Showing posts with label अनुभव. Show all posts
Showing posts with label अनुभव. Show all posts

Sunday, October 20, 2013

संहिता - मनात दडलेली!

प्रत्येकाच्या मनात एक संहिता दडलेली असते. आपल्या आयुष्याची संहिता, आपले विचार, अनुभव आणि आपल्या दृष्टिकोनांची संहिता. खरं तर एकच काय ते आयुष्य! पण वेगवेगळ्या चष्म्यांमधून पाहिले तर त्याचे विविध कंगोरे, चढ-उतार, मर्यादा आणि परिसीमा नव्याने जाणवतात, दिसतात, दिसू शकतात. ही जाणीवच मुळात साक्षात्कारी आहे. आणि अशा जाणिवांची लड उलगडताना दरवेळी त्याच त्या परिघांमध्ये फिरणारे कथानक आपल्या सीमा ओलांडून त्यात वेगवेगळ्या वर्तुळांना जसजसे समाविष्ट करत जाते तसतशी त्यातून येणारी अनुभूतीही बदलत जाते. ही अनुभूती म्हणजे संहिता. 



मायबोली.कॉमच्या माध्यमातून संहिता चित्रपटाच्या प्रीमियरला उपस्थित राहता येणे हा माझ्यासाठी खरोखरी एक सुखद व अविस्मरणीय अनुभव होता. संहिता चित्रपटाची पोस्टर्स पाहिल्यापासून ह्या चित्रपटाबद्दल मनात अतीव उत्सुकता तर होतीच, शिवाय सुमित्रा भावे व सुनील सुकथनकर यांची जोडी असल्यामुळे उत्तम कथानक, उत्कृष्ट दिग्दर्शन, नेत्रसुखद चित्रांकन आणि दर्जेदार अभिनय पुन्हा एकदा ह्या चित्रपटाच्या माध्यमातून अनुभवायला मिळणार याचीही खात्री होती. इतक्या सुंदर अनुभवाची संधी प्राप्त करून दिल्याबद्दल मायबोली व माध्यम प्रायोजकांचे खास खास आभार! :)

पुण्यात प्रीमियरच्या ठिकाणी सिटीप्राईड कोथरूड येथे गुरुवारी सायंकाळी मी पोचले तेव्हा मिलिंद सोमण, देविका दप्तरदार, सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर तिथे अगोदरच आलेले दिसले. नंतर मोहन आगाशे, दीपा श्रीराम, अमोल पालेकर, चंद्रकांत काळे, शेखर कुलकर्णी हेही दिसले. मायबोलीचा लोगो असलेले मोठे बॅनर प्रवेशाच्या जवळच पाहायला मिळाल्यावर छान वाटले. मायबोलीचा लोगो चांगला ठसठशीत उठून दिसत होता. (नंतर स्क्रीनवरही माबोचा लोगो जेव्हा झळकला तेव्हा असाच आनंद झाला!) आपल्या मायबोलीकरांचीही ह्या खेळाला मोठ्या संख्येने उपस्थिती होती. :)

सर्वात अगोदर झाले ते मायबोलीकरांचे कलावंतांबरोबरचे फोटोसेशन! हर्पेनच्या कॅमेर्‍याचा चांगलाच क्लिकक्लिकाट झाला! :) चित्रपटाच्या टीमबरोबर वेगवेगळे व ग्रुप फोटोज काढण्यात आले. देविका व मिलिंद सोमण यांच्याबरोबरही मायबोलीकरांनी भरपूर फोटो काढले. दोघेही अगदी सहजपणे फोटोंसाठी पोझ देत होते. मजा आली. 'से चीज' म्हणत हसताना गाल दुखले! 

आरती ताई अंकलीकरांनी या चित्रपटात आपल्या आर्त, मधुर गाण्याने जान ओतली आहे. संपूर्ण चित्रपटात त्यांनी गायलेल्या सुरांनी जे उत्कट भावविश्व उभे केले आहे त्याला तोड नाही! प्रीमियरच्या निमित्ताने आरतीताईंशीही छान भेट झाली.

सुरुवातीस सुनील सुकथनकर यांच्यासोबत निर्मात्या टीमने सर्व कलाकार, दिग्दर्शक, निर्माते, तंत्रज्ञ, संपूर्ण टीम व चित्रपटास हातभार लावणार्‍या अनेक हितचिंतकांचे आभार मानले आणि 'संहिते' च्या खेळाचा प्रारंभ झाला. मुंबईच्या आलिशान वातावरणातील एका रंगात आलेल्या पार्टीच्या पहिल्याच सीनपासून संहितेने जे मन काबीज केले ते चित्रपट संपला तरी त्यातली प्रत्येक फ्रेम आणि फ्रेम मनात तरळत राहिली. आधुनिक मुंबईच्या वातावरणातून आणि अगदी आताच्या जमान्यातल्या रेवती-रणवीर-शिरीन-तारा-हेमांगिनी-दर्शन यांच्या ओझरत्या, वास्तवदर्शी कथेपासून ही कहाणी कधी संस्थानिकांच्या काळात पोचते, त्या कहाणीतली पात्रे कशी जिवंत होत जातात, त्यांचे कथानक कसे उलगडत जाते -- हा सारा प्रवास अतिशय लक्षवेधी आणि समरसून टाकणारा आहे. प्रेक्षक त्या कहाणीत कसा आणि कधी गुंतत जातो हे त्याचे त्यालाच कळत नाही! कथेतले प्रत्येक पात्र सुरेख उमटले आहे. कलावंतांच्या सौष्ठवपूर्ण अभिनयाची जोड आणि त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या भूमिकांची समर्थ हाताळणी, त्यातले बारकावे ह्या चित्रपटाला सर्वसाधारण प्रेमकथांपेक्षा वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात. संस्थानिकांच्या काळातील, त्यांच्या महालांमधील राजेशाही, खानदानी व कधी विलासी वातावरण, त्यांचा विहार, मानसिकता, स्वतंत्र होऊ घातलेल्या भारताच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या आयुष्यांत घडून (किंवा न घडून) येणारे बदल हे कथेच्या ओघात खूप सुरेख पद्धतीने व्यक्त होत जातात. कथेतील आधुनिक दांपत्याचा आपल्या आयुष्यातील ध्येय साध्य करतानाचा जो संघर्ष दाखवलाय तो अगदी सहज पटणारा आहे. आणि त्याच जोडीला संस्थानिक राजा, त्याची राणी आणि त्याची प्रेमिका यांच्यातील परस्पर-नाते कोठेही ओढून ताणून वाटत नाही, ना त्यांचे संघर्ष! त्यांचे विश्व जसजसे उलगडत जाते तसतसे हे संघर्ष व बंध अधिक गहिरे होत जातात. प्रत्येकजण आपापल्या भूमिकेशी प्रामाणिक आहे. आणि त्यांचे हे प्रामाणिकपण सर्वाधिक भावते. त्यात कोण बरोबर, कोण चूक, कोण उचित असे प्रश्नच येत नाहीत. आणि माझ्या मते कोणताही ग्रह न ठेवता, नॉन-जजमेंटल पद्धतीने ह्या सर्व माणसांची, त्यांच्या नात्याची आणि त्या नात्यातून विकसित झालेल्या प्रगल्भ अनुभवांची कथा सांगण्यात हा चित्रपट यशस्वी झाला आहे. 

राजेश्वरी सचदेव हेमांगिनी व भैरवीच्या भूमिकेत नजाकत आणते. एक यशस्वी अभिनेत्री, एक उदयोन्मुख - कसदार गायिका आणि समर्पित प्रेमिका या तिन्ही भूमिका ती सार्थपणे तोलते. मिलिंद सोमणने साकारलेला रांगडा रणवीर हा त्याने साकारलेल्या सत्यशील राजापेक्षा जास्त भावतो. राजा प्रेमात विकल आहे. आपल्या वर्तनाने इतर आयुष्यांमध्ये झालेल्या उलथापालथीची त्याला जाणीव आहे, पुरुषी अहंकार तर ठासून भरलेला आहे, पण त्याचबरोबर तो आपल्या भावना व कर्तव्य यांसमोर हतबलही आहे. तर रणवीरचे पात्र हे स्वतःच्या मर्यादांची जाणीव असून त्यापुढे जायचा प्रयत्न करणारे, मार्ग शोधणारे आहे. देविकाचा रेवतीच्या भूमिकेतील अभिनय अतिशय सहजपणे उतरला आहे. अगदी गर्ल नेक्स्ट डोअर वाटावे असे हे पात्र. आणि संस्थानिकांच्या पारंपरिक घरात स्वतंत्र विचारांचे पंख लावून कल्पनेच्या विश्वात विहरणारी, अपेक्षित असणार्‍या भूमिकेपेक्षा वेगळ्या तर्‍हेने आयुष्य जगू इच्छिणारी, राज्ञीपदाचा, बुद्धिमत्तेचा व स्वतःच्या आधुनिकतेचा तोरा बाळगणारी राणीही तिने प्रगल्भपणे साकारली आहे. उत्तरा बावकर, ज्योती सुभाष यांच्या अभिनयाबद्दल काय लिहिणार!! दुधात जशी साखर मिसळावी तितक्या सहजतेने सर्व चित्रपटभर त्यांचा वावर आहे! दोघी इतक्या सहज भावातून व परिपक्वतेने आपली पात्रे साकारतात... त्या अभिनय करत आहेत असे कोणत्याच अँगलमधून वाटत नाही! चित्रपटात सर्वच स्त्री पात्रांच्या भूमिका ह्या स्ट्राँग - सशक्त स्त्रियांच्या आहेत. आयुष्यात जाणीवपूर्वक केलेल्या तडजोडींची किंमत त्यांनी मोजली आहे. त्यांची बलस्थाने, आयुष्यातील शोध विभिन्न आहेत. आणि तरीही त्या एका अदृश्य धाग्याने बांधल्या गेल्या आहेत. कोणता धागा असेल हा?

संहिता चित्रपट हा दर्जेदार, कलापूर्ण मराठी चित्रपटांच्या यादीतील एक अग्रगण्य चित्रपट ठरेल ह्यात शंका नाही. राजा-राणी- दरबारी गायिका असणार्‍या प्रेमिकेच्या सर्वसाधारण प्रेमत्रिकोणात्मक कहाणीला कथेतील पात्रांच्या त्या कथेकडे बघण्याच्या दृष्टिकोनामुळे एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्याचे आणि त्या कथेची आजच्या काळाशी वैचारिक व अनुभवात्मक पातळीवर सांगड घालायचे कौशल्य ह्या चित्रपटाने साधले आहे. चित्रपटाच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांना मनोरंजनासोबत एक समृद्ध, सकस विचार मिळतो. तो विचार आपल्याला स्वतःच्या आयुष्यात डोकावून पाहायलाही प्रवृत्त करतो. आपल्या आयुष्याकडे नेहमीच्या साच्याबाहेर जाऊन बघताना जे काही मिळते तिथेच आपलीही एक संहिता आकाराला येत असते.  

महत्त्वाचे म्हणजे चित्रपटात मांडलेल्या कथानकाशी प्रेक्षक रिलेट करू शकतो. त्यातली आधुनिक काळातली पात्रे तर आपल्या आजूबाजूला वावरणारी वाटतात. त्यांच्या कथा त्यामुळे तितक्याच जिव्हाळ्याच्या वाटतात. सुनील सुकथनकरांनी रचलेली गीते, शैलेन्द्र बर्वेंची संगीतयोजना आणि आरतीताईंच्या गळ्यातून थेट मनात खोल आतवर कोठेतरी भिडणारे सूर... क्या कहना!

सर्वांनी आवर्जून हा चित्रपट स्वतः तर पाहावाच आणि आपल्यासोबत इतरांनाही इतका सुंदर अनुभव मोठ्या पडद्यावर पाहण्यास उद्युक्त करावे. चित्रपटातील संवाद व गाण्यांची इंग्रजी सबटायटल्स समर्पक आहेत. मला खास 'वाचत वाचत' हा चित्रपट पुन्हा एकदा बघायचा आहे! :)

Wednesday, September 19, 2012

ढोलताशा व ओलोडम!!


गणेश चतुर्थीच्या सुमुहूर्तावर एका नव्या क्षितिजाला स्पर्श करू जाता खूप आनंद होत आहे! संगीताच्या क्षेत्रातील हे नवे पाऊल माझ्यासाठी खूप मोलाचे आहे. जागतिक संगीत किंवा विश्वसंगीत असे ज्याचे वर्णन करता येईल अशा ''वर्ल्ड म्युझिक'' बद्दल माझे अनुभव, निरीक्षणे, माहिती, महती व या सर्वातून मिळणारा आनंद लेखणीतून व्यक्त करता यावा अशी त्या श्री गणेशाचे चरणी प्रार्थना!

इ.स. १९४६ मधील गणपतीची मिरवणूक


''वर्ल्ड म्युझिक'' म्हणजे नक्की काय? मुळात संगीतात अशी वर्गवारी कधीपासून निर्माण झाली? त्या अगोदर हे संगीत अस्तित्वात होते का?

तर वेगवेगळ्या संस्कृती, परंपरा, समाजातील लोकांच्या त्या त्या भागातील खास संगीताचे अस्तित्व हे शेकडो, हजारो वर्षांपासून होते व आहे. परंतु १९९० सालापर्यंत हे संगीत वेगवेगळ्या नावांनी व प्रकाराखाली लोकांना ऐकण्यासाठी बाजारात उपलब्ध होते. मग कधी ते 'आयलंड म्युझिक' च्या नावाने असायचे तर कधी 'लोक संगीत' नावाने! परंतु इ. स. १९६० मध्ये रॉबर्ट ब्राऊन यांनी कनेटिकट विद्यापीठात आफ्रिका व आशिया खंडातील अनेक गायक, वादक, संगीतज्ञ बोलावून त्यांच्या सादरीकरणाद्वारे वर्ल्ड म्युझिक कन्सर्ट मालिका सुरू केली व या विषयातील अंडरग्रॅज्युएट ते डॉक्टरेट अशा अभ्यासक्रमास प्रारंभ केला. पुढे १९९० च्या दशकात मार्केटिंगसाठी सोपे जावे या दृष्टिकोनातून प्रसारमाध्यमे व संगीत उद्योगांनी ''वर्ल्ड म्युझिक'' शब्दाला उचलून धरले व पाश्चात्त्य नसलेल्या संगीतासाठी ही श्रेणी वापरली जाऊ लागली. ग्रॅमी अ‍ॅवॉर्ड्स व बिलबोर्ड व यांच्यासारख्या जगभरातील अनेक माध्यमांनी ही श्रेणी लोकप्रिय करण्यात सिंहाचा वाटा उचलला. याद्वारे आतापर्यंत कधी न ऐकलेले, अनुभवलेले संगीत लोकांपुढे येऊ लागले. गायन वादनाच्या विविध पद्धती, वाद्ये, ताल, नाद यांची ओळख होऊ लागली. पाश्चात्त्य संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध कलावंतांसोबत जगाच्या कानाकोपर्‍यातील गायक, वादकांचा मेळ घालून त्यातून निर्माण होणारे मिश्र-संगीतही लोकांना आवडू लागले. यात प्रसार-माध्यमांचा वाटा तर मोठा होताच! शिवाय जसे रोज रोज पोळी-भाजी खाऊन कंटाळलेल्या जिभेला काही वेगळ्या चवीचे, चमचमीत खायला मिळाले की मन खुलते त्याप्रमाणे त्याच त्याच पठडीतील संगीत ऐकल्यावर वेगळ्या प्रकारच्या संगीताचा आनंद श्रवणेंद्रियांना सुखावू लागला. त्यातही पाश्चात्त्य संगीतातील काही ओळखीचे सूर, पद्धती व जगातील निरनिराळ्या संस्कृतींमधील अनोळखी सूर यांचा मिलाफ संगीत रसिकांच्या पसंतीस उतरला.

प्रत्येक संस्कृतीचे आपले काही विचार असतात, प्रतीके, श्रद्धा, परंपरा असतात. आणि त्या सर्वांचे प्रतिबिंब त्यांच्या संगीतातही उमटलेले दिसते. तसेच त्यांच्या आजूबाजूचा निसर्ग, निसर्गातील प्राणी-पक्षी-झाडे-वेली-नद्या-शिखरे यांमधून उमटणारे संगीत त्यांच्या गाण्यातून किंवा वादनातून व्यक्त करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यांची वाद्येही उपलब्ध असलेल्या सामग्रीतून, निसर्गातून व मानवी कल्पकतेतून निर्माण होतात. अगदी उदाहरणच द्यायचे झाले तर आफ्रिकेतील कॅमरूनच्या खोर्‍यातील बाका जमातीचे आदिवासी पपईच्या पोकळ देठांत फुंकर घालून व त्या आवाजाची आपल्या गाण्याशी सांगड घालून खास हिंदेव्हू प्रकारचे ध्वनी संगीत निर्माण करतात, जे हर्बी हॅनकॉक व मॅडोना यांसारख्या प्रसिद्ध गायकांनाही भुरळ घालते! अशी अनेक उदाहरणे आहेत. या अतिविशाल क्षेत्राची व माझी नुकतीच ओळख होत आहे. त्याबद्दल टीकाटिप्पणी करायची माझी नक्कीच पात्रता नाही. परंतु आवडलेल्या संगीताची इतरांशी ओळख करून द्यायचा माझा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. मला मिळालेला आनंद इतरांनाही मिळावा अशी इच्छा आहे. आणि या सार्‍या संगीतातून मिळणारा जो मानवतेचा, समानतेचा, शांतीचा, सौहार्दाचा व बंधुभावाचा जो विश्वव्यापक संदेश आहे तो लोकांपर्यंत पोहोचावा अशी मनोकामना! हे प्रयत्न गोड मानून घ्यावेत ही विनंती!

आजचे संगीत : ढोलताशा व ओलोडम!! 

गणेशाच्या स्वागतासाठी व निरोपासाठी आपल्याकडे ढोल-ताशाच्या पथकांची परंपरा आहे. अतिशय उत्साहवर्धक, मुग्ध करणार्‍या या नादगर्जनेत मोठ्या आनंदाने बाप्पांचे आपण स्वागत करतो. आणि तितक्याच कृतज्ञ भावनेने त्यांना निरोपही देतो. कानात घुमत राहतात ते ढोल, टिपर्‍या, झांजांचे गगनभेदी स्वर. त्या स्वरांचीही एक झिंग असते, एक मस्ती असते, एक नशा असते. त्या तालांवर पावले कधी थिरकू लागतात ते कळतही नाही. मनात फक्त तो आणि तोच नाद व्यापून उरतो. सर्व विचार, चिंता, विवंचना बाजूला पडतात. शरीराचा विसर पडतो. उरते ते फक्त नादब्रह्म!

या ढोलताशाच्या उन्मादाची एक झलक इथे पाहा व अनुभवा : http://www.youtube.com/watch?v=-N0RHeY3LY4 (ज्ञान प्रबोधिनीचे ढोल पथक)

किंवा



ब्राझील मधील साल्वाडोर येथे ओलोडम नावाचा एक सांस्कृतिक गट आहे. त्यांचे ड्रम्स वाजविणे, त्या तालांवरील नृत्य पाहिले की आपल्या गणेशोत्सवातील ढोल-पथकेच आठवतात! या ड्रमर्सच्या ड्रम्समधून उमटणारे नाद, त्यांचा आवेश, वाजवायची पद्धत यांत व आपल्या ढोलपथकांत कमालीचे साम्य दिसून येते! ह्या सांस्कृतिक गटाचा मुख्य उद्देश वंशभेदाचे निर्मूलन करण्यात हातभार आणि ब्राझीलच्या तरुणाईच्या सृजनशक्तीला, कलात्मकतेला वाव देणे हे आहे. ब्राझीलमध्ये राहणार्‍या मूळच्या आफ्रिकन वंशाच्या लोकांनी तेथील वंशभेदाचे दाहक चटके सोसले आहेत. अर्थातच त्या सर्वाचा त्यांच्या मानसिकतेवर, स्व-प्रतिमेवर परिणाम झाला आहे. या संगीताद्वारे त्यांना आपली स्व-प्रतिमा सशक्त करण्याची संधी मिळावी म्हणून नेगिलो सांबा या ड्रमरने १९७९ मध्ये या ग्रुपची स्थापना केली. या ग्रुपद्वारे ब्राझीलच्या लोकांना आपले नागरिकी हक्क व अधिकार मिळवण्यासाठी प्रेरणा देण्यात येते, त्यांच्या हक्कांच्या  लढ्यात ओलोडम ग्रुप त्यांची साथ देतो.



या ग्रुपच्या संगीत वादन शैलीला ''सांबा रेग्गे'' असे संबोधिले जाते. पारंपारिक ब्राझिलियन सांबा सोबत इतर संस्कृतींमधील साल्सा, रेग्गे, मेरांग प्रकारच्या तालांचा मेळ त्यांच्या वादनात दिसून येतो. या ग्रुपने पॉप गायक पॉल सायमन व मायकेल जॅक्सन यांचेबरोबर काम केले आहे. पॉल सायमन बरोबर http://www.paulsimon.com/us/music/rhythm-saintsर्‍हिदम ऑफ द सेन्ट्स या अल्बममध्ये तर मायकेल जॅक्सन बरोबर 'दे डोन्ट केअर अबाऊट अस' या गाण्यात त्यांच्या ग्रुपचे वादन आहे.


कार्निवलच्या काळात ओलोडम ग्रूप परेडमध्ये किंवा शोभायात्रेत भाग घेतो. त्यात त्यांचे साधारण दोनशेहून अधिक ड्रमर्स, गायक असतात आणि खास वेशभूषा केलेले हजारो लोक त्यात सहभाग घेतात. पण फक्त कार्निवलपुरतेच यांचे कार्य मर्यादित नाही. वर्षभर अनेक सेमिनार्स, भाषणे, परिसंवादांतून ओलोडमची हजेरी असते. अनेक सामाजिक व राजकीय प्रश्नांवर आधारित परिसंवादांत ते भाग घेतात. दर महिन्याला त्यांचे बंटू नागो नावाचे वार्तापत्रक प्रकाशित होते. त्यांची स्वतःची एक फॅक्टरीही आहे. तिथे ते ड्रम्स, खास वेशभूषेचे कपडे आणि इतर काही वस्तू बनवितात व लोकांना विकतात. ओलोडम तर्फे साल्वाडोरच्या मागास व उपेक्षित मुलांसाठी दाट वस्तीच्या अंतर्भागात शाळाही चालविली जाते. तिथे या मुलांना शालेय शिक्षणासोबत कलाप्रशिक्षण दिले जाते व त्यांची स्वप्रतिमा सशक्त होण्याकडे विशेष लक्ष दिले जाते. तरुणांच्या आर्थिक प्रगतीसाठीही ओलोडमतर्फे खास प्रयत्न केले जातात.  

या ग्रुपचा संस्थापक नेगिलो सांबा व मुख्य गायक - गीतलेखक जर्मानो मेनेघेल दोघेही आता जगात नाहीत. पण त्यांनी सुरू केलेली ही सांगीतिक चळवळ पुढेही चालूच राहील यात शंकाच नाही!

* माझी सहाध्यायी व ब्राझीलची नागरिक असलेल्या मिशेल ब्रूकचे तिने ओलोडमची ओळख करून दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार!

Friday, May 04, 2012

'हा भारत माझा' चित्रपट प्रीमियर वृत्तांत

काही चित्रपट आपल्या कथानकातून व मांडणीतून आपल्याला आपण स्वीकारलेल्या जीवनमूल्यांबाबत, परिस्थितीबाबत विचार करण्यास उद्युक्त करतात. मनोरंजनाबरोबरच जागृती आणण्याचे काम करतात व त्यात प्रेक्षकांनाही सामावून घेतात. 'हा भारत माझा' चित्रपटाच्या माध्यमातून हे सर्व साध्य होते का, हे पाहण्यासाठी हा चित्रपट अवश्य पाहावा व मुलांनाही दाखवावा. 






''हा भारत माझा'' चित्रपटाच्या मायबोलीकरांसाठी खास आयोजित केलेल्या खेळाला मला काही कारणाने जायला जमले नव्हते, पण चित्रपट बघायची इच्छा मात्र होती. काल सायंकाळी ३ मे रोजी ती इच्छा पूर्ण झाली. चित्रपटाच्या प्रीमियरला मायबोली तर्फे जायला मिळते आहे याचाही आनंद मनात होताच! तिथे पोचल्यावर अगोदर अरभाटाला फोन लावला. अन्य कोण मायबोलीकर खेळाला उपस्थित राहणार आहेत त्याची कल्पना नव्हती. त्यामुळे मी आजूबाजूला उभ्या बर्‍याच लोकांकडे बघत 'हा कोणता आयडी असेल?' असा विचार करत अल्पसा टाईमपास केला. थोड्याच वेळात अरभाटाला भेटून व प्रवेशिका हाती घेऊन मी अन्य काही प्रेक्षकांसमवेत स्क्रीन क्रमांक ४ कडे कूच केले.


दारातच एका गोबर्‍या गालाच्या छोट्या मुलाने आमचे एक सुंदर बुकमार्क देऊन स्वागत केले. नंतर कळले की तो चित्रपट अभिनेत्री रेणुका दफ़्तरदार यांचा सुपुत्र होता. त्या बुकमार्कवर एका बाजूला कबीराचा चित्रपटात झळकलेला दोहा व दुसर्‍या बाजूला 'हा भारत माझा' चित्रपटाच्या कलावंत, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आदी मंडळींचे नामनिर्देश होते. कबीराचा तो दोहा वाचताच मन प्रसन्न झाले.


प्रेक्षक व निमंत्रितांमध्ये काही चंदेरी पडद्यावरचे ओळखीचे चेहरे तर काही सामाजिक क्षेत्रांतील मान्यवर मंडळींचे चेहरे दिसत होते. लवकरच चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांनी कार्यक्रमास सुरुवात केली. ह्या 'झीरो बजेट' चित्रपटाची कल्पना अण्णा हजारेंच्या देशव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कशी स्फुरली, काय निमित्त झाले, मान्यवर कलाकारांनी - तंत्रज्ञांनी कशा तारखा दिल्या, मदतीचे पुढे झालेले हात, नंतरची जुळवाजुळव यांबद्दल सांगितले. चित्रपटाच्या दिग्दर्शिका, कथालेखिका, पटकथाकार व संवादलेखिका सुमित्राताई भावे यांसह चित्रपटातील सर्व उपस्थित कलाकार, तंत्रज्ञ तसेच किर्लोस्कर कंपनीचे प्रतिनिधी यांना स्टेजवर बोलावून त्यांची ओळख करून देण्यात आली व त्यांचे खस अत्तराची भेट देऊन स्वागत केले गेले. कलाकारांपैकी उत्तरा बावकर, रेणुका दफ्तरदार, जितेंद्र जोशी, आलोक राजवाडे, मदन देवधर यांसह चित्रपटात इतर छोट्यामोठ्या भूमिका केलेली मंडळीही आवर्जून उपस्थित होती. मायबोली.कॉमचा व मायबोलीतर्फे केल्या गेलेल्या मदतीचाही विशेष उल्लेख सुनील सुकथनकरांनी आवर्जून केला.


सुरुवातीलाच राष्ट्रगीताची धून व त्या जोडीला भारताच्या सीमाप्रांतातील लष्करी ध्वजवंदनाच्या चित्रणाने मनात देशाबद्दल व देशसैनिकांबद्दल जे काही उचंबळून आले त्याचे शब्दांमध्ये वर्णन करणे अशक्य आहे. नंतर कविता खरवंडीकरांनी गायलेला कबीराचा दोहा जणू पुढे उलगडत जाणार्‍या चित्रांची पूर्वकल्पनाच देतो. चित्रपटाची कथा येथे देत नाही. परंतु अगदी कोणत्याही मध्यम वर्गीय घरात घडू शकेल असे हे कथानक आहे. त्यात तरुण पिढी व जुन्या पिढीच्या समोरील व्यावहारिक व मानसिक आव्हाने आहेत. स्वार्थ मोठा की कोणाला न दुखावता, भ्रष्टाचार न करता साधलेला आनंद मोठा यावर कोणत्याही कुटुंबात घडतील अशा घटनांमधून साकारणारी कथा आहे. एकीकडे अण्णा हजारेंनी छेडलेले भ्रष्टाचारविरोधी देशव्यापी अहिंसक आंदोलन, जगात अन्य ठिकाणी झालेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर उमटलेले त्याचे जगव्यापी पडसाद, प्रसारमाध्यमे - सोशल नेटवर्किंग च्या माध्यमातून घरांघरांमधून पोचलेले हे आंदोलन, त्यातून झडलेल्या चर्चा, ढवळून निघालेली मने, शहरी लोकांबरोबरच ग्रामीण जनतेचा सहभाग, भ्रष्टाचाराला कंटाळलेली आणि सरावलेली मने व या सर्वांचे टीव्ही फूटेज या सर्व घटनांचा सुरेख वापर या चित्रपटात दिसून येतो. त्यातूनच चित्रपटाचे कथानक पुढे सरकत राहते. देशव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एका मध्यमवर्गीय कुटुंबातील घडामोडी, त्या कुटुंबातील सदस्यांच्या समोर उभे राहिलेले प्रश्न, त्यांची त्यांनी शोधलेली उत्तरे, त्यातून निर्माण होणारे मानसिक आंदोलन - द्वंद्व यांचा जो मेळ घातला आहे तो खरोखरीच उत्तमपणे मांडला आहे. विक्रम गोखले व उत्तरा बावकर ज्या सहजतेने वावरतात त्यामुळे त्यांचा अभिनय हा अभिनय वाटतच नाही. तीच गोष्ट चित्रपटातील इतरही कलाकारांची म्हणावी लागेल. जितेंद्र जोशी, आलोक राजवाडे, ओंकार गोवर्धन, रेणुका दफ्तरदार, देविका दफ्तरदार यांचे अभिनय हे अभिनय न वाटता अतिशय स्वाभाविक वाटतात. कोठेही दे मार मारामारी, अंगावर येणारी गाणी, संवाद, चित्रे न वापरता आपला संदेश प्रेक्षकांपर्यंत समर्पकपणे पोहोचविण्यात चित्रपट यशस्वी ठरतो. शैलेश बर्वेंनी दिलेले संगीतही चित्रपटात बेमालूमपणे मिसळून जाते. किशोर कदम व दीपा लागूंच्या छोट्याच परंतु प्रभावी भूमिका लक्षात राहणार्‍या आहेत व त्यांनी त्या नेहमीच्याच सफाईने वठविल्या आहेत.


दोन तासांचा हा चित्रपट प्रत्येक भारतवासियाने पाहावा असाच आहे. चित्रपटाला सबटायटल्सही आहेत, त्यामुळे अमराठी लोकांनाही तो सहज समजू शकेल. यातील भाषा आपल्या प्रत्येकाची आहे. या चित्रपटात मांडली गेलेली मानसिक आंदोलने, द्वंद्व, प्रश्न, वातावरण आपणही रोजच्या जीवनात कोठे ना कोठे अनुभवत असतो. त्यामुळेच जो संदेश चित्रपटाच्या शेवटच्या भागात कथानकातून समोर येतो तो नक्कीच आपल्याला विचार करायला लावतो. आपल्या जीवनशैलीविषयी विचार करायला लावतो. पर्याय शोधायचा प्रयत्न करायला लावतो. भ्रष्टाचाराचा विरोध हा आपण आपल्या वैयक्तिक जीवनातून सुरू केल्याशिवाय पर्याय नाही - तसे केले तरच हा लढा सार्थ होईल - भ्रष्टाचार करणे हा जसा गुन्हा आहे तसाच तो सहन करणे हाही एक गुन्हा आहे याची जाणीव ज्या सहज सूक्ष्मतेने चित्रपटातून प्रसारित केली आहे त्याची दाद देण्यासाठी प्रत्येकाने हा चित्रपट एकदा तरी बघावा व इतरांना दाखवावा.


इतका सुंदर चित्रपट पाहायला व अनुभवायला मिळाल्याबद्दल मायबोलीचे व मायबोलीच्या माध्यम प्रायोजकांचे अनेक आभार! :)

Tuesday, October 11, 2011

कोठे जाशी भोगा...!!


''थांबा थांबा.... हे...हे समोरचं होर्डिंग... वाढदिवसाच्या शुभेच्छांचं हो.... तो कोणाचा फोटो आहे?'' सिग्नल सुटत असताना आमच्या कारच्या खिडकीतून मला दिसलेलं ते क्षणभर दचकायला लावणारं होर्डिंग... सॉरी... होर्डिंगवरचा चेहरा....

''ताई, हे तर आमच्या भागातले प्रसिद्ध राजकारणी आहेत हो मोठे! खूप वट आहे हां त्यांचा.... इथं बऱ्याच जमिनी, इमारती, शॉपिंग मॉल्स त्यांच्याच मालकीची आहेत. सगळीकडे होल्ड आहे म्हणे त्यांचा! कोणीही त्यांच्याकडे गेला की त्याचं काम झालंच म्हणून समजा.... दिलेला शब्द पडू देत नाहीत म्हणून रुबाब आहे बरं का त्यांचा... आमच्या इथे लोक त्यांना देव मानतात देव!'' कार चालवत असलेले डॉक्टर पटेल मला सांगत होते. तेवढ्यात त्यांच्या शेजारी बसलेल्या मिसेस पटेलने पुष्टी जोडली, ''आमचा हेल्थ क्लब त्यांच्याच मालकीच्या इमारतीत आहे.... उद्घाटनाला आले होते ना ते साहेब! माझा फोटो आहे त्यांच्याबरोबरचा.... आपण कार्यक्रम संपल्यावर घरी जाऊ तेव्हा दाखवेन हं तुम्हाला!''

कार्यक्रम... हो, मुंबईच्या एका टोकाला असलेल्या त्या उपनगरात आज सायंकाळी माझा कार्यक्रम होता. डॉक्टर पटेल व त्यांच्या सौभाग्यवती स्वागत समितीत होते. त्यामुळे माझी खातिरदारी करणे, ने-आण करणे वगैरे जबाबदारी त्यांच्याकडे होती. त्या भागात नव्यानेच राहायला आलेल्या पटेलांना त्यांच्या 'साहेबां'ची व त्यांच्या बंधूंच्या नानाविध उपक्रमांची जास्त काही माहिती नव्हती, आणि त्यांना ती माहिती करून देण्याची मला इच्छाही नव्हती. आम्ही कार्यक्रम-स्थळाच्या वाटेवर असतानाच मला ते होर्डिंग दिसले काय आणि मनात गतस्मृतींचे मोहोळ माजले.....

---------------------------------------------------------------------------

शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारातील ती एक मेंगळट दुपार होती. आमच्या सीनियर वकील मॅडम मुंबईला गेल्याचे निमित्त करून मी व माझी मैत्रीण आवारातच एका बाजूला गप्पा टाकत उभ्या होतो. दुपारचा एखादा पिक्चर टाकावा की आमची बसंती गाडी उडवत कोरेगाव पार्कमधून चक्कर मारावी यावर गहन खल करत असतानाच अचानक आवारातील पोलिसांच्या संख्येत बरीच वाढ झाल्याचे दोघींच्या लक्षात आले. आजूबाजूला पक्षकार, वकील वगैरे मंडळींची नेहमीसारखीच कोंदट वर्दळ होती. पण खाकी वेषातील एवढ्या संख्येतील पोलिसमामा आता अचानक इथे या गर्दीत काय करत आहेत याबद्दलचे कुतूहल आम्हाला जाणवू लागले. कोणाला तरी विचारावे का, वगैरेवर मंथन करत असतानाच अचानक मैत्रिणीने माझ्या बाहीला खेचून मला एका बाजूला ओढले. दुसर्‍या सेकंदाला साध्या व खाकी वेषातील पोलिसांचा ताफा माझ्या अंगाला अगदी चाटून पुढे गेला. त्यांच्या खाड् खाड् बुटांच्या तालात त्या घोळक्याच्या बरोबर मधून चार-पाच व्यक्ती चालल्या होत्या त्यांनी आमचे लक्ष वेधले....



त्यातील एक व्यक्ती म्हणजे प्रसिद्ध फौजदारी वकील होते. मोठमोठ्या केसेसमध्ये आपल्या बुद्धिचातुर्याच्या व युक्तिवादाच्या जोरावर आरोपींना निर्दोष सिद्ध करण्यात त्यांचा हातखंडा. गेली अनेक वर्षे त्यांनी हाताळलेल्या वेगवेगळ्या नामी केसेसमुळे त्यांचे मोठे नाव होते. पण आज तेही त्यांच्या शेजारून चालणार्‍या व्यक्तीशी काहीशा अदबीने हसत व बोलत होते. कोण होती ती व्यक्ती? सर्वसाधारण उंची व मध्यम बांधा... सावळा वर्ण.... पांढरे शुभ्र परिटघडीचे कपडे... गळ्यात रुळणारा सोन्याचा जाडसर गोफ.... चेहर्‍यावर एक प्रकारचा मग्रूर, बेदरकार भाव....चेहरा काहीसा ओळखीचा वाटत होता... तेवढ्यात आमच्या समोरून जाणार्‍या त्या घोळक्यात कशावरून तरी खसखस पिकली.... सोबतचे पोलिसही त्या हास्यात सामील झाले. पोलिस, वकील, आरोपी व आरोपीबरोबरचे त्याच्यासारख्याच शुभ्र सफेद कडक वेषातील साथीदार....!! माय गॉड! मला व मैत्रिणीला एकाच क्षणाला तो 'अहोऽसाक्षात्कार' झाला.......!!

''अगं, आजच पेपरात फोटो आलाय ना पहिल्या पानावर या माणसाचा...''
''ओह नोऽऽ.... यू मीन... टाडा... गँगवॉर???''
''येस, येस... टाडा कोर्टात केसची सुनावणी चालू आहे अशी न्यूज आली आहे पेपरात...''
''जायचं आपण?''
''काय वेड-बिड लागलं का? ते घेतील तरी का आपल्याला आत?''
''प्रयत्न करायला काय हरकत आहे? आणि आपण पण वकील आहोत.... आय मीन... होणार आहोत! आपण थोडीच त्यांना डिस्टर्ब करणार आहोत? चल, जाऊन बघूयात तरी....!!!''

चार लोकांचे रस्त्यावर भांडण चालू असले की त्यांच्या आजूबाजूला ज्या उत्सुकतेने बघ्यांचा गराडा पडतो अगदी त्याच सवंग उत्सुकतेने मी व मैत्रीण टाडा कोर्टाच्या दिशेने झेपावलो. जिन्यापाशी पावले पुन्हा एकदा थबकली. जावं की न जावं? सोडतील का आत? ओळखपत्र वगैरे विचारलं तर सरळ कॉलेजचं ओळखपत्र पुढं करायचं असं ठरलं आणि मग उसना धीर गोळा करत आम्ही दोघी टाडा कोर्टासाठी जी खोली राखून ठेवण्यात आली होती तिच्या दिशेने वळलो. खालच्या गर्दीचा कोलाहल इथे अजिबात जाणवत नव्हता. दगडी बांधकामाच्या पॅसेजमधील गारवा आज अंगावर शिरशिरी उमटवून जात होता....

खोलीच्या दाराशी दोन सशस्त्र पोलिस उभे होते. आम्ही त्यांच्याकडे न बघताच दडपून आत शिरलो आणि तिथेच खुळचटासारख्या उभ्या राहिलो.

खोलीतल्या मागच्या व मधल्या भागातील बहुतेक सर्व खुर्च्या आणि बाकडी भरलेली होती.... आरोपीच्या माणसांनी!! म्हणजे त्यांच्या बाजूला काही तशा पाट्या नव्हत्या लावलेल्या.... पण एकंदरीत वेषावरून ही माणसे नेहमीची वाटत नव्हती. आरोपीचे वकील व सरकारी वकील आपापल्या फायली, कागदपत्रे व सहकारी मदतनिसांशी बातचीत यांत गुंतले होते. त्यांच्या मागे दोन-तीन खुर्च्या रिकाम्या होत्या, पण तिथे बसायची तर आम्हाला बिलकुल इच्छा नव्हती. धडधडत्या छातीने त्या उग्र गर्दीकडे बघत असतानाच बेलिफाने न्यायाधीशांच्या आगमनाची वर्दी दिली. ते यायच्या आत आम्हाला जागा पकडायच्या होत्या.... कुठं बसायचं.... भिरभिरत्या नजरेनं सारी खोली न्याहाळताना आमच्या मागच्या बाजूने आवाज आला... ''आईये जी, यहाँ आकर बैठिये |'' बायकी आवाज? चमकून त्या दिशेने पाहिले तर खरोखरी एक चाळीशी ओलांडलेल्या बाई आम्हाला खुणेने बोलावत होत्या. पहिल्याच रांगेतील बाकड्यावर बसल्या होत्या त्या! त्यांच्या शेजारील व मागच्या बाकड्यावरची जागा रिकामी होती. हुश्श!!! आम्ही काहीही विचार न करता मुकाट त्या बाईंशेजारी जाऊन बसलो. अजून छाती धडधडत होती. जणू शर्यतीत पळाल्याप्रमाणे श्वास फुलला होता. तेवढ्यात न्यायाधीश महोदय आले... त्यांना अभिवादन करून पुन्हा खाली बसेपर्यंत मी व मैत्रिणीने डोळ्यांच्या कोपर्‍यातून त्या बाईंना न्याहाळून घेतले.

त्यांचे वय नक्की कळत नव्हते. पण स्थूल शरीर, मेंदीचा कलप लावून तांबडे झालेले केस, अंगावर साधा परंतु किंमती, सुळसुळीत पंजाबी सूट, त्याच्यावरची लेसच्या कडांची नाजूक ओढणी, उंची पर्स, हाताच्या बोटांतील जाडजूड सोन्याच्या अंगठ्या... हे प्रकरण आमच्यासारख्या 'बघ्या'च्या वर्गातलं नव्हतं याची जाणीव होत असतानाच वकिलांनी बोलायला सुरुवात केली....

आमच्या मागच्या खुर्च्या व बाकड्यांवर दोन मुख्य आरोपी व त्यांचे साथीदार बसलेले होते. अगदी मोकळे ढाकळे. हातात बेड्या नाहीत, पायांत साखळदंड नाहीत, अंगावर जेलचे कपडे नाहीत.... पण त्यांच्या थंड थंड नजरा, चेहर्‍यावर कितीही उग्र बेपर्वाई असली तरी सावध देहबोली, मुख्य आरोपींचे अस्वस्थ चाळे, या सर्वांवर अलगद नजर ठेवून असलेले सफारी सुटामधील पोलिस, संथ लयीत चालणारे कोर्टाचे कामकाज, टंकलेखकांच्या टाईपरायटरमधून येणारा आवाज, डोक्यावरचे उंचच उंच छत व एका लयीत घरघरणारे पंखे, खिडकीतून येणारी गार वार्‍याची झुळूक....

कोणत्या तरी कारणामुळे त्या दिवशी काही मिनिटांसाठी कोर्टाचे कामकाज थांबले. न्यायाधीश त्यांच्या कक्षात गेल्यावर शेजारी बसलेल्या बाईंनी पर्समधून पाण्याची बाटली काढली व आम्हाला पाणी हवंय का विचारले. खरं तर तोंडाला कोरड पडली होती, पण का कोण जाणे, त्यांना नकोच म्हटले. मग त्यांनी आमची चौकशी करायला सुरुवात केली. पहिल्या पाच मिनिटांतच आमची नावे, कॉलेजचे कोणते वर्ष, कोर्टात काय करता वगैरे माहिती काढून झाल्यावर त्या बाईंनी पहिला बाँबगोळा टाकला....

''मैं तो यहाँ भाईसाब के लिए आयी हूँ | उनके लिए टिफिन जो लाना था....येरवडासे यह जगह मेरे लिए बहोत दूर है... हमारा फ्लॅट है ना वहाँ... लेकिन क्या करें... आना तो था ही... तो जी शोफर को गड्डी चलानेको बोला .... नहीं तो इस ट्राफिक में गड्डी चलानेका मुझे तो बाबा बहोत टेन्शन होता है....'' असं म्हणून बाईंनी आपल्या पर्समधून सुगंध फवारलेला टिचकीभर हातरुमाल काढून त्याने आपला चेहरा अलगद टिपला. आता या ''भाऊगर्दी''तील तिचा भाऊ नक्की कोण या धास्तीने बिचकलेल्या आम्ही... तेवढ्यात तिने मागे वळून आपल्या हातरुमाल धरलेल्या हाताने कोणाला तरी हलकेच अभिवादन केले. आम्ही टकमका त्या दिशेने पाहू लागलो! मेलो!!!! आमची नजरानजर गँगवॉर किंवा टोळीयुद्धाच्या आरोपाखाली पकडल्या गेलेल्या मुख्य आरोपी क्रमांक दोन यांच्याशी झाली होती!!

टेन्शन, टेन्शन.... घोर टेन्शन!!!! बाई तर आमच्याशी वर्षानुवर्षे ओळख असल्यासारख्या गप्पा मारतच सुटल्या होत्या. आमच्या मागे बसलेल्या अनेक थंड खुनशी नजरा आमचा हा 'वार्तालाप' टिपत होत्या याचे भान मला व मैत्रिणीला ''आता कोठे लपावे,'' या विचाराप्रत नेत होते. पण मग न्यायाधीश परत आल्यासरशी आम्ही सरसावून बसलो. आखिर डर डर के क्या जीना? आम्ही तर कोणताच अपराध केला नव्हता. तो फिर क्यों डरे?? अचानक आम्हाला स्वतःतील कायद्याच्या विद्यार्थ्याची आठवण झाली. मग आणखी ताठ मान काढून आम्ही पुढची सुनावणी ऐकत राहिलो.


त्या दिवसाचे कोर्टाचे काम संपल्यावर आम्ही त्या बाईंना एक घाईघाईतील ''बाऽय'' ठोकला व जणू वाघ मागे लागल्याच्या थाटात कोर्टाच्या आवारातून ज्या सटकलो ते पार जंगली महाराज रोडला आलो तरी आमचे हात-पाय थरथरत होते. आपला कोणी पाठलाग तर करत नाही ना, याची चार-चारदा खात्री करून घेतली. त्या रात्री मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडने आमच्या दोघींची भरपूर शाब्दिक धुलाई केली.


''काय नडलं होतं का तिथं कडमडायला?''
''अरे पण...''
''हे बघा, ते लोक फार डेंजर आहेत.... उगाच कशाला चान्स घेताय?''
''हो, पण आम्ही काय तिथं त्यांना खुन्नस द्यायला नव्हतो गेलो...''
''पण त्यांनी खुन्नस घेतली तर??''
''अरे, पण आम्ही काय त्यांचं घोडं मारलंय?''
''कम ऑन, त्या माफिया डॉनच्या बहिणीशी तुम्ही गुलुगुलू गप्पा मारल्या.... आणि म्हणताय वर असं? त्याला समजा आवडलं नाही तिनं तुमच्याशी बोललेलं.... तर???....''
''तर तर काय...???''
''झाली ना त त प प?? नक्को ते उद्योग सुचतात तुम्हाला...''
''हे बघ.... लिसन टू मी...''
''नो, यू लिसन टू मी.... नो मोअर टाडा कोर्ट.... ओके? प्लीज! हात जोडतो....''
आणि यासारख्या त्याच्या पन्नास मिनतवाऱ्या ऐकल्यावर....
''ओह....ओके, ओके... नो मोअर.... प्रॉमिस!''

दोन दिवसांनी आमचे पाय पुन्हा टाडा कोर्टाच्या खोलीच्या दिशेने...

आता आम्ही टाडा कोर्टाच्या वातावरणाला सरावलो होतो. आरोपीची बहीण रोज भक्तिभावाने ''भाईसाब''साठी टिफिन घेऊन यायची. आमच्याशी हटकून दोन-चार वाक्ये बोलायची. तिलाही कदाचित त्या सार्‍या पुरुषांमध्ये एकटीला बोअर होत असेल. आणि आमच्याखेरीज तिथे इतर कोणी स्त्रियाही नसायच्या. मग रोज हवा-पाण्याच्या, ट्रॅफिकच्या, कोर्टातील गर्दीच्या, टिफिनमध्ये काय आणलंय आणि भाईसाबना टिफिनमध्ये काय आवडतं याच्या फुटकळ गप्पा चालायच्या. ना आम्हाला कोणी तिथे हटकत होतं, ना प्रश्न करत होतं. पहार्‍यावरचे पोलिस, साध्या वेषातील पोलिस आणि सरकारी वकिलांचे मदतनीस देखील आता आम्हाला ओळख दाखवू लागले होते. मुख्य आरोपी व त्यांच्या हस्तकांच्या दिशेने पाहणे आम्ही मुद्दामच टाळायचो. आणि कोर्टाच्या सुनावणीत त्यांच्यावर असलेल्या गंभीर आरोपांची जंत्री ऐकताना एखादा माणूस एवढे सगळे गुन्हे कसे काय करू शकतो आणि वर टिच्चून ऐटीत निर्लज्जासारखा भर कोर्टात, जमावापुढे कसा काय वावरू शकतो याचेच नवल वाटायचे.

अनेकदा जेवणाच्या सुट्टीनंतर कोर्टात परत येताना आरोपी, त्यांचे हस्तक, पोलिस, आरोपीचे वकील हे सर्व लोक न्यायाधीश येण्याची वर्दी होईपर्यंत बाहेरच्या व्हरांड्यात उभे राहून नर्म हास्य-विनोद करत असत. मी ते सारे टकमका बघतच बसे. अशक्य वाटायचे, पण ते सारे नजरेसमोरच घडत होते. खोलीच्या आत इतक्या गंभीर आरोपांची चर्चा-सुनावणी, खोलीच्या बाहेर हास्य-विनोद??!!!!

आणि मग तो दिवस उजाडला.... त्या दिवशी जेवणाची सुट्टी संपल्या संपल्या मी व माझी मैत्रीण टाडा कोर्टात येऊन आमच्या ठराविक जागेवर, म्हणजेच मॅडमच्या शेजारी स्थानापन्न झालो. न्यायाधीश महोदय यायला अद्याप अवकाश होता. बाहेर व्हरांड्यात आरोपी, वकील, हस्तक, पोलिसांचा घोळका नेहमीप्रमाणेच उभा होता. अचानक आरोपीने काहीतरी खूण केली. ताबडतोब सोबतच्या एका हस्तकाने आरोपी साहेबांना सिगारेट देऊ केली. आता त्यांना माचिस हवी होती. शेजारच्या पोलिस इन्स्पेक्टरने तत्परतेने माचिस पेटवून त्यांच्यासमोर धरली व आरोपी साहेब मोठ्या ऐटीत सिगारेट शिलगावून ''नो स्मोकिंग''च्या पाटीखाली, कोर्टरूमच्या बाहेर आरामात उभे राहून सिगारेटच्या धुराची वलये हवेत सोडू लागले. त्यांचा तो आविर्भाव बघून आमच्याही डोक्यात धूर होऊ लागला. आम्ही दोघींनी एकमेकींशी कुजबुजत सल्लामसलत केली व कोर्टाच्या पुढ्यात बसणार्‍या लेखनिक - टंकलेखक महाशयांकडे जाऊन आमचा निषेध तत्परतेने नोंदविला.
''जज साहेबांना सांगा त्यांना चांगली समज द्यायला.... नो स्मोकिंगच्या पाटीखाली उभं राहून स्मोक करत आहेत ते!''
लेखनिक दादांनी मुंडी हालवली. न्यायाधीश महोदय आल्यावर आमच्या दिशेने अंगुलिनिर्देश करत त्यांना काहीतरी खुसफुसत सांगितले. न्यायाधीशांनी घसा खाकरला, आरोपीच्या वकिलांना जवळ बोलावून काहीतरी सांगितले, आरोपीच्या वकिलांनीही मुंडी हालवली.

आता आम्ही दोघी पुन्हा टेन्शनमध्ये! एकीकडे त्या आरोपीच्या बेदरकार वागण्याला लहानशी का होईना, खीळ बसल्याचा आनंद.... तर दुसरीकडे यावरून तो किंवा त्याचे साथीदार उगाच आपल्याशी खुन्नस तर घेणार नाहीत ना, याचे बाळबोध टेन्शन! त्या दिवसानंतर तिकडे जाणे आम्ही शक्यतो टाळलेच!

पण मग एक दिवस पेपरात बातमी आली... भारतातील ख्यातनाम विधिज्ञ व आघाडीचे फौजदारी वकील आरोपी क्रमांक दोनच्या वतीने टाडा कोर्टात युक्तिवाद करणार म्हणून!! झाले! आमचा टाडा कोर्टाला टाटा करण्याचा निश्चय पुन्हा डळमळला.... क्या करने का? जाने का या नहीं जाने का? शेवटी छापा-काटा केला. उत्तर अर्थातच 'हो' आले. शिवाय त्या विधिज्ञांचा युक्तिवाद म्हणजे कायद्याच्या अभ्यासकांना निव्वळ मेजवानी असते ते ऐकून होतो. वर ते विधिज्ञ आमचे मानद प्राध्यापक असल्यामुळे आमच्या जवळच्या परिचयाचे होते. गेली चार वर्षे त्यांच्या लेक्चरला होणार्‍या गर्दीत मिळेल ती जागा पकडून, कधी खालच्या कार्पेटवर बसून, तर कधी उभे राहून त्यांची भारतीय घटना, दंड विधान संहिता इत्यादींवरची लेक्चर्स कानात प्राण आणून ऐकलेली.... आता त्यांना प्रत्यक्षात ऐन कोर्टरूममध्ये ऐकण्याची संधी आम्ही कशी चुकविणार?

त्या दिवशी नेमकी आमच्या सीनियर मॅडमना आमची तहान लागली होती. शेवटी त्यांनी सांगितलेले काम करून टाडा कोर्टात पोचायला आम्हाला जरा उशीरच झाला. धावत-पळत जिना चढत आम्ही कोर्टरूममध्ये पोचलो तेव्हा सारी खोली तुडुंब भरली होती. भारतातील ज्येष्ठ विधिज्ञ व गुन्हेगारी वकिलांचा युक्तिवाद ऐकायला तिथे पत्रकार, आरोपींकडची मंडळी व बरेच सारे वकील उपस्थित होते. आमची नजर सर्व दिशांना भिरभिरली तर बसायलाच काय, उभे राहण्यासाठीही कोठेच रिकामी जागा दिसेना! गर्दी झाली होती नुसती तिथे! शेवटी पहार्‍यावरच्या पोलिसाने आमची दया येऊन पहिल्या बाकाकडे अंगुलिनिर्देश केला. तिथे आमच्याशी रोज गप्पा मारणार्‍या आरोपी क्रमांक दोनच्या भगिनी असणाऱ्या मॅडम आरामात बसल्या होत्या. आम्हाला पाहताच त्यांच्या गुलाबी लिपस्टिकने रंगविलेल्या ओठांवर ओळखीचे हसू आले व त्यांनी लगबगीने बाजूला सरकून आम्हाला बसायला जागा करून दिली. तेवढीच जागा रिकामी होती. आरोपींच्या नातलगांसाठी जणू मुद्दाम राखीव ठेवलेली!! गच्च भरलेल्या कोर्टात आज वेगळेच वातावरण होते. शेजारी बसलेल्या मॅडमही खास जामानिमा करून आलेल्या दिसत होत्या. तेवढ्यात न्यायाधीश महोदय आले व कोर्टाचे कामकाज सुरू झाले....

...ब्रिलियंट, ब्रिलियंट! एक उत्कृष्ट, बुद्धीला स्तिमित करणारा आणि अफलातून युक्तिवाद ऐकल्यावर माणूस ज्या प्रभावाखाली येतो त्याच प्रभावात विहरत आम्ही त्या दिवशी कोर्टरूममधून बाहेर आलो. मेंदू अद्याप त्या युक्तिवादातच गुंतला होता. आणि ज्या उठावदार शैलीत वकिलमहाशयांनी आपले म्हणणे मांडले ती शैली, तो आत्मविश्वास पाहिल्यावर लोक या माणसाला कायद्यातला बाप का म्हणत असतील ह्याची जाणीव होत होती. आतल्या उकाड्यानंतर बाहेरची व्हरांड्यातील मोकळी हवा छातीत भरभरून घेतानाच आमच्या टाडा कोर्टरूममधील शेजारणीने आम्हाला गाठले.

''क्या अर्ग्युमेन्ट किया ना सर ने! मैंने उनको सुबह बोला भी था, आप को तो कोर्ट रूम में सिर्फ एंट्री लेने की जरूरत है... हमारा हौसला बहोत बढाया है उन्होंने.... '' मॅडम भरभरून बोलत होत्या... त्या आमच्याशी बोलत असताना बाकीचे वकील आम्हा तिघींकडे गमतीशीर नजरेने बघत तिथून जात होते. तेवढ्यात सारी कोर्टरूम आपल्या युक्तिवादाने जिंकणारे ते ज्येष्ठ विधिज्ञ आपल्या ज्युनियर्स सहित बाहेर आले. केस हाताळणारे नेहमीचे फौजदारी वकील आज त्यांच्या पुढे-मागे झुलत होते. त्यांचा तो सारा घोळका आमच्यासमोरच थांबला. विधिज्ञ साहेबांना ''भाईसाहेबां''च्या बहिणीशी बोलायचे होते... त्यांनी दोन मिनिटे गप्पा मारल्या. त्या वेळात मी व मैत्रीण, दोघी मागे गुपचूप उभ्या होतो. अचानक त्या मॅडमना काहीतरी आठवले आणि त्यांनी आमची ओळख त्या ज्येष्ठ कायदेतज्ञांशी करून दिली. त्याबरोबर ते उद्गारले, ''यह बच्चीयाँ तो हमें पता है... हमारी स्टुडंटस है... है नं?'' आम्ही दोघींनी आवंढा गिळत मुंड्या हालवल्या व धिटाईने पुढे होऊन आमच्या या सरांच्या कोर्टरूममधील युक्तिवादाबद्दल त्यांचे अभिनंदन केले! झाले!! सर भलतेच खूश झाले.... त्यांच्या ज्युनियर्सकडे वळून काहीशा अभिमानाने म्हणाले, ''देखो, ये दोनों मेरी स्टुडंट्स है.... आज मेरा अर्ग्यूमेन्ट सुनने के लिए आयी थी....'' सर्वांच्या नजरा आमच्याकडे.... आणि आम्ही दोघी दूधखुळ्यासारख्या तिथेच अवघडून उभ्या!
तरीही मोठ्या प्रयत्नांनी आम्ही दोघींनी टाळ्याला अडकलेली जीभ उचकटून ''सर, यू वेअर सिंप्ली ब्रिलियन्ट!'' चा उद्घोष केला. सरांनी दोघींच्या पाठीवर थोपटल्यासारखे केले आणि, ''सो, सी यू गर्ल्स इन कॉलेज!'' म्हणत आमचा निरोप घेत तिथून रवाना झाले.

काही वेळा आयुष्यात गोष्टी इतक्या वेगाने घडत जातात की मेंदू पार बधिर होऊन जातो. त्या दिवशी आमचेही असेच झालेले... अनपेक्षितपणे सरांशी झालेला तो वार्तालाप, त्या अगोदरचा मेंदूचा कीस काढणारा त्यांचा युक्तिवाद... त्या नशेतच आम्ही आमच्या सीनियर मॅडमच्या चेंबरमध्ये घुसलो. त्यांना भेटायला आलेले एक सहकारी वकील जाता जाता, ''काय बाबा! तुम्ही लोक मोठी माणसं.... थोरामोठ्यांच्या ओळखीची...!!'' असा टोमणा सर्वांदेखत मारायला विसरले नाहीत. त्या नंतर अनेक दिवस कोर्टातील ओळखीचे शिपाई आणि कॅन्टिनची पोरंही, ''क्काय मॅडम... तुमची पार हाय कमांड पर्यंत वळख हाय की!'' सारख्या उद्गारांनी जाताऱ्येता आम्हाला डिवचत होती तर ओळखीचे काही वकील, ''मानलं पाहिजे बुवा तुम्हाला! पार त्या माफिया डॉनच्या घरच्यांशीच ओळख काढलीत की! '' करत यथेच्छ थट्टा-मस्करी करत होते.

लवकरच परीक्षा जवळ आल्यामुळे आमचे कोर्टात जाणे बंद झाले. टाडा कोर्टाची आठवण स्मृतीच्या एका कोपर्‍यात बंदिस्त झाली. टोळीयुद्ध करून, खून-दरोडे करून बिनबोभाट वावरणारे, जेलमध्येही पंचतारांकित कारावास भोगणारे, नंतर निवडणुकीत जिंकून येणारे ते राजकारणी-गुन्हेगार माझ्या भूतकाळातील एका जमान्याच्या आठवणीचा भाग झाले. नंतर त्यांचे काय झाले वगैरे मागोवा घ्यायच्या भानगडीत मी पडले नाही. वकिली न करण्याचा निर्णय घेतल्यावर तर ते जग जणू माझ्यासाठी परकेच झाले.

------------------------------------------------------------------------------

आज कितीतरी वर्षांनी तो एकेकाळचा परिचित चेहरा आठवला होता... त्यांच्या बंधूंचा तसाच दिसणारा चेहरा भल्या मोठ्या होर्डिंगवर झळकत असण्याचे निमित्त! ती थंड, बेदरकार नजर आठवून भूतकाळातील आठवणी जाग्या झाल्या होत्या. ''बाहेर पडले त्या जगातून, ते बरंच झालं!'' असा विचार मनाशी करत करतच मी कार्यक्रमाचे ठिकाणी पोचले.

त्या उपनगरातील साईबाबांच्या स्थानिक मंदिराचा जीर्णोद्धार केल्याप्रीत्यर्थ आयोजित केलेला सोहळा होता तो! माझ्या एका परिचितांमार्फत मला कार्यक्रमाचे आमंत्रण आले असल्यामुळे मीही फार चौकशी न करता परस्पर होकार दिला होता. कार्यक्रम छान झाला, संपला, सरतेशेवटी नारळ-शाल-पुष्पगुच्छ सत्कार वगैरे झाले. नेहमीप्रमाणे मला आलेला पुष्पगुच्छ मी तेथील दोन लहान मुलींकडे सोपविला. पण नारळ कसा नेणार? शाल कुठं ठेवणार? ताबडतोब एका संयोजकांनी माझ्यासमोर सुती पिशवी धरली. पिशवीचा पांढरट पिवळा रंग, त्यावर लाल ठसठशीत शाईत गौरवाने छापलेले तेच ते परिचित नाव.... ओळखा बघू कोणाचे असेल????? ''कोठे जाशी भोगा... तुझ्यापुढे उभा!!'' बरोब्बर!! त्या गावातील थोर राजकारणी - समाजकारणी - लोकांचे पालनहार - अशा त्या साहेबांच्या बंधूंचे पिशवीवर छापलेले ते नाव मला चांगलेच परिचयाचे होते. अर्थात त्या गावात बहुतेक ठिकाणी त्यांचे नाव असतेच म्हणे... अन् येतेच.... अखेर तेच तर त्यांचे ''कर्म''स्थळ आहे...!!! भले कायदा काहीही म्हणो, पोलिस कळवळून काहीही म्हणोत, वर्तमानपत्रे ठणाणून काहीही सांगोत.... ते त्या भागाचे अनभिषिक्त राजे आहेत हेच खरे!! लोकशाहीत लोकांच्या मनावर ''राज्य'' करणारे... मग ते भले दहशतीच्या जोरावर असो, की लोकांवर केलेल्या उपकारांच्या 'दबावापोटी' असो!

निघताना मी डॉक्टर पटेल व त्यांच्या पत्नीस त्यांच्या घरी मुक्कामासाठी न जाता मला परतीच्या गाडीला सोडायची विनंती केली. तेही अगोदर जरा हिरमुसले, पण नंतर काहीसे नाईलाजाने तयार झाले. नारळ व शाल असलेली पिशवी का कशी कोण जाणे, पण त्यांच्या गाडीच्या डिकीतच राहिली!! :-)

--- अरुंधती 

Friday, September 30, 2011

असाही एक प्रवास!!


''सॉऽऽरी अम्माऽऽ...आपलं...सॉरी अप्पा!!'' मी कच्चकन जीभ चावली आणि तोंडात येणारे माफीनाम्याचे शब्द एका कोरड्या आवंढ्यासरशी गप्पकन् गिळले. ठिकाण होते केरळातील त्रिचूरचे रेल्वे स्टेशन. वेळ सायंकाळचे पाच वाजून दहा मिनिटे. फलाटावर टेकल्या टेकल्या लगेच गचके घेत निघणार्‍या त्रिचूर-बेंगळुरू पॅसेंजरमधील जनरल डब्ब्याच्या दारातून मुसंडी मारून इंचभर आत घुसल्यावर आपल्या बुटांखाली जे मऊ मऊ लागतंय तो रेल्वेच्या डब्याचा तळभाग नसून कोणा मल्लूभाऊ वा मल्लिकेची पावले आहेत ह्या दु:खद व कष्टप्रद जाणिवेला मनोमन चिरडत मी पुन्हा एकदा आजूबाजूच्या घर्मतैलचंदनगंधाने पुनीत झालेल्या हवेचा श्वास नाकात ओढून घेतला व नव्या बळाने रेटा देत मुंगीच्या गतीने पुढे सरकायला सुरुवात केली.
മൂവ് മൂവ്... माझ्या मागे असलेल्या मुंडुवेष्टीने मला जोरात ढकलले. पुन्हा एकवार मी बहिणीला रजा न देणार्‍या तिच्या बॉसला मनातल्या मनात दूषणे दिली. त्याच्या त्या रजा नाकारण्याच्या आडमुठेपणामुळे आम्हाला आरक्षण नसताना साध्या तिकिटावर बारा-तेरा तासांचा प्रवास जनरल डब्यातून करायची वेळ आली होती! त्यात आमच्या बहिणाबाई व आमच्याबरोबर असलेला एक मित्र हे दोघेही अतिशय प्रामाणिक! नियमांना धरून वागणार्‍या समूहाचे नेतृत्व करणारे.... ''आरक्षित डब्यात चढून टी.सी कडून आपले तिकिट अपग्रेड करू,'' (थोडक्यात, बसण्या/झोपण्यासाठी तरी थोडी जागा मिळवू) अशा अर्थाची माझी सूचना त्यांनी पार ''नाऽहीऽऽ!!'' म्हणत धुडकावून लावली होती. परिणामतः आम्ही दोघी जनरल डब्याच्या मागच्या दारातून व मित्रवर्य पुढच्या दारातून त्या महासमुदायाच्या खतखत्याने ओसंडून वाहत असलेल्या डब्यात सूर मारण्यात यशस्वी झालो होतो.

आता खरी समस्या ही आत घुसल्यावर दृष्टोत्पत्तीस आलेल्या अफाट जनसमूहातून मार्गक्रमणा करत आसनव्यवस्थेच्या जवळपास पोहोचण्यात होती. वाटेत अगम्य (मल्याळी) भाषेत मचाव मचाव करणारे असंख्य लोक. अगदी कमरेला पिवळट पांढरी लुंगी गुंडाळलेल्या व शुभ्र बत्तिशीने चकाकणार्‍या कभिन्न तेलकट अण्णा अप्पांपासून मत्स्यगंधा, योजनगंधा नाव सार्थ करणार्‍या व कचाकचा बोलणार्‍या / भांडणार्‍या ललनांपर्यंत सर्वांचेच लक्ष्य मिळेल ती जागा पादाक्रांत / सामानाक्रांत करणे हेच होते. गार्डची शिट्टी होऊन रेल्वे हालली तरी आमच्या डब्याच्या आतील व बाहेरील गर्दी तसूभरही कमी झाली नव्हती. हाय रे रामा! का म्हणून मला ऐन लग्नाच्या मोसमात परतीचे आरक्षण अनिश्चित असताना मैत्रिणीच्या लग्नाला फाफलत त्रिचूरला जायची बुद्धी सुचली? त्यात बहीण व मित्र, दोघांनाही रजा नसल्यामुळे गुर्वायूर मंदिरात त्या मैत्रिणीचे लग्न लागल्यावर स्वादिष्ट भोजनाचा निवांत ताव घ्यायचे सोडून आम्ही घाईघाईत पोटात चार घास ढकलले होते व सामान घेऊन रेल्वे स्टेशनवर थडकलो होतो. स्टेशनवर आमच्यासारखेच अनेक आरक्षण नसलेले प्रवासी व दर सप्ताहान्ताला बंगलोर-त्रिचूर प्रवास करून घरी येणारे व आता परतीला निघालेले नोकरदार व विद्यार्थी....


''ताई, तू थोडी तिरपी उभी राहतेस का, म्हणजे मला पाऊल ठेवायला जागा मिळेल?'' एवढा वेळ बकध्यान करत एका पायावर तोल सांभाळत असलेली मम भगिनी माझ्या कानाशी ओरडली. (पुटपुटली असती तरी ऐकू आले नसते अशा कोलाहलात!) मी उदार मनाने माझ्या देहाची वजनदार तनुलता जरा वक्र केली....तेवढ्यात मागचा एक लुंगीवाला जोरात किंचाळला. अय्यो रामा!! त्याच्या पायावरच उभी राह्यले की वो मी! पुन्हा एकदा मी 'सॉऽरी' ची पुडी सोडली.
कुळकुळीत डोक्यांच्या त्या चिपकट, तेलकट घनगर्भ गर्दीत मला हळूहळू स्वतःचे अस्तित्व नाहीसे होणे, गर्दीत एक होणे, समुदायाचा एक भाग होणे इत्यादी शब्दप्रयोगांचा वास्तविक अर्थ उमजू लागला होता. डोळ्यांसमोर फक्त आणि फक्त मानवी शरीरे, मस्तके, केस, वस्त्रप्रावरणे.... नाकांत शिरून हुळहूळ माजवणारे कोणाचे कृष्णकुंतल... त्यांच्या आडून क्वचित दिसले तर आमच्या डब्याच्या खिडकीचे अवकाश.... आणि दूरच दूर भासणारे आसन-व्यवस्थेचे क्षितिज....पायांवर, पायांत आणि पायाखाली गाठोडी, बोचकी, बचकी, पिशव्या, टोपल्या, करंड्या, खोकी, बॅगा इत्यादी सामानरूपी भौतिकतेचे मणांमणांचे ओझे....!!
मध्येच माझा नाकाचा शेंडा खाजू लागला. ''ए माझं नाक खाजतंय....'' माझ्या पाठीशी उभ्या बहिणीला ऐकू जाईल इतपत मोठ्या आवाजात मी ओरडले. नशीब एवढंच की आजूबाजूला मराठी कळणारं कोणीही नव्हतं. ''मला माझा हातच मिळत नाहीए गं!'' मी पुन्हा कळवळले. हो, माझाच श्वास शेअर करणार्‍या तीन-चारजणांमुळे गेल्या अर्ध्या तासात मला माझ्या हाताचे दर्शनच झाले नव्हते. ''माझं नाक खाजव ना!'' मी अगतिकतेने बहिणीला विनवले. एवढ्या गंभीर क्षणालाही ती दुष्ट नारी आसुरी आनंदाने फिस्सकन हसली. जन्मल्यापासून मोठ्या बहिणीने केलेल्या ताईगिरीचा वचपा काढायची तिला ही नेमकी संधी गवसली होती!
''मी खाजवेन नाक तुझे.... पण.... त्याबद्दल मला काय देशील?''
माझ्या ओठांवर आलेले 'धम्मकलाडू' हे शब्द मी मोठ्या प्रयत्नांती गिळले आणि तिच्या ''पुढचे आठ दिवस मी कशीही वागले तरी मला रागावायचे नाही, माझ्यामागे भुणभूण करायची नाही,'' या मागणीचा बिनशर्त स्वीकार करून सर्व जनसमुदायाच्या साक्षीने तिला माझे नाक माकडागत खाजविण्याची संधी दिली. खेटलेल्या दोघी तिघी पोरी भाषा वगैरे न कळतानाही फिदीफिदी हसल्या. बाप्यांनीही दात काढले.
चला, त्या निमित्ताने इतका वेळ आमच्याकडे परप्रांतीयांच्या तुटकपणाने पाहणार्‍या व अगम्य भाषेत बडबडणार्‍या मल्लू सहप्रवाशांत आमच्यामुळे सौम्य खसखस पिकली होती.
अजूनही आमची दोघींची प्रगती डब्याचे दार ते आसनव्यवस्था यांच्या दरम्यान असलेला पॅसेज एवढीच होती. उपलब्ध प्रत्येक सेंटिमीटरवर माणसे उभी, बसलेली, तोललेली होती. सामान ठेवायच्या लोखंडी जाळीदार रॅकवर देखील काही लोक चढून बसले होते. चार माणसांच्या आसनावर सहा ते आठ माणसे कोंबलेली होती. त्यांच्या पायाशी असलेल्या जागेत वर्तमानपत्रांचे कागद पसरून आणखी काहीजण दाटीवाटीने बसलेले होते. मधल्या वाटेवर, दोन आसनांच्या मधोमध.... सगळीकडे वेगवेगळ्या स्थितीत बसलेली/ उभी जनता.... एकमेकांच्या मांड्यांवर बसलेली डबल डेकर अवस्थेतील तरुण पोरं-पोरी.....भारताच्या फसलेल्या कुटुंब नियोजन उपक्रमाचं हे मिनी व्हर्शन!
पुढचे बारा तास व थोडक्यात संबंध रात्र ह्याच गर्दीत अशा अधांतरी ताटकळलेल्या अवस्थेत इतरांना दत्तक जात काढायची ही कल्पनाच भयंकर होती. आपल्याच हातापायांचे दर्शन दुर्लभ झाले होते. त्रिभंगावस्थेत उभे राहून पाठीची वाट लागली होती. मस्तकात शब्द-गंध-ध्वनीचा उग्र कोलाहल माजला होता. इंग्रजीचे ठराविक 'एक्स्क्यूज मी', 'प्लीज', 'सॉरी' वगैरे शिष्टाचारयुक्त शब्द, हृदयद्रावक दु:खोद्गार आणि माझे कारुण्यरसाने थबथबून वाहत असलेले कटाक्ष यांचा उपस्थित गर्दीच्या काळजावर ढिम्म परिणाम होत नव्हता. शेवटी सारी अस्त्रे म्यान करून मी मुंडी मुरगाळून भवितव्याच्या कल्पनेने डोळे घट्ट मिटून व्यथित अंतःकरणाने उभी राहिलेली असताना बहिणीच्या मोबाईलची रिंग वाजली....
आता गळ्यातला मोबाईल कानापर्यंत न्यायचीही जिथे मारामार तिथे ती तो कॉल काय आणि कसा घेणार! पण बराच वेळ ती रिंग अथकपणे वाजत राहिल्यावर बहिणीच्या समोरच्या बाईने कीव येऊन तिला तसूभर सरकून कॉल घेण्यापुरती जागा करून दिली. पलीकडून आमच्याबरोबर प्रवास करणारा, डब्याच्या दुसर्‍या टोकाला असलेला मित्र बोलत होता. त्या तुटक्या संभाषणातून बहिणीला एवढाच अर्थबोध झाला की त्याला बसायला व्यवस्थित जागा मिळाली आहे आणि आम्ही जर त्याच्या सीटपर्यंत पोहोचू शकलो तर आमचीही बसायची सोय होऊ शकेल!!!
हुर्रे!!!! क्षण-दोन क्षण त्या गोडगोजिर्‍या बातमीने मला बुटातल्या बुटात नाच करावासा वाटू लागला! पण ते शक्य नसल्यामुळे फक्त भुवया व मुंडी वर-खाली करून माझा आनंद साजरा करू जाता शेजारची जनता संशयाने माझ्याकडे बघू लागली.... शेवटी आवरते घेतलेच एकदाचे! पण विचार मात्र सुंई-सुस्साट, बुंई बुंगाट सुटलेच होते! हे मुंबईकर लोक काय जादू करतात इतर लोकांवर कोण जाणे! आणि त्यात आमचा हा मित्र गोडबोल्या गुज्जूभाई आणि कसलेला मुंबईकर! लोकलच्या प्रवासाचा सराव व गर्दीची सवय असलेला! आता त्याच्या कृपेने बधिर, व्यथित, पीडित शरीराला घटका-दोन घटका बूड टेकवायला जागा मिळणार ही कल्पनाच सद्गदित करणारी होती.
असो. मित्राच्या त्या कॉलसरशी माझ्या हतोत्साही शरीरात व मनात एक नवे चैतन्य संचारले. पुढच्या स्टेशनला आमच्या बाजूच्या दरवाज्यातून खाली उतरून डब्याच्या पुढच्या दरवाज्यातून आत घुसायचे असा प्लॅन ठरला. त्याप्रमाणे जिलब्यांनी नटलेल्या पिवळ्या फलकाचे व फलाटाचे दूरून दर्शन झाल्या झाल्या मी व भगिनीने जीव खाऊन दाराच्या दिशेने हालचाल सुरू केली. परंतु हाय रे दैवा! बाहेरून माणसांचा एक भला थोरला लोंढा आमच्या दिशेने घोंघावत आला आणि आम्ही होतो त्यापेक्षाही मागे ढकलल्या गेलो!


प्रत्येक स्टेशनला आमच्या आशा पल्लवित होत व तेवढ्याच घणाघातीपणे त्या उखडल्या जात. उरत ते फक्त सुन्न शरीरांचे भग्न नि:श्वास! बघता बघता बाहेर काळोख पसरला.... डब्यात दिवे लागले... एवढा वेळ जागेसाठी आणि देव जाणे आणखी कोणकोणत्या कारणांसाठी भांडणारी मंडळी जरा दमून भागून थोडी निवांत झाली. मी व बहिणीने आता डब्याच्या आतूनच वाट काढत पलीकडच्या टोकाला पोचायचा निर्णय घेतला असल्यामुळे तासागणिक पाच-सहा इंच अशा गतीने आम्ही पुढे सरकत होतो. पहिल्या कंपार्टमेंटच्या अगदी नजीक पोहोचलो होतो. त्या कंपार्टमेंटमध्ये सगळी कॉलेजची मुलं-मुली ठासून भरली होती. सगळे निवांत झाले म्हटल्यावर त्यांनी मल्याळम् गाण्यांच्या भेंड्या सुरू केल्या. जोरजोरात, जोषात गाडीच्या टपावर व भिंतींवर ताल धरून नजरेचे इशारे करत गाणी म्हणणारी पोरे आणि त्यांच्या इशार्‍यांना मुरकत दाद देणार्‍या पोरी....!! आजूबाजूचे प्रवासी कौतुकाने ह्या जथ्याची गाणी ऐकत होते, मध्येच त्यांना सामील होत होते. एवढ्या गर्दीत, उकाड्यात व गलक्यात आपल्याच मस्तीत राहून, चेमटलेल्या अवस्थेत आनंदीपणे गाणार्‍या त्या सर्वांचा मला क्षण-दोन क्षण हेवा वाटला. एरवी रेल्वेच्या ए.सी. डब्याशिवाय व गुबगुबीत गिरद्यांशिवाय प्रवासाची कल्पना साहू न शकणारी मी त्यांच्या त्या साध्या सरळ आनंदाकडे आसुसून अविश्वासाने पाहत होते. हे लोक परग्रहवासी तर नाहीत ना, अशी शंकाही मनास काही सेकंद चाटून गेली.
माझ्या त्या मनोस्थितीचा भंग एका उग्र, खमंग, रसदार, तेलकट अशा तीव्र वासाने केला. एरवी त्या वासाचा पदार्थ खाण्याची कल्पनाही मी करू शकणार नाही... परंतु माझ्या भुकेलेल्या पोटाला ते माहीत नसावे. त्याने गुरकावून सकाळपासूनच्या धावाधावीत त्याच्याकडे दुर्लक्ष झाल्याची क्षीण गर्जना केली. साइड सीट्सवर बसलेल्या एका मध्यमवयीन जोडप्याने आपला टिफिन उघडून त्यातून तर्रीदार सांबार-भात-भाजी खायला सुरुवात काय केली, आणि सिग्नल मिळाल्याप्रमाणे आजूबाजूच्या लोकांनीही पटापट आपापले डबे उघडून सायंकालीन भोजनास आरंभ केला.

आमच्यापाशी ना टिफिन होते, ना स्टेशनवर बाहेर जाऊन काही विकत घेण्याचा मार्ग! तरी मी धीर करून खिडकीजवळ बसलेल्या एका माणसाला पैसे देऊन पुढच्या स्टेशनावर किमान बिस्किटाचा पुडा घेण्यास खुणेने विनविले. पण आमचा डबा फलाटावरील खाद्यपदार्थाचे स्टॉल्स, दुकानांपासून बर्‍याच लांबवर असल्यामुळे तेही शक्य झाले नाही. आज बहुतेक उपास करायला लागणार हे सत्य उमगेपर्यंत बाजूच्या लोकांची खाणीपिणी आटपली होती आणि आता मिळेल त्या स्क्वेअर इंचात लुंग्या, पातळे आरामासाठी विसावली होती. बहिणीने मित्राला मोबाईल लावला तेव्हा त्याने तेथील बाकड्यावर झोपण्यापुरती जागा मिळाली असून तो आडवा झाला असल्याची सुवार्ता सुनावली.
खाली बसलेल्या (म्हणजे शब्दशः रेल्वेच्या फ्लोअरवर स्थानापन्न), पेंगुळलेल्या व डुलक्या काढणार्‍या मंडळींना तुडवत, लाथा मारत डब्याच्या दुसर्‍या टोकाला पोचायची कल्पनाच असह्य होती. त्याक्षणी मला जर टारझन ट्रेनिंग मिळाले असते तर मी सामानाच्या रॅक्सना धरून लोंबकळत ''याऽऽहूऽऽ'' करत किंचाळत हां हां म्हणता डब्याच्या दुसर्‍या टोकाला पोचले असते असे तीव्रतेने वाटून गेले व पुन्हा एकदा आपल्या शिक्षण व्यवस्थेतील न्यूनस्थळे मजला भेडसावून, वेडावून गेली!
खिन्न मनाने मग मीही आमच्या बॅगच्या एका टोकावर वाईच टेकले. दुसर्‍या टोकावर बहीण! अहाहा.... अंतरीचे सुख वगैरे वगैरे काय जे असते ते मला त्या दोन क्षणांत उमगले! चार तास अतिशय क्लिष्ट अवस्थेत, लटकत, लोंबकळत ठेचकाळत व स्वतःच्या शरीराचे भजे करत काढल्यावर उत्तमांगाला जेव्हा तात्पुरता आधार मिळाला तेव्हा सर्वांगातून सुटकेची एक अबोल तान लहरत गेली. शरीर तर श्रमले होतेच, पण परिस्थितीशी झगडून मनही श्रमले थकले होते. बहिणाबाईंची तर बसता क्षणीच विकेट पडली होती. गाडीच्या हेलकाव्यांच्या अंगाईने ती जागचीच डोलत होती. माझ्या मनातून अद्याप डब्याच्या दुसर्‍या टोकाला कसे जाता येईल याचे विचार गेले नव्हते. जणू काही त्या टोकाला पोचल्यावर मला पंचतारांकित आसन व शयन व्यवस्था प्राप्त होणार होती!!
जनरल डब्यात रात्रीचे वेळी तितकेसे सुरक्षित वातावरण नसते ह्याची जाण ठेवून ती सारी रात्र मी जागून काढली. मध्येच भगिनीला ढोसायचे, बसल्या जागी घोरणार्‍या सुखी निद्रिस्त जीवांकडे बघत उसासे टाकायचे, बिडी-दारू-धूर-गर्दीचे संमिश्र वास, आजूबाजूच्या लोकांचे संथ नि:श्वास....

अगदी पहाटे कधीतरी माझाही डोळा लागला. जाग आली तीच कचाकचा आवाजाने. ज्याच्या पायथ्याशी आम्ही सारी रात्र काढली त्या माणसाने आपले प्लॅस्टिकच्या पिशव्यांमधील सामान आवरायला सुरुवात केली होती. मी तारवटल्या डोळ्यांनी त्याच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिले... ''बेंगळुऽरूऽ इन हाऽफ आवर!'' तो गुरकावला. ताबडतोब मी बहिणीला ढोसायला सुरुवात केली. दोघी जाग्या तर झालो, पण तोंडावर साधे पाणी मारायचे तरी कसे, हाही प्रश्नच होता. शेवटी पर्समधील वाईप्स काढून त्यानेच चेहरे खसाखसा पुसले. बाकीच्या गर्दीला तोंड धुणे वगैरे गोष्टींशी घेणेदेणे नव्हते. त्यांच्या जगात ते मस्त होते. अंगाभोवती गुंडाळलेल्या शालीला आवरून कसेबसे बॅगेत कोंबत असताना मित्राचा कॉल आला.
''प्लॅटफॉर्मपे मिलते है यार!'' तो टवटवीत आवाजात उद्गारला.
त्याच्या त्या सक्काळ सक्काळच्या तरतरीतपणामुळे माझ्या मस्तकात मात्र तिरिमिरीच गेली. इथे सारी रात्र मी चोरचिलटांच्या, गुंडांच्या धास्तीने आणि अशक्य अवघडल्या अवस्थेत बसून जागून काढली... आणि हा शहाणा रात्रभर सुखकी नींद, चैन की सांसे घेऊन कसा बोलतोय बघा!
बहिणीला कडक शब्दांत फर्मान सोडले, ''बॅग उचल!''
''आँ??''
''म्हणतीये ना, बॅग उचल लवकर.... आपल्याला डब्याच्या त्या टोकाला जायचंय!''
बहिणीच्या झोपाळलेल्या डोळ्यांत 'हिला नक्की वेड लागलंय' चे भाव! पण मी आता मागे हटणार नव्हते.
दात-ओठ चावत, जीव खाऊन मी जोरजोरात ''हटो, हटो, मूव्ह, मूव्ह...'' चा नारा देत डब्याच्या त्या टोकाच्या दिशेने देह लोटून दिला. वाटेत येणार्‍या लोकांपुढे आता माझ्या वजनाखाली चिरडले जाणे किंवा बाजूला होणे हेच पर्याय होते. (शिवाय साखरझोपेतून उठल्यावर त्यांची जी अवस्था होती ती माझ्यासाठी फायद्याची होती!) समस्त असुर-राक्षसांना पृथ्वीवर दणदणा चालत, वाटेतील जीवांना पायदळी तुडवत, विकट हास्य-गर्जना करत जाताना कित्ती कित्ती आनंद मिळत असेल ते आता कोठे माझ्या ध्यानात आले. बहीण हूं की चू न करता मुकाट माझ्या मागोमाग येत होती. अशा वेळी मूग गिळून गप्प बसण्याला पर्याय नसतो हे तिला अनुभवाने पुरते कळून चुकले आहे. मजल दरमजल लढवत आम्ही ज्या ठिकाणी आमचा मित्र सकाळचा वारा खात उभा होता तिथपर्यंत जाऊन थडकलो.
'ये ल्लो, आ गये हम | अब साथमें उतरेंगे|'' मी विजयोन्मादाची तुंबळ गर्जना केली.
मित्र खूळ लागल्यागत आम्हा दोघींकडे टकमका बघतच राहिला!!
बंगलोर स्टेशन येताक्षणी आम्ही तिघांनी दरवाजाच्या दिशेने धाव घेतली. मोकळ्या हवेत, मोकळ्या जमिनीवर पाऊल ठेवले. अडथळ्यांच्या शर्यतीने ग्रस्त झालेले रक्ताभिसरण पूर्ववत होण्यासाठी आठ-दहा येरझार्‍या घातल्या. माझी पावले टम्म सुजली होती. शरीरात सुया, पिना टोचल्यासारखी जाणीव होत होती. डोळे लाल झाले होते. आणि थकव्याचे तर विचारूच नका राव! त्या दिवशी बहिणीच्या घरी पोचल्यावर अगोदर अंघोळी केल्या व जे देह लोटून दिले ते थेट सायंकाळी सहा वाजता जाग आली. पिझ्झा ऑर्डर केला. दोघींनी समोरासमोर बसून पिझ्झ्याचा फन्ना उडविताना आयुष्यभरासाठी पाळण्याची प्रतिज्ञा घेतली,
''गांधीबाबांनी केला तर केला.... ह्यापुढे कध्धी कध्धी रेल्वेच्या जनरल डब्याने प्रवास करणार नाही!''
--- अरुंधती
[ मायबोली गणेशोत्सव २०११ स्पर्धेसाठी दिलेला लेख]


Tuesday, January 04, 2011

भांग

'बगड बबं बबं बम लहरी ऽऽ'' कैलाश खेरचा मनमोकळा स्वर कँटीनच्या म्युझिक सिस्टीममधून मदमस्त घुमत होता. चहाच्या पेल्यांच्या तळव्यांनी चिकट झालेल्या टेबलावर ठेवलेल्या काचेच्या पेल्यातील चहामृत प्राशन करत सर्व मित्रमंडळी एकेक लंब्या चवड्या बाता मारण्यात गर्क होती.
''गेल्या शिवरात्रीला आम्ही मित्रांनी भांग-पार्टी केली. काय सॉलिड मजा आली यार.... मी म्हणे व्हरांड्याच्या खांबाला धरून शोलेचे डायलॉग्ज म्हणत बसलो होतो.... मला तर काही आठवत पण नाही यार... हॅ हॅ हॅ!'' आमच्या ग्रुपमधील एकाचा नुकताच झालेला दोस्त सांगत होता. बाकीचे सर्व नग त्याचं बोलणं भक्तिभावाने ऐकत होते. मला नकळत हसू फुटले. भांगेच्या नावासरशी जुन्या धूळ साठलेल्या काही आठवणी जाग्या झाल्या...
भांगेशी माझा संबंध तसा प्रत्यक्षात येईल असे कधी वाटले नव्हते. शंभुनाथ महादेवाचे ते एक आवडते पेय आहे, उत्तरेकडे महादेवाचा प्रसाद समजून महाशिवरात्रीला भांगेचे सेवन करतात इतपत माहिती होती म्हणा! आणि हो, राजेश खन्ना व मुमताजला भांग प्यायल्यावर ''जय जय शिव शंकर'' गात थिरकताना पाहून हे नक्कीच काहीतरी ढँटढँ प्रकरण आहे हा माझा समज पक्का झाला होता. सदाशिव पेठेच्या वरणभाताच्या वट्ट ब्राह्मणी साच्यात लहानाचे मोठे झाल्यावर भांग हा शब्द जरी उच्चारला तरी अंगावर पाल पडल्यागत दचकणारी व किंचाळणारी मंडळी पाहिली होती. अशीच मंडळी भोवताली असताना मला ह्या आयुष्यात तरी ''भांग'' नामक वनस्पतीचे किंवा वनस्पती-निर्मित द्रव्याचे सेवन तर सोडाच, दर्शन तरी होईल की नाही ही शंकाच होती. कुतूहल होते आणि भीतीही! पण एका प्रसंगाने मला भांगेच्या करामतीची नुसतीच ओळखच नव्हे तर पुरती ओळख-परेड करून दिली. ते चोवीस तास कायमचे हरवले ते हरवलेच!!
एक बोचर्‍या थंडीने गारठलेली दुपार. लग्नाच्या पंगतीसाठी गारढोण फरशांवर अंथरलेल्या सतरंज्यांच्या पट्टीवर बसून मी आमच्या पंगतीकडे मिठाईची ताटे कधी वळताहेत ह्याची चातकाच्या आतुरतेने वाट बघत होते. सकाळपासून गुलगुलीत बाळसेदार पदार्थांचे तबियतीने सेवन चालू होते तरीही जेवायच्या वेळेपर्यंत भुकेने जीव गोळा व्हावा इतकी थंडी होती बाहेर! पंगतीत पाठीला पाठ लावून सुटाबुटातील, उंची शेरवानी-सफारीतील पुरुष, नखशिखान्त नटलेल्या काही स्त्रिया आणि बरीच छोटी छोटी मुले आमच्यासोबत जेवायला होती. एकमेकांना आग्रह करकरून भोजनाचा आस्वाद घेणे चालू होते.
समोरच्या पत्रावळी-द्रोणांत तर्‍हेतर्‍हेचे फरसाण, नमकीन, ढोकळा, कडक पुर्‍या, रस्सा-भाजी, कढी, पापड वगैरे पदार्थ दुर्लक्षित पडून होते. मला प्रतीक्षा होती ती त्या जेवणाचा मानबिंदू ठरलेल्या, तोंडात ठेवता क्षणी अलगद विरघळणार्‍या, पांढर्‍या शुभ्र बर्फाप्रमाणे दिसणार्‍या, अतिशय रुचकर अशा खोबर्‍याच्या मलईयुक्त बर्फीची! नेमका तोच पदार्थ सोडून बाकीचे सर्व पदार्थ समोर हजेरी लावत होते. तेवढ्यात अंगावरच्या सुवर्णालंकारांच्या आणि हातभर जरतारी पल्लूच्या ओझ्याने वाकलेली लग्नघरातील थोरली सून तिच्या नणंदेसह हातात पुर्‍यांची टोकरी घेऊन आमच्यापाशी येऊन पत्रावळीत पुरी वाढू लागली.
''भाभीजी, मुझे वह सफेदवाली मिठाई चाहिए | '' मी निर्लज्जपणे माझी मागणी नोंदविली.
तत्परतेने एक वाढपी पंगतीतून वाट काढत आमच्यापाशी आला आणि हातातील ताटातून ती मिठाई मला वाढू लागला. मी मागितल्यावर शेजारी-पाजारी बसलेल्या अनेकांनीही ती मिठाई हौसेने वाढून घेतली. बघता बघता माझ्या समोरच वाढप्याच्या हातातील मिठाईचे ताट रिकामे झाले. काही म्हणा, ही ''सफेदवाली'' मिठाई लग्नाच्या पंगतीत भलतीच हिट झाली होती!
आमचे मातृदैवत माझ्या डाव्या बाजूला बसले होते. मला नजरेने दाबत होते. तरीही नि:संकोचपणे मी त्या बर्फीचे अजून काही तुकडे पुन्हा मागणी करून वाढून घेतले. शिवाय वर, ''वाह! क्या मिठाई बनी है |'' अशी दाद द्यायला विसरले नाही! पंगत चालू राहिली. माझा त्या सफेद मिठाईचा मनसोक्त समाचार घेणेही चालूच राहिले.
मध्य प्रदेशात महाराष्ट्राच्या सीमेच्या अगदी नजीक, तापी नदीच्या काठावर वसलेल्या बर्‍हाणपुरातील हा ऐन थंडीचा मोसम. विलक्षण धुके, पाऊस, गारपीट असे टिपीकल ''ओलें''वाले वातावरण. दिवसेंदिवस सूर्याचे दर्शन दुर्मिळ. गारठलेले शहर व शहरवासी. धुक्याच्या आच्छादनात गुरफटलेला आसमंत. आणि ज्या हवेत सर्वसामान्य बर्‍हाणपुरवासिय बाहेरही पडणार नाहीत अशा हवेत भल्या सकाळी साडेसहाचा लग्नाचा मुहूर्त ठेवलेला!
त्या पहाटे अतिशय कष्टांनी, प्रयत्नपूर्वक ऊबदार रजयांच्या बाहेर पडून पुण्याहून खास ह्या लग्नासाठी आलेले आमचे चौकोनी कुटुंब मोठ्या मुश्किलीने सजून धजून तयार तर झाले... पण त्या गारठलेल्या हवेत लॉजच्या बाहेर पाऊलही टाकवत नव्हते. बरं, मुहूर्त गाठणे तर महत्त्वाचे होते. अखेर वडिलांच्या एका ज्येष्ठ स्नेह्यांच्या मुलाचे लग्न होते ते! मग काय!! भल्या सकाळी लेफ्ट राईट करत आमची परेड निघाली रस्त्याने वाजत-गाजत! ओस पडलेल्या रस्त्यावर आमच्या पावलांचा आवाज उगाच मोठा वाटत होता. एरवी नाक्या-नाक्यावर उभे असणारे टांगेवालेही धुकं-थंडीने गारठून गायब झाले होते.
''हे काय... आत्ता येईल कार्यालय!'' वडिलांनी धूर्त राजकारण्याच्या आवेशात दिलेल्या ह्या आश्वासनावर विसंबून मी व माझी बहीण एकमेकींना ढकलत ढकलत मार्गक्रमणा करत होतो. अगदी दोन मिनिटांचा रस्ता दहा-पंधरा मिनिटे चालले तरी कसा संपत नाहीए ह्यावर विचारमंथन करण्याएवढी अवस्थाही नव्हती आमची! थंडीने बधीर झालेली शरीरे आणि मेंदू तर अगोदरच थंडीने गोठलेला व अर्धनिद्रेत!
आपण लग्नस्थळी जाऊ तेव्हा आपणच तिथे पहिले पोहोचणारे निमंत्रित असू हा आमचा भ्रम कार्यालयाच्या दारातच गळून पडला. आमच्या अगोदर तिथे दोनशे-अडीचशे डोकी रंगीबेरंगी फेटे, शेरवान्या, चमचमणार्‍या साड्या- अलंकारांच्या व उंची पर्फ्युम्सच्या दरवळात वावरत होती. आत शिरल्यावर सुरुवातीचे नमस्कार - चमत्कार, आगत - स्वागत झाले. मग मात्र जवळपासच्या दोन-तीन खुर्च्यांवर टेकून व स्वतःला शालीत गुरफटून मी व भगिनीने तत्परतेने दोन-तीन डुलक्या काढल्या. लग्न आर्य समाज पद्धतीने लावले जात होते, ते आमच्या पथ्यावरच पडले. कारण ह्या लग्नात फार बजबजाट - गोंधळ नसतो. लहान मुलांचा, कोर्‍या नव्या कपड्यांचा आणि माफक कुजबुजीचा आवाज सोडला तर शांत वातावरण. त्यात फक्त पुरोहितांचा काय तो गंभीर स्वर. माझे डोळे जे मिटले ते साडेसाताला मातेने बाहेर वाजत असलेल्या बँडच्या पार्श्वसंगीताच्या लयीत मला गदगदा हालवून ''लग्न लागलं आहे, नाश्त्याला गरम गरम इम्रती, बटाटेवडे आणि पहुवा (पोहे) आहेत. खाणारेस का?'' असे म्हटल्यावरच टक्कन् उघडले.
माझ्या वयाची मुले-मुली तिथे जवळपास नव्हतीच. होती ती माझ्यापेक्षा लहान बच्चे कंपनी. मग त्यांच्याबरोबर जरा दंगा, खेळ, गप्पा यांत थोडा वेळ गेला. प्रीतीभोज सुरु होण्यास अजून बराच अवधी होता. अचानक आमच्या पिताश्रींना आम्हाला बर्‍हाणपुरातील काही प्रेक्षणीय स्थळे दाखवण्याचे सुचले! आमची अकरा नंबरची बस पुन्हा एकदा मजल दरमजल करत निघाली. रस्त्यांवर अगदीच शुकशुकाट होता. बुरहानपुरचा किल्ला आणि तेथील राजेशाही हमामखाना ओस पडले होते. आधीच सुसाट सुटलेले वारे त्या भग्नावशेषांना, खंडहरांना अजूनच गूढ, गारठवणारी डूब देत होते.... तेथील दु:खी, वेदनामय इतिहासाची झाक सार्‍या वातावरणात भरून राहिली होती. तब्बल दोन - अडीच तास पायपीट केल्यावर पिताश्रींना आम्हा श्रमल्या-थकल्या व भुकाळलेल्या जीवांची दया आली. कार्यालयात परत येईस्तोवर भोजनाची वेळ झाली होती. मला तर भीम-बकासुराच्या गोष्टीतील बकासुराप्रमाणे भूक लागली होती. मग काय, आने दो और मिठाई!!!
भरपेट जेवण झाल्यावर मी तिथेच पंगतीत ''आता मी अजिबात चालणार नाहीए,'' हे जाहीर करून टाकले. मोठ्यांनाही जेवण अंमळ जडच झाले असावे. कारण कधी नव्हे तो हेडक्वार्टर्सकडून माझी टांगासवारीची मागणी संमत झाली आणि आमची उचलबांगडी त्वरित कार्यालयाच्या दाराशी उभ्या असलेल्या एका टांग्यात झाली. परतीचा प्रवास अजिबात न आठवण्याइतपत आम्ही झोपाळलो होतो. लॉजवर आल्यावर जेमतेम आवरले आणि गुबगुबीत गाद्यांवर, रजयांमध्ये गुरफटून घेऊन जे देह लोटून दिले ते......
...... दुपारची चार-साडेचाराची वेळ.
दारावर जोरजोरात धडका का बसत आहेत म्हणून मी डोळे चोळत अंथरुणातून उठून बसले. खोलीचे पडदे ओढलेले, अंधार भरून राहिलेला.... शेजारी बहीण व आई-बाबा अजून निद्राधीनच होते. बाबांना हालवले पण ते काहीतरी पुटपुटत पुन्हा घोरासुराला शरण गेले. मग आईला हालवले. दोघींनी मिळून बाबांना उठविले.
''अहोऽ, बघा बरं कोण दार बडवतंय ते.... कधीचे वाजवताहेत दार...'' पिताश्रींना आम्ही दरवाजाच्या दिशेने जवळपास ढकललेच!
त्यांनी जांभई देत, डोळे चोळत दार उघडले. समोर लॉजचा मॅनेजर, एक सुटाबुटातील उंचेपुरे गृहस्थ व त्यांच्या सोबत केसांचा बॉब असलेली एक स्त्री उभे होते. मॅनेजरने हसून मान डोलवली आणि तो चालता झाला. समोरील दांपत्य मात्र अवघडले होते... ''ओह्ह.... आप लोग आराम कर रहे थे.... बहुत देर से हमने यहां का फोन ट्राई किया, कोई जवाब नही मिला... तो फिर आप को लेने हम खुद आये....''
एव्हाना वडिलांची झोप बर्‍यापैकी हटली होती. कारण समोरचे गृहस्थ म्हणजे तेथील नगर निगमचे उच्चपदस्थ अधिकारी श्रीयुत देवडा होते व सोबत असलेल्या बाई त्यांच्या अर्धांगिनी होत्या.
आम्ही लगबगीने उठून आमच्या खोलीत त्यांचे स्वागत केले. जमेल तसा पसारा आवरला व दडपला. दोघेही बिचारे आमच्या झोपेत व्यत्यय आणल्याने जरा संकोचले होते.
वडिलांना तेवढ्यात सुचले, ''चलिए, हम लोग गरमागरम चाय पीते है.... '' लॉजच्या रूम सर्व्हिसने लगेच आलं, वेलदोडा वगैरे घातलेला मसाला चहा पुरविला. तो वाफाळता चहा पीत असताना आमचे गोठलेले मेंदू हळूहळू वितळू लागले होते.
''हमने आप सब की कल शाम बहुत राह देखी डिनर के लिए...'' मिसेस देवडा सांगत होत्या, ''लेकिन आप लोग तो आये नही, ना कुछ खबर.... तो मैने देवडा साब को बोला भी.... आप ने जरूर कुलकर्णी साब को डिनर के लिए ठीक से इन्व्हाईट नही किया होगा.... शायद बुरा मान गए वह....''
आमच्या पिताश्रींचा चेहरा एव्हाना भांबावल्यासारखा झालेला... त्यांनी श्रीयुत देवडांकडे वळून पृच्छा केली, '' देवडा साब, अगर आप बूरा न माने तो एक बात पूंछू?'' त्यांच्या रुकारासरशी वडिलांनी बिचकतच विचारले, ''आप ने तो आज के दिन खाने पे बुलाया था नं? मैने आप को बोला भी था शायद की आज दोपहर शादी का इतना हेवी खाना खाने के बाद हम लोग डिनर कर पाएंगे या नही, पता नही...''
आता देवडासाहेबही बुचकळ्यांत पडलेले दिसू लागले. ''माफ कीजिये जनाब, लेकिन शादी तो कल थी...''
''आँ??!!!'' आमच्या चौघांच्या चेहर्‍यावर एक निर्बुद्ध प्रश्नचिह्न.
''क्या मजाक कर रहे है देवडाजी.... अभी तो दोपहर को आए हम शादी का खाना खा के....'' आई न राहवून उत्तरली.
जरा वेळ हे वाग्युद्ध असेच चालू होते. शेवटी देवडांनी लॉजच्या मॅनेजरला बोलावले.
''भाईसाब, इनको बताइए जरा आज कौन सी तारीख है....''
मॅनेजराने सांगितलेली तारीख ऐकल्यावर आमची पार दाणादाण उडाली! ह्याचा अर्थ काल दुपारी दीड - दोनच्या दरम्यान परत आल्यावर आम्ही जे झोपलो ते थेट आजच्या तारखेला दुपारी चार वाजता उठलो??? कसं शक्य आहे हे? थंडी असली, जास्त जेवण झालं म्हणून काय झालं? इतकी गाढ कुंभकर्णाची झोप कशी काय लागली? मधल्या काळात वाजलेला फोन, ठोठावले गेलेले दार.... काही म्हणजे काहीही ऐकू न येण्याइतपत??
त्या सायंकाळी देवडा पती-पत्नींच्या आग्रहाखातर आम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या खास मध्य प्रदेशी शैलीच्या आदरातिथ्याचा आनंद घेतला. पण डोके अजून जडावलेलेच होते. आपले चोवीस तास असे झोपेत कसे काय गेले ह्याचे समाधानकारक उत्तर मिळत नव्हते.
एवढी काळझोप कशी काय लागली?
डोक्याचा मद्दडपणा, अंगात जाणवणारा जडशीळपणा अजून का जात नाहीए?
दुसरे दिवशी सकाळी आम्ही राहत असलेल्या लॉजच्या खालील प्रल्हाद भोजनालयातील प्रसंग. नाश्त्याचे वेळी परवाच्या लग्नाला आलेले आणि वडिलांच्या ओळखीचे एक सद्गृहस्थ भेटले. आम्हाला पाहिल्यावर आपल्या पांढर्‍या झुबकेदार मिशांतून मिश्किलपणे हसत ते माझ्या वडिलांना विचारू लागले...'' क्या कुलकर्णी साब.... हमने तो सुना की शादी की मिठाई बहुत पसंद आयी आपको? सुना है की गहरी नींदमें आप देवडाजी के यहां डिनर करना भी भूल गए.... हा हा हा.... ''
एव्हाना वडिलांना काहीतरी काळेंबेरे असल्याचा दाट संशय येऊ लागला होता.
त्यांनी भुवया उंचावून, डोळे बारीक करून ''आपण त्या गावचेच नाही'' असा चेहरा केला. पण समोरचे सद्गृहस्थ त्यांच्यापेक्षा वीस-पंचवीस पावसाळे जास्त पाहिलेले असल्यामुळे मागे हटणार्‍यातील नव्हते.
''कमाल है भई, आप को किसी ने बताया नही....'' समोरच्या वाफाळत्या मलईदार मसाला दुधाचा एक घुटका घेऊन त्या सद्गृहस्थांनी आपले वाक्य तसेच हवेत तरंगत सोडून दिले.
एव्हाना वडिलांच्या चेहर्‍यावर तेच ते चिरपरिचित गोंधळलेले भाव येऊ लागले होते.
''क्या... क्या बात बतानी चाहिए थी?'' वडिलांचा पेचात पडलेला स्वर.
''अरे जनाब, जैसी यहां की शादी खास होती है वैसे ही शादी की मिठाई भी खास होती है.....''
''तो?'' वडिलांचा प्रश्न.
''अरे भई, अब भी समझे नहीं?'' वडिलांची मुंडी नकारार्थी हालताना पाहून त्यांनी डोळे मिचकावून वडिलांना जवळ यायची खूण केली.
''क्या?''
''अरे भाया, समझा करो.... यह मिठाई ऐसी वैसी नही होती.... हमारे यहां उसमें भंग मिलाते है शादी ब्याह के वक्त! अब यह मत कहना कि आप भंग वगैरा जानते नही.... वही जय भोलेनाथ वाली.... तो शादीकी भंगवाली मिठाई खाके बहुत मस्त हो जाते है लोग... महा स्वादिष्ट जो होती है ऐसी मिठाई... जितनी खाओ उतनी कम लगती है.... भंग का असर जो होता है...''
एव्हाना त्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत असलेल्या मातृदैवताचा चेहरा प्रेक्षणीय झाला होता!
''काऽऽय? भांग?? अहो, ते भांगच म्हणताहेत ना? म्हणजे त्या परवाच्या लग्नाच्या मिठाईत भांग होती? आपण सगळ्यांनी भांग घातलेली मिठाई खाल्ली??'' मातृदैवत वडिलांची बाही खेचून फुसफुसू लागले. वडिलांच्या चेहर्‍यावर मात्र गेले दोन दिवस तरळत असलेले प्रश्नचिन्ह निवळून आता तिथे तरल साक्षात्काराचे तेज विलसू लागले होते. धाकट्या बहिणीला ''एवढं मोठं काहीतरी घडलं आणि तरीही कोणीच आपल्याला काही कसं सांगितलं नाही?'' ह्याची चुटपूट लागलेली स्पष्ट दिसत होती. पुढच्या प्रवासात तिने एका हलवायाच्या दुकानाच्या पिछाडीस भांग घोटा पाहून ''मला आत्ताच्या आत्ता भांगेची गोळी पायजेल ऽ ऽ'' म्हणून भर-रस्त्यात भोकाड पसरला आणि आजूबाजूच्या लोकांचे यथेच्छ मनोरंजन केले तो किस्सा वेगळाच!!
आणि मी? लग्नाच्या पंगतीत आधी खास आग्रहाने मागवून घेऊन व नंतर नंतर वाढप्याला निर्लज्जपणे पुकारून खादडलेल्या बर्फ्यांचे एक नव्हे, दोन नव्हे, ते अनेक पांढरे शुभ्र तुकडे मला मोठ्या प्रेमाने माझ्या अवतीभवती ''भांग...भांग'' ओरडत भांगडा करताना पुढचे अनेक दिवस स्वप्नात छळत होते!
--- अरुंधती