Monday, May 24, 2010

महिला कारागृहात काही तास

(छायाचित्र स्रोत : विकिपीडिया)

आजची काही माझी तुरुंगातली पहिली वेळ नव्हती. ह्या आधीही दोनदा आले होते मी इथे. पण दोन्ही खेपेस जरा घाईगडबडीत होते. ह्या वेळेला मात्र ठरवले होते की निवांतपणे जायचे. गेल्या खेपांमध्ये फक्त स्त्री कैद्यांच्या बराकी, भटारखाना आणि रोजगार प्रशिक्षणाची पत्र्याची शेड एवढाच परिसर ओझरता पाहिलेला. त्या भेटीत पाहिलेल्या  बराकींमध्ये भिंतीलगत गुंडाळून ठेवलेल्या वळकट्या व दोर्‍यांवर लटकणार्‍या कपड्यांखेरीज ओक्याबोक्या भिंती होत्या फक्त! आणि त्याच दिवशी एका कैदी स्त्रीने आवारातील दुरुस्ती-कामासाठी आणलेली बांबूची शिडी वापरून जेलच्या भिंतीवरून उडी टाकून पळून जायचा असफल प्रयत्न केला होता - त्यामुळे चालू असणारा गदारोळ होता तिथे. शिवाय त्या बाकी कैद्यांच्या निर्विकार नजरा. 

स्थळ होते पुण्याच्या येरवड्याच्या महिला तुरुंगाचे. वेळोवेळी काही प्रसिद्ध तर काही कुख्यात व्यक्तींमुळे येरवडा तुरुंग कायमच चर्चेत राहिला. पुणे शहराकडून येरवड्याला जाताना रस्त्याच्या एका बाजूला दिसणारी त्याची काळीकभिन्न, छाती दडपविणारी उंच तट-भिंतच मी आतापर्यंत पाहत राहिले. पण कधी आतही डोकावेन असे स्वप्नात वाटले नव्हते.

एका आंतरराष्ट्रीय महिला क्लबच्या पुणे शाखेने मला एका समाजसेवी संस्थेमार्फ़त येरवड्याच्या महिला तुरुंगात तेथील कैद्यांसमवेत सत्संग करण्यासाठी खास आमंत्रित केले होते. जवळपास दोन-तीन वर्षांपूर्वीची, म्हणजे महिलांसाठी ''खुल्या कारागृहाची'' सुविधा उपलब्ध होण्याअगोदरची ही घटना. माझ्याबरोबर इतर गायक कलाकार, वाद्यवृंद व संस्थेचे दोन-तीन स्वयंसेवक होते. 

त्या दिवशी भर दुपारी गाडीतून तुरुंगाच्या आवारात, रणरणत्या उन्हात पाऊल टाकल्यावर काही क्षण आम्ही अक्षरशः भाजून निघालो. हवेत विलक्षण उकाडा. पण तुरुंगाच्या प्रवेशद्वारापाशी लेडीज क्लबच्या हसऱ्या सदस्या आमच्या स्वागताला सज्ज असलेल्या पाहून छान वाटले. ह्या सदस्या गेले अनेक महिने महिला कैद्यांसाठी तुरुंगात उपक्रम राबवित असल्याने तेथील वातावरणाला सरावल्या होत्या. स्त्री कैद्यांसाठी सतत काही ना काही चांगले करण्याच्या त्यांच्या धडपडीचे खरेच कौतुक करावेसे वाटत होते. सुरुवातीची काही मिनिटे आम्ही तेथील सुरक्षा कर्मचारी, तुरुंगात अभ्यासक्रमाचा भाग म्हणून भेटीदाखल येणाऱ्या समाजसेवा अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनी व सेवाकार्यासाठी नेहमी येणाऱ्या महिला क्लबच्या सदस्या यांच्याशी बोलून कैद्यांविषयी माहिती घेण्यात घालवला. 

येथील बऱ्याचशा महिला ह्या 'अंडरट्रायल' आहेत हे समजले. म्हणजे त्यांच्यावरचे आरोप अजून सिद्ध झाले नाहीत व त्यांच्यावरचे दावे कोर्टात चालू आहेत.  त्यामुळे त्या कैद्यांच्या संख्येत रोजच भर किंवा घट होत असते. काहीजणींना जामीन मिळतो,  काहीजणींना जामीन मिळूनही त्याचे पैसे भरता न आल्याने पुन्हा तुरुंगातच राहावे लागते. बऱ्याचजणी विवाहितेचा छळ, मारामारी,चोऱ्या -दरोडे आणि अन्य किरकोळ गुन्ह्यांमध्ये अडकून तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. खुनाच्या किंवा गंभीर आरोपांखाली तुरुंगात असलेल्या महिला खूपच कमी आहेत. शिक्षा भोगून बाहेर पडणार्‍या महिलांचे पुनर्वसन हीदेखील मोठी समस्या असल्याचे कळले. घरचे, नातेवाईक, गावातले लोक त्यांना अनेकदा स्वीकारत नाहीत. मादक पदार्थ बाळगणे - सेवन करणे इ. इ. आरोपांवरून काही परदेशी महिलाही आत आहेत. अनेक गरीब, अनाथ महिला केवळ बाळंतपण सरकारी खर्चाने सुखरूप व्हावे व आपला व बाळाचा उदरनिर्वाह काही महिने तरी व्यवस्थित व्हावा ह्यापायी गर्भारपणाचे दिवस भरत आले की किरकोळ गुन्हे करून पकडल्या जातात व नंतर तुरुंगात सरकारी इतमामाने बाळंतपण करून घेतात हेही विदारक वास्तव समजले.  तसेच दुसऱ्याच कोणी गुन्हा करून हकनाक गुन्ह्यात गोवलेल्या महिलाही येथे बऱ्याच आहेत. खूपशा महिला ग्रामीण भागातील असून त्यांचे फारसे शिक्षणही झालेले नाही. बाळंत झालेल्या किंवा ज्यांची मुले अगदी लहान आहेत त्या महिलांना येथे आपल्यासोबत आपली मुले ठेवण्याची मुभा असते. त्या मुलांच्या राहण्या-खाण्या-कपड्यालत्त्याचा, औषधाचा व शिक्षणाचा खर्च सरकार करते.  

सुरक्षा तपासणी वगैरे उरकून, सोबतच्या चीजवस्तू पहाऱ्याकडे सोपवून, रजिस्टरवर सह्या ठोकून आम्ही त्या अरुंद (बरोबर! अगदी पिक्चरमध्ये दाखवतात तशा) छोट्या दरवाज्यातून आपापली डोकी सांभाळत आत शिरलो. सोबत महिला सुरक्षा कर्मचारी होत्याच, त्यांच्या हातात मस्त दंडुकेही होते. आवारात ह्या खेपेस कोणी महिला कैदी दिसत नव्हत्या. बहुतेक सगळ्याजणी सत्संगाच्या ठिकाणी जमल्या असाव्यात किंवा आपापल्या केसेससाठी कोर्टात गेल्या असाव्यात.

जाता जाता आम्हाला एकांत कोठड्यांचेही दर्शन झाले. तिन्ही बाजूंनी भिंती, कोणतीही प्रायव्हसी नसलेल्या, एक बाजू पूर्ण जाळी व गजांनी आच्छादित बंदिस्त अशा स्वरूपाच्या त्या अरुंद, चौकोनी, अंधाऱ्या खोल्या बघताना उगाचच अंगावर शहारा आला. आवारातल्या झाडाझुडुपांच्या मधून काढलेल्या पायवाटेने जात आम्ही सत्संगाच्या ठिकाणी पोचलो. पत्र्याचे छत असलेली ही एक लांबलचक खोली. खिडक्यांना भरभक्कम गज. आत शिरायला एकच दरवाजा आणि तोही छोटासा. गेल्या खेपेस आले होते तेव्हा ही फक्त पत्र्याची शेड होती. आता तिथे पक्के काम करून महिलांना रोजगार प्रशिक्षण देण्याची सोय केलेली दिसत होती. खोलीच्या एका कोपऱ्यात सरकावून ठेवलेली शिवण- विणकाम यंत्रे, कपडे वाळत घालण्याच्या दोऱ्यांवरचे दीनवाणे कपडे बरेच काही सांगून जात होते.  समोर साधारण दीडशे-दोनशे महिला कैदी शिस्तीत सतरंज्यांवर आमची वाट बघत बसलेल्या. ''साऊंड''वाल्याची सर्व सेटिंग्ज पूर्ण होईपर्यंत तेथील स्टेजवर आम्ही वाद्यांची जुळवाजुळव केली. एका स्वयंसेवकाने लिलीच्या फुलांचा भरघोस, टवटवीत हार आणला होता. तो तेथील वेदीवरील सर्वधर्मीय ईश्वर प्रतिमांना एकत्रितपणे घातल्यावर त्या काहीशा कोंदट, घामेजल्या हवेत चैतन्याचा दरवळ पसरला.

ध्वनिक्षेपक सुरू होताच मी सर्वांना सत्संगात सामील होण्याचे आवाहन केले. समोरून ढिम्म प्रतिसाद. अर्थात ते अपेक्षित होतेच! सर्व बायका कोऱ्या, उखडलेल्या चेहऱ्यांनी बसलेल्या. एक डोळा सुरक्षा कर्मचाऱ्यांवर व एक आमच्यावर. साहजिकच होते म्हणा.... त्या सगळ्याजणी दाटीवाटीने भर उकाड्यात आमची वाट पाहत बसलेल्या. त्यातून वॉर्डनचा व सुरक्षा कर्मचाऱ्यांचा टरका डोळा आणि दुसरीकडे मनातली धुसफूस... त्यांच्याकडून वेगळी अपेक्षा करणेच चुकीचे होते.

मी काही क्षण डोळे मिटले, मनातले सर्व विचार समर्पित केले आणि शांत मनाने सत्संगाची सुरुवात नेहमीप्रमाणे अतिशय सोप्या गणेशवंदनेने केली. तबला, गिटार, सहगायकाचे व टाळाचे स्वर एकमेकांमध्ये मिसळून वातावरणात उत्साहाची पेरणी करत होते. पण अजून समोरून थंड प्रतिसाद होता. नाही म्हणायला बऱ्याच बायका हात जोडून बसल्या होत्या किंवा तालावर टाळ्या वाजवत होत्या. पण चेहरे व देहबोली अजून तशीच होती... आखडलेली, आक्रसलेली. त्या गणेश भजनाचा समारोप केल्यावर मी पुन्हा एकदा सर्व महिलांना माझ्या बरोबर, चुकत माकत का होईना, गाण्याचे आवाहन केले. संगीताच्या सुरांमधील मन हलके करण्याची जादू त्यांनी अनुभवावी, काही क्षण साऱ्या चिंता बाजूला ठेवून गाण्यात स्वतःला मुक्तपणे झोकून द्यावे असे मला प्रामाणिकपणे वाटत होते.  

येथे सर्व धर्मांच्या स्त्रिया होत्या. म्हणूनच नंतरचे भजन सर्व-धर्म-समावेशक घेतले. अल्लाहचे नाव आल्यावर पुढे बसलेल्या तिघी-चौघींच्या कळ्या खुलल्या आणि त्या जरा मोकळेपणाने टाळ्या वाजवू लागल्या. बुद्धाचे नाव येताक्षणी अजून काही चेहरे उजळले. विठ्ठलाचे नाव आल्याबरोबर नऊवारी, पाचवारीतल्या, ग्रामीण भागातून आलेल्या अनेक  महिला कैदी जोषाने टाळ्या वाजवू लागल्या. जीझसचा पुकारा करताक्षणी सहाव्या-सातव्या ओळीत बसलेल्या तीन-चार आंग्ल युवती डोलू लागल्या. थोडक्यात काय, समोरच्या श्रोत्यांमध्ये आता थोडा उत्साह दिसू लागला होता. काहीजणींच्या चर्येवर अस्फुटसे स्मितही उमटले होते. त्यांच्या त्या स्मितानेच मला अजून ऊर्जा मिळत होती.

मग पुढेही आम्ही म्हणायला सोपी, वेगवान, नादपूर्ण भजने गाऊ लागलो. सुरुवातीला गाताना संकोच करणाऱ्या बायका हळूहळू भीड चेपली जाऊन खुलेपणाने गाऊ लागल्या होत्या. मध्येच दोन-तीन बायका खोलीच्या मागच्या बाजूला उभ्या राहून भजनाच्या तालावर डोलू-नाचू लागल्या. विठ्ठलाचे भजन सुरू झाल्यावर तर चित्रच पालटले. डोळे मिटून, तालावर पावले टाकणाऱ्या महिलांना अजून काहीजणी सामील झाल्या. त्यांचा नाच फेर धरून  जसजसा रंगात येऊ लागला तसतशा त्या आंग्ल युवतीही उठून त्यांच्या परीने ठेका धरत नाचू लागल्या. आता माझ्या समोर बसलेल्या बायकांनाही हुरूप आला. आपापल्या साड्या झटकत, पदर खोचून त्यातील काहीजणी फुगडी, काहीजणी झिम्मा खेळू लागल्या. एका वेळी दोन-दोन, तीन-तीन जोड्या फुगड्या खेळत होत्या. कोणाचा विश्वास बसणार नाही अशा पद्धतीने वातावरण खेळकर बनले. झिम्मा खेळताना त्यांचे चेहरे फुलून आले होते. चुरशीच्या फुगडीत त्यांना शरीर झोकून मस्त रममाण होताना पाहून त्याच का त्या मगाच्या निर्विकार-कोऱ्या चेहऱ्यांच्या, सुन्न बसलेल्या किंवा खुन्नस देऊन पाहणाऱ्या बायका, असा प्रश्न कोणालाही पडला असता. बघता बघता काही तुरळक कैद्यांचा अपवाद सोडला तर बाकी सर्व बायका नाचू, गाऊ लागल्या होत्या. चेहर्‍यावरच्या रागाची, नैराश्याची, असमाधानाची जागा आता प्रफुल्लित खेळकरपणाने घेतली होती. काहीजणी डोळे मिटून तल्लीन होऊन एकट्याच नाचत होत्या. गतिमान गाण्यांसोबत त्यांची पावलेही थिरकत होती. 

वेळ संपत आली तशी हळूहळू गाण्यांची गती मंदावत आम्ही भजने थांबविली. सर्वांना डोळे मिटून शांत बसायला सांगितले. धपापत्या उरांनी, घामाने डवरलेल्या चेहऱ्याने स्थानापन्न होत सर्व बायकांनी आज्ञाधारकपणे डोळे मिटले आणि आपला श्वास सावरायची वाट पाहू लागल्या. काही बायका अजूनही टक्क, साशंक डोळ्यांनी इकडे तिकडे पाहत होत्या. डोळे बंद करायची त्यांची अजिबात तयारी नव्हती. मी सर्वांना आपल्या श्वासाकडे लक्ष घेऊन जायला सांगितले. शरीरात निर्माण झालेली ऊर्जा अनुभवायला सांगितली. त्यांचे एक छोटेसे, मन शांत करणारे ध्यान घेतल्यावर त्यांना जेव्हा डोळे उघडायला सांगितले तेव्हा कित्येकींच्या चेहऱ्यांवर हास्यरेषा उमटल्या होत्या. जणू त्या काही मिनिटांमध्ये निर्व्याज समाधानाचा सुगंधी दरवळ त्यांनी अनुभवला होता! 

.....  पण वास्तवही वेगळे असते! सत्संग संपल्याचे सूचित केल्यावर महिला क्लबच्या सदस्यांनी माईकचा ताबा घेतला. तेथील स्त्री कैद्यांच्या छोट्या मुलांसाठी त्यांनी नव्या कोऱ्या, फुगे - झिरमिळ्या लावलेल्या तीन-चाकी सायकली आणल्या होत्या. सायकली पाहिल्यावर एवढा वेळ बाहेर दंगा करणारी ती छोटुकली मुले हरखून गेली. कोण सायकलवर पुढे बसणार, कोण मागे ह्यावर त्यांच्यात चढाओढच सुरू झाली. एव्हाना सुरक्षा कर्मचारी पुढे सरसावल्या  होत्याच... तरीही त्या कैद्यांपैकी आठ-दहाजणी लाजत, एकमेकींना ढकलत पुढे येऊन कार्यक्रम आवडल्याचे सांगून गेल्या. आंग्ल युवतींमधील एकजण धिटाईने पुढे आली आणि ती भायखळा तुरुंगात असताना, मनातली आशा पूर्ण तुटत चालली असताना तिथे झालेल्या अशाच सत्संगाने तिला कसा मानसिक आधार दिला होता ते व आजचा सत्संग आवडल्याचे सांगून गेली. आमच्याकडे येणाऱ्या महिलांची गर्दी वाढल्यावर सुरक्षा कर्मचारी दंडुके परजत पुढे आले. मग लगेच पांगापांग! आमच्यात व महिला कैद्यांमध्ये सुरक्षा कर्मचाऱ्यांची एक फळीच उभी राहिली. आता कटायची वेळ आली होती. संयोजक व वॉर्डनसकट इतर सुरक्षा कर्मचाऱ्यांचे अनौपचारिक आभार मानून आम्ही बाहेर जाण्यासाठी निघालो. बाहेर मुलांचा नव्या सायकली पादडण्याचा व आनंदाने चित्कारण्याचा कार्यक्रम रंगात आला होता. त्यांना ह्या तुरुंगाबाहेरचे जग माहीत होते की नाही, कोणास ठाऊक!  

तुरुंगाच्या बाहेर पडलो तसे एवढा वेळ संपर्क तुटलेले बाकीचे सामान्य जग पुन्हा पुकारू लागले. निघण्यासाठी गाडीत मी बसते न बसते तोच मोबाईल खणखणला. ''किती वेळा ट्राय केला तुझा मोबाईल, पण कॉल लागतच नव्हता! '' पलीकडून माझी मैत्रीण ठो ठो करत होती, ''कुठे आहेस? काय करत होतीस? '' गाडीतल्या माझ्या सहकारी मित्रांकडे एक मिष्किल कटाक्ष टाकून मी सहज उत्तरले, ''काही नाही गं, येरवडा जेलमध्ये होते जरा... पण पोचते आहे घरी अर्ध्या-पाऊण तासात, तेव्हा बोलू! '' तिला पुढे काही बोलू न देता मी फोन बंद केला आणि बाकीच्यांच्या हास्यात सामील झाले! मनात समाधानही होते आणि कार्यक्रम व्यवस्थित पार पडल्याचा आनंदही..... आज काही काळासाठी का होईना, त्या कैद भोगत असलेल्या स्त्रिया आपले सर्व राग, लोभ, मत्सर, चिंता, नैराश्य विसरून संगीत-नृत्यात आनंदाने तल्लीन झाल्या होत्या. त्यांना मोकळेपणाने हसताना, खेळताना आणि आपल्या मुलांच्या आनंदाने हरखून जाताना पाहूनच मन भरून आले होते. ईश्वराकडे त्यांना आयुष्यात योग्य मार्ग सापडून त्यांची घडी पुन्हा एकवार बसावी आणि गुन्हेगारीच्या वाट्याला जाण्याची वेळ त्यांच्यावर परत कधी येऊच नये अशी मनोमन प्रार्थना करत मी घराच्या वाटेला लागले.

-- अरुंधती

Sunday, May 23, 2010

चांदण्याचे ओठ तुझे


[ बरेच वर्षांपूर्वी केलेली कविता ]

Sunday, May 16, 2010

मलंग आणि माणुसकी

मलंग गड माची 
(छायाचित्र स्रोत : विकीपीडिया) 

काही वेळा आयुष्यात फार गमतीशीर प्रसंग घडतात. पण त्या त्या वेळेस तुम्ही त्या प्रसंगातील अनोखेपण अनुभवू शकालच ह्याची काहीच हमी नसते. आपले आधीचे पूर्वग्रह किंवा समज बदलून टाकायला एखादी घटनाच पुरेशी असते. असाच एक प्रसंग बऱ्याच वर्षांपूर्वी आमच्या कुटुंबाने अनुभवला. त्याचीच ही कहाणी.

माझे आई-वडील फार ''देव-देव'' करणाऱ्यातले नाहीत. जगात ईश्वर आहे, तो सगळीकडे आहे आणि त्याला आपण मानतो अशी त्यांची विचारसरणी. त्यात कोणत्याही प्रथा परंपरांचे अवडंबर नाही. स्वधर्माचा अभिमान आहे पण इतर धर्मांविषयीही यथायोग्य आत्मीयता. त्यामुळे लहानपणापासून त्यांनी आम्हाला (मला व बहिणीला) मंदिरे, दर्गे, चर्चेस इत्यादी धर्मस्थळांकडे सारख्याच आत्मीयतेने बघायला शिकवले. कोणत्याही सहलीच्या ठिकाणी गेल्यावर तेथील मंदिरे जशी पालथी घातली तशीच इतर प्रसिद्ध धर्मस्थळेही औत्सुक्याने पाहिली. 

तर अशीच एकदा आमची श्री मलंग किंवा हाजी मलंग ह्या कल्याण येथील सुप्रसिद्ध गडावर जायची टूम निघाली. आईवडीलांना मच्छिन्द्रनाथांचे मंदिर तर पाहवयाचे होतेच शिवाय मलंगबाबांच्या दर्ग्याची पूजा हिंदूच करतात त्याबद्दलही उत्सुकता होती. येथे भाविकांकडून मच्छिंद्रनाथांच्या शक्तिस्थळाची पूजाही केली जाते व मलंगबाबांच्या दर्ग्यावर चादरही चढवली जाते असे ऐकून होतो. आम्हा मुलींना पुण्याबाहेर प्रवास करायला मिळणार ह्याचेच अप्रूप होते. वडिलांना ह्या स्थळी दत्तजयंतीलाच जायचे होते. का, तर दत्तात्रेयांपासून नाथपंथाची सुरुवात होते आणि पौर्णिमेला गडावर खास उत्सव असतो म्हणे! ठरल्याप्रमाणे दत्तजयंतीच्या रात्री जरा उशीरानेच आम्ही लाल डब्यातून कल्याणला थडकलो. तिथून टांग्याने हाजी मलंग गडाचा पायथा गाठला. रात्रीचे दहा- साडेदहा वाजत आले होते. थोडा वेळ तेथील बाजारातून भटकल्यावर एका छोट्याशा उपाहारगृहांत थोडी खादाडी केली. आम्ही घरातील सगळेच गड-आरोहणाच्या बाबतीत अतीव निष्णात (? ) असल्यामुळे गडाच्या पायथ्याशी असलेल्या एका दुकानातून चढताना आधारासाठी दोन काठ्या घेतल्या!! सामान-बॅगा वगैरे त्या दुकानातच ठेवले व बरोबर एका शबनममध्ये फक्त एक शाल आणि थोड्या जरुरी वस्तू घेऊन गडाच्या रोखाने मार्गक्रमण करू लागलो.

डिसेंबरातील थंड हवा गडाच्या पायथ्याशीही एव्हाना जाणवू लागली होती. तेथील एक चहाची टपरी बंद होणार एवढ्यात आम्ही घाईघाईने तिथे पोचलो व दुकानदाराला आम्हाला चहा पाजण्याची गळ घातली. आम्हीच त्याचे दिवसातील शेवटचे गिऱ्हाईक दिसत होतो. टपरीतील लाकडी बाकावर बसून डगमगत्या टेबलाला हाताचा टेकू देत सावरत बसलो होतो खरे, पण मला तरी जाम थंडी वाजत होती. तेवढ्यात आमचा चहा आला. गरम गरम वाफाळता आल्याचा चहा.... अहाहा!! त्या क्षणी ते स्वर्गसुख होते. तेवढ्यात वडिलांचे लक्ष सहज बाहेर गेले. टपरीच्या दगडी पायरीवर एक म्हातारी अंधारात कुडकुडत बसून होती. तिच्या वेषावरून तरी गरीब वाटत होती. मेंदी लावल्याने तांबडे झालेले केस, तोंडातला पानाचा तोबरा, पेहराव यांवरून लगेच ती म्हातारी स्त्री मुस्लिम असल्याचे लक्षात येत होते. वडिलांना अचानक काय वाटले कोणास ठाऊक, पण त्यांनी चहावाल्याला त्या म्हातारीलाही चहा नेऊन देण्याची खूण केली. आमचा चहा पिऊन होईपर्यंत त्या म्हातारबाईंचा चहाही बशीत ओतून फुर्र फुर्र करत पिऊन झाला होता. वडिलांनी बिलाचे पैसे दिले व आम्ही टपरीच्या बाहेर पडलो. बघतो तर दारात म्हातारबाई. त्यांनी चहाबद्दल शुक्रिया सांगितले आणि म्हणाल्या, चला, मी पण वर गडावरच जाणार आहे. तुम्हाला रस्ता दाखवते! 

आता ही कोण कुठली म्हातारबाई, तिचा ना कसला ठावठिकाणा, लांब बाह्यांच्या पोलक्यावर बिनबाह्यांचे वेगळ्याच रंगाचे पोलके - विटकी साडी असा थोडासा चमत्कारिक वेष, हातात डालड्याच्या डब्यापासून बनवलेली ''लालटेन'', चालताना वयोपरत्वे जाणारे झोक....  आणि ती कसला रस्ता दाखवणार! वडिलांनी तिला नम्रपणे नको सांगितले, पण ही बाई ऐकायलाच तयार होईना! शेवटी आम्ही तिने रस्ता दाखवावा हे मान्य केल्यावरच आमची तिच्या आग्रहातून सुटका झाली. 

चढणीच्या पहिल्या टप्प्यातच त्या बाईंनी आमच्या चौकशीला सुरुवात केली. आईवडील अगदी त्रोटक उत्तरे देत होते. पण त्यांमुळे नाउमेद न होता म्हातारबाईंचा तोंडपट्टा सारखा चालूच होता. त्यांची ती कृश मूर्ती हवेच्या जोरदार झोताप्रमाणे कधी डावीकडे झुके तर कधी उजवीकडे! त्यांच्या हालचालींप्रमाणे त्यांच्या हातातला, डालड्याच्या डब्याला दोन्ही बाजूंना हिरवा व लाल रंगाचा जिलेटीन पेपर लावलेला लालटेन झोकांड्या खाई. आम्हाला भीती वाटे की म्हातारबाई कलंडणार तर नाहीत? पण आमच्या तुलनेत गड चढण्याच्या बाबतीत त्याच जास्त तंदुरुस्त वाटत होत्या. इकडे आईवडील चढण चढताना जणू मूक झालेले!  एक तर चढताना वजनापरत्वे व सवय नसल्याने दम लागत होता. त्यात धाकटी बहीण नुकतीच आजारातून उठल्यामुळे व अशक्तपणामुळे चढण स्वतःहून चढायला अजिबात राजी नव्हती. सात-आठ वर्षांच्या पोरीला कडेवर घेऊन चढणे म्हणजे सोपी गोष्ट नव्हे! तरी आई-वडील आलटून पालटून तिला कडेवर घेऊन चढत होते खरे!

म्हातारबाई ठरविल्याप्रमाणे आमच्या पुढेच चालल्या होत्या. आकाशातल्या पौर्णिमेच्या टिपूर चांदण्याने आसमंत व सारी डोंगरराजी उजळून निघाली होती. त्या प्रकाशात ते डोंगर ध्यानस्थ योग्याप्रमाणे अजूनच गूढ भासत होते. दुरून कोठूनतरी रेडियोवरच्या गाण्यांचा अस्पष्टसा आवाज येत होता. मधूनच कोणाचे तरी हसणे. नाहीतर रात्रीच्या शांततेची दुलई गडावर पण पसरू लागली होती. अधून मधून कोणी हौशी लोक आम्हाला ओलांडून झरझर पुढे जात होते. आमच्या गोगलगायीच्या गतीने, धापा टाकत चालणाऱ्या चिमुकल्या समूहाकडे पाहून गालातल्या गालात हसत होते. चांदण्याचा प्रकाश असला तरी मला आजूबाजूला पडलेल्या अंधाराची उगाच भीती वाटत होती. मधूनच झुडुपांमधून खुसफूस ऐकू येई. रातकिड्यांच्या किरकिरीबरोबर अचानक एखादा काजवा दर्शन देई. झाडांच्या हालचालीबरोबर त्यांच्या सावल्याही हालत. त्या पानांच्या सळसळीला ऐकले की माझी कल्पनाशक्ती काळोखात काही वेगळे तर दिसत नाही ना याचा विचार करत असे. त्यामुळेच की काय, हातातला टॉर्च उगाच काळोखात फिरवत मी सावल्यांचा अंदाज घेत पुढे चालले होते.

अचानक एक मोठा हिंदी भाषक घोळका मागून आला आणि आम्हाला पाहून थबकला. सगळी तरुण पोरं पोरं होती. त्यांच्यात दोन-तीनच स्त्रिया दिसत होत्या. त्या बायकांचे गोषे मोठे कलापूर्ण होते. माझ्या वडिलांना धापा टाकत एकाच जागी उभे असल्याचे पाहून त्यांच्यातील एका तरुणाने विचारले, ''भाईसाहब, कुछ मदद चाहिए क्या? '' वडिलांनी मानेनेच नकार दिला. तरीही तो जथा थोडा वेळ आमच्याबरोबरच रेंगाळला. सहजच चौकश्या झाल्या - तुम्ही कुठले, आम्ही कुठले इ. इ. ते सर्व तरुण मुंबईतच राहणारे, एकाच परिवारातील होते. त्यांच्यातील एकाचे नुकतेच लग्न झाले होते. म्हणून तो त्याच्या पत्नीसह गडावर दर्शनासाठी चालला होता, आणि सोबत ही जत्रा. त्यांचे आपापसात एकमेकांना चिडवणे, खिदळणे मजेत चालू होती. नववधू फारच सुंदर होती दिसायला. मोठे टप्पोरे डोळे, केतकी गुलाबी वर्ण, धारदार नाक, गुलाबी जिवणी - अगदी काश्मिरी वाटत होती चेहऱ्यावरून. ह्या सर्वांच्या थट्टामस्करीत लाजून लाजून चूर झाली होती. तिची माझी छान गट्टी जमली. आम्ही दोघींनी जवळच पडलेल्या एका झुडुपाच्या दोन वाळक्या फांद्या हातात घेतल्या, आणि अंधाऱ्या पायऱ्यांवर काठ्या आपटत आपटत चालू लागलो. बोलता - बोलता, गप्पांच्या नादात त्या जथ्याबरोबर मी बरीच पुढे आले होते. पण मग अचानक आठवण झाली की आमच्या घरातले बाकी तीन सदस्य मागेच राहिलेत की! त्या नववधूचा- रुख्सानाचा निरोप घेऊन मी पुन्हा माकडाप्रमाणे उड्या मारत खाली आले. आमच्या गोगलगायी फार पुढे सरकल्या नव्हत्या. म्हातारबाईही त्यांना गोंदाप्रमाणे चिकटून होत्या.

एका विश्रामाच्या वेळी आई हळूच वडिलांना म्हणाली, ''त्या बाईंचे लक्षण मला काही ठीक दिसत नाहीए.... मधूनच स्वतःशी पुटपुटत असतात त्या.... कोणी वेडीबिडी तर नसेल? तू त्यांना सांग ना पुढे जायला.... मला तर जरा विचित्र वाटतंय प्रकरण! '' मी पुन्हा एकदा त्या बाईंकडे निरखून पाहिले आणि आईचे बोलणे मलाही जरा पटले. त्या बाई खरेच मधूनच स्वतःशी बोलत होत्या, माना हालवत होत्या. आणि खरे सांगायचे तर चांदण्यात त्यांचा सर्व अवतार जरा भेसूरच दिसत होता. मला उगाचच हौसेहौसेने वाचलेल्या भुतांच्या गोष्टी आठवू लागल्या आणि मी चुपचाप आईवडीलांच्या जवळ सरकले. वडिलांच्या खांद्यावर माझी धाकटी बहीण एव्हाना गाढ झोपून गेली होती. आमचा मंदावलेला वेग बघून त्या बाई कंटाळतील व निघून जातील असा वडिलांचा कयास होता. पण त्या चिवट म्हातारबाईंनी तो खोटा ठरवला. 

एव्हाना गडाचा मधला टप्पा आम्ही पार केला होता. जसजसे गडावरच्या तुरळक वस्तीची जाग जाणवू लागली तसतसा म्हातारबाईंमध्येही हळूहळू फरक पडू लागला. त्यांची पुटपूट थांबली, चाल सुधारली, जणू कोणी त्यांची वर वाट बघत होते अशी आतुरता त्यांच्या चालीत आली. आम्हालाही 'आता संपली बुवा एकदाची चढण' ह्या विचारानेच हायसे वाटत होते. मस्त भन्नाट वारा व शिरशिरी आणणारी थंडीही आता अंगाला झोंबत नव्हती. 

दर्ग्याजवळचे लाइट्स, विद्युत रोषणाई जसे नजरेच्या टप्प्यात आले तशा म्हातारबाई आम्हाला काहीही न बोलता तरातरा पुढे जात दिसेनाशा झाल्या. आईवडीलांनाही ''सुटलो एकदाचे त्यांच्या तावडीतून! '' असे झाले. आता गडावर मुक्कामाला दर्ग्याच्या जवळपास कोठेतरी चौकशी करून जागा शोधायची, तण्णावून द्यायची व पहाटे दर्शन घेऊन उगवतीला गड उतरू लागायचे असा साधारण बेत होता.

रात्री एवढ्या उशीरा पोचल्यावर अनेक दुकाने बंद अवस्थेत न दिसली तरच नवल! दुकानदारांच्या ओळखीने गडावरच कोठेतरी मुक्काम करायचा आमचा बेत होता. पण इथे तर दुकानांना टाळे! तरीही आम्हाला राहण्या-खाण्याची फारशी फिकीर नव्हती. पट्टीच्या चहाबाज असलेल्या माझ्या वडिलांना काही अंतरावरून खास ''अमृततुल्य'' चहाचा खासा दरवळ आला आणि मग बस्सच! पुढचे अंतर आम्ही विठ्ठलाच्या ओढीने वारकरी जसा पळत सुटतो तसे झराझर कापले. एका उंच जोत्यावरच्या घरासमोर बरीच गर्दी दिसत होती. बहुधा हीच ती चहाची ''टपरी'' होती. कोणीतरी एक व्यक्ती त्या घरासमोर टाकलेल्या बाजेवर बसली होती आणि येणारे-जाणारे त्या व्यक्तीच्या पाया पडत होते. कुतूहलाने आम्ही त्या व्यक्तीकडे पाहिले आणि उडालोच! ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून एवढा वेळ आम्हाला सक्तीचा सहवास देणारी डालड्याच्या डब्याचा लालटेन घेतलेली म्हातारी होती!!! त्या बाजेच्या भोवती जणू दरबार भरला होता. येणाऱ्या जाणाऱ्यांकडून सलाम स्वीकारण्याबरोबरच म्हातारबाई आजूबाजूच्या लोकांची म्हणणी ऐकून घेत होत्या. सर्वांच्या वागण्यात त्यांच्याप्रती अदब दिसून येत होती. म्हातारबाई मधूनच गुडगुडी ओढत होत्या, कधी कोणाच्या पाठीवर थाप देऊन हसत होत्या तर कधी कोणाच्या डोक्यावरून हात फिरवत होत्या.

तेवढ्यात त्यांचे लक्ष आमच्याकडे गेले. आम्ही एका कोपऱ्यात 'आता नक्की काय करावे' या विचारात जरासे संकोचून उभे होतो. त्या बाईंनी लगेच आम्हाला पुढे येण्याची खूण केली. मग सर्वांकडे वळून हिंदीत म्हणाल्या, ''आज या कुटुंबाने मला माणुसकी दाखवली. मी थंडीने कुडकुडत असताना त्यांनी मला एक कप चहा काय पाजला आणि मला ऋणी करून टाकले! '' मग घराच्या दरवाज्याकडे बघून आपल्या घोगऱ्या आवाजात त्यांनी मोठ्याने फर्मान सोडले, ''हे कुटुंब माझे खास पाहुणे आहेत. त्यांचे स्पेशल स्वागत करा. '' आम्ही सर्द! बाहेरच्या गारठ्यातून आतल्या घरगुती उबेत गेल्यावर खरंच खूप छान वाटत होते. ढणाणणाऱ्या स्टोव्हवर एका मोठ्या पातेल्यात दूध उकळत होते. दुसरीकडे चहाचे आधण ठेवलेले होतेच! थोड्याच वेळात आमच्यासमोर फेसाळ, दुधाळ अमृततुल्य असा दरवळणारा चहा आला. थंडीने काकडलेल्या शरीरांमध्ये जरा धुगधुगी आल्यावर वडिलांनी सहज करतोय असे दाखवत त्या म्हातारबाईंची चौकशी केली. आम्हाला चहा देणारा माणूस अस्सल मराठी होता. त्याच्याशी आतापर्यंत हवापाण्याच्या गप्पा मारून झाल्या होत्या. तो तर वडिलांकडे थक्क होऊन पाहतच राहिला. ''काय सांगताय साहेब! तुम्हाला माहीतच नाही त्या बाई कोन आहेत ते? नका करू चेष्टा अशी गरीबाची! '' त्याला पुन्हा पुन्हा समजावून सांगितल्यावर मात्र त्याला खात्री पटली. पण तरीही तो ती बाई कोण हे सांगायलाच तयार नाही. शेवटी आई मध्ये पडली, ''अहो भाऊ, आम्हाला खरंच माहीत नाही काही त्या बाईंबद्दल! जरा सांगा ना! ''

त्याने एकवार बाहेर नजर टाकली. बाहेरचा दरबार अजून चालूच होता. लोकांची गर्दी कायम होती. मग तो चहावाला आमच्याकडे वळून घसा खाकरून म्हणाला, ''त्या बाई इथून जवळच एक लई मोठा जागृत दर्गा हाय, त्याच्या मुख्य पुजारीण बाई हायेत. लई मान हाय बघा त्यांना हितं.... समदे लोग त्यांचा शबुद पाळत्याती. '' खरे तर आमचा विश्वासच बसत नव्हता त्याच्या सांगण्यावर! पण अशा बाबतीत कोणी कोणाची टांगखिचाई सहसा करत नाही. तरीही मनात थोडासा संदेह बाळगूनच आम्ही तिथून निघालो. चहावाल्याने अर्थातच चहाचे पैसे घेण्यास साफ नकार दिला.

म्हातारबाईंनी आम्हाला जाताना पाहिले आणि हसून मान हालवून म्हणाल्या, ''कल फिर मिलेंगे, खुदा हाफिज।''
गडावर आम्हाला मुक्कामासाठी म्हातारबाईंच्या कृपेने एक कुटी लगेच मिळाली. बांबूच्या भिंती आणि छत एवढाच तो काय थंडीपासून आडोसा! बघतो तर तिथे रुख्सानाचा सर्व परिवार! मग काय, मला तर जाम आनंद झाला. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनीही त्या म्हातारबाई दर्ग्याच्या मुख्य गुरवीण असल्याचे सांगितले. मग त्यांचा वेष असा फाटका का? गडाच्या पायथ्याशी अंधारात व थंडीत कुडकुडत त्या एकट्याच काय करत होत्या? प्रश्न अनेक होते, पण त्यांची उत्तरे आमच्यापाशी नव्हती. एव्हाना सर्व पुरुष दुसऱ्या कुटीत झोपायला निघून गेले, आणि आम्ही मुली-बायका तिथल्या चटयांवर आडव्या झालो. रात्रीचे बारा तर कधीच वाजून गेले होते. तरीही मी व रुख्साना हलक्या आवाजात गप्पा मारत होतो व खुसुखुसू हसत होतो. शिवाय त्या ओबडधोबड जमिनीवर घातलेल्या चटया अंगाला टोचतही होत्या. कुटीच्या बांबूच्या तट्ट्या पहाटेच्या गार वाऱ्याला अजिबात अटकाव करत नसल्यामुळे आईने आणलेली शाल पांघरून ती रात्र मी थंडीत कुडकुडतच घालवली.

अशीच मग गप्पा मारता मारता कधीतरी झोप लागली. उठले, जाग आली तेव्हा आकाशाचा रंग पालटू लागला होता. सकाळचे साडेपाच-सहा वाजले असावेत. आम्ही दोघी बहिणी, रुख्साना आणि तिच्या इतर महिला नातेवाईक एवढ्याचजणी कुटीमध्ये होतो. त्या बाकी महिला गाढ झोपलेल्या. आई-वडील दोघेही लवकर उठून स्नान वगैरे करून पुढे दर्शनाला गेले होते. मी व बहिणीने कुटीच्या बाहेर येऊन तेथीलच एका मोकळ्या जागेत बोटानेच दात घासले. अंघोळीची तर गोळीच घेतली होती. एवढ्या थंडीत पहाटे थंड पाण्याने आंघोळी करणे म्हणजे महापाप! मग आवरून झाल्यावर आईवडीलांच्या वाटेकडे डोळे लावून आम्ही दोघी बहिणी फटफटणारे आकाश, प्रभातीची प्रसन्न निसर्गराजी अन त्या प्रकाशात वेगळेच रूप ल्यालेल्या डोंगराकडे अनिमिष नेत्रांनी मूकपणे बघत बसलो होतो. धुक्याच्या आच्छादनातून मध्येच वर डोंगरावर एका ठिकाणी धुनी पेटलेली दिसत होती. का कोण जाणे, त्या प्रसन्न वातावरणाचे पावित्र्य माझ्या मनात घर करून बसले.

आईवडील परत येईपर्यंत मला व बहिणीला खूप भूक लागली होती. गड उतरूनच नाश्ता करायचे ठरले. आदल्या रात्री दहा पावलेही चालायला तयार नसलेली माझी बहीण आज मात्र हरणासारख्या उड्या मारत गड उतरत होती!! तिच्या ह्या प्रगतीचे नवल करतो न करतो तोच गडावरची फुलमाळा विकणारी दुकाने लागली. आणि एका दुकानासमोर त्या म्हातारबाई जणू आमची वाट बघत असल्याप्रमाणे उभ्या! आम्हाला पाहताच तोंड भरून, आपले पानाने लाल झालेले दात दाखवत हसल्या. आम्हाला त्यांच्या अखत्यारीत असलेल्या दर्ग्यावर कधीही यायचे आमंत्रण दिले. कोण कुठली ही म्हातारबाई... पण त्या एक कप चहाच्या माणुसकीला अजून किती जागणार होती? वडिलांनी काहीही न बोलता तेथील दुकानातून एक फुलांची चादर विकत घेतली आणि म्हातारबाईंच्या हातात तिचे पुडके ठेवून त्यांना ती चादर आमच्यातर्फे दर्ग्यावर चढवायला सांगितली. पुन्हा एकदा म्हातारबाई तोंड भरून हसल्या. ''जाओ, खुश रहो, खुदा हाफिज।'' म्हणत आमचा निरोप घेतला व बाजारातून तुरुतुरु चालत दिसेनाश्या झाल्या. त्यांच्या त्या लहान होत जाणाऱ्या आकृतीकडे आम्ही तसेच बघत राहिलो. 

गड उतरून आम्ही परतीच्या पुणे प्रवासाच्या तयारीला लागलो. पुढे आईवडीलांच्या गप्पांमध्ये ह्या प्रसंगाचे अनेकदा संदर्भही येत. आणि आपण त्या रात्री माणुसकीचा एक नवा धडा शिकलो, माणुसकीचे एक नवे रूप पाहिले याची जाणीव पुन्हा एकवार मनात वेगळीच स्पंदने निर्माण करून जाई.

--- अरुंधती  

Monday, May 10, 2010

निसर्गाचा हिशोब


छायाचित्र सौजन्य : विकीपिडीया 

आज वाळ्याच्या पडद्यांना पाणी घालताना सहज खिडकीतून बाहेर पाहिले. शेवटी ज्याची भीती वाटत होती तेच झाले होते. खिडकीच्या खाली, वळचणीच्या जागी पारव्याच्या मादीने दोन अंडी घातली होती. म्हणूनच आज सकाळपासून त्यांची खिडकीपाशी लगबग चालली होती तर! एवढे दिवस त्यांना रोज खिडकीपासून हुसकावून लावता लावता मीच जिकिरीला आले होते. त्यांचे ते खर्जातले घुमणे, पंखांची फडफड आणि खिडकीत केलेली घाण ह्यांपेक्षाही मला त्यांना तिथे आपला संसार थाटू द्यायचा नव्हता. गेल्या दोन खेपांना पारव्यांची बाळंतपणं आणि त्यांच्या पिलांची देखभाल करताना आलेल्या अनुभवांची शिदोरी तर होतीच, शिवाय खिडकीत अडचणीच्या जागी त्यांनी अंडी घातली तर धक्का लागून ती फुटणार-बिटणार तर नाहीत ना हीदेखील काळजी होती.

पण पारव्यांना तेवढे कळत असते तर मग काय! त्यांचा तरी काय दोष म्हणा! सिमेंट-काँक्रीटच्या जंगलात त्यांनी तरी कोठे संसार थाटायचा? आणि वाळ्याचा पडदा म्हणजे अतोनात गारवा.... त्यांच्यासाठी ए. सी. च जणू! घरट्याचा आभास करून देणारा वाळ्याच्या मुळ्यांचा नैसर्गिक पोत आणि आडोसा... मग काय! ह्या पारव्यांच्या जोडीला आयतेच फावले होते! त्यांचे कुंजकूजन सुरू झाले रे झाले की मी त्यांना हाकलून लावायचे. पण पठ्ठे एकतर चिकट तरी होते किंवा बुद्दू तरी! रोजच्या हाकलण्याला न जुमानता, न कंटाळता दर दिवशी हजेरी लावणार म्हणजे लावणारच!

पारव्याने खिडकीत घातलेल्या अंड्यांची बातमी घरी कळली त्याबरोबर सर्वांचे आधीच्या पारवा-स्मृतींना उजाळा देणे सुरू झाले. आमच्या आधीच्या जागेत, सहाव्या मजल्यावर पारवे हे जणू परिसराचा अविभाज्य भाग असल्याप्रमाणे वावरत. खिडक्यांच्या वळचणी जश्या त्यांना प्रिय होत्या त्याचप्रमाणे वेळी अवेळी आमची नजर चुकवून घरात शिरून कपाट, फडताळ, लोंबकळणाऱ्या वायरी यांवर स्वार होणे आणि घुमत बसणे हा त्यांचा आवडता छंद! तिथेही ते त्यांच्या अंगभूत चिकाटीचे प्रदर्शन करत. घरातल्या लपण्याच्या जागा आमच्यापेक्षा त्यांनाच जास्त ठाऊक! फक्त आम्हीच नव्हे तर शेजारी-पाजारीही त्यांचा मुक्त संचार असे. आणि आम्हाला सरावल्यामुळे असेल कदाचित, पण त्यांना आमच्या रागावण्याची भीतीच वाटत नसे. शेवटी हातात काठी घेऊन तिचे विविध आवाज करत, तोंडाने कंठशोष होईस्तो आरडाओरडा करत आम्ही व शेजारी त्यांना हाकलून लावत असू. 

तरीही एकदा एका पारव्याच्या लबाड जोडीने पोटमाळ्यावर खोक्याच्या आडोशाला अंडी घातलीच! ''आलिया भोगासी'' करत आम्ही त्यांच्यासमोर सपशेल शरणागती पत्करली. पुढचे अनेक दिवस घरात काड्या, पिसे, दोरे यांचा कचरा व पोटमाळ्यावर त्यांची घाण, अशा साम्राज्यात त्यांच्या घरातल्या असंख्य फेऱ्या सहन करण्यात गेले. पिलांचा जन्म झाल्यावरही बरेच दिवस ही जोडी त्यांना अन्न भरवण्यासाठी खिडकीतून ये-जा करत असे. तोवर आमच्या दोन भिंती त्यांनी खराब केल्या होत्या. एक पिलू लवकर उडायला शिकले आणि बघता बघता स्वतंत्रही झाले. पण दुसऱ्या पिलाला बहुधा तेवढा आत्मविश्वास नसावा. ते पोटमाळ्यावरच वावरायचे. टुलूटुलू चालायचे आणि उडायची वेळ आली की आपले छोटेसे पंख नुसतेच फडफडवायचे. बाबा पारव्याला एव्हाना ह्या सुखी संसाराचा कंटाळा आला असावा, कारण तो आता येईनासा झाला होता. आई मात्र पिलाला भरवायला यायची अधून मधून. त्या पिलांचे ते गोड कर्कश स्वरातील ओरडणे ऐकणे म्हणजे आम्हाला स्वर्गानुभूतीच असायची!! कानात कापसाचे बोळे घातले तरी उपयोग व्हायचा नाही!!

शेवटी करता करता एक दिवस, आमच्या सर्वांच्या धीराची सत्त्वपरीक्षा पाहून ते चुकार पिलू उडायला लागले. पण.... आमच्या घरातला पोटमाळा त्याच्या एवढ्या परिचयाचा झाला होता की संध्याकाळी ते न चुकता घरी परतायचे व पोटमाळ्यावर चढून बसायचे. घरचेच नातवंड असल्यामुळे आम्हाला त्याला हुसकावणेही जीवावर यायचे. तरीही दिवसेंदिवस खराब होणाऱ्या भिंती व अशक्य घाण पाहिल्यावर त्याला घराचे दरवाजे खिडक्या बंद करण्याचा कठोर निर्णय घेण्यावाचून आमच्यासमोर अन्य पर्याय नव्हता! आणि हे पिलू तरी किती चलाख असावे! खिडकीपाशी दबा धरूनच बसायचे. दोन मिनिटांसाठी जरी खिडकी उघडली की महाशय आत!! आणि त्यांच्या आवडत्या स्थानी जाऊन वक्र मान करून तोंडातून आनंदाचे चीत्कार! त्यांना आमचे भयही वाटत नसे... निवांतपणे आमच्या डोक्यावरून अगदी जवळून जायचे. खांद्याला, डोक्याला त्यांचे पंख चाटून जात. ह्या वेळी आम्हीही ठाम निश्चय केला होता. त्याप्रमाणे त्यांना दारे बंदच ठेवली. यथावकाश त्या पिल्लाची घरी ये-जा एकदाची थांबली. आम्हीही सुटकेचे निः श्वास सोडले.

पण हाय रे दैवा! पुढच्याच वर्षी तारुण्यात पदार्पण केलेले पिलू आमच्या दारात आपल्या जोडीदारासह हजर! आता हे प्रकरण हाताबाहेर जाण्याची चिन्हे दिसत होती. त्यांना आमचे घर म्हणजे वडिलोपार्जित इस्टेट वाटत होती की काय? पुन्हा एकदा आमच्यावर स्वतःच्याच घराची दारे-खिडक्या बंद करून, स्वतःला कोंडून घेण्याचा प्रसंग गुदरला होता. त्या जोडीला कटवल्याची पूर्ण खात्री झाल्यावरच आम्ही मोकळे श्वास (खरोखर! ) घेतले. 

आज याही घराच्या खिडकीत पारव्याच्या अंड्याला पाहिल्यावर आम्हाला सर्वांनाच आपल्या भवितव्याची काळजी वाटू लागली होती. दोन दिवस असेच गेले. रोज पारवीण काकू येऊन अंडी उबवत बसत. पारवे काका त्यांना साथ द्यायला जोडीने घुमत बसत. त्यांच्या घूत्कारांचे नाद मला रात्री झोपेत स्वप्नातही ऐकू येत. त्या अंड्यांना हालवावे का ह्याविषयी घरात तीव्र मतभेद होते. पक्ष क्रमांक १ चे म्हणणे होते की निसर्गात ढवळाढवळ करण्याचा आपल्याला कोणताही अधिकार नाही. सबब ती अंडी तशीच राहू द्यावीत. पक्ष क्रमांक २ चे म्हणणे होते की एखाद्या खोक्यात ती अंडी ठेवली तर ती सुरक्षित राहतील व कचराही कमी होईल! पण पारवे त्या स्थलांतरित अंड्यांना स्वीकारतील की नाही ह्याबद्दल पक्ष क्रमांक २ खात्रीशीर सांगू शकत नसल्याने ''ठेविले मादीने तसेची ठेवावे'' असा विचार करत आम्हीही त्या अंड्यांची जागा बदलण्याचे टाळले. 

आता इथेही कचरा करणे सुरू झाले होते. सुतळीचे तुकडे, पिसे, काटक्या, दोरे अन अजून काय काय! नशीब, खिडकीचे दार स्लायडिंग आहे. नाहीतर ती अंडी आमच्या धक्क्याने खालीच पडली असती. पण बहुधा निसर्गाला अशा अडनिड्या जागी त्या नव्या पिलांचा जन्म होणे मान्य नसावे. एके सायंकाळी जोराची वावटळ सुटली, आणि त्या सोसाट्याच्या वाऱ्यात ती दोन्ही अंडी जमीनदोस्त झाली. वावटळ, पाऊस थांबल्यावर नेहमीप्रमाणे मादी खिडकीपाशी आली. पण अंडी तर नव्हतीच! बिचारी खूप वेळ घिरट्या मारत होती. तिचा जोडीदारही तिच्याबरोबर शोधात सामील झाला होता. सगळीकडे आपल्या माना वाकड्या वाकड्या करून दोघेही त्या अंड्यांना धुंडाळत होते. मादी आपला शोक पंखांची अशक्य फडफड करून प्रकट करत होती. त्यांची ती तगमग पाहून मला वाईट वाटत होते. मानवी भाषा त्यांना काय समजणार!!  तरीही मला त्यांची ती तडफड बघून उगाच करुणा दाटून आली आणि मी त्यांना चक्क मराठीतून अंडी खाली पडून फुटल्याचे सांगितलेही! पण त्या अजाण जीवांना त्यातले काहीच कळत नव्हते. त्या दिवसानंतर जवळ जवळ तीन-चार दिवस दोघेही नर-मादी खिडकीभोवती घोटाळत असत. हळूहळू त्या नष्ट झालेल्या अंड्यांचे सत्य त्यांनी स्वीकारले असावे, कारण त्यांचा खिडकीजवळचा संचार कालांतराने बराच कमी झाला.  

आमच्या घरावरची पारवा-संक्रांत एकदाची टळली म्हणून मला मनात कोठेतरी बरेही वाटत होते आणि त्याच वेळेला त्या निरागस मादीचा आकांत आठवून कसेसेही होत होते. एका आईची कूस उजवायचीच राहून गेली होती. पुढील विणीच्या वेळी तिची पिल्ले जगतीलही.... पण जन्माअगोदरच काळाआड गेलेल्या ह्या पिल्लांचा हिशेब कोण देणार होते?

--- अरुंधती