Tuesday, January 19, 2010

नैनितालच्या आठवणी



नैनिताल म्हटले की डोळ्यांसमोर येते विशाल पर्वतराजी, नेत्रसुखद निसर्ग, मनाला आल्हाद देणारे नैनी सरोवर.....

माझा नैनितालचा प्रवास म्हणजे या सर्व सुंदर वातावरणाच्या पार्श्वभूमीवर बाह्यतः केलेली मौजमजा व अंतर्यामी विचारमंथन असा दुहेरी अनुभव होता.

महाविद्यालयाच्या अखेरच्या पर्वातील अभ्यास-सहल म्हणजे सर्व मित्र-मैत्रिणींच्या सोबत धमाल करण्याचा अधिकृत परवानाच जणू! मी व आमच्या वर्गातील सहाध्यायी मित्र-मैत्रिणीही याला अपवाद नव्हतो. अभ्यासाच्या सर्व स्थळांची सहल करून झाल्यावर आमच्या सहलीचा मोर्चा नैनितालकडे वळला. प्रवासात अखंड टिवल्याबावल्या करणे, चिडवाचिडवी, भेंड्या, उखाळ्यापाखाळ्या, खोड्या असे उद्योग चालू होते.

दिल्लीहून एक संपूर्ण रात्र नागमोडी, वळणावळणाच्या रस्त्यांनी बसचा प्रवास केल्यावर पहाटे आलेल्या नैनितालमधील ऐन नोव्हेंबर महिन्यातील हाडे गोठवून टाकणारी थंडी आम्हाला जरा अनपेक्षितच होती.

तशी आम्हाला आमच्या प्राध्यापकांनी पूर्वसूचना दिली होती. परंतु तरुणाईच्या जोषात आम्ही तिकडे फारसे लक्ष दिले नव्हते.

परिणामी, चाळीस जणांचा आमचा जथा कुडकुडत, थरथरत, सुन्न होऊन नैनितालच्या नैनी सरोवराच्या काठालाच लागून असलेल्या पर्यटक निवासात दाखल झाला. दिवसा साधारण तीन ते चार डिग्रीज सेल्सियस तापमान असायचे. रात्री ते किती घसरायचे ह्याची कल्पनाच न केलेली बरी! त्यात आम्ही सरोवराच्या काठालाच असल्याने तो गारठा अजूनच वेगळा! सकाळी दहा वाजता सूर्य उगवायचा (म्हणजे आभाळात धुगधुगी आल्यासारखा दिसायचा! ) बाकी वेळी धुकाळ वातावरण, बोचरी थंडी, रक्त गोठविणारे वारे आणि मधूनच दाटून येणारा अंधार! अहाहा!!


आमची स्थिती तर काय वर्णावी!! नाक, कान, चेहरे थंडीने कोरडे, लाल पडलेले... हात-पाय कधीही दगा देतील अशा स्थितीत! स्थानिक बाजारातील दुकाने उघडल्यासरशी आमची टोळी तेथील दुकानांमधून ढीगभर स्वेटर्स, शाली, कानटोप्या इत्यादी खरेदी करून आली. इतकेच नव्हे तर पुण्यातील आपल्या कुटुंबियांसाठीही प्रत्येकाने पुण्यात तीन - चार डिग्रीज सेल्सियस तापमान असल्याच्या थाटात वारेमाप गरम कपडे घेतले! (अजूनही १२ - १३ वर्षांनंतर आमच्या घरी नैनितालच्या लोकरी स्वेटर - शालींची पुण्याई पुरी पडत आहे, म्हणजे बोला! ) एवढ्या थंडीत प्रवासाने आखडलेले आमचे हात-पायही चटचट हालत नव्हते. अंघोळीच्या नुसत्या कल्पनेनेही जीव नकोसा होत होता. स्नानगृहात एरवी तासंतास रेंगाळणाऱ्या भद्रकन्या विजेच्या चपळाईने स्नानादिकर्म आटोपून बाहेर येत होत्या.

थंडीच्या मोसमामुळे नैनितालमध्ये प्रवाशांची फारशी गर्दी दिसत नव्हती. दुकाने, हॉटेल्सही पटापट बंद होत असत. आम्ही त्यातल्या त्यात स्वस्त व मस्त अशा ढाबावजा टपरीत बसून गरम चहा आणि विस्तवाच्या उबेचा आनंद घेत असू.

आमच्या रूममध्ये तसा पाचजणींमध्ये मिळून एक हीटर होता, पण ऐन रात्री तो बंद पडत असे. रूमची एक बाजू सरोवराच्या दिशेने उघडत होती. त्या बाजूला मोठमोठ्या काचेच्या खिडक्या होत्या, जेणेकरून सरोवर व पलीकडील पर्वतराजींचा नयनरम्य देखावा सतत समोर असावा. पण आमच्या लेखी ह्या खिडक्या म्हणजे अधिक गारठण्याची क्रूर हमी होत्या! माझ्या मैत्रिणी थंडगार पडलेल्या गादीवर कूस जरी बदलावी लागली तरी अक्षरशः किंचाळत उठत असत, इतकी ती गादी बर्फासमान गार पडलेली असे. मला तर थंडीने झोपच नव्हती.

पहिल्याच रात्री माझ्या एका मैत्रिणीच्या पायात थंडीमुळे प्रचंड गोळे व मुंग्या आल्या.

आमच्या वर्गमित्रांना हे कळल्यावर त्यातील एकाने गुपचूप तिला थोडी ब्रँडी आणून दिली व रात्री ती पायाला चोळायला सांगितले.

पण ही मुलगी तर फार महान निघाली.... तिला औषधासाठी चमचाभर ब्रँडी पोटात तर घेणे सोडाच, पण ती पायाला चोळायलाही महासंकोच वाटत होता. शेवटी रात्री पुन्हा एकदा थंडीने किंचाळून झाल्यावर तिने पायाला कण्हत कुथत ब्रँडी चोळली व खोलीतील इतर सर्व जाग्या मुलींकडून बाकी कोणालाही न सांगण्याचे वचन घेतले! (जसे काही आम्ही हिची बदनामीच करणार होतो, कप्पाळ! )

थंडीमुळे आमचे सर्व प्रेक्षणीय स्थळे पाहण्याचे बेत बारगळले. एक तर धुक्यामुळे व कधीही पडणाऱ्या अंधारामुळे मुख्य शहरापासून फार लांब जाणे, डोंगर तुडविणे जरा आमच्यासारख्या नवख्यांना धोक्याचेच वाटत होते. शिवाय थंडीपायी सगळेजण एवढे गळाठले होते की दिवसभर बाजारात हिंडणे, रोप-वे वरून राईड घेणे, घुडसवारी करणे व नौकानयन याखेरीज खाणे-पिणे व झोपा काढणे (जमल्या तर, कारण थंडीमुळे झोपही यायची नाही! ) हाच उद्योग! त्यामुळे अनेकदा आम्ही क्वचितच उघड्या असणाऱ्या पर्यटन ऑफिसमध्ये घुसत असू व त्यांच्याकडील नैनिताल परिसराचे विविध रंगीत नकाशे, पुस्तिका यांच्यावर ताव मारून जणू आपण ती ती स्थळे प्रत्यक्ष बघत आहोत अशा तऱ्हेचे सोंग आणून मुक्त बडबड करीत असू.


एके दुपारी, मनाचा हिय्या करून मी व माझ्या दोन मैत्रिणींनी आतापर्यंत टाळत आलेल्या नौकानयनाचा लाभ घेण्याचे ठरविले. एक नावाडी ठरविला. दुपारची वेळ असल्याने सूर्य नावाला का होईना, आकाशात दिसत होता. अर्थात त्या उन्हात काही दम नव्हता. गार वारे वाहत होते. सरोवरात बोटींची जास्त वर्दळ नसली तरी अनेक लोक आमच्यासारखाच नौकानयनाचा आनंद लुटायला आल्याचे दिसत होते. हवेतला बोचरा गारठा कमी होण्याची कसलीच लक्षणे नसल्यामुळे आम्ही आमच्या कॉलेजवयातील फॅशन सेन्स ला शोभणारे गरम कपडे घालून आलो होतो. (म्हणजेच, कपड्याच्या उबदारपणापेक्षा 'दिखावा' जास्त, हे सुज्ञांनी समजून घ्यावे! ) नावाड्याने नाव वल्हवायला सुरुवात केल्याबरोबर थोड्याच अंतरावर अचानक आभाळ दाटून आले. जोरात वारे वाहू लागले. आमची नाव गदगदा हालू लागली. सरोवरात इतरही बोटी होत्या. अंधारात नाव तशीच वल्हवली असती तर त्यांच्याशी टक्कर होण्याचा धोका असतो असे मौलिक ज्ञान आम्हाला नावाड्याकरवी मिळाले. कोंदलेला अंधार आकस्मिक होता. पण नावाड्याला ह्याची सवय असल्यामुळे त्याने सराईतपणे नाव थांबविली, स्थिर केली व अचानक दाटून आलेला अंधार सरायची वाट पाहत विडी शिलगावून बर्फाळ हवेत धुराची वलये सोडू लागला. इथे आमचे प्राण मात्र कंठाशी आले होते! आमच्यापैकी एकीलाच पोहोता येत होते. आजूबाजूला डोळ्यात बोट घातले तरी दिसणार नाही, एवढा गुडुप्प अंधार होता. नाव वाऱ्याच्या वेगासरशी डुगडुगत, डळमळत होती. नावाडी जगाची पर्वा नसल्यासारखा आपल्याच नादात होता. डोंगरातील एका देवळातून ऐकू येणारा अखंड घंटा गजर मात्र त्या अंधारातही आश्वासन देत होता. माझे सारे लक्ष त्या घंटानादाकडे एकवटले होते. मनातल्या मनात ईश्वराची प्रार्थना चालली होती. इतके दिवस आमची सर्वांची जी मौजमजा चालली होती, तिची चमक आता फिकी पडू लागली होती. अजून किती बघणार, किती पाहणार? किती प्रेक्षणीय स्थळे पाहिल्यावर हे डोळे निवणार? किती वेगळे वेगळे पदार्थ चाखणार? असे किती पदार्थ चाखले म्हणजे समाधान होणार? अजून किती मौजमजा करणार? याला काही अंत आहे का? मनात असे आणि अजून बरेच विचार उमटत होते.


सरोवरावर निःस्तब्ध शांतता पसरली होती. पक्षीही अंधारात चिडीचूप झाले होते. वातावरणात भरून राहिला होता तो फक्त घोंघावणाऱ्या वाऱ्याचा आवाज व अविरत चाललेला घंटानाद! त्याक्षणी मनात काहीतरी हालले. एक पडदा गळून पडला. आपण जे काही करतोय त्यापेक्षा बऱ्याच वेगळ्या कार्याच्या दिशेने जाण्याची अंतर्सूचना मिळाली. गोंधळलेले मन जसे सावरत होते तोच सूर्यानेही अचानक काळ्यासावळ्या ढगांच्या व धुक्याच्या आडून एकदम बहारदार दर्शन दिले! सरोवरातील नौकाप्रवाशांमधून आनंदाचे एकच चीत्कार उमटले. आमच्या नावाड्याने नाव वळवून पुन्हा काठाला आणली. एवढा वेळ निसर्गाच्या ह्या आकस्मिक रूपाने अवाक झालेल्या माझ्या मैत्रिणींनाही कंठ फुटले. माझ्या डोळ्यांत आलेले कृतार्थतेचे अश्रू लपवितच मीही त्यांच्या चटपटीत गप्पांमध्ये सामील झाले.

काठावर आमच्या वर्गातील इतर मित्रमैत्रिणी आमची वाटच पाहत होते. आमच्या प्राध्यापकांनी आम्हाला तासाभरात मुक्काम हालविण्यासाठी तयार होण्याचा निरोप दिला होता.

कॉलेजवयीन नियमाला अनुसरून मी मनोमनच त्या सूर्यदेवतेला नमस्कार केला व एका अनामिक उत्साहाने पुढील प्रवासासाठी सज्ज झाले!

--- अरुंधती

No comments:

Post a Comment