Showing posts with label विचार-यात्रा. Show all posts
Showing posts with label विचार-यात्रा. Show all posts

Wednesday, October 17, 2012

उबुंटू


विश्व संगीताच्या अभ्यासाचे दरम्यान माझी ओळख एका सुंदर शब्दाशी झाली. तो शब्द म्हणजे ''उबुंटू''. 



Umuntu Ngumuntu Ngabantu: “A person is a person because of people.” (झुलू म्हण)

उबुंटू या शब्दाला आफ्रिकेत खोसा समाजात, बंटू भाषांमध्ये मोठे महत्त्वाचे स्थान आहे व त्या शब्दाची वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळी रूपे आहेत. जसे बोथो, उटू, उन्हू इत्यादी. उबुंटू हे एक प्रकारचे तत्त्वज्ञान किंवा जीवनशैली म्हणता येईल. त्याचा अर्थ ढोबळपणे, ''मी आहे, कारण आम्ही आहोत,'' असा होतो. त्यानुसार समाजात प्रत्येकाचे स्थान महत्त्वाचे आहे, आणि ''माझं अस्तित्व इतरांच्या अस्तित्वामुळे आहे,'' हा त्यातील मुख्य विचार मानला जातो. त्यानुसार उबुंटू जीवनशैलीला अनुसरणार्‍या माणसाला इतरांमधील गुणांमुळे  किंवा त्यांच्या क्षमतेमुळे कधीच असुरक्षित वाटत नाही. कारण तो स्वतः पूर्णतेचा एक अंश आहे, त्या पूर्णतेचा एक भाग आहे हे त्याला ठाऊक असते. तो स्वतःला इतरांचा एक भाग मानतो. आणि त्यामुळे इतरांची मानहानी ही त्या व्यक्तीचीही मानहानी ठरते. इतरांचे शोषण त्याचे शोषण ठरते. इतरांचे दु:ख त्याचे दु:ख ठरते. तुम्ही माणूस म्हणून एकट्याने जगू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला आजूबाजूला इतरांची, माणसांची, समाजाची गरज असते. तुमचे अस्तित्व एकमेकांवर अवलंबून आहे. उबुंटू मुळे तुमच्यात उदारता येते. मनाचे मोठेपण येते. आपण एकमेकांशी जोडले गेल्याची भावना येते. अनेकदा आपण स्वतःचा एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून विचार करतो. पण उबुंटू मध्ये तुम्ही व इतर माणसे भिन्न नाहीत. एकाच्या कृतीने बाकीच्यांवरही प्रभाव पडतो. मग तो प्रभाव चांगला असो की वाईट! तुम्ही चांगली कृती केलीत तर त्याचा फायदाही सार्‍या जगाला होतो.

नेल्सन मंडेला उबुंटूचा अर्थ सांगताना म्हणतात : पूर्वीच्या काळी यात्रेकरू प्रवास करताना एखाद्या खेड्यात थांबायचे. तिथे गेल्यावर यात्रेकरूला कोणापाशी अन्न, पाणी मागायची गरज पडत नसे. कारण खेड्यातले सर्व लोक त्याला अन्न, पाणी आणून देत. त्याचे मनोरंजन करत. हा झाला उबुंटूचा एक भाग. याचा अर्थ असा नव्हे की लोकांनी स्वतःचा विचारच करायचा नाही! त्याचा अर्थ असा घ्यायचा की तुमच्या समाजाचा विकास व्हावा यासाठी तुम्ही हे करायला तयार आहात का?  



एक प्रकारचे ''कम्युनिटी स्पिरिट'' ज्याला म्हणता येईल असे हे तत्त्वज्ञान गेल्या काही वर्षांमध्ये पाश्चात्त्य जगातही बरेच प्रसिद्ध पावले असे म्हणता येईल. २००४ सालच्या ''इन माय कंट्री'' चित्रपटात उबुंटू ही मुख्य विचारधारा असल्याचे सांगितले जाते, तर अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांनीही त्यांच्या भाषणात समाजाचे महत्त्व सांगताना उबुंटूचा उल्लेख केला आहे.



संगणकीय प्रणालीच्या जगातही ''उबुंटू'' हे नाव प्रसिद्ध झाले आहे. प्रसिद्ध पॉप गायिका मॅडोनाने उबुंटूचे इंग्रजी भाषांतर असलेले ''आय अ‍ॅम बिकॉझ वुई आर'' हे शीर्षक आपल्या आफ्रिकेतील मलावीच्या एड्स आणि एच आय व्ही ग्रस्त अनाथ मुलांवर तयार केलेल्या माहितीपटासाठी वापरले.



उबुंटू शब्दाशी निगडित एक छोटीशी पण सुरेख गोष्ट मध्यंतरी वाचनात आली.



आफ्रिकेत काम करणार्‍या एका मानववंशशास्त्रज्ञाने तो काम करत असलेल्या खोसा समाजातील लहान मुलांना खेळताना पाहिले. त्याने एका झाडाखाली एक टोपली ठेवली. टोपलीत मधुर चवीची फळे होती. तो या मुलांना म्हणाला, तुमची शर्यत लावूयात. तुमच्यापैकी जो पळत पळत जाऊन त्या टोपलीपाशी पहिला पोचेल त्याला सर्वात जास्त फळे मिळतील. मुलांनी होकार दिला. शास्त्रज्ञाने शर्यत सुरू केल्यावर सर्व मुलांनी एकमेकांचे हात धरले आणि सगळेजण पळत पळत एकाच वेळी त्या टोपलीपाशी पोचले. अर्थातच फळांचा प्रत्येक मुलाला समान वाटा मिळाला. त्या शास्त्रज्ञाला मुलांच्या त्या वागण्याचे फार कुतूहल वाटले. त्याने विचारले, ''तुम्ही अशा प्रकारे का पळालात? तुमच्यापैकी एक कोणीतरी शर्यत जिंकू शकला असता!'' त्यावर मुलांनी फळांवर ताव मारत उत्तर दिले, ''उबुंटू, जर बाकीचे दु:खी असतील तर आमच्यापैकी कोणी एक कसा काय बरे आनंदी होऊ शकेल?'' :-)

(उबुंटूबद्दल आणखी माहिती http://en.wikipedia.org/wiki/Ubuntu_(philosophy) येथे उपलब्ध आहे. चित्र आंतरजालावरून साभार)

Saturday, October 29, 2011

बंड्याची दिवाळी


आजही नाक्यावर बंडू नेहमीसारखाच चकाट्या पिटत उभा होता. बंडोपंत उर्फ बंडूला मी तो नाकातला शेंबूड शर्टाच्या बाहीला पुसत गल्लीत लगोरी किंवा विटीदांडू खेळायचा तेव्हापासून ओळखते. गेल्या पाच - सहा वर्षांमध्ये बंडू खूप बदलला आहे. एका चांगल्या कंपनीत उत्तम पगाराची नोकरी, त्याच्या इतकेच शिकलेली व नोकरी करणारी बायको, नोकरीनिमित्ताने परदेशाची वारी, कंपनीच्या खर्चाने वेगवेगळ्या शहरांत व हॉलिडे होम्समध्ये घालवलेल्या सुट्ट्या यांनंतर ''हाच का तो आपला (जुना) बंडू'' असे म्हणण्याइतपत त्याने जोरदार मुसंडी मारली आहे. मात्र नाक्यावर उभे राहून टंगळमंगळ करत चकाट्या पिटायची त्याची जुनी खोड अद्याप गेलेली नाही. ती तशीच बाकी आहे.

किंचित सुटलेलं पोट ढगळ टी-शर्ट व जीन्सच्या आड लपवत 'शर्मा स्वीट्स'च्या बाहेर उभा असलेला बंड्या पाहून मी त्याला जोरदार हाळी दिली, ''काय बंड्या, काय म्हणतोस? '' (दचकू नका, मला अशी सवय आहे रस्त्यात जोरदार हाळी द्यायची!! ) बंड्याने हातातली सिगरेट घाईघाईने चपलेखाली चुरडली आणि ओळखीचे हसत माझ्या समोर आला, ''कायऽऽ मग!! आज बर्‍याच दिवसांनी!!''
हे आमचे सांकेतिक संभाषण प्रास्ताविक असते. किंवा खूप दिवसांनी भेटल्यासारखं ''वा वा! अलभ्य लाभ!! '' म्हणत हस्तांदोलन करायचं. (आम्ही भल्या सकाळी तापवायला ठेवलेलं दूध नासलं म्हणून चरफडत गल्लीतल्या वाण्याकडून किंवा डेअरीतून दुधाची पिशवी पारोशी, अजागळ अवतारात घेऊन येत असताना रस्त्यात एकमेकांशी  झालेली नजर-भेट ही प्रत्यक्ष भेटीमध्ये गणत नाही हे प्लीज नमूद करून घ्यावे!) नशीब हेच की अजून तरी बंड्या ''लाँग टाईम नो सी यार.... '' ने गप्पांची सुरुवात करत नाही. तर, त्याही दिवशी त्या ''बर्‍याच दिवसांनी''च्या गजरानंतर अपेक्षित क्रमाने आजचे तापमान,  पुण्याची हवा, रस्त्याचे ट्रॅफिक, वाढते बाजारभाव, सुट्ट्या आणि ऑफिसातले काम यांची ठराविक स्टेशने घेत घेत आमची गाडी एकदाची दिवाळीच्या खरेदीवर आली.

''काय मग, या वर्षी काय म्हणतेय दिवाळी? '' मी नेहमीचा प्रश्न विचारला. त्यावर मला त्याचे नेहमीचेच उत्तर अपेक्षित होते. (लक्षात ठेवा, इथे अनपेक्षित उत्तरे येणे अजिचबात अपेक्षित नसते. कारण त्यावर तितका काथ्याकूट करण्याइतका वेळ दोन्ही संभाषणकर्त्या पक्षांकडे असावा लागतो! )

पण बंड्याने या खेपेस आपण बदललोय हे सिद्ध करायचेच ठरविले असावे बहुदा! दोन्ही हात डोक्यामागे घेत एक जोरदार आळस देत तो उद्गारला, ''आऊटसोर्स केली दिवाळी यंदा! ''

''आँ?? .... म्हणजे रे काय? ''

''अगं सोपंय ते.... तुला(ही) कळेल! ''

''अरे हो, पण म्हणजे नक्की काय केलंस तरी काय? ''

''काय म्हणजे... नेहमीची ती दिवाळीची कामं, सफाई, सजावट, फराळ, आकाशकंदील, किल्ला.... सगळं सगळं आऊटसोर्स केलं... ''

''ए अरे वत्सा, मला जरा समजेल अशा भाषेत सांग ना जरा! ''

''अगं, पहिलं म्हणजे ती घराची सफाई.... आई-बाबा, बायको जाम कटकट करतात त्याबद्दल. मला तर वेळ नसतोच आणि बायकोला देखील इतर खूप कामं असतात. मग मी पेपरमध्ये नेहमी जाहिरात येते ना एक... त्या घराची सफाई करून देणार्‍या एका कंपनीलाच आमचं घर साफ करायचं कंत्राट देऊन टाकलं. त्यांनी पार गालिचा, सोफासेट व्हॅक्युम करण्यापासून भिंती-छत-खिडक्या वगैरे सगळं साफ करून दिलं बरं का! है चकाचक! पैसा वसूऽऽल!''

''मग बायकोनं बाकीची किरकोळ स्वच्छता घरकामाच्या बाईंकडून करून घेतली. एक दिवस मी चार प्रकारच्या मिठाया, सुकामेवा घरी आणून ठेवला. फराळाची ऑर्डर बाहेरच दिली. श्रेयासाठी रविवार पेठेत एक मस्त रेडीमेड किल्ला विकत मिळाला. आकाशकंदील तर काय झकास मिळतात गं सध्या बाजारात! त्यातला एक श्रेयाच्या पसंतीने खरेदी केला. आणि हे सगळं एका दिवसात उरकलं, बाऽऽसच! तेव्हा दिवाळीच्या घरकामाचं नो टेन्शन! मलाही आराम आणि बायकोलाही आराम! ''



''वा! '' मी खूश होऊन म्हटलं, ''मग आता बाकीची दिवाळी मजेत असेल ना? ''

''येस येस! '' बंड्या खुशीत हसला. ''या वेळी बायको पण जाम खूश आहे! तिला पार्लर आणि स्पा ट्रीटमेंटचं गिफ्ट कूपन दिलं दिवाळी आधीच! मी देखील स्पा मध्ये जाऊन फुल बॉडी मसाज वगैरे घेऊन आलो. सो... नो अभ्यंगस्नान! आता दिवाळीचे चारही दिवस रोज सकाळी वेगवेगळे नातेवाईक, मित्रमैत्रिणींना भेटायला आम्ही मोकळे!! ''

''म्हणजे? रोज घरी बोलवताय की काय त्यांना? '' मी आश्चर्याने बंड्याचा घरी माणसांची गर्दी होण्याबद्दलचा फोबिया आठवत विचारलं.

''छे छे!! तसलं काय नाही हां! कोण त्यांची उस्तरवार करणार! त्यापेक्षा आम्ही रोज एकेका ग्रुपला एकेका दिवाळी पहाटेच्या कार्यक्रमाला भेटतो. कार्यक्रम आवडला तर सगळा वेळ तिथे बसतो, नाहीतर तिथून कलटी मारतो. मग मस्तपैकी बाहेरच कोठेतरी ब्रेकफास्ट किंवा ब्रंच करायचा.''

''आणि बाकीचा दिवस?''

''रोज स्पेशल प्लॅन बनवतो आम्ही! लांब ड्राईव्हला जायचं... पुण्यात भटकायचं. कुठं प्रदर्शन असेल तर ते बघून यायचं. दुपारी मस्त डाराडूर झोप काढायची. संध्याकाळी सोसायटीत काहीतरी कार्यक्रम असतोच. परवा दीपोत्सव होता. ते रांगोळ्या, आकाशकंदील - किल्ला बांधायची स्पर्धा, फॅशन शो, कॉमन फराळ, गाण्यांचा कार्यक्रम वगैरे असं असतंच काहीतरी... नाहीतरी फॅडच आहे त्याचं सध्या! आमच्या नाही तर शेजारच्या सोसायटीत, तिथं नाही तर जवळच्या बागेत असे कार्यक्रम असतातच गं! तुला मजा सांगू? आमच्या सोसायटीत तर आम्ही या वर्षीपासून फटाके फुल बॅनच केलेत. गेल्या वर्षी पाठाऱ्यांच्या पोरानं पार्किंगमधील वाहनंच पेटवायची बाकी ठेवली होती फटाके पेटवायच्या नादात! आगीचा बंब बोलवायला लागला होता. त्यामुळे नो फटाके.... नो ध्वनिप्रदूषण! सोसायटीत जायचं किंवा क्लबमध्ये. आणि तिथं बोअर झालो तर मग नदीकाठी फायरवर्क्स बघायला जायचं. भन्नाट मजा येते! येताना पुन्हा बाहेरच काहीतरी खायचं किंवा घरी पार्सल. रात्री डीव्हीडीवर किंवा टाटा स्कायवर मस्त पिक्चर टाकायचा.... किंवा गप्पा... अंताक्षरी... फुल धमाल! ''



''सह्ही आहे रे! खरंच मस्त एन्जॉय करताय दिवाळी तुम्ही. आता भाऊबीजेला बहिणींकडे जाणार असशील ना? ''

''नो, नो, नो! त्यांनाही आम्ही सर्व भावांनी बाहेरच भेटायचं ठरवलंय... प्रत्येकीकडे जाण्यायेण्यातच खूप वेळ जातो! शिवाय त्याही नोकऱ्या करतात... त्यांनाही काम पडतं. मग आम्ही सगळ्यांनी मिळून एका हॉटेलमध्ये टेबल बुक केलंय, तिथेच त्या मला व इतर भावांना ओवाळतील, त्यांना त्यांच्या गिफ्ट्स द्यायच्या, ट्रीट द्यायची की झालं! ''

''अरे ते नातेवाईकांचं ठीक आहे... पण तुझ्या कलीग्ज आणि बॉस लोकांकडे तरी तुला स्वतःला जावं लागत असेल ना? ''

''हॅ हॅ हॅ... अगं आमच्या ऑफिसात दिवाळी पार्टी त्यासाठीच तर अ‍ॅरेंज करतात.... तिथल्या तिथं काय त्या शुभेच्छा, गिफ्ट्स वगैरे एक्सचेंज करायचं. फार कटकट नाही ठेवायची! ''

''गुड! म्हणजे ही दिवाळी अगदी टेन्शन-फ्री दिवाळीच म्हण की! ''

''मग!!??!! इथं रोज मर मर मरायचं कामाच्या अन् टेन्शनच्या ओझ्याखाली, आणि हक्काच्या मिळालेल्या दोन-तीन सुट्ट्या देखील ती लोकांची उस्तरवार करण्यात, घरात काम करण्यात नाहीतर नको असणार्‍या लोकांच्या भेटीगाठीत घालवायची म्हणजे फार होतं! हे कसं सुटसुटीत! ''

''अरे पण एवढे सगळे खर्च जमवायचे म्हणजे जरा कसरत होत असेल ना? ''

''ह्यॅ! तो खर्च तर तसाही होत असतोच! तू सांग मला... कुठं होत नाही खर्च?.... मग स्वतःच्या आरामावर खर्च केला तर कुठं बिघडलं? ''

बाप रे! यह हमारा ही बंड्या है क्या? मी डोळे फाडफाडून बंड्याकडे बघत असतानाच त्याचा सेलफोन वाजला आणि तो मला ''बाय'' करून फोनवर बोलत बोलत दिसेनासा झाला. पण माझ्या मनातलं विचारचक्र सुरू झालं होतं....

बंड्याचं लॉजिक तर ''कूल'' होतं. येऊन जाऊन खर्च करायचाच आहे, तर तो स्वतःसाठी का करू नये? स्वतःच्या व कुटुंबाच्या ''हॅपी टाईम'' साठी का करू नये? आणि तरीही त्याच्या बँक बॅलन्सची मला उगाच काळजी वाटू लागली होती. एवढे सगळे खर्च हा आणि ह्याची बायको कसे जमवत असतील? कदाचित वर्षभर त्यासाठी पैसे वेगळे काढत असतील.

एखाद्या गुळगुळीत कागदाच्या कॉर्पोरेट ब्रोशर सारखी बंड्यानं त्याची दिवाळीही गुळगुळीत, झुळझुळीत कशी होईल ते पाहिलं होतं. त्यात कचरा, पसारा, गोंधळ, धूळ, घाम, धूर, प्रदूषणाला किंवा टेन्शनला काहीएक स्थान नव्हतं. नोकरी-व्यवसायाच्या निमित्तानं घराबाहेर बारा - चौदा तास राहणाऱ्या, कामापायी रोज असंख्य प्रकारच्या तणावांना झेलणाऱ्या बंड्यासारख्या तरुणांना आपले सुट्टीचे दिवस तरी कोणत्याही गोंधळाशिवाय, आपल्या मर्जीनुसार घालवायचं स्वातंत्र्य असायलाच पाहिजे, नाही का? की तिथेही आपल्या आशा - अपेक्षांचं ओझं त्यांच्या माथी मारायचं?

बंड्याच्या आईवडीलांना पटत असेल का हे सारं? पण त्यांचा तरी तसा थेट संबंध येतोच कुठं? गेली दोन वर्षं बंड्या वेगळा राहतो. तो मजेत, त्याचे आईवडील मजेत. सगळेच तर मजेत दिसत होते....

मग माझ्या मनात ही कोणती सूक्ष्मशी कळ उमटत होती?

कदाचित बंड्याच्या लेखी दिवाळी हा फक्त एक ''एन्जॉय'' करायचा ''हॉलिडे'' म्हणून उरला होता, त्याबद्दल होती का ती कळ? की कोणत्या तरी जुन्या बाळबोध स्मृतींना उराशी कवटाळून ते चित्र आता किती वेगानं बदलतंय या रुखरुखीची होती ती कळ? गेल्या अनेक पिढ्या दिवाळी अमक्या ढमक्या पद्धतीने साजरी व्हायची, म्हणून आपणही ती तशीच साजरी करायची या अनुकरणशील धाटणीच्या विचारांना छेद जाण्याची होती का ती कळ?  त्या वेदनेत आपली वर्तमान व भविष्याबद्दलची, आपल्या आचार-विचारांबद्दलची अशाश्वती जास्त होती, की आधीच्या पिढ्यांनी जे केलं ते सगळंच सगळं चांगलं, उत्तम, हितकारीच असलं पाहिजे हा भाबडा विश्वास?  

कोणीतरी म्हटल्याचं आठवलं, ''Ever New, Happy You! ''

काळाप्रमाणे बदलत गेलं तर त्यात खरंच का आपला ''र्‍हास'' होतो? आणि र्‍हास नक्की कशाचा होतो.... व्यक्तीचा, कुटुंबाचा, समाजाचा की देशाचा? की विचारांचा व मूल्यांचा? जे चांगलं असेल ते टिकेल हाही एक भाबडा विश्वासच, नाही का? नाहीतर आधीच्या कितीतरी चांगल्या गोष्टी मुळात लयाला गेल्याच नसत्या! कुटुंबसंस्था बदलली तशी सण साजरे करायची पद्धतही बदलत गेली व बदलते आहे. नशीब हेच की आजच्या पिढीला किमान दिवाळी साजरी करायची असते हे तरी माहीत आहे आणि मान्यही आहे. तशीही उठसूठ दिसणार्‍या व मनःपटलावर आदळणार्‍या जाहिरातींची व मालिकांची ती एक प्रकारे कृपाच आहे! संस्कृतीचे दळण लावून लावून ते जाहिरातदार व मालिका दिग्दर्शक एखादा सण साजरा करण्याचे व तो ठराविक स्टॅंडर्डने साजरा करण्याचे प्रेशरच आणतात तुमच्यावर! तुमच्या मानगुटीवर जाहिरातीतील सुळसुळीत कल्पना ते इतक्या बिनबोभाट बसवतात आणि त्या कल्पनांच्या तालावर आपण कधी नाचायला लागतो तेच आपल्याला कळत नाही....!!!

मग संस्कृती खरंच कुठे लुप्त पावते का? की एक अंगडाई घेऊन नव्या साजशृंगारात सामोरी येते? नव्या आचारतत्वांनुसार तिनेही का बदलू नये? कदाचित आणखी दहा-वीस वर्षांनी दिवाळी हा ग्लोबलाईझ्ड सण असेल. किंवा भारतात जगाच्या कानाकोपर्‍यातले, सर्व धर्म-संस्कृतींमधले यच्चयावत सण साजरे होत असतील. तसंही पाहायला गेलं तर दिवाळी किंवा इतर सणांमागच्या पौराणिक कथांशी तर नव्या पिढीचा संपर्क तुटल्यात जमा आहे. त्यांना त्या गोष्टींशी त्या आहेत तशा स्वरूपात रिलेटच करता येत नाही. त्यांच्या १००१ प्रश्नांना आमच्याकडे उत्तरं नाहीत. (कारण आम्ही ते प्रश्न कधी विचारलेच नाहीत.... ना स्वतःला, ना मोठ्या मंडळींना! ना त्यांच्यावर कधी विचार केला...!! ) आता ही चिमखडी पोरं जेव्हा पेचात टाकणारे प्रश्न विचारतात तेव्हा त्यांना काहीतरी सांगून त्यांचे शंकासमाधान करावे लागते. पण त्यांचे कितीतरी प्रश्न अनुत्तरितच राहतात.....

इतर ठिकाणी ग्लोबलाईझ्ड अर्थव्यवस्थेची मूल्ये अंगिकारायची - नव्या विचारधारा - आचार - जीवनपद्धती स्वीकारायची, मात्र सांस्कृतिक - सामाजिक चित्र जसे (आपल्या मनात) आहे तसेच राहावे अशी इच्छा ठेवायची यातील विरोधाभास कितपत सच्चा व कितपत मनोरंजक?

बंड्यानं किमान स्वतःपुरतं तरी ''हॅपी दिवाळी'' चं सोल्युशन शोधलं आहे. त्याच्या उत्तरानं त्याचा काय फायदा, काय तोटा होईल हे काळच सांगेल... पण त्यात इतरांचा तरी आर्थिक फायदाच आहे! आणि कोणास ठाऊक, कदाचित आणखी आठ - दहा वर्षांनी त्याची मुलगी श्रेया जरा मोठी होईल, तोवर त्याचं हेही समीकरण बदलेल. कारण तेव्हाची संस्कृती पुन्हा वेगळं वळण घेऊ पाहत असेल!!

-- अरुंधती

Monday, January 04, 2010

नक्को नक्को रे!


"केतन, नाकात बोटं नको घालू.... "

"केतन, तुला कितीदा सांगितलंय, असा पाय हलवायचा नाही म्हणून! कुणाला लागला तर? " "अरे केतन, तिथे उभा नको राहू, कोणीतरी धक्का मारील... " एक गौरांगना बसस्टॉपवर खांद्यावरच्या जाडजूड ओझ्याच्या पिशव्यांना कसेबसे सांभाळत, बसची वाट पाहत दर मिनिटाने तिच्या बोअर झालेल्या चिमुकल्याला हटकत होती. तिच्या चेहऱ्यावरून ती दमल्याचे स्पष्ट दिसत होते. बराच वेळ थांबूनही बस आली नव्हती. आणि सुपुत्र 'केतन' अतिशय बोअर झालेल्या अवस्थेत स्वतःचे मनोरंजन करू जाता त्याला वारंवार हटकण्यात येत होते. खरं तर आपल्या हटकण्याने मुले खरोखरीच त्यांना करावयाच्या गोष्टी थांबवतात का? थोडा वेळ ऐकल्याचे दाखवतील कदाचित! पण जरा तुमचे लक्ष दुसरीकडे वळले की पुन्हा आपले ह्यांचे उद्योग सुरुच! मग तरीही आपण त्यांना सारखे सारखे का हटकत राहतो? त्या ऐवजी त्याला एखाद्या खेळात, गाण्यात गुंतवता आले तर? उदाहरणार्थ, तिथे ती माता तिच्या मुलाचे लक्ष रस्त्यावरच्या विविध गोष्टींकडे वेधू शकली असती.... जसे, तुला रस्त्यात किती दिव्याचे खांब दिसतात? आपण रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षा मोजूयात. किंवा समोरच्या फळवाल्याकडे कोणती फळे दिसत आहेत रे? इत्यादी इत्यादी. आपण मुलांशी अनेकदा संवाद साधायचे विसरून जातो. आणि ती बोअर झाल्यावर जे काही करतात त्यावर नकारात्मक शेरे ओढत राहातो. माझ्या मैत्रिणींच्या, परिचितांच्या अनेक मुलांमध्ये मी हीच गोष्ट पुन्हा पुन्हा पाहिली आहे. मोठ्यांना जेव्हा त्यांच्याकडे लक्ष द्यायला फुरसत नसते, ते आपल्या गप्पा-कार्यक्रमांत मश्गुल असतात तेव्हा ही मुले आपल्या आईवडीलांचे लक्ष वेधून घ्यायला असेच काहीबाही उद्योग करत असतात. कधी पाणीच सांडून ठेव, कधी पसारा कर, कधी कोणा दुसऱ्या पोराला त्रास दे, कधी मांजरीची शेपटीच ओढ.... त्यात त्या मुलांचा तरी काय दोष असतो म्हणा! त्यांना तुम्हाला काही तरी इंटरेस्टिंग दाखवायचे असते.... अगदी रस्त्यात पडलेल्या चॉकलेटच्या चांदीपासून ते त्यांच्या मोज्याला पडलेल्या भोकापर्यंत! पण आपल्यालाच त्यांच्याकडे पहायला वेळ नसतो. रोजच्या रामरगाड्यात दमछाक होईपर्यंत धावताना त्यांच्या चिमुकल्या विश्वाचा आपल्यालाच अनेकदा विसर पडतो. ती मात्र सदैव आपल्याला त्यांच्या जगात घेऊन जायला उत्सुक असतात. आपल्यालाच त्यांच्या विश्वात डोकावायची सवड नसते. आणि त्यातून कित्येक वेळा आपला धीर संपुष्टात येतो.... एवढ्या वेळाच्या प्रतीक्षेनंतर एकदाची बस आली. केतनचे बखोट पकडून केतनची आई बसमध्ये चढली. चढतानाही सूचनांचा सपाटा आणि तोंडाचा पट्टा चालूच होता. "नीट चढ. तिथे हात लावू नकोस - हात खराब होतील. पुढे धावू नकोस. खिडकीतून हात बाहेर काढू नकोस. तोंडात बोटं घालू नकोस.... " नकोस, नकोस, नकोस आणि पुन्हा नकोस! मान्य आहे, सर्व काही त्याच्याच भल्यासाठी आहे. पण सारखा 'नको' चा पाढा लावणे टाळून हेच वेगळ्या पद्धतीने समजावता आले असते. आजकालच्या पद्धतीप्रमाणे पालक हल्ली एकाच मुलाला जन्म देणे पसंत करतात....त्याच्यावर सर्व वस्तूंचा वर्षाव करतात, त्याचा प्रत्येक हट्ट पुरवितात आणि मग त्याचबरोबर त्या मुलाची प्रत्येक कृती स्कॅनरखाली येते. त्यातून असा 'ना' चा पाढा असेल तर अजूनच आनंद! चिमुकला केतन थोड्याच वेळात बसच्या खिडकीतून रस्त्याकडे पाहत रमून गेला व त्याच्या आईने हुश्श करीत आपले लक्ष इतरत्र वळवले. आता पुरता तरी तो स्थिरावला होता. सगळीकडे टकामका डोळ्यांनी पाहत होता. पण त्याची ही स्थिती फार काळ टिकणारी नव्हती. हे बहुधा त्याच्या आईला देखील माहित असावे. म्हणूनच ती डोके मागे टेकवून, डोळे मिटून थकलेल्या बॅटरीज रीचार्ज करत असावी. तेवढ्यात समोरच्या रस्त्यावरून एक उंट जाताना केतनला दिसला. तो लगेच, "मम्मा, उंट बघ" म्हणून किंचाळत खिडकीतून हात बाहेर काढू लागला. "केतन, किती वेळा सांगितलंय असला वेडेपणा करायचा नाही म्हणून! आधी हात आत घे.... पुन्हा हात बाहेर काढायचा नाही.... आणि असा उसळ्या मारू नकोस रे, माझा ड्रेस खराब होतोय.... " तेवढ्यात त्यांचा स्टॉप आला. मायलेक दोघेही खाली उतरले.... लेक आईच्या हाताला लोंबकळत होता. "अरे, असा लोंबकळू नको रे.... " बसचा थांबा आला, प्रवास संपला पण केतनच्या आईचा 'नको' प्रवास अद्याप जारीच होता.....
--- अरुंधती.

Friday, January 01, 2010

चुटपुटसुंदरी


आमच्या त्या मैत्रिणीला सर्व ग्रुपने ते एक सांकेतिक नावच पाडलंय..... "चुटपुटसुंदरी". आता तुम्ही म्हणाल, हा काय सौंदर्याचा निकष झाला का? पण आमची ही मैत्रीण तिच्या चुटपुटण्याच्या ह्या अनोख्या गुणामुळेच आमच्या ग्रुपमध्ये स्वतःची अशी खास ओळख बाळगून आहे. कोठेही जा, कधीही बघा, ही आपली कसल्या ना कसल्या गोष्टीबद्दल चुटपुटत असते. कधी ती सीरियल मधील रमाच्या पात्राबद्दल चुटपुटते तर कधी कोथिंबीर स्वस्त असतानाच का नाही भरपूर खरेदी केली - जेणेकरून सर्वांना कोथिंबीरवड्या बनवून खिलवता आल्या असत्या ह्याबद्दल चुटपुटलेली असते. कधी त्या सान्यांच्या वैशालीला तिथल्या तिथे खरमरीत उत्तर का नाही दिले म्हणून आमची मैत्रीण अस्वस्थ असते तर कधी सेलमधून आणलेली साडी चांगली नाही लागली म्हणून तिचे मन खंतावलेले असते. तिच्या ह्या चुटपुटीला कंटाळून घरच्यांनी तिचा नादच सोडलाय.... पण आम्ही पडलो मैत्रिणी... त्या ही हक्काच्या! त्यामुळे वेळोवेळी तिला दोन बोल सुनावून तिच्या चुटपुटीतून तिला बाहेर आणण्या पलीकडे काहीच करू शकत नाही. आता परवाचीच गोष्ट घ्या ना! तिच्या सासूबाईंचा षष्ठ्यब्दीपूर्तीचा कार्यक्रम होता. आमच्या मैत्रिणीने कसून मोठ्या कौतुकाने सर्व सोहोळ्याची तयारी केली होती. तिच्या काटेकोर नियोजनाप्रमाणे सोहोळा उत्तम पार पडला. निमंत्रितांची जेवणे आटोपली. पण ठरविल्याप्रमाणे त्यांना घरी विडा बनवून देण्या ऐवजी बाहेरून विडे मागवावे लागले ह्याचे आमच्या बाईसाहेबांना काय ते शल्य लागून राहिले! खरे तर कोणालाच एवढ्या छोट्याशा गोष्टीचे तितकेसे महत्त्व वाटले नाही. कारण सर्व समारंभ उत्कृष्ट झाला होता, जे जे ठरविले होते ते ते सर्व पार पडले होते. अशा वेळी आपला आनंद इतक्या लहानशा गोष्टीने का कमी करायचा? पण आमची चुटपुटसुंदरी हा sss चेहरा लांब करून बसली. शेवटी नवऱ्याला राहवले नाही. तो एकदाचा खेकसला! मग झाssले! अश्रूंचा महापूर लोटला. दुसऱ्या दिवशी मैत्रिणींना फोन करून सर्व दुःखी गाथा ऐकवून झाली. अर्थात प्रत्येकीला व्यवस्थित कल्पना असल्याने माहीत होते की आपल्या कितीही समजविण्याने हिच्यावर परिणाम होणार नाही! ह्यावर आम्हाला माहीत असलेला एकच जालीम उपाय! तिचे लक्ष दुसरीकडे वळविणे!! बऱ्याच दिवसांत एकत्र भेटलो नव्हतो, म्हटलं प्रोग्रॅम बनवूयात. आमची सुंदरी लगेच टवटवली. तिचे जोरदार प्लॅनिंग सुरू झाले. बघता बघता बाईसाहेबांचा मूड ठीक झाला आणि आम्ही सुटकेचा निःश्वास सोडला.
खरेच, काही काही लोक त्यांनी योजल्याप्रमाणे एखादी गोष्ट तंतोतंत नाही झाली तर एवढे का दुःखी होतात? त्यांना छोट्या छोट्या गोष्टींचे इतके मोठे शल्य का लागून राहते? परिस्थिती, मानवी हस्तक्षेप, इतर घटकांनी कधीही, कोणतीही गोष्ट आपल्या यशापयशाचे समीकरण बदलू शकते. आपल्याला जसे हवे तसे घडले नाही म्हणून निराश होणे, खंत करीत राहणे हे केवळ आपल्यालाच नाही, तर आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही त्रासदायी ठरू शकते! ठीक आहे! नाही घडलं तुमच्या मनासारखं! पण म्हणून किती काळ तेच ते उगाळत राहणार? किती वेळ त्यात दवडणार? त्यातून बाहेर येण्यात एवढे कष्ट का पडतात? आणि ज्यांना अशा प्रकारे सारखे सारखे चुटपुटण्याची सवय असते त्यांना पुढे पुढे इतरांची सहानुभूती मिळणे देखील बंद होते. कारण काळ हा पुढे धावत असतो. तुम्ही जर वारंवार झालेल्या घटनेलाच चिकटून बसू राहू लागलात तर काळ व लोक तुम्हाला मागे टाकून पुढे जातात. आणि मग भविष्यात कधीतरी तुम्हाला 'एवढा वेळ चुटपुटण्यात घालविला त्या ऐवजी वेगळ्या गोष्टीत घालविला असता तर बरे झाले असते' असे चुटपुटण्याची वेळ येते! आमच्या चुटपुटसुंदरीसारखे अनेक लोक भवताली दिसतात. सारे काही चांगले, सुरळीत घडत असताना देखील त्यांना एखाद्या होऊ न शकलेल्या गोष्टीची रुखरुख लागलेली असते. त्या सर्वांना आणि आमच्या चुटपुटसुंदरीला सांगावेसे वाटते, "जरा जागे होऊन आजूबाजूला बघा तरी! सगळे किती आनंदात आहेत. तुम्ही पण आनंदी व्हा. इतरांना आनंद द्या! जे नाही झाले, ते नाही झाले... त्याने खंतावून जाण्यापेक्षा जे होत आहे, घडत आहे, त्याचा आनंद घ्या.' असे एक जरी चुटपुटकुमार वा चुटपुटसुंदरी ह्या लेखाने वेगळा विचार करू लागले तरी ह्या लेखाचे सार्थक झाले!
--- अरुंधती.

Wednesday, November 18, 2009

बीटी चा बडगा


कोंकणात लहान मुलांना हमखास सांगण्यात येणारी एक मजेशीर गोष्ट माझी आजी आम्हां सर्व नातवंडांना रात्री सांगायची.

गोष्टीतला गरीब शेतकरी घरात भाजी नसते, म्हणून बायकोच्या सांगण्यावरून गावातल्या सधन माणसाच्या वाडीवर लपत-छपत जातो. तिथे गेल्यावर वाडीतून भाजी चोरायचे त्याला येते दडपण! मग तो जणू त्या वाडीशीच संवाद साधत असल्याप्रमाणे तिला भाजी नेण्याची परवानगी विचारतो आणि स्वतःच वाडीच्या वतीने उत्तरेही देतो.... त्यांचा हा मजेशीर संवाद आजी रंगवून रंगवून सांगायची.... "वाडी गं बाई वाडी.... " "काय म्हणतोस रे फुल्या तरवाडी? " (फुल्या तरवाडी हे शेतकऱ्याचे नाव) "वांगी नेऊ का गं, दोन-चार? " "आरं, ने की धा बारा... " पुढे अनेक वर्षांनी ही गोष्ट विशेष लक्षात राहण्याची अनेक कारणे असली तरी त्यातील त्या गरीब शेतकऱ्याची असहाय अवस्था आणि वांग्यांच्या चोरीसाठी त्याने स्वतःची घातलेली समजूत कोठेतरी मनास स्पर्शून गेली. सध्या बी. टी. वांगी प्रकरण गाजत आहे. निसर्गाच्या नियमांना धाब्यावर बसवून अल्पकालीन फायद्यांसाठी दीर्घ मुदतीचे नुकसान दर्शवणारी बी. टी. वांगी सरकारकडून हिरव्या कंदिलाच्या प्रतीक्षेत आहेत. अनेक पर्यावरण अभ्यासकांनी, कृषी वैज्ञानिकांनी बी. टी. वांग्यांना भारतात आणण्यासाठी स्पष्ट विरोध केला आहे. तरीही वांग्याच्या गुणसूत्रांमध्ये अनैसर्गिक बदल घडवून आणून त्याद्वारे आर्थिक फायदा घडवून आणण्याचा ह्या वांग्यांचा उदो उदो करणाऱ्या कंपन्या व अधिकाऱ्यांचा दावा कितपत योग्य आहे यावर भारतात अजूनही नीट संशोधन झालेले नाही. बाकीच्या अनेक देशांत गुणसूत्रांमध्ये अनैसर्गिक बदल घडवून अन्नोत्पादन करण्यास कडक बंदी आहे. परंतु भारतातील काही अधिकारी मंडळी त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. ज्या देशांमध्ये असे अन्नपदार्थ विकले व उत्पन्न केले जातात तेथील नागरिकांच्या आरोग्याच्या गंभीर समस्या गेल्या काही वर्षांत निर्माण झाल्या आहेत. असे असताना बी. टी. चा अट्टाहास भारतात का? ह्यापूर्वी भारतात बीटी कापसाचे उत्पादन यशस्वी झाले आहे असा युक्तिवाद काही मंडळी करतात. परंतु कोठे कापूस आणि कोठे लोकांच्या पोटात जाणारी, गोरगरीबांना परवडणारी, प्रचंड खपाची वांग्यासारखी भाजी!! बी. टी. वांग्यांचे तब्येतीवर काही संभाव्य परिणाम असे सांगितले जातात : १. प्रतिकारशक्ती कमी होणे २. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, रोग्यांना जास्त धोका ३. एलर्जीज ४. यकृत, मूत्रपिंडांचे आजार असणाऱ्यांना हानीकारक तरीही हे सर्व अल्पकाळात दिसून येणारे परिणाम आहेत. काही अभ्यासक याहीपुढे जाऊन सांगतात की दीर्घकाळात अशा अन्नामुळे अनेक गंभीर आजार होण्याचा संभव आहे. असे असताना विषाची परीक्षा कशाला? महिकोसारख्या बहुराष्ट्रीय कंपनीने जी. एम. तंत्रज्ञानाने विकसित केलेल्या बी. टी. वांग्यांचे बियाणे आपल्याला विकता यावे म्हणून मोठ्या नेटाने रेटा लावला आहे. परंतु जर व्यावसायिक दृष्ट्या या वांग्यांचे उत्पादन करण्याची परवानगी मिळाली तर गेली अनेक शतके भारतात उपलब्ध असलेल्या देशी प्रजातीच्या वांग्यांवर गदा येणार आहे. त्यांचे अस्तित्व संपुष्टात येण्याची भीती आहे. शिवाय ज्या रोग, किडींवर उपाय म्हणून बीटी चा गवगवा केला जात आहे त्या रोगांवर सेंद्रीय शेती पद्धतीत उपाय आहेत. ही बी. टी. वांगी बाजारात आली तर ती इतर देशी वांग्यांपासून वेगळी ओळखता येणे अशक्य आहे, एवढे त्यांच्या रंगरूपात साधर्म्य आहे! हे सर्व वाचनात आले मात्र, आणि मी अस्वस्थ झाले!! उगीचच लहानपणीच्या ऐकलेल्या त्या कथेतील भाबडा, गरीब फुल्या तरवाडी आठवला. ती वांग्याचे पीक असणारी वाडी डोळ्यांसमोर आली. त्याच्या घरातील भुकेली लेकरे, अस्वस्थ माय आणि आजही आपल्या खपाटलेल्या पोटाला चिमटा काढून किडूकमिडूक शेतीत आपल्या कुटुंबाची कशीबशी गुजराण करणारा अडाणी शेतकरी यांच्यामध्ये मनात तुलना सुरू झाली. फक्त एकच गोष्ट जाणवली : कथेतील फुल्या तरवाडीच्या परिस्थितीविषयी आपण काहीही करू शकत नाही. पण आजच्या शेतकऱ्याची, गरीब माणसाची फसवणूक न होऊ देणे आपल्या हाती आहे. चूक घडण्याअगोदरच जर सावरता आले तर त्यातून आपल्या देशाचेच भले होणार आहे. आता गरज आहे ती शास्त्रशुद्ध, निःपक्षपाती, पारदर्शी व प्रदीर्घ संशोधनाची, व त्या संशोधनाचे निष्कर्ष जनताजनार्दनासमोर पोहोचत नाहीत तोवर बीटी वांग्यांसारख्या कोणत्याही अनैसर्गिक उत्पादनाला भारतात सक्त मज्जाव करण्याची!
--- अरुंधती