. नंतर मोहन आगाशे, दीपा श्रीराम, अमोल पालेकर, चंद्रकांत काळे, शेखर कुलकर्णी हेही दिसले. मायबोलीचा लोगो असलेले मोठे बॅनर प्रवेशाच्या जवळच पाहायला मिळाल्यावर छान वाटले. मायबोलीचा लोगो चांगला ठसठशीत उठून दिसत होता. (नंतर स्क्रीनवरही माबोचा लोगो जेव्हा झळकला तेव्हा असाच आनंद झाला!) आपल्या मायबोलीकरांचीही ह्या खेळाला मोठ्या संख्येने उपस्थिती होती. :)

सर्वात अगोदर झाले ते मायबोलीकरांचे कलावंतांबरोबरचे फोटोसेशन! हर्पेनच्या कॅमेर्‍याचा चांगलाच क्लिकक्लिकाट झाला! :) चित्रपटाच्या टीमबरोबर वेगवेगळे व ग्रुप फोटोज काढण्यात आले. देविका व मिलिंद सोमण यांच्याबरोबरही मायबोलीकरांनी भरपूर फोटो काढले. दोघेही अगदी सहजपणे फोटोंसाठी पोझ देत होते. मजा आली. 'से चीज' म्हणत हसताना गाल दुखले! 

आरती ताई अंकलीकरांनी या चित्रपटात आपल्या आर्त, मधुर गाण्याने जान ओतली आहे. संपूर्ण चित्रपटात त्यांनी गायलेल्या सुरांनी जे उत्कट भावविश्व उभे केले आहे त्याला तोड नाही! प्रीमियरच्या निमित्ताने आरतीताईंशीही छान भेट झाली.

सुरुवातीस सुनील सुकथनकर यांच्यासोबत निर्मात्या टीमने सर्व कलाकार, दिग्दर्शक, निर्माते, तंत्रज्ञ, संपूर्ण टीम व चित्रपटास हातभार लावणार्‍या अनेक हितचिंतकांचे आभार मानले आणि 'संहिते' च्या खेळाचा प्रारंभ झाला. मुंबईच्या आलिशान वातावरणातील एका रंगात आलेल्या पार्टीच्या पहिल्याच सीनपासून संहितेने जे मन काबीज केले ते चित्रपट संपला तरी त्यातली प्रत्येक फ्रेम आणि फ्रेम मनात तरळत राहिली. आधुनिक मुंबईच्या वातावरणातून आणि अगदी आताच्या जमान्यातल्या रेवती-रणवीर-शिरीन-तारा-हेमांगिनी-दर्शन यांच्या ओझरत्या, वास्तवदर्शी कथेपासून ही कहाणी कधी संस्थानिकांच्या काळात पोचते, त्या कहाणीतली पात्रे कशी जिवंत होत जातात, त्यांचे कथानक कसे उलगडत जाते -- हा सारा प्रवास अतिशय लक्षवेधी आणि समरसून टाकणारा आहे. प्रेक्षक त्या कहाणीत कसा आणि कधी गुंतत जातो हे त्याचे त्यालाच कळत नाही! कथेतले प्रत्येक पात्र सुरेख उमटले आहे. कलावंतांच्या सौष्ठवपूर्ण अभिनयाची जोड आणि त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या भूमिकांची समर्थ हाताळणी, त्यातले बारकावे ह्या चित्रपटाला सर्वसाधारण प्रेमकथांपेक्षा वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात. संस्थानिकांच्या काळातील, त्यांच्या महालांमधील राजेशाही, खानदानी व कधी विलासी वातावरण, त्यांचा विहार, मानसिकता, स्वतंत्र होऊ घातलेल्या भारताच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या आयुष्यांत घडून (किंवा न घडून) येणारे बदल हे कथेच्या ओघात खूप सुरेख पद्धतीने व्यक्त होत जातात. कथेतील आधुनिक दांपत्याचा आपल्या आयुष्यातील ध्येय साध्य करतानाचा जो संघर्ष दाखवलाय तो अगदी सहज पटणारा आहे. आणि त्याच जोडीला संस्थानिक राजा, त्याची राणी आणि त्याची प्रेमिका यांच्यातील परस्पर-नाते कोठेही ओढून ताणून वाटत नाही, ना त्यांचे संघर्ष! त्यांचे विश्व जसजसे उलगडत जाते तसतसे हे संघर्ष व बंध अधिक गहिरे होत जातात. प्रत्येकजण आपापल्या भूमिकेशी प्रामाणिक आहे. आणि त्यांचे हे प्रामाणिकपण सर्वाधिक भावते. त्यात कोण बरोबर, कोण चूक, कोण उचित असे प्रश्नच येत नाहीत. आणि माझ्या मते कोणताही ग्रह न ठेवता, नॉन-जजमेंटल पद्धतीने ह्या सर्व माणसांची, त्यांच्या नात्याची आणि त्या नात्यातून विकसित झालेल्या प्रगल्भ अनुभवांची कथा सांगण्यात हा चित्रपट यशस्वी झाला आहे. 

राजेश्वरी सचदेव हेमांगिनी व भैरवीच्या भूमिकेत नजाकत आणते. एक यशस्वी अभिनेत्री, एक उदयोन्मुख - कसदार गायिका आणि समर्पित प्रेमिका या तिन्ही भूमिका ती सार्थपणे तोलते. मिलिंद सोमणने साकारलेला रांगडा रणवीर हा त्याने साकारलेल्या सत्यशील राजापेक्षा जास्त भावतो. राजा प्रेमात विकल आहे. आपल्या वर्तनाने इतर आयुष्यांमध्ये झालेल्या उलथापालथीची त्याला जाणीव आहे, पुरुषी अहंकार तर ठासून भरलेला आहे, पण त्याचबरोबर तो आपल्या भावना व कर्तव्य यांसमोर हतबलही आहे. तर रणवीरचे पात्र हे स्वतःच्या मर्यादांची जाणीव असून त्यापुढे जायचा प्रयत्न करणारे, मार्ग शोधणारे आहे. देविकाचा रेवतीच्या भूमिकेतील अभिनय अतिशय सहजपणे उतरला आहे. अगदी गर्ल नेक्स्ट डोअर वाटावे असे हे पात्र. आणि संस्थानिकांच्या पारंपरिक घरात स्वतंत्र विचारांचे पंख लावून कल्पनेच्या विश्वात विहरणारी, अपेक्षित असणार्‍या भूमिकेपेक्षा वेगळ्या तर्‍हेने आयुष्य जगू इच्छिणारी, राज्ञीपदाचा, बुद्धिमत्तेचा व स्वतःच्या आधुनिकतेचा तोरा बाळगणारी राणीही तिने प्रगल्भपणे साकारली आहे. उत्तरा बावकर, ज्योती सुभाष यांच्या अभिनयाबद्दल काय लिहिणार!! दुधात जशी साखर मिसळावी तितक्या सहजतेने सर्व चित्रपटभर त्यांचा वावर आहे! दोघी इतक्या सहज भावातून व परिपक्वतेने आपली पात्रे साकारतात... त्या अभिनय करत आहेत असे कोणत्याच अँगलमधून वाटत नाही! चित्रपटात सर्वच स्त्री पात्रांच्या भूमिका ह्या स्ट्राँग - सशक्त स्त्रियांच्या आहेत. आयुष्यात जाणीवपूर्वक केलेल्या तडजोडींची किंमत त्यांनी मोजली आहे. त्यांची बलस्थाने, आयुष्यातील शोध विभिन्न आहेत. आणि तरीही त्या एका अदृश्य धाग्याने बांधल्या गेल्या आहेत. कोणता धागा असेल हा?

संहिता चित्रपट हा दर्जेदार, कलापूर्ण मराठी चित्रपटांच्या यादीतील एक अग्रगण्य चित्रपट ठरेल ह्यात शंका नाही. राजा-राणी- दरबारी गायिका असणार्‍या प्रेमिकेच्या सर्वसाधारण प्रेमत्रिकोणात्मक कहाणीला कथेतील पात्रांच्या त्या कथेकडे बघण्याच्या दृष्टिकोनामुळे एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्याचे आणि त्या कथेची आजच्या काळाशी वैचारिक व अनुभवात्मक पातळीवर सांगड घालायचे कौशल्य ह्या चित्रपटाने साधले आहे. चित्रपटाच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांना मनोरंजनासोबत एक समृद्ध, सकस विचार मिळतो. तो विचार आपल्याला स्वतःच्या आयुष्यात डोकावून पाहायलाही प्रवृत्त करतो. आपल्या आयुष्याकडे नेहमीच्या साच्याबाहेर जाऊन बघताना जे काही मिळते तिथेच आपलीही एक संहिता आकाराला येत असते.  

महत्त्वाचे म्हणजे चित्रपटात मांडलेल्या कथानकाशी प्रेक्षक रिलेट करू शकतो. त्यातली आधुनिक काळातली पात्रे तर आपल्या आजूबाजूला वावरणारी वाटतात. त्यांच्या कथा त्यामुळे तितक्याच जिव्हाळ्याच्या वाटतात. सुनील सुकथनकरांनी रचलेली गीते, शैलेन्द्र बर्वेंची संगीतयोजना आणि आरतीताईंच्या गळ्यातून थेट मनात खोल आतवर कोठेतरी भिडणारे सूर... क्या कहना!

सर्वांनी आवर्जून हा चित्रपट स्वतः तर पाहावाच आणि आपल्यासोबत इतरांनाही इतका सुंदर अनुभव मोठ्या पडद्यावर पाहण्यास उद्युक्त करावे. चित्रपटातील संवाद व गाण्यांची इंग्रजी सबटायटल्स समर्पक आहेत. मला खास 'वाचत वाचत' हा चित्रपट पुन्हा एकदा बघायचा आहे! :)