Monday, January 04, 2010

नक्को नक्को रे!


"केतन, नाकात बोटं नको घालू.... "

"केतन, तुला कितीदा सांगितलंय, असा पाय हलवायचा नाही म्हणून! कुणाला लागला तर? " "अरे केतन, तिथे उभा नको राहू, कोणीतरी धक्का मारील... " एक गौरांगना बसस्टॉपवर खांद्यावरच्या जाडजूड ओझ्याच्या पिशव्यांना कसेबसे सांभाळत, बसची वाट पाहत दर मिनिटाने तिच्या बोअर झालेल्या चिमुकल्याला हटकत होती. तिच्या चेहऱ्यावरून ती दमल्याचे स्पष्ट दिसत होते. बराच वेळ थांबूनही बस आली नव्हती. आणि सुपुत्र 'केतन' अतिशय बोअर झालेल्या अवस्थेत स्वतःचे मनोरंजन करू जाता त्याला वारंवार हटकण्यात येत होते. खरं तर आपल्या हटकण्याने मुले खरोखरीच त्यांना करावयाच्या गोष्टी थांबवतात का? थोडा वेळ ऐकल्याचे दाखवतील कदाचित! पण जरा तुमचे लक्ष दुसरीकडे वळले की पुन्हा आपले ह्यांचे उद्योग सुरुच! मग तरीही आपण त्यांना सारखे सारखे का हटकत राहतो? त्या ऐवजी त्याला एखाद्या खेळात, गाण्यात गुंतवता आले तर? उदाहरणार्थ, तिथे ती माता तिच्या मुलाचे लक्ष रस्त्यावरच्या विविध गोष्टींकडे वेधू शकली असती.... जसे, तुला रस्त्यात किती दिव्याचे खांब दिसतात? आपण रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षा मोजूयात. किंवा समोरच्या फळवाल्याकडे कोणती फळे दिसत आहेत रे? इत्यादी इत्यादी. आपण मुलांशी अनेकदा संवाद साधायचे विसरून जातो. आणि ती बोअर झाल्यावर जे काही करतात त्यावर नकारात्मक शेरे ओढत राहातो. माझ्या मैत्रिणींच्या, परिचितांच्या अनेक मुलांमध्ये मी हीच गोष्ट पुन्हा पुन्हा पाहिली आहे. मोठ्यांना जेव्हा त्यांच्याकडे लक्ष द्यायला फुरसत नसते, ते आपल्या गप्पा-कार्यक्रमांत मश्गुल असतात तेव्हा ही मुले आपल्या आईवडीलांचे लक्ष वेधून घ्यायला असेच काहीबाही उद्योग करत असतात. कधी पाणीच सांडून ठेव, कधी पसारा कर, कधी कोणा दुसऱ्या पोराला त्रास दे, कधी मांजरीची शेपटीच ओढ.... त्यात त्या मुलांचा तरी काय दोष असतो म्हणा! त्यांना तुम्हाला काही तरी इंटरेस्टिंग दाखवायचे असते.... अगदी रस्त्यात पडलेल्या चॉकलेटच्या चांदीपासून ते त्यांच्या मोज्याला पडलेल्या भोकापर्यंत! पण आपल्यालाच त्यांच्याकडे पहायला वेळ नसतो. रोजच्या रामरगाड्यात दमछाक होईपर्यंत धावताना त्यांच्या चिमुकल्या विश्वाचा आपल्यालाच अनेकदा विसर पडतो. ती मात्र सदैव आपल्याला त्यांच्या जगात घेऊन जायला उत्सुक असतात. आपल्यालाच त्यांच्या विश्वात डोकावायची सवड नसते. आणि त्यातून कित्येक वेळा आपला धीर संपुष्टात येतो.... एवढ्या वेळाच्या प्रतीक्षेनंतर एकदाची बस आली. केतनचे बखोट पकडून केतनची आई बसमध्ये चढली. चढतानाही सूचनांचा सपाटा आणि तोंडाचा पट्टा चालूच होता. "नीट चढ. तिथे हात लावू नकोस - हात खराब होतील. पुढे धावू नकोस. खिडकीतून हात बाहेर काढू नकोस. तोंडात बोटं घालू नकोस.... " नकोस, नकोस, नकोस आणि पुन्हा नकोस! मान्य आहे, सर्व काही त्याच्याच भल्यासाठी आहे. पण सारखा 'नको' चा पाढा लावणे टाळून हेच वेगळ्या पद्धतीने समजावता आले असते. आजकालच्या पद्धतीप्रमाणे पालक हल्ली एकाच मुलाला जन्म देणे पसंत करतात....त्याच्यावर सर्व वस्तूंचा वर्षाव करतात, त्याचा प्रत्येक हट्ट पुरवितात आणि मग त्याचबरोबर त्या मुलाची प्रत्येक कृती स्कॅनरखाली येते. त्यातून असा 'ना' चा पाढा असेल तर अजूनच आनंद! चिमुकला केतन थोड्याच वेळात बसच्या खिडकीतून रस्त्याकडे पाहत रमून गेला व त्याच्या आईने हुश्श करीत आपले लक्ष इतरत्र वळवले. आता पुरता तरी तो स्थिरावला होता. सगळीकडे टकामका डोळ्यांनी पाहत होता. पण त्याची ही स्थिती फार काळ टिकणारी नव्हती. हे बहुधा त्याच्या आईला देखील माहित असावे. म्हणूनच ती डोके मागे टेकवून, डोळे मिटून थकलेल्या बॅटरीज रीचार्ज करत असावी. तेवढ्यात समोरच्या रस्त्यावरून एक उंट जाताना केतनला दिसला. तो लगेच, "मम्मा, उंट बघ" म्हणून किंचाळत खिडकीतून हात बाहेर काढू लागला. "केतन, किती वेळा सांगितलंय असला वेडेपणा करायचा नाही म्हणून! आधी हात आत घे.... पुन्हा हात बाहेर काढायचा नाही.... आणि असा उसळ्या मारू नकोस रे, माझा ड्रेस खराब होतोय.... " तेवढ्यात त्यांचा स्टॉप आला. मायलेक दोघेही खाली उतरले.... लेक आईच्या हाताला लोंबकळत होता. "अरे, असा लोंबकळू नको रे.... " बसचा थांबा आला, प्रवास संपला पण केतनच्या आईचा 'नको' प्रवास अद्याप जारीच होता.....
--- अरुंधती.

4 comments:

  1. व्वा ! सुंदर लिहिलय. नुस्तच नाही, नकोची बाजु न लिहिता "काय करायला हवे" हेही छान लिहिलय, जे अधिक महत्वाचं आहे :)

    ReplyDelete
  2. mastach lihile aahes
    sonali

    ReplyDelete
  3. mastach lihile aahes
    sonali

    ReplyDelete