Showing posts with label लेख. Show all posts
Showing posts with label लेख. Show all posts

Sunday, November 11, 2012

माणूस की पशू?


उषःकालीन आरक्त आकाशापासून ते सायंकालीन आरक्तवर्णी आकाशाच्या प्रवासात नंतर टप्पा येतो तो रात्रकालीन कृष्णवर्णीय आकाशाचा! ज्या सहजतेने रात्रीच्या त्या कृष्णवर्णाला आपण स्वीकारतो तितक्या सहजतेने आपल्या आयुष्यात आपण कृष्णवर्णाला स्वीकारतो का? काळ्या सावल्या, काळा प्रहर, काळे पाणी, काळे विचार .... आपल्या संकल्पनांमध्येही काळ्या रंगाचं व भय, संकट, दुष्टता, निराशा, हीनता यांचं एक नातं बनलेलं दिसतं. आणि माणसाच्या कातडीचा कृष्ण वर्ण? तिथेही काळ्या वर्णाचा पूर्वग्रह आड येताना दिसतो. तीच गोष्ट खुजेपणाच्या बाबतीत. बुटकेपणाभोवती कुचेष्टा, व्यंगात्मक दृष्टीकोन, दोष यांचं तयार केलेलं वलय तर दिसतंच; शिवाय बुटक्या लोकांना एखाद्या पशूप्रमाणे वागविण्याचे प्रकारही कमी नाहीत.

आफ्रिकेतील पिग्मी लोकांना आपल्या कृष्णवर्णामुळे व बुटकेपणामुळे व त्या जोडीला त्यांच्या वन्य  जीवनशैलीमुळे आजवर अनेक अग्निदिव्यांना सामोरे जावे लागले आहे. त्यातले अतिशय मानहानीकारक असे सत्र म्हणून ज्याला संबोधिता येईल ते म्हणजे त्यांचे पाश्चात्य जगात एखाद्या जंगली श्वापदाप्रमाणे केले गेलेले प्रदर्शन! 'पशू व मानव यांमधील आतापर्यंत अज्ञात असलेला दुवा! पशूची मनुष्यावस्थेत उत्क्रांती होत असतानाची आदिम अवस्था!' अशा प्रकारे त्यांची जाहिरात करून त्यांचे ''वैज्ञानिक'' प्रदर्शनात मांडले जाणे व लोकांनी सर्कशीतल्या जनावरांप्रमाणे त्यांच्याशी केलेले वर्तन यांतून मानवी स्वभावाचे विचित्र पैलू समोर येत जातात.

हा काळ होता वसाहतवाद्यांनी नवनव्या भूमी पादाक्रांत करून तेथील स्थानिक लोकांना आपले गुलाम करून घेण्याचा! त्यांच्या जमीनी, नैसर्गिक स्रोत, धन लुटून त्यांच्यावर राज्य करण्याचा, आणि त्यांना आपल्याच भूमीत आश्रित बनविण्याचा. याच काळात घडते ओटा बेंगाची कथा.  


वनातील, निसर्गाच्या कृपेवर अवलंबून असणारे, पशुपक्ष्यांच्या मुक्त सान्निध्यातील स्वतंत्र आयुष्य गुलामीसोबत बरखास्त झाल्यावर गुलामीत जीवन कंठायचे, गुलामीतल्या अत्याचारांपोटी हालअपेष्टा सोसत प्राण गमवायचे की निर्जीव इमारतींच्या जाळ्यात वेढलेल्या व मनुष्यांच्या दयेवर जगणार्‍या संग्रहालयातील पशूंसोबतचे बंदिस्त आयुष्य कंठायचे? प्रगत म्हणवून घेणार्‍या माणसाचे जंगली रूप अनुभवायचे? दोन्ही प्रकारांमध्ये आत्मसन्मानाची होणारी होरपळ, शोषण, निर्बंध, चिरडले जाणे हे तनामनांवर कायमचे ओरखडे ओढणारे....!! आफ्रिकेतील कांगो खोर्‍यातल्या एका वन्य जमातीचा भाग असणार्‍या ओटा बेंगा या पिग्मी तरुणासमोर जेव्हा आपल्या देशात राहून गुलामगिरीत आयुष्य काढायचे की देशाबाहेर जाऊन वेगळे आयुष्य शोधायचे हे पर्याय उभे ठाकले तेव्हा त्याला आपल्यासमोर काय वाढून ठेवलं आहे याची कल्पनाही नसेल! शिकारीसाठी आपल्या टोळीपासून लांब गेलेला ओटा बेंगा जेव्हा शिकारीहून परतला तेव्हा त्याला आपल्या कुटुंबातील सर्व लोक तेव्हा कांगो खोर्‍यावर राज्य करणार्‍या बेल्जियमच्या किंग लिओपल्डच्या सैन्याकरवी मारले गेलेत असे कळले. पुढे त्याला गुलाम म्हणून पकडण्यात व विकण्यात आले.

ओटा बेंगा

इ.स. १९०४ मध्ये सॅम्युएल वर्नर नावाचा एक मिशनरी व व्यवसायाने व्यापारी असलेल्या माणसाची ओटा बेंगाशी गाठ पडली. वर्नरची नियुक्ती सेंट लुईस वर्ल्ड फेअर या अमेरिकेतील प्रदर्शनात पाश्चात्य जगापुढे पिग्मी लोकांचे नमुने मांडता यावेत म्हणून त्यांना गोळा करून आणण्यात झाली होती. मानवी उत्क्रांतीच्या इतिहासातील टप्प्यांमध्ये जगातून गोळा केलेल्या विविध प्रांतांतील एस्किमो, अमेरिकन इंडियन्स, फिलिपिनो यांसारख्या आदिम जमातींच्या लोकांसोबत पिग्मींचेही प्रदर्शन करता यावे हा त्यामागील उद्देश होता. वर्नरने कपड्यांचा एक तागा व एक पौंड मीठाच्या बदल्यात ओटा बेंगाला गुलामांच्या बाजारातून खरेदी केले. वर्नरसोबत प्रवास करत आपल्या गावी पोचेपर्यंत ओटा बेंगाला वर्नरच्या चांगुलपणाची खात्री पटली होती. कारण वर्नरने त्याला गुलामगिरीच्या खाईतून, मृत्यूच्या शक्यतेपासून वाचवले होते. ओटाच्या गावातल्या आणखी काही तरुणांना ''प्रदर्शनात'' सहभागी होण्यासाठी वर्नरने व ओटा बेंगाने राजी केल्यावर ते सगळे अमेरिकेतील मिसुरी राज्यातील सेंट लुईस वर्ल्ड फेअरसाठी रवाना झाले.

बांबुटी नामक आदिवासी जमातीतील ओटा बेंगाच्या या कहाणीत असं विशेष काय आहे? असं काय खास होतं त्या तरुणात ज्यामुळे अमेरिकेसारख्या प्रगत, आधुनिक देशाने त्याची दखल घ्यावी? तर ते होतं त्याचं ''आदिम'' असणं! डार्विनच्या सिद्धांतानुसार मनुष्य हे माकडाचं उत्क्रांत स्वरूप! मग माणूस आणि माकड यांच्यादरम्यानची जी अवस्था होती ती कशी असेल याचं उत्तरच जणू तेव्हाच्या काही मानववंशशास्त्राच्या अभ्यासकांना ओटा बेंगाच्या स्वरूपात मिळालं! तो काळ होता 'सोशल डार्विनिझम'चा! विसाव्या शतकात पदार्पण केलेल्या व स्वतःला  बुद्धीवादी, विज्ञाननिष्ठ व प्रगत समजणार्‍या समाजाने विज्ञानाचा डंका पिटत आपले वर्चस्व सिद्ध करण्याचा! आपला वंश किंवा आपली जमात जगातील इतर वंशांच्या तुलनेत कशी सर्वश्रेष्ठ आहे, सभ्य - सुसंस्कृत आहे हे दाखवून देण्याचा! त्यासाठी पाश्चात्य जगातील वेगवेगळ्या शहरांमध्ये खुली 'वैज्ञानिक' प्रदर्शने भरवली जात. त्यांमधून जगाच्या कानाकोपर्‍यांतून पकडून आणलेल्या, गुलामीत विकल्या गेलेल्या ''आदिम'' जमातींतील माणसांचे प्रदर्शन भरवत असत. या आदिवासी लोकांना त्यांच्या पारंपारिक वेशभूषा घालायला लावून त्यांचे युरोपियन किंवा आधुनिक वेशातील स्त्री-पुरुषांसोबत प्रदर्शन असे. यात पद्धतशीरपणे हे आदिम लोक कसे अप्रगत आहेत, रानटी आहेत, पशुतुल्य आहेत, अनीतिवान आहेत, हीन आहेत, अस्वच्छ आहेत हे प्रेक्षकांच्या मनावर ठसवले जात असे. आणि त्यातूनच ''आपण यांच्यापेक्षा कसे श्रेष्ठ आहोत, वरचढ आहोत'' हा दुरभिमान आपोआप लोकांच्या मनात जागृत होत असे!


आदिम लोकांच्या बसण्या-उठण्याच्या पद्धती, आचार हे किती अप्रगत आहेत, त्यातून त्यांना आपल्यापेक्षा कमी बुद्धी असल्याचे कसे सिद्ध होते हे ठळक केले जाई. ही प्रदर्शने मोठ्या प्रमाणांवर आयोजित होत. अगदी मोठमोठ्या संग्रहालयांतून, शहरांतून, जत्रांमधून! त्या प्रदर्शनाच्या मालकांना किंवा आयोजकांना लोकांनी भरलेल्या वर्गणीतून उत्पन्न तर मिळेच, शिवाय मानवजातीला आपल्या संशोधनामुळे व उपक्रमामुळे किती फायदा होत आहे याचे महान समाधान त्यांना प्राप्त होत असे! या कार्यक्रमांना लोकांची प्रचंड गर्दी उसळत असे. कित्येकदा गर्दीला आटोक्यात ठेवण्यासाठी खास सुरक्षा तैनात करायचा प्रसंग येई अशी गर्दी या कार्यक्रमांना उसळत असे. आणि त्यात प्रदर्शन केल्या जाणार्‍या आदिम लोकांना सर्कशीतील जनावरांप्रमाणे बघ्या लोकांच्या नजरा सहन करायला लागणे, त्यांनी हात लावून चाचपून बघणे, हेटाळणी, कोणी अंगावर थुंकणे, कुचेष्टा, चिखलफेक यासारख्या अवमानजनक गोष्टींना सामोरे जावे लागे. एखाद्या धनिकाने स्वतःचे पदरी जगातील वेगवेगळ्या प्राण्यांचा संग्रह करावा तसे काही मोजके धनिक या गुलामांचा संग्रह करून त्यांचे प्रदर्शन भरवत असत, त्यातून प्रसिद्धी मिळवत असत व विज्ञानाचे सिद्धांत सिद्ध करायला आपण कसे तत्पर आहोत याबद्दलचा मानमरातब मिळवण्यातही ते कमी नसत.

स्टुटगार्ट येथील ''पीपल्स शो'' ची जाहिरात 
डार्विनच्या सिद्धांतातील मोजक्या वाक्यांना उचलून व त्या वाक्यांचा विपरीत अर्थ लावून आपले सामाजिक व वांशिक वर्चस्व सिद्ध करण्याची अहमहमिका तेव्हाच्या पाश्चात्य जगात लागली असल्याचे दिसून येते. पुढे याच वांशिक वर्चस्वाच्या संकल्पनेतून नाझीवादाचा उदय झालेला दिसतो. (संदर्भ : ब्राँक्स पशुसंग्रहालयाचे संस्थापक व वर्णद्वेषी असणार्‍या मॅडिसन ग्रँट यांना त्यांनी लिहिलेले पुस्तक आपले ''बायबल'' असण्याचे सांगणार्‍या व त्यांच्या कार्याची प्रशंसा करणार्‍या, खाली 'अ‍ॅडॉल्फ हिटलर' अशी सही असलेल्या पत्राची सॅम्युएल वर्नर यांचा नातू फिलिप्स ब्रॅडफोर्ड याने सांगितलेली आठवण)

 




आदिम लोकांची मानवी ''वैज्ञानिक'' प्रदर्शने

ओटा बेंगाच्या अगोदरही आफ्रिकेतून आणलेल्या गुलाम तरुण, तरुणींना प्रदर्शनांत मांडले जाई. प्रदर्शनात त्यांना पाहायला येणारे पाश्चात्य लोक त्यांच्या अंगाला हात लावून त्यांची चाचपणी करत. सारा बार्टमन उर्फ हॉट्टेन्टॉट व्हीनस या आफ्रिकन गुलाम तरुणीला अशा तर्‍हेच्या अत्यंत अवमानजनक प्रदर्शनांमधून जावे लागल्याची नोंद आढळते. प्रदर्शनाला येणार्‍या 'सभ्य' बायका तिचा स्कर्ट उचलून तिच्या अवयवांची पडताळणी करत असल्याचीही नोंद आढळते.

पकडून आणलेल्या गुलामांची स्थिती

ज्या ज्या गुलामांना प्रदर्शनासाठी किंवा वैज्ञानिक सिद्धांतांच्या नावाखाली पकडून आणले गेले त्यांची स्थिती 'इकडे आड तिकडे विहीर' अशी होती हे इथे नमूद करणे महत्त्वाचे वाटते. मायदेशी गुलामीत, पकडलेल्या अवस्थेत, अवमानित, बंदिस्त, अतीव कष्टांचं आणि अनिश्चित आयुष्य जगावं की नियतीवर भविष्याचा हवाला ठेवून परक्या देशात, परक्या संस्कृतीत व परक्या माणसांमध्ये तुलनेने कमी कष्टाचं परंतु अवमानित, पशुतुल्य जीणं जगावं?

सेंट लुईस फेअर मध्ये ओटा बेंगा

सॅम्युएल वर्नर मलेरियामुळे आजारी पडल्यावर ओटा बेंगा व त्याच्याबरोबरच्या तरुणांना वर्नरशिवायच सेंट लुईस फेअरमध्ये सामील व्हावे लागले. नंतर जेव्हा वर्नर तिथे पोचला तेव्हा त्याच्या लक्षात आले की या पिग्मी तरुणांना प्रदर्शनातील आदिमतेचा नमुना म्हणून लोकांसमोर येण्याबरोबरच कैद्यासारखे आयुष्य जगण्याची वेळ आली होती. लोकांची गर्दी त्यांना थोडाही वेळ एकटे सोडत नसे. एका अमेरिकन वृत्तपत्राने ओटा बेंगाची प्रसिद्धी ''अमेरिकेतील एकमेव नरभक्षक आफ्रिकन'' अशी तर केलीच, शिवाय आपले मगरीसारखे दात दाखवण्याबद्दल तो लोकांकडून प्रत्येकी पाच सेंट्स घेत असे, ते पुरेपूर वसूल होत असल्याचे वृत्त दिले. तोवर ओटा बेंगा व त्याच्याबरोबरचे आफ्रिकन पिग्मी हे रानटी, जंगली पशुतुल्य लोक असल्याची जनसामान्यांची खात्री झाली होती.

सेंट लुईस फेअर मध्ये ओटा बेंगा व साथीदार

सेंट लुईस फेअरवरून ओटा बेंगा व त्याच्याबरोबरच्या तरुणांना न्यू ऑर्लिन्सला नेण्यात आले. तिथून ते आफ्रिकेत परतले. पण आफ्रिकेतील ओटा बेंगाचे कुटुंब नष्ट झाल्यामुळे व तेथील गुलामगिरीमुळे ओटाला आता तिथे थांबण्यात रस नव्हता. आधीच्या आयुष्यात तो रुळू शकत नव्हता. मग तो १९०६ मध्ये सॅम्युएल वर्नर सोबत पुन्हा अमेरिकेत परतला आणि इतिहासातील एका अतिशय शरम आणणार्‍या घटनापर्वाची सुरुवात झाली.

वर्नरने ओटा बेंगाची सोय अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री येथे केली, कारण अन्य कोणी या पिग्मी तरुणाला ठेवून घेण्यात उत्सुक नव्हते. सॅम्युएल वर्नर स्वतः आर्थिक अडचणीत आल्यामुळे तो तिथून दुसर्‍या ठिकाणी स्वतःच्या पोटापाण्याची सोय बघायला निघून गेला. म्युझियममध्ये ओटाला करण्यासारखे काहीच नव्हते. तिथे येणार्‍या प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यापलीकडे त्याला काहीच उद्योग नव्हता. लोक त्याला त्याचे दात दाखवायला सांगत. तोही अत्यल्प पैशांच्या बदल्यात त्यांना आपले दात दाखवत असे. पण लवकरच तो त्या जिण्याला कंटाळला व विचित्र तर्‍हेने वागू लागला. त्याने तिथे त्याला बघायला आलेल्या एका महिलेच्या रोखाने खुर्ची फेकल्याचे सांगण्यात येते. तिथून त्याची हकालपट्टी झाली. मग तिथून ओटा बेंगाची रवानगी न्यू यॉर्क येथील ब्राँक्स पशूसंग्रहालयात करण्यात आली.

ब्राँक्स पशूसंग्रहालयात ओटा बेंगा 

ब्राँक्स पशुसंग्रहालयाने केलेल्या जाहिरातीतील ओटा बेंगाचे छायाचित्र


''द आफ्रिकन पिग्मी 'ओटा बेंगा',
वय २३ वर्षे, उंची ४ फूट ११ इंच
वजन १०३ पौंड्स,
दक्षिण मध्य आफ्रिकेच्या कांगो राज्यातून कसाई नदीच्या भागातून डॉ. सॅम्युएल पी. वर्नर यांचेद्वारा आणला गेला आहे.''

ब्राँक्स पशुसंग्रहालयातील प्रदर्शनात ओटा बेंगाच्या पिंजर्‍यापुढे लावलेली ही पाटी. आफ्रिकेच्या जंगलातून आलेल्या या कृष्णवर्णाच्या, बुटक्या, मगरीसारखे दात असलेल्या तरुणाची जाहिरात माणूस व माकडाच्या उत्क्रांतीमधील दुवा म्हणून अगोदरच झाली होती. पशूसंग्रहालयात ओटाच्या कडेवर कधी मुद्दाम एक ओरांगउटान माकड दिलेले असे. माकडासोबतचे खेळतानाचे, कुस्ती करतानाचे त्याचे फोटो तत्कालीन वृत्तपत्रांनी मोठ्या चढाओढीने प्रसिद्ध केले होते. ब्राँक्स पशूसंग्रहालयात ओटा बेंगाला ज्या पिंजर्‍यात ठेवले होते तिथे जंगलाचा 'इफेक्ट' येण्यासाठी माकडासोबत एका पोपटाला देखील ठेवले होते. त्याच जोडीला आजूबाजूला हाडे विखरून ठेवण्यात आली होती. अनवाणी पायांनी वावरणार्‍या ओटाला जेव्हा पायात घालण्यासाठी बूट देण्यात आले तेव्हा त्यांच्याकडे एकटक बघणार्‍या ओटाला पाहून प्रेक्षकांमध्ये हास्याचे फवारे उसळल्याचे सांगण्यात येते. त्याच्याकडे बोट दाखवून मोठमोठ्याने हसत ते ओटाच्या 'जंगली' वागण्याची चर्चा करत. त्यात ओटा कधी चित्रविचित्र भावमुद्रा घेऊन त्यांचे मनोरंजन करत असे. आफ्रिकेच्या जंगलात वाढलेला ओटा बेंगा धनुष्यबाणाने लक्ष्याचा वेध घेण्यात पटाईत होता. जंगली वेलींच्या सहाय्याने विणकाम करण्यातही तो प्रवीण होता. त्याच्या जमातीतील इतर लोकांप्रमाणे त्याने आपल्या दातांना मगरीच्या दातांप्रमाणे कोरून घेतले होते. या सर्वाची प्रेक्षकांना खूप नवलाई वाटत होती. मनोरंजनाबरोबरच आफ्रिकेतून आणलेल्या या 'पशुवत्' माणसाच्या जंगलीपणाविषयी व अप्रगतपणाविषयी त्यांच्या मनात खात्री होत होती.

परंतु लवकरच अमेरिकेतील कृष्णवर्णीय चर्च मिशनर्‍यांच्या निषेधामुळे ओटा बेंगाच्या या प्रदर्शनाला टाळे लागले. मिशनर्‍यांचा निषेध हा एका आफ्रिकन कृष्णवर्णीय माणसाला माकड आणि मनुष्य यांच्यामधील दुवा म्हणून त्याचे अवमानजनक प्रदर्शन करण्याबद्दल तर होताच, शिवाय त्यामागे आणखी एक कारण होते. ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांनुसार डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत हा ख्रिश्चन धर्माच्या विरुद्ध होता. त्यामुळे उत्क्रांतीवादाचे असे जाहीर प्रदर्शन ख्रिश्चन धर्माच्या विरोधात मानले गेले.

या आणि काही नागरिकांकडून झालेल्या निषेधाची दखल घेऊन ओटा बेंगाचे जाहीर प्रदर्शन जरी थांबविले गेले तरी तो राहायला अद्याप ब्राँक्स पशूसंग्रहालयातच होता. तोवर त्याचे नाव घरोघरी झाले होते. लोक त्याला पाहायला पशूसंग्रहालयात मोठ्या संख्येने गर्दी करत होते. एका दिवशी ४०,००० लोकांनी ओटा बेंगाला बघण्यासाठी पशुसंग्रहालयाला भेट दिल्याची नोंद टाईम्स वृत्तपत्राने केली. तसेच हे लोक बेंगाची खुलेआम टवाळी करत होते, त्याला ढकलत होते, पाडत होते, त्याची कुचेष्टा करून त्याला अवमानजनक शब्दांनी पुकारत होते ह्या घटनेची नोंदही टाईम्सने केली आहे.

नंतर ओटा बेंगाची रवानगी एका अनाथालयात झाली. कालांतराने तिथूनही त्याला हलवले व लिंचबर्ग येथे स्थलांतरित केले. या नव्या ठिकाणी ओटाने रुळायचा जिकीरीचा प्रयत्न केला. तो तोडकी-मोडकी इंग्रजी भाषा शिकला. त्याने आपल्या मगरीच्या दातांप्रमाणे कोरलेल्या दातांना कॅप्स घालून घेतल्या, आपले नाव 'ओटो बिंगो' असे बदलून घेतले, तो तंबाखूच्या कारखान्यात काम करू लागला. जवळच्या जंगलात तो आपले धनुष्य-बाण घेऊन शिकारीसाठी जात असे, जंगलातून औषधी वनस्पती शोधून आणत असे. पण त्याचे मन आता या देशात रमत नव्हते. इथे त्याने ज्या प्रकारची माणसे पाहिली, जशा प्रकारचे वर्तन अनुभवले त्यानंतर त्याला आपल्या मायदेशी परत जायचे होते. त्याला आपल्या लोकांची आठवण येत होती. पण त्याच वेळी १९१४ मध्ये पहिले जागतिक महायुद्ध उभे ठाकले. आता ओटाकडे लक्ष द्यायला कोणाला फुरसत नव्हती. नव्याची नवलाई बर्‍यापैकी ओसरली होती. ब्राँक्स पशूसंग्रहालयाच्या झालेल्या बदनामीमुळे अनेकांचे हात काही प्रमाणात पोळले होतेच! त्यामुळे ओटा बेंगाकडे पाहायला किंवा त्याच्या भवितव्याची चिंता करायला कोणीच उरले नव्हते. ओटाला स्वतःला मायदेशी जायचे असले तरी त्याच्यापाशी परत जाण्यासाठी पुरेसे पैसेही नव्हते व आवश्यक मदतीचे स्रोतही नव्हते. त्याने 'सभ्य' माणसाच्या जीवनशैलीला हळूहळू का होईना, जरी स्वीकारले, तरी तो सभ्य माणूस त्याला स्वीकारायला तयार नव्हता. त्यांच्या लेखी ओटा बेंगा हा जंगलातून आलेला आदिम प्राणीच होता. हळूहळू ओटा बेंगा नैराश्याने पुरता ग्रस्त झाला. शेवटी त्या नैराश्याच्या भरात त्याने आपल्या दातांच्या कॅप्स उखडून फेकून दिल्या आणि चोरलेल्या पिस्तुलाने स्वतःच्या छातीत गोळी झाडून प्राण त्यागले.    

पुढे नाझी भस्मासुराच्या आगीत वांशिक वर्चस्वाच्या भावनेतून मोठ्या प्रमाणावर नरसंहार झाल्यावर वांशिक वर्चस्व सिद्ध करण्याच्या हेतूने भरवली जाणारी मनुष्यांची ही ''वैज्ञानिक'' प्रदर्शने मागे पडली.
 

सध्याच्या काळातील ''ह्यूमन झू''

थायलंडमध्ये उत्तरेला, ब्रह्मदेशाजवळच्या सीमाप्रांतात एक ब्रह्मदेशातील निर्वासितांची जमात थायलंड सरकारच्या आश्रयाने निवास करून आहे. कारेन नामक पर्वतप्रांतात राहणार्‍या आदिवासी जमातीतील या लोकांमध्ये स्त्रियांची लांब मान हे त्यांच्या सौंदर्याचे प्रतीक मानण्यात येते. त्यासाठी अगदी लहान वयातच मुलींच्या मानेभोवती पितळी रिंगांची वेटोळी वळी घातलेली दिसून येतात. मुलींचे वय वाढत जाते तसतशी वळ्यांची वेटोळीही वाढविण्यात येतात. मोठ्या वयाच्या स्त्रियांमध्ये या मानेभोवतीच्या पितळी रिंगचे वजन १० किलोंचे असते. वस्तुतः त्यात मुलींची मान लांब न होता त्यांच्या गळपट्टीच्या हाडामध्ये व्यंग निर्माण होते. या लोकांना आश्रय देऊन त्या बदल्यात थायलंड सरकारने त्यांचे ह्यूमन झू बनविले असल्याचा आरोप थायलंड सरकारवर केला जातो. कारण या लोकांचा तेथील पर्यटन व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणावर फायदा होत आहे. त्यांना पाहण्यासाठी व त्यांच्या वस्तीला भेट देण्यासाठी, गळ्यात रिंग्ज घातलेल्या मुलींना निरखण्यासाठी पर्यटक गर्दी करतात.






एखाद्या प्रदर्शनात मांडावे तसे त्या मुली-स्त्रियांचे प्रदर्शन या वस्तीतून मांडलेले असते. त्यासाठी प्रत्येक पर्यटकाला दहा डॉलर्सचे शुल्क भरावे लागते. त्यांच्या वस्तीत गेल्यावर या आदिवासी लोकांनी बनविलेल्या कलावस्तूंना खरेदी करण्यासाठीही पर्यटकांचा पाठपुरावा केला जातो. या निर्वासितांना तात्पुरत्या व्हिसावर येथे राहायची परवानगी आहे. मात्र त्यांचा व्हिसा त्यांच्या ''शो'' च्या मालकाने काढून घेतला आहे, त्यामुळे त्याच्या परवानगीशिवाय ते कोठेही जाऊ शकत नाहीत. या लोकांचे पुनर्स्थापन करण्याची तयारी न्यू झीलंड सारख्या देशांनी दाखवली. परंतु थायलंड सरकार त्यांना सोडायला तयार नाही. तसेच त्यांना यापेक्षा जास्त चांगले जीवन कुठे मिळू शकणार आहे, असाही एक दावा केला जातो. ब्रह्मदेशातील सशस्त्र बंडखोर गटांनी या लोकांना त्यांच्या मूळ प्रदेशात नेऊन तिथे त्यांचे पर्यटकांसाठी प्रदर्शन मांडण्यात रस दाखवल्याचे सांगितले जाते. थायलंड सरकारने या लोकांचे कोणतेही पुनर्वसन अद्याप केलेले नाही. या लोकांना अतिशय तुटपुंज्या उत्पन्नावर जगावे लागते. त्यांच्या आयुष्यात कोणतेही स्थैर्य नाही. त्यांच्या जमातीतील मुली गळ्यात रिंग घालायची ही प्रथा इच्छा असली तरी मोडू शकत नाहीत, कारण त्यांनी ती प्रथा पाळण्यावर तेथील पर्यटन व्यवसाय अवलंबून आहे. शेवटी तेथील असुरक्षित आयुष्याला कंटाळून, निषेध म्हणून या जमातीतील तरुणी व मुलींनी २००६ सालापासून आपल्या गळ्यातील रिंग्ज काढून ठेवायला सुरुवात केली. जानेवारी २००८ मध्ये जागतिक राष्ट्रसंघाच्या हाय कमिशनरांनीही या लोकांच्या भवितव्याची चिंता व्यक्त केली.

पॅरिसमध्ये आता इ.स. १८०० ते १९५८ पर्यंतच्या काळात भरवल्या गेलेल्या वेगवेगळ्या ह्यूमन झूं विषयीची माहिती एकत्रित स्वरूपात पाहावयास मिळते. त्या काळातील ह्यूमन झूंसंबंधित वेगवेगळी चित्रे, शिल्पे, जाहिराती, चित्रपट, पोशाख, पोस्टर्स यांचे हे एकत्रित प्रदर्शन सुन्न करणारे, गोठवून टाकणारे असल्याचा अनुभव अनेक मंडळी सांगतात. शोषणाच्या या अगणित कथांमधून त्या काळात अशा प्रकारे प्रदर्शन केल्या गेलेल्या ३५,००० लोकांच्या आयुष्याचा आलेख पाहावयास मिळतो. विज्ञानाच्या मुखवट्याआड दडलेल्या क्रौर्याचे व विकृत कुतूहलाचे नमुने पाहावयास मिळतात. माणसांनी माणसांचे मांडलेले हे प्रदर्शन ''माणूस'' या प्राण्याविषयी आणखी काय काय सांगते हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे.

संदर्भ :

* वॉशिंग्टन पोस्ट मधील अ‍ॅन हॉर्नडे यांचा ३ जानेवारी २००९ रोजीचा लेख : द क्रिटिकल कनेक्शन टू द क्युरियस केस ऑफ ओटा बेंगा

* द गार्डियन २९ नोव्हेंबर २०११ मधील अँजेलिक ख्रिसाफिस यांचा 'पॅरिस शो अनव्हेल्स लाईफ इन ह्यूमन झू' लेख.

* ओटा बेंगा वरील विकीपीडियातील लेख

* सारा बार्टमन बद्दल विकीपीडियातील लेख

* ह्यूमन झू बद्दल विकीपीडियातील लेख
 
* द ह्यूमन झू : सायन्सेस डर्टी लिटल सिक्रेट, २००९ माहितीपट.

* प्रो. सूझन विल्यम्स यांचे ग्रँड रॅपिड्स कम्यूनिटी कॉलेज, मिशिगन येथील रेस अँड एथ्निसिटी कॉन्फरन्स २०११  मधील लेक्चर.

(छायाचित्रे विकीपीडिया व आंतरजालीय स्रोतांमधून साभार)

Wednesday, September 19, 2012

ढोलताशा व ओलोडम!!


गणेश चतुर्थीच्या सुमुहूर्तावर एका नव्या क्षितिजाला स्पर्श करू जाता खूप आनंद होत आहे! संगीताच्या क्षेत्रातील हे नवे पाऊल माझ्यासाठी खूप मोलाचे आहे. जागतिक संगीत किंवा विश्वसंगीत असे ज्याचे वर्णन करता येईल अशा ''वर्ल्ड म्युझिक'' बद्दल माझे अनुभव, निरीक्षणे, माहिती, महती व या सर्वातून मिळणारा आनंद लेखणीतून व्यक्त करता यावा अशी त्या श्री गणेशाचे चरणी प्रार्थना!

इ.स. १९४६ मधील गणपतीची मिरवणूक


''वर्ल्ड म्युझिक'' म्हणजे नक्की काय? मुळात संगीतात अशी वर्गवारी कधीपासून निर्माण झाली? त्या अगोदर हे संगीत अस्तित्वात होते का?

तर वेगवेगळ्या संस्कृती, परंपरा, समाजातील लोकांच्या त्या त्या भागातील खास संगीताचे अस्तित्व हे शेकडो, हजारो वर्षांपासून होते व आहे. परंतु १९९० सालापर्यंत हे संगीत वेगवेगळ्या नावांनी व प्रकाराखाली लोकांना ऐकण्यासाठी बाजारात उपलब्ध होते. मग कधी ते 'आयलंड म्युझिक' च्या नावाने असायचे तर कधी 'लोक संगीत' नावाने! परंतु इ. स. १९६० मध्ये रॉबर्ट ब्राऊन यांनी कनेटिकट विद्यापीठात आफ्रिका व आशिया खंडातील अनेक गायक, वादक, संगीतज्ञ बोलावून त्यांच्या सादरीकरणाद्वारे वर्ल्ड म्युझिक कन्सर्ट मालिका सुरू केली व या विषयातील अंडरग्रॅज्युएट ते डॉक्टरेट अशा अभ्यासक्रमास प्रारंभ केला. पुढे १९९० च्या दशकात मार्केटिंगसाठी सोपे जावे या दृष्टिकोनातून प्रसारमाध्यमे व संगीत उद्योगांनी ''वर्ल्ड म्युझिक'' शब्दाला उचलून धरले व पाश्चात्त्य नसलेल्या संगीतासाठी ही श्रेणी वापरली जाऊ लागली. ग्रॅमी अ‍ॅवॉर्ड्स व बिलबोर्ड व यांच्यासारख्या जगभरातील अनेक माध्यमांनी ही श्रेणी लोकप्रिय करण्यात सिंहाचा वाटा उचलला. याद्वारे आतापर्यंत कधी न ऐकलेले, अनुभवलेले संगीत लोकांपुढे येऊ लागले. गायन वादनाच्या विविध पद्धती, वाद्ये, ताल, नाद यांची ओळख होऊ लागली. पाश्चात्त्य संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध कलावंतांसोबत जगाच्या कानाकोपर्‍यातील गायक, वादकांचा मेळ घालून त्यातून निर्माण होणारे मिश्र-संगीतही लोकांना आवडू लागले. यात प्रसार-माध्यमांचा वाटा तर मोठा होताच! शिवाय जसे रोज रोज पोळी-भाजी खाऊन कंटाळलेल्या जिभेला काही वेगळ्या चवीचे, चमचमीत खायला मिळाले की मन खुलते त्याप्रमाणे त्याच त्याच पठडीतील संगीत ऐकल्यावर वेगळ्या प्रकारच्या संगीताचा आनंद श्रवणेंद्रियांना सुखावू लागला. त्यातही पाश्चात्त्य संगीतातील काही ओळखीचे सूर, पद्धती व जगातील निरनिराळ्या संस्कृतींमधील अनोळखी सूर यांचा मिलाफ संगीत रसिकांच्या पसंतीस उतरला.

प्रत्येक संस्कृतीचे आपले काही विचार असतात, प्रतीके, श्रद्धा, परंपरा असतात. आणि त्या सर्वांचे प्रतिबिंब त्यांच्या संगीतातही उमटलेले दिसते. तसेच त्यांच्या आजूबाजूचा निसर्ग, निसर्गातील प्राणी-पक्षी-झाडे-वेली-नद्या-शिखरे यांमधून उमटणारे संगीत त्यांच्या गाण्यातून किंवा वादनातून व्यक्त करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यांची वाद्येही उपलब्ध असलेल्या सामग्रीतून, निसर्गातून व मानवी कल्पकतेतून निर्माण होतात. अगदी उदाहरणच द्यायचे झाले तर आफ्रिकेतील कॅमरूनच्या खोर्‍यातील बाका जमातीचे आदिवासी पपईच्या पोकळ देठांत फुंकर घालून व त्या आवाजाची आपल्या गाण्याशी सांगड घालून खास हिंदेव्हू प्रकारचे ध्वनी संगीत निर्माण करतात, जे हर्बी हॅनकॉक व मॅडोना यांसारख्या प्रसिद्ध गायकांनाही भुरळ घालते! अशी अनेक उदाहरणे आहेत. या अतिविशाल क्षेत्राची व माझी नुकतीच ओळख होत आहे. त्याबद्दल टीकाटिप्पणी करायची माझी नक्कीच पात्रता नाही. परंतु आवडलेल्या संगीताची इतरांशी ओळख करून द्यायचा माझा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. मला मिळालेला आनंद इतरांनाही मिळावा अशी इच्छा आहे. आणि या सार्‍या संगीतातून मिळणारा जो मानवतेचा, समानतेचा, शांतीचा, सौहार्दाचा व बंधुभावाचा जो विश्वव्यापक संदेश आहे तो लोकांपर्यंत पोहोचावा अशी मनोकामना! हे प्रयत्न गोड मानून घ्यावेत ही विनंती!

आजचे संगीत : ढोलताशा व ओलोडम!! 

गणेशाच्या स्वागतासाठी व निरोपासाठी आपल्याकडे ढोल-ताशाच्या पथकांची परंपरा आहे. अतिशय उत्साहवर्धक, मुग्ध करणार्‍या या नादगर्जनेत मोठ्या आनंदाने बाप्पांचे आपण स्वागत करतो. आणि तितक्याच कृतज्ञ भावनेने त्यांना निरोपही देतो. कानात घुमत राहतात ते ढोल, टिपर्‍या, झांजांचे गगनभेदी स्वर. त्या स्वरांचीही एक झिंग असते, एक मस्ती असते, एक नशा असते. त्या तालांवर पावले कधी थिरकू लागतात ते कळतही नाही. मनात फक्त तो आणि तोच नाद व्यापून उरतो. सर्व विचार, चिंता, विवंचना बाजूला पडतात. शरीराचा विसर पडतो. उरते ते फक्त नादब्रह्म!

या ढोलताशाच्या उन्मादाची एक झलक इथे पाहा व अनुभवा : http://www.youtube.com/watch?v=-N0RHeY3LY4 (ज्ञान प्रबोधिनीचे ढोल पथक)

किंवा



ब्राझील मधील साल्वाडोर येथे ओलोडम नावाचा एक सांस्कृतिक गट आहे. त्यांचे ड्रम्स वाजविणे, त्या तालांवरील नृत्य पाहिले की आपल्या गणेशोत्सवातील ढोल-पथकेच आठवतात! या ड्रमर्सच्या ड्रम्समधून उमटणारे नाद, त्यांचा आवेश, वाजवायची पद्धत यांत व आपल्या ढोलपथकांत कमालीचे साम्य दिसून येते! ह्या सांस्कृतिक गटाचा मुख्य उद्देश वंशभेदाचे निर्मूलन करण्यात हातभार आणि ब्राझीलच्या तरुणाईच्या सृजनशक्तीला, कलात्मकतेला वाव देणे हे आहे. ब्राझीलमध्ये राहणार्‍या मूळच्या आफ्रिकन वंशाच्या लोकांनी तेथील वंशभेदाचे दाहक चटके सोसले आहेत. अर्थातच त्या सर्वाचा त्यांच्या मानसिकतेवर, स्व-प्रतिमेवर परिणाम झाला आहे. या संगीताद्वारे त्यांना आपली स्व-प्रतिमा सशक्त करण्याची संधी मिळावी म्हणून नेगिलो सांबा या ड्रमरने १९७९ मध्ये या ग्रुपची स्थापना केली. या ग्रुपद्वारे ब्राझीलच्या लोकांना आपले नागरिकी हक्क व अधिकार मिळवण्यासाठी प्रेरणा देण्यात येते, त्यांच्या हक्कांच्या  लढ्यात ओलोडम ग्रुप त्यांची साथ देतो.



या ग्रुपच्या संगीत वादन शैलीला ''सांबा रेग्गे'' असे संबोधिले जाते. पारंपारिक ब्राझिलियन सांबा सोबत इतर संस्कृतींमधील साल्सा, रेग्गे, मेरांग प्रकारच्या तालांचा मेळ त्यांच्या वादनात दिसून येतो. या ग्रुपने पॉप गायक पॉल सायमन व मायकेल जॅक्सन यांचेबरोबर काम केले आहे. पॉल सायमन बरोबर http://www.paulsimon.com/us/music/rhythm-saintsर्‍हिदम ऑफ द सेन्ट्स या अल्बममध्ये तर मायकेल जॅक्सन बरोबर 'दे डोन्ट केअर अबाऊट अस' या गाण्यात त्यांच्या ग्रुपचे वादन आहे.


कार्निवलच्या काळात ओलोडम ग्रूप परेडमध्ये किंवा शोभायात्रेत भाग घेतो. त्यात त्यांचे साधारण दोनशेहून अधिक ड्रमर्स, गायक असतात आणि खास वेशभूषा केलेले हजारो लोक त्यात सहभाग घेतात. पण फक्त कार्निवलपुरतेच यांचे कार्य मर्यादित नाही. वर्षभर अनेक सेमिनार्स, भाषणे, परिसंवादांतून ओलोडमची हजेरी असते. अनेक सामाजिक व राजकीय प्रश्नांवर आधारित परिसंवादांत ते भाग घेतात. दर महिन्याला त्यांचे बंटू नागो नावाचे वार्तापत्रक प्रकाशित होते. त्यांची स्वतःची एक फॅक्टरीही आहे. तिथे ते ड्रम्स, खास वेशभूषेचे कपडे आणि इतर काही वस्तू बनवितात व लोकांना विकतात. ओलोडम तर्फे साल्वाडोरच्या मागास व उपेक्षित मुलांसाठी दाट वस्तीच्या अंतर्भागात शाळाही चालविली जाते. तिथे या मुलांना शालेय शिक्षणासोबत कलाप्रशिक्षण दिले जाते व त्यांची स्वप्रतिमा सशक्त होण्याकडे विशेष लक्ष दिले जाते. तरुणांच्या आर्थिक प्रगतीसाठीही ओलोडमतर्फे खास प्रयत्न केले जातात.  

या ग्रुपचा संस्थापक नेगिलो सांबा व मुख्य गायक - गीतलेखक जर्मानो मेनेघेल दोघेही आता जगात नाहीत. पण त्यांनी सुरू केलेली ही सांगीतिक चळवळ पुढेही चालूच राहील यात शंकाच नाही!

* माझी सहाध्यायी व ब्राझीलची नागरिक असलेल्या मिशेल ब्रूकचे तिने ओलोडमची ओळख करून दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार!

Wednesday, March 07, 2012

शुभप्रसंगीची कलंक-सूचक गाणी : गारी गीते


शिव्यांची गाणी??? छ्या!! कल्पनाच करवत नाही ना? पण भारताच्या लोकपरंपरेत अशी एकमेकांना प्रेमळ शिव्या दिलेली सवंग गाणी मनोरंजनाच्या हेतूने गाण्याची जुनी प्रथा आहे.
अगदी परवा परवा पर्यंत मला या प्रकाराबद्दल काहीही माहिती नव्हती. त्याचे असे झाले, भारतीय लोकगीतांच्या विविध प्रकारांचे वाचन करत असताना एक दिवस नजर अचानक एका गीत प्रकारावर येऊन थबकली. तो प्रकार होता 'गारी गीत', किंवा 'गारी'. हिंदी भाषेत गारी म्हणजे 'गाली' उर्फ शिवी एवढे माहीत होते. मग आता ही गाण्यातील गारी कोठून निपजली, म्हणून तिच्याविषयी आणखी वाचत गेले -- आणि लोकपरंपरेतील  एका मजेशीर साहित्यप्रकाराची त्या निमित्ताने ओळख होऊ लागली.

रूढार्थाने गारीचा अर्थ शिवी असा असला तरी गारी गीतांमध्ये दिल्या जाणार्‍या ''शिव्या'' या हास्य उत्पन्न करण्याच्या हेतूने, मनोरंजनाच्या हेतूने दिल्या गेलेल्या शिव्या आहेत. त्यांच्यात व्यंगात्मक विनोदाचे यथार्थ दर्शन तर होतेच, शिवाय ज्या प्रकारे या शिव्या गीतातून सामूहिक रितीने ''गाऊन'' दिल्या जातात तोही प्रकार रोचक आहे. या गारी गीतांना विवाह व इतर शुभ कार्यांच्या वेळी गायले जाते. लोकमनोरंजनासाठी त्यात कलंक-सूचक गोष्टींचा आशय असतो. खास करून स्त्रिया ही गीते गातात.  मर्मभेदी, अपमानजनक अशी गारीगीते माळवा, बुंदेलखंड, बिहार, राजस्थान, वृंदावन, छत्तिसगढ इत्यादी प्रांतांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. विवाहासारख्या  कार्यात व्याह्यांचे स्वागत करताना, त्यांचे आदरातिथ्य करताना आणि भोजन प्रसंगी एकमेकांची उणीदुणी थट्टेच्या आवरणाखाली काढत काढत हास्यफवार्‍यांच्या साथीने आपल्या नरम विनोद बुद्धीची चुणूक दाखवणारी ही गारी गीते म्हणजे भारताच्या लोकपरंपरेतील उपहासगर्भ रचनाच म्हणता येतील!
संत तुलसीदासांनी या गारी गीताचे यथार्थ वर्णन केले आहे : जेंवत देहिं मधुर धुनि गारी । लै लै नाम पुरुष अरु मारी ।
प्रेमात दिलेली गारी ही कविवर्य रसखान यांच्या म्हणण्यानुसार - 'ऐसी गारी पै सौ आदर बलिहारी है।' अशी असते. लग्नाची वरात लग्नमंडपाच्या द्वारी येते तेव्हा आणि लग्नाच्या भोजनसमयी स्त्रिया गारी गीतांचे गायन करतात आणि सोबत हेही सांगतात, ''बरातियों बुरौ मत मानियौ हमारौ हंसबे को सुभाव।'' व्याह्यांना त्यांची विहीण जेव्हा रसपूर्ण शब्दांत गारी गीते सुनावते तेव्हा ती ऐकणार्‍यांचा श्रमपरिहार तर होतोच, परंतु त्या चटकदार, रसाळ शब्दांनी त्यांच्या मनातही हास्य-आनंदाचा भाव निर्माण होतो असे म्हणतात!
लोककवी वृन्द या 'समधिन' किंवा विहिणीने दिलेल्या गारीचे वर्णन करतात :

निरस बात सोई सरस जहाँ होय हिय हेत।
गारी भी प्यारी लगै ज्यों-ज्यों समधिन देत॥




काही वर्षांपूर्वी दिल्ली - ६ नावाने आलेल्या हिंदी चित्रपटातील एका गीतात 'सास गारी देवे, ननंद मुंह लेवे, देवर बाबू मोर, संइया गारी देवे, परोसी गम लेवे, करार गोंदा फूल' या शब्दांत असलेली गारी बर्‍याचजणांना आठवत असेल. एकमेकांचे रहस्यभेद करणे, कुचेष्टा करणे हे वर-वधू पक्षाकडील लोकांना या प्रकारच्या गीतांमधून शक्य होत असावे. आपल्या वैशिष्ट्यपूर्णतेबरोबरच उपस्थितांचे रंजन करण्याचा वारसा चालवणारी गारी गीते लग्नसमारंभासारख्या शुभकार्यामधील ताण हलका करण्याचे काम करतात. ही गीते बहुतांशी सामूहिक रित्या गायली जातात. नथीतून तीर मारणे, प्रतिपक्षाला या शाब्दिक खेळांतून टोले लगावायचा उद्देश त्यातून साधला जात असावा. त्यांचा आशय कुचेष्टेचा असला तरी ती 'हलकेच' घेण्याचा पारंपारिक संकेत असल्यामुळे त्यांच्याकडे हास्यविनोदाच्या चश्म्यातूनच पाहिले जात असावे.

शिवाय या गीतांमागील मानसिकता अभ्यासू जाता लोकपरंपरेतील एक गमतीशीर समज समोर येतो. तो म्हणजे विवाहासारख्या कोणत्याही शुभ, मंगल कार्यात जर अशा पद्धतीने 'गारी' दिली गेली तर ते कार्य व उत्सवमूर्ती दृष्टावत नाहीत. कारण लोकांच्या मनातील नकारात्मक विचार, भावनांचा निचरा 'गारी गीता'तून होत असावा.

गारी गीतांची भाषाही खटकेबाज, लयदार, मस्तमधुर आहे. परंपरेला अनुसरून घुंगट - पडद्याच्या आड वावरणार्‍या स्त्रियांनी रचलेल्या - गायलेल्या गीतांमधील आशय कित्येकदा रांगडा, धीट, सूचक आढळतो. म्हटले तर हा 'विरोधाभास'च म्हणता येईल!

आता ह्या गारी गीतात व्याह्यांची ''अक्कलहुशारी'' कशी निकालात काढली आहे, पाहा तरी!

मेरे समधी बडे होसियार नाम इनका सुन लो जी

मच्छर मार आये समधी जी नाम पडा तीसमार
नाम इनका सुन लो जी| मेरे.

लुंगी के बदले में साया पहन लिया
बन गये नवेली नार समधी गंवार देखो जी

छुरी कैंची रखते है पास एक नंबर के है पाकेटमार
नाम इनका सुन लो जी| मेरे.

म्हणजे, बघा माझे व्याही किती हुशार आहेत! त्यांचे नाव तर तुम्ही ऐकलेच असेल. ते डास मारून आले आहेत. त्यामुळे त्यांचे नाव तीसमार खाँ पडले आहे. लुंगीऐवजी ते परकर नेसून आलेत! अगदी अवखळ तरुणीच्या थाटात ते सजले आहेत. कसे अडाणी आहेत हे व्याही! जरा बघा तरी त्यांच्याकडे - जवळ सुरी, कात्री ठेवतात ते! एक नंबरचे पाकिटमार आहेत हे व्याही. त्यांचं नाव तर तुम्ही ऐकलंच असेल!!!

गारी गीताची ही आणखी एक चुणूक :

अइसन बराती न देखे अभी तक जिया होय धकी-धक.
केहू के एक आँख केहू के दुई आँख,
केहू के एक्कौ न ताकैं टकी-टक; जिया होय धकी-धक.
केहू के एक हाथ केहू के दुई हाथ,
केहू के एक्कौ न खाँय गपी-गप; जिया होय धकी-धक.
केहू के एक गोड़ केहू के दुई गोड़;
केहू के एक्कौ न कूदैं घपी-घप; जिया होय धकी-धक

गाण्याचा भावार्थ असा : असे कसे हे लग्नाच्या वर्‍हाडातील लोक? यांच्यासारखे वर्‍हाडी पाहिले नाहीत हो अगोदर!! कोणी एका डोळ्याने तर कोणी दोन्ही डोळ्यांनी पाहा तरी आमच्याकडे कसे डोळे फाडफाडून टकमका बघताहेत, की आमच्या हृदयाचे ठोके वाढवत आहेत! कोणी एका हाताने तर कोणी दोन्ही हातांनी बघा कसे गपागप खात आहेत! कोणी एका पायाने तर कोणी दोन्ही पायांनी धपाधप उड्या मारत आहेत.... आमच्या हृदयाचे ठोके वाढवत आहेत!!

आणि स्त्रियांनी रचलेला हा व्यंगपूर्ण कल्पना-विलास बघा तरी!

समधी भडुआ पीटे कपार हमरा करम में जोरू नहीं है |


बराती भडुआ पीटे कपार हमरा करम में जोरू नहीं है |
दौडल गईलन कागज के दुकान पर कागज के दुकान |


कागज के जोरू बना मैया हमरा करम में जोरू नहीं है |
कागज के जोरू बगल में बैठाया पलंग पर सोलाया |


हवा बहत उडी जाये बाबू हमरा करम में जोरू नहीं है |
दौडल गईलन कुम्भार के दुकान पर कुम्भार के दुकान |


माटी के जोरू बगल में बैठाया पलंग पर सोलाया |
बूँद पडत गल जाये बाबू हमरा करम में जोरू नहीं है |


दौडल गईलन सोनार के दुकान पर सोनार के दुकान |
सोना के जोरू बना बाबू हमरा करम में जोरू नहीं है |


सोना के जोरू बगल में बैठाया पलंग पर सोलाया |
चोर चोरा के ले जाये बाबू हमरा करम में जोरू नहीं है | 

या गाण्यातही व्याह्यांना 'गाली' दिली आहे. व्याही कपाळ बडवत आहेत. त्यांच्या नशीबातच बायको नाही! वर्‍हाडी लोक देखील कपाळ बडवत म्हणत आहेत, ''अरे देवा! आमच्या नशीबातच बायको नाही!''
पळत पळत ते कागदाच्या दुकानात गेले व त्यांनी कागदाची बायको बनवली. तिला आपल्या शेजारी बसवले,  पलंगावर झोपवले. पण हाय रे दैवा! जोराच्या वार्‍याने कागदी बायको उडून गेली. मग त्यांनी पळत जाऊन कुंभाराकडून मातीची बायको बनवून आणली. तिला आपल्या शेजारी बसवले,  पलंगावर झोपवले. पण हाय रे दैवा!  पावसाच्या पाण्याने बायको विरघळली! मग त्यांनी पळत जाऊन सोनाराकडून सोन्याची बायको बनवून आणली. पण चोराने ती बायको चोरी केली! हाय रे दैवा.....ह्याला म्हणतात, यांच्या नशीबातच बायको नाही!!!



लग्नाची वरात वधूच्या द्वारी लग्नमंडपापाशी येऊन पोहोचते तेव्हा त्या मंडळींना 'तिलक' करून अगोदर त्यांचे पूजन करतात, आणि मग गारी देतात!!! (तिलकाचे वेळी गाण्याच्या गीतात वराकडचे लोक वधूकडच्या लोकांना 'तुम्ही अमक्या तमक्या गोष्टी द्यायचे कबूल केलेत - पण त्या न देता आम्हाला फसवलेत' म्हणून गारी देतात!) बिहार प्रांतांतील लोकगीतांत लग्नप्रसंगी व्याह्यांचे स्वागत करताना त्यांना अशा प्रकारे 'गारी' द्यायची पद्धत आहे :

स्वागत में गाली सुनाओ मोरी सखिया


यह समधी भडुआ को टोपी नहीं है
कागज के टोपी पेन्हाओ पेन्हाओ मोरी सखिया | स्वागत.


इस भैसुर भरूआ को कुरता नहीं है
बोडे का कुर्ता सिलाओ मोरी सखिया | स्वागत.


इस भैसुर भडुआ को धोती नहीं है
बीबी का साया पेन्हाओ पेन्हाओ मोरी सखिया | स्वागत.


इस बराती भडुआ को माला नहीं है
जूते का माला मँगाओ मँगाओ मोरी सखिया | स्वागत.

अगं सख्यांनो, वर्‍हाडी लोक दाराशी येऊन उभे ठाकले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी त्यांना 'गाली' द्यायलाच हवी!
या व्याह्यांकडे टोपी नाही. त्यांना कागदाची टोपी घालायला पाहिजे. या मोठ्या दीरांकडे कुडता (अंगरखा) नाही. यांच्यासाठी मांजरपाटाचा (गोणीच्या कापडाचा) कुडता शिवायला घ्या गं सख्यांनो! या मोठ्या दीरांकडे धोतरच नाही! त्यांना त्यांच्या बायकोचा परकर घालायला दिला पाहिजे! या वर्‍हाड्याकडे माळ नाही. म्हणून त्यांना चपलांची माळच घालायला पाहिजे!!

आणखी एका स्वागत - गीतात गारी देताना स्त्रिया वराच्या पित्याला - व्याहीबुवांना लक्ष्य करून हे गीत गातात :

तिली अरोरो चाँमर फटको
जाइ समधी कों घर धरि पटको |


बाजे ऊ न लायो बजाइबे कों
साजन की पौरि काए कों आयों थुकाइबे कों ||

अर्थ : तीळ सांभाळून ठेवा. तांदूळ पाखडून घ्या. ह्या व्याह्यांना घरी आणून आदळा. हा माणूस इतका कंजूष आहे की त्याने वरातीबरोबर वाजवायला बँडबाजादेखील आणला नाही! एवढेसे कामही त्याला जमले नाही! मग आमच्या सारख्या प्रतिष्ठित लोकांना अपमानित करण्यासाठी आमच्या दारी का आला होता हा?

एका गीतात विहीण व्याह्यांचे स्वागत करते तर ते तिचा उपहास करतात. विहीण म्हणते, 'व्याहीबुवा, तुमच्याशी आज आमचे मिलन झाले. आम्ही स्वतःला भाग्यशाली समजतो की तुमचे आमचे आज मिलन झाले.' त्यावर मुलीच्या सासरचे लोक व्याह्याच्या वतीने गातात, ''अहो विहीणबाई, तुमचा शेला फारच स्वस्त आहे बुवा! अगदीच कवडीमोल.... आणि माझे धोतर बघा किती किंमती आहे - एका परगण्याएवढी त्याची किंमत आहे! ओ विहीणबाई, तुमचा लेहंगा देखील फारच स्वस्त आहे बुवा! त्या मानाने माझे धोतर अतिशय महाग आहे!''

भोजनप्रसंगी गाण्याच्या गारी गीतांमध्ये प्रभू रामचंद्र सीतामाईसह जेव्हा अयोध्येत आले तेव्हा त्यांच्या स्वागतार्थ व सन्मानार्थ अयोध्यावासियांनी कशा प्रकारे उत्सव साजरा केला, सर्व नगरजनांना व अतिथींना राजा दशरथाने कसे भोजन दिले, त्याची तयारी कशी केली इत्यादी रसपूर्ण वर्णन मोठ्या तन्मयतेने केलेले आढळते. पण त्या खेरीज इतर गारी-गीतांमध्ये लग्नातील वर्‍हाडाच्या खाण्यापिण्याच्या लकबींबद्दल उपहास केलेला दिसतो. आता ही बुंदेलप्रांतात प्रचलित ज्योनार गालीच पाहा ना!

बुंदेली ज्योनार गारी (जेवायच्या वेळी गाण्याचे गारी गीत)

कौना की पातर में का का सबाद बाबाजू
हमारे राम जियारे बाबाजू


आलू खा लये रतालू खा लये सेमें सटक गये बाबाजू | हमारे....
पूडी खा लई कचौडी खा लई गुजिया सटक गयी बाबाजू | हमारे...
लड्डू खाये पेडा खाये सो बरफी खा डारीं बाबाजू | हमारी....
रायतो पी लओ खीर पी लई पानी डकर गये बाबाजू | हमारे...
लाँगो चाब लई लायची चाब लई बीडा रचा लऔ बाबाजू | हमारे...
मूँछे मरौडी पहिरीं पनैया चल दये बाबाजू | हमारे...
कौना की पातर में का का सबाद बाबाजू...

अर्थ : हे बाबाजी! कोणकोणत्या पात्रात कोणकोणत्या पदार्थांचा स्वाद आहे सांगा बरं! आमचे व्याही एकाच वेळी सर्व पात्रांमधील पदार्थांचा आस्वाद घेऊ पाहतं आहेत. हे भगवान! त्यांना जिवंत ठेव रे बाबा! त्यांनी बटाट्याची भाजी खाल्ली, रताळ्याची भाजी चापली आणि डाळ - उसळ तर न चावताच गटकावून टाकली. पुर्‍या खाल्ल्या, कचोरी खाल्ली आणि गुजिया त्यांनी घाईघाईत तशाच चव न घेताच गिळल्या! व्याह्यांनी लाडू खाल्ले, पेढे खाल्ले आणि बर्फी तर खाऊन संपवूनच टाकली! त्यावर आमच्या व्याह्यांनी रायते प्यायले, खीर प्यायली आणि एवढे खाऊनही त्यांनी ढेकर दिली नाही! ते रिकामपोटीच राहिले!! व्याह्यांनी लवंगा खाल्ल्या, वेलदोडे चावले, पानाचा विडा चघळला आणि मिशांना ताव मारून वहाणा घालून ते चालते झाले. अरे ओ व्याहीबाबू, एवढे तरी सांगून जा की तुम्हाला कोणकोणत्या पात्रातील पदार्थाचा कोणकोणता स्वाद मिळाला!

अशाच आशयाचे हे माळवी गारी गीत :

काए उठी बैठे औरू लै लेते
काए उठी बैठे औरू लै लेते ||


पूरी लै लेते - कचौरी लै लेते
अपनी बैंहना को लडुआ औरू लै लेते ||


बर्फी लै लेते - जलैबी लै लेते
अपने मैंया को कारोजाम औरू लै लेते ||


आलू लै लेते - कद्दू लै लेते
अपनी बुआ को अरईं औरू लै लेते ||

अर्थ : वर्‍हाडी लोक भोजनास बसलेले असताना वधू पक्षाकडचे लोक वरपक्षाकडील लोकांना आणखी खाण्याचा आग्रह करत आहेत, कोकिळवचनी व्यंगात्मक विनोदाने भरलेले गीत गात आहेत. ''भोजन करणे थांबवलेत कशाला? आणखी काही खायचे होते. पूरी-कचोरी खायची होती. ते नाहीतर किमान आपल्या बहिणीसाठी लाडू तरी घ्यायचेत. बर्फी-जिलबी आणखी घ्यायचीत. ती नाही तर आपल्या आईसाठी आणखी गुलाबजाम तरी ठेवून घ्यायचेत! बटाट्याची आणि भोपळ्याची भाजी आणखी घ्यायचीत. आपल्या आत्यासाठी किमान अरबीची भाजी तरी आणखी घ्यायचीत!!''

व्याह्यांबद्दल थट्टेचे, चेष्टामस्करीचे उद्गार त्यांची विहीण ह्या गीतात काढते.
व्याही बाजाराला गेले होते तेव्हा त्यांची झालेली फजिती त्यांच्या विहिणीने या रांगड्या शब्दांमध्ये वर्णन केली आहे.

गये ते जखौरा की हाट रे मोरे रंजन भौंरा |
गये ते गधैया के पास रे मोरे रंजन भौंरा |
गधैया ने मारी लात रे मोरे रंजन भौंरा |
ऐंगरे टूटे टेंगरे टूटे टूटी है लंगडे की टौन रे मोरे रंजन भौंरा |
अब कैसे निगै मोरे रंजन भौंरा |
ल्याऔ चनन कौ चून रेमोरे रंजन भौंरा |
ऐंगरे जोडे टेंगडे जोडें जोडें लंगडे की टौन रे मोरे रंजन भौंरा |
गये ते जखौरा की हाट रे मोरे रंजन भौंरा |

स्त्रिया गातात - हे माझे मन प्रसन्न करणार्‍या भ्रमरा! आमचे व्याही जखौरा गावाच्या बाजाराला गेले होते. तिथे ते एका गाढवी (पर-स्त्री)च्या जवळ गेले. त्या गाढवी (युवती) ने त्यांना अशी काही लाथ मारली की त्यांचे अंग अन् अंग खिळखिळे झाले आणि आमच्या लंगड्या व्याह्यांचा गुडघाच निखळला! अरे माझ्या भ्रमरा! आता ते कसे चालणार? अरे माझ्या भ्रमरा, चण्याचे पीठ आणा. त्याने मी आमच्या व्याह्यांची तुटलेली हाडे - बरगड्या जोडून देते आणि व्याह्यांचा निखळलेला गुडघा पुन्हा जोडून देते.

आणि ह्या गारी गीतात व्याह्यांच्या संशयी स्वभावाचा कसा पुरेपूर व्यंगमय समाचार घेतला आहे बघा!

कुत्ता पाल लो नये समधी जजमान कुत्ता पाल लो
कुत्ता के राखे से मिलै ऐन चैन
समधिन की रखवारी करै दिन रैन
स्वाद चाख लो कुत्ता पाल लो...
कुत्ता के राखे कौ आसरौ बिलात
समधिन के पीछें लगौ रहे दिन रात
जरा देख लो | कुत्ता पाल लो....
कुत्ता के राखे से पुरा जग जाये
समधिन के आगे पीछे लगौ जाये
जरा देख लो.... कुत्ता पाल लो |

स्त्रिया म्हणतात, अहो पाहुणे, अहो व्याही महाशय, तुम्ही आमचे ऐका आणि एक कुत्रा पाळाच! कुत्रा पाळल्यावर तुम्हाला खूप आराम मिळेल. तो तुमच्या पत्नीची दिवसरात्र राखण करेल आणि मग तुम्ही निवांत होऊन परस्त्रीचे सुख घेऊ शकाल! कुत्रा पाळल्यामुळे तुमची बरीच मदत होईल. तो दिवसरात्र तुमच्या पत्नीच्या - विहीणबाईंच्या आगेमागे करेल. कुत्रा भुंकल्यावर सारे शेजारी जागे होतील. त्यामुळे तुमच्या पत्नीला भेटायला कोणी येऊ शकणार नाही, किंवा तीही कोणाकडे जाऊ शकणार नाही! अहो व्याही महाशय, तुम्ही आमचे ऐकाच व कुत्रा पाळून बघा, त्यामुळे तुम्हाला किती आराम मिळतो ते!

माळवा प्रांतातही विशेष शुभ प्रसंगी गारी गीते गायची परंपरा आहे. 'जच्चा' म्हणजे नवप्रसूत मातेला उद्देशून अनेक व्यंग-विनोदपूर्ण गारी गीते रचली गेली आहेत. त्यातीलच हे एक गारी गीत :

बऊअरि, ओ मेरी बऊअरि
तुम मेरी बऊअरी न हो ||


बऊअरि, बै तो बसै बिन्दाबन-बसे बिन्दाबन 
गरबु तुमें कौन कौ जी म्हाराज ||१||


सासुलि, ओ मेरी सासुलि,
तुम मेरी सासुलि न हो ||


सासुलि - बे तौ दिन कों बसें बिन्दाबन
राति को घर आइयेजी म्हाराज ||२||

सासूने थट्टा-मस्करीत नवप्रसूत सुनेला विचारले, ''माझ्या प्रिय सुने, तू माझी प्रिय सून आहेस ना? माझा मुलगा तर परदेशी वृंदावनात राहतो. मग तू कोणाचा गर्भ धारण केलास?''
नवप्रसूत सुनेने समाधानाने उत्तर दिले, ''माझ्या प्रिय सासूबाई, तुम्ही तर माझ्या लाडक्या सासूबाई आहात. माझे पती दिवसा वृंदावनात - परदेशी राहतात. पण रात्री माझ्यापाशी घरी परत येतात. मी त्यांचाच गर्भ धारण केला!''

विहिणीसाठी गाण्याची गारी गीतेही खास आहेत. तिखट चणे खाण्यावरून विहिणीची केलेली ही थट्टा-मस्करी :

अरे चने वाले रे गलियों में तूने शोर किया
समधन मोर बड़ी चटोरी, भर भर दोने खाती है
चाटा पत्ता फेंक दिया रे, पल्ले से मुहँ पोछ लिया ।।
समधन मेरी बड़ी हठीली, लाल मिर्च डलवाती है ।
मुखड़ा सारा लाल हुआ रे, सी सी का शोर मचाती है।। अरे चने वाले.

आधुनिक काळात रचलेल्या एका गाण्यात विहिणीच्या म्हणजेच समधनच्या एके काळच्या तारुण्याचे वर्णन करून आता ते तारुण्य कसे ओसरले आहे याचे व्यंगपूर्ण वर्णन आहे :

आज मेरी समधन बिके है कोई ले लो ।
अठन्नी नहीं है चवन्नी में लो,
अगर जेब खाली बिना दाम ले लो ।
जब मेरी समधन थी नई नवेली,
तब तो अषर्फी मे तोली गई थी ।
गालों की सुर्खी, ये आँखो की मस्ती,
ये लाखों की बोलियाँ बोली गई थी। आज....
जाओ जी तुमसे ना सौदा करेगें ।
अगर ऐसे तोहफे को ठुकरा चलोगे,
जिगर थाम लोगे सदा गम करोगे ।
ये नीलम सी आँखें, ये गालो की लाली,
ये हर मनचले के दिलों की कयामत,
अषर्फी नहीं है तो रूपये में ले लो ।
रुपया नहीं है तो बिना दाम ले लो ।। आज....

विहिणीला (मुलाच्या मातेला) गारी देणार्‍या 'उबटन' किंवा 'उटणे' लावतानाच्या गीतात सरळ सरळ वधुपक्षाच्या स्त्रिया म्हणतात, 'धिया के गोड झिलिया हो बाबा सतभतरी पुता के लेगेतेई'.... म्हणजे वधूच्या पायांना उटणे लावून झाल्यावर त्या उटण्याचा उरलेला अंश सतभतरीच्या (ज्या स्त्रीने सात पती केलेत अशा) वरमाईच्या पुत्राला (वराला) लावला जाईल!

लोकसाहित्यातील गारीगीतांमधून कृष्ण-राधा-गोपी, प्रभू रामचंद्र-सीता-लक्ष्मण हेही सुटले नाहीत. गोपींनी कान्ह्याला दिलेल्या गारी या एकाच वेळी भावमधुर, भक्तिरसपूर्ण व त्यांच्या लटक्या रागाचे दर्शन घडवणार्‍या आहेत. एका गारी गीतात गोपसख्या गातात,

आवो री आवो तुम, गावो री गारी तुम
देवो री गारी तुम, मोहन को जी जी॥


फागुन में रसिया घर बारी, फागुन में फागुन में,
हां हां बोलत गलियन डोले गारी दे दे मतवारी॥
फागुन में॥


लाज धरी छपरन के ऊपर, आप भये हैं अधिकारी॥
फागुन में॥

प्रभू रामचंद्र व लक्ष्मणाला महिला गारी देतात तेव्हा त्या ज्या प्रकारे  या दशरथपुत्रांच्या जन्मकहाणीचा वापर करून दशरथपुत्रांना ' काय हो, आम्ही जे ऐकलंय ते खरं आहे का? अयोध्येच्या स्त्रिया एक तर पुरुषांपासून दूर राहतात, खीर खातात आणि पुत्रांना जन्म देतात हे खरे का?' असे विचारतात, राम-लक्ष्मणाला त्यांच्या श्यामल-गौर कायावर्णावरून छेडतात, त्यावरून त्यांच्या कुतूहलाचे, चौकसपणाचे व वाक्चातुर्याचे दर्शन घडते. त्या पुढे म्हणतात, 'त्राटिका नार तुम्हाला पाहून अरण्यातून धावत काय आली, तुम्ही धरणीला म्हणे बाणाने छेदलेत,  त्यात असे काय मोठे कर्तृत्व? तुमची स्त्री तुम्हाला सोडून ऋषींच्या सोबत राहिली ते खरं आहे का? आम्ही ज्या खर्‍या गोष्टी बोलतोय, त्यांच्याबद्दल, हे लाला, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका!'

हमनें सुनी अबध की नारी दूर रहैं पुरसन सें ।
खीर खाय सुत पैदा करतीं लाला बड़े जतन सें ।।
नार ताड़का तुमें देखकें दौरी आई बन सें ।
कछु करतूत बनी नइं तुमसें धर छेदी बानन सें ।।
बैन तुमायी तुमें छोड़कें जाय बसी रिसियन कें ।
बुरो मान जिन जइयो लाला इन साँची बातन सें ।।
साँची झूठी तुम सब जानो का कै सकत बड़न सें ।
लगत रओ नीको लाला आये हते जा दिन सें ।। टेक ।।

शिव-पार्वती विवाह प्रसंगावरूनही काही गारी-गीतांच्या रचना बेतल्या आहेत. एका गारी गीतात पार्वतीची एक सखी दुसर्‍या सखीला सांगते, ''आताच मी पार्वतीचे पती शंभूनाथांना पाहून आले!'' ती सांगते,

मैं देख आइ गुइयां री.
जे पारबती के सैंया || 


सांप की लगी लंगोटी
करिया चढो कंधइयां री 
जे पारबती के सैंया || मैं देख.


गांजे भांग की लगी पनरियां
पीवे लोग लुगइयां री
जे पारबती के सैंया || मैं देख.


साठ बरस के भोले बाबा
गौरी हैं लरकइयां री
जे पारबती के सैंया || मैं देख.


तुलसीदास भजो भगवाना
हैं तीन लोक के सैंया री
जे पारबती के सैंया || मैं देख.

भोलेबाबा साठ वर्षाचे आहेत  आणि त्यांच्या होणार्‍या पत्नीचं, गौरीचं वय अजून लहान आहे. ते गांजा पीतात, भांग पीतात. साप धारण करतात. एक गोष्ट मात्र खास आहे की ते तिन्ही लोकांचे स्वामी आहेत!

नव्या काळात वेगळ्या प्रकारच्या गारी गीतांची रचना होते आहे खरी, पण एकंदरीतच गारी गीतांमधील विनोदी, व्यंगात्मक किंवा सवंगतापूर्ण आशय सोडला तर अनेक ठिकाणी गीतांमध्ये आढळणारे हुंडा, मानपान, आहेर, वंशवृद्धीसाठी पुत्राचा आग्रह इत्यादींचे सहज उल्लेख आजच्या जमान्यात खरे तर अस्वस्थ करणारे आहेत.

एका बुंदेली गारी गीतात स्त्रीची तुलना गायीशी केली आहे :

सुनो गउअन की अरज मुरारी हो मोरी प्रभु कीजिये सहाय
बम्बई कलकत्ता औं झाँसी मक्का औअं मदीना कासी 
लगती जाँ गउअन की फाँसी जहाँ होये रहे है कत्ल अपार हो...


मेरे गोबर कामै आवै दूध पीनेसे पित्त शांत हो जावै
घींव से कमजोरी कम जावै इन तीनों से जीवे सकल नर नारी हो...


बछडा दाँये हर में जुताई इनकी खायी खूब कमाई
बेचन लै गये मोल कसाई उनकी गरदन छुरी चलाई
वे तो रोवत हैं अँसुअन ढार हो....


हिन्दू मुसलमान औं इसइया मोरे कोउ नहीं हैं रखवइया
मो को भारत रोज कसइया डूबत अब भारत की नैया
दैया मैया दीन तुम्हार हो....


अर्थ : हे भगवान कृष्णा! आम्हा गायींची विनंती ऐकून आमचा त्रास हरण करायला धावून ये. मुंबई, कलकत्ता, मदीना, झांसी, मक्का, काशी सगळीकडे गायींना फाशी दिले जात आहे - खुलेआम त्यांची कत्तल केली जात आहे. माझे गोमय शेती व घराच्या कामांमध्ये वापरले जाते. माझ्या दुधाने पित्त शांत होते. तुपाने शरीरात बळ येते. आमच्या ह्या तीनही गोष्टींवर स्त्री-पुरुषांचे जीवन चालते. आमच्या बछड्यांना नांगराला जुंपून शेतात ढोरमेहनत करायला लावतात व त्यांच्या आधारावर खूप कमाई करतात. जेव्हा ते काम करण्यालायक उरत नाहीत तेव्हा त्यांना कसायाला विकून टाकतात. कसाई त्यांच्या मानेवर धारदार सुरा फिरवून त्यांचे धड वेगळे करतात. कसायाकडे बैल रडत असतात पण त्यांचा हंबरडा ऐकणारे कोणीच नसते! हिंदू, मुसलमान व ख्रिश्चन यांमधील कोणीच आमचे रक्षण करत नाही. आम्हाला रोज कसाई मारतात. हे भारताच्या अधःपतनाचेच लक्षण नव्हे काय? हे प्रभू! तुमच्या गायींची दशा हीन दीन आहे. तुम्हीच त्यांचे साहाय्य करा. हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन या सर्व जातींमध्ये स्त्रीची स्थिती गायीप्रमाणेच हीन दीन आहे.

लोकगीते जनसमुदायाच्या मनाचा आरसा असतात व मानली जातात. ग्रामीण भारताच्या जीवनशैलीचा ती एक अविभाज्य हिस्सा आहेत. आयुष्यातील अनेकविध टप्प्यांवर आधारित, कोणत्याही प्रसंगावर आधारित लोकगीते माणसांची अगदी जन्मापासून मृत्यूपर्यंत साथ करतात. त्यांच्यातील आशयाचा मनुष्यमनावर नक्कीच कोठेतरी परिणाम होत असणार! बदलत्या काळानुसार गारी गीतांच्या आशयातही फरक पडावा अशी अपेक्षा करणे व्यर्थ आहे का? गारी गीतांतून भारताच्या बहुजन समाजाचे, जतन केल्या जाणार्‍या काही प्रथांचे प्रकट होणारे हे चित्र भारतीय समाजाची आजही अस्तित्वात असलेली मानसिकता दर्शविते असेच म्हणावे का, यावरही चिंतन आवश्यक आहे.

[संदर्भ : बिहार के संस्कार गीत, बुंदेली लोकगीत, संस्कार गीत माळवा, राजस्थानी लोकगीतांच्या संकलनाची मध्य प्रदेश सरकारने प्रकाशित केलेली ई-पुस्तके.]

** हा लेख जालरंगच्या २०१२ च्या होळी विशेषांकात http://holivisheshank2012.blogspot.in/search/label/%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96 येथे पूर्वप्रकाशित झाला आहे.

Sunday, November 27, 2011

म्हणींच्या राज्यातील गमतीजमती



पूर्वापार चालत आलेल्या म्हणींची मजाच काही और असते! अनेकदा त्यांच्यामागे असलेले संदर्भ कालौघात मिटले तरी प्रत्येक म्हणीमागे दडलेले व्यावहारिक शहाणपण, अनुभव व त्यातून मिळणारे ज्ञान हे खणखणीत  असते. पंचतंत्र, जातक कथा, रामायण - महाभारत यांसारख्या कथांमधून या म्हणी, त्यांचे उगम तर दिसतातच; शिवाय अनेक लोककथा - काव्यांच्या स्वरूपांत त्यांचे जतन झालेले आढळून येते.

एखाद्या देशात प्रचलित असलेल्या म्हणींवरून त्या देशातील लोकांची प्रतिभा, वाक्चातुर्य व व्यवहाराची पडताळणी करता येते असा सर्वसामान्य समज आहे. त्यानुसार पाहावयास गेले तर भारतातील विविध भाषांमधील म्हणींचा समृद्ध खजिना येथील लोकांची विलक्षण प्रतिभा, चातुर्य व स्वभाव-विशेषांची ओळख करून देतो असेच म्हणावे लागेल.

आधुनिक युगात म्हणींचा वापर शहरी संभाषणात कदाचित मोठ्या प्रमाणावर होत नसेल. परंतु आजही ग्रामीण भारतात या म्हणी संभाषणात, व्यवहारात सतत डोकावताना दिसतात. गावाकडची दोन माणसे गप्पागोष्टी करत बसली असतील तर त्यांच्या गावगप्पा अवश्य ऐका. तुम्हाला दोन-तीन तरी इरसाल, अस्सल, झणझणीत म्हणी ऐकायला मिळणारच याची खात्री!

महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा, कोंकण, घाटावरच्या अनेक म्हणी आज पुस्तकांच्या व आंतरजालाच्या कृपेने आपल्याला एकत्रित स्वरूपात वाचावयास मिळतात. त्यांच्या 'उद्बोधकते'वर झडलेल्या महान चर्चाही आपण वाचतच असतो. परंतु महाराष्ट्राबाहेर अशा कितीतरी म्हणी आहेत ज्यांचे मराठी स्वरूप आपल्याही माहितीचे आहे! परवा असेच एक म्हणींचे पुस्तक चाळताना वेगवेगळ्या भारतीय भाषांमधील समानार्थी म्हणींचा शोध लागला. भाषा बदलल्या, प्रांत बदलला, संस्कृती - आचार - विचार बदलले तरी मनुष्याचा स्वभाव बदलत नाही. त्याच्या वृत्ती बदलत नाहीत! त्यांच्यामागचे मर्म तेच राहते. भारताच्या विविध प्रांतांमध्ये डोकावून बघितलेत तर अशा बर्‍याचशा म्हणी तुम्हाला सामायिक अर्थाच्या दिसतील.

उदाहरणार्थ हिंदी भाषेतील ही म्हण पाहा ना! म्हण आहे,''मरें भैस में बहुत घी''. म्हणजे म्हैस मेली की त्या  मेलेल्या म्हशीला किती दूध यायचं, त्यापासून किती तूप लोणी बनायचं याबद्दल तिचं बेफाट गुणगान करणं. भले ती म्हैस जिवंत असताना तिला कधी प्रेमाने चारा खाऊ घातला नसेल. पण ती मेल्यावर तिच्या गुणांची तोंड फाटेस्तोवर स्तुती करायची. बुंदेलखंडी भाषेत या म्हणीशी साधर्म्य दाखवणारी ''मरे पूत की बडी आँखे'' अशी म्हण प्रचलित आहे. तिचाही अर्थ असा की जोवर एखादी व्यक्ती जिवंत असते तोवर तिची कदर नसते. परंतु तीच व्यक्ती मेल्यावर तिच्या महानतेचे पोवाडे गायले जातात. याच म्हणीचे आणखी एक रूप म्हणजे, ''मरे बाबा की पस्सों सी आँखे''. इथला 'पस्सों' म्हणजे मराठीतील पसा किंवा ओंजळ!

एकाच अर्थाच्या, शब्द साधर्म्य दाखवणार्‍या म्हणी कदाचित एका प्रांतात जन्मल्या व त्यानंतर विविध कारण - मार्गे इतर प्रांतांमध्ये प्रचलित झाल्या असेही असू शकेल. पूर्वीच्या काळी सार्थवाह, यात्रेकरू, भटके लोक, यती - मलंग - फकीर - साधू - भिख्खू, भ्रमण करून लोक-मनोरंजन करणार्‍या कलावंत लोकांचे तांडे यांच्याद्वारेही अनेक कथा, म्हणी, शब्दप्रयोग वेगवेगळ्या भागांमध्ये पोहोचले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे होते काय, जरी दोन प्रांतांतील व्यक्तींची बोलीभाषा वेगळी असली तरी त्या त्या सामायिक अर्थाच्या म्हणीने ते आपोआप एकमेकांशी सांधले जातात. वाक्यांची लांबण न लावता त्यांना मोजक्या शब्दांमधून व्यक्त होता येते. शिवाय त्या प्रसंगाला वा परिस्थितीला साजेशी ठसकेबाज म्हण आपल्या संग्रही आहे व ती वापरता येणे  याचा आनंदही औरच असतो!

महाराष्ट्रात ''कोठे राजा भोज आणि कोठे गंगू तेली'' ही म्हण आजही लोकप्रिय आहे. गमतीची गोष्ट की हीच म्हण भारतात इतर अनेक भाषांत अगदी त्याच प्रकारे आढळते. जसे, हिंदीत, 'कहाँ राजा भोज, कहाँ गंगू तेली' तर भोजपुरीत 'कहाँ राजा भोज, कहाँ भोजवा / लखुआ तेली', गुजरातीत 'क्यां गंगाशाह, क्यां गंगा तेली', बंगालीत 'कोथाय राजा भोज, कोथाय गंगाराम तेली', राजस्थानी भाषेत 'कठै राजा भोज, कठै गांगलो तेली', बुंदेलखंडात 'कां राजा भोज, कां डूंठा तेली' अशी या म्हणीची विविध रूपे पाहावयास - ऐकावयास मिळतात.

त्याच प्रकारे आणखी एक म्हण : ''नाचता येईना, अंगण वाकडे.... स्वैपाक करता येईना, ओली लाकडे. '' बंगालीत हीच म्हण 'नाचते न जानले, उठानेर दोष' म्हणून प्रचलित आहे. गुजराती मंडळी ह्या म्हणीला 'नाचतां नहीं आवडे तो के आंगणुं बांकुं' अशा प्रकारे वापरतात.

'महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे वाचती' हे वचन तर प्रत्येक मराठी माणसाला ठाऊक आहे. मोठ्या लोकांवरच कायम संकटे येतात अशा अर्थाच्या म्हणी इतर भाषांतदेखील दिसून येतात. 'बडे गाछेई झड लागे' अशी म्हण बंगालीत प्रसिद्ध आहे. त्याचा अर्थ : मोठ्या वृक्षांनाच वादळ सतावते. (लहान झाडाझुडुपांची वादळात तितकी हानी होत नाही.) बुंदेलखंडी भाषेत हीच म्हण 'बडेई रूख पै गाज गिरत', म्हणजे मोठ्या वृक्षावरच वीज कोसळते, या अर्थाने दिसून येते.

गावांगावांमधून पोटदुखीवर रामबाण उपाय म्हणजे ओवा. त्यावरही एक म्हण प्रचलित आहे, ''ज्याचे पोट दुखेल तोच ओवा मागेल.'' म्हणजे आपण होऊन कोणी चवीला तिखट लागणारा, जिभेला मिरमिरणारा ओवा मागायला वा खायला जाणार नाही. ही म्हण हिंदीत 'जिसका पेट दर्द करता है वहीं अजवाइन खोजता है' म्हणून प्रसिद्ध आहे. आणि बंगालीत तिचे रूप, 'जार माथा मांगे सेई चून खोजे'. म्हणजेच, ज्याचे डोके फुटेल तोच चुना शोधेल.



अनुभवातून आलेलं शहाणपण हे नात्यासंबंधी असो की पोटापाण्याच्या व्यवसायासंबंधी - म्हणींत ते लीलया सामावून जाते. आता ही भोजपुरी म्हणच पहा ना -- ''खाद पडे त खेत, नाहीं त कूडा-रेत |'' म्हणजेच शेतीत जर खत घातले तरच शेती चांगली होते, नाहीतर तिचा फक्त कचरा होतो.  किंवा ''करम टरे त टरे, बाकिर जोत न टरे'' ही म्हण. तिचा अर्थ आहे, भले भाग्य धोका देवो - न देवो, पुरुषार्थ धोका देत नाही. भारतातील शेती पर्जन्याच्या मर्जीवर अवलंबून असते त्याचेच हे प्रतिबिंब म्हणीत दिसून येते. भाग्यात पर्जन्यवृष्टी असो वा नसो, (त्याला न डरता) शेत जोमाने नांगरण्यातच पुरुषार्थ आहे.

''अंधेर नगरी चौपट राजा'' या म्हणीचा हिंदी अवतार म्हणजे ''बेबूझ नगरी बेबूझ राजा.''

एक साधू व त्याचा शिष्य फिरत फिरत एका नगरात आले. साधूने शिष्याला शिधासामग्री खरेदी करण्यासाठी बाजारात पिटाळले. शिष्याने पाहिले तो काय, तिथे बाजारात सार्‍या वस्तू एकाच दामाला मिळत होत्या. मग काय, त्याने त्या पैशांतून भरपूर मिठाई खरेदी केली व साधूकडे परत आला. मात्र साधूला शिष्याचा वृत्तांत ऐकून ती नगरी राहण्यास असुरक्षित वाटली व त्याने लगेच तिथून मुक्काम हालवायचे ठरविले. परंतु शिष्याला तर त्याच नगरीत राहायचे होते. त्याला समजावून सांगितल्यावरही फरक न पडल्याने साधू महाशय शेवटी शिष्याला मागे सोडून एकटेच त्या नगरीतून चालते झाले. इकडे शिष्य रोज भरपूर मिठाई खाऊन चांगला जाडजूड, लठ्ठ झाला.

एके दिवशी त्या नगरीत एक खून झाला. तपास करूनही गुन्हेगार सापडला नाही. तेव्हा राजाने क्रोधित होऊन आज्ञा दिली की या नगरीतील सर्वात लठ्ठ मनुष्याला पकडा आणि त्यालाच फाशी द्या! राजाच्या शिपायांनी लठ्ठ शिष्याला पकडले व फाशी देण्यासाठी राजाच्या समोर आणले. शिष्य गयावया करू लागला की तो खून त्याने केलेला नाही. परंतु राजाने त्याचे काहीही ऐकून घेतले नाही. तेवढ्यात शिष्यावरच्या संकटाची वार्ता ऐकून साधूही तिथे धावत धावत आला आणि म्हणू लागला, ''मला फाशी द्या. तो खून मी केला आहे. या माझ्या शिष्याला सोडून द्या. तो निरपराध आहे. '' हे ऐकून शिपायांनी शिष्याला सोडले व साधूला पकडले. राजासमोर साधूला फाशी होणार तेवढ्यात तो शिष्य तिथे धावत आला व ओरडू लागला, ''खरा खून तर मी केलाय, मलाच फाशी द्या!'' साधू व त्याचा शिष्य या दोघांमध्ये अशा रितीने खरा दोषी कोण यांवरून चांगलीच जुंपली. एक म्हणायचा, 'मी केला खून', तर दुसरा म्हणायचा, नाही, नाही, मीच केला खून!!'' शेवटी राजा चांगलाच बुचकळ्यांत पडला व त्याने दोघांनाही सोडून दिले!  

प्रत्येक म्हणीच्या मागे असणार्‍या उगम कथा बदलतील, पात्रे बदलतील. पण त्यांतून लखलखणारे अस्सल शहाणपण मात्र अनुकरणीय ठरेल. अनेक तपे लोटली तरी त्या म्हणी आजच्या काळालाही तितक्याच लागू आहेत.

खालची ही गोष्ट व म्हण वाचून तुम्हाला सध्याच्या कोणत्या घोटाळ्याची आठवण होते का, पहा बघू!

''आँधर सौंटा'', म्हणजेच अधिकारी पदाला अयोग्य व्यक्तीच्या हाती अधिकार देण्याचे फळही वाईटच मिळते!

त्याची गोष्ट ही अशी :

एका गावात एका माणसाने गावातील आंधळ्या व्यक्तींना भोजन द्यायचे ठरविले. त्याप्रमाणे त्याने सर्व आंधळ्यांना गोळा करून भोजनासाठी पंगतीत बसायला सांगितले. आता त्या माणसाची चलाखी बघा बरं का! त्याला मनातून खरेच त्या आंधळ्यांना भोजन देण्याची अजिबात इच्छा नव्हती. मात्र त्यातून मिळणारे श्रेय,नाव व फुकटची प्रसिद्धी हवी होती. मग त्याने एक युक्ती केली. पंगतीत बसलेल्या पहिल्या आंधळ्याच्या पुढे मिष्टान्नाने भरलेले ताट ठेवले. आंधळ्याने ताट चाचपून पाहिले. आपल्यासमोर ठेवलेले ताट पदार्थांनी भरलेले आहे हे चाचपडून पाहिल्यावर तो निश्चिंत झाला व मागे रेलून बसला. त्या चलाख माणसाने तेच ताट उचलून दुसर्‍या आंधळ्याच्या समोर ठेवले. तोही ताट चाचपडून निश्चिंत झाला. अशा पद्धतीने त्या चलाख इसमाने एकच ताट सर्व आंधळ्यांच्या समोर फिरवले. मग तो सार्‍या अंधांना उद्देशून जोरात म्हणाला, ''बंधूंनो, सर्वांना भोजन वाढले आहे. तेव्हा देवाची प्रार्थना करून भोजनाला सुरुवात करा!''
परंतु कोणाच अंधाच्या पुढे भोजनाचे ताट नव्हते. प्रत्येकाला वाटले की माझे ताट शेजारच्या व्यक्तीनेच पळवले. झाले!! ते एकमेकांवर दोषारोप करू लागले, की तूच माझे ताट चोरलेस! करता करता त्यांच्यात भांडणे लागली आणि एकमेकांची सोट्याने यथेच्छ धुलाई करून ते सारे अंध न जेवताच, भुकेल्या पोटी, जखमी होऊन परत गेले!!

एखाद्या कामात मूर्खपणे अडथळा बनून हटवादीपणा करणार्‍यांसाठी हिंदी भाषेत एक म्हण आहे,
'जो बोले सो घी को जाय'. त्या म्हणीमागे एक मजेशीर कथा सांगतात.
एकदा चार मूर्खांनी एका झाडाखाली एकत्र स्वयंपाक बनवायचे ठरविले. पण स्वयंपाकासाठी लागणारे तूप कोणी आणायचे यावरून त्यांच्यात भांडाभांडी सुरू झाली. शेवटी चौघांनी ठरविले की मौन पाळायचे. आणि त्यांच्यातील जो पहिल्यांदा मौन तोडेल त्यानेच तूप आणायला बाजारात जायचे! आता चौघेही चुपचाप.... आपापसांत काहीही न बोलता, हूं की चू न करता तसेच भुकेल्या पोटी कोण पहिल्यांदा मौन तोडतोय याची वाट बघत रस्त्याच्या कडेला बसून राहिले. बघता बघता रात्र झाली. गस्तीवर असणार्‍या पहारेकर्‍याने त्यांना हटकले. पण चौघांपैकी कोणीच मौन सोडायला तयार नव्हते. शेवटी पहारेकरी त्यांना कोतवालाकडे घेऊन गेला. कोतवालाने त्यांना जाब विचारला तरी कोणी बोलायला तयार होईना! कोतवालाला वाटले की चौघेही त्याचा अपमान करत आहेत. त्याने चारही मूर्खांना चाबकाचे फटके ओढायची शिक्षा फर्मावली. एका मूर्खाला शेवटी तो मार सहन होईना, आणि तो वेदनेने कळवळून जोरात ओरडला, ''अयाईगं!'' त्याबरोबर बाकीचे तिघे जोरात ओरडले, ''आता तूच तूप आणायचेस!!!''

''आज नहीं कल'' या म्हणीमागची गोष्ट माणसाच्या स्वभावावर प्रकाश टाकणारी आहे.
एका नगरीत एक मुसलमान माणूस राहायचा. स्वतःला सच्चा मुसलमान, खुदाचा सच्चा पाईक मानायचा. रोज रात्री एका झाडाखाली बसून तो खुदाची करुणा भाकताना म्हणायचा, ''या खुदा, मला तुझ्यापाशी बोलावून घे.'' एक माणूस त्याचे हे खुदाशी बोलणे रोज ऐकायचा. त्याने एक दिवस या मुसलमानाची कसोटी घ्यायचे ठरविले. त्या रात्री तो झाडावर जाऊन बसला. नेहमीप्रमाणे मुसलमान आला, त्याने खुदाची करुणा भाकली, ''या खुदा, आपकी मोहब्बतमें मुझे आपके पास बुला लो |'' झाले! झाडावर बसलेल्या माणसाने वरून एक फाशीचा दोर खाली सोडला व म्हणाला, ''ये वर माझ्याकडे!'' मुसलमानाला वाटले की खुदाच त्याला वर बोलावतोय. त्याबरोबर तो ''आज नहीं कल,'' असे म्हणत आपल्या घराकडे पळत सुटला! म्हणजेच, मला आज नको, उद्या बोलाव. थोडक्यात मरणाची कल्पना करणे आणि प्रत्यक्षात मरणे यात खूप फरक आहे. आणि जोवर एखाद्या गोष्टीची कसोटी घेतली जात नाही तोवर त्यातील सत्यता कळून येत नाही.  

''टेढी खीर'' म्हणून एक म्हण हिंदीत प्रचलित आहे. एखादी गोष्ट करण्यासाठी खूप कठीण वाटली की ही म्हण वापरतात. त्यामागची कथा अशी : एकदा काही लोक मिळून मोठ्या चुलाण्यावर खीर बनवत होते. एक दृष्टिहीन माणूस तिथेच शेजारी बसला होता. त्या लोकांची आपापसात खिरीबद्दल चर्चा चालली होती. ती ऐकून त्या आंधळ्या व्यक्तीच्या तोंडाला पाणी सुटले. या अगोदर त्याने कधी खीर खाल्ली नव्हती. न राहवून त्याने त्यातील एका माणसाला विचारले, ''भाऊ, कशी असते हो ही खीर?'' त्यावर जमलेल्या लोकांनी सांगितले, ''मस्त पांढरीशुभ्र असते ही खीर!'' आता अंध व्यक्तीला काळे - पांढरे कसे समजणार? अंधाने विचारले, ''मग पांढरीशुभ्र म्हणजे कशी?'' त्यावर लोकांनी उत्तर दिले, ''पांढरी म्हणजे बगळ्यासारखी!'' आता अंधाला बगळा माहीत नव्हता. त्याने विचारले, ''बगळा कसा असतो?'' त्याबरोबर लोकांमधील एकाने आपल्या हाताचा बगळ्यासारखा आकार करून त्या अंधाच्या समोर धरला. अंधाने आपल्या हातांनी तो आकार चाचपडून पाहिला आणि म्हणाला, '' मला नको बुवा अशी खीर! ही तर वाकडी खीर आहे.... मी नाही खाऊ शकणार! उगाच माझ्या घशात अडकून बसायची!!''


''काली मुर्गी सफेद अंडा,'' या म्हणीमागे जनसामान्यात रूढ संकल्पनांचे दर्शन होते. त्यामागील कथा अशी सांगतात : एका नगरात एक श्रीमंत माणूस गृहस्थ राहत होता. तो वर्णाने काळे होता याची त्याला फार खंत वाटायची. एकदा तो अंगणात हिरवी शाल पांघरून बसले असताना एक फकीर फिरत फिरत त्याच्यापाशी आला आणि म्हणाला, ''काय हो हिरव्या रंगाचे कावळे महाशय.... या फकिराला काही देणार की नाही?'' त्या श्रीमंताला आपल्या काळ्या वर्णाचा फकिराने असा उल्लेख केलेला ऐकून खूप राग आला व तो तडक घरात निघून गेला. थोड्या वेळाने तो श्रीमंत पिवळ्या रंगाची शाल पांघरून पुन्हा अंगणात येऊन बसला. काही अवकाशाने आधी येऊन गेलेला फकीर फिरत फिरत पुन्हा त्याच्या अंगणासमोर आला व पुकारता झाला, ''क्यों भई बंगले की मैना, कुछ मिलेगा?'' या खेपेस श्रीमंताने फकिराला एक रुपया दिला. निघताना फकीर टोला लगावायला विसरला नाही, ''कोंबडी काळी असली म्हणून काय झाले.... अंडे तर सफेद देतेय बुवा!!''

साचलेलं धन कितीही का असेना, एक ना एक दिवस ते संपुष्टात येते, या लोकसमजाला पुष्टी देणार्‍या म्हणी अनेक भाषांमध्ये दिसतात. बुंदेलखंडी भाषेत 'खायें खायें पार बडात', बंगालीत 'बोसिया खाईले राजार भंडार टूटे', अशा रूपात त्या समोर येतात.



म्हणींचे जे रांगडेपण आहे, त्यांच्यात त्या त्या गोष्टीला कोणताही मुलामा न देता, लोकलाजेचा कसलाही मुलाहिजा न ठेवता थोडक्यात लोकांपुढे ठेवायचे जे कसब आहे, जो रोखठोकपणा आहे तो शब्दालंकारांनी नटलेल्या लांबलचक, पल्लेदार साहित्यात क्वचितच आढळेल! त्यांच्यात लोकरंजनाबरोबरच उपहास आहे, अनुभवातून आलेले शहाणपण आहे, उद्बोधकता आहे आणि त्यांचा जो गंध आहे तोही मिरमिरणारा.... नाकाला झोंबणारा, डोळ्यांत पाणी आणणारा!

हे लोक नक्की कोणते? तर ते कोणी उच्चतम मानल्या जाणार्‍या साहित्याचे अभ्यासक, उपासक नव्हेत वा कोणी महान विद्वान नव्हेत. कोठे दूर डोंगरांवर - रानांमध्ये वस्ती करून राहणारे, कोणी हातावर पोट असणारे, कोणी पोटासाठी वणवण भटकणारे तर कोणी दोन वेळच्या अन्नासाठी मिळतील ती कामे करून वेळ निभावणारे....  श्रद्धा - अंधश्रद्धांनी घेरलेले, रीती-रिवाजांच्या जगात वावरणारे... जाती, धर्म, समाज, पंथाच्या चौकटींना एकाच वेळी घट्ट चिकटून असलेले आणि त्याचवेळी कैकदा त्यांच्या मर्यादा ओलांडण्याचे धाडसही करणारे... त्यांच्या वापरातील म्हणींमध्ये या सार्‍या राहणीतील, विचारांतील व आचरणातील वास्तव जाणवत राहते.

आणखी एक म्हणजे या म्हणी लोकजीवनात कोणीही वापरू शकते. त्यांना प्रताधिकाराचे, जाती -धर्माचे बंधन नाही. सर्वसामान्य मनुष्याच्या आयुष्यात येणार्‍या वा येऊ शकणार्‍या प्रत्येक प्रसंगासाठी म्हणी रचल्या आहेत.

खास ग्रामीण शैलीतील ''पुरुष वो ही, जो एक दंता होई'' या म्हणीच्या उत्पत्तीची कथा काहीशी अशीच आहे. म्हातारा तितुका न अवघे पाऊणशे वयमान सारखा म्हातारा मनुष्य जेव्हा तरुण, सुस्वरूप वधूची स्वप्ने बघत लग्नाला तयार होतो तेव्हा काय होऊ शकते याची ही मजेदार कथा!

खूप खूप वर्षांपूर्वी एकदा एका वृद्ध विधुराला नोकरीतून सेवानिवृत्त झाल्यावर आपल्या एकटेपणाचा खूप कंटाळा आला. घरी तो एकटाच होता. त्याने लग्न करायचे ठरविले. मध्यस्थाला खूप पैसे देऊ केले आणि आपल्यासाठी (तरुण), सुस्वरूप वधू शोधायला सांगितले. मध्यस्थाने सांगितल्याप्रमाणे लग्न जुळवून आणले. पारंपारिक पद्धतीने विवाह पार पडला. विवाह समारंभ आटोपून स्वगृही परत येताना त्या वृद्धाला आपल्या सुंदर नववधूशी बोलण्याची इच्छा झाली. पण त्याला भीती वाटत होती, की वधू आपल्या म्हातारपणाची थट्टा करेल! म्हणून मग त्याने घोड्यावर स्वार होऊन तिच्या डोलीच्या चारही बाजूंना एखाद्या तरुणाच्या जोषात फेर्‍या मारल्या आणि वधूच्या जवळ येऊन म्हणाला, ''पुरुष वो ही, जो एक दंता होई''. (म्हणजे ज्याच्या तोंडात एकच दात, तोच पुरुष!) कारण त्या वृद्धाच्या तोंडात फक्त एकच दात शिल्लक होता.
त्यावर त्याच्या बायकोने डोलीचा पडदा बाजूला सारून मुखावरचा घुंगट दूर केला आणि म्हणाली, ''नारी रूपवती वो ही, जाँके मुँह में दंत न होई''!! (ज्या स्त्रीच्या मुखात एकही दात नाही, तीच नारी रूपवती होय!) .... याचे कारण??? ती 'नववधू' त्या वृद्धापेक्षाही म्हातारी होती आणि तिच्या तोंडात एकही दात शिल्लक नव्हता!!!  

ऐतिहासिक घटना, प्रसंगांचे पडसादही काही म्हणींमध्ये दिसून येतात. ज्या घटना पुढे लोकोक्तीच्या स्वरूपात जनमानसात टिकून राहतात. बुंदेलखंडात ही एक म्हण प्रचलित आहे : 'घर के जान बराते गये, आलीपुरा कठवा में दये.' या म्हणीचा संबंध भारतातील स्वातंत्र्यपूर्व काळातील संस्थानिकांच्या अजब अनागोंदीच्या राज्यकारभाराशी आहे. म्हणीनुसार कोणी एक सद्गृहस्थ वर्‍हाडी म्हणून एका वरातीत सामील होण्यासाठी रवाना झाले आणि त्यांची रवानगी मात्र झाली आलीपुराच्या कोठडीत! त्यांची कसलीही चौकशी न करता त्यांना कोठडीत डांबण्यात आले. इथे आलीपुरा हे नाव प्रतीक रूपाने वापरण्यात आले असले तरी म्हणीमुळे ते जनमानसात अमर झाले आहे.

तीच गोष्ट रिन्द नदी व फतेहचंद सेठची! एकदा शहाजहान बादशहा आग्र्याहून फतेहपूरला जात होते. वाटेत म्हणे रिन्द रिन्द नामक एक नदी लागायची. तर फतेहचंद सेठ नावाच्या व्यक्तीने बादशहाचा मार्ग सुकर व्हावा म्हणून त्या नदीवर पूल बांधायचे ठरविले. पूल तर बांधून झाला, मात्र मुसळधार पावसामुळे तो पूल कोसळला. त्यावेळी फतेहचंदने प्रतिज्ञा केली की काहीही होवो, पूल पुन्हा बांधायला लागला तरी चालेल, पण तो बांधेन तरच नावाचा फतेहचंद! आणि त्याने खरोखरी बादशहाच्या आगमनाअगोदर तो पूल पुनश्च बांधला. तेव्हापासून एक म्हण रूढ झाली, 'कै रिन्द रिन्द ही नहीं, कै फतेहचंद ही नहीं |' आणि आजही ही म्हण वापरण्यात येते.

समाजाची नैतिक जडणघडण, मानसिकता, स्थित्यंतरे, विचारधारा, आचार-व्यवहार या सर्वांचे प्रतिध्वनी आपल्याला म्हणींच्या रूपातून अभ्यासण्यास मिळतात. त्याचबरोबर त्यांची भाषा, शब्द, शैली हेही समाजाच्या वेगवेगळ्या पैलूंचे दर्शन देतात. म्हणी व त्यांमागील कथा हे एका प्रकारे कष्टकरी, श्रमिक जनतेने रचलेले साहित्य ग्रंथच होत. त्यांच्या रूपाने आपल्याला त्या त्या समाजाचे, व्यक्तींचे अनुभव संक्षिप्त रूपात ज्ञात होतात. हा त्यांच्या अनुभवांचा इतिहासच म्हणा ना! आणि त्या अनुभवाचे सौंदर्य वादातीत आहे.


--- अरुंधती कुलकर्णी

------------------------------------------------------------------------------------
ह्या लेखातील काही भाग येथे पूर्वप्रकाशित झाला आहे :
http://mfda2011.blogspot.com/2011/10/mhaninchya-rajyat.html

माहिती स्रोत : आंतरजाल व म्हणींचे अर्थ सांगणारी पुस्तिका.

Sunday, September 11, 2011

भारतीय लोकगीतांमधील गणेश


ॐ नमो जी आद्या। वेद प्रतिपाद्या। जय जय स्वसंवेद्या। आत्मरूपा ॥
मराठी मातीच्या आणि मराठी माणसाच्या मनात असलेले गणपती बाप्पाचे प्रेम, श्रद्धा, भक्ती खरी बहरून येते ती गणेशोत्सवाच्या काळात! जागोजागी गणेशभक्तांचे मेळे, मंडपांत विराजमान गणपती बाप्पा मोरयाच्या आगमनार्थ रचलेले सोहाळे, रोषणाई - सजावटी - मंगल आरत्या, पठणांसह घरांघरांतून उत्साह, मांगल्य व आनंदाला आलेले उधाण... खास महाराष्ट्रात प्रचंड मोठ्या प्रमाणात साजरा होणारा असा हा उत्सव! ढोल, ताशे, झांजांच्या गजरात वाजत-गाजत येणार्‍या गणरायांच्या आगमनाची प्रत्येक घरातून सारे वर्ष आतुरतेने वाट पाहिली जाते.

गणरायांचे सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यातील स्थान फक्त ह्या उत्सवापुरतेच मर्यादित नाही. विघ्नविनाशक, भक्तांचा कैवारी, दुष्ट शक्तींचा विनाश करणारा, विद्या - समृद्धी - ज्ञानाचे शुभ प्रतीक म्हणून पूजिला जाणारा गणपती बाप्पा समाजातील सर्व स्तरांमध्ये तितक्याच श्रद्धाभावाने आराधिला जातो. जणू ह्याच गोष्टीची साक्ष पिढ्यानुपिढ्या चालत आलेली, नवीन भर पडून आणखी समृद्ध झालेली लोकगीते देत असतात.
महाराष्ट्रात जसे घरी, दारी, व्यापारी, पूजा-हवन प्रसंगी किंवा कोणत्याही शुभ कार्याच्या आरंभी गणेशाची आराधना करून त्याला विघ्न दूर करण्यासाठी साकडे घातले जाते तसेच भारताच्या विविध प्रांतांतही गणपतीची तितक्याच प्रेमाने, आर्जवाने आळवणी केलेली दिसून येते.
गणरायाला संकल्प सिद्धीस नेणारा, अडथळे दूर करणारा, उदार, कनवाळू, दयार्द्रव, सकळ कलांचा व विद्यांचा अधिष्ठाता मानले गेले तरी प्रथमतः तो लोकनायक आहे, गणनायक आहे हे विसरून चालणार नाही. आपल्याकडे लोककलेत गणपतीचे स्थान मानाचे आहे. 'पयलं नमन हो करितो वंदन....गणपती आला नाचून गेला' अशा नमनाने पारंपरिक लोककला सादर केली जाते. 'आधी गणाला रणी आणिला', 'महाराज गौरीनंदना अमर वंदना' अशा जोषपूर्ण गीतांनी शाहीर सर्वात अगोदर गणेशाचे आवाहन व वंदन करतात. कधी त्यात 'गण वाकड्या सोंडेचा, गण हत्तीच्या पिंडाचा... शुभ मंगल चरणी गण नाचला' असे वर्णनही आढळते. नांदी, गण गौळणींतून तसेच पोवाडे, आरत्यांमधून बाप्पाचे स्तवन होत असते.
तुम्ही गवरीच्या नंदना
विघ्न कंदना
या नाचत रंगणी जी जी....
घरादारांतूनही गणपतीच्या स्तवनाची, त्याच्या आळवणीची कवने प्रसंगानुसार रचली जात असतात. घरात शुभकार्य काढले की पहिला मान गणपतीचा. आणि लग्नविवाहा सारख्या प्रसंगात तर ठायी ठायी बाप्पाला नमन, त्याची आठवण काढलेली आढळून येते. त्याला घरातील ज्येष्ठाचा मान असतो आणि त्याच्यावर प्रेम मात्र घरातील लहान मुलावर करतात तसं भरभरून केलेलं आढळतं.
सहसा असे दिसून येते की समाजात स्त्रिया आपल्या लोकगीतांचा मोठा ठेवा जपतात, पुढे नेतात, अनेक पिढ्या जतन करतात, त्यांत भर घालतात. अनेक प्रचलित लोकगीते नीट काळजीपूर्वक अभ्यासली तर त्यांच्या रचयित्या ह्या स्त्रिया असाव्यात असा कयास बांधता येतो. मात्र त्यास कोणता ठोस आधार नाही. परंतु लोकगीतांतून आलेले दाखले, उदाहरणे पाहू जाता ती स्त्रियांनी रचली असावीत असे म्हणण्यास पुष्कळ वाव आहे. त्यातील सूक्ष्म विनोदही वाखाणण्यासारखा आहे. मग त्यातून बाप्पाही सुटत नाहीत.
लग्ना अगोदर घाणा भरताना घरातील आयाबाया गणपती बाप्पाची आठवण अशी काढतात.
घाणा भरीला । सवाखंडी सुपारी
मांडवी व्यापारी । गणराज
घाणा भरीला । सवा खंडी गहू
नवर्‍या मुलीला गोत बहू । गणराज
घाणा भरीला । सवा खंडी भाताचा
नवरा मुलगा गोताचा । गणराज
मांडवाच्या दारी । उभा गणपती
नवर्‍या मुलाला गोत किती । गणराया
मांडवाच्या दारी हळदीचे वाळवण
नवर्‍या मुलाला केळवण । गणरायाला
मांडवाच्या दारी । रोविल्या गं मेढी
मूळ गं वर्‍हाडी । अंबाबाई
मांडवाच्या दारी । कोण उभ्यानं घास घेतो
चहूकडे चित्त देतो । गणराज
मांडवाच्या दारी । इथं तिथं रोवा
लोडाला जागा ठेवा । माणसांच्या
घाणा भरीला । सवा खंडी कणीक
मांडवी माणिक । अंबाबाई
आणि आयाबाया जमल्या की 'फू बाई फू' करत फुगडीचा खेळही झिम्माड रंगतो. त्यातही गणपती बाप्पा हळूच डोकावतो. फुगडीच्या गाण्यात एक ललना दुसरीला म्हणते,
गणपतीच्या मागे उंदराची पिल्लं
सगुणा म्हणते तींच माझी मुलं....
या ओळी म्हटल्यानंतर नक्कीच ललना-समूहांत हशा उसळत असणार! नेमक्या ठिकाणी सौम्य विनोद करत हलक्या-फुलक्या वातावरणाला आणखी रंगत आणताना तिथेही बाप्पा आठवतो.
भोंडल्याची सुरुवात गणेशाचे वंदन करून होते -
ऐलमा पैलमा गणेश देवा
माझा खेळ मांडूदे, करीन तुझी सेवा
माझा खेळ मांडीला वेशीच्या दारी
पारवे घुमती बुरजावरी
गुंजावाणी डोळ्यांच्या सारविल्या टिका
आमच्या गावच्या भुलोजी बायका....
किंवा
आधी नमूया श्री गणराया
मंगलमूर्ती विघ्न हराया
मंगलमूर्ती उंदरावरी
सत्ता त्याची इंद्रावरी
इंद्र हा स्वर्गीचा राजा (चाल बदल)
झुलती हत्तीच्या फौजा
वरुण चाकर इंद्राचा
पाऊस पाडील हस्ताचा
पड पड पावसा थेंबोथेंबी
थेंबोथेंबीच्या हळव्या लोंबी
हळव्या लोंबी आणूया, तांदूळ त्याचे कांडूया
मोदक-लाडू बनवूया
गणरायाला अर्पूया....
स्त्रियांच्या विश्वात सहज सापडणार्‍या उदाहरणांनी सजलेल्या या गाण्यांमधून बाप्पाचे केलेले नमन व त्या आडच्या समृद्ध आशय व भावना हा लोकगीताचा प्रमुख ठेवा आहे.
भारतातील विविध प्रांतांमध्येही गणपती बाप्पाची अशाच तर्‍हेने विविध प्रसंगी सकल मनोरथ संपन्न होण्यासाठी, रोग-इडा-पीडा-दुष्काळ-आपत्ती निवारणासाठी, विद्या-संपत्ती-समृद्धी फलप्राप्तीसाठी, कार्य तडीस नेण्यासाठी आराधना होत असते. त्याचा शुभकार्यात पहिला मान असतो. बह्माणी, महेश्वरी, कौमारी, वैष्णवी, इंद्राणी, वाराही व चामुंडा या सप्तमातृकांसमवेत व कुबेर भैरवासमवेत विराजमान गणपतीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करून कार्यसिध्दीनंतर त्यांचे विसर्जन करण्याची परंपरा भारताच्या अनेकविध प्रांतांमध्ये दिसून येते. ह्या मातृका व भैरव गणेशाला विघ्नरूपी असुरांचे निर्दालन करण्यासाठी शक्ती प्रदान करतात असा समज आहे. त्यामुळे विवाहादि प्रसंगांत त्यांचे महत्त्व गणपतीच्या जोडीने अनन्यसाधारण दिसून येते.
राजस्थानात रणथंभौर जवळील सवाई माधोपूर येथील विघ्नविनाशक गणेश हा 'रणतभँवर देव' नावाने विशेष प्रसिद्ध आहे. येथील लोकगीतांमध्ये अनेक ठिकाणी ह्या देवाचा उल्लेख आढळून येतो. विवाहकार्याच्या अगोदर तयारीसाठी गणेशाला ज्योतिषी, सोनार, कासार, कोष्टी, हलवाई इत्यादींच्या बाजारपेठेत चलण्याची प्रार्थना केली जाते, जेणे करून लग्नाची सारी खरेदी निर्विघ्न पार पडावी! त्या गीतांत म्हटले जाते,
'रणतभँवर देवा आप पधारो, रिधि सिधि चँवर डुलावणा।'
ह्या प्रांतांतील गणपतीचे स्तवन, नमन, आवाहन करणारी ही गीते विनायक-गीते म्हणून प्रसिद्ध आहेत.
गंमत म्हणजे, येथेही गणपतीच्या गोलमटोल पोटाची, वाकड्या सोंडेची, एकाच दाताची, लाडूंवरच्या प्रेमाची किंवा सुपाएवढ्या कानांची काहीशी मजेशीर वर्णने आढळून येतात. आता हेच गाणे बघा ना!
अर्जी दरबार में, करता सरकार में |
श्री गणेश, काटो कलेश, नित्य हमेश, ध्यावां थाने ||
अर्जी करा दरबार में, मनावा थाने, विनती करा दरबार में ||
सूंड सुन्डाला, दुंद दुन्दाला | मोटा मुंड, लांबी सूंड, फड़के तुंद, ध्यावां थाने ||
अर्जी करा दरबार में_________
पुष्पं माला, नयन विशाला | चढ़े सिन्दूर, बरसे नूर, दुश्मन दूर, ध्यावां थाने ||
अर्जी करा दरबार में_________
रिद्ध - सिद्ध नारी, लागे पियारी |
रिद्ध - सिद्ध नार, भरो भंडार, करो उद्धार, ध्यावां थाने ||
अर्जी करा दरबार में_________
दास "मोतीसिंह ", थारा गुण गावे |
गुरु चरणा में शीश नवावे |
माँगू दान, द्यो वरदान, दयानिधान, ध्यावां थाने ||
अर्जी करा दरबार में_________
तर काही विनायक-गीतांमध्ये गजाननाची आर्त आळवणी केलेली आढळते. 'हे गजानना, तू सत्वर ये. तुझे सारे प्रिय तुझ्या चरणांवर अर्पण केले आहे, सारे भक्तगण तुझी आतुरतेने वाट बघत आहेत, तुझे स्तवन करत आहेत. देवा गजानना, आता आणखी वाट बघायला लावू नकोस. रिध्दी - सिध्दीला संगतीला घेऊन तू लवकर ये.'
गजानन्द सरकार पधारो,कीर्तन की सब तैयारी है,
आओ आओ,बेगा आओ,चाव दरश को बारी है ॥
थे आवो जद काम बणेला,थां पर सारी बाजी है,
रणत भंवरगढ वाला सुनल्यो,चिन्ता म्हारी लागी है,
देर करो मत,ना तरसाओ,चरण अर्जी हमारी है॥
गजानन्द सरकार पधारो ॥१॥
रिद्धि सिद्धी संग ले आओ विनायक,दयो दर्शन थारे भंक्तां ने।
भोग लगावा,धोक लगावां पुष्प चढावा चरणां में
गजानन्द थारे हाथां में,अब तो लाज हमारी है।
गजानन्द सरकार पधारो ॥२॥
भक्तां की तो विनी सुणली,शिव सुत प्यारो आयो है,
जय-जयकार करो गणपती की आकर मन हरषायो है।
बरसैलो रस अब भजनां में,’महेन्द्र’ महिमा न्यारी है।
गजानन्द सरकार पधारो ॥
कोणी भक्त विनायकाकडे आपल्या ठप्प पडलेल्या कामाबद्दल, अडचणीबद्दल गार्‍हाणे मांडतो. अगोदर तो विनायकाची, 'गजानन्दा'ची स्तुती करतो, आणि मग हलकेच आपली पीडाही सांगतो,
म्हारा प्यारा गजानन्द आईयो,
रिद्धि-सिद्धी ने संग लाइयो जी । । म्हारा प्यारा...
थाने सब से पहलां मनावां,
लडुवल को भोग लगावां,
थे मूंसे चढकर आइयो जी । । म्हारा प्यारा...
माँ पार्वती का प्यारा,
शिव शकंर का लाल दुलारा,
थे बाँध पागडी आइयो जी । । म्हारा प्यारा...
थे रिद्धि-सिद्धि का दातारि,
थानै ध्यावै दुनिया सारी,
म्यारा अटक्या काज बणईयो जी । । म्हारा प्यारा...
थारा सगला भगत यश गावै,
थारे चरणां शीश नवावै,
म्हारी नैया पार लगाइयों जी । । म्हारा प्यारा...
येथील गणपती हा 'पगडी' बांधणारा, राजस्थानी थाटाचा गणपती आहे बरं का!
गणपतीची स्तुती करताना येथील समाजाप्रमाणेच त्या स्तुतीतील अगत्य, प्रेम, दिलदारपणा खास असतो. गणपती बाप्पा तर इतका जवळचा, इतका आपला, प्रिय की त्याची स्तुती करताना घरच्या एखाद्या जवळच्या माणसाप्रमाणे त्याची किंचित थट्टाही केली जाते,
चिंता हरो चिन्तामन गणेश थां बिन घड़ी ना सरे
तमारा शीस मोटा रे गणेश, सवा मन सिन्दूर चढ़े ।
तमारा कान मोटा रे गणेश, पीपल पान झूके ।
तमारी आखँ मोटी रे गणेश, झबरक दिवलो बले ।
तमारी सून्ड मोटी रे गणेश, बासक नाग बनी ।
तमारा दाँत मोटा रे गणेश, सगागन चूड़लो पेरे ।
तमारा हाथ मोटा रे गणेश, चम्पारी डाल झूकी ।
तमारी पीठ मोटी रे गणेश, अम्बा बाड़ी पर चँवर डूले ।
तमारा पाँव मोटा रे गणेश, देवल खम्ब बने ।
तमतो रूग रूग चालो रे गणेश ककुंरा पगलिया बने ।
तमतो गद गद हँसो रे गणेश, पेपरा झूल झूरे ।
आणि आता हे माळवा प्रांतातील विवाहांमध्ये गायले जाणारे गीत देखील बघा ना! किती चिडवलंय गणपती बाप्पाला, पण अतिशय निरागसपणे! आणि सरतेशेवटी प्रत्येक कडव्यात आवाहन करून त्याची प्रार्थनाही केली आहे!!
म्हारा घर रुकमनी जी रो ब्याव, गजानन आवे काज सरेगा
म्हारा घर रुकमनी जी रो ब्याव, गजानन आवे काज सरेगा |
शीश तमारो देवा , मोटेरो कहिये
तेल सिन्दूर चडेगा, गजानन आवे काज सरेगा |
आंख तमारी देवा, छोटेरी कहिये
झबलक दिव्लो बलेगा, गजानन आवे काज सरेगा |
सोंड तमारी देवा , मोटेरी कहिये
वासुगनाग रमेगा,गजानन आवे काज सरेगा |
दांत तमारा देवा,मोटेरा कहिये
सुवागन चुडलो पेरेगा,गजानन आवे काज सरेगा |
दोंद तमारी देवा, मोटेरी कहिये
सवा मन मोदक चडेगा,गजानन आवे काज सरेगा |
पांय तमारा देवा,मोटेरा कहिये
केलारा खंब नमेगा,गजानन आवे काज सरेगा |
मारवाडातील विवाह-गीतांमधील गणपतीचे स्तवन हे काहीसे अशा गीतांमधून केले जाते :
गढ़ रणक भवंर सु आवो विनायक करो रे अणचीती वीरदडी
यां थे तो फीरता तो गीरता नगर ढण्डोल्यो
साटे ने बाबो साघर कीसो येतो फीरता तो
गीरता नगर ढण्ढोल्यो साने काकोसांरोघर
कीसो ये तो ऊंची जी मेडी ने बारे बीजूडा
केव झबल के वारे बारणे ये तो पेलो जी वासो
शीवाजी बसीयो शीवा में भर्‍या रे दीवाल्या एक
दूजो जी वासो सरवर बसोयो सरवल भरीयो ठंडा
नीर सू पाणी तणी पीणी हारण बोलो बोली ओ
शब्द सवासणा एक दुगणीयो जी वासो बागा
जी बसोयो बागा में वन फल छाबियाँ एक आवे
सुगन्धी वासो दीनायक चम्पो चम्पेली मखो
मोगरो एक चोथो जी वासो चोबटे जी बसीयो
चोबटा में भरीया रे चोरासियाँ एक काका ने
बाई भई रे भतीजा अवल लाडलडा मामोसा
एक पांचमो जी बासो तोरण बसीयो तोरण
छाई कडी चीडकली एक अदन बदन दोय
चीडकली बोली बोली ओ शब्द सुवासणा
वाळवंटांत पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व किती असते हे सर्वज्ञात आहे. जीवापेक्षा अनमोल असे हे पाणी, आणि त्या पाण्यापेक्षाही पवित्र असे ते गंगाजल. गणपती बाप्पाचे स्वागत, आदरातिथ्य करताना ह्या लोकगीताचा रचनाकार त्याला आचमन करण्यास गंगाजल देतो.... बुंदेली लोकगीतातील ही फाग गणेश वंदना....
अरे हाँ देवा सेवा तुम्हारी ना जानों-
गन्नेसा गरीब निवाज
अरे हाँ काहे के गनपति करो,
कहाँ देऊं पौढ़ाय-
अरे हाँ गोवर के गनपति करों,
पटा देऊ पौढ़ाय-
अरे हाँ देवा काहे के भोजन करों,
कहो देऊ अचवाय
अरे हाँ देवा दूध-भात भोजन करो,
गंगाजल अचवाय
गणपती बाप्पा, आम्ही इतके घोर अज्ञानी आणि गरीब आहोत की आमच्याकडून तुमचे काय आदरातिथ्य होणार? कशापासून गणपती बनवणार? त्यांची स्थापना कोठे करणार?
तर गोमयापासून, शेणापासून गणेशाची मूर्ती बनवून आम्ही तिची एका आसनावर स्थापना करू.
गणपती बाप्पाला काय नैवेद्य दाखवणार? त्यांना काय प्यायला देणार? तर गणेशजींना आम्ही दूध-भाताचा नैवेद्य दाखवू आणि आचमनासाठी गंगाजल देऊ.
गणपतीला प्रिय असलेल्या दूर्वेचे मनोगत एका भोजपुरी लोकगीतात व्यक्त होते : कधी आम्हाला पायदळी तुडवता, कधी आमच्यावर खुरपे, कुदळी चालवता, कधी आम्हाला पेटवता, कधी गणेशजींच्या कपाळी चढवता, कधी नव्या वधू-वरांचे स्वागत करताना आमचा मान असतो, भाद्रपदाच्या शुक्लाष्टमीला सवाष्णींनी आमची पूजा केल्यावर आम्ही त्यांना आशीर्वाद देतो... (दुबिया = दूर्वा)
दुबिया कहे हम जमबे करब
ओहो दुबिया कहे हम जमबे करब
कबो लातो तर परब कबो जूतों तर परब
सिरि गणेश जी के सर पर हम चढ्बो करब
दुबिया कहे ............................
कतो खुरपी चले कतो कुदाली चले
दुई धार के हसुआ से हम कट्बो करब
दुई यौवन के पेटवा हम भर्बो करब
दुबिया कहे ........................
नवकि दुल्हनिया के खोइचा हम भरबे करब
हर सुहागिन के आसीस हम देबे करब
दुबिया कहे हम .................
निमाडी लोकगीतांत विवाहाच्या वेळी गणपतीला विविध स्थानी प्रस्थान करून सर्व विघ्ने दूर करण्यास व कार्य सिद्धीस नेण्यास असे विनविले जाते :
गढ़ हो गुंडी उप्पर नौबत वाज
नौब्त वाज इंदर गढ़ गाज
तो झीनी झीनी झांझर वाज हो गजानन |
जंव हो गजानन जोसी घर जाजो ,
तों अच्छा अच्छा लगीं निकालो हो गजानन | गढ़ हो .....
जंव हो गजानन बजाजी घर जाजो ,
तों अच्छा अच्छा कपडा ईसावो हो गजानन |
जंव हो गजानन सोनी घर जाजो ,
तों अच्छा अच्छा गयना ईसावो हो गजानन | गढ़ हो.....
जंव हो गजानन पटवा घर जाजो ,
तों अच्छा अच्छा मौड़ ईसावो हो गजानन | गढ़ हो......
जंव हो गजानन साजन घर जाजो ,
तों अच्छी अच्छी बंधीब्याहों हो गजानन |
गढ़ ही गुंडी उप्पर नौब्त वाज ,
नौब्त वाज इन्द्र गढ़ गाज ,
तों झीनी झीनी झांझर वाज हो गजानन |
वेगवेगळ्या सण-उत्सवांमध्येही गणेशाचे पूजन सर्वात प्रथम होत असते.
छत्तीसगढच्या लोकगीतांमध्ये होळीच्या वेळी होलिका पूजनाचे समयी राम-लक्ष्मण-हनुमानासमवेत गणपतीचे असे आवाहन केले जाते :
प्रथम चरन गणपति को, प्रथम चरन गणपति को
गणपति को मनाव , गणपति को मनाव,
प्रथम चरन गणपति को ।
काकर पुत्र गणपति भयो, काकर हनुमान, काकर हनुमान
काकर पुत्र भैरो, भैरो, भैरो, भैरो ।
काकर लक्षमण-राम, काकर लक्षमण-राम ,
प्रथम चरन गणपति को
गणपति को मनाव , गणपति को मनाव,
प्रथम चरन गणपति को ।
होली है ........
गौरी के पुत्र गणपति भयो, अंजनी के हनुमान, अंजनी के हनुमान
कालका के पुत्र भैरो, भैरो, भैरो, भैरो ।
कौशिल्या के राम, कौशिल्या के राम ,
प्रथम चरन गणपति को
गणपति को मनाव , गणपति को मनाव,
प्रथम चरन गणपति को ।
होली है ........
भारताच्या पर्वतीय प्रांतांमधील चाली-रीती ह्या अनेकदा रूढ चाली-रीतींपेक्षा वेगळ्या असतात, त्यांच्या देवी-देवताही वेगळ्या असतात. पण तिथेही गणेशजींना अग्रपूजेचा मान मिळतो. आता कुमाऊं प्रांतातील विवाहाचे हे निमंत्रणच पहा ना!
ब्रम्हा विष्णु न्युतुं मैं काज सुं, गणपति न्युतुं मैं काज सुं
ब्राह्मण न्युतुं मैं काज सुं ,जोशिया न्युतुं मैं काज सुं , ब्रह्मा न्युतुं मैं काज सुं,
विष्णु श्रृष्टि रचाय, गणपति सिद्धि ले आय,
ब्राह्मण वेद पढाए, जोशिया लगन ले आय ,
कामिनी दियो जलाय, सुहागिनी मंगल गाय ,
मालिनी फूल ले आय, जुरिया दूबो ले आय,
शिम्पिया चोया ले आय I
दिन दिन होवेंगे काज सब दिन दिन होवेंगे काज,
समायो बधाये न्युतिये, आज बधाये न्युतिये I
नववधूला शंख - घंटांच्या नादात, कलशाची पूजा करून दिलेल्या काव्यमय आशीर्वादाच्या ह्या कुमाऊं प्रांतातील लोकगीतात गणेशजी असे प्रकटतात :
शकूनादे शकूनादे काजये,
आती नीका शकूना बोल्यां देईना ,
बाजन शंख शब्द ,
देणी तीर भरियो कलश,
यातिनिका, सोरंगीलो,
पाटल आन्च्ली कमले को फूल सोही फूल मोलावंत गणेश,
रामिचंद्र लछीमन जीवा जनम आद्या अमरो होय,
सोही पाटो पैरी रैना ,
सिद्धि बुद्धि सीता देही
बहुरानी आई वान्ती पुत्र वान्ती होय
या सर्व गीतांमधील भाषा, तिची शैली, आलेली उदाहरणे, व्यक्त केलेल्या भावना ह्या अतिशय खुबीदार आहेत. त्या जनमानसाचे प्रतिनिधित्व करतात असे म्हटले तर ते धार्ष्ट्याचे ठरू नये. भाषा, शैली, प्रांत, माणसे बदलली तरी भारताच्या वेगवेगळ्या प्रांतांमधील ही लोकगीते व त्यांचा आशय यांतून सर्वसामान्य माणसांच्या मनात असलेले गणपती बाप्पाचे अढळ स्थान प्रकट होते. गाण्यातील शब्द, त्यांची सोपी चाल, सहज ठेके, गेयता ही लोकगीतांची खासियत असते. गणपती बाप्पाचे स्तवन करणार्‍या लोकगीतांमधून त्याचे ठायी असणारी अतीव श्रद्धा, प्रेम व भोळा भाव व्यक्त होतात. भौगोलिक स्थानानुसार ठिकठिकाणी गणपतीचे रूप काहीसे बदलते, वेषभूषा बदलते, वाहन-आयुध-प्रिय गोष्टीही बदलू शकतात, त्याची उगम गाथा बदलते, त्याचे संबंध स्थानिक देवी-देवतांशी जुळविले जातात, पण त्याचे मंगलदायी, अतिसुखदायी, भाग्यविधाता, दु:खहर्ता, सुखकर्त्याचे स्थान काही बदलत नाही.
त्याचबरोबर हे देखील जाणवते की लोकगीतांचा आशय एक वेळ रांगडा असेल, पण त्यातून प्रकट होणारी भावना मात्र सच्ची असते. संपन्न असते. या भावनेच्या समृद्ध अवकाशात अनेक पिढ्या सरतात, नव्या रचना घडतात, जुन्या रचना जतन करून पुढच्या पिढीकडे सोपविल्या जातात. काळाचे चक्र चालू राहते. गणपती बाप्पा अशा तर्‍हेने जनमानसांत चेतनामयी होऊन राहतो. एक जिवंत श्रद्धास्थान बनतो.
|| जय मंगलमूर्ती || जय श्री गणेश ||
- अरुंधती 
** मायबोली गणेशोत्सव २०११ उपक्रमात समाविष्ट लेख.