Saturday, November 14, 2009

शंभर अधिक एक

रात्रीची जेवणे आटोपली की पूर्वी एक हमखास उद्योग असायचा! चौसोपी वाड्याच्या प्रशस्त अंगणात आजूबाजूच्या झाडांच्या काळोख्या सावल्या निरखत, रामरक्षा पुटपुटत झपाझप शतपावली घालणे हा असायचा तो उद्योग.... आजोबांच्या किंवा वडीलांच्या पायांत लुडबुडत,त्यांच्या हातवाऱ्यांची नक्कल करीत (वेळप्रसंगी त्यांचे धपाटे खात) घातलेल्या ह्या शतपावल्यांची सोनेरी आठवण अजूनही मनात रुंजी घालते. उन्हाळ्यात शतपावलीचा कार्यक्रम गप्पांमध्ये रेंगाळायचा... कधी गप्पा, कधी अंताक्षरी, कधी ठिकरीचा किंवा साप-शिडीचा डाव, कधी भुतांच्या गोष्टी... पाऊसपाण्याच्या दिवसांतआणि थंडीत मात्र आम्ही शतपावल्या लवकर आटपत्या घेत असू. कोणी बरोबर असले तर त्यांच्याशी मनातल्या मनात स्पर्धा लावत त्या शंभर फेऱ्या भराभर पार पडत, तर एकटे
असताना कंटाळा करत, किंवा वाघ मागे लागल्याप्रमाणे आम्ही शतपावली'उरकत' असू. कधी त्यांत खंड पाडला, तर घरातील वडीलधारी मंडळी रागे भरत. एखाद्या घरातील आजी नातवंडांना फडताळावरील डब्यातील लाडू किंवा भाजकी बडीशेप अशी लालूच दाखवून 'शतपावली' करण्यास उद्युक्त करीत असे. अंगणातील वाऱ्याच्या झुळुकींना दाद देत बाजूचे ताड-माड डोलू लागत, टिपूर चांदण्यांत आसमंत उजळून निघे तेव्हा शतपावली घालण्यातही अनामिक आनंद मिळत असे. पुढे वाडे पडले, तिथे टुमदार इमारती उभ्या राहिल्या. पूर्वीसारखे अंगण उरले नाही. सदनिकांच्या 'बाल्कनीज' मध्ये प्रशस्त अंगणाची मजा नव्हती. आजी-आजोबांनाही जेवणानंतर चालायचे कुठे असा प्रश्न पडू लागला. बाल्कनीतील टिचकीभर जागेत येरझाऱ्या घालून त्यांना शतपावलीचे समाधान मिळेना! मग काहीजण सदनिकांच्या आवारातील पार्किंग मध्ये, इटुकल्या पिटुकल्या 'गार्डन' मध्ये सोडियमव्हेपरच्या कठोर प्रकाशात आकाशातले फिकुटलेले चांदणे न्याहाळत दुधाची तहान ताकावर भागवू लागले. हमरस्त्यावर फेरी म्हणजे जीवमुठीत धरून जाणे हे त्यांना माहीत होते. कारण कोणतेही वाहन भरधाव वेगाने कधी अंगाला चाटून जाईल ह्याची शाश्वती नसे. शिवाय,भटकी कुत्री, चोर-पाकिटमार, असंख्य खड्डे अशा विविधांगी आपत्तीतून सहीसलामत जीव बचावला तर खरे बहाद्दर! अखेरीस तंत्रज्ञानाला दया आली. मनोरंजनाच्या टी. व्ही. पर्वात सॅटेलाईट केबलचे आगमन झाले आणि रात्रीच्या जेवणपश्चात शतपावलीचा प्रश्न (काहीजणांसाठी तरी) कायमचा संपला. आता ते जेवण उपरांत टी. व्ही. समोर बसतात व शंभर- दोनशे चॅनल्स फिरतफिरत कोचावर ऐस-पैस बसल्या बसल्याच शतपावली करतात! जागेचे झंजटच नको ना यार! शिवाय एका ठिकाणी बसून तुम्ही अख्खे जग हिंडून येता ते वेगळेच! आजी-आजोबा पण खूश आणि नातवंडेदेखील खूश!!! हां... आता अपचनाचा त्रास झाला तर शेकडो पाचक चूर्णे,गोळ्या आहेत ना मदतीला.... आणि व्यायामाचे म्हणाल तर घरबसल्या व्यायामाची आजकाल चिक्कार साधने उपलब्ध आहेत. आणि मोकळी हवा कधीच येथून गायब झाली आहे... सध्या असतात त्या फक्त पेट्रोल, डिझेलच्या फ्यूम्स! त्यामुळे घरातल्या घरात एअरकंडिशनर्ची गार गार हवा खात मनोरंजनाचा खजिना उलगडणाऱ्या ह्या आधुनिक शतपावलीची चटक तुम्हां-आम्हांस लागली तर आता कोण काय करणार??!!! पण कधी-कधी आम्ही 'वीकएंड' रीट्रीट ला जातो बरं का! एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी, हिरवाईच्या कुशीत, मोकळ्या वातावरणात नभांगण न्याहाळताना आम्हांला उगीचच लहानपणीचे ते सुबक अंगण, गार वारे, शतपावली आठवते आणि पावले थबकतात. मुक्त उधळलेला सुगंध जेव्हा कुपीतून विकत घ्यावा लागतो तेव्हा होणारी मनाची काहीशी अवस्था आम्ही अनुभवतो. पण मग एक उसासा सोडून असले सर्व विचार झटकून टाकतो, व त्या लोभस आठवणींना मनोमन उजाळा देत पुन्हा एकदा आपापल्या सदनिकांचा व बैठकीच्या खोलीतील विशाल टीव्हीरूपी अंगणाचा मार्ग धरतो!
-- अरुंधती

No comments:

Post a Comment