Friday, May 04, 2012

'हा भारत माझा' चित्रपट प्रीमियर वृत्तांत

काही चित्रपट आपल्या कथानकातून व मांडणीतून आपल्याला आपण स्वीकारलेल्या जीवनमूल्यांबाबत, परिस्थितीबाबत विचार करण्यास उद्युक्त करतात. मनोरंजनाबरोबरच जागृती आणण्याचे काम करतात व त्यात प्रेक्षकांनाही सामावून घेतात. 'हा भारत माझा' चित्रपटाच्या माध्यमातून हे सर्व साध्य होते का, हे पाहण्यासाठी हा चित्रपट अवश्य पाहावा व मुलांनाही दाखवावा. 






''हा भारत माझा'' चित्रपटाच्या मायबोलीकरांसाठी खास आयोजित केलेल्या खेळाला मला काही कारणाने जायला जमले नव्हते, पण चित्रपट बघायची इच्छा मात्र होती. काल सायंकाळी ३ मे रोजी ती इच्छा पूर्ण झाली. चित्रपटाच्या प्रीमियरला मायबोली तर्फे जायला मिळते आहे याचाही आनंद मनात होताच! तिथे पोचल्यावर अगोदर अरभाटाला फोन लावला. अन्य कोण मायबोलीकर खेळाला उपस्थित राहणार आहेत त्याची कल्पना नव्हती. त्यामुळे मी आजूबाजूला उभ्या बर्‍याच लोकांकडे बघत 'हा कोणता आयडी असेल?' असा विचार करत अल्पसा टाईमपास केला. थोड्याच वेळात अरभाटाला भेटून व प्रवेशिका हाती घेऊन मी अन्य काही प्रेक्षकांसमवेत स्क्रीन क्रमांक ४ कडे कूच केले.


दारातच एका गोबर्‍या गालाच्या छोट्या मुलाने आमचे एक सुंदर बुकमार्क देऊन स्वागत केले. नंतर कळले की तो चित्रपट अभिनेत्री रेणुका दफ़्तरदार यांचा सुपुत्र होता. त्या बुकमार्कवर एका बाजूला कबीराचा चित्रपटात झळकलेला दोहा व दुसर्‍या बाजूला 'हा भारत माझा' चित्रपटाच्या कलावंत, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आदी मंडळींचे नामनिर्देश होते. कबीराचा तो दोहा वाचताच मन प्रसन्न झाले.


प्रेक्षक व निमंत्रितांमध्ये काही चंदेरी पडद्यावरचे ओळखीचे चेहरे तर काही सामाजिक क्षेत्रांतील मान्यवर मंडळींचे चेहरे दिसत होते. लवकरच चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांनी कार्यक्रमास सुरुवात केली. ह्या 'झीरो बजेट' चित्रपटाची कल्पना अण्णा हजारेंच्या देशव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कशी स्फुरली, काय निमित्त झाले, मान्यवर कलाकारांनी - तंत्रज्ञांनी कशा तारखा दिल्या, मदतीचे पुढे झालेले हात, नंतरची जुळवाजुळव यांबद्दल सांगितले. चित्रपटाच्या दिग्दर्शिका, कथालेखिका, पटकथाकार व संवादलेखिका सुमित्राताई भावे यांसह चित्रपटातील सर्व उपस्थित कलाकार, तंत्रज्ञ तसेच किर्लोस्कर कंपनीचे प्रतिनिधी यांना स्टेजवर बोलावून त्यांची ओळख करून देण्यात आली व त्यांचे खस अत्तराची भेट देऊन स्वागत केले गेले. कलाकारांपैकी उत्तरा बावकर, रेणुका दफ्तरदार, जितेंद्र जोशी, आलोक राजवाडे, मदन देवधर यांसह चित्रपटात इतर छोट्यामोठ्या भूमिका केलेली मंडळीही आवर्जून उपस्थित होती. मायबोली.कॉमचा व मायबोलीतर्फे केल्या गेलेल्या मदतीचाही विशेष उल्लेख सुनील सुकथनकरांनी आवर्जून केला.


सुरुवातीलाच राष्ट्रगीताची धून व त्या जोडीला भारताच्या सीमाप्रांतातील लष्करी ध्वजवंदनाच्या चित्रणाने मनात देशाबद्दल व देशसैनिकांबद्दल जे काही उचंबळून आले त्याचे शब्दांमध्ये वर्णन करणे अशक्य आहे. नंतर कविता खरवंडीकरांनी गायलेला कबीराचा दोहा जणू पुढे उलगडत जाणार्‍या चित्रांची पूर्वकल्पनाच देतो. चित्रपटाची कथा येथे देत नाही. परंतु अगदी कोणत्याही मध्यम वर्गीय घरात घडू शकेल असे हे कथानक आहे. त्यात तरुण पिढी व जुन्या पिढीच्या समोरील व्यावहारिक व मानसिक आव्हाने आहेत. स्वार्थ मोठा की कोणाला न दुखावता, भ्रष्टाचार न करता साधलेला आनंद मोठा यावर कोणत्याही कुटुंबात घडतील अशा घटनांमधून साकारणारी कथा आहे. एकीकडे अण्णा हजारेंनी छेडलेले भ्रष्टाचारविरोधी देशव्यापी अहिंसक आंदोलन, जगात अन्य ठिकाणी झालेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर उमटलेले त्याचे जगव्यापी पडसाद, प्रसारमाध्यमे - सोशल नेटवर्किंग च्या माध्यमातून घरांघरांमधून पोचलेले हे आंदोलन, त्यातून झडलेल्या चर्चा, ढवळून निघालेली मने, शहरी लोकांबरोबरच ग्रामीण जनतेचा सहभाग, भ्रष्टाचाराला कंटाळलेली आणि सरावलेली मने व या सर्वांचे टीव्ही फूटेज या सर्व घटनांचा सुरेख वापर या चित्रपटात दिसून येतो. त्यातूनच चित्रपटाचे कथानक पुढे सरकत राहते. देशव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एका मध्यमवर्गीय कुटुंबातील घडामोडी, त्या कुटुंबातील सदस्यांच्या समोर उभे राहिलेले प्रश्न, त्यांची त्यांनी शोधलेली उत्तरे, त्यातून निर्माण होणारे मानसिक आंदोलन - द्वंद्व यांचा जो मेळ घातला आहे तो खरोखरीच उत्तमपणे मांडला आहे. विक्रम गोखले व उत्तरा बावकर ज्या सहजतेने वावरतात त्यामुळे त्यांचा अभिनय हा अभिनय वाटतच नाही. तीच गोष्ट चित्रपटातील इतरही कलाकारांची म्हणावी लागेल. जितेंद्र जोशी, आलोक राजवाडे, ओंकार गोवर्धन, रेणुका दफ्तरदार, देविका दफ्तरदार यांचे अभिनय हे अभिनय न वाटता अतिशय स्वाभाविक वाटतात. कोठेही दे मार मारामारी, अंगावर येणारी गाणी, संवाद, चित्रे न वापरता आपला संदेश प्रेक्षकांपर्यंत समर्पकपणे पोहोचविण्यात चित्रपट यशस्वी ठरतो. शैलेश बर्वेंनी दिलेले संगीतही चित्रपटात बेमालूमपणे मिसळून जाते. किशोर कदम व दीपा लागूंच्या छोट्याच परंतु प्रभावी भूमिका लक्षात राहणार्‍या आहेत व त्यांनी त्या नेहमीच्याच सफाईने वठविल्या आहेत.


दोन तासांचा हा चित्रपट प्रत्येक भारतवासियाने पाहावा असाच आहे. चित्रपटाला सबटायटल्सही आहेत, त्यामुळे अमराठी लोकांनाही तो सहज समजू शकेल. यातील भाषा आपल्या प्रत्येकाची आहे. या चित्रपटात मांडली गेलेली मानसिक आंदोलने, द्वंद्व, प्रश्न, वातावरण आपणही रोजच्या जीवनात कोठे ना कोठे अनुभवत असतो. त्यामुळेच जो संदेश चित्रपटाच्या शेवटच्या भागात कथानकातून समोर येतो तो नक्कीच आपल्याला विचार करायला लावतो. आपल्या जीवनशैलीविषयी विचार करायला लावतो. पर्याय शोधायचा प्रयत्न करायला लावतो. भ्रष्टाचाराचा विरोध हा आपण आपल्या वैयक्तिक जीवनातून सुरू केल्याशिवाय पर्याय नाही - तसे केले तरच हा लढा सार्थ होईल - भ्रष्टाचार करणे हा जसा गुन्हा आहे तसाच तो सहन करणे हाही एक गुन्हा आहे याची जाणीव ज्या सहज सूक्ष्मतेने चित्रपटातून प्रसारित केली आहे त्याची दाद देण्यासाठी प्रत्येकाने हा चित्रपट एकदा तरी बघावा व इतरांना दाखवावा.


इतका सुंदर चित्रपट पाहायला व अनुभवायला मिळाल्याबद्दल मायबोलीचे व मायबोलीच्या माध्यम प्रायोजकांचे अनेक आभार! :)

2 comments:

  1. Anonymous9:07 PM

    Thanks for such a informative blog!!mast lihilay

    ReplyDelete
  2. Anonymous2:00 PM

    Good information !!!chitrapatachi eak zalak ali dolyasamor !!!!

    ReplyDelete