Showing posts with label स्मृतिगंध. Show all posts
Showing posts with label स्मृतिगंध. Show all posts

Saturday, December 24, 2011

अमृततुल्य जगाच्या स्मृती


हातात सामान घेऊन रेल्वे स्टेशनातून बाहेर आल्यावर पहाटेचा हवेतला शिरशिरता गारवा मला चांगलाच जाणवू लागला. अंगावरची शाल घट्ट लपेटत मी दहा पावले पण चालले नसेन तोच आजूबाजूचे रिक्षावाले ''किधर जाना है? '' करत मागे येऊ लागले होते. सरळ रिक्शात बसून घर गाठावे की गारठलेल्या शरीरात चहाचे इंधन भरून गोठलेल्या मेंदूला तरतरी आणावी या विचारांत असतानाच समोर एक अमृततुल्य चहाची टपरी उघडी दिसली. झाले! माझा रिक्शात बसायचा विचार बारगळला व पावले आपोआप अमृततुल्यच्या रोखाने वळली.

दुकानाबाहेरचे पाण्याचे ओहोळ, आत लाकडी बाकड्यांना दाटीवाटीने खेटून असलेली टेबले, नुकताच ओला पोछा केलेली फरशी, स्टोव्हचा भसभसता आवाज, उकळत्या दुधाचा वातावरणात भरून राहिलेला सुवास आणि चादरी-स्वेटरांत गुरफटलेले, तल्लीन होऊन चहाचा आस्वाद घेणारे ग्राहक... त्या वातावरणात माझ्या शरीरातच नव्हे तर मनातही उबेची आश्वासक वलये आकार घेऊ लागली.



''घ्या ताई, चहा घ्या, '' दुकानाच्या मालकाने माझ्यासमोर पांढर्‍या कपातून आटोकाठ भरून बशीत ओघळलेला, वेलदोड्याचा सुंदर दरवळ येत असलेला वाफाळता अमृततुल्य चहा आणून ठेवला आणि तो दुसर्‍या गिर्‍हाईकाची ऑर्डर बघायला गेला. सर्वात अगोदर मी खोल श्वास घेऊन त्या चहाचा भरभरून सुगंध घेतला. मग तो पहिला सावध घोट. तरी जीभ पोळलीच! शेवटी सरळ बशीत चहा ओतून त्याचा भुरका घेतला. अहाहा... तीच ती चव, तोच स्वाद... मन बघता बघता जुन्या काळात गेले.

Each cup of tea represents an imaginary voyage.  ~Catherine Douzel

माझे व अमृततुल्य चहाचे फार जुने नाते आहे. अगदी मला आठवत असल्यापासूनचे. थंडीचे दिवस, रस्त्यावरच्या शेकोटीचा खरपूस गंध, गुलाबी धूसर गारठ्याने कुडकुडलेली, स्वेटर-कानटोप्या-शालींच्या ऊबदार आवरणांत उजाडलेली सकाळ.... एकीकडे रेडियोवर बातम्या चालू असायच्या, दुसरीकडे ताज्या वर्तमानपत्राच्या करकरीत पानांचा वास आणि सोबत असायचा तो उकळत असलेल्या आले-वेलदोडे घालून केलेल्या चहाचा सुवास! आणि या सकाळीची सुरुवात व्हायची ती श्री अंबिका अमृततुल्य भुवनामधील वर्दळीने!

टिळक रोडवरच्या आमच्या घरासमोरच अमृततुल्य चहासाठी प्रसिद्ध असलेले हे अंबिका भुवन होते. रोज भल्या पहाटे आमच्यासाठी भूपाळी गायल्यागत चार - साडेचाराच्या सुमारास तिथे हालचाल सुरू व्हायची. अगोदर दुकानाचे मोठे शटर उघडण्याचा आवाज. थोडीफार साफसफाई, फर्निचर सरकवण्याचे आवाज. मग कपबश्या साफ करताना होणारा त्यांचा किणकिणाट. तोवर कोणीतरी दुकानासमोरची जागा खराट्याने साफ करून तिथे पाण्याचा सडा घातलेला असायचा. त्याच वेळी दुसरीकडे फर्‍याच्या स्टोव्हला पंप मारला जात असायचा. तो स्टोव्ह एकदाचा पेटला की भस्स भस्स आवाज करायचा. त्यावर भले थोरले पातेले चढविले जायचे. एव्हाना परिसरातील सायकलवरून फिरणारे पेपरवाले, दुधाच्या चरव्या सायकलला लटकवून हिंडणारे दूधवाले, भल्या पहाटे पोटापाण्यासाठी बाहेर पडलेले जीव अंबिका भुवनच्या दारात हळूहळू जमू लागले असायचे. कोणीतरी गारठलेल्या शरीरात ऊब आणायला बिडी पेटवायचे. त्या बिडीचा खमंग धूर हवेत पसरायचा. कोणी पाण्याचा जग घेऊन रस्त्यातच चुळा भरायचे. अंबिका भुवनचा मालक दुकानात काम करणार्‍या पोर्‍यावर मधूनच जोरात खेकसायचा. या सार्‍याला जणू एक लय असायची. एक अलिखित शिस्त. आणि हे सर्व पहाटे पावणेपाच - पाचच्या दरम्यान! आमच्या घरातील खिडक्या व बाल्कनी टिळक रोडच्या दिशेने उघडणार्‍या.... अंबिका भुवनच्या अगदी समोर. आम्हाला निजल्या निजल्या हे सारे आवाज साखरझोपेतच ऐकायला मिळायचे. पहाटेची मृदू-मुलायम अलवार स्वप्ने आणि अंबिका भुवनमधून येणारे हे प्रातःकालीन ध्वनी यांची जणू सांगडच झाली होती आमच्यासाठी!

घरी कोणी पाहुणे मुक्कामास असतील तर त्यांची मात्र थोडी फसगत व्हायची. त्याचे असे व्हायचे की भल्या पहाटे अंबिका भुवनमधून येणारे सारे आवाज ऐकून ती सारी कपबश्यांची किणकीण, धातूच्या बारक्या खलबत्त्यात चहाचा मसाला कुटण्याचा आवाज, स्टोव्हचा भुस्स भुस्स आवाज वगैरे आमच्याच स्वयंपाकघरातून येत आहे असा पाहुण्यांचा गैरसमज व्हायचा. आता थोड्या वेळातच चहा तयार होत आला की मग उठावे असा विचार करत ते डोळे मिटून त्या क्षणाची वाट बघत अंथरुणातच पडून राहायचे. प्रत्यक्षात आवाज पलिकडील बाजूच्या दुकानातून येत आहे याचा त्यांना पत्ताच नसायचा. मग कानोसा घेऊन, बराच वेळ झाला तरी कोणी उठवून चहा झाल्याची वर्दी का देत नाहीत म्हणून ते डोळे किलकिले करून बघायचे तो काय! पहाटेचे जेमतेम पाच वाजत असायचे!

माझे एक काका तर नेहमीच जाम फसायचे. दर मुक्कामाला ते पहाटे अंबिका भुवनची वर्दळ सुरू झाली की उठून गजराचे घड्याळ पुन्हा पुन्हा निरखायचे. शेवटी काकू त्यांना म्हणायची, ''ओ, झोपा जरा! आताशी साडेचार वाजलेत... इतक्या सकाळी काय करायचंय उठून? '' आणि ते बिचारे एकीकडे चहाच्या तयारीचा आवाज येतोय, तरी पण स्वयंपाकघरात सामसूम कशी काय याचा विचार झोपभरल्या अवस्थेत करत पुन्हा एक डुलकी काढायचे.

दिवसभर अंबिका भुवनवर तर्‍हेतर्‍हेच्या गिर्‍हाईकांची गर्दी असायची. अगदी पांढरपेश्यांपासून ते बोहारणी -लमाणी बायका-मजूर-फेरीवाले-भटक्यांपर्यंत. कधी कोणी दरवेशी माकडाला किंवा अस्वलाला बाजूच्या खांबाला बांधून चहा प्यायला विसावायचा तर कधी डोंबारी, कधी कडकलक्ष्मी रस्त्यावरच पदपथावर चहा पिण्यासाठी फतकल मारून बसायचे. सकाळच्या प्रहरी लोकांना जागवत फिरणारे, मोरपिसांचा टोप चढविलेले वासुदेव महाशय देखील अंबिका भुवनच्या चहाने घसा शेकून मगच पुढे जायचे. अश्या लोकांच्या आगमनाची जरा जरी चाहूल लागली तरी अंबिका भुवनाभोवती बघ्यांची गर्दी वाढायची. इथेच जगभराच्या राजकारणाच्या, हवामानाच्या नाहीतर गल्लीतल्या घडामोडींच्या गप्पा झडायच्या. बातम्यांची देव-घेव व्हायची. वर्तमानपत्राची सुटी पाने ग्राहकांमधून फिरायची. जोशी-अभ्यंकर हत्याकांडानंतर काही काळ पुण्यात टिळक रस्त्यावर लवकर शुकशुकाट व्हायचा. तो काळ सोडला तर अंबिका भुवनची आमच्या रस्त्याला एक आश्वासक जाग असायची. रात्री मात्र आजूबाजूच्या इतर दुकानांच्या तुलनेत अंबिका भुवन लवकर बंद व्हायचे.

आमच्या घरी कित्येकदा अंबिकाचा अमृततुल्य चहा घरपोच यायचा. तीही एक मजाच होती. शेजारी एका वकिलांचे ऑफिस होते. ते कामगार न्यायालयात वकिली करत. त्यांच्याकडे कामगार अशिलांची सततची गर्दी असे. आणि आमच्या घरी माझ्या वडिलांच्या ऑफिसात शेतकरी ग्राहकांची गर्दी असे. घरातच ऑफिस असल्यामुळे ही शेतकरी मंडळी जेव्हा जथ्याजथ्याने येत किंवा शेजारच्या वकिलांकडे कामगारांचा पूर लोटे तेव्हा त्यांच्यासाठी चहा यायचा तो अंबिकामधलाच! पण त्यासाठी चहाची ऑर्डर द्यायची माझ्या वडिलांची व वकिलांची पद्धतही मजेशीर होती. घराच्या बाल्कनीतून माझे वडील अगोदर समोरच्या अंबिका भुवनच्या गल्ल्यावर बसलेल्या मालकाचे लक्ष वेधण्यासाठी तोंडातून 'ट्टॉक ट्टॉक'चे मोठमोठे आवाज काढायचे. वकिलांकडे हे काम त्यांचा असिस्टंट करायचा. अंबिकाचा मालक एकतर गल्ल्यावर तरी असायचा किंवा स्टोव्हसमोर बसून मोठ्या थोरल्या ओगराळ्याने पातेल्यातील दूध एकतानतेने ढवळत असायचा. मधोमध अख्खा वाहता टिळक रोड! जर वाहतुकीचा आवाज जास्त असेल तर कित्येकदा वडिलांनी काढलेले ''ट्टॉक्कार'' त्या मालकाच्या लक्षातच यायचे नाहीत. मग त्यानंतरचा उपाय म्हणजे हातांची ओंजळ करून पोकळ आवाजाच्या टाळ्या वाजवायच्या. कधीतरी त्या टाळ्या ऐकून दुकानातील नोकर मालकाला खुणावायचा. मालकाने आमच्या बाल्कनीच्या दिशेने प्रश्नांकित मुद्रेने पाहिले की वडील अगोदर इंग्रजी 'टी' च्या खुणेने ती चहाची ऑर्डर आहे हे सांगून जितके कप चहा हवा असेल तितकी बोटे त्याला दाखवायचे. तो मालकही मग स्वतःच्या हाताची तितकीच बोटे समोर उंच नाचवून ''बरोबर ना? '' अशा अर्थी मुंडीची हालचाल करायचा. त्यावर वडिलांनी ''बरोबर!! '' म्हणून हाताचा अंगठा उंचावून ऑर्डर 'फायनल' व्हायची, किंवा हातानेच ''नाही, नाही, नाही'' करत पुन्हा एकदा बोटे नाचवायची!! कधीतरी दोन्ही पक्षांची बोटे एकसमान आली की ऑर्डरची देवघेव पूर्ण व्हायची! हुश्श!! हा सारा 'मूकसंवाद' बघायला मला फार मजा येई. या प्रकारात कधी कधी दहा - पंधरा मिनिटे आरामात जात. एकदा टाळ्या वाजवून अंबिकावाल्याचे लक्ष गेले नाही तर मग थोडावेळ शेतकरी मंडळींशी बोलून पुन्हा टाळ्या, ट्टॉक्कार इत्यादी इत्यादी. शीळ वाजवून लक्ष वेधायला घरमालकांची बंदी होती म्हणून, नाहीतर तेही केले असते! माझ्या आईचा या सर्व प्रकारावर वडिलांसाठी शेलका शेरा असायचा, ''एवढ्या वेळात समोर जाऊन चहाची ऑर्डर देऊन परत आला असतास! '' पण वडिलांना तीन मजले व अठ्ठावन्न पायर्‍या उतरून पुन्हा चढायचा कोण कंटाळा असल्यामुळे ते तिचे बोलणे कानांआड करायचे.

एकदा का चहाची ऑर्डर दिली की साधारण दहा-पंधरा मिनिटांनी अंबिका भुवनातील नाना एका हातात गरमागरम चहाची अ‍ॅल्यूमिनियमची पोचे पडलेली किटली व दुसर्‍या हातात कपबश्यांचा ट्रे घेऊन वर तिसर्‍या मजल्यावर आलेला असायचा. आल्यासरशी पटापट किटलीतून कपांमध्ये चहा ओतून तो किटली तिथेच बाजूला ठेवून द्यायचा व एका कोपर्‍यात उकिडवा बसून कान कोरत बसायचा. पांढर्‍या सफेद कपांमध्ये चहाचे ते सोनेरी-केशरी-पिवळ्या रंगाचे वाफाळते द्रव ज्या प्रकारे किटलीतून नाना एकही थेंब इकडे तिकडे न सांडता ओतायचा त्याच्या त्या कसबाचे मला खूप कौतुक वाटायचे. त्याच्या त्या 'कौशल्या'मुळेच असेल, पण जेवढ्या कपांची ऑर्डर दिली असेल त्यापेक्षा किटलीत कपभर चहा जास्तच असायचा. हिशेब मात्र दिलेल्या ऑर्डरीप्रमाणे व्हायचा.

नाना आला असेल तर मी हातातला खेळ अर्धवट सोडून घरातून त्याला 'हाय' करायला येऊन जायचे. नाना मला एखाद्या दोस्तासमान वाटायचा. अंगावर मळका पोशाख, गालांवर पांढरट दाढीचे खुंट, विरळ पांढरे केस व त्यातून दिसणारे टक्कल, पडलेले दात असणारा नाना मला पाहून बोळके पसरून लखकन् हसायचा. त्याचे हसणे पाहून मलाही खुदुखुदू हसू यायचे. नानाची उंची खूप कमी होती. मला तो का कोण जाणे, पण माझ्याच वयाचा वाटायचा. कधी कधी तो कळकट खिशातून बिडी काढून शिलगावायचा व नाका-तोंडातून धूर सोडायचा ते पाहायला मला खूप मजा यायची. बिडीचा पहिला झुरका घेतला रे घेतला की नाना हमखास ठसकायचा. ''पाणी देऊ का? '' विचारले की मानेनेच 'नको नको' म्हणायचा.

कधी अंबिका भुवनात गिर्‍हाईकांची खूप गर्दी असेल तर मग नाना चहाची किटली, कपबश्या वगैरे सरंजाम आमच्या घरी पोचवून लगेच दुकानात परत फिरायचा. मग मी बाल्कनीच्या कठड्याच्या नक्षीदार गजांना नाक लावून किंवा त्यांतून डोके बाहेर काढून त्याला हात करायचे. शेवटी आई पाठीत दणका घालून आत घेऊन जायची. तरी कधी नानाने कामातून डोके वर काढून माझ्या दिशेने पाहिले की मला कोण आनंद व्हायचा!



घरी आलेला अमृततुल्य चहा मला तसा कधीच 'शुद्ध स्वरूपात' थेट प्यायला मिळाला नाही. ''चहा लहान मुलांसाठी चांगला नसतो, शहाणी मुलं दूध पितात, '' वगैरेच्या लेक्चर्सना मी बधणारी नव्हते. शेवटी हट्ट करकरून दुधात अमृततुल्य चहाचे चार-पाच चमचे मिसळून मीही ऑफिसात बसलेल्या शेतकर्‍यांच्या रंगीबेरंगी पागोट्यांकडे बघत बघत माझ्या स्पेशल 'चहा'चा आस्वाद घ्यायचे!

दुधाची 'भेसळ' न करता अमृततुल्य चहा पिण्याची संधी मला वडिलांबरोबर जवळपास बाहेर गेले की मिळायची. त्यांना घराच्या कोपर्‍यावर कोणीतरी ओळखीचे, मित्र वगैरे तर भेटायचेच भेटायचे. गप्पांच्या फैरीबरोबर अंबिकाचा अमृततुल्य चहा ठरलेला असायचा. अशा वेळी त्यांच्याकडे लाडिक हट्ट केला की त्यांच्या गप्पा विनाव्यत्यय चालू राहाव्यात यासाठी का होईना, पण आपल्याला बशीत थोडासा चहा ओतून मिळतो हे गुह्य उमगल्यावर अशी संधी वारंवार येण्यासाठी मी टपलेली असायचे. घरी येऊन आईसमोर 'च्या' प्यायल्याची फुशारकी मारायचे. त्या वेळी आपण चहा प्यायलो म्हणजे खूप मोठ्ठे झाले आहोत असे उगाचच वाटायचे!

पुढे टिळक रस्त्यावरची ती जागा आम्ही सोडली तरी अमृततुल्य चहाची चटक काही सुटली नाही. परगावी येता-जाता, बाहेर भटकताना, मॅटिनी पिक्चर बघून घरी येताना अमृततुल्यला भेट दिली नाही तर चुकल्या-चुकल्यासारखे व्हायचे. गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत पहाटे मंडईच्या व दगडू हलवाईच्या गणपतीचे दर्शन घेतले की शनिपारापाशी येऊन अमृततुल्य चहा ढोसणे व घरी जाऊन गपगुमान झोपणे हाही वर्षानुवर्षे ठरलेला कार्यक्रम असायचा. कॉलेजात असताना कधीतरी 'तंगी'च्या काळात दोस्त-कंपनीसोबत खिशातली-पर्समधली चिल्लर जमवून केलेली 'चहा-खारी' पार्टी देखील खास अमृततुल्य भुवनातच साजरी व्हायची. परीक्षेनंतर अवघड गेलेल्या पेपरचे दु:ख याच चहाच्या कपांमध्ये डुबायचे किंवा सोप्या गेलेल्या पेपरच्या उत्सवाला येथेच रंग चढायचा. या चहाची सर आजकाल चहाच्या नावे प्लॅस्टिकच्या पेल्यात मिळणार्‍या चॉकलेटी पिवळ्या रंगाच्या पाणचट उकळ्या गोडमिट्ट द्रावास येणे शक्य नाही!

माझ्या परिचयातील अनेकजण अमृततुल्य चहाला ''बासुंदी चहा'' म्हणून नाके मुरडतात. तसा हा चहा रोजच्या रोज पिण्यासाठी नव्हेच! पण जेव्हा कधी हा चहा प्याल महाराजा, तेव्हा तबियत खूश होऊन जाते! अमृततुल्य चहाचा सुवासिक तवंग जसा जिभेवर व मेंदूवर पसरतो, चढतो तसा अन्य चहाचा क्वचितच पसरत असेल! असो. कोणीतरी म्हटले आहे, ''Tea is liquid wisdom. '' शहाणपणाच्या प्रत्येक टप्प्यावर मनात रुतून बसलेल्या स्मृतीही माणसाला प्रिय असतात. त्यामुळे त्या स्मृतींतील चित्रे, आठवणी, स्पर्श, चवी, दृश्ये जशीच्या तशी राहावीत यांसाठी त्याची धडपड चालते. माझ्या बालपणीच्या व नंतरच्याही कैक स्मृती या अमृततुल्य चहाच्या चवीत बद्ध आहेत. त्या निरागस वयातील स्वच्छ मन, प्रेमळ नात्यांची सुरक्षित ऊब, अचंबित करणारं जग आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मिळणारा निर्मळ आनंद यांची आठवण त्या अमृततुल्यच्या जोडीला मनात सामावली आहे. त्या जगाची सैर-सफर करायची असेल तर आजही म्हणावेसे वाटते... बस्स, एक प्याली अमृततुल्य चाय हो जाय.....!!

-- अरुंधती कुलकर्णी.

* हा लेख येथे पूर्वप्रकाशित झाला आहे : http://hivaaliank2011.blogspot.com/2011/12/blog-post_76.html

Friday, October 21, 2011

श्रुतिकेची गोष्ट



''चला चला, लवकर आटपा बरं जेवणं.... आज श्रुतिका आहे नं?'' आजीने वेगळी आठवण करून दिली नाही तरी दर मंगळवार आणि शुक्रवार म्हणजे रेडियोवरच्या श्रुतिकेचे वार हे समीकरण कितीतरी वर्षे माझ्या मनात पक्के घर करून होते.

ही गोष्ट आहे साधारण १९८२ ते १९९० च्या काळातील. कदाचित त्याही अगोदर पासून नभोवाणीवर श्रुतिका अस्तित्वात असाव्यात. परंतु १९८२ मध्ये आमचा जुना, खटारा, धूळ खात पडलेला व फेंदर्‍या मिशांच्या झुरळांचे वसाहतस्थान बनलेल्या लाकडी अंगकाठीचा रेडियो एकदाचा निकालात निघाला व त्याजागी जुना ट्रान्झिस्टर आला. या नव्या काळ्या चौकोनी डब्यातून कर्कश खरखरीऐवजी सुमधुर आवाजातील गाणी आम्हाला पहिल्यांदाच ऐकू येऊ लागली. सकाळी उठल्यावर चिंतन मालिका आणि अभंगवाणी ऐकायची जशी सवय झाली तशीच मंगळवार व शुक्रवारच्या श्रुतिकेचीही चटक आपोआप लागली.


आजीला ही श्रुतिका स्वरूपातील मराठी नभोनाट्ये विशेष आवडायची. श्रुतिका ऐकायची म्हणून सायंकाळचे बाकीचे सारे कार्यक्रम ती लवकर उरकून घ्यायची. सायंकाळचा बाहेरचा फेरफटका, स्तोत्रवाचन, देवाला उदबत्ती - निरांजन आणि जेवण हे त्या दिवशी लवकर होईल या बेताने तिचे काम चालू असायचे. जेवणे झाली की थोड्या शतपावल्या घालायच्या आणि मग रेडियोवर आकाशवाणी केंद्राचे प्रक्षेपण लावून ठेवायचे. त्याच दरम्यान घाईघाईने अंथरुणेही घातली जायची. गाद्यांवर घातलेल्या चादरींना जराही सुरकुती पडली की इतर वेळेला आजीच्या कपाळालाही चुण्या पडायच्या. चादरीला चारही टोकांनी ओढून ठीकठाक खोचल्याशिवाय गादी प्रकरणातून आमची सुटका नसे. परंतु मंगळवार, शुक्रवारच्या मुहूर्ताला त्या काटेकोरपणातून आम्हाला सवलत मिळत असे. मग सुर्रकन चादरी घातल्या जात, त्यांवर दणादण उशा आदळत, पांघरुणांची घडी विस्कटण्याची पर्वा न करता ती नेम धरून गादीच्या पायथ्याच्या दिशेने हवेत उड्डाण करत. आमचे माकडचाळे आजी त्या दिवशी शांतपणे सहन करत असे. श्रुतिका सुरू झाल्यावर कोणी मधूनच उठवायला नको यासाठी आमची सारी धडपड असे. मोठी माणसेही त्यात सामील असत. आयत्या वेळी रेडियो स्टेशनचे प्रक्षेपण नीट ऐकू येण्यात काही प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून श्रुतिकेअगोदरच दहा-पंधरा मिनिटे त्याला सुस्थानी प्रस्थापित करून श्रुतिकेअगोदर लागणार्‍या जाहिराती, बातम्या इत्यादींना भक्तिभावाने ऐकले जाई. आणि एरवी त्याच कार्यक्रमांचा त्रास होणारी आजी तेव्हा श्रुतिकेच्या प्रतीक्षेत ते सारे 'व्यत्यय' निमूट सहन करायची.

एकदा श्रुतिका सुरू झाली की रेडियोचा आवाज मोठा व्हायचा. त्या नाट्यातील शब्द अन् शब्द कळावा यासाठी कानांत अगदी प्राण आणून कथानक ऐकले जायचे. आजीच्या पुढ्यात कोणतीतरी भाजी निवडायला असायची किंवा तिने शनिवारी करायच्या बिरड्या सोलायला घेतलेल्या असायच्या. हातातून सटकणार्‍या व खोलीत चहूदिशांना उड्डाण करणार्‍या बुळबुळीत सालीच्या बिरड्यांनाही ती त्यावेळी गोळा करायला जायची नाही. एकीकडे हात झपाझप चालू तर दुसरीकडे सारे लक्ष त्या श्रुतिकेतून उलगडणार्‍या नाट्याकडे! एखादा अवघड, दु:खी किंवा नाट्यमय प्रसंग असला की आजीच्या सोबत आमचेही श्वास रोखले जात. एखादा गूढ, रहस्यमय प्रसंग असेल तर आमच्या हृदयाचे ठोकेही वाढलेले असत.

तो काळ कृष्णधवल दूरदर्शनचा होता. आमच्याकडे नुकताच टी. व्ही. संच खरेदी झाला असला तरी रेडियोची सर तेव्हाच्या टी.व्ही. ला येणे शक्यच नव्हते! रोज पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत साथसोबत करणारा रेडियो कोठे आणि सकाळ- संध्याकाळी मर्यादित प्रक्षेपण असणारा टी.व्ही. कोठे! विविधभारतीवरील 'बेला के फूल', 'छायागीत', 'आप की फर्माइश' कार्यक्रम जितके जिव्हाळ्याने ऐकले जायचे तितका स्नेह, जिव्हाळा टी.व्ही. बद्दल उत्पन्न होणे अजून बाकी होते. बाहेर नाट्यगृहांत जाऊन तिकिटाचे पैसे भरून नाटके पाहावीत असे वातावरण घरी नव्हते. शाळेला सुट्टी लागली की मगच आमचे पालक आम्हाला सिनेमा, सर्कस आणि बालनाट्य दाखवत असत. त्यामुळे नभोनाट्य किंवा श्रुतिका हा रेडियोवर आठवड्यातून दोनदा सादर केला जाणारा कार्यक्रम आमच्यासाठी मनोरंजनाची पर्वणी असे.  

किती तरी सुंदर सुंदर श्रुतिका या काळात आम्ही अगदी तन्मयतेने ऐकल्या. एकच कलाकार तरुण, मध्यमवयीन व म्हातार्‍या व्यक्तीचे आयुष्याच्या विविध टप्प्यांमधील संवाद म्हणतो हे तेव्हा आम्हाला कोणी सांगितले असते तरी ते आमच्या मनांना पटले नसते. श्रुतिका ऐकताना आम्ही कथानकात रंगून तर जातच असू. पण मग त्याच वेळी बरेच प्रश्नही पडायचे. एका वेळी रेकॉर्डिंग स्टुडियोत एवढे सगळे लोक कसे काय मावत असतील? ते पार्श्वसंगीत वाजवणारे कलाकार पण त्यांच्या शेजारीच बसले असतील का? या लोकांना कार्यक्रम करून घरी जायला कित्ती उशीर होत असेल, नाही का? वगैरे वगैरे. कार्यक्रमाचे ध्वनिमुद्रण अगोदर केलेले असू शकते यासारख्या गोष्टी तेव्हा आमच्या ध्यानी-मनीही नसत. हो, आणि त्याच बरोबर बालसुलभ शंकाही असायच्या जोडीला. 'त्यांना मध्येच शिंक आली किंवा ढेकर आली तर ते काय बरं करत असतील?', 'मध्येच वीज गेली तर मग त्यांचा कार्यक्रम बंद पडेल का?' अशा शंकांनी मने आशंकित झाली तरी श्रुतिकेत व्यत्यय येऊ नये म्हणून गप्प बसत असू. कलाकारांची नावे श्रुतिकेत सर्वात शेवटी सांगत असत. ती नावे जाहीर झाली की, ''हां, मला वाटलंच होतं हं, अमक्यातमक्याची भूमिका तेच करत असणार म्हणून! काय सुरेख म्हणतात ना ते संवाद!'' वगैरे डायलॉग्जही चालायचे.

माझ्या आजोबांना खरे तर श्रुतिका ऐकायला आवडत असावे. परंतु वरकरणी मात्र ते तसे दाखवत नसत. जणू काही आपला त्या श्रुतिकेशी संबंधच नाही अशा थाटात त्यांच्या आवडत्या खुर्चीत ते नजरेसमोर वर्तमान-पत्र धरून बसलेले असत. पण रेडियोच्या आवाजाची पातळी जरा कमी झाली की त्यांची, 'जरा आवाज वाढव गं!' ची सूचना आजी गालातल्या गालात हसत अमलात आणत असे. त्या काळात चुकून त्यावेळी जर कोणी पाहुणे घरी आले तर स्वाभाविकपणे आम्ही रेडियोचा आवाज कमी किंवा बंद करत असू. पण मग रात्रभर आणि दुसर्‍याही दिवशी श्रुतिकेतील नाट्यात नंतर काय घडले असेल याची चुटपूट लागून राहायची. अनेकदा त्या नाट्यांचे विषय प्रौढांसाठीचे, धीरगंभीर असत. आम्हाला बालवयाच्या श्रोत्यांना ते झेपत नसत. मग श्रुतिका संपली रे संपली की आमची आजीच्या डोक्याशी भुणभूण सुरू होई.... ''आजी, अमक्या शब्दाचा अर्थ काय गं?'' ''आजी, तो बुवा असं का म्हणत होता गं?'' ''ए आजी, ती बाई अशी विचित्र का रडत होती गं?'' एक ना दोन.

आजी आपली कशीबशी आमच्या प्रश्नांना तिला जमेल तशी उत्तरे द्यायची, आणि फारच निरुत्तर झाली की, ''चला, झोपा आता! फार प्रश्न विचारत बसता!'' म्हणून रागावायची. कधी तिने तिच्या आवाक्यातील उत्तर दिले तरी आमच्या मनाचे समाधान व्हायचे नाही. मग झोपाळलेल्या डोळ्यांनी अंथरुणावर पडल्या पडल्या त्याबद्दल विचार करताना कधी तरी झोप लागायची.

एखाद्या रात्री श्रुतिकेचा विषय गूढ, रहस्यमय, भय उत्पन्न करणारा असेल तर मग त्या रात्री मला अंधाराचीही भीती वाटायची. ''ए आजी, आज छोटा दिवा तसाच राहू देत ना!'' म्हणून तिला गळ घालण्यापासून ते रात्रीतून बाथरुमला जायचे झाल्यास तिला बिचारीला झोपेतून जागे करून बाथरुमच्या दारापर्यंत सोबत करायला सांगण्यापर्यंत सर्व प्रकार चालायचे. पण दुसर्‍या दिवशी आजीने इतरांसमोर हसत हसत त्याविषयीचा उच्चार केला की नाकाच्या शेंड्यावर भला थोरला राग मात्र यायचा!

आजी-आजोबा वर्षातून दोन-तीनदा आमच्या गावी राहायला जायचे. एकदा तिथे गेले की साधारण महिनाभर मुक्काम असायचा त्यांचा तिथे. जाताना ते सामानात घरातील तो एकुलता एक ट्रान्झिस्टर सोबतीला घालून न्यायचे. ते दोघे घरी नसले की आम्हा लहान मंडळींना मनसोक्त दंगा करता यायचा. पण मग दर मंगळवारी व शुक्रवारी आजीची, रेडियोची व श्रुतिकेची खूप खूप आठवण यायची. आजोबांच्या देहान्तानंतर आजी एकटीच गावी जाऊ लागली. तेव्हाही तिच्या सोबतीला रेडियो असायचा. गावच्या शेणाने सारवलेल्या कौलारू घरात दिवेलागणीनंतर निजेस्तोवर कंदिलाच्या मिणमिणत्या प्रकाशात त्याची मंद सुरातील साथ तिला निश्चितच आश्वस्त करत असणार!

पुढे पुढे दूरदर्शनचे प्रस्थ जसजसे वाढले तसतसा माझा श्रुतिका ऐकण्यातील उत्साह कमी होऊ लागला. दूरदर्शनवरील वेगवेगळ्या विषयांवरील मालिका, मनोरंजनपर कार्यक्रमांचे आकर्षण वाढू लागले. घरात टी.व्ही.चा आवाज वाढला आणि त्यापुढे रेडियोचा आवाज क्षीण झाला. पण आजीने शेवटपर्यंत रेडियोची साथ सोडली नाही. टी.व्ही.चा आवाज तिला नकोसा झाला की ती रेडियो अगदी कानाशी धरून श्रुतिका ऐकायची. तिला त्रास होत असला तरी ती आम्हाला त्याबद्दल काही बोलायची नाही. पण चपापून मग आम्हीच टी.व्ही.चा आवाज कमी करायचो. कधी तरी ती आदल्या दिवशीची श्रुतिका किती छान होती ते रंगून सांगायची. त्या वेळी आपण तिची श्रुतिका ऐकण्यात साथ-सोबत केली नाही म्हणून उगाचच मनात अपराधी वाटायचे.


आजीनंतर श्रुतिका ऐकणेही इतिहासजमा झाले. परंतु त्या काळात श्रुतिकेच्या रूपाने आम्हाला जे काही मिळाले त्याचे मूल्य अनमोल आहे.


श्रुतिका ऐकता यावी म्हणून एकत्र येऊन चटचट उरकलेली कामे, 'आज काय ऐकायला मिळणार' याविषयी उत्कंठा, एकही शब्द चुकू नये म्हणून कानांत प्राण आणून केलेले श्रवण, श्रुतिकेतील पात्रांच्या संवादांशी एकरूप होणे, सादरकर्त्यांच्या आवाजांवरून त्यांच्या वया-रूपाविषयी मनात बांधलेले अंदाज, समृद्ध कथांना त्या थोडक्या वेळात ताकदीने सादर करण्याचे कलावंतांचे कसब, काही गंभीर कथानकांना ऐकून मनात निर्माण झालेले द्वंद्व, अस्वस्थता, विचारचक्र.... या सर्वाची तुलना आता रिमोटवरच्या बटणासरशी शेकडो चॅनल बदलण्याची सुविधा असलेल्या अद्ययावत टी.व्ही.शी चुकूनही करवत नाही. शिवाय श्रुतिकेशी आमच्या नकळत आमचे बाल्य जोडले गेले. विविध भावबंध जुळले गेले. आता फक्त त्यांच्या रम्य आठवणी मागे उरल्या.      


-- अरुंधती

Saturday, August 07, 2010

पॅलेस, कोर्टकेस, सुवर्णमोहोरा आणि मी

"आल्या का गं मॅडम?'' कोर्टरूमच्या आतून माझ्या मैत्रिणीने खुणेनेच विचारलं.
माझी मुंडी तिसर्‍यांदा नकारार्थी हालताना बघून तिने चेहरा वाकडा केला आणि कोर्टरूमच्या पुढील बाजूची तिची खड्या पारशाची पोझ घेत पुन्हा एकदा आमच्या दाव्याचा क्रमांक साधारण कधी, किती वाजता येईल याची तेथील लिपिकास विचारणा करू लागली. 
वेळ दुपारची. दिवस पावसाळ्याचे. कोर्टाच्या ब्रिटिशकालीन दगडी इमारतीत असलेल्या कोर्टरूम्समध्ये ओलसर दमट हवेबरोबर पावसाळी आभाळामुळे आज जरा जास्तच अंधार दाटला होता. मधूनच सतावणार्‍या, गुणगुणणार्‍या माशांना संथ लयीत गरगरणारे पंखे अजिबात उडवून लावू न शकल्याने त्या मला आजही नेहमीसारख्याच छळत होत्या. पण आज माझे ह्या सगळ्या गोष्टींकडे विशेष लक्ष नव्हते. कोर्टरूममध्ये आज पक्षकारांची जास्त गर्दी नव्हती. तरीही आतील मोकळी बाकडी मला जरा वेळ टेकण्यासाठी खुणावत नव्हती. त्याचे कारणही तसेच होते. 

आज आमच्या मॅडमची, म्हणजे वकील बाईंची एका खास केसची तारीख होती. आणि थोड्याच वेळात वकील बाई त्यांच्या भारताच्या राजकारणातील विख्यात पक्षकाराच्या तितक्याच जगद्विख्यात मातोश्रींबरोबर कोर्टरूममध्ये हजर होणार होत्या. माझी नेमणूक आत कोर्टरूममध्ये त्यांच्या येण्याची वर्दी देण्याच्या कामी झाली होती. त्यामुळे मी आपली कोर्टरूमच्या बाहेरच्या पॅसेजामध्ये एका पायावरून दुसर्‍या पायावर करत त्यांची अधीरपणे वाट बघत होते. 

ह्या आज येणाऱ्या पक्षकार मला आतापर्यंत टी. व्ही., वर्तमानपत्रे, मासिके इत्यादींतून माहिती व छायाचित्रांच्या रूपात भेटलेल्या. राजघराण्याची परंपरा, एकेकाळचे बलाढ्य संस्थान, शेकडो वर्षांचा शौर्याचा इतिहास, स्वातंत्र्योत्तर काळात उचललेली प्रगतीची व विकासाची पावले आणि त्या जोडीला असलेले कर्तृत्ववान, तेजस्वी व्यक्तिमत्त्व! शिवाय भारताच्या राजकारणातही महत्त्वाची भूमिका निभावणार्‍या ह्या राजस्त्री प्रत्यक्षात कशा दिसत असतील, बोलत असतील ह्याबद्दल नकळत माझ्या मनात खूप उत्सुकता दाटली होती. खरे सांगायचे तर मी त्यांना प्रत्यक्षात भेटणार आहे ह्यावर विश्वासच बसत नव्हता. पण वास्तवातील जगात कधी कधी असे योगही जुळून येऊ शकतात! आम्ही विद्यार्थीदशेत करायच्या सक्तीच्या इंटर्नशिपसाठी आमच्या वकील मॅडमकडे चार-सहा महिन्यांसाठी रुजू होतो काय, ह्याच दरम्यान त्यांच्या अखत्यारीत असलेल्या ह्या ''हाय-प्रोफाइल''केसची सुनावणीची तारीख पडते काय, आणि आमच्या वकील मॅडम आम्हा दोघी मैत्रिणींना त्या केसच्या सुनावणीस हजर राहण्याची परवानगी देतात काय.... सगळेच गमतीशीर! पण आयुष्यात असेही योगायोग येऊ शकतात यावर विश्वास ठेवायला लावणाराच तो दिवस होता! 


''आल्या का गं मॅडम?'' मैत्रिणीने पुन्हा एकदा तिच्या आतल्या पोझिशनवरून विचारले. मी पॅसेजच्या दिशेने नजर टाकली तर खरेच आमच्या वकील मॅडम एका देखण्या, वृद्ध बाईंबरोबर येताना दिसल्या. मी लगेच आत वर्दी दिली आणि त्यांना रिसीव्ह करायला सज्ज झाले. त्या बाईंच्या मागोमाग थोडे अंतर राखून अजून दोन तीन सुटाबुटातील माणसे चालत होती. बहुधा त्यांचे सेक्रेटरी व शरीररक्षक असावेत. त्या समोर आल्यावर मी थोडे हसून आमच्या मॅडमच्या 'सर्व व्यवस्थित?'च्या खुणेला नजरेनेच प्रतिसाद दिला आणि त्या दोघींबरोबर आत शिरले. थोड्या वेळातच त्या बाई साक्षीदाराच्या कठड्यात उभ्या राहिल्या. त्यांना तत्परतेने कोणीतरी बसायला खुर्ची आणून दिली. पण त्या उभ्याच होत्या. अंगावर तलम पांढरी शुभ्र कशीदाकाम केलेली उंची साडी, दोन्ही खांद्यांवरून व डोक्यावरून ओझरता पदर, कानात व हातात लखलखणारे हिरे, गळ्यात मोत्याचा सर आणि पायात मॅचिंग उंच टाचांच्या चपला! त्यांची पर्स त्यांचा असिस्टंट सांभाळत होता. वृद्धत्वातही आपले गोरे गुलाबी सौंदर्य, मृदू तेजस्वी कांती आणि चेहर्‍यावरचे सात्त्विक परंतु राजबिंडे भाव सांभाळणार्‍या त्या स्त्रीकडे मी मोठ्या कुतूहलाने बघत होते. त्या मंद हास्यामागे काय विचार चालले असतील, कोणत्या चिंता दडलेल्या असतील यांचा अदमास घेत होते. इस्टेट, प्रॉपर्टीसंबंधीच्या आणि कौटुंबिक कलहाचे - मतभेदांचे प्रतिबिंब दाखवणार्‍या कोर्ट केसेसमध्ये अनेकदा आढळून येणार्‍या टेन्शनचा लवलेशही त्यांच्या चेहर्‍यावर दिसत नव्हता.   सौम्य शब्दांमध्ये, हळू आवाजात त्यांनी वकिलांनी व कोर्टाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. आमच्या वकील मॅडमने त्यांची साक्ष - उलटतपासणी घेतली आणि थोड्याच वेळात त्यांचे तेथील काम संपले. कोर्टरूममधून निघताना मॅडमने त्यांची आम्हा दोघी ज्युनिअर्सशी ओळख करून दिली. त्यांनी मान हालवून आमच्याकडे बघत हसून आमचे अभिवादन स्वीकारले आणि आपल्या असिस्टंटसोबत आमच्या मॅडमशी बोलत बाहेर जाऊ लागल्या. अर्थात आम्हाला त्यांच्याबरोबर जाण्याची परवानगी नव्हती! ज्युनिअरशिपचे काही संकेत पाळावेच लागतात ना! शिवाय आत कोर्टरूममध्ये लिपिकाचे डोके खाण्याची जबाबदारी आमच्यावरच असल्याने आम्ही मुकाट तिथेच थांबलो, पण जरा चुटपुटतच!   

----------------------------------------------------------------------------------------

''परवा मॅडम कसल्या कडक दिसत होत्या, नै? एकदम टॉप टू टो मॅचिंग!!'' माझ्या मैत्रिणीच्या उद्गारांसरशी मी हातातल्या कागदांच्या चळतीतून डोके वर काढले. आम्ही वकील मॅडमच्या घरातील ऑफिसमध्ये खाली कार्पेटवर फतकल मारून बसलो होतो. मॅडम रात्री साडेसात-आठ वाजताच वरती त्यांच्या फ्लॅटमध्ये निघून गेल्या होत्या. आम्हाला त्यांच्या ऑफिसमध्ये नऊ वाजेपर्यंत बसायची परवानगी देऊन! हो, कारण गेले दोन दिवस आम्ही त्यांना ''आम्हाला 'त्या' केसची कागदपत्रे दाखवा ना मॅडम!! '' म्हणून पुरते छळले होते.... त्याचा परिणाम म्हणून की काय, त्यांनी शेवटी कंटाळून कागदपत्रांची एक मोठीच्या मोठी चळत पाहण्याची परवानगी आम्हाला देऊ केली होती. अर्थातच त्या हाय प्रोफाइल केसचे महत्त्वाचे तपशील त्यात नव्हते! परंतु ज्या प्रॉपर्टीज, इस्टेटीवरून ती केस कोर्टात दाखल झाली होती त्या प्रॉपर्टीज व त्या राजघराण्याच्या भारतात असलेल्या विविध जमिनी, महाल, इमारती, जडजवाहीर इत्यादींची भली मोठी जंत्री त्या कागदपत्रांमध्ये होती. मग काय, जणू खजिनाच हाती लागल्याच्या थाटात आम्ही तेव्हा बऱ्यापैकी गोपनीय असलेली ती माहिती अधाश्यासारखी वाचून काढत होतो.

''मला त्या बाईंचे कानातले हिऱ्याचे टॉप्स फार आवडले! कसले लखलखत होते!!'' इति मी. हो, खोटं कशाला बोलू, त्या रात्री स्वप्नात मला ते लखलखणारे तेजस्वी हिरेच दिसत होते!

''हो, परवापासून बघते आहे, तू सारखी त्या बाईंच्या पेहरावाचीच स्तुती करते आहेस! आपल्या मॅडमदेखील त्या दिवशी कित्ती मस्त मॅचिंग करून आल्या होत्या हे मी चौथ्यांदा बोलते आहे... पण तुझं लक्षच नसतं! '' मैत्रीण फणकारली.

''अगं हो गं, कळलं मला! ए, तू त्या पॅलेसचं वर्णन वाचलंस का गं? समुद्राच्या किनाऱ्यावर असा पॅलेस.... कसलं सहही वाटत असेल ना तिथे? मी काही वर्षांपूर्वी त्या पॅलेसचे एका मासिकात फोटो पाहिले होते. काय सॉल्लिड आहे ना? '' मी अजून पॅलेसेस, महाल, प्रासादांच्याच दुनियेत होते.

''हो तर, आणि ही बघ, माझ्या हातातली ही यादी.... सोन्याचे, हिरे-पाचू-माणिक-पोवळ्याच्या दागिन्यांची वर्णनं वाच जरा.... डोळे फिरताहेत नुसती वर्णनं वाचून.... प्रत्यक्षात काय दिसत असतील!!! '' मैत्रिणीने हातातली कागदांची चळत पुढे केली. 

पुढची काही मिनिटे आम्ही अशाच हातातली कागदपत्रे चाळण्यात मग्न होतो. त्या यादीत त्यांच्या घराण्यातील पारंपारिक जुन्या दागदागिन्यांचीही तपशीलवार वर्णने होती. ती भावनाशून्य, तंत्रशुद्ध, निर्विकार वर्णने वाचतानाही माझ्या नजरेसमोर त्या वस्तू प्रत्यक्षात कशा दिसत असतील याच्या विविध शक्यता तरळत होत्या.

''ए, तू खरं त्या बाईंशी थोडं बोलायला हवं होतंस....'' माझी तंद्री भंग करत मैत्रिणीने मला ढोसले. ''ती तू मला एकदा सांगितलेली त्यांच्या घराण्यातील सासूबाईंची आणि तुझ्या पणजोबांची गोष्ट त्या बाईंच्या कानावर घालायला हवी होतीस!'' मैत्रिणीच्या ह्या उद्गारांसरशी मी तिच्याकडे ''वेड लागलं नाही ना तुला? '' अशा आविर्भावात पाहिल्यावर ती थोडा वेळ शांत बसली. मग पुन्हा फुसफुसली, ''सांग ना ती गोष्ट परत! ''

''हं, '' मी निःश्वास सोडला. ''त्यांना माहीतच असेल गं ती गोष्ट! मी काय वेगळं सांगणार? हां, त्या पणजोबांची मी पणती आहे एवढं तरी सांगता आलं असतं.... पण तितका वेळ मिळायला तर पाहिजे ना त्यांच्याशी बोलायला! इथे आपल्याला त्यांच्याशी एक वाक्य बोलायचीही चोरी होती!! '' मैत्रिणीने माझ्याकडे ''यह नही सुधरेगी,'' सदृश भाव चेहऱ्यांवर आणून खेदाने पाहिले! तिच्या मते अशी संधी मागून मिळत नसते, ती हिसकावून घ्यावी लागते. ''गोष्ट सांगते आहेस ना? '' तिने पुन्हा एकदा ढोसले. 

''हं, ऐक. माझ्या पणजोबांनी, म्हणजे आजीच्या वडीलांनी एकदा कोंकणात एका चिमुरड्या परकरी मुलीला पायात आपट्याच्या पानांचे तोडे घालून खेळताना पाहिलं. माझे पणजोबा आपले कोंकणातले साधेसुधे भिक्षुकी करणारे कुडमुडे ज्योतिषी! थोडीफार शेती, भिक्षुकी आणि ज्योतिषाच्या आधारावर ते स्वतःचे घर चालवायचे. तर असेच एक दिवस ही मुलगी त्यांना खेळताना दिसली. त्यांनी त्या मुलीची लक्षणे पाहून तिच्या घरच्यांना सांगितले की भविष्यात ही मुलगी राज्ञीपद भूषवेल. त्या लोकांचा विश्वास बसला की नाही कोणास ठाऊक! पण खरोखरीच पुढे काही वर्षांनी त्या मुलीला राजघराण्यातून मागणी आली आणि ती राणी झाली. मात्र ही गोष्ट इथेच संपत नाही.... '' मी बोलण्यात जरा उसंत घेतली.



''मग, पुढे? '' मैत्रिणीचा उत्सुक स्वर.

''पुढे काय, माझ्या पणजोबांना आपण असे कोण्या मुलीचे भविष्य सांगितले होते ह्याचाही विसर पडला होता. परंतु त्या मुलीच्या घरचे लोक ही गोष्ट लक्षात ठेवून होते. तिचे राजघराण्यात लग्न ठरल्याबरोबर माझ्या पणजोबांना त्या लग्नकार्याला उपस्थित राहण्याचे पद्धतशीर सन्मानपूर्वक आमंत्रण करण्यात आले. एवढेच नव्हे तर कोंकणातल्या त्यांच्या गावापासून त्या संस्थानाच्या राजधानीपर्यंतच्या लांबच्या प्रवासाची सर्व व्यवस्थाही राजघराण्यातर्फे करण्यात आली. पणजोबांना तिथे लग्नाचे सर्व विधी, उत्सव पार पडेपर्यंत आठ दिवस मोठ्या आदरातिथ्याने ठेवले गेले. माझे पणजोबा पडले अगदी साधे, बेताच्या परिस्थितीतले गृहस्थ! त्यांच्याकडे तिकडच्या थंडीसाठी आवश्यक गरम कपडेही नव्हते! मग त्यांच्यासाठी तिथे खास शिंपी बोलावून त्यांच्या मापाच्या गरम कपड्यांची सोय केली गेली, त्यांना पांघरायला मऊ, उबदार रजया दिल्या गेल्या. अगदी परत निघताना त्यांना मानाने लोटा भरून सुवर्णमोहोरा देऊ केल्या गेल्या. पण पणजोबा स्वभावाने अगदी निरिच्छ, साधेसुधे होते. त्यांना विलक्षण संकोच वाटला. ब्राह्मणाला काय करायचंय एवढं सोनं? असा सवाल करून शेवटी त्यातील मूठभर मोहोरा त्यांनी राजघराण्याच्या आग्रहाचा मान राखायचा म्हणून घेतल्या. रजया मात्र आपण नक्की घेऊन जाणार, फार उपयोगी पडतील असे त्यांनी आवर्जून सांगितले. आणि त्या रजया व सुवर्णमोहोरा घेऊन ते परत आपल्या कोंकणातील घरी परतले. पुढे त्यांच्या अकाली देहावसानानंतर परिस्थितीवश त्यातील अनेक मोहोरा उदरनिर्वाहास्तव खर्च झाल्या. परंतु काही मोहोरा माझ्या आजीला वाटणीत मिळाल्या, तर काही आजीच्या मोठ्या बंधूंना. त्या बंधूंच्या सुनेने सोन्याच्या त्या जाड मोहोरेला वळे जोडून त्याची अंगठीच बनवून घेतली. आमच्याकडच्या सुवर्णमोहोरा आजीने १९६१ च्या पानशेतच्या पुरात सर्व संसार-घरदार नष्ट झाल्यावर मोडल्या आणि त्यातून पुढचे विश्व उभे करण्यास हातभार लावला. अशा प्रकारे आमची सुवर्णमोहोरांची कहाणी सुफळ संपूर्ण झाली!! हं, टाका आता दक्षिणा!'' मी मैत्रिणीला चिडवले.  

''हम्म्म! पण तुझ्या पणजोबांनी ते सगळे सोने घेतले असते तर गं??? '' माझी मैत्रीण स्वप्नाळू आवाजात उद्गारली.

''तर? तर आज त्या राजकारणी मायलेकांमध्ये जशी इस्टेटीवरून भांडणे, कोर्टकज्जे चाललेत ना, तसेच आमच्याकडेही झाले असते! एक लक्षात ठेव! ह्या लोकांना असा आयता, पिढीजात, बिनकष्टाचा पैसा पचत असेल, पण आपल्याला नाही पचत! आणि अशा पैशाला वाटा फुटतातच.... बघच तू! ''

''होsss की! म्हणूनच की गं बाई हे गर्भश्रीमंत लोक इतके ऐषोआरामात राहतात, सगळीकडे विमानाने नाहीतर महागड्या गाड्यांमधून प्रवास करतात, पॅलेसमध्ये राहतात.... कसेबसे हिऱ्यापाचूंचे दागिने घालतात! काय बाई, किती ते कष्ट!'' मैत्रिणीने वेडावून दाखवले. 

''ए गप्प गं, त्यांना काय कमी टेन्शन्स असतात का! त्यांना या सगळ्या सुखांची किंमतही तेवढीच मोजावी लागते बरं! मी गॅरंटीने सांगते, रात्री झोप यायला गोळी घ्यायला लागत असणार ह्यांना! आता आपल्याकडच्या या केसचेच बघ ना! कसला वैताग येत असेल ना.... '' माझी मुक्ताफळे.

''ह्यँ! तसलं काही नसतं! त्यांना सवय असते अशा टेन्शन्सची! आपली ही भिक्कार प्रवृत्तीच आपल्याला नडते.... कायम कष्टाच्या, घामाच्या पैशाला नको एवढे महत्त्व देऊन, त्याच्या बाता करून करून ना आपल्या वाडवडिलांनी पार वाट लावली आहे आपली! अरे, आयता पैसा मिळाला तो लेने का, क्यूं - काय को वगैरा नही पूंछने का! पैसा काळा आहे का पांढरा, कोणाला काय पडलंय त्याचं.... मस्त राहायचं, ऐष करायची.... '' मैत्रिणीचे नेहमीचे डायलॉग्ज सुरू झाले होते. त्यांना थांबवायचा एकच उपाय होता.

''मला खूप भूक लागली आहे, '' मी घड्याळात डोकावत कुरकुरले. रात्रीचे नऊ कधीच वाजून गेले होते. बाहेर पावसाची रिपरिप चालूच होती. मॅडमचे घर शहराच्या शांत, झाडीझुडुपांच्या रस्त्यावर असल्याने इथे त्या पावसातही रातकिड्यांची किरकिर व्यवस्थित ऐकू येत होती.

''ए, आज मस्त चायनीज खायचं का? मला मस्त गरमागरम सूप प्यायचंय! '' मैत्रिणीचे डोळे उत्साहाने लकाकले. हुश्श! सध्यापुरता तरी आयता/काळा पैसा आणि घामाचा पैसा यावरून आमचा होणारा नित्य प्रेमळ संवाद टळला होता. 

''चालेल, पण पैसे आहेत का तेवढे? माझ्याकडे शंभराची नोट निघेल, '' इति मी.

''अरे, काळजी नही करने का! कालच बाबांच्या खिशातून मी शंभर ढापलेत.... आणि माझ्या पर्समध्ये असतील अजून साठ-सत्तर रुपये. आजचं आपलं चायनीज खाणं नक्की बसेल त्यात.''

ऑफिसमधील सर्व दिवे, पंखे मालवून, ऑफिस बंद करून आम्ही त्याची चावी मॅडमच्या घरी पोचवली आणि पॅलेसच्या गर्भश्रीमंत स्वप्नांमधून कष्टाने बाहेर पडत पोटात कोकलणाऱ्या कावळ्यांना शांत करण्यासाठी आमच्या नेहमीच्या चायनीज रेस्टॉरंटकडे मोर्चा वळवला. 

--- अरुंधती 

Saturday, July 10, 2010

भागीमारी - एका पुरातत्वीय उत्खननाची अनुभवगाथा

भागीमारी हे नाव आठवले तरी ते सावनेर तालुका (जि. नागपूर) येथील छोटेसे गाव डोळ्यांसमोर उभे ठाकते. जवळपास सोळा-सतरा वर्षांपूर्वी ह्या गावाशी आणि तेथील परिसराशी एका पुरातत्वीय उत्खननाच्या निमित्ताने संबंध आला आणि एक वेगळाच अनुभव माझ्या पदरी पडला.
सर्वात आधी सांगू इच्छिते की आता माझा पुरातत्वशास्त्र इत्यादी विषयांशी फक्त वाचनापुरताच संबंध राहिला आहे. पण कधी काळी एका नामवंत शिक्षणसंस्थेत भारतीय प्राच्यविद्यांचा अभ्यास करताना मला आणि माझ्या तीन सख्यांना पुरातत्वीय उत्खननात प्रत्यक्ष सहभाग घेण्याची अनमोल संधी मिळाली आणि त्या संधीचा लाभ घेताना आम्ही त्या प्रात्यक्षिकपूर्ण अनुभवाने बरेच काही शिकलो. प्रस्तुत लेखात त्या अनुभवांच्या शिदोरीतील मोजके, रंजक अनुभव मांडत आहे. कोठे तांत्रिक चुका राहिल्यास ती माझ्या विस्मरणाची खूण समजावी!!
तर चार झाशीच्या राण्या (उर्फ अस्मादिक व तीन सख्या) प्रथमच अशा प्रकारच्या उत्खननाला तब्बल आठवडाभरासाठी जाणार म्हटल्यावर घरच्यांना थोडी काळजी होतीच. आम्हाला आधीपासून आमच्या मार्गदर्शक प्राध्यापकांनी बरोबर काय काय न्यावे लागेल ह्याची एक मोठी यादीच दिली होती. त्याप्रमाणे जमवाजमव, खरेदी, त्या दरम्यान एकमेकींना असंख्य फोन कॉल्स, सूचना वगैरे पार पडल्यावर जानेवारीच्या एका रात्री आम्ही महाराष्ट्र एक्सप्रेसने नागपुराकडे रवाना झालो. आम्हा नवशिक्यांसोबत एक पी. एच. डी. चे विद्यार्थीही होते. चौघीही अखंड टकळीबाज असल्यामुळे गप्पाटप्पा आणि खादाडीच्या ओघात प्रवास कधी संपला तेच कळले नाही. नागपुराहून भागीमारीला जाताना आधीपासून आमच्या प्राध्यापकांनी आमच्यासाठी खाजगी जीपची व्यवस्था करून ठेवल्याचा खूपच फायदा झाला. आदल्या रात्री अकरा वाजता निघालेलो आम्ही दुसऱ्या रात्री एकदाचे भागीमारीत थडकलो.
आमची नागपुराहून निघालेली जीप धूळ उडवत थेट आमच्या राहुट्यांच्या कँपवरच पोचली. एका बाजूला हाय-वे, दुसऱ्या बाजूला कापणी झालेली शेतं आणि हाय-वे लगतच्या त्या मोकळ्या शेतजमीनीवर उभारलेल्या राहुट्यांमध्ये आमचा मुक्काम! आयुष्यात प्रथमच मी अशा प्रकारे मोकळ्या माळरानावर राहण्याचा अनुभव घेत होते. माझ्यासाठी ते सर्व अनोखे होते. माझ्या बाकीच्या सख्याही पक्क्या शहराळलेल्या. त्यामुळे ह्या नव्या वातावरणात आपण कितपत तग धरू शकू अशी धाकधूक प्रत्येकीच्याच मनात थोड्याफार फरकाने होती. पण त्याहीपेक्षा काही नवे शिकायला मिळणार, आजपर्यंत जे फक्त थियरीत शिकलो ते प्रत्यक्ष करायला मिळणार, अतिशय अनुभवसंपन्न व जाणकार प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभणार ह्या सर्वाचे औत्सुक्य जबरदस्त होते. त्यामुळे जे काही समोर येईल ते स्वीकारायचे, आत्मसात करायचे असाच चंग बांधलेला होता आम्ही!
त्या रात्री आम्ही जरा लवकरच झोपी गेलो. एकतर प्रवासाचा शीण होता आणि दुसऱ्या दिवशी लवकर उठून उत्खननाच्या साईटवर निघायचे होते. माझ्या तंबूत मी आणि एक मैत्रीण अशा दोघींची व्यवस्था होती. बाकी दोघी दुसऱ्या तंबूत. इतर पी. एच. डी. चे विद्यार्थी, प्राध्यापक आणि स्टाफ यांसाठीही वेगवेगळ्या राहुट्या होत्या. स्वयंपाक व भोजनासाठी वेगळी राहुटी होती. सर्व राहुट्या अर्धवर्तुळात रस्त्याच्या विरुद्ध, आतल्या बाजूला तोंड करून होत्या. जरा पलीकडे आमच्या मेक-शिफ्ट बाथरूम्स होत्या. म्हणजे चारी बाजूंनी तरटे लावलेली, पाणी वाहून जायची व्यवस्था केलेली शेतजमीनीतील जागा. त्याही पलीकडे असेच प्रातर्विधींसाठीचे तरटांनी चारही बाजू झाकलेले मातीचे चर. एका मोठ्या चुलाण्यावर सकाळ, संध्याकाळ मोठ्या हंड्या-पातेल्यांतून पाणी उकळत असे. तेच पाणी बादलीतून आम्हाला अंघोळीसाठी मिळे. थेट आकाशाच्या खाली, अंगाला वारा झोंबत, रात्री व पहाटे टॉर्चच्या उजेडात सर्व आन्हिके आटोपताना फारच मजा येत असे! त्यात एक मैत्रीण व मी स्नानाचे वेळी आमच्या नैसर्गिक स्पा उर्फ वेगवेगळ्या तरट-स्नानगृहांमधून एकमेकींशी गप्पा मारत असू. आम्हाला वाटायचे की आम्ही जे काही बोलतोय ते फक्त आमच्यापुरतेच आहे.... पण ते साऱ्या राहुटीवासियांना ऐकू जात असे हे बऱ्याच उशीराने समजले. नशीब, आम्ही वाचलेली पुस्तके, कथा, कादंबऱ्या, पाहिलेले चित्रपट - गाणी वगैरेचीच चर्चा ( वैयक्तिक टिकाटिप्पणीसह) करायचो!!!!
पहिल्या रात्री त्या अनोळखी माळावर, हाय-वे वरच्या ट्रक्सचे आवाज व दिव्यांचे प्रखर झोत तंबूच्या कपड्यातून अंगावर घेत, सतरंजीमधून टोचणाऱ्या नवार खाटेवर कूस बदलत, अंगाला यथेच्छ ओडोमॉस चोपडूनही हल्ल्यास उत्सुक डासोपंतांना हूल देत, बंद तंबूच्या फटीमधून येणारे गार गार वारे अनुभवत आणि दुसऱ्या दिवशीची स्वप्ने पाहत कधी झोप लागली तेच कळले नाही.
दुसऱ्या दिवशी गजर लावला होता तरी कुडकुडत्या थंडीत उठायची इच्छा होत नव्हती. पण तंबूच्या दाराशी आलेल्या बेड-टीने आम्हाला उठवल्यावर मग बाकीचे आवरणे भागच होते. पहाटेच्या अंधारातच पटापट आवरले. येथे खाटेवरून पाऊल खाली टाकल्या टाकल्या बूट-मोजे घालावे लागत. कारण राहुटीचा भाग शेतजमीनीचाच असल्यामुळे रात्रीतून कोण कोण पाहुणे तिथे आश्रयाला आलेले असत. रात्री कंदिलाच्या उजेडात उशाशी काढून ठेवलेला कपड्यांचा ताजा जोड अंगात चढवायचा, सर्व जामानिमा करून दिवसभरासाठी लागणारे सामान सॅकमध्ये कोंबून बाहेरच्या खुल्या आवारात, हातांचे तळवे एकमेकांवर चोळत, थंडीत अंगात ऊब आणायचा प्रयत्न करत प्राध्यापकांची वाट बघत थांबायचे. त्यादिवशीही तसेच झाले. पलीकडे आकाशात विविध रंगछटांची नुसती बरसात झाली होती. सकाळच्या प्रहराला शांत प्रहर का म्हणतात ते तेव्हा नव्याने कळले. जानेवारीतल्या धुक्याच्या दुलईला बाजूला सारत जेव्हा सूर्याची किरणे आसमंत उजळवू लागली होती तेव्हा आमच्या चमूने उत्खननाच्या साईटच्या दिशेने कूचही केले होते. सोबत किलबिलणाऱ्या पक्ष्यांची साथ. नागपुरी उन्हाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी डोक्याला हॅट, गळ्यात स्कार्फ, टी-शर्टवर पूर्ण बाह्यांचा शर्ट, पॅंट आणि पायात शूज अशा एरवी मला अजिबात सवय नसलेल्या अवतारात सुरुवातीला वावरताना थोडे अवघडायला झाले होते. पण हळूहळू त्याची सवय झाली. हाय-वे वरून पंधरा-वीस मिनिटे चालल्यावर थोडे आत वळून एका ओढ्याच्या बाजूला असलेल्या एका पांढरयुक्त डोंगरावर आमची उत्खननाची साईट होती. महापाषाणयुगीन संस्कृतीतील वस्तीचे अवशेष येथील उत्खननात गवसत असल्यामुळे त्याला विशेष महत्त्व होते. अगोदरच्या वर्षी जवळच त्या काळातील दफनभूमीचे उत्खनन झाले होते. मला ह्यावर्षीच्या त्या पुरातन वस्तीवरील उत्खननात हाडे, सांगाडे वगैरे सापडणार नाहीत म्हणून थोडेसे दुः ख झाले खरे, पण त्या वस्तीच्या खुणांमध्येही काही महत्त्वपूर्ण अवशेष, पुरावे हाती लागायची शक्यता होती.
आल्यासरशी आमच्या एका प्राध्यापकांनी आम्हाला ओढ्याच्या दिशेने पिटाळले. मग त्यांनी स्वतः येऊन ओढ्याच्या पाण्यातून, परिसरातून जीवाश्म कसे हुडकायचे ते सप्रात्यक्षिक दाखवले. त्यानंतर जवळपास अर्धा-पाऊण दिवस आम्ही घोटाभर पाण्यात उभे राहून, पाठी वाकवून, माना मोडेस्तोवर ताणून जीवाश्म हुडकत होतो. उत्खनन हे येऱ्या गबाळ्याचे काम नोहे हा शोध मला त्याच बकचिंतनात लागला. पुस्तकात वाचलेली सोपी पद्धत प्रत्यक्षात आणताना किती कष्टाची असते ते पहिल्यांदाच जाणवले. लगोलग सर्व पुरातत्वज्ञांविषयीचा माझा आदर जाम दुणावला.
दुपारच्या जेवणापश्चात (नशीब, त्यासाठी वेगळी तंगडतोड नव्हती! ते जाग्यावरच यायचे! ) मोडलेल्या माना, पाठी सावरत आम्ही उत्खननाच्या चरापाशी येऊन थडकलो. चराचे शास्त्रशुद्ध पद्धतीने वेगवेगळ्या चौरसांमध्ये दोरीच्या साहाय्याने विभाजन करण्यात आले होते. आमच्या हातात छोटी छोटी हत्यारे देऊन प्रत्येकीची रवानगी एकेका कोपऱ्यात करण्यात आली. जमीन कशी हलक्या हाताने उकरायची, ब्रशने साफ करायची वगैरेंचे प्रात्यक्षिक झाल्यावर आम्ही मन लावून आपापल्या चौकोनात कामाला लागलो. खूपच वेळखाऊ, कष्टाचे, धीराचे आणि कौशल्याचे काम. कोणतीही घाई करायची नाही. काही महत्त्वाचे सापडत आहे असे वाटले तर लगेच सरांना बोलावायचे. मध्ये मध्ये आमचे सर येऊन शंकांचे निरसन करीत, प्रश्नांना उत्तरे देत आणि आमच्या आकलनाचीही चाचपणी करत. तशी मजा येत होती. पण एवढा वेळ दोन पायांवर उकिडवे बसण्याची सवय नसल्यामुळे दर पंधरा-वीस मिनिटांनी हात-पाय झाडायचा, झटकायचा कार्यक्रमही चालू असे. पाठ धरली की जरा हात-पाय मोकळे करण्यासाठी इतर लोकांची खोदाखोदी कोठवर आली हे बघण्यासाठी जरा फिरून यायचे.... अर्थातच आपल्या चौकोनापेक्षा इतरांचे चौकोन जास्त आव्हानात्मक व आकर्षक वाटत असत!
मला नेमून देण्यात आलेल्या चौकोनात मला तुटकी-फुटकी मातीची खापरे, शंख, हस्तीदंती बांगड्यांचे काही तुकडे मिळत होते. प्रत्येक अवशेष जीवापाड जपून हलकेच साफ करताना नकळत मनात तो अवशेष तिथे कसा, कोठून आला असेल वगैरेची कल्पनाचित्रे रंगत असत.
मी काम करत असलेल्या चौकोनाच्या जवळच मातीत पुरलेल्या रांजणाच्या खुणा सापडल्या होत्या. त्यामुळे आम्ही काम करत असलेला भाग एखाद्या घराच्या स्वयंपाकाच्या जागेतील असावा असे वाटत होते. आमचे प्राध्यापक आम्हाला खापरांचे वर्गीकरण कसे करायचे, त्यांच्यावर दृश्य खुणा कशा शोधायच्या, त्यांची साफसफाई इत्यादीविषयी अथक मार्गदर्शन करत असत. काम कितीही पुढे न्यावे असे वाटले तरी सूर्याचे मावळतीचे किरण आम्हाला जबरदस्तीने परतीचा कँप साईटचा रस्ता धरायला लावत असत. शिवाय दिवसभर उन्हात करपल्यावर दमलेल्या थकलेल्या शरीराने जास्त काही होणे शक्यही नसे.
कँपवर परतल्यावर हात-पाय धुऊन सगळेजण मधल्या मोकळ्या जागेत ठेवलेल्या प्लॅस्टिक टेबल-खुर्च्यांचा ताबा घेत असत. मग चहा-बिस्किटांचा राऊंड होई. जरा तरतरी आली की आळीपाळीने स्नानासाठी क्रमांक लावले जात. दिवसभराची धूळ, माती, घाम, आदल्या रात्रीचा ओडोमॉसचा थर वगैरे चांदण्यांच्या आणि टॉर्चच्या प्रकाशात, किरकिरणाऱ्या रातकिड्यांच्या आणि गार वाऱ्याच्या साथीने, गरम गरम पाण्याने धुतला जाताना काय स्वर्गसुख लाभे हे शब्दांमध्ये सांगणे शक्य नाही. मग जरा किर्र अंधाराची भीती घालवण्यासाठी आपसूकच तोंडातून गाण्याच्या लकेरी बाहेर पडत आणि टेबलाभोवती गप्पा मारत बसलेल्या आमच्या 'सक्तीच्या' श्रोत्यांची बसल्या जागी करमणूक होई!
स्नानादीकर्मे झाल्यावर खरे तर माझे डोळे दिवसाच्या श्रमांनी आपोआपच मिटायला लागलेले असत. पण कंदिलाच्या प्रकाशातील राहुटीतल्या भोजनाचा दरवळ त्या झोपेला परतवून लावत मला जागे राहण्यास भाग पाडत असे. जेवणात आम्हा विद्यार्थी व प्राध्यापकांची अंगतपंगत बसे. आमचा शिपाई/ आचारी/ वाढपी आम्हाला मोठ्या प्रेमाने आणि आग्रहाने खाऊ घालत असे. त्या पंगतीत दिवसभरातल्या उत्खननाच्या प्रगतीवर चर्चा होत. कधी कधी उष्टे हात कोरडे होईस्तोवर ह्या चर्चा रंगत. त्यातील सर्व तांत्रिक मुद्दे कधी कळत तर कधी बंपर जात. पण तरीही तारवटल्या डोळ्यांनी आपल्या शिक्षकांच्या मुखातून मिळणारी माहिती शिणलेल्या मेंदूत साठवताना काय तो आनंद मिळे!
जेवणापश्चात पुन्हा जरा वेळ बाहेरच्या टेबलाभोवती गप्पा रंगत. कधी आम्ही पाय मोकळे करण्यासाठी हाय-वे च्या कडेकडेने जरा फेरफटका मारून येत असू. पण दिवसभरच्या सवय नसलेल्या परिश्रमांनंतर माझे पाय अशा सफरीसाठी जाम कुरकुरत. तरीही माघार घ्यायची नाही ह्या तत्त्वानुसार मी स्वतः ला रेटत असे. नऊ-साडेनवाला सगळेजण आपापल्या राहुट्यांमध्ये परतलेले असत. मग रात्री कंदिलाच्या मिणमिणत्या उजेडात हलक्या आवाजात गप्पा (हो! गप्पांचे आवाजही मोकळ्या माळरानामुळे इतरांना ऐकू जायचे! ), दुसऱ्या दिवशीचे प्लॅन्स आणि मग कधीतरी कंदिलाची ज्योत बारीक करून निजानीज!
दुसरे दिवशी पुन्हा आदल्याच दिवसाचे रूटीन! रोज साईटवर जाता - येता रस्त्याच्या बाजूला असलेल्या दगडांच्या खाणींमध्ये चमचमणारे दगड मिळायचे. अमेथिस्ट, टोपाझच्या रंगछटांचे ते जाडजूड चमचमणारे दगड गोळा करताना खूप मजा यायची. दुपारच्या जेवणानंतर जिथे कोठे, ज्या झाडाखाली सावली मिळेल तिथे अर्धा तास विश्रांती घेऊन मगच पुढच्या कामाला सुरुवात व्हायची. मग आमच्यातील काही उत्साही जन आजूबाजूच्या संत्रा-पेरुंच्या बागांमध्ये रानमेवा शोधत हिंडायचे. गावातील शेतकरी कधी कधी आम्ही काय करतोय हे पाहायला यायचे. आम्हाला आधीपासूनच गावकऱ्यांशी कसे वागायचे वगैरेच्या अनौपचारिक सूचना देण्यात आल्या असल्यामुळे आम्ही आपले हातातले काम चालू ठेवायचो.
आमचे एक प्राध्यापक आम्हाला अनेकदा काही सोन्याचांदीचे दागिने अंगावर असल्यास ते उत्खननाचे वेळी काढून ठेवायला सांगायचे. ते असे का सांगतात ते मात्र कळत नव्हते. शेवटी त्याचा उलगडा एका मजेदार किश्शाच्या कथनाने झाला. अशाच एका उत्खननाचे वेळी तेथील एका विद्यार्थिनीच्या गळ्यातील सोन्याची चेन उत्खनन करत असलेल्या खड्ड्यात पडली. नंतर लक्षात आल्यावर शोधाशोध झाली व अखेर ती चेन खड्ड्यातून मिळाली. एव्हाना गाववाल्यांपर्यंत ही बातमी कशीतरी पोचलीच होती. मग काय! थोड्याच वेळात त्या जमीनीचा मालक व त्याचे इतर गाववाले साथीदार उत्खननाच्या साईटवर हजर झाले! त्यांच्या मते उत्खननात बरेच गुप्तधन सापडले आणि त्या गुप्तधनात सोन्याची चेनही मिळाली! वातावरण बघता बघता गंभीर झाले. गाववाले गुप्तधन ताब्यात द्या ह्या आपल्या आग्रहापासून मागे हटायचे नाव घेईनात आणि त्यांची कशामुळे खात्री पटेल ह्यावर साईटवरील लोकांमध्ये खल-विचार. शेवटी त्या गाववाल्यांची कशीबशी समजूत काढता काढता तेथील प्राध्यापक, विद्यार्थी व मदतनीसांच्या नाकी नऊ आले! तेव्हापासून जरा जास्तच सावधानता!
एव्हाना मी काम करत असलेल्या चौकोनात फार काही निष्पन्न होत नव्हते. परंतु माझ्या दोन सख्या ज्या चौकोनात काम करत होत्या तिथे फक्त चूलच नव्हे तर वैलीच्या अस्तित्वाच्या खुणाही दिसू लागल्या होत्या!! महापाषाणयुगीन संस्कृतीतील मानवालाही चूल-वैलीचे तंत्रज्ञान अवगत असण्याविषयीचा हा फार फार महत्त्वाचा पुरावा होता. मग त्याविषयी अगणित चर्चा, तर्क, अंदाज चांगलेच रंगत असत. दरम्यान आम्ही उत्खननाच्या व आमच्या राहुट्यांच्या साईटपासून बऱ्यापैकी दूर अंतरावर असलेल्या प्रत्यक्ष भागीमारी गावाचा फेरफटका करून आलो होतो. मुख्य वस्तीतील बऱ्याच घरांचा पाया पांढर असलेल्या भागातच होता. मूळ जोत्यावरच पुढच्या अनेक पिढ्या आपली घरे बांधत होत्या. म्हणजे कितीतरी शे - हजार वर्षे त्याच भागात लोक वस्ती करून राहत होते. अर्थात तिथे लोकांची रहिवासी वस्ती असल्यामुळे तसे तिथे उत्खनन करणे अवघड होते. पण निरीक्षणातून अंदाज तर नक्कीच बांधता येत होता.
आतापर्यंत आमच्या खरडवह्यांमध्ये आम्ही उत्खननाच्या चराच्या आकृत्या, कोणत्या चौकोनात काय काय सापडले त्याच्या नोंदी, खुणा, तपशील व जमतील तशा आकृत्या वगैरे नोंदी ठेवतच होतो. त्या चोपड्यांना तेव्हा जणू गीतेचे महत्त्व आले होते. एकेकीच्या वहीत डोके खुपसून केलेल्या नोंदी न्याहाळताना ''ह्या सर्व घडामोडींचे आपण साक्षीदार आहोत'' या कल्पनेनेच मनात असंख्य गुदगुल्या होत असत. काळाच्या पोतडीतून अजून काय काय बाहेर पडेल ह्याचीही एक अनामिक उत्सुकता मनी दाटलेली असे.
बघता बघता आमचा उत्खननाच्या साईटवरचा वास्तव्याचा काळ संपुष्टात आला. आमची बॅच गेल्यावर दुसरी विद्यार्थ्यांची बॅच उत्खननात सहभागी होण्यासाठी येणार होती. मधल्या काळात २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त आम्हाला सुट्टी होती. त्या दिवशी सकाळी गावातील प्रभात फेरीत उत्स्फूर्त भाग घेऊन त्यानंतर आमच्या तज्ञ प्राध्यापकांनी अतिथीपद भूषविलेल्या गावातील पंचायत व शाळेच्या समारंभात उपस्थिती लावतानाही आगळीच मजा आली. दुपारी असेच फिरायला गेलो असता माझ्या लाल रंगाच्या टीशर्टला पाहून जरा हुच्चपणा दाखवणाऱ्या रस्त्यातील म्हशीमुळे माझी भंबेरी उडाली व इतरांची करमणूक झाली!
निघताना आम्ही मैत्रिणीच्या नातेवाईकांकडे सावनेरला रात्रीचा मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी लवकर उठून नागपूर स्टेशन गाठले. तिथून पुढे पुण्यापर्यंतचा सोळा-सतरा तासांचा प्रवास. अंगाला अजूनही भागीमारीच्या मातीचा वास येत होता. नाकातोंडात-केसांत तिथलीच धूळ होती. हातांना कधी नव्हे तो श्रमाचे काम केल्यामुळे नव्यानेच घट्टे पडले होते. पायांचे स्नायू दुखायचे बंद झाले नसले तरी दिवसभराच्या उठाबशांना सरावू लागले होते. आणि डोळ्यांसमोर सतत उत्खननाच्या साईटची दृश्ये तरळत असायची. तो अख्खा प्रवास आम्ही सहभागी झालेल्या उत्खननाच्या आकृत्या पडताळण्यात, त्यावर चर्चा करण्यात आणि दमून भागून झोपा काढण्यात घालवला.
घरी आल्यावर आप्त-सुहृदांनी मोठ्या उत्सुकतेने प्रवासाविषयी, उत्खननाविषयी विचारले. तेव्हा त्यांना काय काय सांगितले, त्यातील कोणाला मी सांगितलेल्यातील काय काय उमजले हे आता लक्षात नाही. एका अनामिक धुंदीत होते मी तेव्हा! पण आयुष्यातील अतिशय अविस्मरणीय असा अनुभव देणारे ते सात दिवस, ते अनमोल उत्खनन आणि वेगळ्या वातावरणात मिळालेली निखळ मैत्रीची साथ यांमुळे भागीमारी कायम लक्षात राहील!
-- अरुंधती
(छायाचित्र स्रोत : विकिमीडिया) 

Monday, June 28, 2010

रिक्षावाले काका



(छायाचित्र सौजन्य: विकिपीडिया)

''दीपक, खाली ये रे! '' रिक्षावाले काका रस्त्यावरून जोरदार हाळी देतात. शून्य प्रतिसाद.
दोन मिनिटांनी पुन्हा एक हाक, ''ए दीपक, चल लवकर! ''
दीपकच्या आईचा अस्फुट आवाज, ''हो, हो, येतोय तो! जरा थांबा! ''
पुन्हा पाच मिनिटे तशीच जातात.
''ए दीपक, आरं लवकर ये रं बाबा, बाकीची पोरं खोळंबल्याती! ''
रिक्षाचा हॉर्न दोन-तीनदा कर्कश्श आवाजात केकाटतो आणि रिक्षावाल्या काकांच्या हाकेची पट्टीही वर चढते.
समोरच्या इमारतीत राहणाऱ्या छोट्या दीपकची रोज शाळेच्या वेळेला येणाऱ्या रिक्षाकाकांच्या हाकांना न जुमानता आपल्याच वेळेत खाली येण्याची पद्धत मला खरंच अचंबित करते. सकाळी सात-साडेसातच्या सुमारास आमच्या गल्लीत असेच दोन-तीन रिक्षाकाका आपापल्या चिमुकल्या प्रवाशांना त्यांच्या घरातून शाळेत नेण्यासाठी येत असतात. कधी तर त्यांच्या रिक्षाचे इंजिन तसेच चालू असते. सकाळी सकाळी तो पटर्र पटर्र आवाज ऐकला की खरे तर माझ्या मस्तकात कळ जाते. पण त्याचबरोबर त्या रिक्षातल्या चिटकुऱ्या पोरांचा किलबिलाटही चालू असतो तो कानांना सुखावत असतो.
''ए मला धक्का नको हां देऊ, तुझं नाव सांगीन मी रिक्षाकाकांना... ''
"ओ काका, ही बघा ना, मला त्रास देते आहे.... ''
''ए सरक जरा तिकडे, जाड्या.... ढोल्या.... ''
''ओ काका, चला ना लवकर, उशीर होतोय किती.... ''
मग रिक्षाकाकांना बसल्या जागेवरुन सामूहिक हाका मारण्याचा एकच सपाटा. ''काका, चला ऽऽऽऽऽ'' चा कानात दडे बसवणारा घोष. त्या चिमखड्या वामनमूर्ती आकाराने जरी लहान दिसत असल्या तरी त्यांच्या फुफ्फुसांची ताकद त्यांच्या आवाजातून लगेच लक्षात येते. सरावलेले रिक्षाकाकादेखील पोरांना उखडलेल्या आवाजात सांगतात, ''ठीक आहे. आता तुम्हीच आणा त्या दीपकला खाली! '' कधी कधी ही मुले काकांनी सांगण्याची वाट न पाहता आपण होऊनच सुरू करतात, ''ए दीपक, लवकर ये रे खाली.... आम्हाला तुझ्यामुळे उशीर होतोय!!!! '' पावसाळ्यातल्या बेडकांच्या वाढत्या आवाजातील डरांव डरांव सारखे यांचेही आवाज मग आसमंतात घुमू लागतात. टाळ्या, हॉर्न, हाकांचा सपाटा सुरू होतो नुसता!
यथावकाश ह्या सर्व कंठशोषाला जबाबदार दीपक त्याच्या आजोबांचे किंवा बाबांचे बोट धरून येतो खाली डुलत डुलत. सोबत आलेल्या मोठ्या व्यक्तीच्या हातातील सॅक, वॉटरबॅग, लंचबॉक्सची पिशवी ते रिक्षाकाकांकडे सोपवतात. दीपक वर बाल्कनीकडे बघत, लेकाला घाईघाईने टाटा करायला गाऊनवर ओढणी घालून आलेल्या आपल्या आईला हात हालवत ''बाय'' करतो. तिच्या ''डबा खा नीट वेळेवर, '' वगैरे सूचना समजल्यासारखी मुंडी हालवतो आणि रिक्षात बसलेल्या पोरांना धक्काबुक्की करत, खिदळत, इतरांच्या किलबिलाटात सामील होत शाळेकडे रवाना होतो.
थोड्याफार मिनिटांच्या फरकाने आमच्या रस्त्यावर हे नाट्य रोज सकाळी दोन-तीनदा घडते. पात्रांची नावे फक्त बदलतात. कधी तो ''रोहन'' असतो, तर कधी ''हर्षा''. तेच ते पुकारे, तीच ती घाई, तेच संवाद आणि रिक्षाकाकांचे साऱ्या पोरांना कातावून ओरडणे, ''आरे, आता जरा गप ऱ्हावा की! किती कलकलाट करताय रं सकाळच्या पारी! ''
मे महिन्याच्या सुट्टीत मात्र सारे काही शांत असते. एरवी त्या पोरांच्या अशक्य हाकांना कंटाळलेली मी नकळत कधी त्यांच्या हाकांची प्रतीक्षा करू लागते ते मलाच कळत नाही!
कधी काळी लहानपणी मीही शाळेत रिक्षेने जायचे. काळी कुळकुळीत, मीटर नसलेली आमची ती टुमदार रिक्षा आणि आमचे रिक्षाकाकाही तसेच काळेसावळे, आकाराने ऐसपैस! त्यांचे नाव पंढरीनाथ काका. कायम पांढरा शुभ्र झब्बा- लेंगा घातलेली त्यांची विशाल मूर्ती दूरूनही लगेच नजरेत ठसत असे. मंडईजवळच्या बोळात दोन बारक्याशा खोल्यांच्या अरुंद जागेत ते राहायचे. जेमतेम इयत्ता चौथीपर्यंत शिक्षण. मनाने अतिशय दिलदार माणूस! तोंडात कधी शिवी नाही की व्यसनाचा स्पर्श नाही. माळकरी, सश्रद्ध, तोंडात सतत पांडुरंगाचे नाव! आणि तरीही पोरांवर रोज भरपूर ओरडणार अन् त्यांच्यावर तेवढीच मायाही करणार! आईवडीलांच्या गैरहजेरीत मुलांची शाळेत ने-आण करताना ते जणू त्यांचे मायबाप बनत. त्यांना स्वतःला मूलबाळ नव्हते. कदाचित त्याचीच कसर ते आमच्यावर माया करून भरून काढत असावेत. त्यांचा आरडाओरडा त्यामुळेच आम्हाला कधी फार गंभीर वाटलाच नाही. कधी शाळेतून घरी सोडायला उशीर झाला तर ''पोरास्नी भुका लागल्या आस्तील,'' करत त्यांच्या तुटपुंज्या उत्पन्नातून त्यांनी खाऊ घातलेले खारे दाणे, फुटाणे, शेंगा म्हणूनच लक्षात राहिल्या! त्यांना कधी आम्हाला घरी नेण्यासाठी शाळेच्या दाराशी यायला उशीर झाला की अगदी डोळ्यांत प्राण आणून आम्ही त्यांची वाट बघायचो. आणि वाहतुकीच्या गर्दीत ती चिरपरिचित रिक्षा दिसली की मग कोण तो आनंद व्हायचा!
कधी शाळेतल्या जंगलजिम किंवा घसरगुंडीवर शाळा सुटल्यानंतर खेळायची हुक्की आली असेल तर काकांच्या हातात दप्तर कोंबून आम्ही घसरगुंडीच्या दिशेने पसार! शेवटी बिचारे पंढरी काका यायचे आम्हाला शोधत शोधत! आपल्या छोट्याशा घरी नेऊन वर्षातून एकदा आम्हाला सगळ्या मुलांना हौसेने खाऊ घालण्याचा त्यांचा आटापिटा, कधी कोणाला लागल्या-खुपल्यास त्यांनी तत्परतेने लावलेले आयोडीन, रिक्षातल्या कोण्या मुलाची काही वस्तू शाळेत हरवल्यास ती शोधायला केलेली मदत, कोणाशी भांडण झाल्यास घातलेली समजूत यांमुळे ते आम्हा मुलांमध्ये लोकप्रिय होते. त्यामुळेच जेव्हा रिक्षा सुटली तेव्हा खूप वाईट वाटले होते. नंतर कधी ते रस्त्यात दिसले तर स्वखुशीने चटकन लिफ्ट पण देत असत. निरोप घेताना मग उगाच त्यांचे डोळे डबडबून येत.
रिक्षाच्या बाबत माझ्या शेजारणीच्या छोट्या मुलीची तर अजूनच वेगळी तऱ्हा! साडेसाताची शाळा म्हटल्यावर पावणेसातला रिक्षाकाका इमारतीच्या दारात हजर होत. आणि त्यावेळी ही छोटुकली जेमतेम उठून दात घासत असे! मग एकच पळापळ!! एकीकडे रिक्षाकाकांच्या हाकांचा सपाटा आणि दुसरीकडे शेजारीण व तिच्या मुलीतले ''प्रेमळ'' संवाद!!! कित्येकदा माझी शेजारीण लेकीची वेणी लिफ्टमधून खाली जाताना घालत असल्याचे आठवतंय! आज तिला त्या समरप्रसंगांची आठवण करुन दिली की खूप गंमत वाटते.
ह्या सर्व गोष्टी आठवायचं कारण म्हणजे लहान मुलांची शाळेतून ने-आण करण्यासाठीच्या तीन आसनी रिक्षांवर आता सरकारने टप्प्याटप्प्याने बंदी घालायचे ठरविले आहे. त्यांची जागा आता बसेस घेणार आहेत. कारणही सुरक्षिततेचे आहे. एका परीने ते योग्यच आहे. कारण मुलांना अशा रिक्षांमधून कश्या प्रकारे दाटीवाटीने, कोंबलेल्या मेंढरांगत नेले जाते तेही मी पाहिले आहे. गेल्या वर्षी स्वाईन फ्लूच्या साथीमुळे अनेक पालकांनी आपल्या मुलांना रिक्षाऐवजी व्यक्तिशः शाळेत नेऊन सोडणे पसंत केले. तेव्हाच ह्या व्यवसायाला घरघर लागायला सुरुवात झाली होती. सरकारच्या नव्या धोरणामुळे गेली किमान तीस वर्षे चालू असणारा हा व्यवसाय काही काळाने बंद होण्याची चिन्हे दिसत आहेत. शाळांच्या दारांशी आणि रस्त्यांवर आता मुलांनी ठसाठस भरलेल्या, डुचमळत्या रिक्षाही दिसणार नाहीत आणि रोज सकाळी इमारतीच्या दाराशी ''ओ काका, चला नाऽऽऽ, उशीर होतोय,'' चा गिल्लाही ऐकू येणार नाही. मुलांच्या बसेस मुलांना अरुंद गल्ल्यांमधून वाट काढत घराच्या दाराशी नक्कीच सोडणार नाहीत. त्यांचे थांबे ठराविकच असतात.
तेव्हा रिक्षाकाकांचे ते मुलांना जिव्हाळा लावणारे पर्व ओसरल्यात जमा आहे. त्यांना आता उत्पन्नाचे दुसरे मार्ग शोधायला लागतील. त्यातील कितीतरी रिक्षाकाका वयाची चाळीशी ओलांडलेले आहेत. पुन्हा नव्याने रोजीरोटीचा मार्ग शोधायचा हे त्यांच्यासमोरचे मोठे आव्हान आहे. ''कालाय तस्मै नमः '' म्हणत पुढे जायचे ठरवले तरी इतकी वर्षे मुलांना जीव लावणारे, त्यांची काटाकाळजीने ने-आण करणारे, त्यांना वेळप्रसंगी रागावणारे, त्यांच्या जडणघडणीत - शिस्त लावण्यात आपलेही योगदान देणारे अनेक ''पंढरी''काका आणि त्यांचे ह्या उत्पन्नावर चालणारे संसार आठवत राहतात. आणि नकळत मनाला एक अस्पष्ट रुखरुख लागून राहते!
-- अरुंधती

Sunday, June 06, 2010

पाद्रीबुवांची मराठी शिकवणी

(छायाचित्र स्रोत : विकीपिडीया) 
तुम्ही कधी कोणाला आपली मातृभाषा गोर्‍या साहेबाच्या भाषेतून शिकवायची कसरत केली आहे? आणि त्यातून तुमचा आधीचा अनुभव अगदीच माफक असताना व तुमचा विद्यार्थी कोणी ऐरागैरा नाही तर तो एक ख्रिश्चन मिशनरी पाद्री आहे हे माहीत असताना? मला हा अनोखा अनुभव घेण्याची मजेशीर संधी काही वर्षांपूर्वी मिळाली आणि त्या छानशा अनुभवातून एक सुंदर स्मृतिचित्र तयार होताना मलादेखील काही शिकायला मिळालं.
कॉलेजच्या सोनेरी दिवसांमधील गोष्ट. भटकंती, सहली, सिनेमा, हॉटेलिंग, वाढदिवस इत्यादींसाठी कायमच घरून हातखर्चाला दिलेले पैसे कमी पडायचे. अवाजवी पैशांची मागणी केली की घरून सांगितले जायचे, "आपापले पैसे कमावा आणि खर्च करा"! स्वावलंबनाचे व स्वकष्टाच्या कमाईचे महत्त्व समजण्यासाठी त्याचा फार उपयोग झाला. त्यामुळेच मी कधी छोटासा जॉब कर, कधी इंग्रजी वृत्तपत्रांत काहीबाही लेख पाठव तर कधी शिकवण्या घे असे नाना उद्योग करून गरजेबरहुकूम धन जोडण्याच्या कामी असे. सुदैवाने इंग्रजी व मराठी ह्या दोन्ही भाषांच्या टेकूमुळे मला अर्थार्जनाच्या संधींची कधीच कमतरता भासली नाही.
तर एक दिवस अचानक एका मित्रशिरोमणींचा फोन आला. त्यांची ओळख असलेल्या एका मिशनरी संस्थेत एका पाद्रीबुवांना गोर्‍या साहेबाच्या भाषेतून (इंग्रजीतून) मराठी शिकवण्यासाठी सुयोग्य व्यक्ती हवी होती. 'तुला ह्या जॉबमध्ये इंटरेस्ट आहे का? ' अशी पलीकडून पृच्छा झाली. काहीतरी वेगळे करायला मिळते आहे म्हणून मी लगेच होकार दिला. झाले! मिशनच्या मुख्य पाद्रींनी माझी एक अनौपचारिक मुलाखत घेतली. सौम्य, मृदू बोलणे व हसरे व्यक्तिमत्त्व असलेल्या ह्या पाद्रींनी जणू माझी बरीच जुनी ओळख असल्याप्रमाणे माझे स्वागत केले. माझ्या सोयीची वेळ, पगाराची रक्कम आणि कामाची साधारण रूपरेषा इत्यादी गोष्टींची चर्चा करून झाल्यावर त्यांनी मला त्यांच्या संस्थेच्या समृद्ध पुस्तकालयातून हवी ती संदर्भपुस्तके, शब्दकोश इ. घरी नेण्याचीही परवानगी दिली. ते सर्व घबाड पाहिल्यावर मला काय आनंद झाला म्हणून सांगू! घरी मी अक्षरशः उड्या मारीत परत आले.
त्यानंतर मी माझ्या ६८ वर्षांच्या तरुण विद्यार्थ्यालाही भेटले. छोटीशी, जेमतेम पाच फूट उंची असलेली, कमरेतून किंचित वाकलेली मूर्ती, काळासावळा वर्ण, पिकलेले आखूड केस व डोळ्यांना जाडसर भिंगांचा चष्मा! हे माझे विद्यार्थी खास दक्षिण भारताच्या किनारपट्टी प्रदेशातून पुण्याच्या मिशनशी संलग्न असलेल्या शैक्षणिक संस्थेत प्रशासकीय जबाबदारी सांभाळण्यासाठी आले होते. ह्या दाक्षिणात्य पाद्रीबुवांना तरुण अशासाठी म्हणावेसे वाटते कारण वयाच्या ६८व्या वर्षीही त्यांचा काही नवे शिकण्याचा, नवी भाषा - नवी संस्कृती जाणून घेण्याचा उत्साह केवळ अप्रतिम होता! त्यांच्या पहिल्या भेटीतच मला त्यांचे हे गुण भावले. कारण उत्साहापोटी त्यांनी ग्रंथालयातून मराठी शिकण्यासाठी त्यांना उपयुक्त वाटलेली २-३ पुस्तके मला दाखवायला आणली होती. थोडी जुजबी चर्चा करून दुसरे दिवसापासून आमची साहेबाच्या भाषेतून मराठीची शिकवणी सुरू झाली.
तीन महिन्यांच्या आमच्या ह्या शिकवणीत आम्ही दोघांनी आपापल्या भाषा- संस्कृती - तत्त्वज्ञान- विचार इत्यादींची भरपूर देवाणघेवाण केली. आमचे हे पाद्रीबुवा मराठीतून बोलायला बऱ्यापैकी तयार होत असले तरी लिखाणात खूप कच्चे होते. मी त्यांना जो गृहपाठ देत असे तोदेखील ते कसाबसा पूर्ण करीत. जमलं तर चक्क अळंटळं करीत. स्वभाव तसा थोडासा रागीटच होता. शिवाय ते वयाने एवढे मोठे होते की सुरुवातीला मला त्यांना गृहपाठ न करण्याबद्दल, टाळाटाळीबद्दल रागावायचे कसे हाच प्रश्न पडत असे. पण माझी ही अडचण संस्थाप्रमुखांनी सोडवली. "खुशाल शिक्षा करा त्यांना, " प्रमुखांनी मला खट्याळपणे हसत सांगितले. मीही पडत्या फळाची आज्ञा मानून आमच्या ह्या विद्यार्थी पाद्रीबुवांना जास्तीच्या गृहपाठाची शिक्षा देत असे. मग तेही कधी लहान मुलासारखे रुसून गाल फुगवून बसत, तर कधी गृहपाठाचा विषय निघाला की इतर गप्पा मारून माझे लक्ष दुसरीकडे वेधायचा प्रयत्न करीत. कधी माझ्यासाठी चॉकलेट आणीत तर कधी एखादी अवघड किंवा अवांतर शंका विचारून विषयांतर करता येतंय का ते पाहत. अर्थात मीही स्वतः कॉलेजमध्ये शिकत असल्यामुळे मला सर्व दिशाभूल तंत्रे तोंडपाठ होती! त्यामुळे मी त्यांच्या दोन पावले पुढेच असे. मग त्यांच्या चाळिशीच्या फ्रेमआडून माझ्या दिशेने कधी वरमलेले तर कधी मिश्किल हास्यकटाक्ष टाकण्यात येत असत!
ह्या काळात अवांतर गप्पांच्या ओघात त्यांनी मला त्यांची जीवनकहाणीही थोडक्यात सांगितली. दक्षिणेतील एका छोट्याशा गावात परिस्थितीने गरीब ख्रिश्चन कुटुंबात त्यांचा जन्म झाला. बरीच भावंडे आणि पाचवीला पुजलेले दारिद्र्य! शाळेतही त्यांची अभ्यासात खूप प्रगती नव्हती. पण फुटबॉलमध्ये मात्र विलक्षण गती! अगदी आंतरराज्य स्तरावर खेळले ते! पण फुटबॉलमध्ये करियर करण्यासाठी घरची परिस्थिती अनुकूल नव्हती. मग त्यांनी धर्मकार्याला वाहून घेतले. त्याबदल्यात त्यांना ठराविक वेतन सुरू झाले, पोटापाण्याचा प्रश्न मिटला आणि त्या कामातच सगळी हयात गेली. जास्त शिक्षण नसल्यामुळे ह्याही क्षेत्रात अडचणी येत गेल्या. अनेक अपेक्षाभंग पचवावे लागले. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना मिशनच्या कामासाठी पुण्यासारख्या अनोळखी प्रांतात, अनोळखी लोकांमध्ये, वेगळ्या भाषा व संस्कृतीच्या प्रदेशात त्यांना धाडण्यात आले. पण तशाही अवस्थेत त्यांची शिकण्याची तयारी, नवी भाषा आत्मसात करून ती बोलायचा उत्साह खरोखरीच स्तुत्य होता. शारीरिक व्याधी, म्हातारपण, वयाबरोबर येणारी विस्मृती ह्या सर्व आव्हानांना तोंड देत ते आपल्या नव्या जबाबदारीसाठी तयारी करत होते. पण मग कधी कधी त्यांचाही धीर सुटे. संस्थेतील राजकारणाने ते अस्वस्थ होत. आपल्यावर अन्याय झालाय ही भावना त्यांचा पाठलाग करत असे. त्यातल्या त्यात सुख म्हणजे रोजच्या साध्या साध्या वाटणार्‍या गोष्टींमध्ये त्यांना मानसिक आराम मिळत असे. पण तिथेही अपेक्षाभंग झाला की ते कमालीचे अस्वस्थ होत. खास करून मिशनच्या भोजनकक्षात दिले गेलेले खाणे त्यांच्या पसंतीचे नसले की ते हमखास सायंकाळी त्याविषयी माझ्याकडे एखाद्या लहान मुलासारखी तक्रार करीत. मग खाण्यावरून त्यांचे लक्ष अभ्यासात आणण्यासाठी मला खरीखुरी कसरत करावी लागत असे.
एक दिवस आमच्यात अशीच नेहमीच्या गृहपाठाच्या विषयावरून भलतीच खडाजंगी उडाली. आज पाद्रीबुवा भलतेच घुश्शात होते! ''तू मला मुद्दामहून अवघड गृहपाठ देतेस! तुला माहीत आहे मी डायबिटीसचा पेशंट आहे, मला थोडे कमी दिसते, ऐकूही कमी येते. पण तरी तू मला कसलीही सूट देत नाहीस! हे चांगलं नाही!'' मला खरं तर त्यांचा संपूर्ण आविर्भाव पाहून मनात हसायला येत होते. पण तसे चेहर्‍यावर दिसू न देता मी अगदी मास्तरिणीच्या थाटात उत्तरले, ''हे बघा, नियम म्हणजे नियम! जर मी तुम्हाला सूट देत बसले तर तुम्हाला तीन महिन्यातच काय, तीन वर्षांमध्येही मराठी लिहिता - बोलता येणार नाही! बघा, चालणार आहे का तुम्हाला?'' त्यावर ते काही बोलले नाहीत. फक्त आपल्या हातातील वही जरा जोरात टेबलवर आपटून त्यांनी त्यांचा राग व्यक्त केला. मला काळजी होती ते त्यांचा रक्तदाब रागापायी वाढतो की काय! पण आमचा तास संपेपर्यंत त्यांचा पारा बराच खाली आला होता. मग मी निघताना ते हळूच म्हणाले, ''सॉरी हं! आज जास्तच चिडलो ना मी? तुला दुखवायचा हेतू नव्हता माझा. पण वय झालं की होतं असं कधी कधी!'' आणि मग माझ्याच पाठीवर सांत्वना दिल्यासारखे थोपटून त्यांची छोटीशी मूर्ती प्रार्थनाकक्षाच्या दिशेने दिसेनाशी झाली.
ख्रिसमस जवळ आला होता. आमच्या पाद्रीबुवांना त्यांच्या गावाची, प्रदेशाची फार आठवण येत होती. मी त्यांच्यासाठी एक छोटेसेच, स्वहस्ते बनवलेले शुभेच्छापत्र ख्रिसमस अगोदरच्या सायंकाळी घेऊन गेले. दुसर्‍या दिवसापासून मिशनला चार दिवसांची सुट्टी होती. परंतु चार दिवसाचा कालावधी त्यांच्या जन्मगावी जाऊन परत यायला अपुरा असल्यामुळे पाद्रीबुवा जरा खट्टूच होते! त्या सायंकाळी मी त्यांना ते शुभेच्छापत्र दिल्यावर मात्र त्यांचा मूड जरा सावरला. मग ते भरभरून त्यांच्या गावाविषयी बोलत राहिले. आज मी त्यांना मराठीतूनच बोलण्याची सक्ती केली नाही. अगदी निघताना त्यांनी हळूच एक खोके माझ्या हातात ठेवले. आतून मस्त खरपूस, खमंग गोड वास येत होता. औत्सुक्याने मी आत काय आहे ते विचारले तर माझा विद्यार्थी मला थांगपत्ता लागू द्यायला अजिब्बात तयार नाही. मी तिथून बाहेर पडणार इतक्यात त्यांना काय वाटले कोणास ठाऊक, त्यांनी त्यांच्या टेबलावरील ''बी हॅपी'' लिहिलेला शंखाकृती पेपरवेट उचलला व माझ्या हातात कोंबला. त्यांच्या डोळ्यांत दाटून आलेले धुके पाहून मी पण माझे शब्द गिळले. घरी आल्यावर खोके उघडून पाहिले तर आत मस्त संत्र्याचा केक होता. त्यांनी अगत्याने दिलेली ती भेट आमचा ख्रिसमस गोड करून गेली.
त्या अल्प काळात त्यांना शिकवण्यासाठी माझी जी तयारी झाली, जी तयारी मला करावी लागली, त्यामुळे माझे मराठी व इंग्रजी भाषाकौशल्य सुधारण्यास फार मदत झाली. नवनवीन पुस्तके, मिशनचे वाचनालय व निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या मिशनच्या इमारतीतील शांत प्रार्थनागृह ह्यांचाही मी लाभ घेतला. बघता बघता तीन महिने संपले. आमच्या पाद्रीबुवांना आता त्यांच्या नव्या जबाबदारीच्या पदाची सूत्रे स्वीकारायची होती. माझीही कॉलेजची परीक्षा जवळ येऊन ठेपली होती. काहीशा जड अंतःकरणानेच आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. गुरूशिष्याचे स्नेहाचे हे अनोखे नाते आता संपुष्टात येणार होते. शेवटच्या दिवशी आम्ही भरपूर गप्पा मारल्या, आणि त्याही मराठीतून! मी निघताना पाद्रीबुवांना डोळ्यांतील अश्रू लपविणे कठीण झाले होते. आणि उद्यापासून सक्तीची मराठी शिकवणी संपणार याचा आनंदही त्यांच्या चेहर्‍यावर लख्ख दिसत होता. मी त्यावरून त्यांना चिडवले देखील! त्यांची छोटीशी आठवण म्हणून त्यांनी मला एक छोटे बायबल देऊ केले व त्यांचा आवडता पायघोळ ट्रेंचकोट मी नको नको म्हणत असताना माझ्या हातांत कोंबला.
आज त्याला बरीच वर्षे लोटलीत. पुढे निवृत्ती स्वीकारल्यावर ते त्यांच्या जन्मगावी परत गेले. पाद्रीबुवा आता हयात आहेत की नाही हेही मला ठाऊक नाही. पण अजूनही मी कधी कपड्यांचे कपाट आवरायला काढले की एका कप्प्यात सारून ठेवलेला तो कोट मला पाद्रीबुवांची आठवण करून देतो! त्या तीन महिन्यांच्या काळात त्यांना शिकवण्याबरोबर मीही बरेच काही शिकले. त्यांची आठवण मनाच्या एका कोपर्‍यात सदैव राहील.
-- अरुंधती

Sunday, May 16, 2010

मलंग आणि माणुसकी

मलंग गड माची 
(छायाचित्र स्रोत : विकीपीडिया) 

काही वेळा आयुष्यात फार गमतीशीर प्रसंग घडतात. पण त्या त्या वेळेस तुम्ही त्या प्रसंगातील अनोखेपण अनुभवू शकालच ह्याची काहीच हमी नसते. आपले आधीचे पूर्वग्रह किंवा समज बदलून टाकायला एखादी घटनाच पुरेशी असते. असाच एक प्रसंग बऱ्याच वर्षांपूर्वी आमच्या कुटुंबाने अनुभवला. त्याचीच ही कहाणी.

माझे आई-वडील फार ''देव-देव'' करणाऱ्यातले नाहीत. जगात ईश्वर आहे, तो सगळीकडे आहे आणि त्याला आपण मानतो अशी त्यांची विचारसरणी. त्यात कोणत्याही प्रथा परंपरांचे अवडंबर नाही. स्वधर्माचा अभिमान आहे पण इतर धर्मांविषयीही यथायोग्य आत्मीयता. त्यामुळे लहानपणापासून त्यांनी आम्हाला (मला व बहिणीला) मंदिरे, दर्गे, चर्चेस इत्यादी धर्मस्थळांकडे सारख्याच आत्मीयतेने बघायला शिकवले. कोणत्याही सहलीच्या ठिकाणी गेल्यावर तेथील मंदिरे जशी पालथी घातली तशीच इतर प्रसिद्ध धर्मस्थळेही औत्सुक्याने पाहिली. 

तर अशीच एकदा आमची श्री मलंग किंवा हाजी मलंग ह्या कल्याण येथील सुप्रसिद्ध गडावर जायची टूम निघाली. आईवडीलांना मच्छिन्द्रनाथांचे मंदिर तर पाहवयाचे होतेच शिवाय मलंगबाबांच्या दर्ग्याची पूजा हिंदूच करतात त्याबद्दलही उत्सुकता होती. येथे भाविकांकडून मच्छिंद्रनाथांच्या शक्तिस्थळाची पूजाही केली जाते व मलंगबाबांच्या दर्ग्यावर चादरही चढवली जाते असे ऐकून होतो. आम्हा मुलींना पुण्याबाहेर प्रवास करायला मिळणार ह्याचेच अप्रूप होते. वडिलांना ह्या स्थळी दत्तजयंतीलाच जायचे होते. का, तर दत्तात्रेयांपासून नाथपंथाची सुरुवात होते आणि पौर्णिमेला गडावर खास उत्सव असतो म्हणे! ठरल्याप्रमाणे दत्तजयंतीच्या रात्री जरा उशीरानेच आम्ही लाल डब्यातून कल्याणला थडकलो. तिथून टांग्याने हाजी मलंग गडाचा पायथा गाठला. रात्रीचे दहा- साडेदहा वाजत आले होते. थोडा वेळ तेथील बाजारातून भटकल्यावर एका छोट्याशा उपाहारगृहांत थोडी खादाडी केली. आम्ही घरातील सगळेच गड-आरोहणाच्या बाबतीत अतीव निष्णात (? ) असल्यामुळे गडाच्या पायथ्याशी असलेल्या एका दुकानातून चढताना आधारासाठी दोन काठ्या घेतल्या!! सामान-बॅगा वगैरे त्या दुकानातच ठेवले व बरोबर एका शबनममध्ये फक्त एक शाल आणि थोड्या जरुरी वस्तू घेऊन गडाच्या रोखाने मार्गक्रमण करू लागलो.

डिसेंबरातील थंड हवा गडाच्या पायथ्याशीही एव्हाना जाणवू लागली होती. तेथील एक चहाची टपरी बंद होणार एवढ्यात आम्ही घाईघाईने तिथे पोचलो व दुकानदाराला आम्हाला चहा पाजण्याची गळ घातली. आम्हीच त्याचे दिवसातील शेवटचे गिऱ्हाईक दिसत होतो. टपरीतील लाकडी बाकावर बसून डगमगत्या टेबलाला हाताचा टेकू देत सावरत बसलो होतो खरे, पण मला तरी जाम थंडी वाजत होती. तेवढ्यात आमचा चहा आला. गरम गरम वाफाळता आल्याचा चहा.... अहाहा!! त्या क्षणी ते स्वर्गसुख होते. तेवढ्यात वडिलांचे लक्ष सहज बाहेर गेले. टपरीच्या दगडी पायरीवर एक म्हातारी अंधारात कुडकुडत बसून होती. तिच्या वेषावरून तरी गरीब वाटत होती. मेंदी लावल्याने तांबडे झालेले केस, तोंडातला पानाचा तोबरा, पेहराव यांवरून लगेच ती म्हातारी स्त्री मुस्लिम असल्याचे लक्षात येत होते. वडिलांना अचानक काय वाटले कोणास ठाऊक, पण त्यांनी चहावाल्याला त्या म्हातारीलाही चहा नेऊन देण्याची खूण केली. आमचा चहा पिऊन होईपर्यंत त्या म्हातारबाईंचा चहाही बशीत ओतून फुर्र फुर्र करत पिऊन झाला होता. वडिलांनी बिलाचे पैसे दिले व आम्ही टपरीच्या बाहेर पडलो. बघतो तर दारात म्हातारबाई. त्यांनी चहाबद्दल शुक्रिया सांगितले आणि म्हणाल्या, चला, मी पण वर गडावरच जाणार आहे. तुम्हाला रस्ता दाखवते! 

आता ही कोण कुठली म्हातारबाई, तिचा ना कसला ठावठिकाणा, लांब बाह्यांच्या पोलक्यावर बिनबाह्यांचे वेगळ्याच रंगाचे पोलके - विटकी साडी असा थोडासा चमत्कारिक वेष, हातात डालड्याच्या डब्यापासून बनवलेली ''लालटेन'', चालताना वयोपरत्वे जाणारे झोक....  आणि ती कसला रस्ता दाखवणार! वडिलांनी तिला नम्रपणे नको सांगितले, पण ही बाई ऐकायलाच तयार होईना! शेवटी आम्ही तिने रस्ता दाखवावा हे मान्य केल्यावरच आमची तिच्या आग्रहातून सुटका झाली. 

चढणीच्या पहिल्या टप्प्यातच त्या बाईंनी आमच्या चौकशीला सुरुवात केली. आईवडील अगदी त्रोटक उत्तरे देत होते. पण त्यांमुळे नाउमेद न होता म्हातारबाईंचा तोंडपट्टा सारखा चालूच होता. त्यांची ती कृश मूर्ती हवेच्या जोरदार झोताप्रमाणे कधी डावीकडे झुके तर कधी उजवीकडे! त्यांच्या हालचालींप्रमाणे त्यांच्या हातातला, डालड्याच्या डब्याला दोन्ही बाजूंना हिरवा व लाल रंगाचा जिलेटीन पेपर लावलेला लालटेन झोकांड्या खाई. आम्हाला भीती वाटे की म्हातारबाई कलंडणार तर नाहीत? पण आमच्या तुलनेत गड चढण्याच्या बाबतीत त्याच जास्त तंदुरुस्त वाटत होत्या. इकडे आईवडील चढण चढताना जणू मूक झालेले!  एक तर चढताना वजनापरत्वे व सवय नसल्याने दम लागत होता. त्यात धाकटी बहीण नुकतीच आजारातून उठल्यामुळे व अशक्तपणामुळे चढण स्वतःहून चढायला अजिबात राजी नव्हती. सात-आठ वर्षांच्या पोरीला कडेवर घेऊन चढणे म्हणजे सोपी गोष्ट नव्हे! तरी आई-वडील आलटून पालटून तिला कडेवर घेऊन चढत होते खरे!

म्हातारबाई ठरविल्याप्रमाणे आमच्या पुढेच चालल्या होत्या. आकाशातल्या पौर्णिमेच्या टिपूर चांदण्याने आसमंत व सारी डोंगरराजी उजळून निघाली होती. त्या प्रकाशात ते डोंगर ध्यानस्थ योग्याप्रमाणे अजूनच गूढ भासत होते. दुरून कोठूनतरी रेडियोवरच्या गाण्यांचा अस्पष्टसा आवाज येत होता. मधूनच कोणाचे तरी हसणे. नाहीतर रात्रीच्या शांततेची दुलई गडावर पण पसरू लागली होती. अधून मधून कोणी हौशी लोक आम्हाला ओलांडून झरझर पुढे जात होते. आमच्या गोगलगायीच्या गतीने, धापा टाकत चालणाऱ्या चिमुकल्या समूहाकडे पाहून गालातल्या गालात हसत होते. चांदण्याचा प्रकाश असला तरी मला आजूबाजूला पडलेल्या अंधाराची उगाच भीती वाटत होती. मधूनच झुडुपांमधून खुसफूस ऐकू येई. रातकिड्यांच्या किरकिरीबरोबर अचानक एखादा काजवा दर्शन देई. झाडांच्या हालचालीबरोबर त्यांच्या सावल्याही हालत. त्या पानांच्या सळसळीला ऐकले की माझी कल्पनाशक्ती काळोखात काही वेगळे तर दिसत नाही ना याचा विचार करत असे. त्यामुळेच की काय, हातातला टॉर्च उगाच काळोखात फिरवत मी सावल्यांचा अंदाज घेत पुढे चालले होते.

अचानक एक मोठा हिंदी भाषक घोळका मागून आला आणि आम्हाला पाहून थबकला. सगळी तरुण पोरं पोरं होती. त्यांच्यात दोन-तीनच स्त्रिया दिसत होत्या. त्या बायकांचे गोषे मोठे कलापूर्ण होते. माझ्या वडिलांना धापा टाकत एकाच जागी उभे असल्याचे पाहून त्यांच्यातील एका तरुणाने विचारले, ''भाईसाहब, कुछ मदद चाहिए क्या? '' वडिलांनी मानेनेच नकार दिला. तरीही तो जथा थोडा वेळ आमच्याबरोबरच रेंगाळला. सहजच चौकश्या झाल्या - तुम्ही कुठले, आम्ही कुठले इ. इ. ते सर्व तरुण मुंबईतच राहणारे, एकाच परिवारातील होते. त्यांच्यातील एकाचे नुकतेच लग्न झाले होते. म्हणून तो त्याच्या पत्नीसह गडावर दर्शनासाठी चालला होता, आणि सोबत ही जत्रा. त्यांचे आपापसात एकमेकांना चिडवणे, खिदळणे मजेत चालू होती. नववधू फारच सुंदर होती दिसायला. मोठे टप्पोरे डोळे, केतकी गुलाबी वर्ण, धारदार नाक, गुलाबी जिवणी - अगदी काश्मिरी वाटत होती चेहऱ्यावरून. ह्या सर्वांच्या थट्टामस्करीत लाजून लाजून चूर झाली होती. तिची माझी छान गट्टी जमली. आम्ही दोघींनी जवळच पडलेल्या एका झुडुपाच्या दोन वाळक्या फांद्या हातात घेतल्या, आणि अंधाऱ्या पायऱ्यांवर काठ्या आपटत आपटत चालू लागलो. बोलता - बोलता, गप्पांच्या नादात त्या जथ्याबरोबर मी बरीच पुढे आले होते. पण मग अचानक आठवण झाली की आमच्या घरातले बाकी तीन सदस्य मागेच राहिलेत की! त्या नववधूचा- रुख्सानाचा निरोप घेऊन मी पुन्हा माकडाप्रमाणे उड्या मारत खाली आले. आमच्या गोगलगायी फार पुढे सरकल्या नव्हत्या. म्हातारबाईही त्यांना गोंदाप्रमाणे चिकटून होत्या.

एका विश्रामाच्या वेळी आई हळूच वडिलांना म्हणाली, ''त्या बाईंचे लक्षण मला काही ठीक दिसत नाहीए.... मधूनच स्वतःशी पुटपुटत असतात त्या.... कोणी वेडीबिडी तर नसेल? तू त्यांना सांग ना पुढे जायला.... मला तर जरा विचित्र वाटतंय प्रकरण! '' मी पुन्हा एकदा त्या बाईंकडे निरखून पाहिले आणि आईचे बोलणे मलाही जरा पटले. त्या बाई खरेच मधूनच स्वतःशी बोलत होत्या, माना हालवत होत्या. आणि खरे सांगायचे तर चांदण्यात त्यांचा सर्व अवतार जरा भेसूरच दिसत होता. मला उगाचच हौसेहौसेने वाचलेल्या भुतांच्या गोष्टी आठवू लागल्या आणि मी चुपचाप आईवडीलांच्या जवळ सरकले. वडिलांच्या खांद्यावर माझी धाकटी बहीण एव्हाना गाढ झोपून गेली होती. आमचा मंदावलेला वेग बघून त्या बाई कंटाळतील व निघून जातील असा वडिलांचा कयास होता. पण त्या चिवट म्हातारबाईंनी तो खोटा ठरवला. 

एव्हाना गडाचा मधला टप्पा आम्ही पार केला होता. जसजसे गडावरच्या तुरळक वस्तीची जाग जाणवू लागली तसतसा म्हातारबाईंमध्येही हळूहळू फरक पडू लागला. त्यांची पुटपूट थांबली, चाल सुधारली, जणू कोणी त्यांची वर वाट बघत होते अशी आतुरता त्यांच्या चालीत आली. आम्हालाही 'आता संपली बुवा एकदाची चढण' ह्या विचारानेच हायसे वाटत होते. मस्त भन्नाट वारा व शिरशिरी आणणारी थंडीही आता अंगाला झोंबत नव्हती. 

दर्ग्याजवळचे लाइट्स, विद्युत रोषणाई जसे नजरेच्या टप्प्यात आले तशा म्हातारबाई आम्हाला काहीही न बोलता तरातरा पुढे जात दिसेनाशा झाल्या. आईवडीलांनाही ''सुटलो एकदाचे त्यांच्या तावडीतून! '' असे झाले. आता गडावर मुक्कामाला दर्ग्याच्या जवळपास कोठेतरी चौकशी करून जागा शोधायची, तण्णावून द्यायची व पहाटे दर्शन घेऊन उगवतीला गड उतरू लागायचे असा साधारण बेत होता.

रात्री एवढ्या उशीरा पोचल्यावर अनेक दुकाने बंद अवस्थेत न दिसली तरच नवल! दुकानदारांच्या ओळखीने गडावरच कोठेतरी मुक्काम करायचा आमचा बेत होता. पण इथे तर दुकानांना टाळे! तरीही आम्हाला राहण्या-खाण्याची फारशी फिकीर नव्हती. पट्टीच्या चहाबाज असलेल्या माझ्या वडिलांना काही अंतरावरून खास ''अमृततुल्य'' चहाचा खासा दरवळ आला आणि मग बस्सच! पुढचे अंतर आम्ही विठ्ठलाच्या ओढीने वारकरी जसा पळत सुटतो तसे झराझर कापले. एका उंच जोत्यावरच्या घरासमोर बरीच गर्दी दिसत होती. बहुधा हीच ती चहाची ''टपरी'' होती. कोणीतरी एक व्यक्ती त्या घरासमोर टाकलेल्या बाजेवर बसली होती आणि येणारे-जाणारे त्या व्यक्तीच्या पाया पडत होते. कुतूहलाने आम्ही त्या व्यक्तीकडे पाहिले आणि उडालोच! ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून एवढा वेळ आम्हाला सक्तीचा सहवास देणारी डालड्याच्या डब्याचा लालटेन घेतलेली म्हातारी होती!!! त्या बाजेच्या भोवती जणू दरबार भरला होता. येणाऱ्या जाणाऱ्यांकडून सलाम स्वीकारण्याबरोबरच म्हातारबाई आजूबाजूच्या लोकांची म्हणणी ऐकून घेत होत्या. सर्वांच्या वागण्यात त्यांच्याप्रती अदब दिसून येत होती. म्हातारबाई मधूनच गुडगुडी ओढत होत्या, कधी कोणाच्या पाठीवर थाप देऊन हसत होत्या तर कधी कोणाच्या डोक्यावरून हात फिरवत होत्या.

तेवढ्यात त्यांचे लक्ष आमच्याकडे गेले. आम्ही एका कोपऱ्यात 'आता नक्की काय करावे' या विचारात जरासे संकोचून उभे होतो. त्या बाईंनी लगेच आम्हाला पुढे येण्याची खूण केली. मग सर्वांकडे वळून हिंदीत म्हणाल्या, ''आज या कुटुंबाने मला माणुसकी दाखवली. मी थंडीने कुडकुडत असताना त्यांनी मला एक कप चहा काय पाजला आणि मला ऋणी करून टाकले! '' मग घराच्या दरवाज्याकडे बघून आपल्या घोगऱ्या आवाजात त्यांनी मोठ्याने फर्मान सोडले, ''हे कुटुंब माझे खास पाहुणे आहेत. त्यांचे स्पेशल स्वागत करा. '' आम्ही सर्द! बाहेरच्या गारठ्यातून आतल्या घरगुती उबेत गेल्यावर खरंच खूप छान वाटत होते. ढणाणणाऱ्या स्टोव्हवर एका मोठ्या पातेल्यात दूध उकळत होते. दुसरीकडे चहाचे आधण ठेवलेले होतेच! थोड्याच वेळात आमच्यासमोर फेसाळ, दुधाळ अमृततुल्य असा दरवळणारा चहा आला. थंडीने काकडलेल्या शरीरांमध्ये जरा धुगधुगी आल्यावर वडिलांनी सहज करतोय असे दाखवत त्या म्हातारबाईंची चौकशी केली. आम्हाला चहा देणारा माणूस अस्सल मराठी होता. त्याच्याशी आतापर्यंत हवापाण्याच्या गप्पा मारून झाल्या होत्या. तो तर वडिलांकडे थक्क होऊन पाहतच राहिला. ''काय सांगताय साहेब! तुम्हाला माहीतच नाही त्या बाई कोन आहेत ते? नका करू चेष्टा अशी गरीबाची! '' त्याला पुन्हा पुन्हा समजावून सांगितल्यावर मात्र त्याला खात्री पटली. पण तरीही तो ती बाई कोण हे सांगायलाच तयार नाही. शेवटी आई मध्ये पडली, ''अहो भाऊ, आम्हाला खरंच माहीत नाही काही त्या बाईंबद्दल! जरा सांगा ना! ''

त्याने एकवार बाहेर नजर टाकली. बाहेरचा दरबार अजून चालूच होता. लोकांची गर्दी कायम होती. मग तो चहावाला आमच्याकडे वळून घसा खाकरून म्हणाला, ''त्या बाई इथून जवळच एक लई मोठा जागृत दर्गा हाय, त्याच्या मुख्य पुजारीण बाई हायेत. लई मान हाय बघा त्यांना हितं.... समदे लोग त्यांचा शबुद पाळत्याती. '' खरे तर आमचा विश्वासच बसत नव्हता त्याच्या सांगण्यावर! पण अशा बाबतीत कोणी कोणाची टांगखिचाई सहसा करत नाही. तरीही मनात थोडासा संदेह बाळगूनच आम्ही तिथून निघालो. चहावाल्याने अर्थातच चहाचे पैसे घेण्यास साफ नकार दिला.

म्हातारबाईंनी आम्हाला जाताना पाहिले आणि हसून मान हालवून म्हणाल्या, ''कल फिर मिलेंगे, खुदा हाफिज।''
गडावर आम्हाला मुक्कामासाठी म्हातारबाईंच्या कृपेने एक कुटी लगेच मिळाली. बांबूच्या भिंती आणि छत एवढाच तो काय थंडीपासून आडोसा! बघतो तर तिथे रुख्सानाचा सर्व परिवार! मग काय, मला तर जाम आनंद झाला. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनीही त्या म्हातारबाई दर्ग्याच्या मुख्य गुरवीण असल्याचे सांगितले. मग त्यांचा वेष असा फाटका का? गडाच्या पायथ्याशी अंधारात व थंडीत कुडकुडत त्या एकट्याच काय करत होत्या? प्रश्न अनेक होते, पण त्यांची उत्तरे आमच्यापाशी नव्हती. एव्हाना सर्व पुरुष दुसऱ्या कुटीत झोपायला निघून गेले, आणि आम्ही मुली-बायका तिथल्या चटयांवर आडव्या झालो. रात्रीचे बारा तर कधीच वाजून गेले होते. तरीही मी व रुख्साना हलक्या आवाजात गप्पा मारत होतो व खुसुखुसू हसत होतो. शिवाय त्या ओबडधोबड जमिनीवर घातलेल्या चटया अंगाला टोचतही होत्या. कुटीच्या बांबूच्या तट्ट्या पहाटेच्या गार वाऱ्याला अजिबात अटकाव करत नसल्यामुळे आईने आणलेली शाल पांघरून ती रात्र मी थंडीत कुडकुडतच घालवली.

अशीच मग गप्पा मारता मारता कधीतरी झोप लागली. उठले, जाग आली तेव्हा आकाशाचा रंग पालटू लागला होता. सकाळचे साडेपाच-सहा वाजले असावेत. आम्ही दोघी बहिणी, रुख्साना आणि तिच्या इतर महिला नातेवाईक एवढ्याचजणी कुटीमध्ये होतो. त्या बाकी महिला गाढ झोपलेल्या. आई-वडील दोघेही लवकर उठून स्नान वगैरे करून पुढे दर्शनाला गेले होते. मी व बहिणीने कुटीच्या बाहेर येऊन तेथीलच एका मोकळ्या जागेत बोटानेच दात घासले. अंघोळीची तर गोळीच घेतली होती. एवढ्या थंडीत पहाटे थंड पाण्याने आंघोळी करणे म्हणजे महापाप! मग आवरून झाल्यावर आईवडीलांच्या वाटेकडे डोळे लावून आम्ही दोघी बहिणी फटफटणारे आकाश, प्रभातीची प्रसन्न निसर्गराजी अन त्या प्रकाशात वेगळेच रूप ल्यालेल्या डोंगराकडे अनिमिष नेत्रांनी मूकपणे बघत बसलो होतो. धुक्याच्या आच्छादनातून मध्येच वर डोंगरावर एका ठिकाणी धुनी पेटलेली दिसत होती. का कोण जाणे, त्या प्रसन्न वातावरणाचे पावित्र्य माझ्या मनात घर करून बसले.

आईवडील परत येईपर्यंत मला व बहिणीला खूप भूक लागली होती. गड उतरूनच नाश्ता करायचे ठरले. आदल्या रात्री दहा पावलेही चालायला तयार नसलेली माझी बहीण आज मात्र हरणासारख्या उड्या मारत गड उतरत होती!! तिच्या ह्या प्रगतीचे नवल करतो न करतो तोच गडावरची फुलमाळा विकणारी दुकाने लागली. आणि एका दुकानासमोर त्या म्हातारबाई जणू आमची वाट बघत असल्याप्रमाणे उभ्या! आम्हाला पाहताच तोंड भरून, आपले पानाने लाल झालेले दात दाखवत हसल्या. आम्हाला त्यांच्या अखत्यारीत असलेल्या दर्ग्यावर कधीही यायचे आमंत्रण दिले. कोण कुठली ही म्हातारबाई... पण त्या एक कप चहाच्या माणुसकीला अजून किती जागणार होती? वडिलांनी काहीही न बोलता तेथील दुकानातून एक फुलांची चादर विकत घेतली आणि म्हातारबाईंच्या हातात तिचे पुडके ठेवून त्यांना ती चादर आमच्यातर्फे दर्ग्यावर चढवायला सांगितली. पुन्हा एकदा म्हातारबाई तोंड भरून हसल्या. ''जाओ, खुश रहो, खुदा हाफिज।'' म्हणत आमचा निरोप घेतला व बाजारातून तुरुतुरु चालत दिसेनाश्या झाल्या. त्यांच्या त्या लहान होत जाणाऱ्या आकृतीकडे आम्ही तसेच बघत राहिलो. 

गड उतरून आम्ही परतीच्या पुणे प्रवासाच्या तयारीला लागलो. पुढे आईवडीलांच्या गप्पांमध्ये ह्या प्रसंगाचे अनेकदा संदर्भही येत. आणि आपण त्या रात्री माणुसकीचा एक नवा धडा शिकलो, माणुसकीचे एक नवे रूप पाहिले याची जाणीव पुन्हा एकवार मनात वेगळीच स्पंदने निर्माण करून जाई.

--- अरुंधती  

Friday, April 16, 2010

शोलेची आग


काही दशकांपूर्वी शोले चित्रपटाने सारा भारत गाजवला आणि हिंदी चित्रसृष्टीत एक झंझावात निर्माण केला. काल आंतरजालावर मुशाफिरगिरी करत असताना कोठेतरी ''शोले''चे नाव वाचले आणि विस्मृतीत गेलेली एक जुनी आठवण ताजी झाली. छोटीशीच पण निरागस!

शोले चित्रपट येऊन गेल्यावर बर्‍याच वर्षांनी मी व माझ्या धाकट्या बहिणीने तो पिंपरीच्या एका चित्रपटगृहात ''मॅटिनी''ला पाहिला. तेव्हा आमचे घर त्या चित्रपटगृहाच्या अगदी समोर होते. त्यामुळे मी व बहीण आईसोबत अगदी आयत्या वेळेस तिकिट काढून गेलो चित्रपट पाहायला! [तेव्हाही तो हाऊसफुल्ल व्हायचा कधी कधी!] बहिणीचे वय होते सात वर्षे आणि माझे दहा वर्षे! आमचा सर्व चित्रपट पाहून झाला, चित्रपटगृहातले दिवे लागले, प्रेक्षक बाहेर पडू लागले. आम्हीही जायला उठलो. पाहिले तर धाकटी बहीण मुसमुसून रडत होती. तिला विचारल्यावर ती काही उत्तरही देईना! वाटले, हिला काही दुखले-खुपले तर नाही ना, बरे वाटत नाही का.... काय झाले काहीच कळेना!

कसेबसे तिला चित्रपटगृहाच्या बाहेरच्या आवारापर्यंत आणले. पण तिथे मात्र तिने जोरात भोकांडच पसरला. मी व आई हतबुद्ध! लोकांच्या कुतूहलाच्या नजरांची जागा नंतर काळजीने घेतली. तिथला रखवालदार ओळखीचा होता. तो विचारू लागला, ''बेबीको क्या हो गया? सब ठीक है ना? पानी लाऊ क्या?'' त्याने बिचार्‍याने पाणीही आणले. पण आमच्या बहिणाबाईंना पाणीही नको होते. तिचा हंबरडा काही केल्या आटोपायचे चिन्ह दिसत नव्हते. आंजारून -गोंजारून झाले, जरबेने विचारून झाले, जवळ घेऊन झाले, सर्व शक्य उपाय चालू होते!
बहिणीने तर जमिनीवर लोळणच घ्यायची शिल्लक ठेवली होती!!!

दहा-पंधरा मिनिटे हे नाटक चालू होते. मग मात्र आईचा संयम सुटला. तिने तिच्या खास ठेवणीतल्या करड्या आवाजात बहिणीला विचारले, ''आता काय झाले ते सांगतेस की नाही? का देऊ एक फटका?''
ही मात्रा मात्र बरोब्बर लागू पडली.
बहिणीचा टाहो एकदम तार सप्तकातून मध्य, तिथून मंद्र सप्तकावर आला... अश्रू वाळले होते त्यांच्या जागी नवे अश्रू येणे बंद झाले. हंबरड्याची जागा हुंदक्यांनी व मुसमुसण्याने घेतली. तिचा तो ओसरलेला आवेग पाहून आईलाही जरा धीर आला. मग मोठ्या प्रेमाने तिने बहिणीच्या डोक्यावरून हात फिरवून तिला पुन्हा विचारलं, ''काय झालं माझ्या राजाला, सांगशील का आता तरी?''

बहिणीने डबडबलेल्या डोळ्यांनी, आईच्या पदरात तोंड खुपसून स्फुंदत उत्तर दिलं..... ''आई, अमिताभ बच्चन मेलाssssssssss!!!!!''

क्षण-दोन क्षण आईच्या डोक्यात काहीच प्रकाश पडेना! मग तिला उलगडले.... शोलेमध्ये अमिताभ शेवटी मरताना दाखवला आहे! बहिणीचा अमिताभ अतिशय लाडका होता तेव्हा! तिला चित्रपटातील अमिताभची मारामारीही खरीखुरी वाटायची आणि घरी ती अदृश्य शत्रूंबरोबर तोंडाने ढिश्शुम् ढिश्शुम् आवाज काढत हाणामारी करत असायची! तिच्या लेखी ते सर्व खरे असायचे. आणि आता तिला चित्रपटाचे कथानक इतके सत्य वाटत होते की अमिताभ खरोखर मेला आणि तो आता आपल्याला पुन्हा कध्धी कध्धी दिसणार नाही म्हणून तिला अगदी भडभडून व भरभरून रडायला येत होते!!!!!!!

तिच्या त्या निरागसपणापुढे आणि समजेच्या अभावापुढे आई पार शरणागत झाली! बहिणीला काही केल्या चित्रपटातील गोष्टी खोट्या असतात, त्यातील कलाकार असे चित्रपटात दाखवले म्हणजे खरेखुरे मरत नाहीत हे पटायला जाम तयार नव्हते. दादापुता करून तिला घरी घेऊन आल्यावरही तिचे डोळे वारंवार अमिताभच्या आठवणीने (!!) भरून वाहत होते. आम्हाला मात्र आता हसू दाबणे अवघड जात होते.

शेवटी दुसर्‍या दिवशी आम्ही पुन्हा शोले बघितला. त्यात अमिताभला जिवंत पाहून तिला एकदाचे हायसे वाटले! ह्या खेपेस तो मेला तेव्हा ती एवढी रडली नाही!
तिच्या बालमनाला समजेल पण ते दुखावले जाणार नाही अशा रीतीने तिला समजावता समजावता घरच्यांच्या नाकी नऊ आले! पण मग हळूहळू तिला उमजू लागले की चित्रपटातील कथानक सत्य नसते, मारामारी - ढिश्शुम् ढिश्शुम् वगैरे सगळे खोटे असते.... पुढे आम्ही अनेक मारधाड चित्रपट खदखदा हसत पाहिले. पण शोलेचा तो अनुभव अविस्मरणीय होता!!

आजही कधी कधी आम्ही तिला शोलेची आठवण काढून चिडवतो! :-)

--- अरुंधती 


Wednesday, March 31, 2010

अदृश्य डोळ्यांनी अनुभवलेलं साहित्य संमेलन




सध्या साहित्य संमेलन बरंच गाजतंय...नव्हे, गाजवलं जातंय! नवे नवे वाद, नव्या बातम्या, नवे विषय....


अशाच ह्या बातम्या वाचताना मला 'त्या' साहित्यसंमेलनाची आठवण झाली.
एक असं साहित्य संमेलन जे मी तिथे हजर न राहताही अनुभवलं....
नाही, नाही.... मला संजयासारखी दिव्यदृष्टी नव्हती प्रदान केली कोणी! ना मला धृतराष्ट्रासारखा चिंतातुर बाप ''काय काय दिसतंय ते सांग झणी'' म्हणून सतावत होता. मी इकडे पुण्यात..आणि संमेलन तर दूर गावी! पण तरीही मला त्याविषयी इत्थंभूत माहिती जाणून घेणं फार म्हणजे फार अनिवार्य होतं हो!
झालं असं होतं की एक दिवस अस्मादिकांची स्वारी अशीच नेहमीसारखी वेंधळ्या धांदरटपणाची कमाल करत करत शाळेच्या आवारातून चालली होती. बहुधा डोक्यात ''आज आईने डब्यात कोणती भाजी दिली आहे कोणास ठाऊक!'' सारखे तद्दन निरुपयोगी विचार चालले असावेत. तेवढ्यात करड्या स्वरात हाक आली, ''कुलकर्णी!''
घाबरून काही सेकंद माझ्या छातीचे ठोके पुरते थांबलेच आणि मग ते काळीज सशाच्या काळजाप्रमाणे सैरावैरा वेगात धावू लागले. कारण मी ज्यांना अतिशय घाबरायचे अशातल्या माझ्या एका शिक्षिकाबाईंनी मला पुकारा दिला होता.
ह्याच त्या बाई, माझं खिडकीतून बाहेर दिसणार्‍या गुलमोहराच्या किंवा शिरिषाच्या झाडाकडं लक्ष असलं की मला हमखास पकडणार्‍या. ह्याच त्या बाई, ज्या मी शाळेच्या वहीच्या शेवटच्या पानावर राजकन्या, मोरपिसे, शंख शिंपल्यांची चित्रं काढत असताना मला तंद्रीतून जागं करून वर्गात अवघड अवघड प्रश्न विचारणार्‍या. ह्याच त्या बाई, मला पेंगुळल्यासारखे होत असले की ''कुलकर्णी, धडा वाच,'' असे सांगून माझ्या सुखनिद्रेवर संक्रांत आणणार्‍या.... ह्याच त्या बाई, माझा गृहपाठ झाला नसेल तेव्हाच माझी वही चाळायला मागणार्‍या.... त्यांना बहुधा माझ्याविषयी सहावे इंद्रिय असावे हा माझा समज एव्हाना दृढ होत आलेला....
अशा बाईंनी जाहीर पुकारा करणं म्हणजे थेट कडेलोटाची शिक्षाच की!
मी मनातल्या मनात थरथरत बाईंसमोर जाऊन उभी राहिले.
''क..क्क..काय बाई?'' माझा अस्फुटसा अडखळता प्रश्न.
''मला मधल्या सुट्टीत येऊन भेट स्टाफ-रूम मध्ये.'' इति बाई.
झालं. माझं लवकर लवकर डबा संपवून, बुचाच्या झाडाखाली उभं राहून, इतर डझनभर मुलींसारखी आकाशात नजर स्थिर करून, शरीरचापल्याच्या जोरावर बुचाची फुलं झाडावरून थेट हातात ''कॅच कॅच'' करायचा प्रोग्रॅम बोंबलला!
मधल्या सुट्टीत बाईंनी जमेल तेवढ्या करड्या आवाजात फर्मान सोडले, ''तुला अहवाल लिहायचाय... ते इचलकरंजीला साहित्य संमेलन चाललंय ना, त्याचा...''
''बाई, पण मला काय माहीत तिथं काय चाललंय ते! मी कसं लिहिणार?'' माझा चाचरता प्रश्न.
''अगं, सोपं आहे. आता पेपरमध्ये येतातच आहेत त्याच्यावर लेख. ते जमा कर, लायब्ररीत जाऊन इतर वर्तमानपत्रांमधली कात्रणं चाळ जरा! आणि गेल्या , त्याच्या गेल्या वर्षीच्या साहित्य संमेलनांचे अहवाल पाहा जरा.. म्हणजे कळेल!''
''पण बाई, असं न पाहता कसं कळणार तिथं काय काय झालं ते... कोण काय बोललं, लोकांच्या प्रतिक्रिया वगैरे...'' माझा पुन्हा एक बावळट प्रश्न.
''अगं काढ ना माहिती मग! इतकं अवघड नाहीए ते काम. विचार जरा आजूबाजूला, कोणी गेलं होतं का साहित्य संमेलनाला....''
आता ह्यांना काय खाऊ वाटत होता का, की माझ्या आजूबाजूचे लोक मला हव्या असलेल्या माहितीसाठी साहित्य संमेलनाला टपकतील म्हणून! आणि तेव्हा काही आतासारखी 'लाईव्ह टीव्ही कव्हरेज'ची सोयही नव्हती! पण कोण सांगणार त्यांना??!! असो. मी मुंडी होकारार्थी हालवली (तेवढं मात्र फर्मास जमतं आपल्याला!) आणि तिथून लगबगीनं काढता पाय घेणार एवढ्यात पुन्हा करडा आवाज गरजला, ''आणि हो, आठवडाभरात दे आणून! मग मी बघेन काय फेरफार करायचे ते!''
झाले! मेरी रातोंकी नींद, दिनका चैन...सब कुछ गायब हो गया| कधी तांदळातले खडे निवडले नसतील एवढ्या तन्मयतेने मी वृत्तपत्रे वाचू लागले. लायब्ररीतील बाईंचे डोके खा खा खाऊन झाले. त्यांनी दिलेल्या कात्रणांची, आधीच्या अहवालांची पारायणे करून झाली. खुनाचा तपास करणार्‍या गुप्तहेराच्या चाणाक्षपणाने मी इचलकरंजी किंवा त्याच्या आसपासच्या गावात नातेवाईक असलेल्या वर्गमैत्रिणी हुडकून काढल्या. त्यांना आपापल्या इचलकरंजीकर नातेवाईकांना विचारण्यासाठी एक प्रश्नावलीच दिली. अधून मधून आमच्या करड्या स्वराच्या बाईही मला बोलावून हातात माहितीचे काही कागद, कात्रणे इत्यादी इत्यादी कोंबत.
अखेर करत करत माझ्याकडे माहितीचे, साहित्य संमेलनाच्या इत्थंभूत घटनाक्रमांचे एक छोटेसे संकलनच तयार झाले.
मग एके सुदिनी सर्व भेंडोळी समोर ठेवली, कोरे कागद पुढ्यात ओढले, माता सरस्वतीचे स्मरण केले आणि त्या अदृश्य संमेलनाचा साग्रसंगीत अहवाल लिहायला घेतला.
पाहता पाहता सर्व लेख पुरा झाला. एक-दोन शंकांचे समाधान एका मैत्रिणीमार्फत तिच्या नातेवाईकांकडून करून घेतले. लेख घरच्यांना वाचायला दिला. ''आहे बुव्वा!'' वडिलांचा खोचक अभिप्राय, ''अगदी तू तिथे प्रत्यक्ष जाऊन संमेलन पाहिलंस असंच वाटतंय लेख वाचून!'' मनातल्या मनात मला एकीकडे स्वतःचा अभिमान वाटत होता आणि दुसरीकडे एक बोचरी भावना होती. बरं, मी काही टिळकही नव्हते ना नामदार गोखले! बाणेदारपणे, सचोटीने, स्वाभिमानाने तेजस्वी उत्तरे वगैरे देणे म्हणजे काहीतरीच!!!! आमचं आपलं सोयीचं गणित! मनात स्वतःच्या प्रश्नाला स्वतःच स्पष्टीकरण : ''असे कितीसे लोक वाचणार आहेत हा लेख! आणि त्यांनी वाचला तरी त्यांना मी ते संमेलन प्रत्यक्ष अनुभवले किंवा नाही ह्याबद्दल काय असा फरक पडणार आहे? किती जण त्याचा नंतर विचार करणार आहेत? त्यांना सर्व संमेलनाचा धावता अहवाल तुझ्यामुळेच तर एका फटक्यात वाचायला मिळणार आहे! मग काय हरकत आहे? शिवाय तू जमवलेली माहितीही समर्पक आहे. केली आहेस मेहनत एवढी तर घे जरा मजा!!''
माझा लेख मोठ्या ऐटीत वार्षिक अंकात छापून आला. बर्‍याच जणांनी वाचला. माझे भरपूर कौतुकही झाले. लेखनशैलीची दादही देऊन झाली. माझे मन मात्र कधीचे त्या लेखिकेच्या नावापाशी जे थबकले होते, तसेच आजही थबकून आहे.
--- अरुंधती