Showing posts with label समाज. Show all posts
Showing posts with label समाज. Show all posts

Friday, October 25, 2013

ग्रीनवॉशिंग व ग्राहकांची जागरूकता

''आमचे उत्पादन पर्यावरणपूरक आहे.''

''आम्ही बनविलेले उत्पादन संपूर्णतः नैसर्गिक आणि पर्यावरणास कोणताही धोका न पोहोचविणारे आहे.''

अशा कित्येक जाहिराती आपल्याला टीव्ही, वर्तमानपत्रे, सोशल मीडियावर दिसत असतात. एखादे उत्पादन पर्यावरणपूरक आहे हे 'दिसल्या'वर आजच्या सुशिक्षित, सधन ग्राहकाचा त्या उत्पादनामधील रस वाढतो ही बाब उत्पादन करणार्‍या कंपन्या व जाहिरातदार नेमकी जाणून आहेत. जागतिक तापमानवाढ, पर्यावरणाची हानी, प्रदूषण इत्यादींबद्दल वाढती सतर्कता जशी ह्याला कारण आहे तशीच 'ग्रीन' किंवा 'पर्यावरणपूरक' उत्पादने खरेदी करणे हे सामाजिक प्रतिष्ठेचे समजले जाण्याची मानसिकताही त्यामागे आहे.

सध्याचा जमाना प्रसारमाध्यमांचा व सोशल मीडियाचा आहे. टीव्ही, आंतरजाल, वृत्तपत्रे इत्यादींच्या माध्यमातून आपण वर्षाकाठी हजारो जाहिरातींच्या संपर्कात येत असतो. या जाहिराती आपल्यावर अगदी बेगुमान आदळत असतात. त्यांचा अभ्यास करू जाता, गेल्या काही वर्षांमध्ये जाहिरातदार आपली उत्पादने किंवा सुविधा कशा प्रकारे पर्यावरणपूरक आहेत, पर्यावरणाला पोषक आहेत अथवा ''ग्रीन'' आहेत हे अहमहमिकेने सांगताना, मांडताना दिसतात. त्या प्रकारच्या लेबल्सने त्यांचे उत्पादन नटलेले असते. 'इको-फ्रेंडली', 'बायो-डीग्रेडेबल', 'ग्रीन', 'री-सायकल्ड', 'डॉल्फिन-फ्रेंडली', 'पर्जन्यवनांना धोका न पोचविणारे', 'नैसर्गिक', 'एनर्जी-एफिशियंट', 'फॉस्फेट-फ्री', 'अ‍ॅनिमल-फ्रेंडली', पर्यावरणपूरक उत्पादन अशी अनेक प्रकारची, तर्‍हेची लेबल्स - त्यांवरील लोगो - त्यांमागील संदेश - हे खरोखर तुम्हा-आम्हाला ती जाहिरात बघताना किंवा खरेदी करताना कळते का हो? जाहिरातीनुसार खरोखर ते उत्पादन तसे आहे की जाहिरातदार आपली दिशाभूल करत आहे हे त्यावरून कळते का?

'ग्रीनवॉशिंग' म्हणजे ढोबळपणे आपले उत्पादन प्रत्यक्षात जेवढे व जितके पर्यावरणपूरक आहे त्याच्या कितीतरी पटीने जास्त असल्याचे भासविणे असे म्हणता येईल. प्रत्यक्ष उत्पादनावर, कंपनीच्या संकेतस्थळ / माहितीपुस्तिकेत किंवा जाहिरातींमध्ये असे प्रतिपादन केलेले असते. 'ग्रीनवॉशिंग'ची ही संज्ञा व अशा प्रकारे दिशाभूल करणे हे काही नवीन नाही. ही दिशाभूल मुख्यतः जाहिराती व लेबल्सद्वारे केली जाते. जोवर ही दिशाभूल फक्त मार्केटिंग तंत्राचा एक भाग एवढ्यापुरतीच मर्यादित होती तोपर्यंत त्याकडे बर्‍याच प्रमाणात दुर्लक्ष केले गेले. परंतु ही दिशाभूल ग्राहकांच्या आरोग्यास व पर्यायाने सामाजिक आरोग्यास धोकादायक ठरू शकते हे लक्षात आल्यावर ग्राहक संघटना, वेगवेगळ्या एन.जी.ओ. व स्थानिक प्रशासकीय व्यवस्था त्यांबद्दल जागरूक होऊ लागल्या. इ.स. २००९ च्या टेराचॉईस एनव्हायर्नमेन्टल मार्केटिंग कंपनीच्या अहवालानुसार अमेरिकेत २२१९ उत्पादनांनी 'ग्रीन' असल्याचा दावा केला. त्यातील ९८% उत्पादने 'ग्रीनवॉशिंग' केलेली होती!!

एअरबस ए ३८० - अ बेटर एन्व्हायर्नमेन्ट इनसाईड अ‍ॅन्ड आऊट अशी जाहिरात


तुम्ही जेव्हा एखादे उत्पादन खरेदी करता तेव्हा त्यावर असणारी सर्व प्रकारची लेबल्स पाहून - वाचून तुम्ही ते खरेदी करता का? त्या लेबल्सचा अर्थ तुम्हाला माहीत असतो का? वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या प्रकारची लेबल्स जेव्हा आपले उत्पादन हे 'ग्रीन' आहे हे दर्शविण्यासाठी लावतात तेव्हा त्यांच्या विभिन्नतेमुळे तुमचा गोंधळ उडतो का? उदा. एखादे उत्पादन 'ऑर्गॅनिक' (सेंद्रीय) किंवा 'अ‍ॅनिमल फ्रेंडली' आहे हे वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या लेबल्सद्वारे दाखवतात. त्यावरील लोगो भिन्न असू शकतात, चित्र भिन्न असू शकते. तसेच त्या लेबलमागे कोणती अधिकृत संस्था आहे का, हेही स्पष्ट नसते. ग्राहकांचा गोंधळ हा कित्येकदा ह्यामुळे होतो. जरा विचार करा, त्या उत्पादनावर जर अशा तर्‍हेचे लेबल असेल किंवा 'आमचे उत्पादन हे पर्यावरणपूरक आहे' असे निराळे व ठळक छपाईत लिहिलेले असेल तर त्यामुळे ते उत्पादन विकत घेणे किंवा न घेणे ह्याबद्दल तुमच्या निर्णयावर काही प्रभाव, फरक पडतो का?



अनेक कंपन्यांच्या संकेतस्थळांवर त्यांची उत्पादने 'इको-फ्रेंडली' असल्याचे दावे केलेले आढळतात. परंतु नक्की कोणत्या प्रकारे ते उत्पादन इको-फ्रेंडली आहे, त्याचा पुरावा किंवा त्याबद्दलची सविस्तर माहिती यांबद्दल तिथे जास्त काही लिहिलेले नसते. काही आंतरराष्ट्रीय ब्रँड्सच्या कंपन्यांच्या संकेतस्थळांवर त्या कंपन्यांनी आपल्या उत्पादनाचे किंवा आपली कंपनी करत असलेल्या कामासंबंधीचे पर्यावरण अहवाल दिलेले असतात. रकानेच्या रकाने भरून माहिती असते. परंतु नक्की कोणत्या ठिकाणाची माहिती आहे, किती क्षेत्रफळातील जमीन/स्रोत/उद्योगाची माहिती आहे, इतर कोणत्या उपाययोजना केल्या आहेत, किती प्रमाणात त्या राबविल्या आहेत, कधीपासून व कशा प्रकारे राबविल्या आहेत - या सर्व तपशिलांची बर्‍याचवेळा वानवा असते. कंपनीचे कारखाने अनेक ठिकाणी असतील आणि त्यातील एखाद्या ठिकाणचा अहवालच जर सादर केला असेल तर मग त्या अहवालानुसार कंपनीच्या प्रॅक्टिसेस पर्यावरणपूरक म्हणता येतात का? हे अहवाल कित्येकदा कंपनीनेच प्रायोजित केलेले असतात. म्हणजे कोणा तटस्थ किंवा त्रयस्थ, मान्यताप्राप्त, अधिकृत संस्थेद्वारा ही तपासणी झालेलीच नसते. कंपनीने नेमलेल्या एखाद्या सल्लागार संस्थेने दिलेला अहवाल असतो तो! मग असा अहवाल कितपत ग्राह्य धरायचा?

भारतासकट बर्‍याच देशांमध्ये एखाद्या उत्पादनाच्या किंवा सुविधेच्या पर्यावरणावर होणार्‍या परिणामांसंबंधी दिशाभूल करणार्‍या जाहिरातींची रेलचेल दिसून येते. भारतातले एक उदाहरण म्हणजे व्हर्लपूल क्विक चिल रेफ्रिजरेटरची जुनी जाहिरात! ह्या जाहिरातीत कंपनीने म्हटले होते की अन्य कंपन्यांच्या सर्वसामान्य रेफ्रिजरेटरमध्ये वापरला जाणारा पर्यावरणास धोकादायक गॅस न वापरता या उत्पादनात पर्यावरणपूरक गॅस वापरला गेला आहे. ही जाहिरात ठिकठिकाणी झळकली. प्रत्यक्षात तो गॅस पर्यावरणास पूरक नसून हानी पोहोचविणाराच होता. परंतु कंपनीने बिनबोभाटपणे अशी जाहिरात करून ग्राहकांची दिशाभूल केली. नंतर त्यांना ती जाहिरात योग्य कारवाईमुळे मागे घ्यावी लागली. हे एक उदाहरण... पण अशी कैक उदाहरणे ह्या क्षेत्रातले तज्ज्ञ लोक देतात. या उदाहरणांमध्ये फक्त खासगी संस्थाच नव्हे तर कित्येकदा सरकारी किंवा निम्न सरकारी कंपन्याही दिशाभूल करणार्‍या जाहिराती, लेबल्सद्वारे ग्राहकांची फसवणूक करण्यास हातभार लावत असतात.

ग्रीनवॉशिंगची ७ पातके!

[द सेव्हन सिन्स ऑफ ग्रीनवॉशिंग]

१. उत्पादनामुळे होणारी हानी लपविण्याचे पातक

एखादे उत्पादन 'ग्रीन' आहे हे महत्त्वाच्या पर्यावरणासंबंधी निकषांकडे दुर्लक्ष करून अतिशय त्रोटक किंवा मर्यादित बाबींवरून ठरविणे. (उदा. पर्यावरणपूरक अशा (शाश्वत / सस्टेनेबल) जंगलातील वृक्षांपासून बनविलेला कागद : हा कागद बनविताना निर्माण झालेले प्रदूषण किंवा खर्च झालेली अतिरिक्त ऊर्जा यांबद्दल सांगण्याची टाळाटाळ व ते उत्पादन 'ग्रीन' आहे अशी जाहिरात.)

२. पुरावा नसण्याचे पातक

आपले उत्पादन 'ग्रीन' असण्याचा दावा त्यासंबंधी कोणताही पुरावा न देता करणे. तशी माहिती किंवा त्रयस्थ, तटस्थ संस्थेचे तसे प्रशस्तिपत्रक सादर न करणे.

३. मोघमपणाचे पातक

उत्पादनाची जाहिरात करताना मोघम शब्द वापरणे. त्या संज्ञेचा अभिप्रेत अर्थ विशद न करणे. जसे, 'ऑल नॅचरल'. आता ऑल नॅचरल या संज्ञेचा कंपनीला अभिप्रेत असणारा अर्थ व ग्राहकाला अभिप्रेत असणारा अर्थ यांच्यात तफावत असते व असू शकते. त्या तफावतीचा गैरफायदा घेऊन आपल्या उत्पादनाबद्दल ग्राहकांची दिशाभूल करणे.

४. अप्रासंगिक किंवा संबंध नसलेली जाहिरात करण्याचे पातक

येथे कंपनीने उत्पादनावर किंवा जाहिरातीत केलेला दावा जरी बरोबर असला तरी त्याचा पर्यावरणाविषयी जागरूक ग्राहकांना काही उपयोग नसतो. [उदा. एखादे उत्पादन विकत घेऊन तुम्ही डॉल्फिन्सचे संरक्षण / जतन करण्यास हातभार लावत आहात असा दावा करणे. त्या निकषावर ते उत्पादन पर्यावरणपूरक आहे असे भासविणे.]

५. धोकादायक बाबींपेक्षा कमी धोका असणार्‍या बाबींची जाहिरात करण्याचे पातक

'लेसर ऑफ द टू एव्हिल्स' असे ज्याला म्हणता येईल, अशा प्रकारे एखाद्या उत्पादनापासून जर पर्यावरण किंवा आरोग्याला जो धोका सर्वात मोठ्या प्रमाणात असेल त्याबद्दल न बोलता त्या उत्पादनामुळे आरोग्याला / पर्यावरणाला कमी धोका असणार्‍या बाबीसंबंधी बोलणे व ग्राहकाची दिशाभूल करणे. [उदा. ऑर्गॅनिक सिगारेट्स, किंवा पॅकबंद पाण्याची 'नैसर्गिक स्रोतांतून / हिमनगातून आलेले शुद्ध पाणी' अशी जाहिरात.]

६. खोटे दावे करण्याचे पातक

आपल्या उत्पादनाबद्दल पर्यावरणासंबंधी खोटे दावे करणे. [उदा. प्रत्यक्षात आपले उत्पादन 'एनर्जी एफिशियन्ट' इ. नसताना जाहिरातीत किंवा उत्पादनावर तसे, तत्सम शब्द वापरणे.]

७. खोट्या शिक्क्यांचे पातक

ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी आपल्या उत्पादनावर ते उत्पादन 'ग्रीन' असण्याचे खोटे शिक्के / लेबल्स लावणे. [उदा. 'इको-प्रेफर्ड' उत्पादनाचा दावा करून खोटे शिक्के/लेबल्स लावून ते उत्पादन पर्यावरणपूरक असल्याचे भासविणे.]

उत्पादनांवर छापले जाणारे शिक्के किंवा लेबल्स नक्की काय सांगतात, काय दर्शवितात, त्यांच्या मागे कोणती / कोणत्या अधिकृत संस्था आहेत, त्या संस्था मान्यताप्राप्त व तटस्थ - खात्रीलायक आहेत का, हे सर्व ग्राहकांना समजणे व त्यांनी त्याबद्दल जागरूक राहणे हे आवश्यक आहे. अन्यथा अशी लेबल्स ग्राहकांची दिशाभूल करतात किंवा त्यांना गोंधळात टाकतात.

त्यासाठी कोणत्याही उत्पादनावरील 'इको-लेबल्स' असतात त्यांची खात्री करून घेणे हे ग्राहकास शक्य असणे जरुरीचे आहे. त्यासाठी आवश्यक माहिती, चित्रे इत्यादी हे पर्यावरणपूरक उत्पादनासंबंधी संकेतस्थळांवर, पुस्तिकांद्वारा प्रकाशित होणे एक महत्त्वाचे पाऊल ठरेल. तसेच ज्या संस्थांद्वारे अशी लेबल्स मान्य केली जातात त्या संस्थांची व त्यांच्या कार्याची पारदर्शकता ग्राहकांपुढे येणे आवश्यक आहे. त्या संस्थांना किंवा संस्थाचालकांना कोणत्याही उत्पादनाच्या विक्रीतून निधी मिळतो, किंवा अन्य कोणत्याही प्रकारचा फायदा होतो, असे असता कामा नये. तसेच ग्राहकांना, पर्यावरण-संरक्षण करणार्‍या कार्यकर्त्यांना, उद्योगांना व समाजधुरीणांना विचारून, त्यांची मते व प्रतिसाद विचारात घेऊन पर्यावरणासंबंधी प्रशस्तिपत्रके बनविली जाणे आवश्यक आहे.
सर्व ग्रीन लेबल्स चे प्रमाणीकरण होणे, त्यांच्यात एकवाक्यता येणे, त्यांबद्दल सार्वत्रिक जागरूकता वाढणे हेही महत्त्वाचे आहे.

भारतात अ‍ॅडव्हर्टायझिंग कौन्सिल ऑफ इंडिया सारख्या संस्था कार्यरत आहेत व त्या दिशाभूल करणार्‍या जाहिरातींवर नजर ठेवून असतात, तसेच चुकीच्या जाहिरातींवर यथायोग्य कारवाई होण्यासाठी प्रयत्न करत असतात. परंतु कित्येकदा संपूर्ण कारवाई पार पडेस्तोवर हजारो, लाखो ग्राहकांची दिशाभूल होण्याची शक्यता जास्त असते. तसेच संबंधित कंपन्या आपली दिशाभूल करणारी जाहिरात फक्त मागे घेतात व त्या ऐवजी दुसरी जाहिरात दाखवितात. परंतु आपण अगोदर दिशाभूल करणारी जाहिरात केली हे त्या कंपन्या ग्राहकांसमोर मान्य करत नाहीत.

अनेकदा अशा तर्‍हेचे ग्रीनवॉशिंग करणार्‍या कंपन्यांमुळे फक्त ग्राहकांना व पर्यावरणालाच फटका बसत नाही, तर ज्या कंपन्या खरोखरी पर्यावरणपूरक उत्पादने किंवा सुविधा देतात त्यांच्याकडेही संशयाने बघितले जाते. प्रगत देशांमधील ग्राहकांमध्ये 'ग्रीन' उत्पादनांबद्दल वाढता अविश्वास, ज्याला 'ग्रीन फटीग(थकवा)' म्हणून संबोधिले जाते, रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यावर विचारमंथन करताना तज्ज्ञांनी काही गोष्टी मांडल्या. त्यात ग्राहक व जाहिरात करणार्‍या एजन्सीज, मार्केटिंग करणार्‍या एजन्सीज यांच्यात पर्यावरणपूरकता म्हणजे नक्की काय याबद्दल साक्षरता / जागरूकता निर्माण करणे हा एक उपाय होता.

पर्यावरणपूरक उत्पादने ही स्थलकालसापेक्ष असतात. उदा. एखाद्या ठिकाणी पाण्याची मुबलकता असेल तर तिथे 'धुवून पुन्हा वापरता येण्यासारखे बाळांचे कापडी लंगोट' हे पर्यावरणाला आव्हान देत नाहीत. पण जिथे पाण्याचे दुर्भिक्ष्य असेल तिथे पाण्याची मागणी वाढविणार्‍या, पाण्याच्या स्रोतांवर ताण आणणार्‍या लंगोटांची जाहिरात करणे हे पर्यावरणदृष्ट्या जबाबदारीचे ठरणार नाही.

एखादे उत्पादन पर्यावरणपूरक आहे किंवा नाही हे ठरविणे जसे मान्यताप्राप्त अधिकृत संस्थांचे काम आहे तसेच आपल्या उत्पादनाबद्दल खरी व तपशीलवार माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचविणे हे त्या उत्पादन करणाऱ्या कंपनीचे काम आहे. त्यात ते उत्पादन/ वस्तू बनविताना खर्च होणारे नैसर्गिक स्रोत, ऊर्जा, त्या उत्पादनाची प्रक्रिया, वापरले जाणारे घटक, कचर्‍याची विल्हेवाट, औद्योगिक कचर्‍याचे निर्मूलन, त्या उत्पादनाची चाचणी घेताना ती कशी घेतली गेली, उत्पादनाची वाहतूक, आवरण, ज्या ठिकाणी उत्पादन बनविले जाते त्या ठिकाणच्या नैसर्गिक पर्यावरणाच्या जतनाची जबाबदारी इत्यादी अनेक गोष्टींचा समावेश होतो. ही सर्व माहिती ग्राहकांची दिशाभूल करणारी नसावी, खरीखुरी असावी. तसेच मान्यताप्राप्त त्रयस्थ, अधिकृत संस्थेने नियमाने तपासणी करून ही माहिती खरी असल्याचे मान्य केलेले असावे. तसेच ठराविक काळाने उत्पादनांची व अन्य बाबींची पर्यावरणपूरकतेच्या बदलत्या निकषांनुसार पुनर्तपासणी होणेही आवश्यक आहे.

आपण कोणतेही उत्पादन 'ग्रीन' असल्याच्या निकषावर जेव्हा खरेदी करतो तेव्हा एक ग्राहक म्हणून त्या उत्पादनाच्या पर्यावरणपूरकतेची खात्री करून घेणे ही आपलीही एक महत्त्वाची जबाबदारी ठरते.

* वरील लेख हा फक्त माहिती मिळावी व जागरूकता निर्माण व्हावी - वाढावी ह्या उद्देशातून लिहिलेला आहे.

संदर्भ :

१] सेंटर फॉर सस्टेनेबल प्रॉडक्शन अ‍ॅन्ड कन्झम्प्शन चे संकेतस्थळ : http://www.cuts-international.org/

२] इको-लेबल्स

३] रिचर्ड दाल यांचा 'एनव्हायर्नमेन्टल हेल्थ पर्स्पेक्टीव्ह' अंकातील ग्रीनवॉशिंग संदर्भातील जून २०१० मध्ये प्रसिद्ध झालेला लेख. http://ehp.niehs.nih.gov/118-a246/

* छायाचित्र विकीपीडियावरून साभार

Saturday, March 09, 2013

पडद्याआडचे संगीत


कितीतरी वर्षे समाजात संगीत हे फक्त पुरुषांची मक्तेदारी होते. स्त्रियांना घरगुती, कौटुंबिक किंवा विशेष प्रसंगांना गाण्याची परवानगी असे. परंतु सामाजिक पातळीवर गाण्याचा व्यवसाय किंवा गायनाचे कार्यक्रम करताना स्त्रिया क्वचितच दिसत. व्यावसायिक पातळीवर गायन करण्याचे काम असे गणिका व नट्यांचे! सर्वसामान्य घरांमधील स्त्रियांना पोटापाण्यासाठी गायन करण्यास बंदी होती असेच म्हणावे लागेल.

युरोपमध्येही फार काही वेगळे चित्र नव्हते. सोळाव्या व सतराव्या शतकांत येथे ज्या ज्या गायिका होऊन गेल्या त्या गणिका, नट्या, राजदरबारातील कलावंत किंवा नन्स असायच्या. मध्ययुगातील नन्स ह्या चर्चमध्ये लोकांच्या नजरेआड पडद्यामागून आपले गायन सादर करायच्या. या नन्स मध्यमवर्गीय व उच्चमध्यमवर्गीय घरांमधून आलेल्या असत. त्यांना कॉन्व्हेन्ट मध्ये ठेवणे हा त्यांचे लग्न करून देण्यापेक्षा स्वस्त असा पर्याय, म्हणून अनेक कुटुंबे हा पर्याय निवडत असत. या स्त्रियांच्या सांगीतिक प्रवासावर डेबोरा रॉबर्ट आणि लॉरी स्ट्रास या दोघी गेली २० वर्षे संशोधन करत आहेत. त्यांच्या गाण्यातील मतितार्थ, रचनांचा अभ्यास करत आहेत. इ.स. २००२ मध्ये त्यांनी स्त्रियांचा 'सेलेस्टियल सायरेन्स' (Celestial Sirens) नामक समूह-गानवृंद स्थापन केला असून या स्त्रिया मध्ययुगीन आधुनिक स्त्रियांची आठवण म्हणून नन्सचा पोशाख करून आपला कार्यक्रम सादर करतात.

गंमत म्हणजे याच काळात राजदरबारातील स्त्री गायिकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत होती. काही वेळा राजे-सरदार या गायिकांचे गाणे फक्त खासगी कार्यक्रमात निवडक श्रोत्यांसाठीच ठेवत असल्याच्या नोंदी इतिहासात आढळतात. त्याचे कारण आपल्याकडील स्त्री कलावंतांची कीर्ती बाहेर जाऊ नये म्हणून! परंतु त्यांच्या प्रयत्नांना मर्यादित यश आल्याचेही इतिहास सांगतो व त्याचा परिणाम म्हणून कालांतराने स्त्री गायिकांच्या संख्येत भर पडत गेली असेही नोंदवितो.  



म्युझिका सेक्रेटा चे संकेतस्थळ - http://musicasecreta.com/

संदर्भ व आभार - बेरुम्बाऊड्रम.ऑर्ग

Sunday, November 11, 2012

माणूस की पशू?


उषःकालीन आरक्त आकाशापासून ते सायंकालीन आरक्तवर्णी आकाशाच्या प्रवासात नंतर टप्पा येतो तो रात्रकालीन कृष्णवर्णीय आकाशाचा! ज्या सहजतेने रात्रीच्या त्या कृष्णवर्णाला आपण स्वीकारतो तितक्या सहजतेने आपल्या आयुष्यात आपण कृष्णवर्णाला स्वीकारतो का? काळ्या सावल्या, काळा प्रहर, काळे पाणी, काळे विचार .... आपल्या संकल्पनांमध्येही काळ्या रंगाचं व भय, संकट, दुष्टता, निराशा, हीनता यांचं एक नातं बनलेलं दिसतं. आणि माणसाच्या कातडीचा कृष्ण वर्ण? तिथेही काळ्या वर्णाचा पूर्वग्रह आड येताना दिसतो. तीच गोष्ट खुजेपणाच्या बाबतीत. बुटकेपणाभोवती कुचेष्टा, व्यंगात्मक दृष्टीकोन, दोष यांचं तयार केलेलं वलय तर दिसतंच; शिवाय बुटक्या लोकांना एखाद्या पशूप्रमाणे वागविण्याचे प्रकारही कमी नाहीत.

आफ्रिकेतील पिग्मी लोकांना आपल्या कृष्णवर्णामुळे व बुटकेपणामुळे व त्या जोडीला त्यांच्या वन्य  जीवनशैलीमुळे आजवर अनेक अग्निदिव्यांना सामोरे जावे लागले आहे. त्यातले अतिशय मानहानीकारक असे सत्र म्हणून ज्याला संबोधिता येईल ते म्हणजे त्यांचे पाश्चात्य जगात एखाद्या जंगली श्वापदाप्रमाणे केले गेलेले प्रदर्शन! 'पशू व मानव यांमधील आतापर्यंत अज्ञात असलेला दुवा! पशूची मनुष्यावस्थेत उत्क्रांती होत असतानाची आदिम अवस्था!' अशा प्रकारे त्यांची जाहिरात करून त्यांचे ''वैज्ञानिक'' प्रदर्शनात मांडले जाणे व लोकांनी सर्कशीतल्या जनावरांप्रमाणे त्यांच्याशी केलेले वर्तन यांतून मानवी स्वभावाचे विचित्र पैलू समोर येत जातात.

हा काळ होता वसाहतवाद्यांनी नवनव्या भूमी पादाक्रांत करून तेथील स्थानिक लोकांना आपले गुलाम करून घेण्याचा! त्यांच्या जमीनी, नैसर्गिक स्रोत, धन लुटून त्यांच्यावर राज्य करण्याचा, आणि त्यांना आपल्याच भूमीत आश्रित बनविण्याचा. याच काळात घडते ओटा बेंगाची कथा.  


वनातील, निसर्गाच्या कृपेवर अवलंबून असणारे, पशुपक्ष्यांच्या मुक्त सान्निध्यातील स्वतंत्र आयुष्य गुलामीसोबत बरखास्त झाल्यावर गुलामीत जीवन कंठायचे, गुलामीतल्या अत्याचारांपोटी हालअपेष्टा सोसत प्राण गमवायचे की निर्जीव इमारतींच्या जाळ्यात वेढलेल्या व मनुष्यांच्या दयेवर जगणार्‍या संग्रहालयातील पशूंसोबतचे बंदिस्त आयुष्य कंठायचे? प्रगत म्हणवून घेणार्‍या माणसाचे जंगली रूप अनुभवायचे? दोन्ही प्रकारांमध्ये आत्मसन्मानाची होणारी होरपळ, शोषण, निर्बंध, चिरडले जाणे हे तनामनांवर कायमचे ओरखडे ओढणारे....!! आफ्रिकेतील कांगो खोर्‍यातल्या एका वन्य जमातीचा भाग असणार्‍या ओटा बेंगा या पिग्मी तरुणासमोर जेव्हा आपल्या देशात राहून गुलामगिरीत आयुष्य काढायचे की देशाबाहेर जाऊन वेगळे आयुष्य शोधायचे हे पर्याय उभे ठाकले तेव्हा त्याला आपल्यासमोर काय वाढून ठेवलं आहे याची कल्पनाही नसेल! शिकारीसाठी आपल्या टोळीपासून लांब गेलेला ओटा बेंगा जेव्हा शिकारीहून परतला तेव्हा त्याला आपल्या कुटुंबातील सर्व लोक तेव्हा कांगो खोर्‍यावर राज्य करणार्‍या बेल्जियमच्या किंग लिओपल्डच्या सैन्याकरवी मारले गेलेत असे कळले. पुढे त्याला गुलाम म्हणून पकडण्यात व विकण्यात आले.

ओटा बेंगा

इ.स. १९०४ मध्ये सॅम्युएल वर्नर नावाचा एक मिशनरी व व्यवसायाने व्यापारी असलेल्या माणसाची ओटा बेंगाशी गाठ पडली. वर्नरची नियुक्ती सेंट लुईस वर्ल्ड फेअर या अमेरिकेतील प्रदर्शनात पाश्चात्य जगापुढे पिग्मी लोकांचे नमुने मांडता यावेत म्हणून त्यांना गोळा करून आणण्यात झाली होती. मानवी उत्क्रांतीच्या इतिहासातील टप्प्यांमध्ये जगातून गोळा केलेल्या विविध प्रांतांतील एस्किमो, अमेरिकन इंडियन्स, फिलिपिनो यांसारख्या आदिम जमातींच्या लोकांसोबत पिग्मींचेही प्रदर्शन करता यावे हा त्यामागील उद्देश होता. वर्नरने कपड्यांचा एक तागा व एक पौंड मीठाच्या बदल्यात ओटा बेंगाला गुलामांच्या बाजारातून खरेदी केले. वर्नरसोबत प्रवास करत आपल्या गावी पोचेपर्यंत ओटा बेंगाला वर्नरच्या चांगुलपणाची खात्री पटली होती. कारण वर्नरने त्याला गुलामगिरीच्या खाईतून, मृत्यूच्या शक्यतेपासून वाचवले होते. ओटाच्या गावातल्या आणखी काही तरुणांना ''प्रदर्शनात'' सहभागी होण्यासाठी वर्नरने व ओटा बेंगाने राजी केल्यावर ते सगळे अमेरिकेतील मिसुरी राज्यातील सेंट लुईस वर्ल्ड फेअरसाठी रवाना झाले.

बांबुटी नामक आदिवासी जमातीतील ओटा बेंगाच्या या कहाणीत असं विशेष काय आहे? असं काय खास होतं त्या तरुणात ज्यामुळे अमेरिकेसारख्या प्रगत, आधुनिक देशाने त्याची दखल घ्यावी? तर ते होतं त्याचं ''आदिम'' असणं! डार्विनच्या सिद्धांतानुसार मनुष्य हे माकडाचं उत्क्रांत स्वरूप! मग माणूस आणि माकड यांच्यादरम्यानची जी अवस्था होती ती कशी असेल याचं उत्तरच जणू तेव्हाच्या काही मानववंशशास्त्राच्या अभ्यासकांना ओटा बेंगाच्या स्वरूपात मिळालं! तो काळ होता 'सोशल डार्विनिझम'चा! विसाव्या शतकात पदार्पण केलेल्या व स्वतःला  बुद्धीवादी, विज्ञाननिष्ठ व प्रगत समजणार्‍या समाजाने विज्ञानाचा डंका पिटत आपले वर्चस्व सिद्ध करण्याचा! आपला वंश किंवा आपली जमात जगातील इतर वंशांच्या तुलनेत कशी सर्वश्रेष्ठ आहे, सभ्य - सुसंस्कृत आहे हे दाखवून देण्याचा! त्यासाठी पाश्चात्य जगातील वेगवेगळ्या शहरांमध्ये खुली 'वैज्ञानिक' प्रदर्शने भरवली जात. त्यांमधून जगाच्या कानाकोपर्‍यांतून पकडून आणलेल्या, गुलामीत विकल्या गेलेल्या ''आदिम'' जमातींतील माणसांचे प्रदर्शन भरवत असत. या आदिवासी लोकांना त्यांच्या पारंपारिक वेशभूषा घालायला लावून त्यांचे युरोपियन किंवा आधुनिक वेशातील स्त्री-पुरुषांसोबत प्रदर्शन असे. यात पद्धतशीरपणे हे आदिम लोक कसे अप्रगत आहेत, रानटी आहेत, पशुतुल्य आहेत, अनीतिवान आहेत, हीन आहेत, अस्वच्छ आहेत हे प्रेक्षकांच्या मनावर ठसवले जात असे. आणि त्यातूनच ''आपण यांच्यापेक्षा कसे श्रेष्ठ आहोत, वरचढ आहोत'' हा दुरभिमान आपोआप लोकांच्या मनात जागृत होत असे!


आदिम लोकांच्या बसण्या-उठण्याच्या पद्धती, आचार हे किती अप्रगत आहेत, त्यातून त्यांना आपल्यापेक्षा कमी बुद्धी असल्याचे कसे सिद्ध होते हे ठळक केले जाई. ही प्रदर्शने मोठ्या प्रमाणांवर आयोजित होत. अगदी मोठमोठ्या संग्रहालयांतून, शहरांतून, जत्रांमधून! त्या प्रदर्शनाच्या मालकांना किंवा आयोजकांना लोकांनी भरलेल्या वर्गणीतून उत्पन्न तर मिळेच, शिवाय मानवजातीला आपल्या संशोधनामुळे व उपक्रमामुळे किती फायदा होत आहे याचे महान समाधान त्यांना प्राप्त होत असे! या कार्यक्रमांना लोकांची प्रचंड गर्दी उसळत असे. कित्येकदा गर्दीला आटोक्यात ठेवण्यासाठी खास सुरक्षा तैनात करायचा प्रसंग येई अशी गर्दी या कार्यक्रमांना उसळत असे. आणि त्यात प्रदर्शन केल्या जाणार्‍या आदिम लोकांना सर्कशीतील जनावरांप्रमाणे बघ्या लोकांच्या नजरा सहन करायला लागणे, त्यांनी हात लावून चाचपून बघणे, हेटाळणी, कोणी अंगावर थुंकणे, कुचेष्टा, चिखलफेक यासारख्या अवमानजनक गोष्टींना सामोरे जावे लागे. एखाद्या धनिकाने स्वतःचे पदरी जगातील वेगवेगळ्या प्राण्यांचा संग्रह करावा तसे काही मोजके धनिक या गुलामांचा संग्रह करून त्यांचे प्रदर्शन भरवत असत, त्यातून प्रसिद्धी मिळवत असत व विज्ञानाचे सिद्धांत सिद्ध करायला आपण कसे तत्पर आहोत याबद्दलचा मानमरातब मिळवण्यातही ते कमी नसत.

स्टुटगार्ट येथील ''पीपल्स शो'' ची जाहिरात 
डार्विनच्या सिद्धांतातील मोजक्या वाक्यांना उचलून व त्या वाक्यांचा विपरीत अर्थ लावून आपले सामाजिक व वांशिक वर्चस्व सिद्ध करण्याची अहमहमिका तेव्हाच्या पाश्चात्य जगात लागली असल्याचे दिसून येते. पुढे याच वांशिक वर्चस्वाच्या संकल्पनेतून नाझीवादाचा उदय झालेला दिसतो. (संदर्भ : ब्राँक्स पशुसंग्रहालयाचे संस्थापक व वर्णद्वेषी असणार्‍या मॅडिसन ग्रँट यांना त्यांनी लिहिलेले पुस्तक आपले ''बायबल'' असण्याचे सांगणार्‍या व त्यांच्या कार्याची प्रशंसा करणार्‍या, खाली 'अ‍ॅडॉल्फ हिटलर' अशी सही असलेल्या पत्राची सॅम्युएल वर्नर यांचा नातू फिलिप्स ब्रॅडफोर्ड याने सांगितलेली आठवण)

 




आदिम लोकांची मानवी ''वैज्ञानिक'' प्रदर्शने

ओटा बेंगाच्या अगोदरही आफ्रिकेतून आणलेल्या गुलाम तरुण, तरुणींना प्रदर्शनांत मांडले जाई. प्रदर्शनात त्यांना पाहायला येणारे पाश्चात्य लोक त्यांच्या अंगाला हात लावून त्यांची चाचपणी करत. सारा बार्टमन उर्फ हॉट्टेन्टॉट व्हीनस या आफ्रिकन गुलाम तरुणीला अशा तर्‍हेच्या अत्यंत अवमानजनक प्रदर्शनांमधून जावे लागल्याची नोंद आढळते. प्रदर्शनाला येणार्‍या 'सभ्य' बायका तिचा स्कर्ट उचलून तिच्या अवयवांची पडताळणी करत असल्याचीही नोंद आढळते.

पकडून आणलेल्या गुलामांची स्थिती

ज्या ज्या गुलामांना प्रदर्शनासाठी किंवा वैज्ञानिक सिद्धांतांच्या नावाखाली पकडून आणले गेले त्यांची स्थिती 'इकडे आड तिकडे विहीर' अशी होती हे इथे नमूद करणे महत्त्वाचे वाटते. मायदेशी गुलामीत, पकडलेल्या अवस्थेत, अवमानित, बंदिस्त, अतीव कष्टांचं आणि अनिश्चित आयुष्य जगावं की नियतीवर भविष्याचा हवाला ठेवून परक्या देशात, परक्या संस्कृतीत व परक्या माणसांमध्ये तुलनेने कमी कष्टाचं परंतु अवमानित, पशुतुल्य जीणं जगावं?

सेंट लुईस फेअर मध्ये ओटा बेंगा

सॅम्युएल वर्नर मलेरियामुळे आजारी पडल्यावर ओटा बेंगा व त्याच्याबरोबरच्या तरुणांना वर्नरशिवायच सेंट लुईस फेअरमध्ये सामील व्हावे लागले. नंतर जेव्हा वर्नर तिथे पोचला तेव्हा त्याच्या लक्षात आले की या पिग्मी तरुणांना प्रदर्शनातील आदिमतेचा नमुना म्हणून लोकांसमोर येण्याबरोबरच कैद्यासारखे आयुष्य जगण्याची वेळ आली होती. लोकांची गर्दी त्यांना थोडाही वेळ एकटे सोडत नसे. एका अमेरिकन वृत्तपत्राने ओटा बेंगाची प्रसिद्धी ''अमेरिकेतील एकमेव नरभक्षक आफ्रिकन'' अशी तर केलीच, शिवाय आपले मगरीसारखे दात दाखवण्याबद्दल तो लोकांकडून प्रत्येकी पाच सेंट्स घेत असे, ते पुरेपूर वसूल होत असल्याचे वृत्त दिले. तोवर ओटा बेंगा व त्याच्याबरोबरचे आफ्रिकन पिग्मी हे रानटी, जंगली पशुतुल्य लोक असल्याची जनसामान्यांची खात्री झाली होती.

सेंट लुईस फेअर मध्ये ओटा बेंगा व साथीदार

सेंट लुईस फेअरवरून ओटा बेंगा व त्याच्याबरोबरच्या तरुणांना न्यू ऑर्लिन्सला नेण्यात आले. तिथून ते आफ्रिकेत परतले. पण आफ्रिकेतील ओटा बेंगाचे कुटुंब नष्ट झाल्यामुळे व तेथील गुलामगिरीमुळे ओटाला आता तिथे थांबण्यात रस नव्हता. आधीच्या आयुष्यात तो रुळू शकत नव्हता. मग तो १९०६ मध्ये सॅम्युएल वर्नर सोबत पुन्हा अमेरिकेत परतला आणि इतिहासातील एका अतिशय शरम आणणार्‍या घटनापर्वाची सुरुवात झाली.

वर्नरने ओटा बेंगाची सोय अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री येथे केली, कारण अन्य कोणी या पिग्मी तरुणाला ठेवून घेण्यात उत्सुक नव्हते. सॅम्युएल वर्नर स्वतः आर्थिक अडचणीत आल्यामुळे तो तिथून दुसर्‍या ठिकाणी स्वतःच्या पोटापाण्याची सोय बघायला निघून गेला. म्युझियममध्ये ओटाला करण्यासारखे काहीच नव्हते. तिथे येणार्‍या प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यापलीकडे त्याला काहीच उद्योग नव्हता. लोक त्याला त्याचे दात दाखवायला सांगत. तोही अत्यल्प पैशांच्या बदल्यात त्यांना आपले दात दाखवत असे. पण लवकरच तो त्या जिण्याला कंटाळला व विचित्र तर्‍हेने वागू लागला. त्याने तिथे त्याला बघायला आलेल्या एका महिलेच्या रोखाने खुर्ची फेकल्याचे सांगण्यात येते. तिथून त्याची हकालपट्टी झाली. मग तिथून ओटा बेंगाची रवानगी न्यू यॉर्क येथील ब्राँक्स पशूसंग्रहालयात करण्यात आली.

ब्राँक्स पशूसंग्रहालयात ओटा बेंगा 

ब्राँक्स पशुसंग्रहालयाने केलेल्या जाहिरातीतील ओटा बेंगाचे छायाचित्र


''द आफ्रिकन पिग्मी 'ओटा बेंगा',
वय २३ वर्षे, उंची ४ फूट ११ इंच
वजन १०३ पौंड्स,
दक्षिण मध्य आफ्रिकेच्या कांगो राज्यातून कसाई नदीच्या भागातून डॉ. सॅम्युएल पी. वर्नर यांचेद्वारा आणला गेला आहे.''

ब्राँक्स पशुसंग्रहालयातील प्रदर्शनात ओटा बेंगाच्या पिंजर्‍यापुढे लावलेली ही पाटी. आफ्रिकेच्या जंगलातून आलेल्या या कृष्णवर्णाच्या, बुटक्या, मगरीसारखे दात असलेल्या तरुणाची जाहिरात माणूस व माकडाच्या उत्क्रांतीमधील दुवा म्हणून अगोदरच झाली होती. पशूसंग्रहालयात ओटाच्या कडेवर कधी मुद्दाम एक ओरांगउटान माकड दिलेले असे. माकडासोबतचे खेळतानाचे, कुस्ती करतानाचे त्याचे फोटो तत्कालीन वृत्तपत्रांनी मोठ्या चढाओढीने प्रसिद्ध केले होते. ब्राँक्स पशूसंग्रहालयात ओटा बेंगाला ज्या पिंजर्‍यात ठेवले होते तिथे जंगलाचा 'इफेक्ट' येण्यासाठी माकडासोबत एका पोपटाला देखील ठेवले होते. त्याच जोडीला आजूबाजूला हाडे विखरून ठेवण्यात आली होती. अनवाणी पायांनी वावरणार्‍या ओटाला जेव्हा पायात घालण्यासाठी बूट देण्यात आले तेव्हा त्यांच्याकडे एकटक बघणार्‍या ओटाला पाहून प्रेक्षकांमध्ये हास्याचे फवारे उसळल्याचे सांगण्यात येते. त्याच्याकडे बोट दाखवून मोठमोठ्याने हसत ते ओटाच्या 'जंगली' वागण्याची चर्चा करत. त्यात ओटा कधी चित्रविचित्र भावमुद्रा घेऊन त्यांचे मनोरंजन करत असे. आफ्रिकेच्या जंगलात वाढलेला ओटा बेंगा धनुष्यबाणाने लक्ष्याचा वेध घेण्यात पटाईत होता. जंगली वेलींच्या सहाय्याने विणकाम करण्यातही तो प्रवीण होता. त्याच्या जमातीतील इतर लोकांप्रमाणे त्याने आपल्या दातांना मगरीच्या दातांप्रमाणे कोरून घेतले होते. या सर्वाची प्रेक्षकांना खूप नवलाई वाटत होती. मनोरंजनाबरोबरच आफ्रिकेतून आणलेल्या या 'पशुवत्' माणसाच्या जंगलीपणाविषयी व अप्रगतपणाविषयी त्यांच्या मनात खात्री होत होती.

परंतु लवकरच अमेरिकेतील कृष्णवर्णीय चर्च मिशनर्‍यांच्या निषेधामुळे ओटा बेंगाच्या या प्रदर्शनाला टाळे लागले. मिशनर्‍यांचा निषेध हा एका आफ्रिकन कृष्णवर्णीय माणसाला माकड आणि मनुष्य यांच्यामधील दुवा म्हणून त्याचे अवमानजनक प्रदर्शन करण्याबद्दल तर होताच, शिवाय त्यामागे आणखी एक कारण होते. ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांनुसार डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत हा ख्रिश्चन धर्माच्या विरुद्ध होता. त्यामुळे उत्क्रांतीवादाचे असे जाहीर प्रदर्शन ख्रिश्चन धर्माच्या विरोधात मानले गेले.

या आणि काही नागरिकांकडून झालेल्या निषेधाची दखल घेऊन ओटा बेंगाचे जाहीर प्रदर्शन जरी थांबविले गेले तरी तो राहायला अद्याप ब्राँक्स पशूसंग्रहालयातच होता. तोवर त्याचे नाव घरोघरी झाले होते. लोक त्याला पाहायला पशूसंग्रहालयात मोठ्या संख्येने गर्दी करत होते. एका दिवशी ४०,००० लोकांनी ओटा बेंगाला बघण्यासाठी पशुसंग्रहालयाला भेट दिल्याची नोंद टाईम्स वृत्तपत्राने केली. तसेच हे लोक बेंगाची खुलेआम टवाळी करत होते, त्याला ढकलत होते, पाडत होते, त्याची कुचेष्टा करून त्याला अवमानजनक शब्दांनी पुकारत होते ह्या घटनेची नोंदही टाईम्सने केली आहे.

नंतर ओटा बेंगाची रवानगी एका अनाथालयात झाली. कालांतराने तिथूनही त्याला हलवले व लिंचबर्ग येथे स्थलांतरित केले. या नव्या ठिकाणी ओटाने रुळायचा जिकीरीचा प्रयत्न केला. तो तोडकी-मोडकी इंग्रजी भाषा शिकला. त्याने आपल्या मगरीच्या दातांप्रमाणे कोरलेल्या दातांना कॅप्स घालून घेतल्या, आपले नाव 'ओटो बिंगो' असे बदलून घेतले, तो तंबाखूच्या कारखान्यात काम करू लागला. जवळच्या जंगलात तो आपले धनुष्य-बाण घेऊन शिकारीसाठी जात असे, जंगलातून औषधी वनस्पती शोधून आणत असे. पण त्याचे मन आता या देशात रमत नव्हते. इथे त्याने ज्या प्रकारची माणसे पाहिली, जशा प्रकारचे वर्तन अनुभवले त्यानंतर त्याला आपल्या मायदेशी परत जायचे होते. त्याला आपल्या लोकांची आठवण येत होती. पण त्याच वेळी १९१४ मध्ये पहिले जागतिक महायुद्ध उभे ठाकले. आता ओटाकडे लक्ष द्यायला कोणाला फुरसत नव्हती. नव्याची नवलाई बर्‍यापैकी ओसरली होती. ब्राँक्स पशूसंग्रहालयाच्या झालेल्या बदनामीमुळे अनेकांचे हात काही प्रमाणात पोळले होतेच! त्यामुळे ओटा बेंगाकडे पाहायला किंवा त्याच्या भवितव्याची चिंता करायला कोणीच उरले नव्हते. ओटाला स्वतःला मायदेशी जायचे असले तरी त्याच्यापाशी परत जाण्यासाठी पुरेसे पैसेही नव्हते व आवश्यक मदतीचे स्रोतही नव्हते. त्याने 'सभ्य' माणसाच्या जीवनशैलीला हळूहळू का होईना, जरी स्वीकारले, तरी तो सभ्य माणूस त्याला स्वीकारायला तयार नव्हता. त्यांच्या लेखी ओटा बेंगा हा जंगलातून आलेला आदिम प्राणीच होता. हळूहळू ओटा बेंगा नैराश्याने पुरता ग्रस्त झाला. शेवटी त्या नैराश्याच्या भरात त्याने आपल्या दातांच्या कॅप्स उखडून फेकून दिल्या आणि चोरलेल्या पिस्तुलाने स्वतःच्या छातीत गोळी झाडून प्राण त्यागले.    

पुढे नाझी भस्मासुराच्या आगीत वांशिक वर्चस्वाच्या भावनेतून मोठ्या प्रमाणावर नरसंहार झाल्यावर वांशिक वर्चस्व सिद्ध करण्याच्या हेतूने भरवली जाणारी मनुष्यांची ही ''वैज्ञानिक'' प्रदर्शने मागे पडली.
 

सध्याच्या काळातील ''ह्यूमन झू''

थायलंडमध्ये उत्तरेला, ब्रह्मदेशाजवळच्या सीमाप्रांतात एक ब्रह्मदेशातील निर्वासितांची जमात थायलंड सरकारच्या आश्रयाने निवास करून आहे. कारेन नामक पर्वतप्रांतात राहणार्‍या आदिवासी जमातीतील या लोकांमध्ये स्त्रियांची लांब मान हे त्यांच्या सौंदर्याचे प्रतीक मानण्यात येते. त्यासाठी अगदी लहान वयातच मुलींच्या मानेभोवती पितळी रिंगांची वेटोळी वळी घातलेली दिसून येतात. मुलींचे वय वाढत जाते तसतशी वळ्यांची वेटोळीही वाढविण्यात येतात. मोठ्या वयाच्या स्त्रियांमध्ये या मानेभोवतीच्या पितळी रिंगचे वजन १० किलोंचे असते. वस्तुतः त्यात मुलींची मान लांब न होता त्यांच्या गळपट्टीच्या हाडामध्ये व्यंग निर्माण होते. या लोकांना आश्रय देऊन त्या बदल्यात थायलंड सरकारने त्यांचे ह्यूमन झू बनविले असल्याचा आरोप थायलंड सरकारवर केला जातो. कारण या लोकांचा तेथील पर्यटन व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणावर फायदा होत आहे. त्यांना पाहण्यासाठी व त्यांच्या वस्तीला भेट देण्यासाठी, गळ्यात रिंग्ज घातलेल्या मुलींना निरखण्यासाठी पर्यटक गर्दी करतात.






एखाद्या प्रदर्शनात मांडावे तसे त्या मुली-स्त्रियांचे प्रदर्शन या वस्तीतून मांडलेले असते. त्यासाठी प्रत्येक पर्यटकाला दहा डॉलर्सचे शुल्क भरावे लागते. त्यांच्या वस्तीत गेल्यावर या आदिवासी लोकांनी बनविलेल्या कलावस्तूंना खरेदी करण्यासाठीही पर्यटकांचा पाठपुरावा केला जातो. या निर्वासितांना तात्पुरत्या व्हिसावर येथे राहायची परवानगी आहे. मात्र त्यांचा व्हिसा त्यांच्या ''शो'' च्या मालकाने काढून घेतला आहे, त्यामुळे त्याच्या परवानगीशिवाय ते कोठेही जाऊ शकत नाहीत. या लोकांचे पुनर्स्थापन करण्याची तयारी न्यू झीलंड सारख्या देशांनी दाखवली. परंतु थायलंड सरकार त्यांना सोडायला तयार नाही. तसेच त्यांना यापेक्षा जास्त चांगले जीवन कुठे मिळू शकणार आहे, असाही एक दावा केला जातो. ब्रह्मदेशातील सशस्त्र बंडखोर गटांनी या लोकांना त्यांच्या मूळ प्रदेशात नेऊन तिथे त्यांचे पर्यटकांसाठी प्रदर्शन मांडण्यात रस दाखवल्याचे सांगितले जाते. थायलंड सरकारने या लोकांचे कोणतेही पुनर्वसन अद्याप केलेले नाही. या लोकांना अतिशय तुटपुंज्या उत्पन्नावर जगावे लागते. त्यांच्या आयुष्यात कोणतेही स्थैर्य नाही. त्यांच्या जमातीतील मुली गळ्यात रिंग घालायची ही प्रथा इच्छा असली तरी मोडू शकत नाहीत, कारण त्यांनी ती प्रथा पाळण्यावर तेथील पर्यटन व्यवसाय अवलंबून आहे. शेवटी तेथील असुरक्षित आयुष्याला कंटाळून, निषेध म्हणून या जमातीतील तरुणी व मुलींनी २००६ सालापासून आपल्या गळ्यातील रिंग्ज काढून ठेवायला सुरुवात केली. जानेवारी २००८ मध्ये जागतिक राष्ट्रसंघाच्या हाय कमिशनरांनीही या लोकांच्या भवितव्याची चिंता व्यक्त केली.

पॅरिसमध्ये आता इ.स. १८०० ते १९५८ पर्यंतच्या काळात भरवल्या गेलेल्या वेगवेगळ्या ह्यूमन झूं विषयीची माहिती एकत्रित स्वरूपात पाहावयास मिळते. त्या काळातील ह्यूमन झूंसंबंधित वेगवेगळी चित्रे, शिल्पे, जाहिराती, चित्रपट, पोशाख, पोस्टर्स यांचे हे एकत्रित प्रदर्शन सुन्न करणारे, गोठवून टाकणारे असल्याचा अनुभव अनेक मंडळी सांगतात. शोषणाच्या या अगणित कथांमधून त्या काळात अशा प्रकारे प्रदर्शन केल्या गेलेल्या ३५,००० लोकांच्या आयुष्याचा आलेख पाहावयास मिळतो. विज्ञानाच्या मुखवट्याआड दडलेल्या क्रौर्याचे व विकृत कुतूहलाचे नमुने पाहावयास मिळतात. माणसांनी माणसांचे मांडलेले हे प्रदर्शन ''माणूस'' या प्राण्याविषयी आणखी काय काय सांगते हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे.

संदर्भ :

* वॉशिंग्टन पोस्ट मधील अ‍ॅन हॉर्नडे यांचा ३ जानेवारी २००९ रोजीचा लेख : द क्रिटिकल कनेक्शन टू द क्युरियस केस ऑफ ओटा बेंगा

* द गार्डियन २९ नोव्हेंबर २०११ मधील अँजेलिक ख्रिसाफिस यांचा 'पॅरिस शो अनव्हेल्स लाईफ इन ह्यूमन झू' लेख.

* ओटा बेंगा वरील विकीपीडियातील लेख

* सारा बार्टमन बद्दल विकीपीडियातील लेख

* ह्यूमन झू बद्दल विकीपीडियातील लेख
 
* द ह्यूमन झू : सायन्सेस डर्टी लिटल सिक्रेट, २००९ माहितीपट.

* प्रो. सूझन विल्यम्स यांचे ग्रँड रॅपिड्स कम्यूनिटी कॉलेज, मिशिगन येथील रेस अँड एथ्निसिटी कॉन्फरन्स २०११  मधील लेक्चर.

(छायाचित्रे विकीपीडिया व आंतरजालीय स्रोतांमधून साभार)

Monday, October 29, 2012

सिद्दी संगीत

गुलामगिरी, दास्यत्व, पराधीनता यांतून येणारी हतबलता तर काही ठिकाणी हतबलतेतून अंगच्या मूळ ताकदीतून येणारी लढाऊ वृत्ती यांचा अर्थ पुरेपूर जाणणारी व मूळ आफ्रिकन वंशाची जमात गेली अनेक शतके भारतात वास्तव्य करून आहे. आज तुम्ही व आम्ही जेवढे भारतीय आहोत तेवढीच ही जमातही भारतीय आहे. परंतु आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शरीरयष्टी, रूपरचना, मूळ आफ्रिकन प्रथा व संगीत यांमुळे आजही भारतीय प्रजेमध्ये हे लोक वेगळे कळून येतात. त्यांना 'सिद्दी' किंवा 'हबशी' म्हणून संबोधिले जाते. आज भारतात त्यांची संख्या पन्नास ते साठ हजार यांच्या दरम्यान असल्याचे सांगण्यात येते. या वैशिष्ट्यपूर्ण लोकांनी त्यांच्या पूर्वापार सांगीतिक परंपरा किती जरी जपल्या तरी स्थानिक भारतीय संगीत, भाषा व प्रथांशी त्यांचा कालपरत्वे मेळ झाला आहे. सिद्दी लोकांच्या परंपरा, भाषा, राहणी, समजुती व संगीताचा अभ्यास करू जाता संस्कृती कशा प्रकारे मूळ धरते, प्रवाहित होते, विकसित होते किंवा दिशा बदलते याचे जणू एक चित्रच समोर उभे राहते.
सिद्दी स्त्री व मुलगी
असे सांगितले जाते की भारतात सिद्दी लोकांनी इ.स. ६२८ मध्ये भडोच बंदरात पहिले पाऊल टाकले. पुढे इस्लामी अरब टोळ्यांनी केलेल्या हल्ल्यांमध्येही अनेक सिद्दी फौजेचा भाग म्हणून भारतभूमीत आले. परंतु सैन्याचा भाग म्हणून आलेल्या सिद्दींपेक्षाही गुलाम, नोकर, खलाशी व व्यापारी म्हणून आलेल्या सिद्दींचे प्रमाण जास्त धरले जाते. हे सर्वजण पूर्व आफ्रिकेतून इ.स. १२०० ते १९०० या कालखंडात भारतात येत राहिले व इथेच स्थायिक झाले. १७ व्या शतकात पोर्तुगीज व्यापार्‍यांनी सिद्दींना भारतातील अनेक राज्यकर्त्यांना, संस्थानांना व राजांना गुलाम म्हणून विकल्याची नोंद आढळते. या काळात भारतात मोठ्या प्रमाणात सिद्दी लोकांची गुलाम म्हणून विक्री झाली.

भारताच्या पश्चिम भागात, खास करून गुजरातेत सिद्दी लोकांना आपल्या अंगभूत ताकदीमुळे व इमानदारीमुळे स्थानिक राजांच्या पदरी मारेकरी म्हणून नेमण्यात आले. काहींना शेतमजूर, नोकर म्हणून पाळण्यात आले. ज्या सिद्दींना असे आयुष्य नको होते त्यांनी घनदाट जंगलांच्या आश्रयाला जाणे पसंत केले. त्यातील काहींनी एकत्र येऊन महाराष्ट्रातील जंजिर्‍यावर व जाफराबाद येथे आपली सत्ताकेंद्रेही उभी केली. दिल्लीवर मुघलांची सत्ता येण्याअगोदरच्या काळात (इ.स. १२०५ ते १२४०) रजिया सुलतानाचे पदरी असलेला जमालुद्दीन याकूत हा प्रसिद्ध सरदार सिद्दी जमातीपैकीच एक होता असे सांगण्यात येते. गुलामी ते सरदारकी असा त्याचा प्रवास होता.

सत्तासंघर्षामध्ये सिद्दी जमातीने कायम मराठ्यांपेक्षा मुघलांचीच जास्त करून साथ दिली. परंतु सिद्दी लोकांमधील मलिक अंबर या इतिहास प्रसिद्ध व्यक्तिमत्वाने आपल्या मर्दुमकीने मुघलांना जेरीस तर आणलेच, परंतु मराठ्यांसाठी महत्त्वाच्या ठरलेल्या गनिमी काव्याच्या लढ्याची सुरूवात मलिक अंबरने महाराष्ट्रात केली. इथियोपियाहून आईबापांनी गुलामगिरीत विकलेल्या व जागोजागच्या गुलाम बाजारांमधून विक्री होत भारतात पोचलेल्या मलिक अंबरने अहमदनगरच्या निझामाच्या पदरी चाकरी केली व त्याचा बाकीचा इतिहास, पराक्रम, त्याने बांधलेल्या कलापूर्ण वास्तू व औरंगाबाद येथे त्याने तेव्हा विकसित केलेली 'नेहर' जलव्यवस्था यांबद्दल इतिहासकार कौतुक व्यक्त करतात.

भारतातील अनेक सिद्दी लोक हे टांझानिया व मोझांबिक येथील लोकांचे वंशज असून त्यांच्या पूर्वजांना पोर्तुगीजांनी भारतात आणले. यातील बहुसंख्य लोकांनी मुस्लिम किंवा ख्रिश्चन धर्म स्वीकारला असून फारच कमी लोक हिंदू धर्म लावतात. त्याचे मुख्य कारण पारंपारिक हिंदू वर्ण व्यवस्थेत त्यांना कोठेच स्थान नसणे!

भारतातील तीन प्रांतांमध्ये प्रामुख्याने सिद्दी लोकांच्या वसाहती आढळतात. गुजरात, कर्नाटक व हैद्राबाद हे ते प्रमुख प्रांत होत. गुजरातेत गीर जंगलाच्या आजूबाजूला सिद्दी लोकांच्या वसाहती आढळतात. त्यांचे पूर्वज हे जुनागढच्या नवाबाच्या पदरी गुलाम होते. पोर्तुगीजांनी त्यांना गुलाम म्हणून जुनागढच्या नवाबाला विकले होते.


येथील सिद्दींनी स्थानिक गुजरातेतील चालीरीती, संगीत, भाषा इत्यादी जरी आत्मसात केले असले तरी त्यांच्या काही काही प्रथा, समजुती, संगीत व नृत्य या त्यांच्या मूळ संस्कृतीतून आलेल्या आहेत व त्यांनी त्या प्रयत्नपूर्वक जपल्या आहेत. याचेच एक उदाहरण म्हणजे त्यांचे 'गोमा संगीत'. किंवा गोमा नृत्य! ह्याचे मूळ पूर्व आफ्रिकेतील बंटू लोकांच्या आवडत्या एन्गोमा ड्रमिंग व नृत्यामध्ये असल्याचे सांगतात. या लोकांसाठी गोमा नृत्य हे फक्त मनोरंजन किंवा विरंगुळ्याचे साधनच नाही, तर ते त्यांच्या मूळ धार्मिक किंवा आध्यात्मिक समजुतींनुसार महत्त्वाचे आहे. नृत्याच्या परमक्षणांना नर्तकांच्या अंगात त्यांचे पूर्वज संत-आत्मे प्रवेश करतात अशी त्यांची श्रद्धा आहे.

गुजरातेतील सिद्दी लोकांचे हे गोमा नृत्य :



कर्नाटकात सिद्दींची संख्या सर्वात जास्त असल्याचे सांगण्यात येते. उत्तर कर्नाटकाच्या यल्लापूर, हलियाल, अंकोला, जोयडा, मुंडगोड, सिरसी तालुक्यांत, बेळगावच्या खानापूर तालुक्यात आणि धारवाडच्या कालघाटगी या ठिकाणी प्रामुख्याने सिद्दींची वस्ती आढळते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर अनेक सिद्दींनी पाकिस्तानात जाणे पसंत केले व ते कराचीत स्थायिक झाले. कर्नाटकातील सिद्दी हे प्रामुख्याने पोर्तुगीज, अरब व ब्रिटिश व्यापार्‍यांनी १६ ते १९ व्या शतकाच्या काळात गोव्याला गुलाम म्हणून आणलेल्या मूळच्या इथियोपिया व मोझांबिक येथील आफ्रिकन लोकांचे वंशज आहेत. त्यातील काहींना गुलामगिरीतून मुक्त करण्यात आले तर काहींनी पळून स्वतःची सुटका करून घेतली व जंगलांचा आश्रय घेतला.
यल्लापूरच्या सिद्दींमध्ये, त्यांच्या नाच-गाण्यांमध्ये व श्रद्धा समजुतींमध्ये त्यांच्या पूर्वजांचा वारसा पुढे चालविलेला दिसून येतो. एम टी व्ही साऊंड ट्रिपिन् कार्यक्रमात यल्लापुरातील सिद्दी लोकांवर झालेला हा कार्यक्रम : https://www.youtube.com/watch?v=JT-ODZ7YX30

त्यांच्यावरचा हा एक व्हिडियो :



हैद्राबादचे सिद्दी हे त्या भागात १८ व्या शतकात स्थायिक झाल्याचे सांगण्यात येते. हे सिद्दी निझामाच्या पदरी घोडदळात काम करत असत. त्यांचे संगीत हे 'हैद्राबादी मर्फा संगीत' (ज्याला 'तीन मार' म्हणूनही संबोधिले जाते) म्हणून विशेष प्रसिद्ध आहे व हैद्राबादेत ते खास सिद्दींच्या लग्नसमारंभांत किंवा अन्य प्रसंगी वाजविले जाते. ढोलक, स्टीलची कळशी व लहान 'मर्फा' ढोल यांसोबत लाकडी 'थापी' असा मर्फा वाद्यवृंदाचा संच असतो. मर्फातही तीन उपप्रकार आहेत. काही फक्त पुरुषांसाठी आहेत तर काही प्रकार पुरुष व स्त्रिया दोघांसाठी आहेत. यातील नृत्यप्रकारात तलवार व काठ्यांचा वापर करण्यात येतो. मात्र या कलाप्रकाराला ओहोटी लागल्याचे सांगण्यात येते.

केनियातील वृत्तवाहिनीने प्रसारित केलेले सिद्दी लोकांविषयीचे हे वार्तांकन :



आजच्या काळात बहुसंख्य सिद्दींची आर्थिक व सामाजिक स्थिती ही निम्न स्तराची आहे असे सांगतात. शिक्षणाचा अभाव, गरीबी, पिढ्यानुपिढ्या लादलेली गुलामगिरीची मानसिकता यांमुळे या लोकांना मुख्य प्रवाहात येण्यासाठी वेळ लागतो आहे. तसेच त्यांची सामाजिक परिस्थितीही फार चांगली नाही. भारतीय भाषा, आचार, वेशभूषा व संस्कृतीशी बर्‍याच प्रमाणात आदानप्रदान केले तरी सिद्दींना मुख्य लोकधारेने फारसे सामावून घेतलेले दिसत नाही. नव्या पिढीला शिक्षणाचे महत्त्व कळले असल्यामुळे मेहनतीच्या जोडीला शिक्षणाचा मेळ घालून ते आयुष्यात पुढे येण्याच्या खटपटीत दिसतात.

(* चित्रे व माहिती आधार : विकिपीडिया, हिंदू वृत्तपत्रातील बातमी, The African Dispersal in the Deccan: From Medieval to Modern Times By Shanti Sadiq Ali, बी बी सी इन पिक्चर्स : इंडियाज आफ्रिकन कम्युनिटीज)

Wednesday, October 17, 2012

उबुंटू


विश्व संगीताच्या अभ्यासाचे दरम्यान माझी ओळख एका सुंदर शब्दाशी झाली. तो शब्द म्हणजे ''उबुंटू''. 



Umuntu Ngumuntu Ngabantu: “A person is a person because of people.” (झुलू म्हण)

उबुंटू या शब्दाला आफ्रिकेत खोसा समाजात, बंटू भाषांमध्ये मोठे महत्त्वाचे स्थान आहे व त्या शब्दाची वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळी रूपे आहेत. जसे बोथो, उटू, उन्हू इत्यादी. उबुंटू हे एक प्रकारचे तत्त्वज्ञान किंवा जीवनशैली म्हणता येईल. त्याचा अर्थ ढोबळपणे, ''मी आहे, कारण आम्ही आहोत,'' असा होतो. त्यानुसार समाजात प्रत्येकाचे स्थान महत्त्वाचे आहे, आणि ''माझं अस्तित्व इतरांच्या अस्तित्वामुळे आहे,'' हा त्यातील मुख्य विचार मानला जातो. त्यानुसार उबुंटू जीवनशैलीला अनुसरणार्‍या माणसाला इतरांमधील गुणांमुळे  किंवा त्यांच्या क्षमतेमुळे कधीच असुरक्षित वाटत नाही. कारण तो स्वतः पूर्णतेचा एक अंश आहे, त्या पूर्णतेचा एक भाग आहे हे त्याला ठाऊक असते. तो स्वतःला इतरांचा एक भाग मानतो. आणि त्यामुळे इतरांची मानहानी ही त्या व्यक्तीचीही मानहानी ठरते. इतरांचे शोषण त्याचे शोषण ठरते. इतरांचे दु:ख त्याचे दु:ख ठरते. तुम्ही माणूस म्हणून एकट्याने जगू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला आजूबाजूला इतरांची, माणसांची, समाजाची गरज असते. तुमचे अस्तित्व एकमेकांवर अवलंबून आहे. उबुंटू मुळे तुमच्यात उदारता येते. मनाचे मोठेपण येते. आपण एकमेकांशी जोडले गेल्याची भावना येते. अनेकदा आपण स्वतःचा एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून विचार करतो. पण उबुंटू मध्ये तुम्ही व इतर माणसे भिन्न नाहीत. एकाच्या कृतीने बाकीच्यांवरही प्रभाव पडतो. मग तो प्रभाव चांगला असो की वाईट! तुम्ही चांगली कृती केलीत तर त्याचा फायदाही सार्‍या जगाला होतो.

नेल्सन मंडेला उबुंटूचा अर्थ सांगताना म्हणतात : पूर्वीच्या काळी यात्रेकरू प्रवास करताना एखाद्या खेड्यात थांबायचे. तिथे गेल्यावर यात्रेकरूला कोणापाशी अन्न, पाणी मागायची गरज पडत नसे. कारण खेड्यातले सर्व लोक त्याला अन्न, पाणी आणून देत. त्याचे मनोरंजन करत. हा झाला उबुंटूचा एक भाग. याचा अर्थ असा नव्हे की लोकांनी स्वतःचा विचारच करायचा नाही! त्याचा अर्थ असा घ्यायचा की तुमच्या समाजाचा विकास व्हावा यासाठी तुम्ही हे करायला तयार आहात का?  



एक प्रकारचे ''कम्युनिटी स्पिरिट'' ज्याला म्हणता येईल असे हे तत्त्वज्ञान गेल्या काही वर्षांमध्ये पाश्चात्त्य जगातही बरेच प्रसिद्ध पावले असे म्हणता येईल. २००४ सालच्या ''इन माय कंट्री'' चित्रपटात उबुंटू ही मुख्य विचारधारा असल्याचे सांगितले जाते, तर अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांनीही त्यांच्या भाषणात समाजाचे महत्त्व सांगताना उबुंटूचा उल्लेख केला आहे.



संगणकीय प्रणालीच्या जगातही ''उबुंटू'' हे नाव प्रसिद्ध झाले आहे. प्रसिद्ध पॉप गायिका मॅडोनाने उबुंटूचे इंग्रजी भाषांतर असलेले ''आय अ‍ॅम बिकॉझ वुई आर'' हे शीर्षक आपल्या आफ्रिकेतील मलावीच्या एड्स आणि एच आय व्ही ग्रस्त अनाथ मुलांवर तयार केलेल्या माहितीपटासाठी वापरले.



उबुंटू शब्दाशी निगडित एक छोटीशी पण सुरेख गोष्ट मध्यंतरी वाचनात आली.



आफ्रिकेत काम करणार्‍या एका मानववंशशास्त्रज्ञाने तो काम करत असलेल्या खोसा समाजातील लहान मुलांना खेळताना पाहिले. त्याने एका झाडाखाली एक टोपली ठेवली. टोपलीत मधुर चवीची फळे होती. तो या मुलांना म्हणाला, तुमची शर्यत लावूयात. तुमच्यापैकी जो पळत पळत जाऊन त्या टोपलीपाशी पहिला पोचेल त्याला सर्वात जास्त फळे मिळतील. मुलांनी होकार दिला. शास्त्रज्ञाने शर्यत सुरू केल्यावर सर्व मुलांनी एकमेकांचे हात धरले आणि सगळेजण पळत पळत एकाच वेळी त्या टोपलीपाशी पोचले. अर्थातच फळांचा प्रत्येक मुलाला समान वाटा मिळाला. त्या शास्त्रज्ञाला मुलांच्या त्या वागण्याचे फार कुतूहल वाटले. त्याने विचारले, ''तुम्ही अशा प्रकारे का पळालात? तुमच्यापैकी एक कोणीतरी शर्यत जिंकू शकला असता!'' त्यावर मुलांनी फळांवर ताव मारत उत्तर दिले, ''उबुंटू, जर बाकीचे दु:खी असतील तर आमच्यापैकी कोणी एक कसा काय बरे आनंदी होऊ शकेल?'' :-)

(उबुंटूबद्दल आणखी माहिती http://en.wikipedia.org/wiki/Ubuntu_(philosophy) येथे उपलब्ध आहे. चित्र आंतरजालावरून साभार)

Monday, October 08, 2012

धोबिणींचा गानवृंद!


काबाडकष्टांच्या आयुष्यात, संघर्ष - गरिबीचे जीवन जगत असताना त्याला जर संगीताची किनार लाभली तर सार्‍या आयुष्यात सर्व तर्‍हेच्या प्रसंगात ते संगीत साथ देते हे खरेच आहे. जगातल्या वेगवेगळ्या देशांमधील कष्टकरी जमाती आपल्या श्रमांचा भार हलका करण्यासाठी, मनाला विरंगुळा देण्यासाठी संगीताचा आधार घेताना दिसतात. त्या संगीतातून त्यांच्या भावना, आयुष्यातील चढउतार, गमतीच्या गोष्टी, लोककथा, दंतकथा इथपासून ते केवळ यमक जुळवण्यापुरती केलेली मजेशीर रचना असे सर्व प्रकार दिसतात.

ब्राझीलमधील जेक्विटिनहोन्हा खोर्‍यातील धोबिणींनी आपल्या कष्टाच्या, एकसुरी आयुष्यातून विरंगुळा, रंजनाचे चार क्षण शोधले आणि त्याची परिणिती त्या बायकांचा एक सुरेखसा गानवृंद तयार होण्यात झाली!
ब्राझीलच्या मिनास जेराइस राज्यात वसलेल्या उत्तर पूर्व भागातील या बायका म्हणजे त्यांच्या पूर्वापार चालत आलेल्या गाण्यांचे चालते-बोलते भांडार आहेत! मूळ आफ्रिकेतून त्यांच्या पूर्वजांनी या देशात आणलेले पिढ्यानुपिढ्या समृद्ध करणारे आफ्रिकन धर्तीचे संगीत, सांबा, फ्रेवोस, ड्रमिंग, अफोक्सेस, लोकसंगीत यांचा व्यवसायाने धोबिणी असणार्‍या या स्त्रियांकडे मोठा संचयच आहे म्हणा ना!




आयुष्यात या स्त्रियांनी काय नाही पाहिलेय? त्यांचे पूर्वज ब्राझीलमध्ये गुलाम म्हणून आले. इ.स. १५३० ते १८५० या काळात ब्राझीलमध्ये चाळीस लाख गुलामांची आयात झाली. पुरुषांची शारीरिक ताकद जास्त म्हणून स्त्रियांपेक्षा पुरुष गुलाम जास्त आणले जायचे. पुरुषांना उसाच्या शेतांमध्ये राबविले जायचे तर बायका घरमालकांच्या व मालकिणींच्या हाताखाली राबायच्या, त्यांची मुले सांभाळायच्या, स्वैपाकी म्हणून काम करायच्या, मालकाच्या घरात कष्टाची कामे करायच्या. शिवाय रस्त्यावर खाद्यपदार्थही विकायच्या. पुरुष गुलामांपेक्षा त्यांची गुलामगिरीतून लवकर मुक्तता व्हायची. त्याचे मुख्य कारण म्हणजे त्या आपल्या मालक-मालकिणीच्या जास्त जवळच्या संपर्कात असायच्या. गुलामगिरीतून मुक्त झाल्या की मग या स्त्रिया धोबीण, स्वैपाकी, आया, नोकराणी म्हणून काम करायच्या. एकोणिसाव्या शतकात त्यांच्या वाटची गरिबी, कष्ट, मोलमजुरी चुकले नाहीत. शिवाय त्या समाजात अतिशय निम्न स्तराचे आयुष्य त्यांच्या वाट्याला आले होते. परंतु जसजशा उच्चवर्गातील स्त्रिया मुलींच्या शिक्षणाच्या हक्कासाठी झटू लागल्या तसतशा या कृष्णवर्णीय स्त्रिया आपल्या सामाजिक व राजकीय हक्कांसाठी झगडू लागल्या. इ.स. १९३२ मध्ये त्यांच्या निरक्षरतेमुळे त्यांना मतदानाचे हक्क नाकारण्यात आले. इ.स. १९४० च्या दरम्यान त्यांनी आपले संघटन करण्यास सुरुवात केली. ज्या जमिनीवर त्यांची घरे होती ती जमीन सरकार हिरावून घेऊ लागल्यावर या बायकांनी आपल्या हक्कांसाठी त्वेषाने लढा दिला. परिणामी त्यांना समाजात व त्यांच्या धर्मात प्रबळ स्थान मिळाले.

कँडोंब्ले हा त्यांनी आफ्रिकेतून आपल्याबरोबर आणलेला खास धर्म! पश्चिम आफ्रिकेच्या योरुबा परंपरेच्या व कॅथलिक धर्माच्या संगमातून निपजलेला हा धर्म. या धर्मात येथील स्त्रियांना अतिशय मानाचे स्थान आहे. त्याचे एक कारण सांगितले जाते की गुलामगिरीच्या काळात गुलाम स्त्रियांना पुरुषांच्या तुलनेत जास्त मोकळीक असल्याने त्या त्यांच्या धार्मिक परंपरा जतन करू शकल्या व गुलामीव्यतिरिक्त केलेल्या कामाच्या पैशांतून धार्मिक समारंभांसाठी निधी गोळा करू शकल्या. आपल्या धर्माच्या चर्चमध्ये त्या ''हाय प्रिस्टेस'' किंवा उच्च पुजारिणीची भूमिका बजावत होत्या. शिवाय सुरुवातीपासून त्या स्वतःचे स्वतः कमावत होत्या. आर्थिक स्वावलंबन व धर्मातील प्रबळ स्थान यांमुळे या स्त्रियांचे त्यांच्या समाजातील स्थानही पुढचे राहिले.

मात्र त्या तुलनेत त्यांची आर्थिक स्थिती फार काही सुधारलेली दिसत नाही. आजही या स्त्रिया समाजातील धनवान लोकांकडे नोकर, मदतनीस, आया, स्वैपाकी म्हणून काम करताना दिसतात. त्यांचे कष्ट सुटलेले नाहीत. पण त्यांच्या समाजात व धर्मात त्यांचे स्थान निर्विवादपणे सशक्त आहे.

धोबिणी

श्रीमंत, धनाढ्य लोकांचे कपडे हाताने धुऊन त्यांना कोळशाच्या इस्त्रीने कडक इस्त्री करायच्या व्यवसायात असणार्‍या धोबिणींना अनेकदा स्वतःचे अंग झाकायला पुरेसे कपडे नसत. तासन् तास नदीच्या पाण्यात कपडे धुवायचे, ते वाळवायचे व त्यांना सुरेखशी इस्त्री करायची, या एकसुरी कामात त्यांना आनंद देणारी गोष्ट म्हणजे त्यांच्याजवळची गाणी! आपल्या मोकळ्या किंवा किनर्‍या आवाजात ही गाणी गात कपडे धुताना त्यांचा कष्टाचा भारही जरासा हलका होत असे. त्यांच्यापाशी जी गाणी होती ती पोर्तुगीज, आफ्रिकन, कृष्णवर्णीय, भारतीय परंपरांचा मेळ असणारी!

अल्मेनाराच्या धोबिणी

प्रसिद्ध संगीतकार लेननच्या ''Lavadeira Do Rio'' (नदीकाठच्या धोबिणी) या गाण्यातील काही ओळींचा अनुवाद किती समर्पक आहे!

Ah! Washerwoman of the river!
Many sheets to wash
One more skirt to go
When the soap runs out
But she runs to the water's edge
And sees the surf shine
She hears the wild racket
Of the waves that beat the shore
Ah, oh, the wind blew
Ah, oh, the leaf fell...


'Beating Clothes, Singing Life'

गानवृंदातील स्त्रिया

अल्मेनाराच्या सेंट पीटर भागात इ.स. १९९१ मध्ये कम्युनिटी लाँड्री बांधली गेल्यावर या बायका प्रसिद्ध संगीतकार, संशोधक व गायक कार्लोस फरीयास याच्या मार्गदर्शनाखाली एकत्र आल्या व आपल्या गाण्यांचे समूहगायन करू लागल्या. त्यांनी अल्मेनाराच्या धोबिणींची सामाजिक संघटना स्थापन केली. त्यात पन्नासापेक्षा जास्त बायकांचा सहभाग होता. त्यांच्या गानवृंदाचे जसजसे नाव होऊ लागले तसतशा ब्राझीलच्या निरनिराळ्या शहरांतून त्यांना कार्यक्रमांसाठी, उत्सवांसाठी आमंत्रणे येऊ लागली. त्यांनी ब्राझीलच्या भागांबरोबरच पोर्तुगाल, पेरू, युरोपचे दौरेही केले. ''बाटुकिम ब्राझिलेरो'' (२००२) व अ‍ॅक्वा (२००५) या त्यांच्या संगीत अल्बम व पुस्तकांतून त्यांनी आपल्या समृद्ध वारशाला लोकांसमोर आणले. संगीताद्वारे समाजात सामावले जाण्याचा त्यांचा 'Beating Clothes, Singing Life' हा कार्यक्रम स्थानिकांनी व परदेशातील संगीत रसिकांनी उचलून धरला. 




या धोबिणींच्या वेगवेगळ्या गाण्यांचे अल्बम्स रेकॉर्ड झाले, त्यावर पुस्तके निघाली. कार्यशाळा होऊ लागल्या.  आपल्या कार्यक्रमांतून त्या फक्त आपल्या परंपरागत गाण्यांची झलकच दाखवतात असे नव्हे; तर त्या आपल्या आयुष्याची, संघर्षाची, कष्टांची कथाही सांगतात. नदीकाठच्या कथा ऐकवून लोकांचे मनोरंजन करतात. आपल्या खुमासदार संवादांनी कार्यक्रमात रंगत आणतात. आपल्या कलेच्या माध्यमातून समाजातील सर्व स्तरांच्या लोकांशी संवाद साधतात. त्यांना आवाहन करतात. ड्रम्स, गिटार्स, फ्लूट्स च्या साथीने या बायकांचे भरदार आवाज श्रोत्यांना वेगळ्याच दुनियेची सफर घडवून आणतात. आज कम्युनिटी लाँड्रीद्वारे चाळीस बायका या धोबीकामाद्वारे आपल्या कुटुंबाची गुजराण करतात. त्यातील बारा ते पंधरा बायका धोबिणींच्या गानवृंदात गातात. आपली सुख-दु:खे लोकांबरोबर वाटतात.



कार्यक्रमाच्या शेवटी पाण्याला आशीर्वाद देण्याचा विशेष सोहळा असतो. या सोहळ्यात गानवृंदातील सर्व स्त्रिया रस्त्यांतून गाणी गात, वाद्ये वाजवत एक चैतन्यपूर्ण मिरवणूक काढतात. ही मिरवणूक त्या त्या ठिकाणच्या नदी, तळी, कारंजी, जलाशयांपर्यंत वाजत-गाजत जाते व तिथे या स्त्रिया फुलांची उधळण करतात.

या कार्यक्रमाला ब्राझील सरकारच्या सांस्कृतिक खात्याने विशेष मान्यता दिली असून त्यांना वेळोवेळी गौरवण्यात आले आहे. आयुष्यभर इतरांची धुणी धुऊन जीवनाचे गाणे गाणार्‍या बायकांची ही आयुष्याकडे बघण्याची दृष्टी, त्यांची कला आणि ताकद ही नक्कीच कौतुकास्पद आहे.  

*********************************************

माझी सहाध्यायी मिशेल ब्रूकचे पुन्हा एकदा ब्राझीलच्या या चिरतरुण गानवृंदाची ओळख करून दिल्याबद्दल विशेष आभार!

(* पोर्तुगीज भाषेतील शब्दांचे उच्चार दिल्यापेक्षा थोडे वेगळे असण्याची शक्यता आहे.)
(चित्रे अल्मेनाराच्या सांस्कृतिक संकेतस्थळावरून साभार)

Friday, May 04, 2012

'हा भारत माझा' चित्रपट प्रीमियर वृत्तांत

काही चित्रपट आपल्या कथानकातून व मांडणीतून आपल्याला आपण स्वीकारलेल्या जीवनमूल्यांबाबत, परिस्थितीबाबत विचार करण्यास उद्युक्त करतात. मनोरंजनाबरोबरच जागृती आणण्याचे काम करतात व त्यात प्रेक्षकांनाही सामावून घेतात. 'हा भारत माझा' चित्रपटाच्या माध्यमातून हे सर्व साध्य होते का, हे पाहण्यासाठी हा चित्रपट अवश्य पाहावा व मुलांनाही दाखवावा. 






''हा भारत माझा'' चित्रपटाच्या मायबोलीकरांसाठी खास आयोजित केलेल्या खेळाला मला काही कारणाने जायला जमले नव्हते, पण चित्रपट बघायची इच्छा मात्र होती. काल सायंकाळी ३ मे रोजी ती इच्छा पूर्ण झाली. चित्रपटाच्या प्रीमियरला मायबोली तर्फे जायला मिळते आहे याचाही आनंद मनात होताच! तिथे पोचल्यावर अगोदर अरभाटाला फोन लावला. अन्य कोण मायबोलीकर खेळाला उपस्थित राहणार आहेत त्याची कल्पना नव्हती. त्यामुळे मी आजूबाजूला उभ्या बर्‍याच लोकांकडे बघत 'हा कोणता आयडी असेल?' असा विचार करत अल्पसा टाईमपास केला. थोड्याच वेळात अरभाटाला भेटून व प्रवेशिका हाती घेऊन मी अन्य काही प्रेक्षकांसमवेत स्क्रीन क्रमांक ४ कडे कूच केले.


दारातच एका गोबर्‍या गालाच्या छोट्या मुलाने आमचे एक सुंदर बुकमार्क देऊन स्वागत केले. नंतर कळले की तो चित्रपट अभिनेत्री रेणुका दफ़्तरदार यांचा सुपुत्र होता. त्या बुकमार्कवर एका बाजूला कबीराचा चित्रपटात झळकलेला दोहा व दुसर्‍या बाजूला 'हा भारत माझा' चित्रपटाच्या कलावंत, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आदी मंडळींचे नामनिर्देश होते. कबीराचा तो दोहा वाचताच मन प्रसन्न झाले.


प्रेक्षक व निमंत्रितांमध्ये काही चंदेरी पडद्यावरचे ओळखीचे चेहरे तर काही सामाजिक क्षेत्रांतील मान्यवर मंडळींचे चेहरे दिसत होते. लवकरच चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांनी कार्यक्रमास सुरुवात केली. ह्या 'झीरो बजेट' चित्रपटाची कल्पना अण्णा हजारेंच्या देशव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कशी स्फुरली, काय निमित्त झाले, मान्यवर कलाकारांनी - तंत्रज्ञांनी कशा तारखा दिल्या, मदतीचे पुढे झालेले हात, नंतरची जुळवाजुळव यांबद्दल सांगितले. चित्रपटाच्या दिग्दर्शिका, कथालेखिका, पटकथाकार व संवादलेखिका सुमित्राताई भावे यांसह चित्रपटातील सर्व उपस्थित कलाकार, तंत्रज्ञ तसेच किर्लोस्कर कंपनीचे प्रतिनिधी यांना स्टेजवर बोलावून त्यांची ओळख करून देण्यात आली व त्यांचे खस अत्तराची भेट देऊन स्वागत केले गेले. कलाकारांपैकी उत्तरा बावकर, रेणुका दफ्तरदार, जितेंद्र जोशी, आलोक राजवाडे, मदन देवधर यांसह चित्रपटात इतर छोट्यामोठ्या भूमिका केलेली मंडळीही आवर्जून उपस्थित होती. मायबोली.कॉमचा व मायबोलीतर्फे केल्या गेलेल्या मदतीचाही विशेष उल्लेख सुनील सुकथनकरांनी आवर्जून केला.


सुरुवातीलाच राष्ट्रगीताची धून व त्या जोडीला भारताच्या सीमाप्रांतातील लष्करी ध्वजवंदनाच्या चित्रणाने मनात देशाबद्दल व देशसैनिकांबद्दल जे काही उचंबळून आले त्याचे शब्दांमध्ये वर्णन करणे अशक्य आहे. नंतर कविता खरवंडीकरांनी गायलेला कबीराचा दोहा जणू पुढे उलगडत जाणार्‍या चित्रांची पूर्वकल्पनाच देतो. चित्रपटाची कथा येथे देत नाही. परंतु अगदी कोणत्याही मध्यम वर्गीय घरात घडू शकेल असे हे कथानक आहे. त्यात तरुण पिढी व जुन्या पिढीच्या समोरील व्यावहारिक व मानसिक आव्हाने आहेत. स्वार्थ मोठा की कोणाला न दुखावता, भ्रष्टाचार न करता साधलेला आनंद मोठा यावर कोणत्याही कुटुंबात घडतील अशा घटनांमधून साकारणारी कथा आहे. एकीकडे अण्णा हजारेंनी छेडलेले भ्रष्टाचारविरोधी देशव्यापी अहिंसक आंदोलन, जगात अन्य ठिकाणी झालेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर उमटलेले त्याचे जगव्यापी पडसाद, प्रसारमाध्यमे - सोशल नेटवर्किंग च्या माध्यमातून घरांघरांमधून पोचलेले हे आंदोलन, त्यातून झडलेल्या चर्चा, ढवळून निघालेली मने, शहरी लोकांबरोबरच ग्रामीण जनतेचा सहभाग, भ्रष्टाचाराला कंटाळलेली आणि सरावलेली मने व या सर्वांचे टीव्ही फूटेज या सर्व घटनांचा सुरेख वापर या चित्रपटात दिसून येतो. त्यातूनच चित्रपटाचे कथानक पुढे सरकत राहते. देशव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एका मध्यमवर्गीय कुटुंबातील घडामोडी, त्या कुटुंबातील सदस्यांच्या समोर उभे राहिलेले प्रश्न, त्यांची त्यांनी शोधलेली उत्तरे, त्यातून निर्माण होणारे मानसिक आंदोलन - द्वंद्व यांचा जो मेळ घातला आहे तो खरोखरीच उत्तमपणे मांडला आहे. विक्रम गोखले व उत्तरा बावकर ज्या सहजतेने वावरतात त्यामुळे त्यांचा अभिनय हा अभिनय वाटतच नाही. तीच गोष्ट चित्रपटातील इतरही कलाकारांची म्हणावी लागेल. जितेंद्र जोशी, आलोक राजवाडे, ओंकार गोवर्धन, रेणुका दफ्तरदार, देविका दफ्तरदार यांचे अभिनय हे अभिनय न वाटता अतिशय स्वाभाविक वाटतात. कोठेही दे मार मारामारी, अंगावर येणारी गाणी, संवाद, चित्रे न वापरता आपला संदेश प्रेक्षकांपर्यंत समर्पकपणे पोहोचविण्यात चित्रपट यशस्वी ठरतो. शैलेश बर्वेंनी दिलेले संगीतही चित्रपटात बेमालूमपणे मिसळून जाते. किशोर कदम व दीपा लागूंच्या छोट्याच परंतु प्रभावी भूमिका लक्षात राहणार्‍या आहेत व त्यांनी त्या नेहमीच्याच सफाईने वठविल्या आहेत.


दोन तासांचा हा चित्रपट प्रत्येक भारतवासियाने पाहावा असाच आहे. चित्रपटाला सबटायटल्सही आहेत, त्यामुळे अमराठी लोकांनाही तो सहज समजू शकेल. यातील भाषा आपल्या प्रत्येकाची आहे. या चित्रपटात मांडली गेलेली मानसिक आंदोलने, द्वंद्व, प्रश्न, वातावरण आपणही रोजच्या जीवनात कोठे ना कोठे अनुभवत असतो. त्यामुळेच जो संदेश चित्रपटाच्या शेवटच्या भागात कथानकातून समोर येतो तो नक्कीच आपल्याला विचार करायला लावतो. आपल्या जीवनशैलीविषयी विचार करायला लावतो. पर्याय शोधायचा प्रयत्न करायला लावतो. भ्रष्टाचाराचा विरोध हा आपण आपल्या वैयक्तिक जीवनातून सुरू केल्याशिवाय पर्याय नाही - तसे केले तरच हा लढा सार्थ होईल - भ्रष्टाचार करणे हा जसा गुन्हा आहे तसाच तो सहन करणे हाही एक गुन्हा आहे याची जाणीव ज्या सहज सूक्ष्मतेने चित्रपटातून प्रसारित केली आहे त्याची दाद देण्यासाठी प्रत्येकाने हा चित्रपट एकदा तरी बघावा व इतरांना दाखवावा.


इतका सुंदर चित्रपट पाहायला व अनुभवायला मिळाल्याबद्दल मायबोलीचे व मायबोलीच्या माध्यम प्रायोजकांचे अनेक आभार! :)

Sunday, November 27, 2011

म्हणींच्या राज्यातील गमतीजमती



पूर्वापार चालत आलेल्या म्हणींची मजाच काही और असते! अनेकदा त्यांच्यामागे असलेले संदर्भ कालौघात मिटले तरी प्रत्येक म्हणीमागे दडलेले व्यावहारिक शहाणपण, अनुभव व त्यातून मिळणारे ज्ञान हे खणखणीत  असते. पंचतंत्र, जातक कथा, रामायण - महाभारत यांसारख्या कथांमधून या म्हणी, त्यांचे उगम तर दिसतातच; शिवाय अनेक लोककथा - काव्यांच्या स्वरूपांत त्यांचे जतन झालेले आढळून येते.

एखाद्या देशात प्रचलित असलेल्या म्हणींवरून त्या देशातील लोकांची प्रतिभा, वाक्चातुर्य व व्यवहाराची पडताळणी करता येते असा सर्वसामान्य समज आहे. त्यानुसार पाहावयास गेले तर भारतातील विविध भाषांमधील म्हणींचा समृद्ध खजिना येथील लोकांची विलक्षण प्रतिभा, चातुर्य व स्वभाव-विशेषांची ओळख करून देतो असेच म्हणावे लागेल.

आधुनिक युगात म्हणींचा वापर शहरी संभाषणात कदाचित मोठ्या प्रमाणावर होत नसेल. परंतु आजही ग्रामीण भारतात या म्हणी संभाषणात, व्यवहारात सतत डोकावताना दिसतात. गावाकडची दोन माणसे गप्पागोष्टी करत बसली असतील तर त्यांच्या गावगप्पा अवश्य ऐका. तुम्हाला दोन-तीन तरी इरसाल, अस्सल, झणझणीत म्हणी ऐकायला मिळणारच याची खात्री!

महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा, कोंकण, घाटावरच्या अनेक म्हणी आज पुस्तकांच्या व आंतरजालाच्या कृपेने आपल्याला एकत्रित स्वरूपात वाचावयास मिळतात. त्यांच्या 'उद्बोधकते'वर झडलेल्या महान चर्चाही आपण वाचतच असतो. परंतु महाराष्ट्राबाहेर अशा कितीतरी म्हणी आहेत ज्यांचे मराठी स्वरूप आपल्याही माहितीचे आहे! परवा असेच एक म्हणींचे पुस्तक चाळताना वेगवेगळ्या भारतीय भाषांमधील समानार्थी म्हणींचा शोध लागला. भाषा बदलल्या, प्रांत बदलला, संस्कृती - आचार - विचार बदलले तरी मनुष्याचा स्वभाव बदलत नाही. त्याच्या वृत्ती बदलत नाहीत! त्यांच्यामागचे मर्म तेच राहते. भारताच्या विविध प्रांतांमध्ये डोकावून बघितलेत तर अशा बर्‍याचशा म्हणी तुम्हाला सामायिक अर्थाच्या दिसतील.

उदाहरणार्थ हिंदी भाषेतील ही म्हण पाहा ना! म्हण आहे,''मरें भैस में बहुत घी''. म्हणजे म्हैस मेली की त्या  मेलेल्या म्हशीला किती दूध यायचं, त्यापासून किती तूप लोणी बनायचं याबद्दल तिचं बेफाट गुणगान करणं. भले ती म्हैस जिवंत असताना तिला कधी प्रेमाने चारा खाऊ घातला नसेल. पण ती मेल्यावर तिच्या गुणांची तोंड फाटेस्तोवर स्तुती करायची. बुंदेलखंडी भाषेत या म्हणीशी साधर्म्य दाखवणारी ''मरे पूत की बडी आँखे'' अशी म्हण प्रचलित आहे. तिचाही अर्थ असा की जोवर एखादी व्यक्ती जिवंत असते तोवर तिची कदर नसते. परंतु तीच व्यक्ती मेल्यावर तिच्या महानतेचे पोवाडे गायले जातात. याच म्हणीचे आणखी एक रूप म्हणजे, ''मरे बाबा की पस्सों सी आँखे''. इथला 'पस्सों' म्हणजे मराठीतील पसा किंवा ओंजळ!

एकाच अर्थाच्या, शब्द साधर्म्य दाखवणार्‍या म्हणी कदाचित एका प्रांतात जन्मल्या व त्यानंतर विविध कारण - मार्गे इतर प्रांतांमध्ये प्रचलित झाल्या असेही असू शकेल. पूर्वीच्या काळी सार्थवाह, यात्रेकरू, भटके लोक, यती - मलंग - फकीर - साधू - भिख्खू, भ्रमण करून लोक-मनोरंजन करणार्‍या कलावंत लोकांचे तांडे यांच्याद्वारेही अनेक कथा, म्हणी, शब्दप्रयोग वेगवेगळ्या भागांमध्ये पोहोचले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे होते काय, जरी दोन प्रांतांतील व्यक्तींची बोलीभाषा वेगळी असली तरी त्या त्या सामायिक अर्थाच्या म्हणीने ते आपोआप एकमेकांशी सांधले जातात. वाक्यांची लांबण न लावता त्यांना मोजक्या शब्दांमधून व्यक्त होता येते. शिवाय त्या प्रसंगाला वा परिस्थितीला साजेशी ठसकेबाज म्हण आपल्या संग्रही आहे व ती वापरता येणे  याचा आनंदही औरच असतो!

महाराष्ट्रात ''कोठे राजा भोज आणि कोठे गंगू तेली'' ही म्हण आजही लोकप्रिय आहे. गमतीची गोष्ट की हीच म्हण भारतात इतर अनेक भाषांत अगदी त्याच प्रकारे आढळते. जसे, हिंदीत, 'कहाँ राजा भोज, कहाँ गंगू तेली' तर भोजपुरीत 'कहाँ राजा भोज, कहाँ भोजवा / लखुआ तेली', गुजरातीत 'क्यां गंगाशाह, क्यां गंगा तेली', बंगालीत 'कोथाय राजा भोज, कोथाय गंगाराम तेली', राजस्थानी भाषेत 'कठै राजा भोज, कठै गांगलो तेली', बुंदेलखंडात 'कां राजा भोज, कां डूंठा तेली' अशी या म्हणीची विविध रूपे पाहावयास - ऐकावयास मिळतात.

त्याच प्रकारे आणखी एक म्हण : ''नाचता येईना, अंगण वाकडे.... स्वैपाक करता येईना, ओली लाकडे. '' बंगालीत हीच म्हण 'नाचते न जानले, उठानेर दोष' म्हणून प्रचलित आहे. गुजराती मंडळी ह्या म्हणीला 'नाचतां नहीं आवडे तो के आंगणुं बांकुं' अशा प्रकारे वापरतात.

'महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे वाचती' हे वचन तर प्रत्येक मराठी माणसाला ठाऊक आहे. मोठ्या लोकांवरच कायम संकटे येतात अशा अर्थाच्या म्हणी इतर भाषांतदेखील दिसून येतात. 'बडे गाछेई झड लागे' अशी म्हण बंगालीत प्रसिद्ध आहे. त्याचा अर्थ : मोठ्या वृक्षांनाच वादळ सतावते. (लहान झाडाझुडुपांची वादळात तितकी हानी होत नाही.) बुंदेलखंडी भाषेत हीच म्हण 'बडेई रूख पै गाज गिरत', म्हणजे मोठ्या वृक्षावरच वीज कोसळते, या अर्थाने दिसून येते.

गावांगावांमधून पोटदुखीवर रामबाण उपाय म्हणजे ओवा. त्यावरही एक म्हण प्रचलित आहे, ''ज्याचे पोट दुखेल तोच ओवा मागेल.'' म्हणजे आपण होऊन कोणी चवीला तिखट लागणारा, जिभेला मिरमिरणारा ओवा मागायला वा खायला जाणार नाही. ही म्हण हिंदीत 'जिसका पेट दर्द करता है वहीं अजवाइन खोजता है' म्हणून प्रसिद्ध आहे. आणि बंगालीत तिचे रूप, 'जार माथा मांगे सेई चून खोजे'. म्हणजेच, ज्याचे डोके फुटेल तोच चुना शोधेल.



अनुभवातून आलेलं शहाणपण हे नात्यासंबंधी असो की पोटापाण्याच्या व्यवसायासंबंधी - म्हणींत ते लीलया सामावून जाते. आता ही भोजपुरी म्हणच पहा ना -- ''खाद पडे त खेत, नाहीं त कूडा-रेत |'' म्हणजेच शेतीत जर खत घातले तरच शेती चांगली होते, नाहीतर तिचा फक्त कचरा होतो.  किंवा ''करम टरे त टरे, बाकिर जोत न टरे'' ही म्हण. तिचा अर्थ आहे, भले भाग्य धोका देवो - न देवो, पुरुषार्थ धोका देत नाही. भारतातील शेती पर्जन्याच्या मर्जीवर अवलंबून असते त्याचेच हे प्रतिबिंब म्हणीत दिसून येते. भाग्यात पर्जन्यवृष्टी असो वा नसो, (त्याला न डरता) शेत जोमाने नांगरण्यातच पुरुषार्थ आहे.

''अंधेर नगरी चौपट राजा'' या म्हणीचा हिंदी अवतार म्हणजे ''बेबूझ नगरी बेबूझ राजा.''

एक साधू व त्याचा शिष्य फिरत फिरत एका नगरात आले. साधूने शिष्याला शिधासामग्री खरेदी करण्यासाठी बाजारात पिटाळले. शिष्याने पाहिले तो काय, तिथे बाजारात सार्‍या वस्तू एकाच दामाला मिळत होत्या. मग काय, त्याने त्या पैशांतून भरपूर मिठाई खरेदी केली व साधूकडे परत आला. मात्र साधूला शिष्याचा वृत्तांत ऐकून ती नगरी राहण्यास असुरक्षित वाटली व त्याने लगेच तिथून मुक्काम हालवायचे ठरविले. परंतु शिष्याला तर त्याच नगरीत राहायचे होते. त्याला समजावून सांगितल्यावरही फरक न पडल्याने साधू महाशय शेवटी शिष्याला मागे सोडून एकटेच त्या नगरीतून चालते झाले. इकडे शिष्य रोज भरपूर मिठाई खाऊन चांगला जाडजूड, लठ्ठ झाला.

एके दिवशी त्या नगरीत एक खून झाला. तपास करूनही गुन्हेगार सापडला नाही. तेव्हा राजाने क्रोधित होऊन आज्ञा दिली की या नगरीतील सर्वात लठ्ठ मनुष्याला पकडा आणि त्यालाच फाशी द्या! राजाच्या शिपायांनी लठ्ठ शिष्याला पकडले व फाशी देण्यासाठी राजाच्या समोर आणले. शिष्य गयावया करू लागला की तो खून त्याने केलेला नाही. परंतु राजाने त्याचे काहीही ऐकून घेतले नाही. तेवढ्यात शिष्यावरच्या संकटाची वार्ता ऐकून साधूही तिथे धावत धावत आला आणि म्हणू लागला, ''मला फाशी द्या. तो खून मी केला आहे. या माझ्या शिष्याला सोडून द्या. तो निरपराध आहे. '' हे ऐकून शिपायांनी शिष्याला सोडले व साधूला पकडले. राजासमोर साधूला फाशी होणार तेवढ्यात तो शिष्य तिथे धावत आला व ओरडू लागला, ''खरा खून तर मी केलाय, मलाच फाशी द्या!'' साधू व त्याचा शिष्य या दोघांमध्ये अशा रितीने खरा दोषी कोण यांवरून चांगलीच जुंपली. एक म्हणायचा, 'मी केला खून', तर दुसरा म्हणायचा, नाही, नाही, मीच केला खून!!'' शेवटी राजा चांगलाच बुचकळ्यांत पडला व त्याने दोघांनाही सोडून दिले!  

प्रत्येक म्हणीच्या मागे असणार्‍या उगम कथा बदलतील, पात्रे बदलतील. पण त्यांतून लखलखणारे अस्सल शहाणपण मात्र अनुकरणीय ठरेल. अनेक तपे लोटली तरी त्या म्हणी आजच्या काळालाही तितक्याच लागू आहेत.

खालची ही गोष्ट व म्हण वाचून तुम्हाला सध्याच्या कोणत्या घोटाळ्याची आठवण होते का, पहा बघू!

''आँधर सौंटा'', म्हणजेच अधिकारी पदाला अयोग्य व्यक्तीच्या हाती अधिकार देण्याचे फळही वाईटच मिळते!

त्याची गोष्ट ही अशी :

एका गावात एका माणसाने गावातील आंधळ्या व्यक्तींना भोजन द्यायचे ठरविले. त्याप्रमाणे त्याने सर्व आंधळ्यांना गोळा करून भोजनासाठी पंगतीत बसायला सांगितले. आता त्या माणसाची चलाखी बघा बरं का! त्याला मनातून खरेच त्या आंधळ्यांना भोजन देण्याची अजिबात इच्छा नव्हती. मात्र त्यातून मिळणारे श्रेय,नाव व फुकटची प्रसिद्धी हवी होती. मग त्याने एक युक्ती केली. पंगतीत बसलेल्या पहिल्या आंधळ्याच्या पुढे मिष्टान्नाने भरलेले ताट ठेवले. आंधळ्याने ताट चाचपून पाहिले. आपल्यासमोर ठेवलेले ताट पदार्थांनी भरलेले आहे हे चाचपडून पाहिल्यावर तो निश्चिंत झाला व मागे रेलून बसला. त्या चलाख माणसाने तेच ताट उचलून दुसर्‍या आंधळ्याच्या समोर ठेवले. तोही ताट चाचपडून निश्चिंत झाला. अशा पद्धतीने त्या चलाख इसमाने एकच ताट सर्व आंधळ्यांच्या समोर फिरवले. मग तो सार्‍या अंधांना उद्देशून जोरात म्हणाला, ''बंधूंनो, सर्वांना भोजन वाढले आहे. तेव्हा देवाची प्रार्थना करून भोजनाला सुरुवात करा!''
परंतु कोणाच अंधाच्या पुढे भोजनाचे ताट नव्हते. प्रत्येकाला वाटले की माझे ताट शेजारच्या व्यक्तीनेच पळवले. झाले!! ते एकमेकांवर दोषारोप करू लागले, की तूच माझे ताट चोरलेस! करता करता त्यांच्यात भांडणे लागली आणि एकमेकांची सोट्याने यथेच्छ धुलाई करून ते सारे अंध न जेवताच, भुकेल्या पोटी, जखमी होऊन परत गेले!!

एखाद्या कामात मूर्खपणे अडथळा बनून हटवादीपणा करणार्‍यांसाठी हिंदी भाषेत एक म्हण आहे,
'जो बोले सो घी को जाय'. त्या म्हणीमागे एक मजेशीर कथा सांगतात.
एकदा चार मूर्खांनी एका झाडाखाली एकत्र स्वयंपाक बनवायचे ठरविले. पण स्वयंपाकासाठी लागणारे तूप कोणी आणायचे यावरून त्यांच्यात भांडाभांडी सुरू झाली. शेवटी चौघांनी ठरविले की मौन पाळायचे. आणि त्यांच्यातील जो पहिल्यांदा मौन तोडेल त्यानेच तूप आणायला बाजारात जायचे! आता चौघेही चुपचाप.... आपापसांत काहीही न बोलता, हूं की चू न करता तसेच भुकेल्या पोटी कोण पहिल्यांदा मौन तोडतोय याची वाट बघत रस्त्याच्या कडेला बसून राहिले. बघता बघता रात्र झाली. गस्तीवर असणार्‍या पहारेकर्‍याने त्यांना हटकले. पण चौघांपैकी कोणीच मौन सोडायला तयार नव्हते. शेवटी पहारेकरी त्यांना कोतवालाकडे घेऊन गेला. कोतवालाने त्यांना जाब विचारला तरी कोणी बोलायला तयार होईना! कोतवालाला वाटले की चौघेही त्याचा अपमान करत आहेत. त्याने चारही मूर्खांना चाबकाचे फटके ओढायची शिक्षा फर्मावली. एका मूर्खाला शेवटी तो मार सहन होईना, आणि तो वेदनेने कळवळून जोरात ओरडला, ''अयाईगं!'' त्याबरोबर बाकीचे तिघे जोरात ओरडले, ''आता तूच तूप आणायचेस!!!''

''आज नहीं कल'' या म्हणीमागची गोष्ट माणसाच्या स्वभावावर प्रकाश टाकणारी आहे.
एका नगरीत एक मुसलमान माणूस राहायचा. स्वतःला सच्चा मुसलमान, खुदाचा सच्चा पाईक मानायचा. रोज रात्री एका झाडाखाली बसून तो खुदाची करुणा भाकताना म्हणायचा, ''या खुदा, मला तुझ्यापाशी बोलावून घे.'' एक माणूस त्याचे हे खुदाशी बोलणे रोज ऐकायचा. त्याने एक दिवस या मुसलमानाची कसोटी घ्यायचे ठरविले. त्या रात्री तो झाडावर जाऊन बसला. नेहमीप्रमाणे मुसलमान आला, त्याने खुदाची करुणा भाकली, ''या खुदा, आपकी मोहब्बतमें मुझे आपके पास बुला लो |'' झाले! झाडावर बसलेल्या माणसाने वरून एक फाशीचा दोर खाली सोडला व म्हणाला, ''ये वर माझ्याकडे!'' मुसलमानाला वाटले की खुदाच त्याला वर बोलावतोय. त्याबरोबर तो ''आज नहीं कल,'' असे म्हणत आपल्या घराकडे पळत सुटला! म्हणजेच, मला आज नको, उद्या बोलाव. थोडक्यात मरणाची कल्पना करणे आणि प्रत्यक्षात मरणे यात खूप फरक आहे. आणि जोवर एखाद्या गोष्टीची कसोटी घेतली जात नाही तोवर त्यातील सत्यता कळून येत नाही.  

''टेढी खीर'' म्हणून एक म्हण हिंदीत प्रचलित आहे. एखादी गोष्ट करण्यासाठी खूप कठीण वाटली की ही म्हण वापरतात. त्यामागची कथा अशी : एकदा काही लोक मिळून मोठ्या चुलाण्यावर खीर बनवत होते. एक दृष्टिहीन माणूस तिथेच शेजारी बसला होता. त्या लोकांची आपापसात खिरीबद्दल चर्चा चालली होती. ती ऐकून त्या आंधळ्या व्यक्तीच्या तोंडाला पाणी सुटले. या अगोदर त्याने कधी खीर खाल्ली नव्हती. न राहवून त्याने त्यातील एका माणसाला विचारले, ''भाऊ, कशी असते हो ही खीर?'' त्यावर जमलेल्या लोकांनी सांगितले, ''मस्त पांढरीशुभ्र असते ही खीर!'' आता अंध व्यक्तीला काळे - पांढरे कसे समजणार? अंधाने विचारले, ''मग पांढरीशुभ्र म्हणजे कशी?'' त्यावर लोकांनी उत्तर दिले, ''पांढरी म्हणजे बगळ्यासारखी!'' आता अंधाला बगळा माहीत नव्हता. त्याने विचारले, ''बगळा कसा असतो?'' त्याबरोबर लोकांमधील एकाने आपल्या हाताचा बगळ्यासारखा आकार करून त्या अंधाच्या समोर धरला. अंधाने आपल्या हातांनी तो आकार चाचपडून पाहिला आणि म्हणाला, '' मला नको बुवा अशी खीर! ही तर वाकडी खीर आहे.... मी नाही खाऊ शकणार! उगाच माझ्या घशात अडकून बसायची!!''


''काली मुर्गी सफेद अंडा,'' या म्हणीमागे जनसामान्यात रूढ संकल्पनांचे दर्शन होते. त्यामागील कथा अशी सांगतात : एका नगरात एक श्रीमंत माणूस गृहस्थ राहत होता. तो वर्णाने काळे होता याची त्याला फार खंत वाटायची. एकदा तो अंगणात हिरवी शाल पांघरून बसले असताना एक फकीर फिरत फिरत त्याच्यापाशी आला आणि म्हणाला, ''काय हो हिरव्या रंगाचे कावळे महाशय.... या फकिराला काही देणार की नाही?'' त्या श्रीमंताला आपल्या काळ्या वर्णाचा फकिराने असा उल्लेख केलेला ऐकून खूप राग आला व तो तडक घरात निघून गेला. थोड्या वेळाने तो श्रीमंत पिवळ्या रंगाची शाल पांघरून पुन्हा अंगणात येऊन बसला. काही अवकाशाने आधी येऊन गेलेला फकीर फिरत फिरत पुन्हा त्याच्या अंगणासमोर आला व पुकारता झाला, ''क्यों भई बंगले की मैना, कुछ मिलेगा?'' या खेपेस श्रीमंताने फकिराला एक रुपया दिला. निघताना फकीर टोला लगावायला विसरला नाही, ''कोंबडी काळी असली म्हणून काय झाले.... अंडे तर सफेद देतेय बुवा!!''

साचलेलं धन कितीही का असेना, एक ना एक दिवस ते संपुष्टात येते, या लोकसमजाला पुष्टी देणार्‍या म्हणी अनेक भाषांमध्ये दिसतात. बुंदेलखंडी भाषेत 'खायें खायें पार बडात', बंगालीत 'बोसिया खाईले राजार भंडार टूटे', अशा रूपात त्या समोर येतात.



म्हणींचे जे रांगडेपण आहे, त्यांच्यात त्या त्या गोष्टीला कोणताही मुलामा न देता, लोकलाजेचा कसलाही मुलाहिजा न ठेवता थोडक्यात लोकांपुढे ठेवायचे जे कसब आहे, जो रोखठोकपणा आहे तो शब्दालंकारांनी नटलेल्या लांबलचक, पल्लेदार साहित्यात क्वचितच आढळेल! त्यांच्यात लोकरंजनाबरोबरच उपहास आहे, अनुभवातून आलेले शहाणपण आहे, उद्बोधकता आहे आणि त्यांचा जो गंध आहे तोही मिरमिरणारा.... नाकाला झोंबणारा, डोळ्यांत पाणी आणणारा!

हे लोक नक्की कोणते? तर ते कोणी उच्चतम मानल्या जाणार्‍या साहित्याचे अभ्यासक, उपासक नव्हेत वा कोणी महान विद्वान नव्हेत. कोठे दूर डोंगरांवर - रानांमध्ये वस्ती करून राहणारे, कोणी हातावर पोट असणारे, कोणी पोटासाठी वणवण भटकणारे तर कोणी दोन वेळच्या अन्नासाठी मिळतील ती कामे करून वेळ निभावणारे....  श्रद्धा - अंधश्रद्धांनी घेरलेले, रीती-रिवाजांच्या जगात वावरणारे... जाती, धर्म, समाज, पंथाच्या चौकटींना एकाच वेळी घट्ट चिकटून असलेले आणि त्याचवेळी कैकदा त्यांच्या मर्यादा ओलांडण्याचे धाडसही करणारे... त्यांच्या वापरातील म्हणींमध्ये या सार्‍या राहणीतील, विचारांतील व आचरणातील वास्तव जाणवत राहते.

आणखी एक म्हणजे या म्हणी लोकजीवनात कोणीही वापरू शकते. त्यांना प्रताधिकाराचे, जाती -धर्माचे बंधन नाही. सर्वसामान्य मनुष्याच्या आयुष्यात येणार्‍या वा येऊ शकणार्‍या प्रत्येक प्रसंगासाठी म्हणी रचल्या आहेत.

खास ग्रामीण शैलीतील ''पुरुष वो ही, जो एक दंता होई'' या म्हणीच्या उत्पत्तीची कथा काहीशी अशीच आहे. म्हातारा तितुका न अवघे पाऊणशे वयमान सारखा म्हातारा मनुष्य जेव्हा तरुण, सुस्वरूप वधूची स्वप्ने बघत लग्नाला तयार होतो तेव्हा काय होऊ शकते याची ही मजेदार कथा!

खूप खूप वर्षांपूर्वी एकदा एका वृद्ध विधुराला नोकरीतून सेवानिवृत्त झाल्यावर आपल्या एकटेपणाचा खूप कंटाळा आला. घरी तो एकटाच होता. त्याने लग्न करायचे ठरविले. मध्यस्थाला खूप पैसे देऊ केले आणि आपल्यासाठी (तरुण), सुस्वरूप वधू शोधायला सांगितले. मध्यस्थाने सांगितल्याप्रमाणे लग्न जुळवून आणले. पारंपारिक पद्धतीने विवाह पार पडला. विवाह समारंभ आटोपून स्वगृही परत येताना त्या वृद्धाला आपल्या सुंदर नववधूशी बोलण्याची इच्छा झाली. पण त्याला भीती वाटत होती, की वधू आपल्या म्हातारपणाची थट्टा करेल! म्हणून मग त्याने घोड्यावर स्वार होऊन तिच्या डोलीच्या चारही बाजूंना एखाद्या तरुणाच्या जोषात फेर्‍या मारल्या आणि वधूच्या जवळ येऊन म्हणाला, ''पुरुष वो ही, जो एक दंता होई''. (म्हणजे ज्याच्या तोंडात एकच दात, तोच पुरुष!) कारण त्या वृद्धाच्या तोंडात फक्त एकच दात शिल्लक होता.
त्यावर त्याच्या बायकोने डोलीचा पडदा बाजूला सारून मुखावरचा घुंगट दूर केला आणि म्हणाली, ''नारी रूपवती वो ही, जाँके मुँह में दंत न होई''!! (ज्या स्त्रीच्या मुखात एकही दात नाही, तीच नारी रूपवती होय!) .... याचे कारण??? ती 'नववधू' त्या वृद्धापेक्षाही म्हातारी होती आणि तिच्या तोंडात एकही दात शिल्लक नव्हता!!!  

ऐतिहासिक घटना, प्रसंगांचे पडसादही काही म्हणींमध्ये दिसून येतात. ज्या घटना पुढे लोकोक्तीच्या स्वरूपात जनमानसात टिकून राहतात. बुंदेलखंडात ही एक म्हण प्रचलित आहे : 'घर के जान बराते गये, आलीपुरा कठवा में दये.' या म्हणीचा संबंध भारतातील स्वातंत्र्यपूर्व काळातील संस्थानिकांच्या अजब अनागोंदीच्या राज्यकारभाराशी आहे. म्हणीनुसार कोणी एक सद्गृहस्थ वर्‍हाडी म्हणून एका वरातीत सामील होण्यासाठी रवाना झाले आणि त्यांची रवानगी मात्र झाली आलीपुराच्या कोठडीत! त्यांची कसलीही चौकशी न करता त्यांना कोठडीत डांबण्यात आले. इथे आलीपुरा हे नाव प्रतीक रूपाने वापरण्यात आले असले तरी म्हणीमुळे ते जनमानसात अमर झाले आहे.

तीच गोष्ट रिन्द नदी व फतेहचंद सेठची! एकदा शहाजहान बादशहा आग्र्याहून फतेहपूरला जात होते. वाटेत म्हणे रिन्द रिन्द नामक एक नदी लागायची. तर फतेहचंद सेठ नावाच्या व्यक्तीने बादशहाचा मार्ग सुकर व्हावा म्हणून त्या नदीवर पूल बांधायचे ठरविले. पूल तर बांधून झाला, मात्र मुसळधार पावसामुळे तो पूल कोसळला. त्यावेळी फतेहचंदने प्रतिज्ञा केली की काहीही होवो, पूल पुन्हा बांधायला लागला तरी चालेल, पण तो बांधेन तरच नावाचा फतेहचंद! आणि त्याने खरोखरी बादशहाच्या आगमनाअगोदर तो पूल पुनश्च बांधला. तेव्हापासून एक म्हण रूढ झाली, 'कै रिन्द रिन्द ही नहीं, कै फतेहचंद ही नहीं |' आणि आजही ही म्हण वापरण्यात येते.

समाजाची नैतिक जडणघडण, मानसिकता, स्थित्यंतरे, विचारधारा, आचार-व्यवहार या सर्वांचे प्रतिध्वनी आपल्याला म्हणींच्या रूपातून अभ्यासण्यास मिळतात. त्याचबरोबर त्यांची भाषा, शब्द, शैली हेही समाजाच्या वेगवेगळ्या पैलूंचे दर्शन देतात. म्हणी व त्यांमागील कथा हे एका प्रकारे कष्टकरी, श्रमिक जनतेने रचलेले साहित्य ग्रंथच होत. त्यांच्या रूपाने आपल्याला त्या त्या समाजाचे, व्यक्तींचे अनुभव संक्षिप्त रूपात ज्ञात होतात. हा त्यांच्या अनुभवांचा इतिहासच म्हणा ना! आणि त्या अनुभवाचे सौंदर्य वादातीत आहे.


--- अरुंधती कुलकर्णी

------------------------------------------------------------------------------------
ह्या लेखातील काही भाग येथे पूर्वप्रकाशित झाला आहे :
http://mfda2011.blogspot.com/2011/10/mhaninchya-rajyat.html

माहिती स्रोत : आंतरजाल व म्हणींचे अर्थ सांगणारी पुस्तिका.

Saturday, October 29, 2011

बंड्याची दिवाळी


आजही नाक्यावर बंडू नेहमीसारखाच चकाट्या पिटत उभा होता. बंडोपंत उर्फ बंडूला मी तो नाकातला शेंबूड शर्टाच्या बाहीला पुसत गल्लीत लगोरी किंवा विटीदांडू खेळायचा तेव्हापासून ओळखते. गेल्या पाच - सहा वर्षांमध्ये बंडू खूप बदलला आहे. एका चांगल्या कंपनीत उत्तम पगाराची नोकरी, त्याच्या इतकेच शिकलेली व नोकरी करणारी बायको, नोकरीनिमित्ताने परदेशाची वारी, कंपनीच्या खर्चाने वेगवेगळ्या शहरांत व हॉलिडे होम्समध्ये घालवलेल्या सुट्ट्या यांनंतर ''हाच का तो आपला (जुना) बंडू'' असे म्हणण्याइतपत त्याने जोरदार मुसंडी मारली आहे. मात्र नाक्यावर उभे राहून टंगळमंगळ करत चकाट्या पिटायची त्याची जुनी खोड अद्याप गेलेली नाही. ती तशीच बाकी आहे.

किंचित सुटलेलं पोट ढगळ टी-शर्ट व जीन्सच्या आड लपवत 'शर्मा स्वीट्स'च्या बाहेर उभा असलेला बंड्या पाहून मी त्याला जोरदार हाळी दिली, ''काय बंड्या, काय म्हणतोस? '' (दचकू नका, मला अशी सवय आहे रस्त्यात जोरदार हाळी द्यायची!! ) बंड्याने हातातली सिगरेट घाईघाईने चपलेखाली चुरडली आणि ओळखीचे हसत माझ्या समोर आला, ''कायऽऽ मग!! आज बर्‍याच दिवसांनी!!''
हे आमचे सांकेतिक संभाषण प्रास्ताविक असते. किंवा खूप दिवसांनी भेटल्यासारखं ''वा वा! अलभ्य लाभ!! '' म्हणत हस्तांदोलन करायचं. (आम्ही भल्या सकाळी तापवायला ठेवलेलं दूध नासलं म्हणून चरफडत गल्लीतल्या वाण्याकडून किंवा डेअरीतून दुधाची पिशवी पारोशी, अजागळ अवतारात घेऊन येत असताना रस्त्यात एकमेकांशी  झालेली नजर-भेट ही प्रत्यक्ष भेटीमध्ये गणत नाही हे प्लीज नमूद करून घ्यावे!) नशीब हेच की अजून तरी बंड्या ''लाँग टाईम नो सी यार.... '' ने गप्पांची सुरुवात करत नाही. तर, त्याही दिवशी त्या ''बर्‍याच दिवसांनी''च्या गजरानंतर अपेक्षित क्रमाने आजचे तापमान,  पुण्याची हवा, रस्त्याचे ट्रॅफिक, वाढते बाजारभाव, सुट्ट्या आणि ऑफिसातले काम यांची ठराविक स्टेशने घेत घेत आमची गाडी एकदाची दिवाळीच्या खरेदीवर आली.

''काय मग, या वर्षी काय म्हणतेय दिवाळी? '' मी नेहमीचा प्रश्न विचारला. त्यावर मला त्याचे नेहमीचेच उत्तर अपेक्षित होते. (लक्षात ठेवा, इथे अनपेक्षित उत्तरे येणे अजिचबात अपेक्षित नसते. कारण त्यावर तितका काथ्याकूट करण्याइतका वेळ दोन्ही संभाषणकर्त्या पक्षांकडे असावा लागतो! )

पण बंड्याने या खेपेस आपण बदललोय हे सिद्ध करायचेच ठरविले असावे बहुदा! दोन्ही हात डोक्यामागे घेत एक जोरदार आळस देत तो उद्गारला, ''आऊटसोर्स केली दिवाळी यंदा! ''

''आँ?? .... म्हणजे रे काय? ''

''अगं सोपंय ते.... तुला(ही) कळेल! ''

''अरे हो, पण म्हणजे नक्की काय केलंस तरी काय? ''

''काय म्हणजे... नेहमीची ती दिवाळीची कामं, सफाई, सजावट, फराळ, आकाशकंदील, किल्ला.... सगळं सगळं आऊटसोर्स केलं... ''

''ए अरे वत्सा, मला जरा समजेल अशा भाषेत सांग ना जरा! ''

''अगं, पहिलं म्हणजे ती घराची सफाई.... आई-बाबा, बायको जाम कटकट करतात त्याबद्दल. मला तर वेळ नसतोच आणि बायकोला देखील इतर खूप कामं असतात. मग मी पेपरमध्ये नेहमी जाहिरात येते ना एक... त्या घराची सफाई करून देणार्‍या एका कंपनीलाच आमचं घर साफ करायचं कंत्राट देऊन टाकलं. त्यांनी पार गालिचा, सोफासेट व्हॅक्युम करण्यापासून भिंती-छत-खिडक्या वगैरे सगळं साफ करून दिलं बरं का! है चकाचक! पैसा वसूऽऽल!''

''मग बायकोनं बाकीची किरकोळ स्वच्छता घरकामाच्या बाईंकडून करून घेतली. एक दिवस मी चार प्रकारच्या मिठाया, सुकामेवा घरी आणून ठेवला. फराळाची ऑर्डर बाहेरच दिली. श्रेयासाठी रविवार पेठेत एक मस्त रेडीमेड किल्ला विकत मिळाला. आकाशकंदील तर काय झकास मिळतात गं सध्या बाजारात! त्यातला एक श्रेयाच्या पसंतीने खरेदी केला. आणि हे सगळं एका दिवसात उरकलं, बाऽऽसच! तेव्हा दिवाळीच्या घरकामाचं नो टेन्शन! मलाही आराम आणि बायकोलाही आराम! ''



''वा! '' मी खूश होऊन म्हटलं, ''मग आता बाकीची दिवाळी मजेत असेल ना? ''

''येस येस! '' बंड्या खुशीत हसला. ''या वेळी बायको पण जाम खूश आहे! तिला पार्लर आणि स्पा ट्रीटमेंटचं गिफ्ट कूपन दिलं दिवाळी आधीच! मी देखील स्पा मध्ये जाऊन फुल बॉडी मसाज वगैरे घेऊन आलो. सो... नो अभ्यंगस्नान! आता दिवाळीचे चारही दिवस रोज सकाळी वेगवेगळे नातेवाईक, मित्रमैत्रिणींना भेटायला आम्ही मोकळे!! ''

''म्हणजे? रोज घरी बोलवताय की काय त्यांना? '' मी आश्चर्याने बंड्याचा घरी माणसांची गर्दी होण्याबद्दलचा फोबिया आठवत विचारलं.

''छे छे!! तसलं काय नाही हां! कोण त्यांची उस्तरवार करणार! त्यापेक्षा आम्ही रोज एकेका ग्रुपला एकेका दिवाळी पहाटेच्या कार्यक्रमाला भेटतो. कार्यक्रम आवडला तर सगळा वेळ तिथे बसतो, नाहीतर तिथून कलटी मारतो. मग मस्तपैकी बाहेरच कोठेतरी ब्रेकफास्ट किंवा ब्रंच करायचा.''

''आणि बाकीचा दिवस?''

''रोज स्पेशल प्लॅन बनवतो आम्ही! लांब ड्राईव्हला जायचं... पुण्यात भटकायचं. कुठं प्रदर्शन असेल तर ते बघून यायचं. दुपारी मस्त डाराडूर झोप काढायची. संध्याकाळी सोसायटीत काहीतरी कार्यक्रम असतोच. परवा दीपोत्सव होता. ते रांगोळ्या, आकाशकंदील - किल्ला बांधायची स्पर्धा, फॅशन शो, कॉमन फराळ, गाण्यांचा कार्यक्रम वगैरे असं असतंच काहीतरी... नाहीतरी फॅडच आहे त्याचं सध्या! आमच्या नाही तर शेजारच्या सोसायटीत, तिथं नाही तर जवळच्या बागेत असे कार्यक्रम असतातच गं! तुला मजा सांगू? आमच्या सोसायटीत तर आम्ही या वर्षीपासून फटाके फुल बॅनच केलेत. गेल्या वर्षी पाठाऱ्यांच्या पोरानं पार्किंगमधील वाहनंच पेटवायची बाकी ठेवली होती फटाके पेटवायच्या नादात! आगीचा बंब बोलवायला लागला होता. त्यामुळे नो फटाके.... नो ध्वनिप्रदूषण! सोसायटीत जायचं किंवा क्लबमध्ये. आणि तिथं बोअर झालो तर मग नदीकाठी फायरवर्क्स बघायला जायचं. भन्नाट मजा येते! येताना पुन्हा बाहेरच काहीतरी खायचं किंवा घरी पार्सल. रात्री डीव्हीडीवर किंवा टाटा स्कायवर मस्त पिक्चर टाकायचा.... किंवा गप्पा... अंताक्षरी... फुल धमाल! ''



''सह्ही आहे रे! खरंच मस्त एन्जॉय करताय दिवाळी तुम्ही. आता भाऊबीजेला बहिणींकडे जाणार असशील ना? ''

''नो, नो, नो! त्यांनाही आम्ही सर्व भावांनी बाहेरच भेटायचं ठरवलंय... प्रत्येकीकडे जाण्यायेण्यातच खूप वेळ जातो! शिवाय त्याही नोकऱ्या करतात... त्यांनाही काम पडतं. मग आम्ही सगळ्यांनी मिळून एका हॉटेलमध्ये टेबल बुक केलंय, तिथेच त्या मला व इतर भावांना ओवाळतील, त्यांना त्यांच्या गिफ्ट्स द्यायच्या, ट्रीट द्यायची की झालं! ''

''अरे ते नातेवाईकांचं ठीक आहे... पण तुझ्या कलीग्ज आणि बॉस लोकांकडे तरी तुला स्वतःला जावं लागत असेल ना? ''

''हॅ हॅ हॅ... अगं आमच्या ऑफिसात दिवाळी पार्टी त्यासाठीच तर अ‍ॅरेंज करतात.... तिथल्या तिथं काय त्या शुभेच्छा, गिफ्ट्स वगैरे एक्सचेंज करायचं. फार कटकट नाही ठेवायची! ''

''गुड! म्हणजे ही दिवाळी अगदी टेन्शन-फ्री दिवाळीच म्हण की! ''

''मग!!??!! इथं रोज मर मर मरायचं कामाच्या अन् टेन्शनच्या ओझ्याखाली, आणि हक्काच्या मिळालेल्या दोन-तीन सुट्ट्या देखील ती लोकांची उस्तरवार करण्यात, घरात काम करण्यात नाहीतर नको असणार्‍या लोकांच्या भेटीगाठीत घालवायची म्हणजे फार होतं! हे कसं सुटसुटीत! ''

''अरे पण एवढे सगळे खर्च जमवायचे म्हणजे जरा कसरत होत असेल ना? ''

''ह्यॅ! तो खर्च तर तसाही होत असतोच! तू सांग मला... कुठं होत नाही खर्च?.... मग स्वतःच्या आरामावर खर्च केला तर कुठं बिघडलं? ''

बाप रे! यह हमारा ही बंड्या है क्या? मी डोळे फाडफाडून बंड्याकडे बघत असतानाच त्याचा सेलफोन वाजला आणि तो मला ''बाय'' करून फोनवर बोलत बोलत दिसेनासा झाला. पण माझ्या मनातलं विचारचक्र सुरू झालं होतं....

बंड्याचं लॉजिक तर ''कूल'' होतं. येऊन जाऊन खर्च करायचाच आहे, तर तो स्वतःसाठी का करू नये? स्वतःच्या व कुटुंबाच्या ''हॅपी टाईम'' साठी का करू नये? आणि तरीही त्याच्या बँक बॅलन्सची मला उगाच काळजी वाटू लागली होती. एवढे सगळे खर्च हा आणि ह्याची बायको कसे जमवत असतील? कदाचित वर्षभर त्यासाठी पैसे वेगळे काढत असतील.

एखाद्या गुळगुळीत कागदाच्या कॉर्पोरेट ब्रोशर सारखी बंड्यानं त्याची दिवाळीही गुळगुळीत, झुळझुळीत कशी होईल ते पाहिलं होतं. त्यात कचरा, पसारा, गोंधळ, धूळ, घाम, धूर, प्रदूषणाला किंवा टेन्शनला काहीएक स्थान नव्हतं. नोकरी-व्यवसायाच्या निमित्तानं घराबाहेर बारा - चौदा तास राहणाऱ्या, कामापायी रोज असंख्य प्रकारच्या तणावांना झेलणाऱ्या बंड्यासारख्या तरुणांना आपले सुट्टीचे दिवस तरी कोणत्याही गोंधळाशिवाय, आपल्या मर्जीनुसार घालवायचं स्वातंत्र्य असायलाच पाहिजे, नाही का? की तिथेही आपल्या आशा - अपेक्षांचं ओझं त्यांच्या माथी मारायचं?

बंड्याच्या आईवडीलांना पटत असेल का हे सारं? पण त्यांचा तरी तसा थेट संबंध येतोच कुठं? गेली दोन वर्षं बंड्या वेगळा राहतो. तो मजेत, त्याचे आईवडील मजेत. सगळेच तर मजेत दिसत होते....

मग माझ्या मनात ही कोणती सूक्ष्मशी कळ उमटत होती?

कदाचित बंड्याच्या लेखी दिवाळी हा फक्त एक ''एन्जॉय'' करायचा ''हॉलिडे'' म्हणून उरला होता, त्याबद्दल होती का ती कळ? की कोणत्या तरी जुन्या बाळबोध स्मृतींना उराशी कवटाळून ते चित्र आता किती वेगानं बदलतंय या रुखरुखीची होती ती कळ? गेल्या अनेक पिढ्या दिवाळी अमक्या ढमक्या पद्धतीने साजरी व्हायची, म्हणून आपणही ती तशीच साजरी करायची या अनुकरणशील धाटणीच्या विचारांना छेद जाण्याची होती का ती कळ?  त्या वेदनेत आपली वर्तमान व भविष्याबद्दलची, आपल्या आचार-विचारांबद्दलची अशाश्वती जास्त होती, की आधीच्या पिढ्यांनी जे केलं ते सगळंच सगळं चांगलं, उत्तम, हितकारीच असलं पाहिजे हा भाबडा विश्वास?  

कोणीतरी म्हटल्याचं आठवलं, ''Ever New, Happy You! ''

काळाप्रमाणे बदलत गेलं तर त्यात खरंच का आपला ''र्‍हास'' होतो? आणि र्‍हास नक्की कशाचा होतो.... व्यक्तीचा, कुटुंबाचा, समाजाचा की देशाचा? की विचारांचा व मूल्यांचा? जे चांगलं असेल ते टिकेल हाही एक भाबडा विश्वासच, नाही का? नाहीतर आधीच्या कितीतरी चांगल्या गोष्टी मुळात लयाला गेल्याच नसत्या! कुटुंबसंस्था बदलली तशी सण साजरे करायची पद्धतही बदलत गेली व बदलते आहे. नशीब हेच की आजच्या पिढीला किमान दिवाळी साजरी करायची असते हे तरी माहीत आहे आणि मान्यही आहे. तशीही उठसूठ दिसणार्‍या व मनःपटलावर आदळणार्‍या जाहिरातींची व मालिकांची ती एक प्रकारे कृपाच आहे! संस्कृतीचे दळण लावून लावून ते जाहिरातदार व मालिका दिग्दर्शक एखादा सण साजरा करण्याचे व तो ठराविक स्टॅंडर्डने साजरा करण्याचे प्रेशरच आणतात तुमच्यावर! तुमच्या मानगुटीवर जाहिरातीतील सुळसुळीत कल्पना ते इतक्या बिनबोभाट बसवतात आणि त्या कल्पनांच्या तालावर आपण कधी नाचायला लागतो तेच आपल्याला कळत नाही....!!!

मग संस्कृती खरंच कुठे लुप्त पावते का? की एक अंगडाई घेऊन नव्या साजशृंगारात सामोरी येते? नव्या आचारतत्वांनुसार तिनेही का बदलू नये? कदाचित आणखी दहा-वीस वर्षांनी दिवाळी हा ग्लोबलाईझ्ड सण असेल. किंवा भारतात जगाच्या कानाकोपर्‍यातले, सर्व धर्म-संस्कृतींमधले यच्चयावत सण साजरे होत असतील. तसंही पाहायला गेलं तर दिवाळी किंवा इतर सणांमागच्या पौराणिक कथांशी तर नव्या पिढीचा संपर्क तुटल्यात जमा आहे. त्यांना त्या गोष्टींशी त्या आहेत तशा स्वरूपात रिलेटच करता येत नाही. त्यांच्या १००१ प्रश्नांना आमच्याकडे उत्तरं नाहीत. (कारण आम्ही ते प्रश्न कधी विचारलेच नाहीत.... ना स्वतःला, ना मोठ्या मंडळींना! ना त्यांच्यावर कधी विचार केला...!! ) आता ही चिमखडी पोरं जेव्हा पेचात टाकणारे प्रश्न विचारतात तेव्हा त्यांना काहीतरी सांगून त्यांचे शंकासमाधान करावे लागते. पण त्यांचे कितीतरी प्रश्न अनुत्तरितच राहतात.....

इतर ठिकाणी ग्लोबलाईझ्ड अर्थव्यवस्थेची मूल्ये अंगिकारायची - नव्या विचारधारा - आचार - जीवनपद्धती स्वीकारायची, मात्र सांस्कृतिक - सामाजिक चित्र जसे (आपल्या मनात) आहे तसेच राहावे अशी इच्छा ठेवायची यातील विरोधाभास कितपत सच्चा व कितपत मनोरंजक?

बंड्यानं किमान स्वतःपुरतं तरी ''हॅपी दिवाळी'' चं सोल्युशन शोधलं आहे. त्याच्या उत्तरानं त्याचा काय फायदा, काय तोटा होईल हे काळच सांगेल... पण त्यात इतरांचा तरी आर्थिक फायदाच आहे! आणि कोणास ठाऊक, कदाचित आणखी आठ - दहा वर्षांनी त्याची मुलगी श्रेया जरा मोठी होईल, तोवर त्याचं हेही समीकरण बदलेल. कारण तेव्हाची संस्कृती पुन्हा वेगळं वळण घेऊ पाहत असेल!!

-- अरुंधती