Thursday, November 26, 2009

द्रोण पत्रावळींच्या खादाड आठवणी


श्रावण-भाद्रपदाचे दिवस म्हणजे घरात विशेष पूजा, होम- हवन, धार्मिक कार्यांचे दिवस. ह्या कालाला त्यांमुळे एक वेगळाच सुगंध प्राप्त असतो. वेगवेगळी फुले, पत्री, पूजा द्रव्य, प्रसादाचे जेवण, होमाच्या धुरांचे वास स्मृतिपटलावर बहुधा कायमचे कोरून ठेवले गेलेत. निरनिराळ्या सणांच्या निमित्ताने घरात भरपूर पाहुणे जेवायला येणेही त्यातलेच! पण सध्याच्या 'फास्ट' जमान्यातील प्लास्टिक, स्टायरोफोम, फॉईलच्या ताटवाट्यांची तेव्हा डाळ शिजत नाही. आजही तिथे पत्रावळी, द्रोणच लागतात. मग भले पत्रावळीतून पातळ कालवणाचा ओहोळ जमिनीच्या दिशेने झेपावो की द्रोण कलंडू नये म्हणून त्याला पानातीलच अन्नपदार्थांचे टेकू द्यावयास लागोत! पत्रावळीतील जेवणाची मजाच न्यारी! निमित्त कोणते का असेना - अगदी पाणीकपातीपासून मोलकरणीच्या खाड्यापर्यंत! पत्रावळींचा बहुगुणी पर्याय गृहिणींचा लाडकाच!
पत्रावळींचेही कितीतरी प्रकार आहेत. त्या त्या प्रदेशात सहज मिळणाऱ्या पानांपासून पत्रावळी टाचायचे काम पूर्वी घरीच केले जायचे. पण शहरीकरणाबरोबर ह्या पत्रावळीही बाजारात आयत्या मिळू लागल्या. अर्थात म्हणून त्यांचे महत्त्व कमी झाले नाही. कधी वडाच्या तर कधी पळसांच्या पानांची असते ही पत्रावळ. एकमेकांना काड्यांनी टाचलेली ही पाने जेवणात किती अनोखा स्वाद आणतात! अनेक बायाबापड्यांचे चंद्रमौळी संसार त्यांच्या आधारावर चालतात. पंक्तींच्या जेवणाचा अविभाज्य हिस्सा ठरलेल्या ह्या पर्यावरणपूरक (तेव्हा असे शब्दही माहीत नव्हते) पत्रावळी - द्रोण घरात कार्य निघाले की आम्ही मंडईच्या मागील बाजूला जाऊन शेकड्यात आणायचो! त्या पानांचा घमघमाटही खास असतो. अन्नाच्या स्वादात लीलया मिसळणारा आणि तरीही त्याची वेगळी ओळख कायम राखणारा.
कधी केळीच्या पानावर जेवलाय तुम्ही? हिरवेगार निमुळते पान, त्यांवर देखणा सजलेला पांढराशुभ्र वाफाळता भात - पिवळेधम्म वरण, भाजी, कोशिंबीर, चटण्या, मिष्टान्ने, पापड - कुरडया... सगळी मांडणी सुबक, नेटकी. अगदी चित्र काढावे तशी. केळीच्या पानावर जेवायचा योग तसा क्वचितच यायचा, पण जेव्हा यायचा तेव्हा त्या आकर्षक रंगसंगतीला पाहूनच निम्मे पोट भरत असे. पानात वाढणी करण्या अगोदर ते पान स्वच्छ धुवून घ्यायचाही एक सोहळा असायचा. हमखास घरातील वडीलधारी मंडळी त्या वेळी आजूबाजूला असायची. मग ते पान कसे स्वच्छ धुवायचे यावर सप्रात्यक्षिक निरूपण व्हायचे! जेवण संपल्यावरही आपले खरकटे पानात गोळा करून पान अर्धे दुमडून ठेवायचे, म्हणजे वाढपी मंडळींचा घोटाळा होत नाही, हेही ठासून सांगितले जायचे. पूर्वी घराजवळ गायीम्हशींचा एकतरी गोठा हमखास असायचा, किंवा रस्त्यातून गायीम्हशींना धुंडाळून धुंडाळून आम्ही मुले त्यांच्या पुढ्यात खरकट्या पत्रावळी ठेवत असू आणि त्या पत्रावळींमधील अन्न फस्त करीत असताना मोठ्या धैर्याने व प्रेमाने त्यांच्या पाठीवरून हात फिरवत त्यांच्याशी बोलत असू. कोणत्याही सांडलवंडीची विशेष पर्वा न करता केळीच्या पानावर वाढलेल्या जेवणावर ताव मारायचे स्वप्न काही वर्षांपूर्वी जेव्हा दक्षिण भारतात प्रवासाचा योग आला तेव्हा पूर्ण झाले. अनेक ठिकाणी केळीच्या पानावर उदार हस्ते वाढलेल्या सुग्रास व वैविध्यपूर्ण दाक्षिणात्य जेवणाचा आस्वाद घेता आला व ती सफर अजूनच संस्मरणीय झाली.
पानांवरून आठवले, कर्दळीच्या पानांनाही सत्यनारायणाच्या प्रसादाच्या शिऱ्याबरोबर मिळणारा मान आगळाच! गरम गरम शिऱ्याने कर्दळीचे पान काळवंडते खरे, पण त्या प्रसादाच्या शिऱ्याची रुची अजून वाढविते. पानग्यांना येणारा हळदीच्या पानांचा गंधही अविस्मरणीय! आमच्या लहानपणी माझी आई दर रविवारी सकाळी आम्हाला देवपिंपळाच्या लुसलुशीत हिरव्यागार पानावर गरमागरम तूपभात खायला घालत असे. भाताच्या उष्णतेने पिंपळपान अक्षरशः काळेठिक्कर पडत असे! पण त्या भाताची चव अजूनही जिभेवर रेंगाळते.
मागे एकदा धर्मस्थळनामक दक्षिणेतील पवित्र क्षेत्री मंजुनाथाच्या देवळातील प्रसादाचे भोजन घेतानाची आठवण! बसायला चटया होत्या आणि समोर पानाच्या जागीही चटयाच! स्वच्छ धुतलेल्या! जेव्हा त्यांच्यावर ठेवायला केळीची पाने आली तेव्हा माझा पुणेरी जीव भांड्यात पडला. तोवर मी 'आता चटईवर वाढतात की काय' ह्या शंकेने चिंतातुर झाले होते. त्या भोजनशाळेतील बाबागाडीवजा ढकलगाडीतून बादल्यांच्या माध्यमातून आमच्या पानांपर्यंत पोचलेल्या 'सारम भातम'ची आठवण मनात आजही ताजी आहे.
सुपारीच्या झाडापासून बनवलेल्या सुंदर गोमट्या पत्रावळी मी सर्वात प्रथम बंगलोरच्या एका ख्यातनाम आश्रमातील नवरात्रोत्सवात पाहिल्या. हजारोंच्या संख्येने येणाऱ्या भक्तगणांच्या प्रसादव्यवस्थेसाठी अतिशय उत्कृष्ट! त्या वर्षी माझ्या सेवा टीमकडे पत्रावळींचे गठ्ठे खोलायचे व ओल्या अन कोरड्या फडक्याने त्यांना साफ करण्याचीच सेवा होती. असे किती गठ्ठे खोलले व पत्रावळी पुसल्या ते आता आठवत नाही. मात्र तेव्हा आमची सर्वांची बोटे पत्रावळी हाताळून काळी पडली होती एवढे खरे! सर्वात मजा परदेशी पाहुण्यांची - मोठ्या नवलाईने व कुतूहलाने ते हातात त्या पत्रावळी घेऊन त्यांना उलटून पालटून, निरखून आमच्याकडून त्यांच्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करीत होते! पुढे पुढे तशा पत्रावळी व द्रोण आपल्याकडेही मिळू लागले. आता तर आपल्याकडे ह्या द्रोणांनी मानाचे स्थान पटकावले आहे. पूर्वी द्रोणातील कुल्फी, जांभळे फक्त लोणावळ्यातच मिळायची. द्रोणातील कुल्फी खाताना निम्मी भूमातेला व कपड्यांना दान व्हायची. तरीही त्या चिकट ओघळांची तमा न बाळगता सर्व बच्चेकंपनी द्रोणातल्या कुल्फीवर तुटून पडत असे. शहरांमधून द्रोणाला फक्त देवळांमधून मिळणारे प्रसाद व हलवायाच्या दुकानातील मिठाई-फरसाणातून मिरवता यायचे. पण आता तर भेळवाल्यांपासून चाट, पाणीपुरी, रगडा विकणारे 'पार्सल' साठी द्रोणाला पसंती देतात. इतकेच काय तर 'खैके पान बनारसवाला' वाले पानही द्रोणांतून मिळते. आपण 'विडा' खातोय की एखादी स्वीटडिश असा प्रश्न पडण्याइतपत मालमसाला त्यात ठासून भरलेला असतो.

द्रोणांचे तरी आकार किती असावेत! बनवणाऱ्याच्या मर्जीने व बनवून घेणाऱ्याच्या गरजेनुसार त्यांची आकृतीही बदलत जाते. उज्जैनला एका रम्य गारठलेल्या धुके भरल्या सकाळी हातगाडीवर घेतलेल्या उभट हिरव्या द्रोणातील 'पहुवा' (पोहे) व शुद्ध तुपातील गरम इम्रतीची आठवण अशीच कधी थंडीच्या दिवसांत हुरहूर लावते.
आयुष्यातील खाद्यप्रवासात आपल्या ह्या द्रोण पत्रावळींना नक्कीच कोठेतरी खास महत्त्व आहे. एरवी त्यांची आठवण आल्यावाचून राहत नाही आणि सणासुदींच्या दिवसांत त्यांचे अस्तित्व उत्सवाला अजून रंगत आणते. बारशापासून सुतकापर्यंत साथ निभावणाऱ्या ह्या द्रोण पत्रावळींनी पुढील काळातही आपले अस्तित्व असेच जोपासावे व त्यांना भरभरून लोकाधार मिळावा हीच मंगलकामना!
--- अरुंधती

Friday, November 20, 2009

पावसात चिंब व्हावे



पावसात चिंब व्हावे 
वेध नभीचे लागावे 
अनंताच्या पसार्‍यात 
देवा तुझे गीत गावे ||

हिरव्याची नवलाई 
पर्णसंभारी फुलोनी 
उमलत्या कलिकांनी 
तुझ्या श्वासे बहरावे ||

माझ्या केतकी मनाला 
तुझे सुगंधाचे दान 
त्याच्या रोमांरोमांतून 
देवा घडो तुझे ध्यान ||

असा वर्षाव जो व्हावा 
देह आभाळीच ल्यावा 
माती मातींत सुगंधे 
त्याचा मुक्त शिडकावा ||
-- अरुंधती

Wednesday, November 18, 2009

सिंहगडावर चढाई! एक प्रत्यक्ष अनुभव!

आयुष्यात मराठी माणसाने एकदा तरी सिंहगड चढावा. हे माझे स्वाभिमानाचेच नव्हे तर स्वानुभवाचे बोल आहेत. खास करून आपल्या मित्रमैत्रिणींच्या बरोबर घाम गाळत, धापा टाकत, हाकारे पिटारे देत पायथ्यापासून गड चढण्यात जी काय मजा आहे ती अनुभवूनच पाहावी!

असेच आम्ही मित्रमैत्रिणी जूनच्या एका रविवारच्या भल्या सकाळी सारसबागेपाशी सिंहगडाकडे नेणाऱ्या एस. टी. च्या प्रतीक्षेत एकत्र जमलो होतो. एरवीचा, आरामात आपापल्या गाड्यांनी सिंहगडाच्या वाहनतळापर्यंत थेट पोहोचून शरीराला फारसे कष्ट न देता निसर्गनिरीक्षण व खादाडी करून परत फिरण्याचा राजमार्ग त्यागून आमच्याचपैकी कोण्या बहाद्दराच्या सुपीक डोक्यातून असे 'वेगळे' आऊटिंग करण्याची अफलातून कल्पना चमकली होती. सगळेजण मोठ्या उत्साहात निघाले तर खरे, पण आम्हाला गडाच्या पायथ्याशी सोडून एस. टी. धुरळा उडवीत जणू वाकुल्या दाखविल्याप्रमाणे अंतर्धान पावली तशी एकेकाने वर गडाकडे दृष्टिक्षेप टाकला आणि एक दीर्घ श्वास घेत मोठ्या धैर्याने गडचढणीस आरंभ केला!

आमच्या कंपूमध्ये साधारण पंचेचाळीस वर्षाची प्राजक्ताची मावशी, अशोकच्या शेजारी राहणारे करंदीकर आजोबा, परागची वय वर्षे १४ व १२ ची २ भाचरे आणि आम्ही १०-१२ मित्रमैत्रिणी असे वैविध्यपूर्ण लोक ठासून भरले होते. मावशींचे वजन जरा अंमळ जास्तच होते, पण त्यांचा उत्साह लाजवाब होता. पाठीवरच्या सॅकमधील पाण्याच्या बाटल्यांचे ओझे सांभाळत सांभाळतच आम्ही मार्गक्रमणा करीत होतो. माझा 'गिर्यारोहणाचा' अनुभव म्हणजे अधून मधून कधीतरी टंगळमंगळ करीत आरामात पर्वती चढणे. म्हणूनच की काय, मराठी मावळ्यांच्या ताकदीला आणि काटकपणाला मनोमन अभिवादन करीत मी घाम पुसत पायऱ्या चढत होते. आमच्यातील ४-५ सराईत वीर माकडांप्रमाणे टणाटणा उड्या मारत पाहता पाहता झपाझप दिसेनासे झाले. एव्हाना आमची विभागणी साधारण ३ गटांमध्ये झालेली! रोजच्या व्यायामाची सवय असलेला, उत्साही गट; मध्यममार्गाचे अनुसरण करणारा आशावादी गट आणि सगळ्यांत मागे असलेला, पाय ओढत - धापा टाकत रेंगाळत चालणारा दिरंगाई गट. अस्मादिकांची वर्गवारी कोणत्या गटांत झाली हे सुज्ञांस सांगणे नलगे!

२०-२५ मिनिटांच्या दमछाक करणाऱ्या चढणीनंतर प्राजक्ताच्या मावशीने अचानक वाटेतच बसकण ठोकली. "पुरे झालं बाई आता! माझ्यात काही अजून वर चढण्याची ताकद नाही! " घामाने डबडबलेल्या मावशी धपापल्या. आजूबाजूला कोंडाळे करून उभ्या आमच्या डोळ्यांसमोर मात्र आता या भारदस्त महिलेस उचलून वर न्यावे लागणार की काय ह्या कल्पनेने भरदिवसा काजवे चमकले. "मावशी, तुम्ही आधी जरा पाणी प्या आणि शांत व्हा पाहू! प्राजक्ता, अगं मावशींना वारा घाल म्हणजे थोडं बरं वाटेल त्यांना!" आमच्यातील एक हुशार वीर उद्गारले. आमचा घोळका अडेल म्हशीसारखा जागीच हंबरत थबकल्याचे लक्षात येताच पुढच्या वळणावर पोहोचलेले काही जण "काय झाले? "सदृश खाणाखुणा करीत पुनश्च माघारी आले. थोडावेळ प्रश्नोत्तरांची देवाणघेवाण चांगलीच रंगली. "मावशी, दम गेला का आता? चला, आम्ही बरोबर आहोत तुमच्या... लवकर निघालो की लवकर पोचू वर! " अशा धीराच्या बोलण्याने मावशींची समजूत काढत आमचा तांडा तेथून मार्गस्थ झाला.

लिटरच्या लिटर पाणी ढोसत, मांड्या - पोटऱ्यांच्या बंडाकडे साफ दुर्लक्ष करत, बरगड्यांजवळून येणाऱ्या कळांना मराठ्यांच्या शौर्याची शपथ देत व मनातल्या मनात घरी परतल्यावर रोज सकाळी नियमित व्यायामाचा सुनिश्चय बाळगत आम्ही स्वतःला पुढे ढकलत होतो. करंदीकर आजोबा मात्र तुडतुडीत हरणाच्या चपळाईने आमच्या पुढे होते. मध्येच दीपाला चक्करल्यासारखे झाले. लगेच तत्परतेने अजून एक 'ब्रेक' घेण्यात आला. कोणी तिला आपली धूळ व आणखी कशाकशाने माखलेली पादत्राणे हुंगविली, कोणी लिमलेटच्या गोळ्या चारल्या तर कोण्या स्वयंघोषित 'डॉक्टर'ने तिला 'अमुक ऍक्युप्रेशरचा पॉंईंट दाब म्हणजे बरे वाटेल' इत्यादी मौलिक सूचना दिल्या. एव्हाना उन्हे चांगलीच कडकडली होती. अनेक सराईत व नवखे हौशे गौशे गडप्रेमी आमच्या एकमेकांना रेटत मुंगीच्या गतीने सरकणाऱ्या कडबोळ्याकडे मिष्किलपणे पाहत आम्हाला मागे टाकून सरसर पुढे जात होते. आमच्या जवळून जाणाऱ्या एका ग्रामस्थाच्या डोईवरील पाटीत दह्याची मडकी आहेत हे कळल्यावर आम्हाला साक्षात अमृतकुंभ गवसल्याचा आनंद झाला. बाजूच्या झाडाच्या सावलीत हाश्शहुश्श करीत देह लोटून देत आम्ही एकदिलाने दह्याचा फन्ना उडविला. आमची गलितगात्र अवस्था पाहून त्या ग्रामस्थालाही दया आली असावी. कारण आपल्या पाटीत रिकामी मडकी गोळा करून जमा झालेले पैसे कनवटीला बांधताना तो गालातल्या गालात हसत म्हणाला, "आता येकदम थोडक्यावर राह्यला बघा गड!" त्याच्या शब्दांनी काय धीर आला म्हणून सांगू! अंगात जणू हजार हत्तींचे बळ संचारले. जणू नरवीर तानाजी मालुसरेंच्या अपार शौर्याची पुसटशी झुळूक आम्हा थकल्याभागल्या व पस्तावलेल्या वीरांना अखेरच्या टप्प्यासाठी आवश्यक ताकद देत होती!

अखेर तो सुवर्णक्षण आला! ज्या पळाची आम्ही मनापासून आसुसून वाट पाहत होतो, जे सिंहगडाच्या मुख्य दरवाज्याचे व वाहनतळाजवळील पिठलंभाकरी, कांदाभजी विकणाऱ्या टपऱ्यांचे चित्र मनःचक्षुंसमोर रंगवीत आम्ही तो विशाल भूखंड पादाक्रांत केला होता ते सारे सारे आमच्या नजरेच्या टप्प्यात आले. मावशीबाईंनी तर मोठा नि:श्वास टाकून त्यांचा देह एका टपरीबाहेरच्या प्लास्टिकच्या खुर्चीत लोटून दिला. आमच्या अगोदर गडावर पोहोचलेली मंडळी खाऊनपिऊन, विश्रांती घेऊन गडावर फेरफटका मारून येण्याच्या बेतात होती. त्यांना मानेनेच 'जा' अशा अर्थी खुणा करून आम्ही श्रांत क्लांत जीव श्वास पूर्वपदावर येण्याची प्रतीक्षा करण्यात मग्न होतो. अचानक आमच्यातील कोणीतरी किंचाळले, "ए, ते बघ, काय सॉल्लिड देखावा आहे!" चमकून आमच्या सर्वांच्या नजरा समोर वळल्या, आणि खरेच की! ज्या निसर्गरम्य डोंगररांगांना व वृक्षराजीला पाहण्याच्या अट्टहासापायी आम्ही हा थोर पराक्रम केला होता, ते सारे सृष्टीचे सुंदर स्वप्न आमच्या नजरांपुढे सुहास्यवदनाने उभे ठाकले होते. संपूर्ण चढणीत ह्या 'आरोहण' कल्पनेच्या आमच्या टोळक्यातील 'शिल्पकारा'वर मनस्वी सूड घेण्याचे माझे सर्व बेत तात्काळ तिथल्या तिथे मावळले आणि परतीच्या उतरणीपेक्षाही अधिक वेगाने मन पुढच्या प्रवासाचे बेत आखू लागले.

-- अरुंधती

बीटी चा बडगा


कोंकणात लहान मुलांना हमखास सांगण्यात येणारी एक मजेशीर गोष्ट माझी आजी आम्हां सर्व नातवंडांना रात्री सांगायची.

गोष्टीतला गरीब शेतकरी घरात भाजी नसते, म्हणून बायकोच्या सांगण्यावरून गावातल्या सधन माणसाच्या वाडीवर लपत-छपत जातो. तिथे गेल्यावर वाडीतून भाजी चोरायचे त्याला येते दडपण! मग तो जणू त्या वाडीशीच संवाद साधत असल्याप्रमाणे तिला भाजी नेण्याची परवानगी विचारतो आणि स्वतःच वाडीच्या वतीने उत्तरेही देतो.... त्यांचा हा मजेशीर संवाद आजी रंगवून रंगवून सांगायची.... "वाडी गं बाई वाडी.... " "काय म्हणतोस रे फुल्या तरवाडी? " (फुल्या तरवाडी हे शेतकऱ्याचे नाव) "वांगी नेऊ का गं, दोन-चार? " "आरं, ने की धा बारा... " पुढे अनेक वर्षांनी ही गोष्ट विशेष लक्षात राहण्याची अनेक कारणे असली तरी त्यातील त्या गरीब शेतकऱ्याची असहाय अवस्था आणि वांग्यांच्या चोरीसाठी त्याने स्वतःची घातलेली समजूत कोठेतरी मनास स्पर्शून गेली. सध्या बी. टी. वांगी प्रकरण गाजत आहे. निसर्गाच्या नियमांना धाब्यावर बसवून अल्पकालीन फायद्यांसाठी दीर्घ मुदतीचे नुकसान दर्शवणारी बी. टी. वांगी सरकारकडून हिरव्या कंदिलाच्या प्रतीक्षेत आहेत. अनेक पर्यावरण अभ्यासकांनी, कृषी वैज्ञानिकांनी बी. टी. वांग्यांना भारतात आणण्यासाठी स्पष्ट विरोध केला आहे. तरीही वांग्याच्या गुणसूत्रांमध्ये अनैसर्गिक बदल घडवून आणून त्याद्वारे आर्थिक फायदा घडवून आणण्याचा ह्या वांग्यांचा उदो उदो करणाऱ्या कंपन्या व अधिकाऱ्यांचा दावा कितपत योग्य आहे यावर भारतात अजूनही नीट संशोधन झालेले नाही. बाकीच्या अनेक देशांत गुणसूत्रांमध्ये अनैसर्गिक बदल घडवून अन्नोत्पादन करण्यास कडक बंदी आहे. परंतु भारतातील काही अधिकारी मंडळी त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. ज्या देशांमध्ये असे अन्नपदार्थ विकले व उत्पन्न केले जातात तेथील नागरिकांच्या आरोग्याच्या गंभीर समस्या गेल्या काही वर्षांत निर्माण झाल्या आहेत. असे असताना बी. टी. चा अट्टाहास भारतात का? ह्यापूर्वी भारतात बीटी कापसाचे उत्पादन यशस्वी झाले आहे असा युक्तिवाद काही मंडळी करतात. परंतु कोठे कापूस आणि कोठे लोकांच्या पोटात जाणारी, गोरगरीबांना परवडणारी, प्रचंड खपाची वांग्यासारखी भाजी!! बी. टी. वांग्यांचे तब्येतीवर काही संभाव्य परिणाम असे सांगितले जातात : १. प्रतिकारशक्ती कमी होणे २. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, रोग्यांना जास्त धोका ३. एलर्जीज ४. यकृत, मूत्रपिंडांचे आजार असणाऱ्यांना हानीकारक तरीही हे सर्व अल्पकाळात दिसून येणारे परिणाम आहेत. काही अभ्यासक याहीपुढे जाऊन सांगतात की दीर्घकाळात अशा अन्नामुळे अनेक गंभीर आजार होण्याचा संभव आहे. असे असताना विषाची परीक्षा कशाला? महिकोसारख्या बहुराष्ट्रीय कंपनीने जी. एम. तंत्रज्ञानाने विकसित केलेल्या बी. टी. वांग्यांचे बियाणे आपल्याला विकता यावे म्हणून मोठ्या नेटाने रेटा लावला आहे. परंतु जर व्यावसायिक दृष्ट्या या वांग्यांचे उत्पादन करण्याची परवानगी मिळाली तर गेली अनेक शतके भारतात उपलब्ध असलेल्या देशी प्रजातीच्या वांग्यांवर गदा येणार आहे. त्यांचे अस्तित्व संपुष्टात येण्याची भीती आहे. शिवाय ज्या रोग, किडींवर उपाय म्हणून बीटी चा गवगवा केला जात आहे त्या रोगांवर सेंद्रीय शेती पद्धतीत उपाय आहेत. ही बी. टी. वांगी बाजारात आली तर ती इतर देशी वांग्यांपासून वेगळी ओळखता येणे अशक्य आहे, एवढे त्यांच्या रंगरूपात साधर्म्य आहे! हे सर्व वाचनात आले मात्र, आणि मी अस्वस्थ झाले!! उगीचच लहानपणीच्या ऐकलेल्या त्या कथेतील भाबडा, गरीब फुल्या तरवाडी आठवला. ती वांग्याचे पीक असणारी वाडी डोळ्यांसमोर आली. त्याच्या घरातील भुकेली लेकरे, अस्वस्थ माय आणि आजही आपल्या खपाटलेल्या पोटाला चिमटा काढून किडूकमिडूक शेतीत आपल्या कुटुंबाची कशीबशी गुजराण करणारा अडाणी शेतकरी यांच्यामध्ये मनात तुलना सुरू झाली. फक्त एकच गोष्ट जाणवली : कथेतील फुल्या तरवाडीच्या परिस्थितीविषयी आपण काहीही करू शकत नाही. पण आजच्या शेतकऱ्याची, गरीब माणसाची फसवणूक न होऊ देणे आपल्या हाती आहे. चूक घडण्याअगोदरच जर सावरता आले तर त्यातून आपल्या देशाचेच भले होणार आहे. आता गरज आहे ती शास्त्रशुद्ध, निःपक्षपाती, पारदर्शी व प्रदीर्घ संशोधनाची, व त्या संशोधनाचे निष्कर्ष जनताजनार्दनासमोर पोहोचत नाहीत तोवर बीटी वांग्यांसारख्या कोणत्याही अनैसर्गिक उत्पादनाला भारतात सक्त मज्जाव करण्याची!
--- अरुंधती

Tuesday, November 17, 2009

रंगीत साड्या


वर्ष होते महाराष्ट्र दिनाच्या (१ मे) रौप्यमहोत्सवाचे! त्यानिमित्त पोलिस परेड मैदानावर होणाऱ्या कार्यक्रमातील आंतरशालेय लेझीम पथकात आमच्या वर्गातील काही मुलींची माझ्यासकट निवड झाली. वार्षिक परीक्षा संपल्यामुळे चौखूर उधळलेल्या गुरांच्या उत्साहात आम्ही सरावासाठी एका प्रथतयश शाळेच्या मैदानावर एकत्र जमू लागलो. पहिल्यात दिवशी प्राथमिक सरावानंतर आमच्या प्रशिक्षक लोकांनी सर्व मुलींना दुसऱ्या दिवशीपासून केसांचे अंबाडे घालून येण्यास सांगितले. माझ्यासारख्या आखूड केसधारी बालांसमोर आता काय करायचे असे मोठे प्रश्‍नचिन्ह उभे राहिले.
तत्काळ तुळशीबागेतून तयार अंबाडे, गंगावने, आकडे, पिना, रिबिनींची जंगी खरेदी झाली. दुसऱ्या दिवशी आपापल्या शाळांचे युनिफॉर्म, पायात बूट-मोजे व मानेवर डुगूडुगू हलणारे अंबाडे अशा अवतारात भर उन्हात घाम गाळत आम्ही सरावासाठी हजर झालो. त्यानंतरचे चार-पाच दिवस पथकातील सर्व मुलांची (व थोडीफार आमची देखील!) बेहद्द करमणूक झाली.
सराव ऐन भरात आलेला असताना मुलींचे अंबाडे धडाधड गळून खाली पडत. कोणाचे गंगावन सुटून चरणाशी लोळण घेई, तर कोणाच्या लत्ताप्रहाराने खाली पडलेला अंबाडा फुटबॉलप्रमाणे उडून शेजारच्या रांगेत जाऊन पडे. एका क्षणात भरगच्च केशसंभाराचे आखूड गवतात रूपांतर होई. एक-दोन मुली शरमून रडू लागल्याचंही मला आठवतंय. अंबाड्याला सरावल्यावर नंतरचा आदेश आला तो पाचवारी साडीची दुटांगी पद्धतीने (कोळिणी नेसतात तशा काहीशा पद्धतीने) नऊवारी नेसून येण्याचा! आधीच घरातील आया, ताया, मावशा, काकवांच्या गंगावनांवर डल्ले मारून झाले होते. त्यात आता साडीची भर! दुसऱ्या दिवसापासून शाळेच्या युनिफॉर्मचा ब्लाऊज, दुटांगी साडी, पायात बूट मोजे व मानेवर अंबाडा अशा रम्य अवतारात आम्ही मुली सरावासाठी दाखल झालो.

हळूहळू त्याचीही सवय झाली. एक मेच्या एक-दोन दिवस अगोदर आम्हाला कार्यक्रमात नेसण्यासाठीच्या साड्या व नकली अलंकारांचे (पुतळीमाळ, डूल इ.) वाटप झाले. कार्यक्रमाचा दिवस उजाडला. भरपूर सराव, दिमाखदार रचना व सळसळता उत्साह यामुळे आमचा लेझीम कार्यक्रम मस्त होणार यात शंकाच नव्हती! सर्व मुली नऊवाऱ्या नेसून नकली अलंकार घालून नटून थटून, अंबाड्यावर गजरे मिरवीत समारंभस्थळी पोचल्या होत्या. मुलेदेखील पांढऱ्याशुभ्र सलवार कुडत्यांत व लाल-भगव्या फेट्यात उठून दिसत होती. आमचा कार्यक्रम छानच पार पडला. अभिनंदनाचा वर्षाव झेलत आणि श्रमपरिहारार्थ दिलेल्या खाऊचा फन्ना उडवीत आम्ही घरी निघालो. घरी आल्यावर मी साडी बदलली तो काय- साडीच्या कच्च्या रंगामुळे तिचा सगळा पिवळा रंग माझ्या अंगावर उतरलेला! संध्याकाळी पथकातील दुसरी मैत्रीण भेटली. ती तर "आरक्तवर्णा' म्हणजे लालमहाल झाली होती. तिची साडी लाल रंगाची होती ना!
दुसऱ्या दिवशी शाळेत गेलो तेव्हा तिथे आमच्याचसारख्या लाल, पिवळ्या, हिरव्या रंगांच्या मैत्रिणी पाहून आम्हाला हसून हसून कोसळावे, की शरमेने बेजार व्हावे ते समजत नव्हते. अखेरीस आमच्या शिक्षिकांतर्फे आम्हाला निरोप आला की सर्व लेझीम पथकातील मुलींनी त्यांना मिळालेल्या साड्या शाळेच्या लोकनृत्यसंघाच्या रंगपटासाठी शाळेत जमा कराव्यात, झाडून सगळ्या मुलींनी ताबडतोब दुसऱ्या दिवशी त्या साड्या शाळेत जमा केल्या आणि एकमेकींच्या रंगीबेरंगी वर्णाची यथेच्छ टिंगलटवाळी करीत सुटकेचा निःश्‍वास सोडला!
महाराष्ट्र दिनाचे रौप्यमहोत्सवी वर्ष आम्हा सर्व मुलींना अशा वेगळ्या तऱ्हेने संस्मरणीय ठरले.!!

--- अरुंधती
(सकाळ मुक्तपीठ मध्ये माझा छापून आलेला लेख) http://beta.esakal.com/2009/05/13160641/muktapeethe-experience-about-s.html
My Master Poojya H. H. Sri Sri Ravi Shankar ji!

Monday, November 16, 2009

आक्रसलेल्या क्रोशाची चित्तरकथा

तसे अधून-मधून मला सर्जनशीलतेचे झटके येत असतात. कधी त्यांची परिणिती काव्य-लेख-निबंधांत होते तर कधी एखादी 'अनवट' कलाकृतीआकार घेते! येथे 'अनवट' शब्दाचा अर्थ 'जरा हट के' असा आहे हे सुज्ञांनी समजून घ्यावे. चांगलया मशागत केलेल्या जमिनीत ज्या जोमाने तणउगवते त्याहीपेक्षा अधिक जोमाने माझ्या सुपीक डोक्यातून अनेक हरहुन्नरी विचारांचे पीक निघत असते. मग त्यासाठी एखादीच ठिणगी पुरेशीअसते.... भुस्सदिशी विचारांचा जाळ उमटतो आणि त्याचे पर्यवसान अनोख्या 'कला(? )कृती'मध्ये होते!! अशीच परवा टी. व्ही. चॅनल्समधून दमछाक होईस्तोपर्यंत येरझारा घालताना माझी नजर एका चॅनलवर थबकली. एक देखणी, सालंकृत ललना तिथे प्रेक्षकांना तिने बनवलेल्या क्रोशाच्या पिशव्या, पर्सेस, रुमाल वगैरे मोठ्या अभिमानाने व उत्साहाने दाखवत होती. झाले! ठिणगी पडली!! मला फार पूर्वी मी बनवलेल्या क्रोशाच्या वस्तूंची आठवण झाली. घाईघाईने मी कपाटे हुडकायला सुरुवात केली. बऱ्याच खटपटी-लटपटींनंतर लक्षात आले की आपण त्यांतील बऱ्याच वस्तू कोणाकोणाच्या हातांत कोंबल्या आहेत..... व त्यांच्या प्रतिक्रियेसाठी क्षणभरही प्रतीक्षा न करता तिथून काढता पाय घेतला आहे!!! पण अशा बेइमान स्मृतींनी नाउमेद होणे आमच्या रक्तात नाही बरे! म्हणूनच, कपाटातील कपड्यांच्या अक्षम्य उलथापालथीनंतर जेव्हा मम हाती एवढे दिवस तोंड लपवून बसलेली क्रोशाची सुई लागली तेव्हा माझा आनंद गगनात मावेनासा झाला! 'हेच ते हेच ते हेच ते चरण अनंताचे' अशा गाण्याच्या लकेरी घेत मी एका कोपऱ्यातील प्लॅस्टिकच्या पिशवीतील दुर्लक्षित लोकरीच्या गुंड्यांकडे माझा मोर्चा वळवला. येथे मी विनम्रपणे नमूद करू इच्छिते की माझ्या एका मावसबहिणीचा लोकरी कपडे विणण्याचा व्यवसाय असल्यामुळे तिच्या कृपेने आमच्या घरी कधीच लोकरीचा तुटवडा भासत नाही. तिच्या कपडे विणून उरलेल्या लोकरीला खासा न्याय देण्याचे धार्ष्ट्य मी वेळोवेळी माझ्या 'अनवट कलाकृती'च्या माध्यमातून समस्त जगताला दाखवून देत असते. असो. तर आता लोकरही सापडली होती, आणि क्रोशाची सुईदेखील! माझ्यासारख्या अट्टल कलावंताला दुसरे काय लागते! तत्काळ माझ्याकोमल, कुशल हस्तांनी टाके विणायला सुरुवात केली. औदार्याचा जन्मजात वस्तुपाठ मिळाल्याने आपण विणताना टाके मोजावेत, आकारठरवावा असे माझ्यासारख्या मनस्वी कलावंताला शोभून दिसत नाही. मग कितीही टाके गळाले, उसवले, आक्रसले किंवा ढिले पडले तरीबेहत्तर.... आम्ही आमच्या कलेशी कोणतीही तडजोड करीत नाही! एक लोकरीचा गुंडा संपला तर दुसऱ्या रंगाचा गुंडा घ्यायचा.... अगदीविणीच्या एका ओळीच्या मधोमधदेखील! पारंपारिक, संकुचित दृष्टीच्या पल्याड जाऊन धाडस दाखवणाऱ्यालाच खरी कला उमगते असेम्हणतात. कदाचित म्हणूनच मी क्रोशाच्या बारीकशा सुईच्या माध्यमातून माझी बेदरकार, धाडसी वृत्ती जगाला दाखवून देत असावे! तर, अशा वर्णनातून वाचकांना जो अर्थबोध व्हायचा तो एव्हाना झाला असेलच... हिरव्यागार, पोपटी रंगाचे दोन मोठे लोकरी गुंडे माझ्यासमोर आ वासून पडले होते.... त्यांच्या डोळ्यांत भरणाऱ्या (की खुपणाऱ्या? ) रूपाकडेदुर्लक्ष करीत मी दात-ओठ खाऊन त्यांच्या मूक आव्हानाला प्रतिसाद देत होते. टाक्यांमागून टाके, ओळींमागून ओळी, विणलेल्या खांबांमधूनलपंडाव खेळताना मी जणू देह-काळाचे भानच विसरले होते. अर्जुनाला जसा पोपटाचा डोळा दिसत होता तशी मला फक्त पोपटी लोकर दिसतहोती. झरझर धावणाऱ्या हातांमधून एक गोजिरा आकृतिबंध जन्म घेत होता. येणारे-जाणारे माझी ही (अ)घोर तपश्चर्या पाहून (बहुधा)कौतुकाने तोंडातून 'च च' असले काहीसे उद्गार काढून मला प्रोत्साहन (की सांत्वना? ) देत होते. वडिलांना वाटले मी त्यांच्यासाठी खासहिवाळ्याच्या मुहूर्तांवर मफलर विणत आहे! तसे त्यांनी बोलूनही दाखवले. परंतु अहोरात्र माझ्या लोकरी कलाकृतीच्या आराधनेत (शब्दशः)गुंतलेल्या मला त्यांचे शब्द जाणवले तरच नवल! तर असेच तीन दिवस गेले. बाकीचे जग आपापल्या दिनक्रमांत गुंग होते.... पण माझ्या तारवटलेल्या डोळ्यांना एकच लोकरी स्वप्न दिसत होते. बघता बघता अर्धा हात लांबीचा, सुबक विणीचा एक देखणा चौकोन तयार झाला होता. वडील अधून-मधून त्याच्याकडे अनिमिष दृष्टीने पाहत 'वा! छान! ' असले काहीसे उद्गार काढत. पण मला त्यांमागील मर्म उमगत नव्हते. त्या चौकोनातून मस्तपर्स साकारेल अशा दिवास्वप्नांत मी गढले होते. लोकरीचे गुंडे संपत आले तसे माझे विणकामही संपुष्टात आले. चौकोन शिवून घेतला. त्याच्या कडांना दोन सुंदर गोफ विणूनअडकावले... पण माझी पर्स अचानक झोळीप्रमाणे मध्यावर खचू लागली... आ वासलेले तिचे तोंड मिटता मिटेना! गोफांचे ठिकाण बदलून पाहिले, परंतु एकदा रुसलेली पर्स माझ्यामनातला आकार घेईना.... अशीच खटपटत असताना पिताश्रींची नजर माझ्या हातातील केविलवाण्या दिसणाऱ्या आकारावर पडली. "हेकाय?!! तू मफलर नाही बनवलास? " त्यांचा प्रश्न आत्ता कोठे माझ्या ध्यानात येत होता. मीही मग ओशाळे हसत "अहो, लोकरच संपली! " अशी सारवासारव केली. अखेर माझ्या सर्व प्रयत्नांना त्या आडमुठ्या पर्सने दाद न दिल्याने मीही तिला रागारागाने तिचे गोफांचे अलंकार काढूनविणकामाच्या पिशवीत पुन्हा ढकलून दिले. रात्री त्या फसलेल्या पर्सच्या विचारांनी डोळ्याला डोळा लागत नव्हता. काय योजिले होते आणि काय घडले! केवढी ही घोर फसवणूक!! मनाचीसमजूत घालूनही मन जुमानत नव्हते. ती पोपटी लोकर माझ्या मिटल्या पांपण्यांआडून मला वाकुल्या दाखवीत होती. क्रूर! निष्ठुर!! तिलाआता चांगलाच धडा शिकवावा हा विचार मनास चाटून गेला आणि मी अंथरुणावरच ताडकन उठून बसले. वडिलांना जोरात हाक मारली. तेबिचारे झोपायच्या तयारीतच होते. ते 'काय गं? ' असे विचारत आले मात्र, आणि मी जादूगाराच्या पोतडीतून काढावी तशी ती अडेलतट्टू पोपटीबिनबंदाची पर्स पिशवीतून काढून त्यांच्यासमोर धरली. त्यांनी माझ्याकडे बुचकळलेल्या नजरेने पाहिले. तो शिवलेला चौकोन मी त्यांच्याहातांत कोंबला व मोठ्या ऐटीत उद्गारले, "बघा बरं, डोक्याला बसते आहे का ही टोपी... " त्यांनीही लगेच ती नक्षीदार, जाळीदार 'टोपी'डोक्यावर चढवली. अगदी फिट्ट बसली. कानही झाकले जात होते. वा! जणू त्यांच्या डोक्याच्या मापानेच ही टोपी विणल्यासारखे वाटत होते.माझा त्या पर्सवरचा सूड पूर्ण झाला होता!!! "बाबा, राहू देत तुम्हालाच ही टोपी.... मी तुम्हाला मफलर विणेपर्यंत नक्की कामी येईल... हां,बाहेर घालता नाही येणार तिच्या पोपटी रंगामुळे, पण घरी घालायला काही हरकत नाही. " वडील नव्या लोकरी टोपीला मस्तकावर चढवून पुन्हा झोपायला निघून गेले आणि पर्सच्या आक्रसलेल्या नव्या रूपात क्रोशाच्या पुढील कलाकृतीची मधुर स्वप्ने पाहत मीही निद्रादेवीस शरणाधीन झाले!
-- अरुंधती

Sunday, November 15, 2009

निळामिठी



कृष्णमेघ घननीळ दिगंतर 
चांदेरी किरणांची प्रभावळ |
गहिर्‍या कोमल मंतरल्या क्षणी 
तुझ्या मंद हास्याची चाहुल ||

  पिऊन टाकिले गगन अंतरी 
नेत्री सावळे स्वप्निल काजळ |
तृषार्त मीही तरीही का रे 
तुझ्या ओढीने कातर पाऊल ||

  पुष्करिणींचे सलिल सुगंधी 
वृक्षजटांचे हिरवे जावळ |
तुझ्याचसाठी कुसुमकळांनी 
मऊ रेशमी भरीली ओंजळ ||

  गभिर घना तू धावत ये रे 
निळामिठीने अथांग व्याकुळ |
अनंतब्रह्मा द्वैत मिटवुनी 
पुन्हा बरसू दे सगुण तीर्थजल ||
--- अरुंधती

Saturday, November 14, 2009

शंभर अधिक एक

रात्रीची जेवणे आटोपली की पूर्वी एक हमखास उद्योग असायचा! चौसोपी वाड्याच्या प्रशस्त अंगणात आजूबाजूच्या झाडांच्या काळोख्या सावल्या निरखत, रामरक्षा पुटपुटत झपाझप शतपावली घालणे हा असायचा तो उद्योग.... आजोबांच्या किंवा वडीलांच्या पायांत लुडबुडत,त्यांच्या हातवाऱ्यांची नक्कल करीत (वेळप्रसंगी त्यांचे धपाटे खात) घातलेल्या ह्या शतपावल्यांची सोनेरी आठवण अजूनही मनात रुंजी घालते. उन्हाळ्यात शतपावलीचा कार्यक्रम गप्पांमध्ये रेंगाळायचा... कधी गप्पा, कधी अंताक्षरी, कधी ठिकरीचा किंवा साप-शिडीचा डाव, कधी भुतांच्या गोष्टी... पाऊसपाण्याच्या दिवसांतआणि थंडीत मात्र आम्ही शतपावल्या लवकर आटपत्या घेत असू. कोणी बरोबर असले तर त्यांच्याशी मनातल्या मनात स्पर्धा लावत त्या शंभर फेऱ्या भराभर पार पडत, तर एकटे
असताना कंटाळा करत, किंवा वाघ मागे लागल्याप्रमाणे आम्ही शतपावली'उरकत' असू. कधी त्यांत खंड पाडला, तर घरातील वडीलधारी मंडळी रागे भरत. एखाद्या घरातील आजी नातवंडांना फडताळावरील डब्यातील लाडू किंवा भाजकी बडीशेप अशी लालूच दाखवून 'शतपावली' करण्यास उद्युक्त करीत असे. अंगणातील वाऱ्याच्या झुळुकींना दाद देत बाजूचे ताड-माड डोलू लागत, टिपूर चांदण्यांत आसमंत उजळून निघे तेव्हा शतपावली घालण्यातही अनामिक आनंद मिळत असे. पुढे वाडे पडले, तिथे टुमदार इमारती उभ्या राहिल्या. पूर्वीसारखे अंगण उरले नाही. सदनिकांच्या 'बाल्कनीज' मध्ये प्रशस्त अंगणाची मजा नव्हती. आजी-आजोबांनाही जेवणानंतर चालायचे कुठे असा प्रश्न पडू लागला. बाल्कनीतील टिचकीभर जागेत येरझाऱ्या घालून त्यांना शतपावलीचे समाधान मिळेना! मग काहीजण सदनिकांच्या आवारातील पार्किंग मध्ये, इटुकल्या पिटुकल्या 'गार्डन' मध्ये सोडियमव्हेपरच्या कठोर प्रकाशात आकाशातले फिकुटलेले चांदणे न्याहाळत दुधाची तहान ताकावर भागवू लागले. हमरस्त्यावर फेरी म्हणजे जीवमुठीत धरून जाणे हे त्यांना माहीत होते. कारण कोणतेही वाहन भरधाव वेगाने कधी अंगाला चाटून जाईल ह्याची शाश्वती नसे. शिवाय,भटकी कुत्री, चोर-पाकिटमार, असंख्य खड्डे अशा विविधांगी आपत्तीतून सहीसलामत जीव बचावला तर खरे बहाद्दर! अखेरीस तंत्रज्ञानाला दया आली. मनोरंजनाच्या टी. व्ही. पर्वात सॅटेलाईट केबलचे आगमन झाले आणि रात्रीच्या जेवणपश्चात शतपावलीचा प्रश्न (काहीजणांसाठी तरी) कायमचा संपला. आता ते जेवण उपरांत टी. व्ही. समोर बसतात व शंभर- दोनशे चॅनल्स फिरतफिरत कोचावर ऐस-पैस बसल्या बसल्याच शतपावली करतात! जागेचे झंजटच नको ना यार! शिवाय एका ठिकाणी बसून तुम्ही अख्खे जग हिंडून येता ते वेगळेच! आजी-आजोबा पण खूश आणि नातवंडेदेखील खूश!!! हां... आता अपचनाचा त्रास झाला तर शेकडो पाचक चूर्णे,गोळ्या आहेत ना मदतीला.... आणि व्यायामाचे म्हणाल तर घरबसल्या व्यायामाची आजकाल चिक्कार साधने उपलब्ध आहेत. आणि मोकळी हवा कधीच येथून गायब झाली आहे... सध्या असतात त्या फक्त पेट्रोल, डिझेलच्या फ्यूम्स! त्यामुळे घरातल्या घरात एअरकंडिशनर्ची गार गार हवा खात मनोरंजनाचा खजिना उलगडणाऱ्या ह्या आधुनिक शतपावलीची चटक तुम्हां-आम्हांस लागली तर आता कोण काय करणार??!!! पण कधी-कधी आम्ही 'वीकएंड' रीट्रीट ला जातो बरं का! एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी, हिरवाईच्या कुशीत, मोकळ्या वातावरणात नभांगण न्याहाळताना आम्हांला उगीचच लहानपणीचे ते सुबक अंगण, गार वारे, शतपावली आठवते आणि पावले थबकतात. मुक्त उधळलेला सुगंध जेव्हा कुपीतून विकत घ्यावा लागतो तेव्हा होणारी मनाची काहीशी अवस्था आम्ही अनुभवतो. पण मग एक उसासा सोडून असले सर्व विचार झटकून टाकतो, व त्या लोभस आठवणींना मनोमन उजाळा देत पुन्हा एकदा आपापल्या सदनिकांचा व बैठकीच्या खोलीतील विशाल टीव्हीरूपी अंगणाचा मार्ग धरतो!
-- अरुंधती