Sunday, October 24, 2010

अग्निहोत्र : शेतीसाठी समृद्ध वरदान!

मध्यंतरी एका परिचितांच्या ओळखीतील शेतावर जायचा योग आला. हिरवेगार शिवार, डोलणारी पिके, रसरशीत फळे - भाज्या पाहून मन प्रसन्न झाले. शेतमालकांनी आपल्या शेतीत आपण अग्निहोत्राचा दैनंदिन प्रयोग रोज करत असल्याचे व तेव्हापासून पिकाला खूप फायदा झाल्याचे आवर्जून सांगितले. ह्या अगोदरही मी अग्निहोत्र कसे करतात, का करतात, त्याचे वातावरणासाठी - शेतीसाठी व आरोग्यासाठी उपयोग इत्यादींविषयीची मार्गदर्शक भाषणे व प्रात्यक्षिके पाहिली होती. परंतु ज्या शेतजमीनीत असे अग्निहोत्र अनेक महिने नित्यनियमाने होत आहे असे शेत बघण्याचा योग बऱ्याच काळानंतर जुळून आला. अग्निहोत्राचा नित्य सराव शेतीसाठी खरोखरीच उपयोगी पडू शकतो हे जाणवले. तेव्हा पासून ही माहिती आपल्या इतर मराठी शेतकरी बांधवांपर्यंत विनासायास कशी नेता येईल ह्यावर माझे विचार मंथन सुरू झाले. आंतरजालावर मराठीत काही माहिती उपलब्ध होते का, हे धुंडाळले. परंतु हाती विशेष काही आले नाही. इंग्रजी व अन्य विदेशी भाषांमध्ये (जर्मन, फ्रेंच, पोलिश इ. ) मात्र विपुल माहिती उपलब्ध आहे. विज्ञान किंवा शेती हा काही माझा प्रांत नव्हे. परंतु तरीही माझ्या अल्पमतीला अनुसरून अग्निहोत्राविषयीची मला मिळालेली व शेतकरी बंधूंसाठी तसेच पर्यावरण प्रेमींसाठी उपयुक्त वाटणारी माहिती आपल्या समोर ठेवत आहे!  (जाणकारांनी ह्या माहितीत भर घातली तर स्वागतच आहे!)

मानवाच्या व जीवसृष्टीच्या इतिहासात सूर्य व अग्नी यांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. सूर्याने औष्ण्य दिले, प्रकाश, प्राणऊर्जा, अन्न दिले तर अग्नीने भयमुक्त केले, अन्न रांधता येणे शक्य केले व पोषण केले. त्यांच्या ह्या महत्त्वपूर्ण भूमिकेला अनुसरून जगातील बहुविध संस्कृतींमध्ये सूर्य व अग्नी वंदनीय मानले गेले असून त्यांना देवत्व बहाल केलेले आढळते. त्यांचा आदरसन्मान, त्यांचे प्रती कृतज्ञता आणि त्यांची उपासना हा त्यामुळे अनेक संस्कृतींचा अविभाज्य भाग न बनला तरच नवल!

भारतात शेती व गोधनाच्या दृष्टीने अग्नी व सूर्य फारच उपयोगी! कदाचित त्यामुळे भारतीय संस्कृतीतही सूर्योपासना व अग्नीपूजा पुरातन कालापासून दिसून येते. ह्या उपासना व पूजांमधील एक भाग म्हणजे अग्निहोत्र. अग्नी व सूर्याची आराधना. प्रजापतीला अभिवादन. बल, पुष्टी, औष्ण्य, ऊर्जा यांची आराधना. अग्निहोत्राची सुरुवात नक्की कोणी, कशी, केव्हा केली याविषयी बरेच संशोधक बरेच काही सांगू शकतील. परंतु त्यापेक्षाही महत्त्वाची आहे ती अग्निहोत्राची शेतीसाठीची उपयुक्तता. भारतातील व भारताबाहेरील विविध विद्यापीठे, संशोधकांनी व कृषी तंत्रज्ञांनी केलेल्या आधुनिक, विज्ञानाधारित संशोधनानुसार अग्निहोत्राचा शेतीला खूप चांगला फायदा होतो हे निष्पन्न झाले आहे. एका शेतीप्रधान देशासाठी असे संशोधन व त्याची उपयुक्तता अमूल्य आहे.



पूर्वी अग्निहोत्र हे परंपरा, रूढींच्या जोखडात अडकले होते. परंतु आताचे त्याचे स्वरूप सर्वसामान्य माणसास अनुसरण्यास व समजण्यास सोपे, सहज झाले आहे. शेतकरी व त्याच्या कुटुंबातील कोणीही सदस्य आपल्या शेतीसाठी अग्निहोत्र करू शकतात. त्याला कसलेही बंधन नाही. अग्निहोत्र ही एक प्रकारची विज्ञानाधारित, शास्त्रशुद्ध वातावरण-प्रक्रियाच आहे असे म्हणता येईल. आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान ह्यांच्या आधारे अग्निहोत्राचे सभोवतालच्या वातावरणावर, पिकांवर, जमिनीच्या कसावर, पाण्यावर होणारे परिणाम अभ्यासू जाता हा प्रकार खूपच लाभदायी व पर्यावरणपूरक आहे हे संशोधकांच्या लक्षात आले आणि सुरू झाली अग्निहोत्राचा पूरक वापर करून कसलेली शेती.

ह्या आधुनिक अग्निहोत्रात काय असते तरी काय?

१. सूर्योदय व सूर्यास्त ह्या दोन वेळांना हे अग्निहोत्र करतात.
२. त्यासाठी लागणारी सामग्री अतिशय कमी खर्चात, शेती व्यवसायात सहज उपलब्ध होणारी, पर्यावरणपूरक असते. अग्निहोत्राचे तांबे धातूचे पिरॅमिड आकारातील पात्र भारतात माफक किमतीत सामान्यतः पूजा भांडार, भांड्यांच्या दुकानात सहज उपलब्ध होऊ शकते.
३. अग्निहोत्राला लागणारा वेळ सकाळ-सायंकाळ मिळून जास्तीत जास्त अर्धा तास, व त्याचे होणारे फायदे मात्र दूरगामी आहेत.
४. सर्व परिवार अग्निहोत्रात सामील होऊ शकतो. त्याला संख्या, जाती, धर्म, लिंग, पंथाचे बंधन नाही.
५. अग्निहोत्र करताना उच्चारण्याचे मंत्र अतिशय सोपे असून परदेशी लोकही ते सहज पाठ करू शकतात.



साहित्य :

१. तांबे धातूचे ठराविक आकाराचे पिरॅमिड पात्र
२. गायीच्या शेणाची गोवरी, गायीचे तूप, हातसडीचा अख्खा तांदूळ (महिनाभरासाठी पावशेर तांदूळ पुरेसा)
३. काडेपेटी
४. सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळेचे नेमके वेळापत्रक.
५. काटक्या वापरायच्या असल्यास वड, पिंपळ, बेल, उंबर, पळस यांच्या वाळक्या काटक्या.




अग्निहोत्राचा प्रत्यक्ष विधी : 

स्थळ : शेताच्या मध्यात एखादे खोपटे बांधून तिथे हे अग्निहोत्र केल्यास त्याचा उत्तम फायदा होतो.

सूर्याला सन्मुख बसावे. (सकाळी पूर्वेस व सायंकाळी पश्चिमेस तोंड करून) समोर तांब्याच्या पिरॅमिड पात्रात गोवरीचा छोटा तुकडा तळाशी ठेवून त्याच्या भोवती गोवरीचे इतर तुकडे रचत जाणे, ज्यामुळे मध्यात थोडा खळगा तयार होईल. मग एका गोवरीच्या तुकड्याच्या टोकाला थोडे तूप लावून तो आगकाडीने पेटविणे व तो तुकडा अग्निहोत्र पात्रात ठेवणे. अग्निहोत्र प्रज्वलित करण्यासाठी तुम्ही मधल्या खळग्यात कापूर वडी ठेवू शकता. नेमक्या सूर्योदयाच्या व सूर्यास्ताच्या वेळी गायीच्या तुपात भिजलेले दोन चिमटी तांदूळ (अक्षता) ह्या पेटत्या अग्नीला अर्पण करणे. दोन्ही वेळा भिन्न मंत्र म्हटले जातात. दोन्ही वेळा अग्नीत अक्षता अर्पण केल्यावर ते तांदूळ पूर्णपणे जळेपर्यंत तुम्ही बसले असाल त्याच जागी डोळे मिटून स्थिर, शांत बसू शकता.

१. सूर्योदयाचे वेळी अग्निहोत्र करताना म्हणावयाचा मंत्र : 

सूर्याय स्वाहा । (अग्नीत चिमूटभर तूपमिश्रित तांदूळ घालणे) सूर्याय इदं न मम ॥ प्रजापतये स्वाहा । (अग्नीत चिमूटभर तूपमिश्रित तांदूळ घालणे) प्रजापतये इदं न मम ॥

२. सूर्यास्ताचे वेळी अग्निहोत्र करताना म्हणावयाचा मंत्र : 

अग्नये स्वाहा । (चिमूटभर तूपमिश्रित तांदूळ अग्नीत घालणे) अग्नये इदं न मम ॥ प्रजापतये स्वाहा । (अग्नीत चिमूटभर तूपमिश्रित तांदूळ घालणे) प्रजापतये इदं न मम ॥



अग्निहोत्र हे वातावरण, जमीन, पाणी, वनस्पती, प्राणी व मानवास आरोग्यदायी असून दोषनिर्मूलनाचे, शुद्धीकरणाचे काम करते असा अभ्यासकांचा दावा आहे. मंत्रांसहित अग्निहोत्राचे परिणाम फक्त पिकावरच नव्हे, तर मानवी आरोग्यावर, मनस्थितीवर सकारात्मक पद्धतीने दिसून आले आहेत. मंत्र म्हणजे मनाला जे तारतात ते. संस्कृत मंत्रांची कंपने/ तरंग व त्यांचा मानवी चेतासंस्थेवरील, जीवसृष्टीवरील सकारात्मक परिणाम ह्यांवर संशोधन चालू आहेच! अग्निहोत्रात म्हटल्या जाणाऱ्या मंत्रांचाही सभोवतालच्या जीवसृष्टीवर व मानवी आरोग्यावर -स्वास्थ्यावर चांगला परिणाम दिसून आला आहे.

रोज अग्निहोत्र करून जोपासलेल्या, कसलेल्या शेतीचा भारतातील वेगवेगळ्या कृषी संशोधन संस्था, अभ्यासक व भारताबाहेरील तज्ञांनी अभ्यास केल्यावर त्यांनी खालील प्रमाणे निष्कर्ष काढले :

१. अग्निहोत्र केलेल्या क्षेत्रातील पोषक वायूंचे प्रमाण परिणामकारक रितीने वाढले. (इथिलीन ऑक्साईड, प्रॉपिलीन ऑक्साईड, फॉर्मॅल्डिहाईड, ब्यूटाप्रोपियोलॅक्टोन) त्या भागातील पॅथोजेनिक बॅक्टेरियाजचे प्रमाण ९६% ने घटले व हवा शुद्ध होण्यास मदत झाली. अग्नीत आहुती घातल्यावर गायीच्या तुपामुळे ऍसिटिलीन तयार होऊन त्यामुळे प्रदूषित हवा शुद्ध होण्यास मदत होते.

२. पिकाची गुणवत्ता व उत्पादनात वाढ.

३. कृषी रसायनांच्या फवारणीच्या खर्चात घट.

४. चव, रंग, पोत व पोषणमूल्यांच्या दृष्टीने सरस पीक.

५. अधिक टिकाऊ व निर्यातीस अनुकूल उत्पादन.

६. कमी काळात जास्त पीक. एका वर्षात अधिक वेळा पीक घेऊ शकता.

७. अग्निहोत्रात वापरल्या जाणाऱ्या तुपाची सूक्ष्म स्तरावर प्रक्रिया होऊन त्यामुळे वनस्पतींना हरितद्रव्य उत्पन्न करण्यास मदत मिळते.

८. मधमाश्या अग्निहोत्र केलेल्या क्षेत्रातील पिकाकडे, झाडांकडे अधिक प्रमाणात आकृष्ट होताना दिसून आले आहे. त्यामुळे परागसिंचनास मदत होऊन उत्पादन वाढण्यास मदत होते.

९. अग्निहोत्रातील राख घन, द्राव, जैव-रसायनांच्या रूपात किंवा बायोसोल सारख्या स्वरूपात शेतात वापरल्यास पिकाला अधिक पोषण देण्यास, तसेच कीड व रोगांपासून त्यांचा बचाव करण्यास मदत करते असेही दिसून आले आहे.

अग्निहोत्र वापरून केलेल्या शेती/ पिकात खालील प्रमाणे फरक दिसून आला :

टोमॅटो : ( अगोदर, कृषी रसायने वापरून) : आकार - ७ सेंमी, वजन -८५ ग्रॅ., जाडी - १३ सेंमी, चव - बेचव,पोत - निस्तेज, रंग - फिकट लाल  , दर झाडागणिक उत्पादन - १ ते २ किलो, लागवडीपासून सुगीचा काळ - १२ आठवडे.
टोमॅटो : ( अग्निहोत्र वापरून) :    आकार - १० सेंमी, वजन - १२० ग्रॅ., जाडी - २० सेंमी, चव - चांगली , पोत - टणक , रंग -गडद लाल, ,दर झाडागणिक उत्पादन - ३ ते ४ किलो, लागवडीपासून सुगीचा काळ - ७ आठवडे.

आंबा : (अगोदर, कृषी रसायने न वापरता) : १०,००० किलो प्रती हेक्टर ( ८,९२५ पाऊंडस/ एकर)
(अगोदर, कृषी रसायने - कीटकनाशके व खते वापरून): ३०,००० किलो/ हेक्टर ( २६,७०० पाऊंडस/एकर)
(अग्निहोत्र वापरून) : ८४,००० किलो प्रती हेक्टर ( ७४,८०० पाऊंडस/ एकर)

केळी : 
१. पाचव्या पिढीतील केळीची बाग, फळाचा आकार लहान आणि कमी उत्पादन.
२. बाग फुसॅरियम (Fusarium)  ह्या बुरशीने ७०% ग्रस्त.
३. ४०%  moco Pseudomona Solanace.
४. एका झाडापासून जास्तीत जास्त ६ ते ७ नवीन झाडे तयार.
५. लागवडीपासून उत्पादनाचा काळ ८ ते १२ महिने.

चार महिने अग्निहोत्राचा शेतात/ बागांमध्ये नियमित वापर केल्यावर :
१. सर्व बागेचे एकसंध पुनरुज्जीवन.
२. रोग व कीड यांचा अभाव.
३. केळीचे घड आकाराने व वजनाने जास्त मोठे. सरासरी १२० केळी.
४. एका झाडापासून १० ते १२ नव्या झाडांची निर्मिती.
५. लागवडीपासून उत्पादनाचा काळ ६ महिने.

भाताच्या पिकाच्या बाबत, अग्निहोत्राने बीज अंकुरित होण्यास मदत होते का या विषयी बेंगळुरू येथील विवेकानंद योग संशोधन संस्थेने केलेल्या पाहणी व निष्कर्षांबद्दलचा हा दुवा :

अग्निहोत्राने बीज अंकुरित होण्यास मदत
http://nopr.niscair.res.in/bitstream/123456789/9356/1/IJTK%203(3)%20231-239.pdf


तसेच मायक्रो-बायॉलॉजिस्ट व संशोधक यांनी वेगवेगळे शास्त्रीय प्रयोग करून अग्निहोत्राची वातावरणासाठी व पिकांसाठीची उपयुक्तता सिद्ध केली आहे. अग्निहोत्र व सूक्ष्म-जीव (मायक्रोब्ज), अग्निहोत्राची राख व पाण्यात विरघळणारी फॉस्फेटस, अग्निहोत्र व द्राक्षे, अग्निहोत्र व व्हॅनिला वनस्पती यांविषयी केलेल्या प्रयोगांमधून त्याचे महत्त्व व उपयुक्तता अधोरेखितच झाली आहे. ह्या प्रयोगांविषयीचा दुवा :

http://www.agnihotra.org/content/scientific-experiments-agnihotra

अग्निहोत्राचे अन्य उपयोग :

१. अनेक मनोकायिक आजारांवर, जुन्या दुखण्यांवर तसेच नशाखोरीतून सुटण्यासाठी पूरक व उपयुक्त.

दुवा : http://www.indianjpsychiatry.org/temp/IndianJPsychiatry293247-2347415_063114.pdf

दुवा : http://www.homa-hof-heiligenberg.de/homa-therapie_eng.html

२. ध्यान, एकाग्रता यांसाठी पोषक.

३. आरोग्यास उपयुक्त, प्रतिकारशक्ती वाढविते, ताण कमी करते, सकारात्मक दृष्टिकोन तयार करण्यासाठी पूरक.

अग्निहोत्र व होम उपचार ( होमा थेरपी) विषयी आंतरजालावर भरपूर माहिती उपलब्ध आहे. त्याचा अनेक देशी-विदेशी लोक लाभ घेत आहेत. अग्निहोत्रा विषयीची अनेक संकेतस्थळेही उपलब्ध आहेत.
कर्नाटकातील एका शेतकऱ्याची ही अनुभव गाथा व आपल्या शेतातील अग्निहोत्राच्या प्रयोगानंतर त्याने अनुभवलेले बदल ह्या विषयीचा अजून एक लेख :


अभय मुतालिक देसाई यांचा आत्मनिर्भर शेतीचा शास्त्रीय प्रयोग


http://www.organiser.org/dynamic/modules.php?name=Content&pa=showpage&pid=304&page=10 

श्री. देसाई ह्यांनी आपल्या शेताच्या मध्यावर अग्निहोत्रासाठी छोटेसे खोपटे बांधले. त्याचा उपयोग फक्त अग्निहोत्र करणे व मंत्रोच्चारण करणे एवढ्यासाठीच केला. रोज सूर्योदय व सूर्यास्त समयी अग्निहोत्र केल्याने त्यांना कशा प्रकारे आपल्या शेतीत सुधारणा घडवता आली ह्याचा आढावा त्यांचा लेख घेतो.

हिमाचल प्रदेशातील शेतकर्‍यांनी अग्निहोत्र शेती करण्यास सुरुवात केल्याची ही बातमी : http://www.thaindian.com/newsportal/feature/himachal-pradesh-farmers-adopt-centuries-old-homa-farming-method_100238829.html

यूट्यूबवरही ह्याविषयीच्या ध्वनिचित्रफीती उपलब्ध असून त्या अवश्य पाहाव्यात : 

श्री. रवी वाडेकर, रत्नागिरी ह्यांची मुलाखत


श्री. रमेश तिवारी ह्या उत्तर प्रदेशातील आंबा उत्पादकाची परदेशी वृत्तवाहिनीवर अग्निहोत्र शेतीबद्दलची बातमी


ठाण्याच्या श्री. व्यंकटेश कुलकर्णी या कृषी उत्पादकाची मुलाखत


दक्षिण जर्मनीतील हाल्डेन्होफ अग्निहोत्र शेती


श्री. अभय मुतालिक देसाई, कर्नाटक यांची मुलाखत


श्री. वसंत परांजपे यांची मुलाखत व अग्निहोत्र प्रात्यक्षिक


भारतातील गरीब शेतकऱ्याला परवडणारी, त्याला सहज करता येणारी व अनुभवसिद्ध अशी ही अग्निहोत्राची पद्धती जर आधुनिक शेतकऱ्याने अवलंबली तर परंपरागत ज्ञानाचा व्यवहारी उपयोग करून त्याला आपले व घरादाराचे आयुष्य तर समृद्ध बनवता येईलच, शिवाय पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ते एक फार मोठे योगदान ठरेल. सर्वसामान्य माणसालाही अग्निहोत्र करणे सहज शक्य असून रोज किमान एका वेळी अग्निहोत्र करता आले तरीही ते लाभदायकच आहे!

अग्निहोत्राविषयी अधिक माहितीसाठी : 

तपोवन, मु.पो. : रत्नपिंपरी, तालुका : पारोळा, जि : जळगाव, महाराष्ट्र, भारत

दूरभाष : +९१ २५९७ २३५ २०३, +९१ २५९७ २८६ ०९१.

मोबाईल : श्री. अभय परांजपे : +९१ ९९८१३ ५२४६३.

ईमेल : tapovan3@yahoo.com

वेबसाईट : http://www.tapovan.net/



--- लेखिका : अरुंधती

(माहितीस्रोत : आंतरजाल व अन्य)

No comments:

Post a Comment