Sunday, March 20, 2011

संत नामदेवांच्या गुरुमुखी अभंगांमधील चमत्कार प्रसंग



ग्रंथसाहिबातील गुरुमुखीमध्ये लिखित व पंजाबी भाषेत रचलेल्या ''शबद'' रचनांचे वाचन करत असताना ईश्वराच्या अगाध लीलांचे वर्णन करणार्‍या संत नामदेव रचित सुंदर रचना वाचणे हा खरोखर प्रासादिक अनुभव आहे. एरवी हरीभक्तीबरोबरच समाजातील अंधश्रद्धा, भोंदूगिरी व पाखंडीपणावर आपल्या अभंगांमधून शब्दांचे आसूड उगारून खरमरीत टीका करणार्‍या संत नामदेवांच्या या एकूण ६१ रचनांमध्ये त्यांच्या आयुष्यातील काही चमत्कारांचे त्यांनी काव्यरूपात केलेले वर्णनही आगळे व अभ्यास करण्याजोगे आहे. नवरसांमधील अद्भुतरसाला, विस्मयाला जागृत करणार्‍या या रचनांमधील शब्दप्रयोग काहीवेळा मराठी धाटणीचेही आहेत.
आजच्या युगात चमत्कारांच्या विरोधात बोलणारे 'अशा घटना खरोखरी घडू शकतात का?' म्हणून त्यांना वैचारिक आव्हानही देऊ शकतील. परंतु खुद्द संत नामदेव ह्या घटनांचे वर्णन फार मार्मिकपणे करतात. त्यांत कसलाही अभिनिवेश नाही. उलट एकप्रकारचा तटस्थपणाच आढळतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ह्या सर्व रचना पंजाबी गुरुमुखीतील असून विशिष्ट संगीत रागांत रचलेल्या आहेत. ज्याची मातृभाषा मराठी आहे अशा ह्या संताने बाराव्या शतकात भागवतधर्माचा प्रसार करण्यासाठी महाराष्ट्राबाहेर पाऊल टाकले. नामदेवांनी पंजाबात वीस वर्षांपेक्षा जास्त काळ वास्तव्य केले. तेथील भाषा, संस्कृती फक्त आत्मसातच केली असे नव्हे; तर त्या भाषेत सुंदर काव्येही रचली. हे सर्व अभंग शीख संप्रदायाच्या आद्य धर्मग्रंथाचा, गुरु ग्रंथसाहिबचा एक भाग आहेत. अभंगांच्या भाषेची प्रासादिकता, वर्णनातील नाट्यमयता, आपला भाव नेटक्या शब्दांनी मांडण्याची कला आणि ह्या सर्वांमधून ठायी ठायी जाणवणारे भक्तीमाधुर्य बघू जाता नामदेवांच्या रचनांचे आगळेपण लक्षात येऊ लागते.

आतापर्यंतच्या माझ्या वाचनात आलेल्या संत नामदेव रचित अभंगांमधील हे तीन चमत्कृतीपूर्ण प्रसंग इथे त्यांच्याच शब्दांमध्ये देऊन त्यांचा अर्थ सांगायचा माझा प्रयत्न आहे.
एका रचनेत ते आपल्या हातून देवाने (विठ्ठलाने) दूध कसे प्यायले ह्याचे सरळ, साधे, प्रांजळ वर्णन करतात :
दूधु कटोरै गडवै पानी ॥
कपल गाइ नामै दुहि आनी ॥१॥
दूधु पीउ गोबिंदे राइ ॥
दूधु पीउ मेरो मनु पतीआइ ॥
नाही त घर को बापु रिसाइ ॥१॥

कपिला गाईचं दोहन करून कटोराभर दूध आणि गडूभर पाणी नामदेव (कुल)देवासाठी घेऊन गेले. माझ्या देवाधिदेवा, गोविंद राया, हे दूध पी बरं! तू हे दूध प्यायलास की मला बरं वाटेल. नाहीतर माझे वडील नाराज होतील.
सोइन कटोरी अम्रित भरी ॥
लै नामै हरि आगै धरी ॥२॥
एकु भगतु मेरे हिरदे बसै ॥
नामे देखि नराइनु हसै ॥३॥
दूधु पीआइ भगतु घरि गइआ ॥
नामे हरि का दरसनु भइआ ॥४॥

नामदेवाने अमृतरूपी दुधाने सोन्याची कटोरी भरली आणि देवाच्या समोर धरली. हा माझा भक्त माझ्या हृदयात निवास करतो (असे म्हणत) देवाने (नारायणाने) नामदेवाकडे पाहून स्मित केले. देवाने दूध प्यायले, भक्त घरी परतला, अशा रीतीने नामदेवाला हरीचे दर्शन झाले.
किती सरळसोट वर्णन.... पण थेट हृदयाला भिडणारे! ''माझ्या देवाधिदेवा, गोविंद राया, हे दूध पी बरं! तू हे दूध प्यायलास की मला बरं वाटेल. नाहीतर माझे वडील नाराज होतील.'' हा त्यांचा आग्रह जितका निर्व्याज, निरागस आहे तितकाच त्यामागील भावही!
''देवाने दूध प्यायले, भक्त घरी परतला, अशा रीतीने नामदेवाला हरीचे दर्शन झाले.'' जणू काही नामदेव दुसर्‍याच कोणाबद्दल सांगत आहेत अशा तर्‍हेने केलेले हे वर्णन!
पुढे एका अभंगात तत्कालीन वर्णव्यवस्था, जातिभेदापायी नामदेवांना एकदा देवळाबाहेर हुसकावले जाते त्या प्रसंगाचे वर्णन आहे. व्यथित अंतःकरणाने नामदेव देवळाच्या पिछाडीस हरिनामाला आळवत बसतात. आणि काय आश्चर्य!! काही काळाने देऊळच फिरते आणि पिछाडीस बसलेल्या ह्या हरिभक्ताला सन्मुख होते.
प्रसंगाचे वर्णन करताना नामदेव म्हणतात :
हसत खेलत तेरे देहुरे आइआ ॥
भगति करत नामा पकरि उठाइआ ॥
हीनड़ी जाति मेरी जादिम राइआ ॥
छीपे के जनमि काहे कउ आइआ ॥१॥

हसत खेळत मी तुझ्या मंदिरी आलो. हे भगवंता, तुझी आराधना करत असताना नामदेवाला पकडून मंदिराबाहेर हुसकावले गेले. हे देवा, माझी जात हीन आहे. मी शिंप्याच्या घरी का जन्मलो?
लै कमली चलिओ पलटाइ ॥
देहुरै पाछै बैठा जाइ ॥२॥
जिउ जिउ नामा हरि गुण उचरै ॥
भगत जनां कउ देहुरा फिरै ॥३॥

मी माझं कांबळं उचललं आणि देवळाच्या पिछाडीस जाऊन बसलो. नामदेवाने जसजसे भगवंताचे स्तुतीगान सुरू केले तसे देऊळ मूळस्थानावरून फिरले आणि देवाच्या या पामर भक्ताकडे तोंड करून बसले.
आपण हीन कुळात का जन्माला आलो ह्या नामदेवांच्या प्रश्नात जी आर्तता आहे ती व्याकुळ करणारी आहे. त्यामागचे दु:ख हे आपल्या प्राणप्रिय भगवंताची मनाजोगती आराधना करता न येण्याचे दु:ख आहे.
ह्या अभंगासंदर्भात जी कथा प्रसिद्ध आहे ती अशी की, एकदा विठोबा खेचर, नामदेव व ज्ञानेश्वर ह्या देवळाच्या समोर इतर वारकर्‍यांसमवेत भजनकीर्तनात मग्न होते तेव्हा तेथील पुजार्‍यांनी त्यांना हटकले व तिथून बाहेर काढले. मग सर्व वारकर्‍यांसह नामदेव मंदिराच्या पिछाडीस गेले व तिथे भजनाचे रंगी दंग झाले. आणि काय आश्चर्य! देवाने आपल्या प्रिय भक्ताच्या आळवणीला साद देत सारे देऊळच फिरवले व भक्ताला दर्शन दिले.
देवाने आपल्या भक्ताकडे मुख करून त्याच्या कीर्तनाचा, स्तुतीगानाचा आनंद घेतला.
औरंगाबाद जवळ औंढे नागनाथाचे जे प्रसिद्ध शिवमंदिर आहे तेच हे मंदिर अशी कथा आहे. ह्या देवळाच्या पिछाडीस नंदी आहे.
तिसर्‍या अभंगात नामदेव ईश्वराच्या कृपेने मृत गाय कशी जिवंत झाली व दूध देऊ लागली हे वर्णितात.
ह्या वर्णनातील सुलतान हा मोहम्मद बिन तुघलक हा सुलतान होय. तसे हा सुलतान तत्त्वज्ञान, तर्क, गणित, अवकाशविज्ञान, वैद्यकशास्त्र, भाषा इत्यादींत पारंगत होता, परंतु हिंदूंचा द्वेष करण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही.
नामदेवांच्या हरीभक्तीने व लोकप्रियतेने अस्वस्थ होऊन तुघलकाने त्यांना साखळदंडांत बंदिस्त केले. त्याची अट होती, तुझा विठ्ठल खराच असेल तर त्याला बोलाव व मेलेल्या गायीला पुन्हा जिवंत करून दाखव. अन्यथा मी तुझा येथेच वध करेन. नामदेवांच्याच शब्दांमध्ये हा प्रसंग :
सुलतानु पूछै सुनु बे नामा ॥
देखउ राम तुम्हारे कामा ॥१॥
नामा सुलताने बाधिला ॥
देखउ तेरा हरि बीठुला ॥१॥
बिसमिलि गऊ देहु जीवाइ ॥
नातरु गरदनि मारउ ठांइ ॥२॥

सुलतान म्हणाला, ''नामदेवा, मला तुझ्या देवाची करामत बघायची आहे.''
सुलतानाने नामदेवाला अटक केली आणि फर्मान सोडले, ''मला तुझा देव दाखव.''
''ही मेलेली गाय जिवंत करून दाखव, नाहीतर मी तुझं शिर आताच्या आता इथे धडावेगळं करेन.''
बादिसाह ऐसी किउ होइ ॥
बिसमिलि कीआ न जीवै कोइ ॥३॥
मेरा कीआ कछू न होइ ॥
करि है रामु होइ है सोइ ॥४॥
नामदेव उत्तरले, ''महाराज, हे असं कसं घडून येणार? कोणीही मेलेल्याला पुन्हा जिवंत करू शकत नाही. मी स्वतः ह्याबाबत काहीच करू शकत नाही. जे काही राम (ईश्वर) करेल त्याप्रमाणे घडेल.''
बादिसाहु चड़्हिओ अहंकारि ॥
गज हसती दीनो चमकारि ॥५॥
रुदनु करै नामे की माइ ॥
छोडि रामु की न भजहि खुदाइ ॥६॥
न हउ तेरा पूंगड़ा न तू मेरी माइ ॥
पिंडु पड़ै तउ हरि गुन गाइ ॥७॥

उद्धट राजा ह्या उत्तराने संतप्त झाला आणि त्याने नामदेवावर हत्तीचा हल्ला घडवून आणला. नामदेवाची आई रडू लागली आणि म्हणू लागली, ''तू तुझ्या रामाला सोडून देऊन त्याच्या अल्लाची भक्ती का करत नाहीस?''
नामदेवाने उत्तर दिले, '' मी तुझा मुलगा नाही आणि तू माझी माता नाहीस! माझं शरीर नष्ट झालं तरी मी हरीचं स्तुतीगान करतच राहीन.''
करै गजिंदु सुंड की चोट ॥
नामा उबरै हरि की ओट ॥८॥
काजी मुलां करहि सलामु ॥
इनि हिंदू मेरा मलिआ मानु ॥९॥
बादिसाह बेनती सुनेहु ॥
नामे सर भरि सोना लेहु ॥१०॥
मालु लेउ तउ दोजकि परउ ॥
दीनु छोडि दुनीआ कउ भरउ ॥११॥

हत्तीने सोंडेने प्रहार केला, पण नामदेव हरीकृपेने त्यातून वाचले.
राजा उद्गारला, ''माझ्यासमोर काजी, मुल्ला मान तुकवितात आणि ह्या हिंदूने माझा अवमान केला आहे.''
लोकांनी राजाला विनविले, '' हे राजा, आमची प्रार्थना ऐक. नामदेवाच्या वजनाचे सोने घे आणि त्याला सोडून दे.'' त्यावर राजा उत्तरला, '' मी जर सोने घेतले तर मला माझ्या श्रद्धेचा बळी देऊन भौतिक संपत्ती गोळा करत बसल्याबद्दल नरकात जावे लागेल.''
पावहु बेड़ी हाथहु ताल ॥
नामा गावै गुन गोपाल ॥१२॥
गंग जमुन जउ उलटी बहै ॥
तउ नामा हरि करता रहै ॥१३॥
सात घड़ी जब बीती सुणी ॥
अजहु न आइओ त्रिभवण धणी ॥१४॥

पायांना साखळदंडांनी बांधून जखडलेल्या अवस्थेत नामदेवांनी हाताने ताल धरला आणि ईश्वराचे स्तुतीगान करू लागले.
''हे देवा! गंगा आणि यमुनेचे पाणी जरी उलटे वाहू लागले तरी मी तुझेच स्तुतिगान करत राहीन,'' त्यांनी आळविले. तीन तास (सात घटिका) उलटले. आणि तरीही त्रिभुवनाचा स्वामी आला नाही.
पाखंतण बाज बजाइला ॥
गरुड़ चड़्हे गोबिंद आइला ॥१५॥
अपने भगत परि की प्रतिपाल ॥
गरुड़ चड़्हे आए गोपाल ॥१६॥
कहहि त धरणि इकोडी करउ ॥
कहहि त ले करि ऊपरि धरउ ॥१७॥
कहहि त मुई गऊ देउ जीआइ ॥
सभु कोई देखै पतीआइ ॥१८॥

पंखांच्या पिसांपासून बनविलेले पाखंतण वाद्य वाजवित, गरुडारूढ विश्वेश्वर अखेरीस प्रकटला. आपल्या भक्ताचा प्रतिपालक असा तो गोपाल गरूडारूढ होऊन प्रकट झाला. ईश्वर त्याला (नामदेवाला) म्हणाला, ''तुझी इच्छा असेल तर मी पृथ्वी तिरपी करेन, तुझी इच्छा असेल तर तिला उलटी-पालटी करेन. तुझी इच्छा असेल तर मी मेलेल्या गायीला पुन्हा जिवंत करेन. सर्वजण पाहतील आणि त्यांची खात्री पटेल.''
नामा प्रणवै सेल मसेल ॥
गऊ दुहाई बछरा मेलि ॥१९॥
दूधहि दुहि जब मटुकी भरी ॥
ले बादिसाह के आगे धरी ॥२०॥
बादिसाहु महल महि जाइ ॥
अउघट की घट लागी आइ ॥२१॥

नामदेवाने प्रार्थना केली आणि गायीचे दोहन केले. त्याने वासराला गायीजवळ आणले आणि तिचे दोहन केले.
जेव्हा दुधाने घडा पूर्ण भरला तेव्हा नामदेवाने तो घडा राजासमोर नेऊन ठेवला. राजा व्यथित मनाने राजवाड्यात परतला.
काजी मुलां बिनती फुरमाइ ॥
बखसी हिंदू मै तेरी गाइ ॥२२॥
नामा कहै सुनहु बादिसाह ॥
इहु किछु पतीआ मुझै दिखाइ ॥२३॥
इस पतीआ का इहै परवानु ॥
साचि सीलि चालहु सुलितान ॥२४॥

काजी आणि मुल्लांच्या माध्यमातून राजाने नामदेवाची प्रार्थना केली, ''हे हिंदू, मला माफ कर. मी तुझ्यासमोर केवळ एखाद्या गायीसमान आहे.'' नामदेव उत्तरले, ''हे राजा, ऐक. हा चमत्कार मी घडवला का? ह्या चमत्काराचा उद्देश होता की हे राजा, तू सत्याच्या व विनयाच्या मार्गाने चालावेस.''
नामदेउ सभ रहिआ समाइ ॥
मिलि हिंदू सभ नामे पहि जाहि ॥२५॥
जउ अब की बार न जीवै गाइ ॥
त नामदेव का पतीआ जाइ ॥२६॥
नामे की कीरति रही संसारि ॥
भगत जनां ले उधरिआ पारि ॥२७॥
सगल कलेस निंदक भइआ खेदु ॥
नामे नाराइन नाही भेदु ॥२८॥१॥१०॥

नामदेवाला ह्यामुळे सगळीकडे प्रसिद्धी मिळाली. सारे हिंदू गोळा झाले व नामदेवाला भेटायला गेले. जर गाय जिवंत झाली नसती तर लोकांचा नामदेवावरचा विश्वास उडाला असता. नामदेवाची कीर्ती चारही दिशांना पसरली. इतर विनयशील भक्तही वाचले व त्याच्याबरोबर पैलतिरी जाऊ शकले. जो निंदक होता त्याला अनेक त्रास, क्लेश भोगावे लागले. नामदेव व ईश्वरात भेद उरला नाही.
---------------------
''आपल्यात व नारायणात कोणताच भेद उरलेला नाही,'' हे सांगणारी नामदेवांची वाणी घडलेल्या चमत्कारामुळे इतर हिंदूंना कशा प्रकारे जीवनदान मिळाले याचे संकेताने मोजक्या शब्दांमध्ये वर्णन करते. गाय जर जिवंत झाली नसती तर सुलतानाने फक्त नामदेवालाच चिरडले नसते तर त्याच्याबरोबर इतर भक्तांवरही आपत्ती ओढविली असती. प्राण गमावण्यापासून ते सक्तीच्या धर्मांतरापर्यंत कोणत्याही प्रकारच्या संकटाला त्यांना सामोरे जावे लागले असते. परंतु ती गाय जिवंत झाल्यामुळे पुढच्या घटना टळल्या.
आता गाय कशी काय जिवंत झाली? देवाच्या मूर्तीने दूध कसे काय प्यायले? देऊळ कसे काय फिरले? असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्या प्रश्नांची उत्तरे तर्काच्या, बुद्धिवादाच्या भाषेत दिली जाऊ शकतील की नाही ही शंकाच आहे. कारण या सर्व घटना सामान्य बुद्धीपलीकडील आहेत. अनाकलनीय आहेत. नामदेवांच्या वर्णनानुसार तरी त्या त्या घटना त्यांच्या आयुष्यात प्रत्यक्ष घडल्या. कथा, कीर्तने, पोथ्या, अभंगांतून त्या घटना लोकांपर्यंत पोहोचल्या. आज त्या संतसाहित्याचा एक अविभाज्य हिस्सा आहेत. अशा प्रसंगांतून संत नामदेवांची हरिभक्ती अधिकच दृढ झाली.
-- अरुंधती
लेखासाठी वापरलेले संदर्भ :
नामदेव व तुघलकाविषयीची माहिती : विकिपीडिया
शबद रचना : शीख संप्रदायाची संकेतस्थळे
(विशेष टीप : वरील अभंगांमधील प्रसंगांचे वर्णन करणारे नामदेवांचे मराठीतील अभंग कोणास माहित असल्यास कृपया प्रतिसादात द्यावेत ही विनंती.)

3 comments:

  1. ब-याचदा ज्या घटना घडल्या अस आपण म्हणतो, ते एक प्रकारच त्या घटनेकडे पाहाण्याच perspective असत - आणि म्हणून ते खोट नसत आणि ते सगळ्यांना समजण्यासारखही नसत. संतांनी शब्दबद्ध केलेले चमत्कार प्रत्यक्षात घडले होते की नव्हते हा नेहमीच चर्चेचा मुद्दा राहील. पण मला वाटत की संतांना चमत्काराबद्दल सांगायचं नसून 'perspective' (दृष्टिकोन?)बद्दल सांगायच आहे. एकदा ते कळल की मग प्रश्न संपून त्यातला आनंद (चमत्कार?) पाहता येतो! काही गोष्टी संकेताने सांगायची पद्धत योग्यही आहे.

    ReplyDelete
  2. प्रतिसादाबद्दल धन्यवाद सविता!

    चमत्काराशिवाय नमस्कार नाही या उक्तीला साजेसे हे प्रसंग मला वाटले. भक्तीतील सामर्थ्य अधोरेखित करतानाच जातपात, धर्मभेद यांवर घडलेल्या चमत्कारांतून उत्तर दिले असेही म्हणायला हरकत नाही. भक्तीतून दृष्टीकोन व्यापक होतो. तुला हेच म्हणायचे आहे ना? की अजून काही? :-)

    ReplyDelete
  3. 'भक्ती' हा एक दृष्टिकोन आहे. तो काहींकडे असतो, काहींकडे नसतो, काहींकडे सोयीने असतो-नसतो. एकदा हे आपण मान्य केल की भक्त- अभक्तांमध्ये श्रेणीक्रम ठरवायची (भक्त ग्रेट किंवा अभक्त जास्त ग्रेट) आपली धडपड थांबते. खरा भक्त नेहमी प्रश्न विचारायला लोकाना उद्युक्त करेल असा माझा अंदाज आहे (अनुभव भलताच विचित्र आहे हा भाग वेगळा!) - 'मी सांगतो म्हणून ते सत्य माना' हे मला विचित्र वाटत - म्हणून माझी ही अपेक्षा असेल. भक्ती हादेखील अनुभवण्याचा मुद्दा आहे; दुर्दैवाने आपण (आपल्या समाजाने) तो फक्त श्रद्धेचा मुद्दा बनवून टाकला आहे. त्यामुळे संत चमत्कार सांगतात पण चमत्कार न मानणा-यांवरही तितकेच प्रेम करतात, निदान द्वेष करत नाहीत हे विसरून भक्तांच्या मांदियाळीत वारंवार समरप्रसंग उद्भवतात!

    थोडे विषयांतर: रामकृष्ण परमहंस यांच संवाद संकलन 'Gospel' तुम्ही वाचल असेलच. रामकृष्णांचे चमत्काराबाबतचे विचार फार प्रगल्भ आहेत - अर्थात भक्तांना संत महात्मे जसे समजतात त्याला स्थळ-काळ-विचारांच्या मर्यादा असतात! चमत्काराकडे पाहण्याची एक वेगळीच दृष्टी रामकृष्ण देतात असे मला वाटले आहे - प्रत्येकाचे मत वेगळे असू शकते हे मला मान्य आहेच!

    ReplyDelete