Showing posts with label पर्यावरण. Show all posts
Showing posts with label पर्यावरण. Show all posts

Friday, October 25, 2013

ग्रीनवॉशिंग व ग्राहकांची जागरूकता

''आमचे उत्पादन पर्यावरणपूरक आहे.''

''आम्ही बनविलेले उत्पादन संपूर्णतः नैसर्गिक आणि पर्यावरणास कोणताही धोका न पोहोचविणारे आहे.''

अशा कित्येक जाहिराती आपल्याला टीव्ही, वर्तमानपत्रे, सोशल मीडियावर दिसत असतात. एखादे उत्पादन पर्यावरणपूरक आहे हे 'दिसल्या'वर आजच्या सुशिक्षित, सधन ग्राहकाचा त्या उत्पादनामधील रस वाढतो ही बाब उत्पादन करणार्‍या कंपन्या व जाहिरातदार नेमकी जाणून आहेत. जागतिक तापमानवाढ, पर्यावरणाची हानी, प्रदूषण इत्यादींबद्दल वाढती सतर्कता जशी ह्याला कारण आहे तशीच 'ग्रीन' किंवा 'पर्यावरणपूरक' उत्पादने खरेदी करणे हे सामाजिक प्रतिष्ठेचे समजले जाण्याची मानसिकताही त्यामागे आहे.

सध्याचा जमाना प्रसारमाध्यमांचा व सोशल मीडियाचा आहे. टीव्ही, आंतरजाल, वृत्तपत्रे इत्यादींच्या माध्यमातून आपण वर्षाकाठी हजारो जाहिरातींच्या संपर्कात येत असतो. या जाहिराती आपल्यावर अगदी बेगुमान आदळत असतात. त्यांचा अभ्यास करू जाता, गेल्या काही वर्षांमध्ये जाहिरातदार आपली उत्पादने किंवा सुविधा कशा प्रकारे पर्यावरणपूरक आहेत, पर्यावरणाला पोषक आहेत अथवा ''ग्रीन'' आहेत हे अहमहमिकेने सांगताना, मांडताना दिसतात. त्या प्रकारच्या लेबल्सने त्यांचे उत्पादन नटलेले असते. 'इको-फ्रेंडली', 'बायो-डीग्रेडेबल', 'ग्रीन', 'री-सायकल्ड', 'डॉल्फिन-फ्रेंडली', 'पर्जन्यवनांना धोका न पोचविणारे', 'नैसर्गिक', 'एनर्जी-एफिशियंट', 'फॉस्फेट-फ्री', 'अ‍ॅनिमल-फ्रेंडली', पर्यावरणपूरक उत्पादन अशी अनेक प्रकारची, तर्‍हेची लेबल्स - त्यांवरील लोगो - त्यांमागील संदेश - हे खरोखर तुम्हा-आम्हाला ती जाहिरात बघताना किंवा खरेदी करताना कळते का हो? जाहिरातीनुसार खरोखर ते उत्पादन तसे आहे की जाहिरातदार आपली दिशाभूल करत आहे हे त्यावरून कळते का?

'ग्रीनवॉशिंग' म्हणजे ढोबळपणे आपले उत्पादन प्रत्यक्षात जेवढे व जितके पर्यावरणपूरक आहे त्याच्या कितीतरी पटीने जास्त असल्याचे भासविणे असे म्हणता येईल. प्रत्यक्ष उत्पादनावर, कंपनीच्या संकेतस्थळ / माहितीपुस्तिकेत किंवा जाहिरातींमध्ये असे प्रतिपादन केलेले असते. 'ग्रीनवॉशिंग'ची ही संज्ञा व अशा प्रकारे दिशाभूल करणे हे काही नवीन नाही. ही दिशाभूल मुख्यतः जाहिराती व लेबल्सद्वारे केली जाते. जोवर ही दिशाभूल फक्त मार्केटिंग तंत्राचा एक भाग एवढ्यापुरतीच मर्यादित होती तोपर्यंत त्याकडे बर्‍याच प्रमाणात दुर्लक्ष केले गेले. परंतु ही दिशाभूल ग्राहकांच्या आरोग्यास व पर्यायाने सामाजिक आरोग्यास धोकादायक ठरू शकते हे लक्षात आल्यावर ग्राहक संघटना, वेगवेगळ्या एन.जी.ओ. व स्थानिक प्रशासकीय व्यवस्था त्यांबद्दल जागरूक होऊ लागल्या. इ.स. २००९ च्या टेराचॉईस एनव्हायर्नमेन्टल मार्केटिंग कंपनीच्या अहवालानुसार अमेरिकेत २२१९ उत्पादनांनी 'ग्रीन' असल्याचा दावा केला. त्यातील ९८% उत्पादने 'ग्रीनवॉशिंग' केलेली होती!!

एअरबस ए ३८० - अ बेटर एन्व्हायर्नमेन्ट इनसाईड अ‍ॅन्ड आऊट अशी जाहिरात


तुम्ही जेव्हा एखादे उत्पादन खरेदी करता तेव्हा त्यावर असणारी सर्व प्रकारची लेबल्स पाहून - वाचून तुम्ही ते खरेदी करता का? त्या लेबल्सचा अर्थ तुम्हाला माहीत असतो का? वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या प्रकारची लेबल्स जेव्हा आपले उत्पादन हे 'ग्रीन' आहे हे दर्शविण्यासाठी लावतात तेव्हा त्यांच्या विभिन्नतेमुळे तुमचा गोंधळ उडतो का? उदा. एखादे उत्पादन 'ऑर्गॅनिक' (सेंद्रीय) किंवा 'अ‍ॅनिमल फ्रेंडली' आहे हे वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या लेबल्सद्वारे दाखवतात. त्यावरील लोगो भिन्न असू शकतात, चित्र भिन्न असू शकते. तसेच त्या लेबलमागे कोणती अधिकृत संस्था आहे का, हेही स्पष्ट नसते. ग्राहकांचा गोंधळ हा कित्येकदा ह्यामुळे होतो. जरा विचार करा, त्या उत्पादनावर जर अशा तर्‍हेचे लेबल असेल किंवा 'आमचे उत्पादन हे पर्यावरणपूरक आहे' असे निराळे व ठळक छपाईत लिहिलेले असेल तर त्यामुळे ते उत्पादन विकत घेणे किंवा न घेणे ह्याबद्दल तुमच्या निर्णयावर काही प्रभाव, फरक पडतो का?



अनेक कंपन्यांच्या संकेतस्थळांवर त्यांची उत्पादने 'इको-फ्रेंडली' असल्याचे दावे केलेले आढळतात. परंतु नक्की कोणत्या प्रकारे ते उत्पादन इको-फ्रेंडली आहे, त्याचा पुरावा किंवा त्याबद्दलची सविस्तर माहिती यांबद्दल तिथे जास्त काही लिहिलेले नसते. काही आंतरराष्ट्रीय ब्रँड्सच्या कंपन्यांच्या संकेतस्थळांवर त्या कंपन्यांनी आपल्या उत्पादनाचे किंवा आपली कंपनी करत असलेल्या कामासंबंधीचे पर्यावरण अहवाल दिलेले असतात. रकानेच्या रकाने भरून माहिती असते. परंतु नक्की कोणत्या ठिकाणाची माहिती आहे, किती क्षेत्रफळातील जमीन/स्रोत/उद्योगाची माहिती आहे, इतर कोणत्या उपाययोजना केल्या आहेत, किती प्रमाणात त्या राबविल्या आहेत, कधीपासून व कशा प्रकारे राबविल्या आहेत - या सर्व तपशिलांची बर्‍याचवेळा वानवा असते. कंपनीचे कारखाने अनेक ठिकाणी असतील आणि त्यातील एखाद्या ठिकाणचा अहवालच जर सादर केला असेल तर मग त्या अहवालानुसार कंपनीच्या प्रॅक्टिसेस पर्यावरणपूरक म्हणता येतात का? हे अहवाल कित्येकदा कंपनीनेच प्रायोजित केलेले असतात. म्हणजे कोणा तटस्थ किंवा त्रयस्थ, मान्यताप्राप्त, अधिकृत संस्थेद्वारा ही तपासणी झालेलीच नसते. कंपनीने नेमलेल्या एखाद्या सल्लागार संस्थेने दिलेला अहवाल असतो तो! मग असा अहवाल कितपत ग्राह्य धरायचा?

भारतासकट बर्‍याच देशांमध्ये एखाद्या उत्पादनाच्या किंवा सुविधेच्या पर्यावरणावर होणार्‍या परिणामांसंबंधी दिशाभूल करणार्‍या जाहिरातींची रेलचेल दिसून येते. भारतातले एक उदाहरण म्हणजे व्हर्लपूल क्विक चिल रेफ्रिजरेटरची जुनी जाहिरात! ह्या जाहिरातीत कंपनीने म्हटले होते की अन्य कंपन्यांच्या सर्वसामान्य रेफ्रिजरेटरमध्ये वापरला जाणारा पर्यावरणास धोकादायक गॅस न वापरता या उत्पादनात पर्यावरणपूरक गॅस वापरला गेला आहे. ही जाहिरात ठिकठिकाणी झळकली. प्रत्यक्षात तो गॅस पर्यावरणास पूरक नसून हानी पोहोचविणाराच होता. परंतु कंपनीने बिनबोभाटपणे अशी जाहिरात करून ग्राहकांची दिशाभूल केली. नंतर त्यांना ती जाहिरात योग्य कारवाईमुळे मागे घ्यावी लागली. हे एक उदाहरण... पण अशी कैक उदाहरणे ह्या क्षेत्रातले तज्ज्ञ लोक देतात. या उदाहरणांमध्ये फक्त खासगी संस्थाच नव्हे तर कित्येकदा सरकारी किंवा निम्न सरकारी कंपन्याही दिशाभूल करणार्‍या जाहिराती, लेबल्सद्वारे ग्राहकांची फसवणूक करण्यास हातभार लावत असतात.

ग्रीनवॉशिंगची ७ पातके!

[द सेव्हन सिन्स ऑफ ग्रीनवॉशिंग]

१. उत्पादनामुळे होणारी हानी लपविण्याचे पातक

एखादे उत्पादन 'ग्रीन' आहे हे महत्त्वाच्या पर्यावरणासंबंधी निकषांकडे दुर्लक्ष करून अतिशय त्रोटक किंवा मर्यादित बाबींवरून ठरविणे. (उदा. पर्यावरणपूरक अशा (शाश्वत / सस्टेनेबल) जंगलातील वृक्षांपासून बनविलेला कागद : हा कागद बनविताना निर्माण झालेले प्रदूषण किंवा खर्च झालेली अतिरिक्त ऊर्जा यांबद्दल सांगण्याची टाळाटाळ व ते उत्पादन 'ग्रीन' आहे अशी जाहिरात.)

२. पुरावा नसण्याचे पातक

आपले उत्पादन 'ग्रीन' असण्याचा दावा त्यासंबंधी कोणताही पुरावा न देता करणे. तशी माहिती किंवा त्रयस्थ, तटस्थ संस्थेचे तसे प्रशस्तिपत्रक सादर न करणे.

३. मोघमपणाचे पातक

उत्पादनाची जाहिरात करताना मोघम शब्द वापरणे. त्या संज्ञेचा अभिप्रेत अर्थ विशद न करणे. जसे, 'ऑल नॅचरल'. आता ऑल नॅचरल या संज्ञेचा कंपनीला अभिप्रेत असणारा अर्थ व ग्राहकाला अभिप्रेत असणारा अर्थ यांच्यात तफावत असते व असू शकते. त्या तफावतीचा गैरफायदा घेऊन आपल्या उत्पादनाबद्दल ग्राहकांची दिशाभूल करणे.

४. अप्रासंगिक किंवा संबंध नसलेली जाहिरात करण्याचे पातक

येथे कंपनीने उत्पादनावर किंवा जाहिरातीत केलेला दावा जरी बरोबर असला तरी त्याचा पर्यावरणाविषयी जागरूक ग्राहकांना काही उपयोग नसतो. [उदा. एखादे उत्पादन विकत घेऊन तुम्ही डॉल्फिन्सचे संरक्षण / जतन करण्यास हातभार लावत आहात असा दावा करणे. त्या निकषावर ते उत्पादन पर्यावरणपूरक आहे असे भासविणे.]

५. धोकादायक बाबींपेक्षा कमी धोका असणार्‍या बाबींची जाहिरात करण्याचे पातक

'लेसर ऑफ द टू एव्हिल्स' असे ज्याला म्हणता येईल, अशा प्रकारे एखाद्या उत्पादनापासून जर पर्यावरण किंवा आरोग्याला जो धोका सर्वात मोठ्या प्रमाणात असेल त्याबद्दल न बोलता त्या उत्पादनामुळे आरोग्याला / पर्यावरणाला कमी धोका असणार्‍या बाबीसंबंधी बोलणे व ग्राहकाची दिशाभूल करणे. [उदा. ऑर्गॅनिक सिगारेट्स, किंवा पॅकबंद पाण्याची 'नैसर्गिक स्रोतांतून / हिमनगातून आलेले शुद्ध पाणी' अशी जाहिरात.]

६. खोटे दावे करण्याचे पातक

आपल्या उत्पादनाबद्दल पर्यावरणासंबंधी खोटे दावे करणे. [उदा. प्रत्यक्षात आपले उत्पादन 'एनर्जी एफिशियन्ट' इ. नसताना जाहिरातीत किंवा उत्पादनावर तसे, तत्सम शब्द वापरणे.]

७. खोट्या शिक्क्यांचे पातक

ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी आपल्या उत्पादनावर ते उत्पादन 'ग्रीन' असण्याचे खोटे शिक्के / लेबल्स लावणे. [उदा. 'इको-प्रेफर्ड' उत्पादनाचा दावा करून खोटे शिक्के/लेबल्स लावून ते उत्पादन पर्यावरणपूरक असल्याचे भासविणे.]

उत्पादनांवर छापले जाणारे शिक्के किंवा लेबल्स नक्की काय सांगतात, काय दर्शवितात, त्यांच्या मागे कोणती / कोणत्या अधिकृत संस्था आहेत, त्या संस्था मान्यताप्राप्त व तटस्थ - खात्रीलायक आहेत का, हे सर्व ग्राहकांना समजणे व त्यांनी त्याबद्दल जागरूक राहणे हे आवश्यक आहे. अन्यथा अशी लेबल्स ग्राहकांची दिशाभूल करतात किंवा त्यांना गोंधळात टाकतात.

त्यासाठी कोणत्याही उत्पादनावरील 'इको-लेबल्स' असतात त्यांची खात्री करून घेणे हे ग्राहकास शक्य असणे जरुरीचे आहे. त्यासाठी आवश्यक माहिती, चित्रे इत्यादी हे पर्यावरणपूरक उत्पादनासंबंधी संकेतस्थळांवर, पुस्तिकांद्वारा प्रकाशित होणे एक महत्त्वाचे पाऊल ठरेल. तसेच ज्या संस्थांद्वारे अशी लेबल्स मान्य केली जातात त्या संस्थांची व त्यांच्या कार्याची पारदर्शकता ग्राहकांपुढे येणे आवश्यक आहे. त्या संस्थांना किंवा संस्थाचालकांना कोणत्याही उत्पादनाच्या विक्रीतून निधी मिळतो, किंवा अन्य कोणत्याही प्रकारचा फायदा होतो, असे असता कामा नये. तसेच ग्राहकांना, पर्यावरण-संरक्षण करणार्‍या कार्यकर्त्यांना, उद्योगांना व समाजधुरीणांना विचारून, त्यांची मते व प्रतिसाद विचारात घेऊन पर्यावरणासंबंधी प्रशस्तिपत्रके बनविली जाणे आवश्यक आहे.
सर्व ग्रीन लेबल्स चे प्रमाणीकरण होणे, त्यांच्यात एकवाक्यता येणे, त्यांबद्दल सार्वत्रिक जागरूकता वाढणे हेही महत्त्वाचे आहे.

भारतात अ‍ॅडव्हर्टायझिंग कौन्सिल ऑफ इंडिया सारख्या संस्था कार्यरत आहेत व त्या दिशाभूल करणार्‍या जाहिरातींवर नजर ठेवून असतात, तसेच चुकीच्या जाहिरातींवर यथायोग्य कारवाई होण्यासाठी प्रयत्न करत असतात. परंतु कित्येकदा संपूर्ण कारवाई पार पडेस्तोवर हजारो, लाखो ग्राहकांची दिशाभूल होण्याची शक्यता जास्त असते. तसेच संबंधित कंपन्या आपली दिशाभूल करणारी जाहिरात फक्त मागे घेतात व त्या ऐवजी दुसरी जाहिरात दाखवितात. परंतु आपण अगोदर दिशाभूल करणारी जाहिरात केली हे त्या कंपन्या ग्राहकांसमोर मान्य करत नाहीत.

अनेकदा अशा तर्‍हेचे ग्रीनवॉशिंग करणार्‍या कंपन्यांमुळे फक्त ग्राहकांना व पर्यावरणालाच फटका बसत नाही, तर ज्या कंपन्या खरोखरी पर्यावरणपूरक उत्पादने किंवा सुविधा देतात त्यांच्याकडेही संशयाने बघितले जाते. प्रगत देशांमधील ग्राहकांमध्ये 'ग्रीन' उत्पादनांबद्दल वाढता अविश्वास, ज्याला 'ग्रीन फटीग(थकवा)' म्हणून संबोधिले जाते, रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यावर विचारमंथन करताना तज्ज्ञांनी काही गोष्टी मांडल्या. त्यात ग्राहक व जाहिरात करणार्‍या एजन्सीज, मार्केटिंग करणार्‍या एजन्सीज यांच्यात पर्यावरणपूरकता म्हणजे नक्की काय याबद्दल साक्षरता / जागरूकता निर्माण करणे हा एक उपाय होता.

पर्यावरणपूरक उत्पादने ही स्थलकालसापेक्ष असतात. उदा. एखाद्या ठिकाणी पाण्याची मुबलकता असेल तर तिथे 'धुवून पुन्हा वापरता येण्यासारखे बाळांचे कापडी लंगोट' हे पर्यावरणाला आव्हान देत नाहीत. पण जिथे पाण्याचे दुर्भिक्ष्य असेल तिथे पाण्याची मागणी वाढविणार्‍या, पाण्याच्या स्रोतांवर ताण आणणार्‍या लंगोटांची जाहिरात करणे हे पर्यावरणदृष्ट्या जबाबदारीचे ठरणार नाही.

एखादे उत्पादन पर्यावरणपूरक आहे किंवा नाही हे ठरविणे जसे मान्यताप्राप्त अधिकृत संस्थांचे काम आहे तसेच आपल्या उत्पादनाबद्दल खरी व तपशीलवार माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचविणे हे त्या उत्पादन करणाऱ्या कंपनीचे काम आहे. त्यात ते उत्पादन/ वस्तू बनविताना खर्च होणारे नैसर्गिक स्रोत, ऊर्जा, त्या उत्पादनाची प्रक्रिया, वापरले जाणारे घटक, कचर्‍याची विल्हेवाट, औद्योगिक कचर्‍याचे निर्मूलन, त्या उत्पादनाची चाचणी घेताना ती कशी घेतली गेली, उत्पादनाची वाहतूक, आवरण, ज्या ठिकाणी उत्पादन बनविले जाते त्या ठिकाणच्या नैसर्गिक पर्यावरणाच्या जतनाची जबाबदारी इत्यादी अनेक गोष्टींचा समावेश होतो. ही सर्व माहिती ग्राहकांची दिशाभूल करणारी नसावी, खरीखुरी असावी. तसेच मान्यताप्राप्त त्रयस्थ, अधिकृत संस्थेने नियमाने तपासणी करून ही माहिती खरी असल्याचे मान्य केलेले असावे. तसेच ठराविक काळाने उत्पादनांची व अन्य बाबींची पर्यावरणपूरकतेच्या बदलत्या निकषांनुसार पुनर्तपासणी होणेही आवश्यक आहे.

आपण कोणतेही उत्पादन 'ग्रीन' असल्याच्या निकषावर जेव्हा खरेदी करतो तेव्हा एक ग्राहक म्हणून त्या उत्पादनाच्या पर्यावरणपूरकतेची खात्री करून घेणे ही आपलीही एक महत्त्वाची जबाबदारी ठरते.

* वरील लेख हा फक्त माहिती मिळावी व जागरूकता निर्माण व्हावी - वाढावी ह्या उद्देशातून लिहिलेला आहे.

संदर्भ :

१] सेंटर फॉर सस्टेनेबल प्रॉडक्शन अ‍ॅन्ड कन्झम्प्शन चे संकेतस्थळ : http://www.cuts-international.org/

२] इको-लेबल्स

३] रिचर्ड दाल यांचा 'एनव्हायर्नमेन्टल हेल्थ पर्स्पेक्टीव्ह' अंकातील ग्रीनवॉशिंग संदर्भातील जून २०१० मध्ये प्रसिद्ध झालेला लेख. http://ehp.niehs.nih.gov/118-a246/

* छायाचित्र विकीपीडियावरून साभार

Sunday, October 24, 2010

अग्निहोत्र : शेतीसाठी समृद्ध वरदान!

मध्यंतरी एका परिचितांच्या ओळखीतील शेतावर जायचा योग आला. हिरवेगार शिवार, डोलणारी पिके, रसरशीत फळे - भाज्या पाहून मन प्रसन्न झाले. शेतमालकांनी आपल्या शेतीत आपण अग्निहोत्राचा दैनंदिन प्रयोग रोज करत असल्याचे व तेव्हापासून पिकाला खूप फायदा झाल्याचे आवर्जून सांगितले. ह्या अगोदरही मी अग्निहोत्र कसे करतात, का करतात, त्याचे वातावरणासाठी - शेतीसाठी व आरोग्यासाठी उपयोग इत्यादींविषयीची मार्गदर्शक भाषणे व प्रात्यक्षिके पाहिली होती. परंतु ज्या शेतजमीनीत असे अग्निहोत्र अनेक महिने नित्यनियमाने होत आहे असे शेत बघण्याचा योग बऱ्याच काळानंतर जुळून आला. अग्निहोत्राचा नित्य सराव शेतीसाठी खरोखरीच उपयोगी पडू शकतो हे जाणवले. तेव्हा पासून ही माहिती आपल्या इतर मराठी शेतकरी बांधवांपर्यंत विनासायास कशी नेता येईल ह्यावर माझे विचार मंथन सुरू झाले. आंतरजालावर मराठीत काही माहिती उपलब्ध होते का, हे धुंडाळले. परंतु हाती विशेष काही आले नाही. इंग्रजी व अन्य विदेशी भाषांमध्ये (जर्मन, फ्रेंच, पोलिश इ. ) मात्र विपुल माहिती उपलब्ध आहे. विज्ञान किंवा शेती हा काही माझा प्रांत नव्हे. परंतु तरीही माझ्या अल्पमतीला अनुसरून अग्निहोत्राविषयीची मला मिळालेली व शेतकरी बंधूंसाठी तसेच पर्यावरण प्रेमींसाठी उपयुक्त वाटणारी माहिती आपल्या समोर ठेवत आहे!  (जाणकारांनी ह्या माहितीत भर घातली तर स्वागतच आहे!)

मानवाच्या व जीवसृष्टीच्या इतिहासात सूर्य व अग्नी यांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. सूर्याने औष्ण्य दिले, प्रकाश, प्राणऊर्जा, अन्न दिले तर अग्नीने भयमुक्त केले, अन्न रांधता येणे शक्य केले व पोषण केले. त्यांच्या ह्या महत्त्वपूर्ण भूमिकेला अनुसरून जगातील बहुविध संस्कृतींमध्ये सूर्य व अग्नी वंदनीय मानले गेले असून त्यांना देवत्व बहाल केलेले आढळते. त्यांचा आदरसन्मान, त्यांचे प्रती कृतज्ञता आणि त्यांची उपासना हा त्यामुळे अनेक संस्कृतींचा अविभाज्य भाग न बनला तरच नवल!

भारतात शेती व गोधनाच्या दृष्टीने अग्नी व सूर्य फारच उपयोगी! कदाचित त्यामुळे भारतीय संस्कृतीतही सूर्योपासना व अग्नीपूजा पुरातन कालापासून दिसून येते. ह्या उपासना व पूजांमधील एक भाग म्हणजे अग्निहोत्र. अग्नी व सूर्याची आराधना. प्रजापतीला अभिवादन. बल, पुष्टी, औष्ण्य, ऊर्जा यांची आराधना. अग्निहोत्राची सुरुवात नक्की कोणी, कशी, केव्हा केली याविषयी बरेच संशोधक बरेच काही सांगू शकतील. परंतु त्यापेक्षाही महत्त्वाची आहे ती अग्निहोत्राची शेतीसाठीची उपयुक्तता. भारतातील व भारताबाहेरील विविध विद्यापीठे, संशोधकांनी व कृषी तंत्रज्ञांनी केलेल्या आधुनिक, विज्ञानाधारित संशोधनानुसार अग्निहोत्राचा शेतीला खूप चांगला फायदा होतो हे निष्पन्न झाले आहे. एका शेतीप्रधान देशासाठी असे संशोधन व त्याची उपयुक्तता अमूल्य आहे.



पूर्वी अग्निहोत्र हे परंपरा, रूढींच्या जोखडात अडकले होते. परंतु आताचे त्याचे स्वरूप सर्वसामान्य माणसास अनुसरण्यास व समजण्यास सोपे, सहज झाले आहे. शेतकरी व त्याच्या कुटुंबातील कोणीही सदस्य आपल्या शेतीसाठी अग्निहोत्र करू शकतात. त्याला कसलेही बंधन नाही. अग्निहोत्र ही एक प्रकारची विज्ञानाधारित, शास्त्रशुद्ध वातावरण-प्रक्रियाच आहे असे म्हणता येईल. आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान ह्यांच्या आधारे अग्निहोत्राचे सभोवतालच्या वातावरणावर, पिकांवर, जमिनीच्या कसावर, पाण्यावर होणारे परिणाम अभ्यासू जाता हा प्रकार खूपच लाभदायी व पर्यावरणपूरक आहे हे संशोधकांच्या लक्षात आले आणि सुरू झाली अग्निहोत्राचा पूरक वापर करून कसलेली शेती.

ह्या आधुनिक अग्निहोत्रात काय असते तरी काय?

१. सूर्योदय व सूर्यास्त ह्या दोन वेळांना हे अग्निहोत्र करतात.
२. त्यासाठी लागणारी सामग्री अतिशय कमी खर्चात, शेती व्यवसायात सहज उपलब्ध होणारी, पर्यावरणपूरक असते. अग्निहोत्राचे तांबे धातूचे पिरॅमिड आकारातील पात्र भारतात माफक किमतीत सामान्यतः पूजा भांडार, भांड्यांच्या दुकानात सहज उपलब्ध होऊ शकते.
३. अग्निहोत्राला लागणारा वेळ सकाळ-सायंकाळ मिळून जास्तीत जास्त अर्धा तास, व त्याचे होणारे फायदे मात्र दूरगामी आहेत.
४. सर्व परिवार अग्निहोत्रात सामील होऊ शकतो. त्याला संख्या, जाती, धर्म, लिंग, पंथाचे बंधन नाही.
५. अग्निहोत्र करताना उच्चारण्याचे मंत्र अतिशय सोपे असून परदेशी लोकही ते सहज पाठ करू शकतात.



साहित्य :

१. तांबे धातूचे ठराविक आकाराचे पिरॅमिड पात्र
२. गायीच्या शेणाची गोवरी, गायीचे तूप, हातसडीचा अख्खा तांदूळ (महिनाभरासाठी पावशेर तांदूळ पुरेसा)
३. काडेपेटी
४. सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळेचे नेमके वेळापत्रक.
५. काटक्या वापरायच्या असल्यास वड, पिंपळ, बेल, उंबर, पळस यांच्या वाळक्या काटक्या.




अग्निहोत्राचा प्रत्यक्ष विधी : 

स्थळ : शेताच्या मध्यात एखादे खोपटे बांधून तिथे हे अग्निहोत्र केल्यास त्याचा उत्तम फायदा होतो.

सूर्याला सन्मुख बसावे. (सकाळी पूर्वेस व सायंकाळी पश्चिमेस तोंड करून) समोर तांब्याच्या पिरॅमिड पात्रात गोवरीचा छोटा तुकडा तळाशी ठेवून त्याच्या भोवती गोवरीचे इतर तुकडे रचत जाणे, ज्यामुळे मध्यात थोडा खळगा तयार होईल. मग एका गोवरीच्या तुकड्याच्या टोकाला थोडे तूप लावून तो आगकाडीने पेटविणे व तो तुकडा अग्निहोत्र पात्रात ठेवणे. अग्निहोत्र प्रज्वलित करण्यासाठी तुम्ही मधल्या खळग्यात कापूर वडी ठेवू शकता. नेमक्या सूर्योदयाच्या व सूर्यास्ताच्या वेळी गायीच्या तुपात भिजलेले दोन चिमटी तांदूळ (अक्षता) ह्या पेटत्या अग्नीला अर्पण करणे. दोन्ही वेळा भिन्न मंत्र म्हटले जातात. दोन्ही वेळा अग्नीत अक्षता अर्पण केल्यावर ते तांदूळ पूर्णपणे जळेपर्यंत तुम्ही बसले असाल त्याच जागी डोळे मिटून स्थिर, शांत बसू शकता.

१. सूर्योदयाचे वेळी अग्निहोत्र करताना म्हणावयाचा मंत्र : 

सूर्याय स्वाहा । (अग्नीत चिमूटभर तूपमिश्रित तांदूळ घालणे) सूर्याय इदं न मम ॥ प्रजापतये स्वाहा । (अग्नीत चिमूटभर तूपमिश्रित तांदूळ घालणे) प्रजापतये इदं न मम ॥

२. सूर्यास्ताचे वेळी अग्निहोत्र करताना म्हणावयाचा मंत्र : 

अग्नये स्वाहा । (चिमूटभर तूपमिश्रित तांदूळ अग्नीत घालणे) अग्नये इदं न मम ॥ प्रजापतये स्वाहा । (अग्नीत चिमूटभर तूपमिश्रित तांदूळ घालणे) प्रजापतये इदं न मम ॥



अग्निहोत्र हे वातावरण, जमीन, पाणी, वनस्पती, प्राणी व मानवास आरोग्यदायी असून दोषनिर्मूलनाचे, शुद्धीकरणाचे काम करते असा अभ्यासकांचा दावा आहे. मंत्रांसहित अग्निहोत्राचे परिणाम फक्त पिकावरच नव्हे, तर मानवी आरोग्यावर, मनस्थितीवर सकारात्मक पद्धतीने दिसून आले आहेत. मंत्र म्हणजे मनाला जे तारतात ते. संस्कृत मंत्रांची कंपने/ तरंग व त्यांचा मानवी चेतासंस्थेवरील, जीवसृष्टीवरील सकारात्मक परिणाम ह्यांवर संशोधन चालू आहेच! अग्निहोत्रात म्हटल्या जाणाऱ्या मंत्रांचाही सभोवतालच्या जीवसृष्टीवर व मानवी आरोग्यावर -स्वास्थ्यावर चांगला परिणाम दिसून आला आहे.

रोज अग्निहोत्र करून जोपासलेल्या, कसलेल्या शेतीचा भारतातील वेगवेगळ्या कृषी संशोधन संस्था, अभ्यासक व भारताबाहेरील तज्ञांनी अभ्यास केल्यावर त्यांनी खालील प्रमाणे निष्कर्ष काढले :

१. अग्निहोत्र केलेल्या क्षेत्रातील पोषक वायूंचे प्रमाण परिणामकारक रितीने वाढले. (इथिलीन ऑक्साईड, प्रॉपिलीन ऑक्साईड, फॉर्मॅल्डिहाईड, ब्यूटाप्रोपियोलॅक्टोन) त्या भागातील पॅथोजेनिक बॅक्टेरियाजचे प्रमाण ९६% ने घटले व हवा शुद्ध होण्यास मदत झाली. अग्नीत आहुती घातल्यावर गायीच्या तुपामुळे ऍसिटिलीन तयार होऊन त्यामुळे प्रदूषित हवा शुद्ध होण्यास मदत होते.

२. पिकाची गुणवत्ता व उत्पादनात वाढ.

३. कृषी रसायनांच्या फवारणीच्या खर्चात घट.

४. चव, रंग, पोत व पोषणमूल्यांच्या दृष्टीने सरस पीक.

५. अधिक टिकाऊ व निर्यातीस अनुकूल उत्पादन.

६. कमी काळात जास्त पीक. एका वर्षात अधिक वेळा पीक घेऊ शकता.

७. अग्निहोत्रात वापरल्या जाणाऱ्या तुपाची सूक्ष्म स्तरावर प्रक्रिया होऊन त्यामुळे वनस्पतींना हरितद्रव्य उत्पन्न करण्यास मदत मिळते.

८. मधमाश्या अग्निहोत्र केलेल्या क्षेत्रातील पिकाकडे, झाडांकडे अधिक प्रमाणात आकृष्ट होताना दिसून आले आहे. त्यामुळे परागसिंचनास मदत होऊन उत्पादन वाढण्यास मदत होते.

९. अग्निहोत्रातील राख घन, द्राव, जैव-रसायनांच्या रूपात किंवा बायोसोल सारख्या स्वरूपात शेतात वापरल्यास पिकाला अधिक पोषण देण्यास, तसेच कीड व रोगांपासून त्यांचा बचाव करण्यास मदत करते असेही दिसून आले आहे.

अग्निहोत्र वापरून केलेल्या शेती/ पिकात खालील प्रमाणे फरक दिसून आला :

टोमॅटो : ( अगोदर, कृषी रसायने वापरून) : आकार - ७ सेंमी, वजन -८५ ग्रॅ., जाडी - १३ सेंमी, चव - बेचव,पोत - निस्तेज, रंग - फिकट लाल  , दर झाडागणिक उत्पादन - १ ते २ किलो, लागवडीपासून सुगीचा काळ - १२ आठवडे.
टोमॅटो : ( अग्निहोत्र वापरून) :    आकार - १० सेंमी, वजन - १२० ग्रॅ., जाडी - २० सेंमी, चव - चांगली , पोत - टणक , रंग -गडद लाल, ,दर झाडागणिक उत्पादन - ३ ते ४ किलो, लागवडीपासून सुगीचा काळ - ७ आठवडे.

आंबा : (अगोदर, कृषी रसायने न वापरता) : १०,००० किलो प्रती हेक्टर ( ८,९२५ पाऊंडस/ एकर)
(अगोदर, कृषी रसायने - कीटकनाशके व खते वापरून): ३०,००० किलो/ हेक्टर ( २६,७०० पाऊंडस/एकर)
(अग्निहोत्र वापरून) : ८४,००० किलो प्रती हेक्टर ( ७४,८०० पाऊंडस/ एकर)

केळी : 
१. पाचव्या पिढीतील केळीची बाग, फळाचा आकार लहान आणि कमी उत्पादन.
२. बाग फुसॅरियम (Fusarium)  ह्या बुरशीने ७०% ग्रस्त.
३. ४०%  moco Pseudomona Solanace.
४. एका झाडापासून जास्तीत जास्त ६ ते ७ नवीन झाडे तयार.
५. लागवडीपासून उत्पादनाचा काळ ८ ते १२ महिने.

चार महिने अग्निहोत्राचा शेतात/ बागांमध्ये नियमित वापर केल्यावर :
१. सर्व बागेचे एकसंध पुनरुज्जीवन.
२. रोग व कीड यांचा अभाव.
३. केळीचे घड आकाराने व वजनाने जास्त मोठे. सरासरी १२० केळी.
४. एका झाडापासून १० ते १२ नव्या झाडांची निर्मिती.
५. लागवडीपासून उत्पादनाचा काळ ६ महिने.

भाताच्या पिकाच्या बाबत, अग्निहोत्राने बीज अंकुरित होण्यास मदत होते का या विषयी बेंगळुरू येथील विवेकानंद योग संशोधन संस्थेने केलेल्या पाहणी व निष्कर्षांबद्दलचा हा दुवा :

अग्निहोत्राने बीज अंकुरित होण्यास मदत
http://nopr.niscair.res.in/bitstream/123456789/9356/1/IJTK%203(3)%20231-239.pdf


तसेच मायक्रो-बायॉलॉजिस्ट व संशोधक यांनी वेगवेगळे शास्त्रीय प्रयोग करून अग्निहोत्राची वातावरणासाठी व पिकांसाठीची उपयुक्तता सिद्ध केली आहे. अग्निहोत्र व सूक्ष्म-जीव (मायक्रोब्ज), अग्निहोत्राची राख व पाण्यात विरघळणारी फॉस्फेटस, अग्निहोत्र व द्राक्षे, अग्निहोत्र व व्हॅनिला वनस्पती यांविषयी केलेल्या प्रयोगांमधून त्याचे महत्त्व व उपयुक्तता अधोरेखितच झाली आहे. ह्या प्रयोगांविषयीचा दुवा :

http://www.agnihotra.org/content/scientific-experiments-agnihotra

अग्निहोत्राचे अन्य उपयोग :

१. अनेक मनोकायिक आजारांवर, जुन्या दुखण्यांवर तसेच नशाखोरीतून सुटण्यासाठी पूरक व उपयुक्त.

दुवा : http://www.indianjpsychiatry.org/temp/IndianJPsychiatry293247-2347415_063114.pdf

दुवा : http://www.homa-hof-heiligenberg.de/homa-therapie_eng.html

२. ध्यान, एकाग्रता यांसाठी पोषक.

३. आरोग्यास उपयुक्त, प्रतिकारशक्ती वाढविते, ताण कमी करते, सकारात्मक दृष्टिकोन तयार करण्यासाठी पूरक.

अग्निहोत्र व होम उपचार ( होमा थेरपी) विषयी आंतरजालावर भरपूर माहिती उपलब्ध आहे. त्याचा अनेक देशी-विदेशी लोक लाभ घेत आहेत. अग्निहोत्रा विषयीची अनेक संकेतस्थळेही उपलब्ध आहेत.
कर्नाटकातील एका शेतकऱ्याची ही अनुभव गाथा व आपल्या शेतातील अग्निहोत्राच्या प्रयोगानंतर त्याने अनुभवलेले बदल ह्या विषयीचा अजून एक लेख :


अभय मुतालिक देसाई यांचा आत्मनिर्भर शेतीचा शास्त्रीय प्रयोग


http://www.organiser.org/dynamic/modules.php?name=Content&pa=showpage&pid=304&page=10 

श्री. देसाई ह्यांनी आपल्या शेताच्या मध्यावर अग्निहोत्रासाठी छोटेसे खोपटे बांधले. त्याचा उपयोग फक्त अग्निहोत्र करणे व मंत्रोच्चारण करणे एवढ्यासाठीच केला. रोज सूर्योदय व सूर्यास्त समयी अग्निहोत्र केल्याने त्यांना कशा प्रकारे आपल्या शेतीत सुधारणा घडवता आली ह्याचा आढावा त्यांचा लेख घेतो.

हिमाचल प्रदेशातील शेतकर्‍यांनी अग्निहोत्र शेती करण्यास सुरुवात केल्याची ही बातमी : http://www.thaindian.com/newsportal/feature/himachal-pradesh-farmers-adopt-centuries-old-homa-farming-method_100238829.html

यूट्यूबवरही ह्याविषयीच्या ध्वनिचित्रफीती उपलब्ध असून त्या अवश्य पाहाव्यात : 

श्री. रवी वाडेकर, रत्नागिरी ह्यांची मुलाखत


श्री. रमेश तिवारी ह्या उत्तर प्रदेशातील आंबा उत्पादकाची परदेशी वृत्तवाहिनीवर अग्निहोत्र शेतीबद्दलची बातमी


ठाण्याच्या श्री. व्यंकटेश कुलकर्णी या कृषी उत्पादकाची मुलाखत


दक्षिण जर्मनीतील हाल्डेन्होफ अग्निहोत्र शेती


श्री. अभय मुतालिक देसाई, कर्नाटक यांची मुलाखत


श्री. वसंत परांजपे यांची मुलाखत व अग्निहोत्र प्रात्यक्षिक


भारतातील गरीब शेतकऱ्याला परवडणारी, त्याला सहज करता येणारी व अनुभवसिद्ध अशी ही अग्निहोत्राची पद्धती जर आधुनिक शेतकऱ्याने अवलंबली तर परंपरागत ज्ञानाचा व्यवहारी उपयोग करून त्याला आपले व घरादाराचे आयुष्य तर समृद्ध बनवता येईलच, शिवाय पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ते एक फार मोठे योगदान ठरेल. सर्वसामान्य माणसालाही अग्निहोत्र करणे सहज शक्य असून रोज किमान एका वेळी अग्निहोत्र करता आले तरीही ते लाभदायकच आहे!

अग्निहोत्राविषयी अधिक माहितीसाठी : 

तपोवन, मु.पो. : रत्नपिंपरी, तालुका : पारोळा, जि : जळगाव, महाराष्ट्र, भारत

दूरभाष : +९१ २५९७ २३५ २०३, +९१ २५९७ २८६ ०९१.

मोबाईल : श्री. अभय परांजपे : +९१ ९९८१३ ५२४६३.

ईमेल : tapovan3@yahoo.com

वेबसाईट : http://www.tapovan.net/



--- लेखिका : अरुंधती

(माहितीस्रोत : आंतरजाल व अन्य)

Saturday, October 16, 2010

कहाणी गणेशाची - वृक्षसंवर्धनाची!


ऐका देवा गणेशा, तुझी कहाणी. निर्मळ मळे, उदकाचे तळे, बेलाचा वृक्ष, सुवर्णाची कमळे.


एक आटपाट नगर होतं. हिरवीगार झाडी, निसर्गरम्य टेकड्या, नितळ जलाशय आणि स्वच्छ हवेचं त्याला वरदान होतं. आटपाट नगरातले लोक खूप हुशार, शिकलेले, व्यासंगी होते. पोटा-पाण्यासाठी हिंडताना ते बाहेरच्या देशांमध्ये गेले. काही जण तिथेच राहिले, काही परत आले. येताना त्यांनी आपल्याबरोबर छान छान बिया, रोपे आणली. रंगीबेरंगी फुलांची, नक्षीदार पानांची. मायदेशी परतल्यावर त्यांनी मोठ्या हौसेने ती रोपे रुजवली. प्रेमाने त्यांना जोपासले. न्हाऊ-माखू घातले. खतांचा चारा दिला. सूर्यप्रकाशाचा खाऊ दिला. बघता बघता त्या रोपांचे मोठे मोठे देखणे वृक्ष झाले. येणार्‍या जाणार्‍यांचे मन मोहवू लागले. प्रत्येकाला हवेहवेसे वाटू लागले. मग इतर लोकांनीही आधीचे जुने वृक्ष पाडले व ह्या नव्या वृक्षांच्या बिया आपल्या अंगणात, शेतांमध्ये, टेकाडांवर, जलाशयांकाठी आणि रस्त्यांच्या कडेला पेरल्या. त्यांचेही मोठे वृक्ष तयार झाले. वृक्षांना लगडलेल्या रंगीबेरंगी घोसांनी, नक्षीदार पानांनी आटपाट नगर आता अजूनच देखणे दिसू लागले.
पण मग हळूहळू लोकांना फरक जाणवू लागला. त्या देखण्या वृक्षांवर पक्षी फिरकत नव्हते. किडे-मुंग्या-फुलपाखरे-अळ्या, जणू सर्व प्राण्यांनी त्यांच्यावर बहिष्कार घातला होता. बघता बघता आटपाट नगरातली पशु-पक्ष्यांची संख्या रोडावली. नव्या परदेशी वृक्षांच्या आजूबाजूची जमीन वैराण होऊ लागली. त्यांच्या छायेत इतर झाडे-झुडूपे उगवेनात. जणू निसर्गदेवतेचा कोपच झाला. भूदेवी नाराज झाली, जलदेवता रुष्ट झाली, वायूदेवता अडून बसली, सूर्यदेवता आग ओकू लागली. आटपाट नगरातले नागरिक चिंतेत पडले. त्यांना काय करावे ते सुचेना. त्यांनी संकटनाशक गणराजांची करुणा भाकली. मनोमन त्यांचे ध्यान केले. ह्या संकटातून बाहेर पडल्यास नेटाने पर्यावरणाचे संवर्धन करण्याचा संकल्प घेतला. भक्तांची तळमळ पाहून गणराय प्रसन्न झाले. त्यांनी नागरिकांना दृष्टांत दिला. ''आजपासून सगळीकडे देशी झाडे लावा. आपल्या मातीतल्या झाडांचे संवर्धन करा. आपल्या देशातील रोपे, बीजांचे जतन करा. दिखाव्याला भुलू नका. आपल्या देशात प्रचंड वनसंपत्ती आहे, तिचे जतन करा. लाकूडफाट्यासाठी, बांधकामासाठी वृक्षतोड करणे, गायराने उध्वस्त करणे थांबवा. वृक्षांना आणि प्राणिमात्रांना आपल्या स्वार्थाचा बळी करू नका. झाडे लावायचा वसा घ्या. उतू नका, मातू नका, दिला वसा टाकू नका. असे सलग पाच वर्षे करा. तुमचा हेतू पूर्ण होईल, सुख पुन्हा दारी येईल.''
आटपाट नगरातील रहिवाशांनी गणपतीबाप्पाच्या सांगण्यानुसार काम करायला सुरुवात केली. तज्ञांचा सल्ला घेऊन सगळीकडे देशी झाडांची लागवड सुरू झाली. मनोभावे त्यांना पाणी घातले. जैविक खताचा खाऊ दिला. सूर्यप्रकाशाचा चारा दिला. थंडीवार्‍यापासून संरक्षण केले. चार-पाच वर्षांमध्ये झाडे छान फोफावली. त्यांना फुले-फळे बहरू लागली. हां हां म्हणता त्यांच्यावर पक्षी विसावू लागले, आपली घरटी बांधू लागले. त्यांच्या किलबिलाटाने सारा परिसर चैतन्यमय झाला. किडे, मुंग्या, फुलपाखरे, गुरे-ढोरे वृक्षांच्या छायेत रमू लागले. भूदेवी प्रसन्न झाली. जलदेवता खळाळून हसली. वायुदेवतेच्या फुंकरीसरशी वृक्ष तालात डोलू लागले. सूर्यदेवता स्नेह बरसू लागली. निसर्गदेवता पुन्हा एकदा आटपाटनगरावर प्रसन्न झाली होती. आटपाटनगरीचे नागरिक मनोमन आनंदले. त्यांनी एकमुखाने गणरायाचा जयजयकार केला व आपल्या संकल्प-सिद्धीसाठी नव्या जोमाने काम करू लागले.
आटपाट नगरीच्या लोकांच्या मनीचा हेतू जसा साध्य झाला, तसा तुमचा-आमचा होवो. ही साठां उत्तरांची कहाणी पांचा उत्तरी सुफल संपूर्ण.
(हा लेख मायबोली गणेशोत्सव २०१० साथी मायबोली संकेतस्थळावर पूर्वप्रकाशित) 

Tuesday, February 02, 2010

गुणसूत्रांची भेसळ थांबवा!


नमस्कार!
ह्या घडीला पर्यावरण मंत्री जयराम रमेश अमेरिकन हितसंबंध असलेल्या कॉर्पोरेशन्सना भारतातील फळभाज्यांचा राजा असलेल्या "वांग्या"च्या गुणसूत्रांत अनैसर्गिक बदल करण्याचा परवाना द्यावा अथवा नाही याबद्दल विचारविनिमय करत आहेत. येथे एका अभिनव पद्धतीने मंत्री महोदयांना भारतातील वांग्याचे रक्षण करण्याची विनंती करण्यात येत आहे : जगातील सर्वात मोठ्या पातळीवर वांग्याचे भरीत बनविण्यात येत आहे. आणि ते भरीत दिल्लीतील हजारो गरीब व भुकेल्या जनतेला वाटण्यात येणार आहे. ध्येय आहे २०,००० (वीस हजार) वांग्यांचे! तुम्ही खालील पिटिशनवर साईन (स्वाक्षरी) करून त्यांत एका वांग्याची भर टाकाल काय?
http://greenpeace.in/safefood/the-biggest-baingan-bharta-ever/
पिटिशन मध्ये लिहिले आहे : "भारताने आपल्या वांग्यांना अमेरिकन हितसंबंध असलेल्या कॉर्पोरेशन्सद्वारा प्रदूषित होऊ देऊ नये." धन्यवाद!
--- अरुंधती