Friday, January 01, 2010

चुटपुटसुंदरी


आमच्या त्या मैत्रिणीला सर्व ग्रुपने ते एक सांकेतिक नावच पाडलंय..... "चुटपुटसुंदरी". आता तुम्ही म्हणाल, हा काय सौंदर्याचा निकष झाला का? पण आमची ही मैत्रीण तिच्या चुटपुटण्याच्या ह्या अनोख्या गुणामुळेच आमच्या ग्रुपमध्ये स्वतःची अशी खास ओळख बाळगून आहे. कोठेही जा, कधीही बघा, ही आपली कसल्या ना कसल्या गोष्टीबद्दल चुटपुटत असते. कधी ती सीरियल मधील रमाच्या पात्राबद्दल चुटपुटते तर कधी कोथिंबीर स्वस्त असतानाच का नाही भरपूर खरेदी केली - जेणेकरून सर्वांना कोथिंबीरवड्या बनवून खिलवता आल्या असत्या ह्याबद्दल चुटपुटलेली असते. कधी त्या सान्यांच्या वैशालीला तिथल्या तिथे खरमरीत उत्तर का नाही दिले म्हणून आमची मैत्रीण अस्वस्थ असते तर कधी सेलमधून आणलेली साडी चांगली नाही लागली म्हणून तिचे मन खंतावलेले असते. तिच्या ह्या चुटपुटीला कंटाळून घरच्यांनी तिचा नादच सोडलाय.... पण आम्ही पडलो मैत्रिणी... त्या ही हक्काच्या! त्यामुळे वेळोवेळी तिला दोन बोल सुनावून तिच्या चुटपुटीतून तिला बाहेर आणण्या पलीकडे काहीच करू शकत नाही. आता परवाचीच गोष्ट घ्या ना! तिच्या सासूबाईंचा षष्ठ्यब्दीपूर्तीचा कार्यक्रम होता. आमच्या मैत्रिणीने कसून मोठ्या कौतुकाने सर्व सोहोळ्याची तयारी केली होती. तिच्या काटेकोर नियोजनाप्रमाणे सोहोळा उत्तम पार पडला. निमंत्रितांची जेवणे आटोपली. पण ठरविल्याप्रमाणे त्यांना घरी विडा बनवून देण्या ऐवजी बाहेरून विडे मागवावे लागले ह्याचे आमच्या बाईसाहेबांना काय ते शल्य लागून राहिले! खरे तर कोणालाच एवढ्या छोट्याशा गोष्टीचे तितकेसे महत्त्व वाटले नाही. कारण सर्व समारंभ उत्कृष्ट झाला होता, जे जे ठरविले होते ते ते सर्व पार पडले होते. अशा वेळी आपला आनंद इतक्या लहानशा गोष्टीने का कमी करायचा? पण आमची चुटपुटसुंदरी हा sss चेहरा लांब करून बसली. शेवटी नवऱ्याला राहवले नाही. तो एकदाचा खेकसला! मग झाssले! अश्रूंचा महापूर लोटला. दुसऱ्या दिवशी मैत्रिणींना फोन करून सर्व दुःखी गाथा ऐकवून झाली. अर्थात प्रत्येकीला व्यवस्थित कल्पना असल्याने माहीत होते की आपल्या कितीही समजविण्याने हिच्यावर परिणाम होणार नाही! ह्यावर आम्हाला माहीत असलेला एकच जालीम उपाय! तिचे लक्ष दुसरीकडे वळविणे!! बऱ्याच दिवसांत एकत्र भेटलो नव्हतो, म्हटलं प्रोग्रॅम बनवूयात. आमची सुंदरी लगेच टवटवली. तिचे जोरदार प्लॅनिंग सुरू झाले. बघता बघता बाईसाहेबांचा मूड ठीक झाला आणि आम्ही सुटकेचा निःश्वास सोडला.
खरेच, काही काही लोक त्यांनी योजल्याप्रमाणे एखादी गोष्ट तंतोतंत नाही झाली तर एवढे का दुःखी होतात? त्यांना छोट्या छोट्या गोष्टींचे इतके मोठे शल्य का लागून राहते? परिस्थिती, मानवी हस्तक्षेप, इतर घटकांनी कधीही, कोणतीही गोष्ट आपल्या यशापयशाचे समीकरण बदलू शकते. आपल्याला जसे हवे तसे घडले नाही म्हणून निराश होणे, खंत करीत राहणे हे केवळ आपल्यालाच नाही, तर आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही त्रासदायी ठरू शकते! ठीक आहे! नाही घडलं तुमच्या मनासारखं! पण म्हणून किती काळ तेच ते उगाळत राहणार? किती वेळ त्यात दवडणार? त्यातून बाहेर येण्यात एवढे कष्ट का पडतात? आणि ज्यांना अशा प्रकारे सारखे सारखे चुटपुटण्याची सवय असते त्यांना पुढे पुढे इतरांची सहानुभूती मिळणे देखील बंद होते. कारण काळ हा पुढे धावत असतो. तुम्ही जर वारंवार झालेल्या घटनेलाच चिकटून बसू राहू लागलात तर काळ व लोक तुम्हाला मागे टाकून पुढे जातात. आणि मग भविष्यात कधीतरी तुम्हाला 'एवढा वेळ चुटपुटण्यात घालविला त्या ऐवजी वेगळ्या गोष्टीत घालविला असता तर बरे झाले असते' असे चुटपुटण्याची वेळ येते! आमच्या चुटपुटसुंदरीसारखे अनेक लोक भवताली दिसतात. सारे काही चांगले, सुरळीत घडत असताना देखील त्यांना एखाद्या होऊ न शकलेल्या गोष्टीची रुखरुख लागलेली असते. त्या सर्वांना आणि आमच्या चुटपुटसुंदरीला सांगावेसे वाटते, "जरा जागे होऊन आजूबाजूला बघा तरी! सगळे किती आनंदात आहेत. तुम्ही पण आनंदी व्हा. इतरांना आनंद द्या! जे नाही झाले, ते नाही झाले... त्याने खंतावून जाण्यापेक्षा जे होत आहे, घडत आहे, त्याचा आनंद घ्या.' असे एक जरी चुटपुटकुमार वा चुटपुटसुंदरी ह्या लेखाने वेगळा विचार करू लागले तरी ह्या लेखाचे सार्थक झाले!
--- अरुंधती.

No comments:

Post a Comment